सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

स्वतःला_शोधताना_ते_स्वतःसाठी_बदलताना

#स्वतःला_शोधताना_ते_स्वतःसाठी_बदलताना
#माझा_प्रवास 
#गौरीहर्षल

गेल्या काही दिवसात लक्षात आलं की खरंच गरज आहे का किंवा असते का इतकं टोकाला जाऊन कुणाचं वागणं, बोलणं मनावर घेण्याची??? आपल्याला दुखावून समोरची व्यक्ती जर काही झालंच नाही अशा थाटात जगत असते तर आपण स्वतःला कोणत्या चुकीची शिक्षा देत असतो??  मग मात्र ठरवलं की राग येणं, वाईट वाटण हे तर होतच राहणार आहे पण दरवेळेस असं झालं की आपल्या मनाचा तो दरवाजा उघडायचा जो आपल्याला योग्य ठिकाणी नेईल. ते ठिकाण म्हणजे आपल्या नव्या विचारांचं दालन जे प्रत्येक चुकीची, अयोग्य वाटणारी गोष्ट एका नव्या नजरेतून दाखवेल. हा सगळा प्रवास स्वतःचा स्वतःसोबतच असणार आहे त्यामुळे आपण स्वतः कसे आहोत हे शोधण्याची संधी आपल्याला सतत मिळत राहते. आणि इतर कुणाच्या येण्याची वाट बघत बसण्याचीही गरज नाही.  

ह्याच विचारातून #स्वतःसाठी_बदलताना काय करावं लागेल  ती यादी तयार करायला सुरुवात केली. 
आणि काय सांगू खूप काही सापडलं जे मला सतत जाणवून देत राहील की 
                  "तुझे आहे तुजपाशी, 
                 परि तू जागा चुकलासी"  
मग काय म्हटलं हेही लिहून ठेवूया. कदाचित आपल्यासारखेच रस्ता माहीत असूनही वाट चुकलेले जे आहेत त्यांना उपयोग होईल. 

शेवटी समर्थांनी म्हटलेच आहे न , 
"दिसा माजी काही तरी ते लिहावे | 
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ||
जे जे आपणासी ठावे | 
ते ते इतरांसी शिकवावे | 
शहाणे करुन सोडावे सकल जन ||"

मधल्या काळात आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, विचित्र वागणारी माणसं ह्यांचा त्रास करून घेत स्वतःच्या मनाला जो त्रास दिला तोच आता द्यायचा नाही असा संकल्प उद्या येणाऱ्या #दत्तजयंती च्या निमित्ताने केला आहे. 
बाकी संकल्पच का ? तर पब्लिक न्यू ईयरला संकल्प करते माझ्यासाठी माझं नवीन वर्ष उद्यापासून सुरू होणार अस का कुणास ठाऊक मला वाटलं आणि अर्थातच सगळ्यात जवळच्या मित्राचा वाढदिवस ह्याशिवाय योग्य मुहूर्त कुठला असणार रस्ता चुकलेल्या मनाला मार्गावर आणण्यासाठी? 

ते म्हणतात न , की तुम्ही जर एखाद्या विशिष्ट संकेताची वाट बघत असाल तर तो नक्कीच तुमच्या आसपास असतो. 
सो, बरंच काही पेंडिंग आहे ते मार्गी लावण्यासाठी पुन्हा एकदा स्वतःला शोधण्यासाठी निघायचं आहे. प्रयत्न करण्यात तोटा काहीच नाही झाला तर फायदाच आहे so giving it a chance. 

#स्वतःसाठी_बदलताना ही मी स्वतःसाठी लिहिलेल्या सूचनांची सिरीज आहे असं म्हटलं तरी चालेल. अशा गोष्टी ज्यांचा विसर पडतो आणि मग पुन्हा मन त्याच गल्लीत जाऊन धडकते जिथे जायची गरज नसते. 

बाकी माझा संकल्प तडीस नेण्यासाठी माझा मितवा आहेच माझ्या सोबत तसा तो असतोच. 
तर माझ्यातर्फे #स्वतःला_शोधताना च्या सगळ्या वाचक मित्रमैत्रिणींना दत्तजयंतीच्या शुभेच्छा. 
थोडीशी सकारात्मकता मनात आणून उद्यापासून खूप काही चांगलं घडणार आहे ह्या  विचारावर लक्ष केंद्रित करत बाकी सगळं #दत्तात्रेयार्पणमस्तू करूया. 

