आज एक खूप छान गोष्ट जाणवली. काय माहित आहे?? 2016 मधली मी आणि 2026 मधली मी या दोघींमध्ये एक महत्त्वाचा फरक मला लक्षात आला. आणि तो फरक म्हणजे 2016 मध्ये माझ्या आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीतल्या संकल्पना फार रॉ होत्या म्हणजे त्या बऱ्यापैकी कच्च्या किंवा वरवरच्या अशा होत्या. बैठक जरी पक्की असली तरी आयुष्यात अजून बरेच अनुभव घेणे तेव्हा शिल्लक होते. त्यामुळे ते सहाजिकही होतं. आपल्या बाबतीत ज्या गोष्टी घडत आहेत त्या का घडत आहेत त्यांचे भविष्यात काय परिणाम घडतील याबद्दल फारसा विचार मी करत नव्हते. कारण तेव्हाही आणि आत्ताही एक गोष्ट माझ्या मनावर आणि मेंदूवर कोरलेली होती ती म्हणजे माझा मित्र आहे तो बघून घेईल, मला कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही.
आणि जसं जसं आयुष्य पुढे सरकत गेलं तसं तसं लक्षात आलं की खरोखर त्याने कितीतरी गोष्टींची काळजी माझ्या अपरोक्ष घेतली आहे.
म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणतो ना की देव आपल्या आयुष्यातून माणसांना वजा करतो कारण आपल्याला त्यांचं जे रूप दिसत असतं त्यापेक्षा वेगळं असलेलं आणि खरं असलेलं रूप त्याला माहीत असतं.
आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला ह्या गोष्टी फार ठळकपणे दिसतात.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला जाणवली ती म्हणजे जी माणसं आपल्याला खूप जवळची आपल्याबद्दल चांगला विचार करणारी अशी वाटत असतात ना कालांतराने आपल्याला आपल्या पडत्या काळात किंवा कठीण काळात त्यांनी आपल्याबद्दल काय विचार केला होता हे लक्षात येतं. कधी कधी ते सत्य समोरून आपल्याकडे येतं आणि कधी कधी त्या व्यक्तींच्या बाबतीत अशा काही घटना घडतात की आपल्याला त्यांच्या मनात आपल्याबद्दल असणारे विचार जाणवतात.
माझ्या बाबतीत जसा जसा माझा प्रवास पुढे पुढे सरकत गेला तशा तशा या गोष्टी जास्त ठळकपणे घडत गेल्या. आजही बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी मला आधीच जाणवतात. पण कारण पुन्हा तेच मी त्यावर आताही फारसा विचार करत नाही.
आपल्याबद्दल कोणी काय विचार करायचा आणि काय कृती करायची हा अक्षरशः ज्याच्या त्याच्या कर्माचा प्रश्न असतो. आणि त्या गोष्टींचा चांगलं किंवा वाईट फलित हे त्या व्यक्तीला मिळणार असतं.
मग माझ्यासारख्या कित्येक सामान्य माणसांना हा प्रश्न पडतो की या सगळ्यांमध्ये आपण काय करायचं असतं???
त्याचं फार छान उत्तर तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे ,
" ठेविले अनंते तैसेची रहावे ।चित्ती असो द्यावे समाधान ।"
अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते, आत्ता जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात चांगला काळ चाललेला नाहीये किंवा तुमचं कोणी जवळच नाहीये तर मनापासून फक्त एकच गोष्ट करा - तुमचं जे कुठलं इष्ट दैवत, श्रद्धास्थान असेल त्याच्या समोर पूर्णपणे शरणागती पत्करा ,समर्पण करा.
आपल्या चुका, आपल्या मनात येणारे वाईट विचार चांगले विचार सगळं काही सांगून मोकळे व्हा. त्यानंतर त्यांनाच योग्य मार्ग दाखवण्यासाठी विनंती करा.
आणि हे सगळं करताना मनापासून त्यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवा. तो विश्वास कधीही डळमळीत होऊ देऊ नका. एवढी गोष्ट जर केली तर तुम्ही कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीने तुमच्या आयुष्याची जबाबदारी घेतली जाते.
मी तर अनुभव घेतला आहे आणि घेत आहे, भविष्यातही घेणार आहे. ही गोष्ट करण्यासाठी कुठल्याही चांगल्या मुहूर्ताची गरज नसतेच. मनात येईल तो ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी चांगला मुहूर्त.
बाकी???
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
3 मे 2026