मंगळवार, २४ मार्च, २०२६

कशाला उद्याची बात

#कशाला_उद्याची_बात? 
उद्याची काळजी करण्यात आपण आजचा आनंद विसरतोय का? हा प्रश्न बऱ्याच क्लायंटशी बोलताना मनात डोकावत असतो. 
🫧 मन अनेकदा अशा समस्या सोडवत बसतं ज्या प्रत्यक्षात अस्तित्वातच नसतात. आजच्या क्षणात जगायला शिका, कारण आयुष्य इथेच वर्तमानात आहे, हे जेव्हा सांगूनही पटत नाही तेव्हा आपल्या मनाला उदाहरणांची गरज असते. 

उदाहरणामुळे त्याला गोष्टी लवकर समजतात. म्हणूनच ही आजची गोष्ट....👇🏼
एका तरुणाने एकदा एका साधूला विचारले,“मी खूप विचार करणं कसं थांबवू?”
साधूने उत्तर दिले:“तू खूप विचार करतोस कारण तुझं मन तुझं संरक्षण करायचा प्रयत्न करतंय... अशा भविष्यापासून जे अजून अस्तित्वातच नाही. मला सांग—उद्याचा दिवस कोणी पाहिलाय?
त्याबद्दल तुला वाटणारी भीती हे सत्य नसून केवळ सत्याचा मुखवटा घातलेली एक कल्पना आहे.म्हणून मन अशा समस्या निर्माण करतं ज्या खरंतर अस्तित्वात नाहीतच...
आणि मग त्या सोडवण्याचा प्रयत्न करून स्वतःला थकवून टाकतं. अगदी एखाद्या मांजरीसारखं, जी स्वतःच्या शेपटीचा पाठलाग करत गोल गोल फिरत असते.
जर तुला मुक्त व्हायचं असेल, तर दोन गोष्टी लक्षात ठेव.
💫पहिली—तुझे विचार म्हणजे सत्य नव्हेत.
तू ज्या गोष्टींची काळजी करतोस, त्यातील बहुतेक गोष्टी कधीच घडणार नाहीत.
💫दुसरी—जीवन त्याच्या गतीनेच पुढे जाईल.
जे तुझ्या नियंत्रणात नाही ते सोडून दे, आणि जे समोर येईल त्याला हुशारीने सामोरं जा.
हे केलंस की तुझं अस्वस्थ मन बदलून जाईल...भीतीच्या चक्रातून.... एका नदीसारखं—जी वाहत असते संथपणे, परिस्थितीनुसार मार्ग बदलते आणि शांत असते.
✔️हे नीट समजून घे: मन अनेकदा स्वतःच निर्माण केलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतं. 
🌸जीवनावर विश्वास ठेव.
🧘🏼‍♀️जिथे शक्य आहे तिथे कृती कर.
🤷🏼‍♀️जिथे शक्य नाही तिथे विषय सोडून दे.
हाच मार्ग आहे.”
खरे शहाणपण विचारांच्या गोंधळात अडकून राहण्यात नसून, एका शांत श्वासात असतं.
❤️ जेव्हा आपण प्रत्येक 'उद्या' आजच सोडवण्याचा हट्ट सोडतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की वर्तमानाचा प्रकाश मार्ग दाखवण्यासाठी पुरेसा आहे.
या क्षणावर विश्वास ठेवण्यात एक वेगळीच शक्ती आहे, कारण आयुष्य नेमकं इथेच फुलत असतं. या क्षणात जगायला शिकलात की हृदयाला विश्रांती मिळते आणि भीतीमुळे दडून बसलेला अंतरात्म्याचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. 🌿
जाता जाता इतकच सांगते...
"तुमचे विचार म्हणजे 'सत्य' नव्हेत, तर ती फक्त मनाची एक कल्पना असू शकते. भीतीचा मुखवटा बाजूला सारून पहा, वर्तमान अधिक सुंदर आहे. जे आपल्या हातात नाही, ते सोडून देण्यातच खरी शांतता आहे. ✨"