https://www.facebook.com/109012627448262/posts/120681526281372/

सगळं काही दत्तात्रेयार्पणमस्तु!!! 🙏🙏
#गौरीहर्षल
२८.१२.२०२०



बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२०

विषारी सकारात्मकता - गौरीहर्षल

#विषारी_सकारात्मकता
#toxic_positivity

टायटल बरोबरच आहे. आपल्या कुणाच्याही ध्यानीमनी नसताना कोरोना आपल्या आयुष्यात आला आणि त्याने गेल्या काही महिन्यात यथेच्छ धुमाकूळ घालत आपल्या आयुष्यात नको तितके बदल घडवून आणले. त्यातले काही बदल अर्थातच चांगले आहेत तर काही नाहीत. पण ह्या सगळ्यात ज्या गोष्टीचा गवगवा सोशल मीडियावर जास्त झाला ते म्हणजे सकारात्मकता किंवा positivity. 
जो तो उठला आणि सांगत सुटला की आपण आलेल्या परिस्थितीत सकारात्मक विचार करत कसं जगायला हवं. पण म्हणतात नं अति तिथे माती तसंच काहीसं ह्या सकारात्मकतेच्या दृष्टिकोनाचंही झालंय. आणि त्यातून आता हे नवीन पिल्लू बाहेर पडले आहे ज्याचं नाव आहे 
#विषारी_सकारात्मकता अर्थात #toxic_positivity.

आता प्रश्न आहे की सकारात्मकता सुद्धा घातक ठरू शकते का? तर हो. कशी?
टॉक्सिक पॉझिटिव्हीटी म्हणजे नेमकं काय आहे ते आधी बघू. 
टॉक्सिक पॉझिटिव्हीटी म्हणजे आयुष्यात कितीही अडचणी,अवघड प्रसंग आले तरीही त्यामुळे होणारा त्रास लपवत सतत आनंदी किंवा सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणे. 
आता कुणी म्हणेल ह्यात काय चुकीचं आहे? तर आनंदी,सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणे ह्यात काहीच चुकीचं नाहीये चुकीचा आहे तो दृष्टीकोन जो मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करत सतत सकारात्मक राहायला सांगतो. 
माणूस आनंदी कधी होईल जेव्हा त्याला योग्य मनस्थितीच्या  मदतीने आलेल्या वाईट परिस्थितीत ही जगण्याचा मार्ग सापडेल. मग जर आपल्याला एखाद्या गोष्टीने दुःख होत आहे, त्रास होत आहे तर त्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन उत्तर शोधायचं की फक्त आनंदी असल्याचं चित्र उभे करून जगायचं? 
एखादी दुःखी, त्रासदायक भावना जर सतत दडपून टाकण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात ती जास्त तीव्रतेने त्रासदायक ठरू शकते. 
टॉक्सिक पॉझिटिव्हीटी बाबतही हेच होतं -
वस्तुस्थितीचा स्विकार करून त्यातून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी बरेच जण ती अमान्य तरी करतात किंवा चक्क दुर्लक्ष करून आहे तेच ठीक आहे असं स्वतःला सांगत राहतात. 
​इतरांना दाखवण्यासाठी अनेक जण सोशल मीडियावर स्वतःच्या श्रीमंतीचे , आनंदी असण्याचे प्रदर्शन करत असतात. 
सतत वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टेटस म्हणून बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह vibes ओन्ली अशा अर्थाचे स्टेटस शेयर करतात. 
जर कुणी प्रॉब्लेम मध्ये असेल आणि त्याने अशा व्यक्ती जवळ ते सांगायचा प्रयत्न केला तर ह्या व्यक्ती त्यात काय एवढं वगैरे म्हणत ऐकून घेण्याआधी तो प्रॉब्लेम किती क्षुल्लक आहे हे सांगतात.

यामागे आपली एक जुनी मानसिकताही घातक ठरते ती म्हणजे आपला त्रास मग तो पुरुष असो किंवा स्त्री कुणालाही कळू द्यायचा नाही. पिढ्यानपिढ्या आपल्या मनावर लोक काय म्हणतील? हेच बिंबवले जाते. मग कितीही त्रास होत असला तरी ही तो लपवण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे तो त्रास कमी होण्याऐवजी अजून वाढत जातो. 
प्रत्येकाला ह्या गोष्टीचं स्वतःपुरत तरी निरीक्षण करून लक्षात येईल की आपण असे वागत आहोत का? जर ऊत्तर हो असेल तर काय करता येईल? हाही विचार करायला हवा. 
--- आयुष्यात घडलेल्या एखाद्या घटनेने,प्रसंगाने जर आपल्याला वाईट वाटतंय,निराश झाल्यासारखे वाटतेय तर सगळ्यात आधी  त्या भावनेचा स्वीकार करायला शिका.  
--- ती भावना जरी नकारात्मक असली तरी त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका, मनात कुठल्याही प्रकारचा अपराधीपणा येऊ देऊ नका. 
---उलट स्वतःला सांगा की चढउतार, यशापयश हे आयुष्याचा एक भाग असतात  संपूर्ण आयुष्य नाही.
--- सोशल मिडिया वरील जे अकौंटस बघून तुम्हाला स्वतःला बदलावेसे वाटते, स्वतः बद्दल कमीपणा वाटतो ती सगळी अकौंटस अनफॉलो करा. 
--- आपल्या मनातल्या भावना लिहून काढा. लिहून काढल्याने मनातल्या भावनांचा निचरा होण्यास मदत होते. 
--- तुमच्या आयुष्यात खरे पॉझिटिव्ह बदल तेंव्हाच घडतील जेव्हा तुम्ही स्वतःला स्वतःच्या नजरेतून बघाल. स्वतःला आहे तसे स्विकारून जगण्याचा प्रयत्न कराल. 

