मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

नावडतीचं मीठ अळणी

#नावडतीचं_मीठ_अळणी 

स्निग्धा आणि मुग्धा या दोघी जिवलग मैत्रिणी होत्या. शाळा कॉलेजपर्यंत एकत्र असणाऱ्या त्या लग्नानंतर मात्र वेगवेगळ्या शहरात शिफ्ट झाल्या होत्या.
मुग्धाच्या अंगावर बऱ्यापैकी जबाबदाऱ्या असल्याने तिला शक्यतो बाहेरच्या गोष्टींमध्ये फारसं पडण्यासाठी वेळ मिळत नव्हता, तर स्निग्धाचा मात्र छोटासं कुटुंब असल्यामुळे घरातल्या आणि बाहेरच्या गोष्टी मॅनेज करत तिला बॅलन्स राखावा लागत होता. 
मुळातच पहिल्यापासून या दोघी इतरांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या असल्यामुळे नवीन शहरात सुद्धा त्यांनी इतर व्यक्तींबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण घरातल्या व्यक्ती सोडल्या तर बाहेरच्या लोकांबरोबर जुळवून घेताना त्यांना बऱ्यापैकी विचित्र अनुभव आले. 
आधी उत्साहाने बोलवणाऱ्या सोसायटीतल्या बायका मुग्धाला टाळतात हे तिच्या लक्षात आलं होतं. तर अशीच गोष्ट स्निग्धाच्या बाबतीत ऑफिसमध्ये घडली होती. 
एका सुट्टीत जेव्हा त्या दोघी एकमेकींना भेटल्या. तेव्हा एकमेकींसोबत चर्चा करताना त्यांनी आपल्या मनातली ही खदखद एकमेकींसमोर व्यक्त केली. 
मुग्धाच्या बाबतीत घडलेली गोष्ट ऐकल्यानंतर नकळतच स्निग्ध म्हणाली, " मुग्धे कदाचित असं असू शकेल का? म्हणजे बघ तू एकत्र कुटुंब बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेस. आणि तुझ्या आजूबाजूला बऱ्यापैकी छोटी कुटुंब आहेत. तू जरी इतरांना स्वतःसारखं वागा म्हणून जबरदस्ती करणार नसलीस तरी कुठे ना कुठेतरी त्यांच्या मनात याबद्दल वेगळे विचार असू शकतात. आणि त्याच असुरक्षिततेमुळे ते सर्वजण तुला टाळत असतील." 
यावर मुग्धा म्हणाली, " बरोबर आहे तुझं! मी त्या दृष्टिकोनातून विचार केलाच नव्हता. आता मी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवीन की इथे प्रॉब्लेम माझ्या वागण्यामध्ये नसून इतर व्यक्तींच्या मनात असलेल्या असुरक्षिततेबद्दल आहे. आणि त्याबाबतीत मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने एक्सेप्ट करायला हव्यात." 
स्वतःच्या समस्येवर काही अंशी उत्तर मिळाल्यानंतर अचानकच मुग्धा स्निग्धाकडे बघून म्हणाली, " स्निग्धा, तुझ्या बाबतीत पण तर असच झालं असेल असं नाही का वाटत तुला?? म्हणजे बघ तू तुझ्या कामात पहिल्यापासूनच एफिशियंट आहेस. त्यामुळे जॉब सुरू केल्यापासून तू इतरांपेक्षा लवकर प्रमोशन्स मिळवले आहेत. शिवाय तुझ्या कामात चुका नसतात त्यामुळे बऱ्याचदा तू कौतुकास पात्र असतेस. कुठे ना कुठेतरी ही गोष्ट सुद्धा तुझ्या इतर सहकारी व्यक्तींच्या मनात ईर्षा आणि असुरक्षितता निर्माण करत असेल. पण पुन्हा आपण तेच म्हणूया की हा त्यांचा प्रश्न आहे आपला नाही. आपल्याला आपल्या दिशेने येणाऱ्या या अशा वागण्याला हॅण्डल करणे मात्र शिकायला हवं हे नक्की." 
हे ऐकल्यावर स्निग्धा म्हणाली, " परफेक्ट, आत्ताच बघ ना बोलता बोलता आपल्याला एकमेकींच्या प्रश्नांवर उत्तरं सापडली. बाकी काही असो नसो पण आपण आपल्या मनातल्या गोष्टी एकमेकींकडे व्यक्त करण्यासाठी तरी निदान आपण वेळ काढायलाच हवा." 

