कालाय तस्मै नमः भाग ९ ते ११

कालाय तस्मै नमः| भाग ९

सरप्राईज

 अंगणात छानपैकी टेबल मांडलं होता. त्याच्या पलीकडे सगळी नातवंडं हातात Happy birthday चे एकेक अक्षर स्वतःच्या मोडक्या तोडक्या अक्षरात लिहिलेले बोर्ड घेऊन उभी होती. मागे सगळी मुलं मुली त्यांच्या जोडीदारासोबत उभे होते.  

माईही त्यांच्या ह्या सरप्राईज मध्ये सामील होत्या. आज तारखेने अन् दुसऱ्याच दिवशी तिथीने काकांचा 75 वा वाढदिवस होता. त्याचीच गुपचूप तयारी करून सगळे जण जमा झाले होते. काकांसाठी जसे ते सरप्राईज होते तसे सकाळपर्यंत माईंसाठीही होते. पण सकाळी भास्कर ला आलेला फोन माईनी उचलला आणि पलीकडून अशोकचा आवाज आला की अरे आम्ही सगळे शेजारच्या पाटलांच्या वाड्यात आलो आहोत तुम्ही कधी पोहोचत आहात. अजून सगळी तयारी करायची आहे. ते ऐकल्यावर माईनी त्याला रागातच विचारले, मग काय माईना सामील करावेच लागले. 

शेजारच्या वाड्यात तसेही कुणी नसायचे त्यामुळे सगळ्यांना तिथे तयारी करणे सोपे झाले. रात्री उशिरापर्यंत जागून सगळे जण गप्पा मारत होते. बऱ्याच वर्षांनी सगळ्या मुलां-नातवंडांना आजूबाजूला बघून काकांनाही छान वाटत होते. शेवटी गायत्री सगळ्यांना ओरडली,"अरे उद्याही बरेच काम आहे चला झोपा आता." तसे सगळेजण एकेक करून झोपायला गेले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लवकरच उठले होते. घरात पूजा होणार होती. आणि संध्याकाळी बाहेर एक हॉल घेऊन ओळखीच्या लोकांसाठी मेजवानी होती. त्याचे आमंत्रण, तयारी हेच सगळे जण करत होते. तिन्ही मुली सकाळीच माई काकांच्या खोलीत आल्या. हातात सामानाच्या पिशव्या होत्या. 

गायत्री म्हणाली, “काका, हे आम्हा तिघींकडून तुमच्या दोघांसाठी संध्याकाळी घालून या.” काका काही बोलणार तेवढ्यात धाकटी रोहिणी म्हणाली, “आधी उघडून तर बघा म्हणजे आम्हालाही कळेल तुम्हाला आमचं गिफ्ट आवडलं का?” माईंसाठी पैठणी आणि काकांसाठी धोतर कुर्ता होता, ते ही खास तयार करून घेतलेले. त्यासोबतच काकांसाठी सोन्याची चेन होती. 

मैथिलीही म्हणाली, “काका तुम्ही दोघांनी आजपर्यंत आमच्यासाठी जे केलं आहे ही काही त्याची परतफेड नाही. दरवेळी हक्काने तुमच्याकडून घेताना वाटायचं आपणही द्यावं. मग सहजच ही कल्पना आली आणि आम्ही तिघीही पैसे जमवत राहिलो. आणि त्यातून हे घेतले. हे पैसे आमचे आहेत तुमच्या जावयाचे नाहीत त्यामुळे अजिबात काही मनात येऊ देऊ नका. आणि हो आम्हाला फक्त तुमचे आशीर्वाद हवे आहेत बाकी काही नको. आता पटकन तयार होऊन या.” 


दुपारपर्यंत पूजा आटोपली, सगळ्यांची जेवणेही झाली. तोपर्यंत चार वाजतच आले होते. श्रीपाद आणि श्रीधर आता सगळ्यांना स्पेशली महिलामंडळाला आवरण्यासाठी घाई करू लागले. कार्यक्रम जरी ७ वाजता असला तरी वेळ तर लागणार होताच. छानपैकी आवरून सगळेजण हॉलवर पोहोचले. पाहुणे आधीच येऊन पोहोचले होते. 

माई आणि काकांसाठी दरवाजातून ते बसण्याची व्यवस्था केलेल्या जागेपर्यंत मस्त पाकळ्यांनी पायघड्या घातल्या होत्या. सगळं बघताना काकांना अगदी भारावून गेल्यासारखं झालं होतं. आप्तेष्ट, मित्रमंडळी कौतुकाने सगळा सोहळा बघत होते.

श्रीधर, विजय आणि अशोकनेच जवळपास सगळं ठरवलं होतं. काकांच्या जवळची असणारी मंडळी त्यांच्याबद्दलच्या मजेशीर आठवणी सांगणार होते. मुलांनी लहानपणीचे किस्से सांगितले. सुनांनी आणि नातवंडांनी मिळून एक छोटेसे नाटुकले सादर केले. 

सगळे झाल्यानंतर ओळखीचेच एक गायक त्यांची कला सादर करणार होते. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता. सगळ्यात शेवटी सगळे जण निवांत बसलेले असताना अशोकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत स्टेजकडे बघण्यास सांगितले. मागे असणाऱ्या भिंतीवर एक मखमली पडदा लावलेला होता ज्याचे अनावरण काका करणार होते. त्याने माई आणि काकांना स्टेजवर बोलवले. 

बसलेल्या जागेपासून ते स्टेजवर जाण्यासाठी सगळी नातवंडं त्यांना नेण्यासाठी आली. स्टेजवर आल्यावर काकांनी रिबीन ओढत पडदा सरकवला.

 एक सुरेख कोलाज होतं हाताने तयार केलेले. घरातील प्रत्येकाचे फोटो त्यात होते. सोबतच एक छानसा अल्बम होता जो सगळ्या मुलांनी काकांना दिला. त्यात काकांच्या लहानपणापासूनच्या आठवणी होत्या फोटोरूपाने. नकळतच काकांचे डोळे भरून आले. मग काकांनीही आपल्या काही छान आठवणी,बालपणीचे किस्से सांगितले. शेवटी माईंच्या आवाजातले एक सुरेल गाणे सादर होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. 

सगळे दिवस सारखे नसतात दुःखामागून सूख आणि सुखामागून दुःख ह्यांच्यामुळे तर जगण्याची आस कायम राहते. तसेच चांगलं आणि वाईट ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

कुठलीही व्यक्ती कधीच पूर्णपणे चांगली किंवा वाईट नसते. ते सर्वस्वी परिस्थितीवर आणि निर्णयावर अवलंबून असते. माणसं चुकतातच, मग ते कुठल्याही नात्यात असुदे, कुठल्याही वयाचे असुदे. पण चुकांमधून योग्य तो धडा घेत जो पुढे जातो तो शहाणा ठरतो. 
  
   हे लिहिण्याचं कारण आपल्या कथेतही वाईट व्यक्ती आहेत पण त्या सतत २४ तास तशाच नसतात. त्यांच्याही आयुष्यात असे काही क्षण येतात जिथे काही वेळासाठी का होईना त्यांना आपण चुकीचं वागतोय ह्याची जाणीव होते. आणि नकळतच ते चांगलं वागून जातात. ह्यालाच तर काळाचा महिमा असं म्हणतात ना. 

आपल्या आजूबाजूला सुद्धा असे अनेक जण असतात. आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळी मध्ये जे इतरांच्या सुखात मिठाचा खडा टाकण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. पण अश्या लोकांना कित्येकदा स्वतःच्या वागण्याची जाणीव होते. आणि ते चांगलही वागतात. 
मग आपणही त्यांना तोडून टाकत नाहीच जसे आहेत तसे स्विकारत जगत असतोच. 

इथेही सगळं छान झालं म्हटल्यावर ललिताच्या पोटात दुखत होतच. तिच्या धुसफूस करण्याचा परिणाम अश्विनीवरही झाला होता. ती ही काही न काही खुसपट काढून कार्यक्रम नासवण्याचा प्रयत्न करत होती. पण ह्या वेळी अशोकनेच सगळी परिस्थिती बघत त्या दोघींनाही दमात घेतले होते. 

श्रीपादवर त्याचा कितीही राग असला तरी माई आणि काका त्याचे जन्मदाते होते. आणि त्यांच्या आनंदावर त्याला विरजण पाडायचे नव्हते. 

मुलं सुना , लेक जावई , नातवंडं ह्या सगळ्या गोतावळ्यात माई आणि काकांना खुश बघून अशोक आणि त्याच्या जोडीला श्रीधरलाही कुठेतरी काही वेळासाठी आपल्या वागण्याची लाज वाटली होती. 

"ललिता, अश्विनी आज इथे कसलाही तमाशा व्हायला नकोय. माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे आणि तो आनंदातच साजरा झाला पाहिजे. तुम्हाला दोघींनाही त्रास होत असेल तर मी तुम्हाला गाडी आणि ड्रायव्हरची सोय करून देतो. तुम्ही आपापल्या माहेरी निघून जा. मी आणि विजय मुलांना घेऊन नंतर थेट आपल्या घरी येऊ.", अशोकनेच त्या दोघींना सांगितलं. 

आता अशोकच असं म्हणत आहे म्हटल्यावर त्या दोघींनाही काही बोलता आलं नाही. मन मारून का होईना हसतमुख चेहऱ्याने त्यांना त्या सगळ्यात सामील व्हावे लागले. 

आणि आधी नाईलाजाने सहभागी झालेल्या त्या दोघीही नकळतच सगळ्यात मिसळून गेल्या. 

रात्री झोपताना राहून राहून आजचा दिवस काकांच्या डोळ्यांसमोर येत होता. ह्या सगळ्या आठवणी मनाच्या कप्प्यात जपून ठेवण्याचा निर्णय घेत त्यांना झोप लागली. 
बऱ्याच दिवसांनी आपल्या माणसांसोबत एक मनासारखा दिवस सगळेच जगले होते. आजच्या दिवसाने सगळ्यांना आठवणींचा एक मोठा खजिना दिला होता. 

काकांना कित्येक दिवसांनी असं शांत झोपलेलं बघून माईंना बरं वाटलं. त्याही काही वेळातच निद्रेच्या आधीन झाल्या. 

श्रीपादला मात्र कुठेतरी हे सगळं जसं दिसत आहे तसेच कायमस्वरूपी राहणार नाही ह्या गोष्टींची जाणीव झाली होती. शेवटी मानवी स्वभावाला औषधं नसते. पण अरुंधती गेल्यापासून तो ह्या सगळ्या गोष्टींकडे त्रयस्थपणे बघत होता. 

कैवल्यची जबाबदारी तर त्याची होतीच पण भविष्यात स्वराचीही जबाबदारी त्यालाच घ्यावी लागणार होती. 

त्रयस्थपणे निरीक्षण करून तो सतत सगळ्यांच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता. जेणेकरून त्यांच्या स्वभावातील खुनशीपणाचा अंदाज बांधता येईल. आणि त्याच्या परीने काही गोष्टींना आवर घालता येईल. 

असो तर इथेही अशाच काही क्षणांमुळे सगळ्या वाईट गोष्टींचा विसर सगळ्यांनाच पडला. आणि दिवस आनंदात गेला. पुढचा दिवस त्याचं रहस्यमय गाठोडं घेऊन तयारीतच होता. 
_____________________________________

कालाय तस्मै नमः| भाग १०

खेळ मनाचे 

वाढदिवस साजरा झाला. एक दिवस थांबून सगळे आपापल्या घरी परत गेले. कुणी आनंदाची शिदोरी घेऊन तर कुणी दुसऱ्याचं नीट का सुरू आहे ह्या दुःखात. 

माणसाचं मन मोठं विचित्र असतं. त्याला स्वतःच्या समोरचं हात पसरून बोलावणारं सुख दिसत नाही, दुसऱ्याच्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टी खुणावतात. त्या बघून त्याचा इगो सुखावतो. मग मनातून नकळतच तो हा खेळ सुरू करतो. आपल्याच जवळच्या माणसांचं चांगलं झालेलं बघून दुःखी होण्याचा. पण त्याला हे कळत नाही की जे आपण दुसऱ्याच्या बाबतीत घडू दे असं म्हणत आहोत त्याला आपल्याही नकळत आपल्याच आयुष्यात आपण बोलवत आहोत. 

कर्म ही गोष्ट तो पूर्णपणे विसरतो, जे देऊ तेच परत मिळणार. ही खूप महत्त्वाची आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे बघू या जमतंय का ते.