आता ह्यावरून जर तुम्हाला तुमच्या जवळपास कुणी असं करताना दिसत आहे तर काय कराल? 
तू हे असले स्टेटस का टाकतोस किंवा टाकतेस म्हणून लगेच त्यांना बोलायला सुरुवात करू नका. 
तर त्या व्यक्तीच्या बाजूने विचार करण्याचा प्रयत्न करा. त्याला काही प्रॉब्लेम आहे का ते शोधून काढण्याचा प्रयत्न करा. 
"तुला काय वाटतंय ते बोलण्याचा प्रयत्न कर, मी ऐकतोय"  ह्याची जाणीव करून दया.  बऱ्याचदा मदतीपेक्षाही कुणीतरी आपलं ऐकावं हीच अपेक्षा असते. 
त्याला किंवा तिला बोलते करण्याचा प्रयत्न करा. 
आवश्यक असल्यास तज्ञांची मदत घ्या. 
आपली एक छोटीशी कृती कुणासाठी तरी खूप महत्त्वाची ठरू शकते हे लक्षात घ्या. 
          वाचक मित्रांनो जग जर फक्त ब्लॅक अँड व्हाईट असते तर आपण इतके आनंदी असतो का ? नाही नं! 
मग तसेच भावनांचेही आहे. सकारात्मक आणि नकारात्मक ह्या भावनाही अशाच आहेत, पण कोणत्या वेळी कुठली भावना मनात येते हे मात्र ओळखणे आपल्या हातात आहे. त्या भावनेला योग्य प्रकारे प्रतिसाद दिला तर प्रश्न सुटण्यासाठी मदतच होते. हे जमत नसेल अवघड जात असेल तर वेळीच योग्य ठिकाणाहून मदत घ्या. 
जाता जाता इतकंच म्हणेन ,
Toxic Positivity is not positive. Face it. 
इतरांच्या दिखाव्याला भुलून स्वतःच्या आयुष्यात विष कालवू नका. चकाकतं ते सगळं सोनच नसतं हे लक्षात ठेवा. 
#गौरीहर्षल



शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

फिरुनी नवी जन्मेन मी

नव्यानेच उमलणारी लाजरी, हसरी , नाचरी बाहुली होती ती.  नुकतेच स्वप्नांच्या पावलांनी १६व्या वर्षात पाऊल टाकले होते. 

   शाळेचे धरलेले बोट सुटून सुटली कॉलेजच्या हातात हात दिला होता. जसे जसे नवे विश्व खुणावत होते तसे तिचे पंख भरारी मारण्यासाठी उत्सुक झाले होते. 

 

अशातच एक दिवस बाबांनी हातात नव्याकोऱ्या स्कुटीची चावी टेकवली. आतातर काय आभाळ ठेंगणे झाले. उत्साहाने आवडीच्या सगळ्या ठिकाणी ती गाडीवर भटकून आली. 

  

गाडीच्या वाढलेल्या वेगासोबत मैत्री करताना शरीर देत असलेली सूचना मात्र तिने धुडकावून लावली. आणि अचानक साध्या सरळ मार्गाने निघालेल्या तिच्या आयुष्याला ब्रेक मिळाला. निमित्त झालं एका छोट्या अपघाताचं. डोक्यावर पडल्याने सुरक्षितता म्हणून काही चाचण्या डॉक्टरांनी करायला सांगितल्या. 


निदान - ब्रेन ट्युमर, प्राथमिक सुरुवात होती पण ट्युमर म्हणजे ऑपरेशन. 

जवळचे सगळे हवालदिल झालेले. ही मात्र तशी शांत होती. लवकरात लवकर ऑपरेशन केले तर फायदेशीर ठरेल असे डॉक्टर सांगत होते. हो, नाही करत तिने सगळ्यांना तयार केले. डॉक्टरांनी ऑपरेशनची तारीख दिली पुढच्याच आठवड्यातली. 


तारीख बघताच तिच्या आईवडिलांचे उसने अवसानही ओसरले. तिचा वाढदिवस होता त्या दिवशीच. आपल्या लेकीला ज्या दिवशी पहिल्यांदा हातात घेतले त्याच दिवशी तिच्या ऑपरेशनच्या फॉर्मवर सही करायची हे विचारच त्यांना सहन होत नव्हते. 


तिने मात्र धीराने घेत दोघांनाही समजावून सांगितले की, 'देव मला पुन्हा एकदा संधी देतो आहे नव्याने सुरुवात करण्यासाठी म्हणून तर इतका स्पेशल दिवस निवडला आहे.' 


ठरलेल्या दिवशी ऑपरेशन करण्यात आले. ती दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आली. डोळे उघडताच समोर आईबाबा दिसले. एवढया त्रासातही चेहऱ्यावर हसू आणून 

त्यांना चियर अप करण्यासाठी गाऊ लागली, 

"एकाच ह्या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा"

गौरी हर्षल कुलकर्णी

२६ जुलै २०२०




जरा विसावू या वळणावर....

"भले बुरे जे घडून गेले

विसरून जाऊ सारे क्षणभर

जरा विसावू या वळणावर"

ह्या ओळी गुणगुणत असतानाच तिचा काम करणारा हात आणि विचारात भरकटणारं मन दोघेही थांबले.


खरंच रोजच्या जगण्यात किती आणि काय काय सुटून गेलं नं? जी माणसं कधी काळी खूप जवळची होती ती आज कुठेच नाहीयेत. असं का होतं? मग आठवणींचा पट उलगडतच राहिला अन् नकळतच तिचे डोळे भरून आले.


कसे कोठुनी येतो आपण

कसे नकळता जातो गुंतून

उगाच हसतो उगाच रुसतो

क्षणात आतुर क्षणात कातर


लहानपणीचं घर तिथलं अंगण ,अंगणातलं कैरीचं झाड आयुष्यातले पहिले सवंगडी तिथेच मिळाले.

त्यातले काही इतके दूर गेले की चेहरेही धूसर झाले त्यांचे. काही मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या करत मनात आणि आयुष्यातही टिकले.


माणसं अशीच हरवत राहतात का प्रत्येक वळणावर??? पण जरी ती हरवली तरी आठवणी तर असणार आहेतच ना त्यांच्या कायमचं तिने स्वतःच स्वतःला उत्तर दिलं. शोधायचं म्हटलं तर सगळे सापडतील लगेच पण तोच निरागस मैत्रीत पुढे केलेला हात पुन्हा तितक्याच निरागसपणे हातात येईल का? की उगाच फेसबुक, वॉट्सअप्प वर जगाला दाखवण्याच्या नादात कैरीच्या , लिंबाच्या, आंब्याच्या कडूगोड आठवणी आठवणीच होऊन राहतील? तरीही ती हूरहूर लागतेच मनाला.


जुनी खेळातली नावं, लुटुपुटूची भांडणं, रुसवे, फुगवे, भातुकली सगळं कसं आत्ता घडत असल्यासारखं नजरेसमोर नाचलं. हातातली कामं आवरत तिने आज जुने अल्बम काढले. प्रत्येक फोटो एक नवीन आठवण आणि खूप दिवस टिकेल, पुरेल असं समाधानाचं हसू देऊन गेला तिला. खूप काही आहे आपल्याजवळ पण आपण उगाचच नवीन काहीतरी शोधत फिरतो असा विचार मनात येताच ती स्वतःशीच हसली.


संध्याकाळी घरी आल्यावर नवरा आणि मुलंही तिचं हे रूप पाहून खुश झाली. तितक्यात तिच्या जुन्या घराजवळचे कुणीतरी काका काकू भेटले आणि काय काय मस्त आठवणी सांगत होते असं नवरा म्हणू लागला. चला, मनातली तगमग योग्य मनापर्यंत पोचली ह्या विचाराने तिला अजूनच छान वाटलं. पुन्हा एकदा ती गुणगुणू लागली.....


खेळ जुना हा युगायुगांचा

रोज नव्याने खेळायाचा

डाव रंगता मनासारखा

कुठली हुरहुर कसले काहूर

जरा विसावू ह्या वळणावर


गौरी हर्षल कुलकर्णी

२६ जुलै २०२०






कितीदा नव्याने

"कितीदा नव्याने तुला आठवावे,

डोळ्यातले पाणी नव्याने वहावे"


गाणं ऐकलं आणि त्याला नकळतच हसू आलं. स्मृतींची पाने उलटून तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाही. 


नकळत्या वयात तिच्या प्रेमात पडला होता तो. ते नक्की प्रेम आहे की आकर्षण हेही समजत नव्हते.


 ती वर्षं त्याच्या आयुष्याच्या, करियरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वर्षं होती. पण मधेच ती भेटली आणि एका क्षणात त्याच्या मनात खळबळ माजली. 


अभ्यास एके अभ्यास करत जगणारा मुलगा सगळं काही सोडून तिच्या स्वप्नांमध्ये रमू लागला. रात्रंदिवस सतत तीच दुसरं काही त्याला सुचेना. ती दिसली की तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिच्या अवतीभवती घुटमळत राहू लागला. 


आजूबाजूला सर्वांनाच जसं हे समजलं तसं तिलाही समजलं होतच.इतर मुलींसारखं तिलाही ते आवडत होतं,पण तीही त्याच्यासारखीच होती करियर वगैरे गोष्टीना पहिली प्रायोरीटी देणारी त्यामुळे इतक्या हुशार मुलाने असं वागलेल तिला आवडलं नव्हतं. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. 


शेवटी एक दिवस त्याने तिला त्याच्या भावना सांगितल्या, तिला कदाचित अंदाज आला होताच. दोन दिवस मागून घेत ती निघून गेली. 


तिच्या वागण्याने गोंधळून गेलेला तो तिला पाठमोरी जाताना बघत होता. दोन दिवसानंतर तिच्या मैत्रिणीने एक पत्र आणून त्याला दिले. ती त्या दिवशी भेटली ती परत आलीच नाही. 


तिच्या न येण्याने तो पुरता कोलमडून गेला होता. पुढचे काही दिवस फक्त आणि फक्त निराशेत, उदास गाणी ऐकण्यात गेले.  ते पत्र अजून उघडून बघितलेही नव्हते त्याने. 


शेवटी कसाबसा मनाचा हिय्या करत त्याने ते पत्र उघडले. त्यात लिहिलेलं वाचल्यावर जे काही घडलं ते कुणालाही अनपेक्षित अस होतं. त्या दिवसानंतर तो आमूलाग्र बदलला. 


एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस. 


आयुष्यात ठरवलेल्या सर्व गोष्टी त्याने प्रचंड कष्ट करून मिळवल्या होत्या. आज जेव्हा त्याला त्यासाठी पुरस्कार मिळत होता तेव्हा तो मात्र त्याच श्रेय तिला देत होता. 


ते पत्र त्याने एक क्षणभरही स्वतःपासून दूर केले नव्हते.


त्यांचं एकत्र येणं कधीच शक्य होणार नव्हते पण ते तिने इतक्या छान पद्धतीने सांगितले की त्याला तिला गमावूनही मिळवल्याची जाणीव झाली. 


त्या समजूतदार पत्राने त्याला प्रेमाचा नवा मार्ग दाखवत सोबतीची उणीव भरून काढली होती. ती आज नसूनही त्याच्यासोबतच होती. 

गौरी हर्षल कुलकर्णी

२७ जुलै २०२०






अंतरंगातला देव

गॅलरीत ठेवलेल्या आरामखुर्चीत बसून आप्पा रेडिओवर गाणी ऐकत होते. पुढचं गाणं सुरू झालं तसा त्यांच्या डोळ्यांसमोर एक चेहरा तरळून गेला. 

तो दिवस आठवल्यावर त्यांच्या अंगावर काटा आला. 


पावसाने सगळीकडे थैमान घातलं होतं. श्रावण महिना असल्याने त्या दिवशी घरात पूजा केली होती. रजत कुरकुर करतच पुजेला बसला होता. त्याचा ह्या सगळ्या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता पण आप्पांचं मन मोडू नये म्हणून तो  करत असे. 

आप्पा त्याला नेहमी समजावत की एक दिवस कुठल्या न कुठल्या रुपात तो नक्की तुला भेटेल. तेंव्हा तूच मला सांगशील. 


अशातच संध्याकाळी मागच्या गल्लीत असणारी चाळ कोसळली अशी बातमी आली. थोड्याच वेळात त्यांच्या इथेही सूचना आल्या गरजेच्या सामानासह दुसरीकडे निघण्याची तयारी सुरु करा अशा. 


आप्पा ही सगळ्यांच्या सोबत ठरलेल्या ठिकाणी आले. 

"काय उपयोग झाला पूजा करून आला का तुमचा देव आपल्याला वाचवायला? उलट घर सोडून आलो आपण." रजत बडबड करू लागला. 


पाण्याचा जोर वाढला होता. सगळ्यांच्याच मनात आता खळबळ माजली होती. सोबत काही लहान मुले,गरोदर स्त्रियाही होत्या. 

हळूहळू त्या सगळ्यांना पुढच्या ठिकाणी पोहोचण्याचं काम सुरू झालं. रजतसोबतच सगळी तरुण मुलं मदतीसाठी पुढे झाली. 

जातपात, वय, स्त्री पुरुष सगळे भेदभाव बाजूला सारून फक्त माणुसकीच्या नात्याने जो तो मदत करत होता. रात्र सरता सरता सगळे टेकडीच्या माथ्यावर असलेल्या मोठ्या मंदिरात जाऊन पोहोचले. 

रजत एका वयोवृद्ध आजोबांना पाठीवर घेऊन आला होता. त्यांना व्यवस्थित जागा बघून त्याने बसविले तसे त्याचे दोन्ही हात घट्ट धरून डोळ्यांना टेकवत आजोबांनी नमस्कार केला. 

"अहो आजोबा हे काय करताय?" असे म्हणत रजत मागे सरकला.

"अरे लेका , तुझ्या रुपात माझा देव धावून आला बघ,  आज त्याचं दर्शन झालं मी भरून पावलो. नाहीतर माझ्यासारख्या म्हाताऱ्याकडं सगळ्यांनी दुर्लक्ष केलं होतं. पण त्याने तुझ्यामार्फत माझी मदत केली. दगडातला देव भेटला नाही पण माणसातला भेटला अजून काय पाहिजे?" 


रजतने डबडबलेल्या डोळ्यांनी आप्पांकडे बघितलं आणि त्याच वेळी जवळच्याच पायरीवर बसून एक आंधळा भिकारी गाऊ लागला, 


तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो

नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो

तुझ्यामाझ्यात भेटंल साऱ्यात तो

शोध, नाही कुठे या पसाऱ्यात तो

रोज वृंदावनी फोडी जो घागरी

तोच नाथा घरी वाहातो कावडी

गुंतला ना कधी मंदिरी, राउळी

बाप झाला कधी जाहला माऊली

भाव भोळा जिथे धावला तो तिथे

भाव नाही तिथे सांग धावंल का?

बघ उघडुनी दार अंतरंगातला देव घावल का?


गौरी हर्षल कुलकर्णी

२७ जुलै २०२०




लग जा गले

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो


तिच्या आवाजातली व्याकुळता तो आपल्या मनात नकळतच साठवून ठेवण्याची धडपड करत होता. ड्युटी पुन्हा जॉईन करा असा तडकाफडकी निरोप आल्यावर त्याच्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी तिचा चेहरा आला होता. दोनच दिवसांनी असणारा त्याचा वाढदिवस ह्यावेळी तरी एकत्र साजरा करता येईल म्हणून किती प्लॅन करत होती ती. काही त्याला सांगून तर काही लपून छपून. पण आता मात्र ते शक्य नव्हतं. 


शेवटी मनाचा हिय्या करत त्याने तिला सांगितलंच. क्षणभर तिच्या डोळ्यांत पाणी आलं. पण पुढच्याच क्षणी स्वतःला सावरत ती त्याला म्हणाली, "बरं झालं माझी सगळी तयारी झाली होती ते. तुझे सगळे गिफ्ट्स तरी तुला प्रत्यक्ष देता येतील. आणि तुला अजून काही हवं असेल तर ते ही आणता येईल. उद्या दुपारी जाणार न तू?"


तिचं वागणं बघून तो थक्क झाला होता. आपल्याला कस कळलं नाही कधी एवढी स्ट्रॉंग झाली ही? सायन्सच्या प्रॅक्टिकलला डिसेक्शन करताना घाबरलेली ती आणि आत्ताची ही केवढा फरक पडला. 

ते काहीही असलं तरी मी मात्र अजूनच प्रेमात पडतोय हिच्या. माझ्यासोबत माझी स्वप्नं भरभरून जगतानाही तिने स्वतःच्या स्वप्नांना जिवंत ठेवलं आहे. सोबतच घरच्यांनाही सांभाळते. तो स्वतःशीच विचार करत असतानाच ती आली आणि म्हणाली, चल रे सगळे जमले आहेत टेरेसवर आज मस्त पोटभर गप्पा मारू. 


त्या गप्पाच्या ओघातच त्याने तिला गाणं म्हणायला लावलं होतं आणि रेकॉर्ड पण करून घेतलं होतं. 

ती हसली तेंव्हा तो म्हणाला होता, "आठवणीच जगण्यासाठी मदत करतात ग. अवघड क्षणी डोळे मिटून एक छानशी आठवण जगून घेतो मी कारण ती मला बळ देते समोर आलेल्या संकटाला परतवून लावण्यासाठी. मी एकवेळ माणसाचे चेहरे विसरेन पण आठवण मात्र मनाच्या एका कप्प्यात सुरक्षित असेल. आणि तीच मला नव्याने सुरुवात करताना सोबत करेल." 

तेच गाणं तो ड्युटीवर परत जाताना रिपीट मोडवर ऐकत होता. पण प्रत्येक वेळी त्याला तिची नवीन आठवण हसवून जात होती. 


काही दिवसानंतर

इकडे आता त्याचा संपर्क तुटल्यापासून पंधरा दिवस झाले होते. 

शोध जरी सुरू असला तरी तो कधी सापडणार? कशा अवस्थेत ह्याची काही कल्पना नव्हती.मनातून मात्र  प्रत्येकाला आपल्या शंका खोट्या ठराव्यात असच वाटत होतं. 

 शेवटी शोध लागेल कधीतरी अस म्हणत सगळेच आपापल्या मार्गाला लागले. तीही आशेच्या हिंदोळ्यावर झुलत त्याची वाट बघत होती. पण मन मानेल तर ना? 


आणि एक दिवस तिला अपेक्षित बातमी आली. तो सापडला होता. बेशुद्ध अवस्थेत पण जिवंत होता. ती मिळेल त्या वाहनाने त्याच्या जवळ पोहोचली. पण त्याच्या डोळ्यात ओळखीची खूण नव्हती. बऱ्याच उंचावरून पडल्याने आणि वेळेत उपचार न मिळाल्याने आठवणी धूसर झाल्या होत्या. 


जखमा ताज्या असल्याने मेंदूवर ताण देऊन चालणार नव्हते. तेव्हा फक्त जुजबी ओळख पटवून देत तिने त्याला घरी येण्यासाठी तयार केले होते. 

सगळे सोपस्कार पार करून त्याने स्वतःच्याच घरी गृहप्रवेश केला. माणसं जरी त्याला अनोळखी वाटत असली तरी त्यांचे डोळे त्याला सतत काहीतरी वेगळं दाखवत होते. 