✔️प्रश्न १: तुमच्या मनातही कधी अशा समस्या येतात का, ज्या प्रत्यक्षात कधी घडल्याच नाहीत? कमेंट्समध्ये सांगा. 👇
✔️प्रश्न २: 'अतिविचार' (Overthinking) थांबवण्यासाठी तुम्ही कोणती गोष्ट आवर्जून करता?
✔️प्रश्न ३: या कथेतील कोणती ओळ तुम्हाला सर्वात जास्त भावली?
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
जर तुम्हालाही self awareness journey सुरू करायची असेल, 
तर संपर्क करा:
Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor
📩 WhatsApp: 9730961014 (paid counselling) 

मनातल्या गाठी

#मनातल्या_गाठी 
जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला 'खटकते'...
आपल्याला कधी कधी एखाद्याचं बोलणं किंवा वागणं एकदम मनाला लागतं. कशावरून तरी आपण एकदम चिडतो, नाहीतर एकदम गप्प होतो. आपण म्हणतो, "त्यानं मला असं का म्हटलं?" किंवा "तिचं वागणं मला अजिबात आवडलं नाही." आपल्याला वाटतं की समोरची माणसं किंवा ती परिस्थितीच चुकीची आहे.
पण जरा थांबून विचार करा... आपल्याला जे 'खटकतंय', ते खरं तर आपल्याला काहीतरी सांगायला आलंय.
आरसा दाखवणारी अस्वस्थता
जेव्हा आपल्याला राग येतो ना, तेव्हा तो राग फक्त समोरच्यावर नसतो. तो आपल्या आतल्या कुठल्यातरी जुन्या जखमेवर बोट ठेवत असतो. जसं शरीराला कुठे लागलं असेल आणि तिथे कुणी हात लावला की आपण कळवळतो, तसंच मनाचं आहे. जे आपल्याला 'ट्रिगर' करतं, ते खरं तर आपल्याला सांगतंय की, "हे बघ, इथे अजून थोडं मलम लावायची गरज आहे बरं का!"
बदलणं नेहमीच 'शांत' नसतं
आपल्याला वाटतं प्रगती म्हणजे सगळं कसं छान, शांत असणार. पण कधी कधी मनाची साफसफाई करताना थोडी धूळ उडणारच. काही कटू सत्य समोर येणारच. ते स्वीकारणं थोडं जड जातं, पण तिथेच खरी सुधारणा असते. स्वतःला ओळखून, आपल्या उणिवा समजून घेणं हीच तर मोठी गोष्ट आहे.
मोकळं होण्याचा मार्ग
जोपर्यंत आपण त्या खुपणाऱ्या गोष्टींकडे बघत नाही, तोपर्यंत आपण त्यातून मुक्त होऊ शकत नाही. जेव्हा आपण स्वतःला विचारतो, "अरे, मला या गोष्टीचा इतका त्रास का होतोय?", तेव्हा कुठेतरी त्या त्रासाची गाठ सुटायला सुरुवात होते. आणि एकदा का ती गाठ सुटली की जे सुख मिळतं, तेच खरं स्वातंत्र्य!
मग आज काय शिकायचं?
आज तुम्हाला कशाचा सगळ्यात जास्त राग आला? कशाची भीती वाटली?
लक्षात ठेवा, जे तुम्हाला अस्वस्थ करतंय, तेच तुम्हाला बरं होण्याचा रस्ता दाखवतंय. त्या खुपणाऱ्या गोष्टींकडे शत्रू म्हणून न बघता, सुधारण्याची एक संधी म्हणून बघा. मग बघा, आयुष्य कसं हलकं-फुलकं वाटायला लागेल! ✨

✔️प्रश्न १: नजीकच्या काळात तुम्हाला कशाचा सगळ्यात जास्त राग आला? कशाची भीती वाटली?कमेंट्समध्ये सांगा. 👇
✔️प्रश्न २: जे तुम्हाला अस्वस्थ करत आहे, ते तुम्हाला ओळखता येतं का? 
✔️प्रश्न ३: या कथेतील कोणती ओळ तुम्हाला सर्वात जास्त भावली?
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
जर तुम्हालाही self awareness journey सुरू करायची असेल, 
तर संपर्क करा:
Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor
📩 WhatsApp: 9730961014 (paid counselling) 

सोमवार, १६ मार्च, २०२६

असं का झालं?