मुग्धा आणि स्निग्धाला तर त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं. पण तुम्ही सुद्धा जर अशा सिच्युएशन्स फेस करत असाल तर कदाचित तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम सोल्युशन पुढे मिळेल... त्यासाठी वाचत राहा... 

एखाद्या व्यक्तीला जेंव्हा आपण आवडत नसतो. तेव्हा ती व्यक्ती तिचे आपल्याबद्दलचे विचार कुणासोबत तरी शेयर करते. आणि बऱ्याचदा आपल्याला जाणीव होण्याआधी आपला तिरस्कार करणाऱ्या, आपण न आवडणाऱ्या लोकांचा एक मोठा ग्रुप तयार झालेला असतो. तुम्ही सुद्धा हे अनुभवलं आहे का? 
कधी न कधीतरी प्रत्येक जण ही गोष्ट अनुभवतोच. 
तर असो आज आपण याच परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

तुम्ही तटस्थपणे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की यामागे तुमच्याबद्दल असणारा तिरस्कार हे कारण मुळात नसतेच. मग काय कारण असते? त्यामागे असते ती तुमची खरी पॉवर... तुमचा या सगळ्या व्यक्तींवर असणारा प्रभाव. जो सहन न झाल्याने तुमच्याविषयी नकारात्मक विचार मनात असणाऱ्या व्यक्ती एकत्र येतात. मुळात तुमचे व्यक्तिमत्व कसे असते की ज्याला कितीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तरी टाळता येत नाही. त्यामुळे या सगळ्या व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल बोलत असतात, तुमच्याबद्दल विचार करत असतात आणि त्यांचे एकमेकांसोबत असणारे नातेच मुळात तुमच्याविषयी असणाऱ्या भावनांमुळे असते. यालाच प्रभाव असे म्हणतात. 

पण तुम्हाला माहित आहे का त्यातली महत्त्वाची गोष्ट काय आहे??? तर या सगळ्या लोकांचा हा नकारात्मक स्वभाव तुम्ही कसे आहात ते ठरवत नाही. मुळात तुमचा स्वभाव तुम्ही या सगळ्या नकारात्मकतेला कशा पद्धतीने प्रतिसाद देता त्यावर ठरतो. जर तुम्ही या सगळ्या व्यक्तींचे वागणे मनावर घेतले तर सहाजिकच आहे की त्याचा तुमच्या मनस्थितीवर चुकीचा परिणाम होतो. पण जर तुम्ही या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले. ते म्हणजे की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला विरोध करण्यासाठी सुद्धा लोकांना एकत्र यावे लागते. तर सहाजिकच आहे तुमच्या आत्मविश्वासामध्ये भर पडते. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने विचार करू लागतात तेव्हा आपोआपच तुम्ही स्वतःच्या बाबतीत चांगल्या गोष्टी आकर्षित करायला सुरुवात करतात. तुम्हाला मनापासून प्रोत्साहन देणारे, पाठिंबा देणारे आणि तुमच्या सोबत नातं जोडण्यासाठी तयार असणाऱ्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतात. 

सो, इतरांच्या दृष्टिकोनातून स्वतःला बघून स्वतःमध्ये बदल घडवण्यापेक्षा तुम्ही जसे आहात तसेच स्वतःला स्वीकारा. कारण जेव्हा तुम्हाला विरोध करण्यासाठी लोक एकत्र येतात. तेव्हा एक लक्षात घ्या - तुमचा स्वतःचा प्रवास सुद्धा एका वेगळ्या आणि प्रभावी दिशेने सुरू झालेला असतो. 
स्वतःला शोधताना _ गौरी हर्षल 2/ 2025 
गौरी हर्षल कुलकर्णी 
एम ए क्लीनिकल सायकॉलॉजी आणि समुपदेशन
 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: