कालाय तस्मै नमः (भाग १२ ते १५)

कालाय तस्मै नमः| भाग १२

जाणीव स्व अस्तित्वाची


एकीकडे माई आणि काका स्वराला भविष्यात येणाऱ्या गोष्टीवर मात करण्यासाठी तयार करत होते. तर दुसरीकडे अजूनही कुणीतरी स्वराच्या मदतीसाठी तयारी सुरू केली होती. 


भविष्यात असे काय घडणार होते? त्याची झलक स्वरा सात वर्षाची झाली तशी जाणवू लागली.


 एके रात्री अचानक ती झोपेत दचकली. माई शेजारीच झोपल्या होत्या त्यामुळे त्यांना पटकन ते जाणवले. तसे त्यांनी घाबरलेल्या स्वराला जवळ घेतले ती तशी अजूनही झोपेतच होती. पण बडबडत होती. माईंनी नीट कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला तसे काही अस्पष्ट शब्द त्यांना ऐकू आले, तिकडे जाऊ नको अस काहीसं. त्या काही विचारणार तेवढ्यात स्वरा कूस पालटत त्यांच्या कुशीत शिरून झोपून गेली. 


सकाळी उठल्यावर त्यांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीच आठवत नव्हते. स्वरा दुपारी शाळेतून घरी आली तशी नेहमीप्रमाणे माईंच्या खोलीत आली नाही म्हणून माई तिला शोधत तिच्या खोलीत गेल्या. तर ती दप्तर एकीकडे टाकून गुढघ्यात तोंड घालून मुसमुसत कोपऱ्यात बसली होती. तिच्या डोक्यावरून हात फिरवत माईनी विचारले, “काय झाले राणूबाई?” तशी ती डोळ्यातलं पाणी कसंबसं थांबवत म्हणाली, “बघ ना ग माई. शाळेत सगळे चिडले माझ्यावर?” 


“का?” माईनी विचारले


“आम्ही न मधल्या सुट्टीत खेळत होतो. तर ती रचना झाडावर चढायला लागली. सगळे तिला चियर करत होते, पण मला काय झालं काय माहिती मी तिला नको चढू खाली उतर म्हणत होते. आणि मग अचानक मला वाटले की ती पडणार आहे म्हणून मी तिला खाली उतरविण्यासाठी पुढे जात होते तर सगळ्यांनी मला मागे ओढून तिथून जा असे सांगितले. मी गुपचूप लांब जाऊन उभी राहिले. आणि तिकडे बघतच होते तर रचना पडली तिला खूप लागले. मग बाई येऊन सगळ्यांना ओरडत होत्या तर सगळ्यांनी माझंच नाव घेतलं. पण मी तिथे नव्हते हे बाईंना माहीत होतं म्हणून त्या मला काहीच म्हणाल्या नाहीत उलट बाकीच्याना रागवल्या.  तर सगळ्यांनी आता मला तू आमच्यात येऊ नको असं सांगितलं.” 


“असं झालं होय,” माई तिला शांत करत म्हणाल्या. स्वरा मात्र अचानक काहीतरी आठवल्यासारखं माईना म्हणाली, “माई मी रात्री झोपेत न असंच काहीतरी बघितलं ग.” माईंना ती काय सांगतेय ते समजलं,  पण तिने जास्त विचार करत बसू नये म्हणून तो विषय टाळण्यासाठी त्या तिला म्हणाल्या,  “अरु , (कधी कधी त्या तिला अरु म्हणून हाक मारायच्या तिलाही ते आवडत असे) मी तुझ्या आवडीचा चिवडा केला आहे. चल बरं, पटकन कपडे बदलून ये. सगळं जागेवर ठेव. आपण दोघी अंगणातल्या झोक्यावर बसून खाऊ या.” स्वरा हो अशी मान डोलवत आवरण्यासाठी गेली. दारात उभ्या असणाऱ्या काकांनी हे सगळं ऐकलं होतं. त्यांनी माईंना नजरेनेच शांत रहा असं खुणावले. ते दोघे जरी शांत राहिले असले तरी सत्य शांत नव्हतेच. 


रचनाची आई संध्याकाळी घरी आली होती स्वराचे आभार मानण्यासाठी. त्यांच्या रचनाच्या म्हणण्यानुसार ती स्वराचं ऐकून उतरण्यासाठी प्रयत्न करत होती तेव्हा घसरली. पण रचनाच्या आईलाही माहीत होतं स्वरा रचनाची किती जवळची मैत्रीण आहे ते. रचना त्यांचं एकुलते एक अपत्य होते ते ही १५ वर्षांनी झालेलं. त्यामुळे तिची जरा जास्तच काळजी असे त्यांना. स्वरावर माई काकांचे संस्कार असल्याने त्या रचनाला तिच्यासोबतच राहण्याची ताकीद देत असत. आणि म्हणूनच आज त्यांना वाटत होते की स्वरामुळे रचना वाचली. माई काका त्यांच्याशी जुजबी बोलले आणि त्या गेल्या.



 इकडे संगीता मात्र स्वरावर खूप चिडली होती. स्वरा खेळून झाल्यावर घरात आली तशी संगीता तिला ओरडू लागली. घाबरलेल्या स्वराला आपलं काय चुकलं हेच कळत नव्हतं. ती चुपचाप कोपऱ्यात उभी होती. माईंनी तिला आधी बोलू दिले आणि मग नेमका प्रकार सांगितला. त्यावेळेपुरते तरी  संगीताला सगळे समजले आहे असे माईना वाटले पण सत्य परिस्थिती नेहमीप्रमाणे वेगळीच होती. 


लहानग्या स्वराला आईबाबांना आपण का नकोसे आहोत हेच समजत नसे. पण अशाच वातावरणात ती स्वतःला स्ट्रॉंग ठेवायला शिकत होती. माई आणि काका दोघेही तिला सतत योग्य गोष्टीची जाणीव करून द्यायचे. 

स्वरा हळूहळू मोठी होत होती, तसतसे तिला येणारे अनुभवही वाढत होते. तिच्या आसपासच्या, जवळच्या एखाद्या व्यक्तींबद्दल जर काही वाईट अघटित घडणार असेल तर ते स्वराला समजू लागले होते आणि आता वयानुसार ती आपल्या स्वप्नांचा अर्थही समजून घेण्यासाठी प्रयत्न करत होती. माई एकीकडे तिला शारीरिक, मानसिक बळ मिळावे म्हणून प्रयत्न करत असत; तर दुसरीकडे काका तिच्या स्वप्नांमुळे तिला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत होते. 


एव्हाना आपण इतरांपेक्षा वेगळ्या आहोत ह्याची पुसटशी जाणीव तिला होऊ लागली होती. तिच्या जागी दुसरे कुणी असते तर ते शेफारून गेले असते पण  आपल्या वेगळं असण्याचा आईबाबांना त्रास होतो ही जाणीव तिला जास्त प्रमाणात त्रास देत असे. मग ह्या सगळ्या गोष्टी दूर ठेवण्यासाठी ती काकांना आणखी प्रश्न विचारत असे. काकांना कधी कधी उत्तरे देता येत नसत मग ते तिला म्हणत की तू तुझे प्रश्न एका ठिकाणी लिहून ठेव आणि तुझा मोठा काका आला न की त्याला विचार. हा सल्ला मात्र स्वरा पाळत होती. अशातच एके दिवशी श्रीपादने तो परत येतो आहे असे सांगितले. 


श्रीपाद येणार म्हणून माईंना जास्तच आनंद झाला होता. तसा तो वर्षातून एकदा चक्कर मारतच असे पण आता तो कायमचा येणार होता. स्वराही आता  बरीच मोठी झाली होती. तिला काही गोष्टी समजावून सांगत तिची शक्ती योग्य दिशेने वळवणे खूप गरजेचे होते. त्यासाठीच तो परत येणार होता. पण तो एकटाच येणार नव्हता, त्याच्या सोबत अजूनही कुणीतरी येणार होते ज्याच्या येण्याने स्वराच्या प्रश्नांची उत्तरे तिला मिळणार होती. 


आणि अजून एक छानसे सरप्राईज ही तिच्यासाठी वाट बघत होते. 


श्रीपादच्या येण्याचा दिवस जवळ येत होता तशी का कुणास ठाऊक स्वराची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कोण येईल काकासोबत?   


इकडे श्रीपादने गेल्या काही वर्षात स्वराबद्दलची प्रत्येक गोष्ट नीट लक्षात ठेवून काही गोष्टी ठरवल्या होत्या. ती जसजशी मोठी होणार होती तसतशी तिला तिच्या कडे काय आहे त्याची जाणीव होणार होती. पण त्या गोष्टीचा ओघ चांगल्या दिशेने जाण्यासाठी काय करावे हे त्याने फार पूर्वीच ठरवले होते. आणि ते नकळतच माई अन् काकांकडून करूनही घेतले होते. 


स्वरावर सकारात्मक संस्कारांचा पगडा इतका जबरदस्त बसला होता की आता ती चुकूनही वेगळ्या वाटेकडे वळणार नव्हती. हो पण छोट्या छोट्या गोष्टी आपण इच्छा केली तर घडतात हे आताशा तिला कळू लागले होते. पण ते सगळे तिने  फारच निष्पाप पणे येऊन काकांना सांगितले आणि त्यांनी श्रीपादला. त्यावेळी तो फक्त हसून काकांना म्हणाला विद्यार्थी तयार होतोय आता त्याच्या कसोटीचा क्षण लवकरच येईल. ह्या कसोटीच्या क्षणी तिला पाठिंब्याची गरज पडेल तो खंबीर पाठिंबा तिला एक कसलेला खेळाडूच देऊ शकतो. त्यालाही मी घेऊन येतोय. 



कोण आहे तो? सुज्ञ वाचकांना अंदाज आला असेलच. बरोबर तो म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून श्रीपाद- अरुंधतीचा ‘कैवल्य’. 


स्वरा फक्त त्याला नावाने ओळखत होती. कारण तो तिच्या बारश्यानंतर परत आला होता. पण तो जेव्हा जेव्हा आला तेव्हा स्वरा घरी नसल्याने तिने त्याला पाहिले नव्हते. ती कधी तिच्या आजोळी होती तर कधी तिच्या काकू किंवा आत्याकडे. 


कैवल्यही नंतर त्याच्या शिक्षणात गुरफटला कारण त्याला फक्त औपचारिक गोष्टींचं शिक्षण नव्हतं घ्यायचं.  खरे तर तो बऱ्याच गोष्टी शिकत होता.  



स्वरा आणि कैवल्यमध्ये एक बंध होता जो ह्या भेटीने अजून मजबूत होणार होता. 


तिकडे ललिता आपली भूमिका तशीच पार पाडत होती. माई काकांनी तोंड बंद ठेवल्याने त्यांना वाटेतून बाजूला करण्याची गरज तिला वाटली नव्हती. पण इथेच ती चुकली होती. ती ह्या गैरसमजात राहिली की तिचं कारस्थान कुणालाही समजलं नाहीये पण प्रत्यक्षात ती आणि तिचे दोन्ही साथीदार आता नियतीच्या जाळ्यात अलगद अडकले होते. त्याचे परिणाम जाणवत असूनही ते मान्य करण्याचे धैर्य मात्र त्या तिघांपैकी कुणाकडेही नव्हते. 


पण आता त्याच्यामधला जो सगळ्यात जास्त कच्चा खेळाडू होता तो मागे फिरू बघत होता. कोण असेल तो? 

__________________________________

कालाय तस्मै नमः|भाग १३

कैवल्यचे आगमन

श्रीपाद येणार म्हणून माई त्याच्या आवडीचे काय काय पदार्थ करायचे ह्या विचारात दंग होत्या. तेवढ्यात कुणीतरी मागून येऊन अलगद त्यांचे डोळे झाकले. माईंनी त्या हातावरून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण काही समजेना.  तेवढ्यात ज्याने डोळ्यावर हात ठेवले तो जोरजोराने ओरडू लागला, कुणीतरी त्याला मागून झाडूने मारले होते. 


माईंनी वळून बघितले तर एक ताडमाड उंच तरुण मुलगा पाठमोरा उभा होता. हातात झाडू घेऊन स्वरा त्याच्या मागे लागली होती. तिला वाटले की तो माईला काहीतरी करत आहे. ती पुन्हा त्याच्या मागे धावू लागली तसा तो माईंच्या मागे जाऊन लपला आणि म्हणू लागला, “माई थांबव ग तिला. किती मारतेय ती.” माईंनी हसत हसत स्वराला सांगितले की अग तो तुझा काऊ दादा आहे. तशी डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत ती म्हणाली, “मग त्याला सांगता येत नव्हतं का ते?” 


हसत हसत कैवल्य तिच्या जवळ गेला आणि तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाला, “तू मला संधी दिली का बोलण्यासाठी? ते ही जाऊदे, तू माझं सरप्राईज पण खराब केलंस. माई मला ओळखते की नाही हे बघत होतो मी, पण त्याआधीच तू मला मारत सुटलीस.” 


“अरे, पण मला काय माहिती तू आहेस ते? मला वाटलं,” तिला मधेच थांबवत तो म्हणाला, “की चोर आहे न? डिटेक्टिव्हगिरी कधी बंद करणार तू? अजूनही तशीच आहेस. आणि चोर सगळं घर सोडून म्हाताऱ्या लोकांसोबत लपाछपी खेळेल का? डोकं नीट तरी वापरत जा गं,” तसे सगळेच हसू लागले. ते बघून स्वरा गाल फुगवून पाय आपटत आत निघून गेली. 


“असू दे येईल थोड्या वेळाने ती स्वतःच. तू येणार आहेस हे का कळवलं नाहीस पण? आणि बाबा कुठे आहे तुझा?”  काकांनी त्याला विचारलं.


“अहो आजोबा, बाबा उद्या येणार आहेत ते कामात अडकले होते.  आम्ही दोघे वेगवेगळ्या ठिकाणी होतो. मधल्या स्टेशनवर भेटून एकत्र येणार होतो. पण माझं काम संपलं, मग मीच बाबांना म्हणालो की मी पुढे जातो.” कैवल्य माई आणि काकांना नमस्कार करत म्हणाला. 


"कसे आहात काका काकू?", विचारत त्याने भास्कर संगीतालाही नमस्कार केला. आणि इकडे तिकडे तो बघतच होता तेवढ्यात फुगा झालेल्या स्वराने उत्तर दिलं, "दादा नाहीये घरात तो गेला भटकायला.",आणि डोळे मिचकावले. 


तशी संगीता तिच्यावर चिडली,तू  का ग सारखी त्याच्या मागे पडतेस? ती पुढे काही बोलणार तेवढ्यात काका घसा खाकरत म्हणाले, "तुमचं रोजचंच आहे. तो प्रवासातून आला आहे आधी त्याला काय हवं नको ते बघा."


काकांनी जबरदस्ती विषय थांबवला हे कैवल्यच्या लक्षात आलं पण तो त्यावेळी गप्प बसला. आता आलोच आहोत तर कळेल हळूहळू असा विचार करत फ्रेश होण्यासाठी आतमध्ये गेला. 


स्वराला वाईट वाटले, पण ती चुपचाप मान खाली घालून आईला मदत करू लागली. जमेल तेवढी कामं करून ती कॉलेजसाठी बाहेर पडली. ह्या वर्षी कॉलेजच्या पहिल्या वर्षात होती ती. वयाच्या पेक्षा जास्तच समंजसपणा तिच्याकडे होता त्यामुळे बऱ्याच गोष्टी ती ऐकून घ्यायची. पण तिच्या उलट समीरच्या बाबतीत घडत असे. त्याला मुलगा म्हणून मोकळीक तर होतीच पण तो चुकला तरी ते काकांपासून लपवण्यासाठी आईबाबा प्रयत्न करत असत. 


कैवल्यला आल्यापासून काका काकूंच्या स्वराबाबत वागण्यातला बदल दिसत होताच,पण रात्री तो काकांच्या सोबत बोलत होता तेव्हा त्यांनीही त्याला सगळं सांगितलं. त्याला कळलं स्वराने इतक्या कमी वयातच आपल्या सारखंच बरंच काही बघितलं, अनुभवलं आहे. तो स्वराशीही बोलण्यासाठी तिच्या खोलीकडे गेला. दरवाजा फक्त ढकलला होता बंद नव्हता त्यामुळे आत काहीतरी गडबड आहे हे त्याला जाणवलं. तो आत गेला तसे त्याने बघितले स्वरा एका कोपऱ्यात मुसमुसत बसली होती. त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तसे तिने वरती बघितले.


 तिचा मूड चेंज करण्यासाठी तो म्हणाला, “बापरे आज पाऊस पडणार बहुतेक.” तसं थोड्याशा रागात तिने त्याच्याकडे बघितले आणि म्हणाली, “तुला भिजायचं आहे का काऊ दादा?” तिच्या आवाजातला बदल जाणवून तो जरासा चमकला. पण तिला ते जाणवू न देता तो म्हणाला, “हो पण कस काय होणार ना?” तशी ती त्याच्याकडे न बघता म्हणाली, “आत्तापासून दहाव्या मिनिटाला पाऊस पडतो की नाही बघ. स्टॉप वॉच लाव.” आणि गॅलरीत जाऊन उभी राहिली. कैवल्यला अस काही होणार ह्याचा अंदाज होताच त्यासाठीच तर तो आला होता. 