#असं_का_झालं? 
जेव्हा उत्तरं मिळत नाहीत, तेव्हा शांतपणे पुढे जाणंच चांगलं...
"काही गोष्टींचा शेवट ' आता सगळं काही नीट झालंय' अशा उत्तराने किंवा स्थितीत होत नाही; तर तो होतो मनाला झालेल्या स्पष्ट जाणिवेने आणि स्वतःच्या स्वाभिमानाने."

कधीकधी आपल्या आयुष्यातली काही पावलं अशी असतात की तिथे समोरचा माणूस आपल्याला ना काही सांगतो, ना आपली माफी मागतो. आपण मात्र उगाच विचार करत बसतो की 'असं का झालं?'

तुमच्यासोबत सुद्धा असं झालं असेल ना??? 
पण खरं सांगू का? 
मनाला शांतता मिळवण्यासाठी समोरच्याने उत्तर द्यायलाच पाहिजे असं काही नसतं.
जेव्हा आपल्याला वस्तुस्थिती नीट समजते, तेव्हा ती गोष्ट तिथेच संपते. आपण जसा विचार केला होता तसं जग नसतं, हे जेव्हा आपल्याला उमजतं ना, तेव्हा एक प्रकारची शांतता मिळते. त्या शांततेत आपला स्वाभिमान जागा होतो आणि आपल्याला सांगतो की, "जिथे तुझी किंमत नाही, तिथे आता वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही."
कोणत्याही उत्तराची अपेक्षा न ठेवता आयुष्यात पुढे जाणं म्हणजे हार मानणं नसतं; तर तो स्वतःचा सन्मान करण्याचा एक मार्ग असतो. शेवटच्या शब्दासाठी भांडण्यापेक्षा स्वतःच्या मनाची शांतता निवडणं कधीही श्रेष्ठच!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
जर तुम्हालाही healing journey सुरू करायची असेल,
तर संपर्क करा:
Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor
📩 WhatsApp: 9730961014

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

व्यक्त होणं का थांबतं?

"व्यक्त होणं का थांबतं? ~अनपेक्षित धक्क्याचा मनावर होणारा परिणाम"
बऱ्याचदा ढोर मेहनत करून सुद्धा ऐनवेळी तोंडचा घास दुसऱ्या व्यक्तीने हिसकावून घेतल्यावर ढसाढसा रडणाऱ्या व्यक्ती कौन्सिलिंग सेशनमध्ये भेटतात. 
त्यापैकी कित्येक जणांचे मनोगत ही खालची वाक्यं दर्शवतात... 

तुमच्या बाबतीत सुद्धा हे घडलं आहे का? 
हळूहळू काही माणसं व्यक्त व्हायची बंद होतात किंवा ती व्यक्त होणे टाळू लागतात असं का होत असेल? 
कारण त्यांच्या आजूबाजूला त्यांना इतरांचा खोटेपणा, दिखाऊपणा, इतरांचं क्रेडिट लाटण्याची वृत्ती अशा अनेक गोष्टी उघडपणे दिसू लागतात पण त्याच वेळेला त्यांना हेही दिसतं की असं वागणाऱ्या लोकांना कोणीच ना त्यांच्या चुकीची जाणीव करून देतात... ना कधी धारेवर धरतात... उलट दुसऱ्यांच्या गोष्टी लाटून खऱ्याचं खोटं करून खोट्याचं खरं करून स्वतःची बाजू चांगली सिद्ध करायला शिकलेल्या ह्या लोकांना जर चुकून कधी यश मिळालं तर त्यांच्या यशाचा एवढा गाजावाजा केला जातो की रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या व्यक्तीचे यश झाकोळून जातं. 

आता कोणी म्हणेल की त्याने त्या यशाची किंमत कमी तर होत नाही ना? नक्कीच होत नाही पण आनंदाने आपलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनस्थितीवर मात्र खोलवर परिणाम होतो. 

 कारण हे असं वागणारी आपलीच माणसं असतात... ज्यांना आपण कधीकाळी बऱ्यापैकी जवळच्या नात्यांमध्ये ओळखत असतो. पण त्या व्यक्ती वेळ आल्यावर आपल्या कल्पना, आपण मांडलेली मतं, आपण केलेली काम सुद्धा स्वतःच्या नावावर खपवून मोकळे होतात. 

कालाय तस्मै नमः म्हणजे काळ हे या सगळ्या गोष्टींवर उत्तम उत्तर असतं. कारण अर्थातच सत्य एके दिवशी समोर येतच...
 पण म्हणून झालेला त्रास, मनस्ताप यांची भरपाई होत नाही. 

माणसं कितीही यशस्वी झाली तरी सुरुवातीच्या काळात किंवा अगदी यशाच्या शिखरावर असताना सुद्धा जर त्यांना जवळच्या लोकांकडून असे अनुभव आले तर ती अलिप्त होत जातात. कारण बऱ्याचदा अन्याय झालाय म्हणून दाद मागायला गेलो तर समोरच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी वाटेल त्या लेवलची वाक्य तोंडावर फेकून मारली जातात. 

हे फक्त घरात, ऑफिसमध्ये घडत नाही तर हल्ली सर्वत्र घडतं. 
उपाय खूप सारे असतात... पण जेव्हा समोरच्याने आपला केसाने गळा कापलेला असतो... तेव्हा त्यावर चिडचिड करून त्रागा व्यक्त करून काहीही साध्य होत नाही.‌

उदाहरण द्यायचं झालं तर थोडक्यात सांगते, 
नावं बदललेली आहेत...
नेहा नावाची माझी एक क्लायंट मागच्या आठवड्यात सेशनची वेळ ठरवून माझ्याशी बोलत होती. 
तिच्या आत्तापर्यंतच्या सेशनचा आढावा घेत असतानाच अचानक ती थांबली आणि म्हणाली , "गौरीताई मला एक महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे. खरंतर तुम्ही म्हणाल की इतके दिवस आपण जे काही करत आहोत तरीही तुझ्याकडून अशी रिएक्शन मला अपेक्षित नव्हती. पण मला राहावत नाहीये आणि मला प्रामाणिकपणे तुम्हाला हे सांगायचं आहे." 

मी तिला म्हणाले, " ठीक आहे, आधी तुझ्या मनात जे काही साचलेले आहे ते आपण बाहेर काढू आणि मगच पुढे जाऊ." 

ती, " माझी एक मैत्रीण आहे. जिला मी इतके दिवस खूप जवळची मैत्रीण समजत होते. मागच्या वर्षापर्यंत ती नोकरी करत होती. आणि तिचं बाकी सगळंही उत्तम सुरू होतं. पण अचानक तिच्या नोकरीत काही प्रॉब्लेम झाले आणि तिला राजीनामा द्यावा लागला. त्यावेळेला ती निराश झालेली होती. म्हणून मी तिला उभारी देण्यासाठी नेहमी तिच्याशी स्वतःहून संवाद साधत होते. 
संवाद साधत असताना एके दिवशी मी तिला एका व्यवसायाबद्दल स्वतःहून माहिती दिली आणि म्हणाले की जर तुझे तयारी असेल तर आपण दोघी एकत्र हे काम करू. मला हे काम करायची खूप इच्छा आहे. त्यावेळी ती मला म्हणाली की मी विचार करून सांगते. त्यानंतर बरेच दिवस, महिने उलटले तिच्याकडून मला काहीही रिप्लाय आला नाही. माझ्याकडे बाकीची ही कामं असल्यामुळे मी ही गोष्ट फारशी मनावर घेतली नाही. आणि अचानक काही दिवसांपूर्वी मला असं कळलं की मी सुचवलेला व्यवसाय तिने करायला सुरुवात केली आहे. तिने मला त्यात सामील केलं नाही याच्याशी मला काहीच देणं घेणं नव्हतं. पण ते करताना तिला एकदाही मला संपर्क करावासा वाटला नाही याचं मला खूप वाईट वाटलं. मुळात तिला ती गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवावी वाटली यातच मला काय ते उत्तर मिळालं होतं. पण तरीही माझा स्वभाव जो सगळ्यात जास्त तुम्हालाच माहित आहे. त्याला अनुसरून मी फोन करून माझा त्रागा व्यक्त केला. आणि इथेच माझं चुकलं.... समोरच्या व्यक्तीने अर्थातच माझं म्हणणं उडवून लावलं आणि समोरून फोन बंद केला. या सगळ्या गोष्टींमुळे माझा पुढचा सगळा आठवडा खराब गेला. तुम्ही म्हणाल की मी वेड्यासारखी वागले, मी असं करायला नव्हतं पाहिजे हे मला सुद्धा पटलं पण तोपर्यंत बंदुकीतून गोळी सुटली होती. " 