आता गणपतीतच सगळे जण एकत्र येणार होते. तोपर्यंत प्रत्येकाची आपापली कामं होती, जबाबदाऱ्या होत्या. सगळी छोटी मुलंही आपसात काय मज्जा करायची हे ठरवून मोकळी झाली होती. 

स्वरा आता घरात एकटी मुलगी नव्हती. तिच्यानंतर तिघींचा जन्म झाला होता. त्यामुळे आपल्यालाही खेळायला कुणीतरी आहे म्हणून ती खुश असायची. लहान मुलं निरागस, निष्पाप असतात. 

कपट, ईर्षा, राग हे सगळं ती हळूहळू अनुकरणातून शिकतात. आपले आईवडील कुणाच्या समोर कसे वागतात आणि मागे कसे वागतात ह्यावर त्यांचं बारीक लक्ष असतं. काही वेळा प्रश्न विचारतात तर कधी कधी ते स्वतःच उत्तर शोधून काढतात. पण ह्यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडत जातं. इथेही असंच काहीसं घडत होतं. मुलांच्याही नकळत मुलांना आपल्याच भावंडांशी वैरभावनेने वागण्याची तालीम मिळत होती. 

श्रीधर-मंदा, विजय-ललिता, अश्विनी-अशोक ह्याचं मनातून जरी एकमेकांशी पटत नव्हतं तरी ते ठरवून एकत्र येत होते. ह्यामागचा हेतू अर्थातच अजून कुणीही बोलून दाखवला नव्हता. सध्या तरी 'तेरी भी चूप मेरी भी चूप' असं होतं. पण लवकरच काहीतरी घडणार होतं ज्यामुळे ह्या सगळ्यांची आयुष्यं एक यु टर्न घेणार होती. 

त्या दोन व्यक्ती गेले बरेच दिवस शांतपणे सगळं बघत होत्या. त्यांना जी तयारी करायची होती ती जवळपास पूर्ण झाली होती. पण पुढचा प्लॅन अंमलात आणण्यासाठी त्यांना अजून काही जणांना आपल्या कटात सामील करून घ्यावे लागणार होते. तसे त्यांचे चाचपणे सुरू होते. आणि तो दिवसही आला जेव्हा त्यांना त्यांचा तिसरा साथीदार मिळाला होता. त्याला सगळी योजना त्यांनी समजावून सांगितली. जमेल तशी त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आता फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघावी लागणार होती. ह्यावेळी हा खेळ कसा खेळला जाणार आहे हे अजून गुलदस्त्यातच होते. 

श्रावण आला तशी सणांची रेलचेल सुरू झाली. वाड्यावरही माई उत्साहात सगळं काही करत होत्या. पण हल्ली त्यांची तब्येत फारशी साथ देत नव्हती. संगीता जबरदस्ती त्यांना आराम करायला लावत होती. पण माईंचं काही एका जागी बसणं होत नसे. अशातच गणपती जवळ आल्याने दुप्पट उत्साहाने त्या हे करू ते करू म्हणू लागल्या. शेवटी काकांनी रागावून त्यांना सक्तीची विश्रांती घेण्यास भाग पाडले. 

दोन दिवस आधीच बाकीच्या सुना आणि नातवंडं येणार होती. काकांच्या लेकीही ह्या वर्षी येणार होत्या. मुलं मात्र नंतर येणार होती गणपती गौरीच्या दिवशीच विसर्जित होणार असल्याने कुणी बसण्याच्या दिवशी तर कुणी विसर्जनाच्या दिवशी येणार होते. एकंदरीत वातावरण छान होते. पण त्या सगळ्याचा मागे हलक्या पावलाने अजून कुणीतरी येणार होते की आले होते?

बाप्पाचं आगमन झाले तसा घरात एक वेगळा उत्साह होता. एकीकडे त्याच्या येण्याने सगळं नीट होईल अशी अपेक्षा होती तर दुसरीकडे कुणीतरी आपलं जाळं पसरवत होते.
 
घर जरी मोठे असले तरी सगळे एकत्र आल्यानंतर ओसरीतच झोपत असत. तेथेच अंथरूण घातल्यावर मुलांची दंगामस्ती सुरू झाली. सगळे जण मुलांना एकेक करून पकडून झोपवण्याचा प्रयत्न करत होते. कुणीतरी मात्र कधी हा गोंधळ संपतोय ह्याची वाट बघत होते. कारण आजच त्यांचा प्लॅन सुरू होणार होता. थोड्याच वेळात सगळे निद्रेच्या आधीन झाले. 