“स्वरा तुला कुणी सांगितलं की नाही माहीत नाही पण सांगतो,” 


त्याचं वाक्य मधेच तोडत स्वरा म्हणाली, “माहिती आहे मला मी तुझ्या आईसारखी म्हणजे अरुंधती मावशीसारखी दिसते. ह्याच गोष्टी मुळे कुणी मला जवळ करत नाही. सगळे राग राग करतात माझा. मग मी असं काहीतरी करते.” असं म्हणत तिने हात लांब केला. पावसाचे टपोरे थेंब तिच्या ओंजळीत विसावले होते. 

“बास झालं,” तो जरा रागातच म्हणाला तशी ती दचकली. “हेच जे करायचं नाही ते करतेस तू म्हणून मग अजून चिडचिड सहन करावी लागते सगळ्यांची तुला. तू हे करतेस त्याचा उलटाही परिणाम होतो ग,” तो कळवळून सांगत होता. 


तिने प्रश्नार्थक चेहरा केला तसा कैवल्य म्हणाला, “स्वरा प्रत्येक गोष्टीचे दोन परिणाम होतात. चांगले आणि वाईट. आता तू चिडलीस तुझा राग तू तुझी ताकद वापरून निसर्गावर काढलास. तुला बरं वाटलं. पण ह्या थेंबासोबत तुझ्या वाईट विचारांचे व्हायब्रेशन सगळीकडे गेले. ज्यांना ज्यांना ह्या पावसाचा सामना करावा लागला आता ते सगळे तुझा राग दुसऱ्या कुणावरतरी काढतील. म्हणजे झालं काय जी गोष्ट कमी करायची होती ती नकळतच अनेक पटीत वाढवून अनेक जीवांना नुकसान पोहोचवणार.” 


“मग आता?” स्वरा


“आता काय येत्या दोन दिवसात तुझं ट्रेनिंग सुरू करतोय मी.  पण त्या आधी मला तुझी तयारी किती आहे ते बघायचे आहे. आणि मला शिकताना दुर्लक्ष केलेलं चालणार नाही कळलं?”  कैवल्य


“हो , पण दादा मला कसली कसली स्वप्नं पडतात, कधी कधी ती खरी होतात, त्याचं काय?” स्वरा


“एकदा तुझा हा वेगळा अभ्यास सुरू झाला की कळेल तुला हळूहळू आणि मग त्याच काय करायचं तेही समजेल. आता खूप उशीर झाला आहे झोप. आपल्या अभ्यासासोबतच तुला कॉलेजचा अभ्यासही करायचा आहे. त्यात हयगय नकोय मला. चल गुड नाईट झोप शांतपणे.” असे म्हणून कैवल्य त्याच्या खोलीत निघून गेला. 


कसला अभ्यास करावा लागणार आता ह्या विचारातच स्वराला झोप लागली. 


मध्यरात्री ती नेहमीप्रमाणे दचकून उठली. स्वप्नांत तिला तिची ललिता काकू, श्रीधर काका आणि अश्विनी काकू एका पाठमोऱ्या उभ्या बाईला काहीतरी करत आहेत असे दिसले. स्वप्नातच त्या बाईचा चेहरा बघण्यासाठी ती पुढे सरकली. तेवढ्यात ती स्त्री मागे वळली. स्वरा तो चेहरा बघून जागीच थबकली. तो चेहरा दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून तिचाच होता. पण ती स्त्री वयाने खूप मोठी होती. 


ती त्या तिघांकडे वळून म्हणाली, “मी तुम्हाला ह्या आधी माफ केले आहे. पण आता इतकी शिक्षा भोगत असतानाही जर तुम्ही पुन्हा तेच करणार असाल तर मात्र तुमचे खूप वाईट हाल होतील.” असे म्हणून तिने अश्विनीच्या पायाकडे बघितलं आणि हसली.


 अचानकच तिचं लक्ष स्वराकडे गेलं तसं प्रचंड प्रेमाने भरलेल्या डोळ्यांनी ती स्वराकडे बघू लागली. स्वराला मात्र भीती वाटत होती. ती जसजशी स्वराकडे सरकू लागली तसतशी स्वरा अजूनच घाबरली. तिला दरदरून घाम फुटला, जागचे हलता येईना. आणि ती दचकून उठली. उठून इकडे तिकडे बघितले तर माई तिच्याकडेच बघत होती. माईंनी नेहमीप्रमाणे काही प्रश्न न विचारता तिला पिण्यासाठी पाणी दिले आणि तिला कुशीत घेत त्या थोपटू लागल्या. थोड्या वेळात स्वराला गाढ झोप लागली. मग मात्र तिला सकाळीच जाग आली तेही कैवल्यच्या उठवण्याने. 


त्याने तिच्या तोंडावर पाणी शिंपडून तिला उठवले अन् मग दोघांची मस्ती सकाळी सकाळी सुरू झाली. सगळं आवरून तो तिच्यासोबत त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजे मंदिरात आला.लहानपणी ही त्या मंदिरात येऊन ते दोघे तासनतास एका ठिकाणी बसून राहायचे अर्थात वेगवेगळे. ना रांगेत जाऊन दर्शन ना कुणाशी बोलणं फक्त तिथलं वातावरण आवडायचं म्हणून.


 कैवल्य ने त्याच्या येण्याचं कारण सांगितलं. स्वरा म्हणाली, “दादू मलाही हेच वाटत होतं, म्हणून मीही इथेच येऊन बसते नेहमी. किती छान योगायोग आहे हा.” तसा कैवल्य गालातच हसला आणि म्हणाला, “योगायोग नाही हा आपल्या दोघांमधला धागा आहे जो आपलं नातं अजून घट्ट बनवतो. ते सोड तू मला रात्रीबद्दल काहीतरी सांगणार होतीस.” 


“अरे हो, मला न स्वप्न पडलं,” असं म्हणत स्वराने सगळं काही त्याला सांगितलं आणि त्याच्याकडे उत्तराच्या अपेक्षेने बघू लागली.  


तो म्हणाला, “स्वरा जेव्हा कुणीतरी अशी व्यक्ती जी आपल्या आयुष्याचा भाग होती, पण आता अस्तित्वात नाहीये. अशा पद्धतीने दिसते तेव्हा ती काय सांगते ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत जा. मी असं नाही म्हणत की तुझं सगळं स्वप्न खरं आहे. त्यात काही प्रमाणात मनाचा खेळ असणारच, पण त्यातला मुख्य भाग शोधून काढून त्यावर लक्ष केंद्रित करायलाच तुला शिकायचे आहे. आज बाबा येत आहेत त्यांची परवानगी मिळाली की उद्यापासून मी तुला काही छोट्या छोट्या गोष्टी शिकवतो. मी ह्या गोष्टी माझ्या गुरुकडे शिकलो. अर्थात मला हे सगळं शिकवायचंच असा माझ्या आईचा आग्रहच होता. त्यामुळे मी लहान असताना ती स्वतः माझ्या स्वप्नात येऊन खूप गोष्टी मला शिकवायची. त्यामुळे असेल कदाचित पण मला स्वप्नांची भीती वाटत नाही. मग ते कितीही भीतीदायक का असेना. हं तर मॅडम, हा आपल्या आयुष्यातील एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही. त्यामुळे ह्यातील कोणत्या गोष्टी कुणाजवळ आणि किती प्रमाणात शेयर करायच्या हेही तुला कळेल हळूहळू. ” दोघेही घरी आले.घरातील वातावरण जास्तच तणावाचे वाटत होते. 


कैवल्यने विचारले, “काय झालं?” 

तसा भास्कर म्हणाला, “अरे तुझ्या धाकट्या काका काकूंचा (म्हणजे अशोक आणि अश्विनी) अपघात झाला आहे. काका सिरीयस आहे आणि काकुचे दोन्ही पाय कदाचित ..” पुढे त्याला बोलवेना. कैवल्यने वळून स्वराकडे बघितलं. तिच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती तरळत होती. 


तेवढ्यात श्रीपादचा फोन आला की तुम्ही निघण्याची घाई करू नका. मी तडक तिकडे जातो आणि मग परिस्थिती बघून तुम्हाला सांगतो. श्रीपाद स्वतः जातो आहे म्हटल्यावर माई काकांच्या जीवात जीव आला. पण त्याला लवकर काय ते कळव असे दोनचारदा बजावून सांगतच त्यांनी फोन कैवल्यकडे दिला. 


श्रीपाद कैवल्यला म्हणाला, “जे काम मी आल्यावर सुरू करायच होतं ते तू आजच्या आज सुरू कर. ती खूप गोंधळून जाणार आहे पुढच्या काही काळात. तिला फक्त आणि फक्त तूच सांभाळू शकतोस. आणि हो तिच्यामार्फतच आपण अरुला शांत करू शकतो. हे लक्षात ठेव त्यामुळे ती चिडून जाऊन काही करेल अशी वेळ येऊ देऊ नकोस.”


“ठीक आहे बाबा. मी घेतो सगळ्यांची काळजी तुम्ही नका टेन्शन घेऊ,” असे म्हणत कैवल्यने फोन ठेवला.


दुपारी उशीरा श्रीपादचा फोन आला त्याने सांगितलं की अशोकचा धोका टळला आहे पण काही दिवस त्याला दवाखान्यात ठेवून घेतील. आणि अश्विनीचे पाय थोडक्यात वाचले आहेत पण २ महिने तरी प्लास्टर असेल. हे सगळे कसे काय घडले? ते दोघे गाडीतून जात होते समोरून आलेल्या ट्रकला बघून गाडी वळवण्याचा प्रयत्न अशोक करत असतानाच गाडी दुसरीकडे जाऊन धडकली. 


अश्विनीचे पाय अडकले होते त्यामुळे तिला जास्त लागले. अशोकला डोक्याला लागले होते पण तो लवकर शुद्धीवर आल्याने धोका टळला होता. हे सगळे सांगितल्यावर श्रीपाद म्हणाला की मी उद्या तिकडे येतो मुलांजवळ थांबतो मग तुम्ही चौघे इकडे या. तोपर्यंत श्रीधर-मंदा, विजय-ललिता आहेतच इथे. स्वराने इतक्यातच कुणाच्या समोर येऊ नये असे त्याला वाटत असल्याने मुलांना नको ते वातावरण म्हणून त्याने विषय बंद केला होता. 


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच तो आला. संगीताने घरात सगळं करून ठेवले होते आणि स्वराला सूचनाही दिली. तसा श्रीपाद म्हणाला, “अग आम्ही बापलेक चांगला करतो स्वयंपाक तू कशाला त्या बिचारीला इतकं टेन्शन देतेस.” संगीता हसून त्याला म्हणाली, “दादा तिलाही सवय हवी न. माई काकांच्या मुळे भरपूर लाड होतात तिचे. बर आम्ही निघतो आता संध्याकाळी किंवा सकाळी येऊ परत. समीर येतो म्हणतोय तर त्याला घेऊन जातो. नाहीतर ह्या दोघांची भांडणं तुम्हाला सोडवत बसावी लागतील.”


"ठीक आहे.", असं म्हणत श्रीपाद स्वयंपाक घरातून बाहेर पडला. समीरचे जाणे त्यांच्यासाठी उपयोगीच होणार होते. 

स्वराला कुठल्याही गोष्टीचा व्यत्यय न येता बऱ्याच गोष्टी सांगता येणार होत्या. 

सगळ्यांना निरोप देऊन तो देवघरातील पादुकांसमोर येऊन उभा राहिला. मनात शब्द उमटले, शेवटची लढाई आहे ही. स्वतःच्याच माणसांविरुद्ध. ह्यात यश मिळू दे असं तरी कसं म्हणू. एकच मागतो ज्याच्यासाठी जे योग्य आहे ते घडू दे. तू खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा रहा. ह्या मुलांना त्यांचा मार्ग सापडू दे. 

 सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक विचार, सकारात्मक लोक ह्यांचं अनुकरण करा. जगाला खूप गरज आहे चांगल्या माणसांची तुम्हाला कुणी भेटलं नसेल तर स्वतःच कुणासाठी तरी चांगला माणूस होण्यासाठी प्रयत्न करा. आपल्याला काय आवडतं ते दुसऱ्यांवर लादण्यापेक्षा इतरांचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो हे मान्य करण्याचा प्रयत्न करा. 

__________________________________

कालाय तस्मै नमः|भाग १४

साधनेतील संकेत 


थोड्याच वेळात माई, काका, भास्कर, संगीता आणि समीर गाडी घेऊन अशोक-अश्विनी ला बघण्यासाठी निघून गेले. 


काल फोनवरच श्रीपादने कैवल्यला काही सूचना दिल्या होत्या, त्या प्रमाणे कैवल्य ने स्वराला काय काय येते ते बघण्यासाठी साधनेच्या खोलीत बोलावले होते. तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्तच अभ्यास तिचा आहे. हे बघून नकळतच त्याच्या मनावरचं एक ओझं उतरलं. कारण आता बाकी सगळे समजवताना फारसा संदर्भ द्यावा लागणार नव्हता. 


श्रीपादला आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बद्दल त्याने कल्पना दिली होती. त्यानुसार आता ते तिघेही साधनेसाठी त्या खोलीत आले. 


आपापल्या आसनावर बसण्याआधी त्यांनी स्वराकडे एक नजर टाकली. ती शांतपणे आतमध्ये आली आणि त्या उंच अशा तसबिरीजवळ जात तिने डोके खाली टेकवून नमस्कार केला अगदी अरुंधतीप्रमाणेच. त्यानंतर ती त्याच जागी जाऊन बसली जिथे अरुंधती बसत असे. स्वराच्या रुपात अरुंधतीचा अंशच जन्माला आला होता पण दोघींमध्ये एक मोठा फरक होता. 


अरुंधतीला आईवडील, कुटुंबाचे प्रेम ह्या पॉझिटिव्ह गोष्टी मिळाल्याने ती शांत समंजस अन् विशेष म्हणजे प्रेमळ होत गेली. ह्याउलट स्वराच्या वाटेला सतत नकारात्मक भावना आल्याने कधी कधी तिच्या रागाचा उद्रेक असा काही होत असे की तिच्यासोबतच इतरांनाही त्याची झळ बसे. पण तरीही तिचा मूळचा प्रेमळ समंजस स्वभाव कायम होता. मग रात्री तिला पडणारी अन् खरी होणारी स्वप्नं, त्यांचं काय? ह्यात सगळ्यात मोठा वाटा होता तो स्वराबाबत न थांबणाऱ्या कुरापतींचा. स्वराला नकळत अरुंधती तिचे रक्षण करण्यासाठी तिच्या आसपास असे त्यामुळे जेव्हा ह्या कुरापती वाढत तेव्हा जसा स्वराला त्रास होई तसा तो अरुंधतीलाही होई. त्यात स्वराच्या रागाला शांत करण्यासाठी अरुंधती सर्व काही स्वतःकडे घेत असे त्यामुळे होई काय स्वरा सुरक्षित होत असे, पण अरूधंतीची शक्ती जास्त असल्याने तिला येणारा क्षणिक रागही समोरच्याचे जास्त नुकसान करत असे. 


आता आपण अपघाताकडे वळू. ह्या अपघातात सगळ्यात जास्त इजा अशोकला झाली होती असे का हा प्रश्न होताच. तर अशोक आणि विजयची बायको ललिता हे दोघेच ह्या खेळाचे मास्टरमाइंड होते, त्या साधकाची ललिताशी भेट अशोकनेच घडवून आणली होती. का? कारण होतं श्रीपादबद्दल मत्सर.... 


अशोक लहानपणापासून उनाड होता त्यामुळे जसे इतर ठिकाणी व्हायचे तेच इथेही घडत असे. श्रीपादचा दाखला देऊन सतत त्याला सांगितले जायचे असा वाग तसा वाग. अडनिडे वय असताना हा राग नकळतच त्याच्या मनात घर करून गेला आणि पुढे पुढे त्याचे रूपांतर एका विषारी रोपात कसे झाले ते कुणालाही कळले नाही. 


पुढे जाऊन तोही आयुष्यात स्थिर झाला, पण राग तसाच मनात होता त्यात भर पडली ती विजयच्या बायकोमुळे – ललितामुळे. 


ललिताचा अहंकारी स्वभाव, अरुंधतीचा रागराग करणे ह्यामुळे अशोकला वाटले की जर काही करायचे ठरवले तर ही नक्की आपल्याला मदत करेल आणि झालेही तसेच. त्याचं सुदैव की दुर्दैव पण अश्विनी त्याच्या आयुष्यात आली आणि तीही स्वभावाने तशीच होती. 


ललिता आणि अश्विनीचे विचार इतके जुळले की अशोकला पडद्याआडून पुढे येण्याची गरज भासली नाही. कामे होत गेली. यश(?) मिळत गेले. नंतर श्रीधरही त्यात सामील झाला. 


विजयला आणि श्रीधरच्या बायकोला मंदाला हे सगळे काही काळाने माहिती झाले पण त्यांनी मूक संमती देत शांत रहाणे निवडले. ह्या सगळ्या लोकांच्या नकारात्मक विचारांमुळे ललिता आणि अश्विनीच्या कृतीला बळच मिळत गेले. त्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची अशी होती की त्या जी काही कृत्ये करत असत त्यात सातत्य होतं. खंड पडू नये म्हणून प्रयत्न केले जात. त्यामुळे वाईट शक्तीला सतत खाद्य मिळून ती अजून प्रभावशाली होत असे.



खऱ्या आयुष्यात ही असेच होते. वाईट वागणारे लोक सातत्याने तेच करत असतात त्याचं त्यांना फळही मिळतं. पण उलट चांगल्या लोकांच्या कुठल्याही कृतीत सातत्य नसते. कुठल्या तरी कारणाने खंड पडतो त्यामुळे यश मिळण्यासाठी उशीर होतो.  इथेही तेच झाले होते.


 असो तर अशा पद्धतीने वर्षानुवर्षे ते बऱ्याच कुरघोडी कधी अगदी लहानशा कुणालाही समजणार नाही अशा प्रकारच्या करत होते, पण आता मात्र त्यांचा प्लॅन मोठा होता. 


स्वराला वश करून घेऊन त्यांना तिच्याच हातून वाईट गोष्टी घडवून आणायच्या होत्या. हे जसे अरुंधतीच्या लक्षात आले तसा तिने त्यांना जीव वाचेल पण जिव्हारी लागेल असा फटका दिला होता. त्याचा परिणाम किती झाला आहे हे मात्र वेळच सांगणार होती. 


आपण भूतकाळात फेरफटका मारताना हेच सर्व प्रसंग स्वरूपात ध्यानासाठी बसलेल्या त्या तिघांनाही दिसले स्वरा, श्रीपाद आणि कैवल्यला. जागे झाल्यानंतर काही क्षण तिघेही स्तब्ध होते त्यांच्या सोवळ्या मनाला हे पटतच नव्हते की कुणी इतका राग मनात ठेवून असं कसं वागू शकते? पण जे काही होते ते सत्य होते आता त्या सहित पुढचे पाऊल उचलावे लागणार होते. 


तेवढ्यात त्या तिघांनाही पुन्हा डोळे मिटून घेण्याची आज्ञा झाली. तिघांनीही डोळे मिटून घेतले तसा एक सुगंध हवेत पसरला आणि आजूबाजूचे वातावरण बदलल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपले शरीर अगदी हलके होत असल्याची जाणीव त्यांनी झाली. 

   

  एक धीरगंभीर पण प्रेमळ आवाज खोलीत घुमू लागला, “मला माहित आहे की तुम्हाला ह्या कृतींमागचे कारण जाणून घ्यायची इच्छा आहे. पण इथे ठोस असे काही कारण नाही ह्या मधील काही गोष्टी ह्या तुमच्या आणि त्यांच्या पूर्वजन्मातील देवाणघेवाणीमुळे  घडल्या. तुमच्याकडून नकळत त्यांचे काही नुकसान झाले होते. आणि आता बाकी ते जे काही करत होते ते त्यांचे ह्या जन्मातील दुष्कर्म आहे." 


"योग्य वेळ आली की त्यासाठी त्यांना शिक्षा ही मिळणारच कदाचित ती आताच्या घटनेपेक्षा तीव्रही असू शकते किंवा सौम्यही असेल. त्याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही. हो पण जर त्या शिक्षेतून त्यांनी योग्य तो धडा घेतला तर त्यांचेच कल्याण होईल. पण तसे करण्यासाठी त्यांची स्वतःची तयारी हवी त्यामध्ये तुम्ही किंवा आम्हीही त्यांना जबरदस्ती करू शकत नाही."


"राहिली गोष्ट स्वराच्या शक्तींची तर त्याबाबत श्रीपादला योग्य सूचना मिळतील. त्यानुसार स्वराला साधनेत प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन करावे लागेल. स्वरा मला माहित आहे तू खूप दुखावली आहेस, पण  काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्या जशा आहेत तशा स्वीकारणे गरजेचे असते. ते करणे अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही. अजून काहीच वर्षे तुम्ही तिघेही ह्या कुटुंबाशी बांधील राहाल, त्यानंतर मात्र समाज नियमानुसार फक्त काही विशिष्ट प्रसंगीच तुम्हाला ह्यांच्या आयुष्यात डोकवावे लागेल. लवकरच तुम्हाला तुमचे कार्य कळेल. ते कुणाजवळ उघड करायचे कुणाजवळ नाही हे ही सांगितले जाईल." 


"जाता जाता एकच गोष्ट सांगतो, येणारा काळ हा तुमच्या कुटुंबियांना अवघड असणार आहे आणि तुम्हाला त्यात काहीही करता येणार नाही. तसा प्रयत्नही करू नका. शुभं भवतु!” असे म्हणत आवाज विरत गेला. 


 डोळे मिटून बसलेल्या स्वराला आपल्या डोक्यावर प्रेमाने फिरवलेला हात जाणवला आणि बऱ्याच वाईट क्षणांचं ओझं उतरून मन पिसासारखं हलकं झालं आहे अशी जाणीव झाली. 


सगळं कळल्यानंतर आलेला राग आता त्या सगळ्यांबद्दल वाटणाऱ्या दयेत बदलला होता. एकमेकांशी काहीही न बोलता ते तिघेही खोलीतून बाहेर पडले.