मंडळी माझ्या ह्या क्लायंटला अँगर इशू आहेत. त्यांना राग येतो, आणि त्यावर आम्ही गेले काही महिने काम करत आहोत. पण होतं काय सगळ्या पद्धती तंत्र वापरली तरी त्या स्वतः एक माणूस आहेत आणि जेव्हा माणूस एखाद्या व्यक्तीकडून जाणून बुजून दुखावला जातो तेव्हा त्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यात जमेलच असं नाही. 
लक्षात घ्या आपण रागावर नियंत्रण ठेवणं शिकायचं असतं पण ते केव्हा जेव्हा बऱ्यापैकी वेळेला आपल्याला माहीत असतं की आपल्याला राग येणार आहे आपलं शरीर तसेच सिग्नल आपल्याला देत असतं. इथे माझ्या क्लायंटच्या बाबतीत मात्र घडलेली घटना पूर्णपणे अनपेक्षित होती त्यामुळे त्या जे काही वागल्या ती त्यांची प्रतीक्षिप्त प्रतिक्रिया होती. म्हणजे त्या घडलेल्या घटनेवरची रिएक्शन... इन्स्टंट रिएक्शन. 
जी खरंतर त्यांना टाळता येऊ शकली असती.... पण कदाचित ते त्यांना नाही जमलं. हरकत नाही... त्याही परिस्थितीत आपण चुकत आहोत , चुकीच्या व्यक्तीसमोर व्यक्त होत आहोत हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ते माझ्याकडे प्रामाणिकपणे कबूल केलं ही सुद्धा स्वतःमध्ये चांगल्या सुधारणा घडवून आणण्याची एक बाजू आहे. 
हळूहळू कदाचित त्यांना त्यांच्या रागावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येईल. 

पण एक गोष्ट लक्षात घ्या आपण समोरच्या व्यक्तीच्या कडून नकळत किंवा जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अशा पद्धतीच्या वर्तणुकीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मग अशा लोकांच्या बाबतीत काय करायचं? ते मी जनरलाइज्ड सांगू शकत नाही. पण ज्यांना असं वाटतं ते कौन्सिलिंग सेशन चा वापर करून स्वतःच्या आयुष्यातील अशा व्यक्तींसोबत कसं वागायचं हे नक्कीच शिकू शकतात... 
बाकी तुमच्या बाबतीत सुद्धा जर असं काही घडत असेल तर ते आमच्या पर्यंत पोहोचवा.... 
गौरी हर्षल 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर 

शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०२६

choice is yours

Choice is yours 
निवड तुमची: जेव्हा शहराच्या वेगात आयुष्य थबकतं!
'समीर' एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत (MNC) सिनीअर मॅनेजर म्हणून काम करत होता. पुण्यात स्वतःचं हक्काचं घर, आलिशान गाडी आणि सुखी कुटुंब—सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं होतं. समीरला वाटायचं की त्याने आयुष्याचं गणित अचूक सोडवलं आहे.
पण एक दिवस अचानक कंपनीत 'ले-ऑफ' जाहीर झाला आणि एका ईमेलने समीरचं जगच बदलून गेलं. ज्या कंपनीसाठी त्याने रक्ताचं पाणी केलं होतं, तिथून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
बाहेर पावसाळी संध्याकाळ होती आणि समीर मुंबई-पुणे हायवेवर गाडी थांबवून सुन्न होऊन बसला होता. डोळ्यासमोर घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण आणि भविष्याची चिंता उभी राहिली. त्याला वाटलं, "हे माझ्याच बाबतीत का झालं? मी काय चूक केली होती?"
अशाच अस्वस्थ मनस्थितीत तो आपल्या कॉलेजच्या एका जुन्या मित्राला, 'विक्रम' ला भेटायला गेला. विक्रम एक यशस्वी उद्योजक होता आणि त्याने आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले होते.
समीरने आपली सगळी कैफियत मांडली. विक्रम शांतपणे ऐकून घेत होता. त्याने हॉटेलच्या खिडकीबाहेर पाहिलं, जिथे जोरात पाऊस पडत होता आणि ट्रॅफिक जाम झालं होतं.
विक्रम म्हणाला, "समीर, बघ बाहेर ट्रॅफिक जाम आहे. कोणीतरी गाडी खराब झाल्यामुळे किंवा पावसामुळे अडकलंय. तुझ्या मते, त्या माणसाच्या हातात हा पाऊस थांबवणं होतं का?"
समीर म्हणाला, "नाही रे, पाऊस किंवा ट्रॅफिक आपल्या हातात नसतं."
विक्रम हसून म्हणाला, "अगदी हेच तुझ्या करिअरचं आहे. जागतिक मंदी, कंपनीचे निर्णय किंवा 'ले-ऑफ' हे त्या पावसासारखं आहे. ते टाळणं तुझ्या हातात नव्हतं. पण आता कारच्या आत बसून रडत बसायचं की जवळचा रस्ता शोधून बाहेर पडायचं, हे मात्र तुझ्या हातात आहे."
समीरला काहीतरी पटू लागलं. विक्रम पुढे म्हणाला:
"संकटं ही शहरातल्या ट्रॅफिकसारखी असतात. ती कधी येतील सांगता येत नाही. पण त्या वेळी आपण 'हॉर्न' वाजवून डोकं दुखवून घ्यायचं की शांत राहून पुढच्या वळणाचा विचार करायचा, ही आपली निवड असते."
समीरने त्या रात्री स्वतःला एक प्रश्न विचारला— "मी जे बदलू शकत नाही त्याचा विचार करत बसू की जे मी करू शकतो त्यावर लक्ष देऊ?"
त्याने दुसऱ्या दिवसापासून रडणं थांबवलं. त्याने आपल्या अनुभवाचा वापर करून स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली. सुरुवातीला कठीण गेलं, पण सहा महिन्यांतच तो आधीपेक्षा जास्त कमावू लागला आणि मुख्य म्हणजे तो आता स्वतःचा मालक होता.
कथेचे तात्पर्य:
शहरातल्या धावपळीच्या आयुष्यात कधी 'पिंक स्लिप' मिळेल, कधी तब्येत साथ देणार नाही किंवा कधी नाती दुरावतील, हे आपल्या हातात नसतं. संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं, त्याच्या हातात असतं.
जेव्हा परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर असते, तेव्हा तुमच्याकडे दोनच पर्याय असतात:
परिस्थितीचे बळी (Victim) बनायचं की
परिस्थितीचे विजेते (Warrior) बनायचं.
लक्षात ठेवा, वादळ तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर तुमच्यातली सुप्त ताकद ओळखण्यासाठी येतं!
तुमच्याही आयुष्यात असं कधी 'वादळ' आलं होतं का? तुम्ही त्याला कसं तोंड दिलं? कमेंट्समध्ये नक्की सांगा.
गौरी हर्षल कुलकर्णी
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर
📱 9730961014

शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

Do you compare your life with others?