एक भयंकर शांतता जाणवू लागली. त्या तिघांनाही आता काम संपवण्यासाठी घाई झाली होती. पण ह्यावेळी कुणीतरी बघू नये अशा व्यक्तीने त्यांना बघितलं होतं. ते त्यांच्यामधील एकाच्या लक्षात आलं होतं. इतर दोघांना कळू न देता त्या बघणाऱ्याचा काटा काढायचा असे त्याने स्वतःशीच ठरवले. 

रात्रीच्या अंधारात त्या तिघांची खुसफूस सुरू होती. सगळ्यात मोठी व्यक्ती होती तिने विचारलं, “झालं का सगळं सांगितल्याप्रमाणे?” दुसरीने मान डोलवत हो असं. उत्तर दिलं. एक खुनशी हास्य एकाच वेळी त्यांच्यासह अजून काही चेहऱ्यांवर उमटलं. 

"ह्यावेळी जर आपला प्लॅन यशस्वी झाला तर बरंच काही साध्य होईल." पहिली व्यक्ती

"पण कशावरून मागच्या वेळेस जशी अरुंधती आडवी आली तसा ह्यावेळी श्रीपाद येणार नाही?" , दुसऱ्या व्यक्तीने आपल्या मनातली शंका बोलून दाखवली. 

"असं नाही होणार , कारण सध्या श्रीपाद त्याच्या मुलामध्ये गुंग आहे. त्यामुळे आपण त्याच्या नाकाखाली काय करत आहोत हे त्याच्या सहजासहजी लक्षात येणार नाही. आणि जोपर्यंत त्याच्या लक्षात येईल, तोपर्यंत आपलं सावज आपल्या ताब्यात आलेलं असेल.", पहिली व्यक्ती ज्या आत्मविश्वासाने म्हणाली ते बघून इतर दोघांना आता आपलं काम १००%पूर्ण होणारच अशी खात्री पटली. 

पण माणूस जसं ठरवतो तसच कधीही घडत नाही. व्यक्ती चांगलं वागणारी असुदे किंवा वाईट वागणारी असुदे, नियती प्रत्येकाचा प्लॅन फिस्कटवण्यासाठी तयारीत बसलेली असते. 

चांगल्या किंवा वाईट कुठल्याही मार्गावर यश इतक्या सहजपणे ओंजळीत येऊन पडत नाही. 

कृतीमध्ये, कष्टांमध्ये सातत्य असेल तरच गोष्टी घडतात. 

त्या तिघांचं बोलणं ऐकणार्या व्यक्तीला त्या तिघांच्याही मनात खदखदत असणाऱ्या रागाचा, द्वेषाचा अंदाज आला होता. पण उघडपणे समोर गेलं तर त्याने गोष्टी नको त्या थराला जाण्याची शक्यता होती म्हणून ती व्यक्ती शांत बसून सगळं ऐकत होती. 

उद्याची सकाळ कुणाच्या तरी आयुष्यात बरेच काही बदल घडवून आणणार होती. 
हे सगळं शांतपणे बघणाऱ्या त्या व्यक्तीने मात्र नकळतच वरती बघून हात जोडले आणि कालाय_तस्मै_नमः| म्हणत सगळं काही त्याच्यावर सोपवलं. 

त्या तिन्ही व्यक्ती आता घरातले सगळे झोपले होते तिथे आल्या. सगळी मुलं गाढ झोपेत होती. त्यातच त्यांचं टार्गेटही होतं. जगातल्या छक्क्या पंजाची कल्पना नसलेलं ते लेकरू आपल्याच स्वप्नातल्या विश्वात रमून झोपेतच खुदूखुदु हसत होते. उद्यापासून आपल्या आयुष्यात काय होणार आहे ह्याची काडीमात्र खबर त्याला नव्हती. पुढे काय होणार हे येणारी वेळच सांगू शकत होती...

वरवर पाहता आपल्याला बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य खूप छान चाललं आहे असं वाटतं पण खरी परिस्थिती काही वेगळीच असते. कुणीतरी आयुष्यभर भरल्या घरात एकटे असते. कुणीतरी सगळी भौतिक सुखं पायाशी असूनही त्यांचा उपभोग घेऊ शकत नसते. 