 स्वरा बागेतील झोक्यावर जाऊन बसली. श्रीपाद देवघराच्या दिशेने वळला. तर कैवल्य शांतपणे त्या खोलीतून बाहेर पडणाऱ्या त्या पुसट आकृतीकडे बघत होता. ती आकृती त्याच्या दिशेने आली आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले. तिच्याही डोळ्यात पाणी होते. जणूकाही ती त्याला डोळ्यांत साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. हळूहळू ती हवेत विरत गेली आणि दिसेनाशी झाली. होय ती अरुंधतीचीच आकृती होती. 


इकडे श्रीधरच्या मनात आता विचारांचे काहूर माजले होते. अशोक ची अवस्था पाहून त्याला भीती वाटत होती. त्याने ते ललिताजवळ बोलून दाखवले तशी ती चिडली आणि म्हणाली की आता असे मधेच मागे फिरता येणार नाही. नाहीतर आपण आमंत्रण देऊन बोलावलेली ती वाईट शक्ती आपल्यावरच उलटेल. हे ऐकल्यावर तर तो अजूनच घाबरला. पण दुसरा पर्याय त्याला दिसतही नव्हता त्यामुळे तो शांत बसला. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या अशोकला मात्र राहून राहून आता आपले कसे होणार ह्याबद्दल विचार सतावत होते. पण जित्याची खोड - म्हणजे इतकं सगळं घडूनही तो मार्ग सोडण्याची त्याची तयारी नव्हती. 


आता कुणी म्हणेल का? तर ह्या मार्गावर एका बाजूला त्यांना पैसा भौतिक सुख म्हणजे बंगला गाडी प्रॉपर्टी हे सगळे इतके मिळाले होते की त्यापुढे हा शारीरिक त्रास त्याना छोटा वाटत होता. व्यसनी माणसाला कस त्याचं व्यसन सुटत नाही तसेच. पण हे व्यसन पुढे जाऊन किती घातक ठरू शकते ह्याची अजून त्यांना कल्पना नव्हती. 


माई, काका आणि बाकीचे तिघेही त्यांना भेटून परत आले. आईवडील म्हणून माईकाकांना काळजी तर वाटतच होती पण प्रत्यक्षात आपल्या मुलांची वागणूक बघितल्यावर त्यांची मनं दुखावली गेली. कारण भेटण्यासाठी आपल्या वयाचा विचार न करता आलेल्या आईवडिलांशी नीट बोलण्याचे कष्टही त्यांच्या पैकी कुणी घेतले नव्हते. तशीच वागणूक भास्कर संगीताला ही मिळाली होती. पण सगळं काही गिळून आरामा साठी गावी या असे सांगून ते तिथून निघाले. 


वाटेतून येताना देवीच्या देवळात ओटी भरण्याची इच्छा माईंनी व्यक्त केली. तसे ते तिकडे गेले परतीच्या वाटेवर भास्कर संगीताला मात्र स्वराची उणीव पहिल्यांदा जाणवली. 


हा एक सुखद बदल होता. काकांनी मनोमनच देवीचे आभार मानले. त्यांना घरी पोहोचण्यासाठी बराच उशीर झाला होता. पण इकडे ह्या तिघांनी मात्र त्यांच्यासाठी मस्त जेवणाची तयारी करून ठेवली होती. सगळं काही स्वराने केलं आम्ही फक्त मदत केली हे जेव्हा कैवल्य म्हणाला तेंव्हा संगीताला लेकीचं फार कौतुक वाटलं ते तिला दाखवताही आलं नाही आणि लपवताही आलं नाही त्यामुळे तिचे डोळे भरून आले. 


तशी तिच्या गळ्यात हात टाकत स्वरा म्हणाली, “असू द्या हो मातोश्री, नका टेन्शन घेऊ .कुणाला काही होणार नाही माझं हातचं खाऊन.” तसे सगळे हसू लागले. आगाव कुठली अस म्हणत संगीताने तिला हसतच हलकासा धपाटा मारला.


 चला जेवू या सगळे अस म्हणत कैवल्यने समीरला मदत करण्यासाठी आत नेले. आईबाबांची बदललेली वागणूक बघून स्वराच्या चेहऱ्यावर हसू आले. 


त्या रात्री बऱ्याच गोष्टी बदलल्या. एकीकडे स्वराला आपली वेगळी वाट सापडली आणि त्या सोबतच काही सुखद अनुभव आले. तर दुसरीकडे ह्या उलट पडलेल्या डावापासून अनभिज्ञ अशा ललिता आणि अशोकच्या डोक्यात नवीन काहीतरी गडबड सुरू झाली. 


आता खेळ पूर्णपणे काळाच्या हातात गेला होता. त्यात कुठलेही बदल घडवणे ना प्याद्यांच्या हातात राहिले होते ना ही खेळणाऱ्यांच्या. 


पण श्रीपाद मागील भागात म्हणाला तस प्रत्येकासाठी योग्य काय आहे हे ठरले होते आणि आता ते घडणार होते. 


आणि तेच होते खरं तर.... 


आपल्या बाबतीत कुरघोड्या डावपेच करणाऱ्या व्यक्ती आपल्याला वरवर कितीही खुश दिसत असल्या तरी पडद्याआडचे चित्र काही वेगळेच असते. 


चांगल्या माणसांचं सगळं नेहमीच चांगलं होतं. फक्त त्या चांगल्याची व्याख्या वेगळी असते. 


तुम्हाला काय वाटते अशोक ललिताने ह्या अपघातानंतर काय करतील? त्यांच्या वागण्यात बदल घडतील की ते पुन्हा स्वराला त्रास देण्यासाठी नवीन मार्ग शोधून काढतील?

_______________________________

प्रतिक्रियांची वाट पहात आहे...


बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू !!! शुभं भवतु!!!

स्वतःला शोधताना गौरी हर्षल 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

comparison 2/8

प्रत्येकाचा मार्ग वेगळा ...