Do you compare your life with others? 
अमित आणि सुमित हे दोघे एकाच कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण करून एका नामांकित आयटी कंपनीत रुजू झाले. अमित कोडिंगमध्ये अत्यंत हुशार होता, त्याला तांत्रिक गोष्टींची उपजत जाण होती. दुसरीकडे सुमित हा स्वभावाने मनमिळाऊ होता आणि त्याचे संवादकौशल्य उत्तम होते.
दोन वर्षे झाली. एके दिवशी कंपनीने 'प्रमोशन'ची यादी जाहीर केली. सुमितला 'टीम लीडर' बनवण्यात आले होते, तर अमित अजूनही 'सिनियर डेव्हलपर' म्हणूनच काम करत होता.
ही बातमी ऐकल्यापासून अमित अस्वस्थ झाला. त्याने स्वतःची तुलना सुमितशी करायला सुरुवात केली. "मी सुमितपेक्षा जास्त वेगाने कोड लिहितो, मी त्याच्यापेक्षा जास्त तास काम करतो, तरीही त्याला माझ्या वरचे पद मिळाले? कंपनीला माझ्या कामाची किंमतच नाही," असे विचार करून तो स्वतःला कमी लेखू लागला. या वैफल्यात त्याचे कामात लक्ष लागेनासे झाले. त्याने स्वतःचे महत्त्व स्वतःच्याच नजरेत कमी केले होते.
त्याचे मार्गदर्शक असलेले विकास सर ह्यांच्या लक्षात आले. त्यांनी अमितला केबिनमध्ये बोलावले.
"अमित, तू आजकाल खूप उदास वाटतोयस. काय झालंय?" विकास सरांनी विचारले.
अमितने आपले मन मोकळे केले, "सर, सुमितला प्रमोशन मिळाले आणि मी तिथेच आहे. मला वाटते मी त्याच्याइतका सक्षम नाहीये."
विकास सर हसले आणि त्यांनी टेबलावर दोन वस्तू ठेवल्या— एक महागडा 'स्मार्टफोन' आणि एक 'पॉवर बँक'.
ते म्हणाले, "अमित, हे बघ. हा फोन कितीही महागडा असला तरी तो पॉवर बँकशिवाय जास्त वेळ चालू शकत नाही. आणि ही पॉवर बँक कितीही शक्तिशाली असली तरी ती फोनसारखे फोटो काढू शकत नाही किंवा इंटरनेट चालवू शकत नाही. जर स्मार्टफोनने विचार केला की, 'मी पॉवर बँकसारखी वीज का साठवू शकत नाही?' तर तो त्याचा अपमान होईल. कारण त्याचे काम वेगळे आहे."
"सुमितमध्ये लोकांकडून काम करून घेण्याची आणि व्यवस्थापन करण्याची कला आहे, म्हणून तो 'टीम लीडर' झाला. पण तुझ्याकडे 'टेक्निकल आर्किटेक्चर'ची जी दृष्टी आहे, ती सुमितकडे नाही. तुला 'टेक्निकल एक्सपर्ट' म्हणून पुढे जाण्याची संधी आहे. तू सुमितशी तुलना करून तुझ्या या दुर्मिळ कौशल्याचा अपमान करतोयस."
अमितला आपली चूक उमजली. त्याने सुमितसारखे बनण्याचा नाद सोडला आणि स्वतःच्या कोडिंग कौशल्याला अधिक धार लावली. काही महिन्यांनी, कंपनीने त्याला 'चीफ टेक्निकल ऑफिसर' च्या विशेष ट्रेनिंगसाठी निवडले— जे सुमितच्या पदापेक्षाही वेगळ्या आणि मोठ्या जबाबदारीचे काम होते.

कथेचे तात्पर्य:
✔️खऱ्या आयुष्यात आपण अनेकदा सोशल मीडियावरील फोटो किंवा दुसऱ्याचे पगार पाहून स्वतःला दुःखी करतो.
✔️ पण प्रत्येकाचा प्रवास, परिस्थिती आणि कौशल्ये वेगळी असतात.
 ✔️दुसऱ्याच्या यशाचे मोजमाप आपल्या आयुष्याला लावणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा अनादर करणे होय.
✔️तुमची प्रगती ही कालच्या 'तुम्ही' पेक्षा आज तुम्ही किती चांगले आहात, यावर मोजली पाहिजे, दुसऱ्याच्या गतीने नाही.
✔️लक्षात ठेवा 👉🏼स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात

तुम्हाला सुद्धा स्वतःच्या आयुष्याची इतरांसोबत तुलना करण्याची सवय आहे का? 
तुमचे अनुभव नक्की सांगा. 
गौरी हर्षल कुलकर्णी 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर 
📱📩 9730961014

गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

be selective

Be selective 

राजहंस वृत्ती: काय स्वीकारावं आणि काय सोडावं?