आईवडिलांसाहित सगळ्यांनी मिळून आधी त्याच्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. तो मान्य करून तो ही आता त्यांच्यामध्ये मिसळू लागला होता. 

तिचीच कल्पना होती ती पण ती स्वतः मात्र जरा जपून त्याच्या आसपास वावरत होती. कारण तो तिच्याकडे बघितलं की अस्वस्थ व्हायचा. ही व्यक्ती आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती आहे हे त्याला जाणवत होते पण तिचं आणि आपलं नातं नेमकं काय आहे हेच त्याला आठवत नव्हते. इतरांना त्रास नको म्हणून त्याने वरवर जरी नवराबायको आहोत हे मान्य केले होते तरी एकांतात मात्र त्याने तिला वेळ मागितला होता. तिनेही त्याला तो दिला होता कारण त्याच्या आठवणींच्या थियरीवर तिचा पूर्ण विश्वास होता. 


अशातच एके दिवशी तिला सहज गाणं म्हणायची हुक्की आली तो घरात नव्हता त्यामुळे ती मस्त मोकळ्या आवाजात मनापासून सूरांना आळवत होती. 


पास आइये कि हम नहीं आएंगे बार-बार

बाहें गले में डाल के हम रो लें ज़ार-ज़ार

आँखों से फिर ये प्यार कि बरसात हो न हो

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो


मनातलं सगळं दुःख तिच्या आवाजात स्पष्ट जाणवत होतं. शेवटची ओळ म्हणत असताना ती मागे वळाली आणि जागेवरच थबकली. समोर तो उभा होता डोळ्यात अश्रू पण ओठांवर मात्र आज ओळखीचं हसू आलं होतं. त्याच्या आठवणीनी अखेर त्याला तिची ओळख पटवून दिली होती. 

गौरी हर्षल 




बुधवार, २२ जुलै, २०२०

मला आवडलेलं पुस्तक भाग १

#मला_आवडलेलं_पुस्तक
जिवात्म जगाचे कायदे / laws of spiritual world 
लेखिका - खोरशीद भावनगरी

मागच्या वर्षी एका ग्रुपवर अशीच पुस्तकावर चर्चा सुरू होती तिथे ह्या पुस्तकाचा विषय निघाला. कुणाला आवडले होते कुणाला नाही. 

चर्चा वाचून शेवटी पुस्तक मागवलं. हे पुस्तक मात्र नेहमीप्रमाणे एका बैठकीत वाचून संपवलं नाही. निवांत वेळ काढत एकेक प्रकरण वाचलं. आणि मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. 

पुस्तक लिहिले आहे खोरशीद भावनगरी ह्यांनी. पुस्तकाच्या नावावरून विषयाचा अंदाज येतोच पण तरीही सांगते. हे पुस्तक हा त्यांच्या दोन दिवंगत मुलांच्या आत्म्यांशी असलेला संवाद आहे. असा संवाद जो व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील बऱ्याच सवयी, पद्धती ह्यांच्यावर पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडतो. 

पुस्तक कुठलीही अंधश्रद्धा पसरवत नाही कारण तसं काहीच ह्या पुस्तकात नाही. ह्या आत्म्यांशी संवाद हा विशिष्ट पद्धतीने साधला गेला आहे. त्या पद्धतीही त्याचं उत्तम ज्ञान घेऊनच वापरल्या आहेत. (Planchet वगैरे फालतू प्रकार नाहीत? )

मला हे पुस्तक आवडण्याचं कारण म्हणजे एक तर वयाच्या मानाने बऱ्यापैकी लवकर ते माझ्या हातात पडले आहे. आणि दुसरे म्हणजे जेव्हा आयुष्यात एखादी वाईट किंवा चुकीची गोष्ट घडते तेव्हा आपण आपलं नशीब, देव किंवा इतरांना बोल लावत बसतो. पण हा विचार कधीच करत नाही की अरे मी कधी न कधी कळत नकळत त्या व्यक्तीचं, प्राण्याचं काही नुकसान केलं आहे का? 

कारण हे पुस्तक पूर्वजन्मापासून ते मृत्यूनंतर घडणाऱ्या अनेक गोष्टी साध्या सोप्या भाषेत सांगते. अर्थात  ज्या मला पटल्या आहेत. 


छोटी छोटी उदाहरणे देत सत्यकथेवर आधारित हे पुस्तक वाचताना आयुष्याची एक नवीन बाजू सांगते हे मात्र नक्की. 

(वाचायचे असल्यास पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध आहे.)
#गौरीहर्षल
#पुस्तकवाचन


मंगळवार, २१ जुलै, २०२०

रंजीश ही सही🎶🎶 भाग १

रंजीश ही सही 🎶🎶

भाग १ 

आपल्या छोटयाशा घरात असणाऱ्या मोठ्या खिडकीत टांगलेल्या झोपाळ्यावर झोके ती बाहेर कोसळणारा पाऊस बघत होती. 