अशी बरीच दुःख असतात जी उघडपणे सांगता येत नाहीत पण ती व्यक्तीच्या मनावर नकळत आघात करत असतात.
 हा सुडाचा खेळ कशासाठी? 

काहीवेळा माणसाकडे पैसा तर भरपूर असतो पण ते नसतं ज्याच्यासाठी तो जगत असतो. अशा गोष्टी ज्या पैशांनी विकत घेता येत नाहीत. आणि त्या मिळवण्यासाठी स्वतःच्या वाईट स्वभावाला मुरड घालणे ह्या लोकांना शक्य नसते. म्हणून मग मनात सुडाची भावना जागी होते आणि कधी व्यक्ती तिच्या प्रभावाखाली जातो त्यालाही कळत नाही. 

तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या जर कुणी आपल्यावर जळत असेल तर दुर्लक्ष करा किंवा आपल्याला कुणाबद्दल असे वाटत असेल तर मनोमन त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करा. ईर्षेपोटी कधीही कुणाचं वाईट चिंतू नका.
_____________________________________

कालाय तस्मै नमः| भाग ११

ललिताच्या अचानक येण्यामागचे रहस्य

वाड्यावर नेहमीप्रमाणे आता दिनक्रम सुरू होता. पण माईंमध्ये झालेला बदल काकांना जाणवला होता. हल्ली त्या जास्त वेळ स्वरासोबत घालवत होत्या. सतत तिला काही न काही सांगत होत्या. पाचच वर्षाचं ते लेकरूही जमेल तसं सगळं समजून घेत होतं. काकांना अंदाज आला होता पण त्यांना नेमकं काय घडलं आहे ते माईंच्या तोंडून ऐकायचं होतं. 

गणपती होऊन काही दिवस झाले होते. त्यामुळे आता तसा निवांत वेळ होता दोघांकडे. अशातच एके दिवशी विजय आणि ललिता त्यांच्या जुळ्या लेकींसह - सई आणि जुई - गडबडीत आले होते. विजयला एका मोठ्या कामासाठी काही दिवसांसाठी परदेशी जायचं होतं. तसा तो आधीही गेला होता त्यामुळे ह्याचवेळी अचानक त्याने बायको मुलींना इकडे आणून सोडलं तेव्हा काकांना जरा आश्चर्यच वाटलं. 

इथे माईंच्या अस्वस्थतेमध्ये मात्र भर पडली होती. का कुणास ठाऊक पण ललिताचं वावरणं काकांनाही विचित्र वाटत होतं. पण पुरुष माणूस, त्यात सासरे, मग कसं बोलणार म्हणून ते गप्प होते. कारण ललिता तशी फारशी घरच्या लोकांमध्ये मिसळणारी नव्हती. ती सगळ्यांशीच फटकून वागत असे. माहेरच्या संपत्तीचा आणि स्वतःच्या सौंदर्याचा जरा जास्तच गर्व होता तिला. पण एकत्र कुटुंब असल्याने फारशी वेगळी वागणूक तिला कधी कुणी दिली नव्हती. ती माई काकांशीही कामापुरतंच बोलत असे. ते ही तिच्यापासून थोडेसे दूरच राहायचे. मुलाचा संसार नीट चालावा हीच त्यामागे त्यांची इच्छा असायची. पण ह्यावेळी मात्र तिच्या वागण्यात फारच बदल झाला होता. तो वरून चांगला दिसत असला तरी चांगला भासत नक्कीच नव्हता. 
     

माईंना आपल्याला काही तरी सांगायचे आहे हे काकांना जाणवले होते. पण माई बोलण्यासाठी आसपास आल्या की ललिता काहीतरी काम काढून तिथेच घुटमळत असायची हेही त्यांच्या लक्षात आले. शेवटी त्यांनी माईंना एका ओळखीच्या कडे भेटायला जायचे आहे असे सांगून बाहेर निघण्याचे ठरवले. दोघेही निघणार तेवढ्यात आतून जिवाच्या आकांताने मारलेली किंकाळी ऐकू आली. माईंच्या छातीत धस्स झाले. त्या वेगाने घराच्या आतल्या बाजूला गेल्या तर जुई डोक्यावर पडली होती. आजूबाजूला रक्ताचा सडा होता. ललिताने रडत रडत जुईला उचलले आणि बाहेर आली. परंतु बाहेर येताना तिने जर तोंड उघडले तर मग काय होईल कळले ना असा कटाक्ष माईंकडे टाकला. 