एका प्रसिद्ध आश्रमात एक तरुण शिष्य, 'वेदांत', आपल्या गुरूंकडे शिकत होता. वेदांत खूप हुशार होता, पण तो एक बाबतीत खूप त्रस्त असायचा. लोकांच्या प्रतिक्रिया, टीका आणि सल्ले यांचा त्याच्यावर खूप लवकर परिणाम व्हायचा. कोणी चांगलं म्हटलं की तो हवेत उडायचा आणि कोणी टीका केली की तो दिवसभर उदास राहायचा.

एके दिवशी तो गुरूंना म्हणाला, "गुरुदेव, या जगात इतके लोक आहेत आणि प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. कोणाचं ऐकावं आणि कोणाचं सोडून द्यावं, हेच मला समजत नाही. लोक जे बोलतात ते माझ्या मनात घर करून राहतं."

गुरुदेव स्मितहास्य करत त्याला आश्रमाच्या तलावाकाठी घेऊन गेले. तिथे एक देखणा राजहंस पोहत होता. गुरूंनी वेदांतला सांगितले, "वेदांत, या राजहंसाचं नीट निरीक्षण कर. असं म्हणतात की, जर राजहंसासमोर दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं, तर तो फक्त दूध पितो आणि पाणी सोडून देतो. तो त्या मिश्रणात गुंतून न राहता, जे 'सार' (Essence) आहे तेच स्वीकारतो."

वेदांत म्हणाला, "पण सर, माणसाच्या बाबतीत हे कसं शक्य आहे?"

गुरू समजावून सांगू लागले, "माणसानं सुद्धा राजहंसासारखं असावं. रोज तुला हजारो विचार ऐकायला मिळतील, हजारो सल्ले दिले जातील. पण त्यातील सर्वच गोष्टी तुझ्या कामाच्या नसतात. काही गोष्टी तुझ्या प्रगतीसाठी चांगल्या असतील (दूध), तर काही फक्त तुझे मन कलुषित करणारी टीका असतील (पाणी)."
"ज्या क्षणी तू लोकांच्या टोमण्यांना किंवा निरर्थक टीकेला मनात जागा देतोस, त्या क्षणी तू 'पाणी' पिऊ लागतोस. ज्याला स्वतःची उंची गाठायची आहे, त्याने राजहंसासारखा 'विवेक' जागृत ठेवला पाहिजे. जे तुला पटेल, जे तुला प्रगतीकडे नेईल, तेच स्वीकारावं; बाकी सगळं तिथेच सोडून द्यावं."

वेदांतला एक मोठा धडा मिळाला होता. त्याने ठरवले की आता तो लोकांच्या शब्दांचा कचरा स्वतःच्या मनात साठवणार नाही. तो फक्त तेच शब्द निवडेल जे त्याला अधिक चांगला माणूस बनवतील.

कथेचे तात्पर्य:
हे जग विविध विचारांच्या मिश्रणाने भरलेले आहे. इथे चांगुलपणाही आहे आणि नकारात्मकताही. माणसाचा 'विवेक' हा त्याच्यातला राजहंस आहे. आपण काय स्वीकारतो, यावरच आपले सुख आणि शांती अवलंबून असते. जे पटत नाही किंवा जे आपल्याला मानसिक त्रास देते, ते सोडून देण्यातच खरी बुद्धिमत्ता आहे.
"तुमच्या मनाची बरणी राजहंसासारखी ठेवा; फक्त शुद्धाचा स्वीकार करा, अशुद्धाचा त्याग करा."
माणसानं राजहंसासारखं असावं.आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं.

तुम्हाला सुद्धा राजहंस व्हायला आवडेल का? की तुम्ही आधीच हे करण्याचा प्रयत्न करत आहात पण जमत नाही? मग योग्य वेळी योग्य व्यक्तीची मदत घ्या. 

गौरी हर्षल कुलकर्णी 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर 
📱📩 9730961014