माईंचं लक्ष जाताच त्यांचा चेहरा भीतीने काळवंडला. जुईला डॉक्टर कडे नेण्यात आले. टाके पडले होते अन् रक्तही बरेच गेले होते. माई तिच्या उशाशी बसून होत्या. मनात विचार करत होत्या की काय कमी पडतंय म्हणून ललिता अशी वागते आहे? त्या रात्री त्या तिघांनी जे काही केलं ते बघितल्यावर मला खात्रीच वाटत नव्हती की माझ्याच घरात ही माझीच लेकरं अशी एकमेकांना पाण्यात बघत असतील. पण ललितातर स्वतःच्या लेकीच्याही जीवावर उठली आहे मग माझ्या स्वराचं काय होईल? आधीच तिचं असामान्य असणं तिच्या आईबापालाच सहन होत नाही. 

संगीता आणि भास्कर एके दिवशी स्वराबद्दल बोलत होते ते चुकून माईंच्या कानावर पडल होतं. भास्करला स्वराच्या जन्माला येण्याचा फारसा आनंद नव्हता त्याला तर दुसराही मुलगाच हवा होता. आणि संगीता, तिला आपल्याच लेकराच्या गुणांबद्दल प्रॉब्लेम होता. त्यावेळी ती कुणाच्याही प्रभावाखाली नव्हती. तर ते तिचे विचार होते.


आपल्या समाजात अशी बरीच कुटुंब सापडतील, जिथे बाहेर दाखवताना मुलगी आमच्यासाठी खूप स्पेशल आहे असं दाखवलं जातं. पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी असते. ते शेवटपर्यंत कुणालाही कळत नाही. असो. 

इथे मात्र ह्या दोघांच्या मनात स्वराबद्दल असणारे विचार इतरांच्या पथ्यावर पडले होते, कारण नकळतच त्यांच्या करणीला बळ मिळाले होते. आणि आता त्यांना फक्त ह्या दोघांचे हेच विचार सतत तेल घालून पेटवत ठेवायचे होते. 


माईंनी मनाशी काहीतरी ठरवत आधी हे सगळं काकांच्या कानावर घालायचे ठरवले. त्या घाईने काकांच्या खोलीत आल्या. काका काहीतरी लिहिण्यात गुंतले होते. ते बघून माई मागे फिरल्या तेवढ्यात काका म्हणाले, “सरस्वती जे बोलायचं आहे ते बोल. आत्ता कुणीही घरात नाहीये.” बोलताना कुणीही ह्या शब्दावर त्यांनी दिलेला जोर माईंच्या लक्षात आला. 

शब्दांची जुळवाजुळव करत माईंनी काकांना त्या रात्री घडलेला प्रसंग सांगितला. त्या रात्री तीन व्यक्ती होत्या पण मला मात्र फक्त ललिताचाच चेहरा दिसला हेही त्या म्हणाल्या सोबतच इतर दोन व्यक्ती मध्ये एक पुरुष होता हेही त्यांनी सांगितले. 

काका काहीसे विचारात पडले. मग म्हणाले, “असं काहीतरी होणार ह्याची कल्पना होती मला. श्रीपादनेही सांगितलं होतं. पण त्याचं म्हणणं आहे की आपण सध्या काही करू शकत नाही. आपण फक्त स्वरावर लक्ष ठेवून तिला उत्तमोत्तम संस्कार देऊ शकतो. आणि आपल्याला जे काही ज्ञान आहे ते तिच्यापर्यंत पोहोचवू शकतो. ही तिची लढाई आहे जी बरीच वर्षे चालणार आहे. आपण आज आहोत उद्या कदाचित नसू. तेव्हा आपले संस्कारच तिला बळ देतील आपल्याच माणसांपासून सुरक्षित राहण्यासाठी.” 

शेवटच्या वाक्यावर माईंनी चमकून काकांकडे बघितले. तसे काका म्हणाले, “प्रत्येक जण आपलं नशीब स्वतः घडवत असतो. जसं आपली वयाने मोठी असलेली लेकरं स्वतःच्या नशिबाशी खेळ करत आहेत, तशी आपली ही लहानशी पोर सगळ्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करेल. तिला खूप सोसावे लागणार आहे. त्यासाठी आपले आशीर्वाद तिला नेहमी तयार करतील. एकटी असूनही ती सगळ्या वाईट गोष्टींना भारी पडेल. 
तिच्यासारख्या खूप मुली आहेत, मुलगेही आहेत जे स्वतःच्याच घरात, माणसात हे सगळं भोगतात अशा सगळ्यांसाठी स्वरा नकळतच आदर्श होईल बघ. 
तू अजिबात काळजी करू नकोस असं मी म्हणणार नाही, पण ह्या काळजीचा उपयोग तू स्वराला घडवण्यासाठी कर. आपण कितीही थकलो असलो तरी ही जबाबदारी पार पडल्याशिवाय आपल्याला सुट्टी मिळणार नाहीये.”

 काका हसत हसत म्हणाले. माईही मान डोलवत हसून खोलीतुन बाहेर पडल्या. काळजीचे सावट तसेच असले तरी त्यांच्या मनातल्या भीतीची जागा आता विश्वासाने घेतली होती. विश्वास होता त्याच्यावर ज्याने सगळ्यांना घडवले आहे. सईसोबत खेळत असणाऱ्या स्वराकडे बघून माईंना जाणवलं की ही पोर आयुष्यात इतरांना कधीही निराश करणार नाही. पण आपल्याला तिला स्वतःला सांभाळायला शिकवायचे आहे. 


स्वरामध्ये अस वेगळं काय होतं? तसं बघायला गेलं तर काहीच नव्हतं. हो अगदी सामान्य रंग, किडकिडीत तब्येत होती. पण तिचा स्वभाव मात्र खूप गोड होता. तिच्यावर थोडंसंही प्रेम करणाऱ्या माणसाला ती खूप जीव लावायची. इतकी लहान असतानाही ती आईबाबा चिडचिड करू नये म्हणून हट्ट करत नसे. 

माई आणि काकांसोबत मात्र ती मनातलं सगळं बोलत असे. त्यांनी तिला तिच्या आवडत्या देवबाप्पाला ही सगळं सांगायची सवय लावली होती. पण हेच समजुतदार असणं तिच्यासाठी शत्रू ठरलं होतं. कारण तिच्या सगळ्या बहिणी, भाऊ दिसायला देखणे होते तरीही त्या सगळ्यांमध्ये हे ध्यान मात्र लक्ष वेधून घेत असे. आणि हीच गोष्ट इतरांना खटकत असे. त्यांना भीती वाटत असे की ही मुलगी भविष्यात आपल्या मुलांना जड जाईल.

 प्रत्यक्षात मात्र सगळी मुलं आपल्या ह्या बहिणीशी प्रेमाने वागत असत कारण त्यांच्या मनाला अजून असल्या भावनांचा स्पर्श झाला नव्हता. पण पुढेही त्या सगळ्यांच्या स्वराबद्दलच्या भावना अशाच असणार का हे येणारी वेळ आणि परिस्थितीच सांगणार होती. 

प्रत्येक जण आपल्या आयुष्यात एक लढाई लढत असतो. कधी स्वतःशी, कधी जवळच्या लोकांशी, कधी समाजाशी. आपण मात्र समोरून दिसणारे चित्र बघूनच त्या त्या व्यक्तीवर एक शिक्का मारून मोकळे होत असतो. ते म्हणतात न काय ते judgemental होतो.

 व्यक्तीसमोर अवघड परिस्थिती मध्ये कोणते पर्याय होते, त्याने ते का निवडले, कसे निवडले आपल्याला काहीच माहीत नसते. म्हणून लगेच कुठलाही निष्कर्ष काढू नये. कारण प्रत्यक्षात कोण काय सहन करत आहे ह्याची आपल्याला काडीमात्र जाणीव नसते. कधी कधी फक्त सोबत कुणीतरी आहे एवढा विश्वास द्यावा बास.
____________________________________
प्रतिक्रियांची वाट बघत आहे. 

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू !!! शुभं भवतु !!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

comparison 2/8

प्रत्येकाचा मार्ग वेगळा ...