मागे बॅकग्राऊंडला रुना लैलाच्या आवाजात तिची आवडती गझल बरसत होती अगदी रिपीट मोडवर. 
(Lyrics By: अहमद फ़राज़)

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ

अब तक दिल-ए-खुशफ़हम को हैं तुझ से उम्मीदें
ये आखिरी शम्में भी बुझाने के लिये आ
रंजिश ही सही...

इक उम्र से हूँ लज्ज़त-ए-गिरया से भी महरूम
ऐ राहत-ए-जां मुझको रुलाने के लिये आ
रंजिश ही सही...

कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिये आ
रंजिश ही सही...

माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ
रंजिश ही सही...

जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ
रंजिश ही सही...

पहले से मरासिम ना सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रहे दुनिया ही निभाने के लिये आ
रंजिश ही सही...

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफा है तो ज़माने के लिये आ
रंजिश ही सही...

एका क्षणी तिला मनावरचा भार इतका नकोसा झाला की मेंदूचं न ऐकता डोळे पाझरू लागले. 

का इतक्या हतबल झालो आपण? ती स्वतःलाच विचारू लागली. का आपण एकदाही प्रयत्न केला नाही स्वतःच्या समाधानासाठी? जी मुलगी स्वतःच्या सुखासाठी तडजोड करत नव्हती ती त्या व्यक्तीच्या एका शब्दाखातर सगळं सोडून कशी काय निघून आली? 

दुसरीकडे तिच्याच मनाने त्या प्रश्नांची उत्तरे दिली, मग काय करू शकणार होतीस तू? त्या क्षणी तुझ्या सुखापेक्षा इतरांची आयुष्य जास्त महत्वाची होती. 
    आणि आफ्टर ऑल द ग्रेट पौरवी देशमुख ह्यांना त्याग करून मोठ्ठं व्हायचं होतं न? शेवटचं वाक्य ऐकताच तिच्या अंगावर काटा आला. 

खरंच अस होतं सगळ्यांच्या नजरेत मोठेपणा हवा म्हणून मी अशी वागले की मला त्या सगळ्यांचं सुख महत्वाचं वाटलं? 
मोठेपणाच हवा होता तर घरच्यांना हव्या असलेल्या मुलाशी लग्न करूनही मिळवता आला असता की.
 पण मला ते नव्हतं करायचं मला स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि त्यालाही दाखवून द्यायचं होतं की पौरवी देशमुख काय चीज आहे. 
जिने एकदा नातं जोडलं की मग ती त्या व्यक्तीसाठी काहीही करू शकते. आणि जर नातं तोडलं तर त्याचं लोकांना कायमचं विसरून जगुही शकते. 

काय म्हणाला होता तो मला? तू जळतेस माझ्यावर! अरे हट मी जर तुझ्यावर जळले असते न तर तुझ्या हातात माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीचा हात कधीच दिला नसता. 

आरुषी , तिचं नाव ओठांवर आणि चेहरा क्षणार्धात पौरवीच्या नजरेसमोर येऊन गेला. लग्नाच्या वेळी आरु च्या चेहऱ्यावर असणारा तो आनंद बघण्यासाठी तर पौरवीने आयुष्यभरासाठी वनवास स्विकारला होता. 

मुंबईत असणारे सरळसोट पण जीव की प्राण आयुष्य सोडून  ती  ह्या मनालीजवळ असणाऱ्या गावात येऊन राहिली होती. सगळ्या सुखसोयी सोडून स्वतःच्या जीवावर मागच्या दोन वर्षात तिने बरीच प्रगती केली होती. 

आज तिच्याकडे छोटंसं घर, गाडी तर होतीच पण अहोरात्र मेहनत करून तिने तिच्या बुटीकच्या दोन शाखा तिने मनालीत उभ्या केल्या होत्या. पण तिला शांत वातावरण खूप आवडतं असल्याने तिने घर घेताना ते गाव निवडलं होतं. तिथून मनालीला  जाण्यास फारसा वेळ लागत नव्हता त्यामुळे तिला ते सोयीचं होतं. 

आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेलच की ही नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळी कथा आहे. 
तर ही गोष्ट आहे एका अशा मुलीची जिचा प्रवास सुरू झाला मुंबई मध्ये आणि सध्या तो येऊन थांबला आहे हिमाचल प्रदेशात असणाऱ्या मनालीत. 
पौरवी देशमुख , एका नाकासमोर चालणाऱ्या मराठी कुटुंबात जन्माला आलेली ज्येष्ठ कन्या. अभ्यासात प्रचंड हुशार असायलाच हवी न कारण मध्यमवर्गीय लोकांना त्याशिवाय पर्यायच नसतो. पण तरीही तिने फॅशन डिझायनिंगचं क्षेत्र निवडलं आहे. 

त्या क्षेत्रात ती थोडीफार धडपडत उभी रहातच होती पण तेवढ्यात तिच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की तिला सगळं काही सोडून द्यावे लागले. 

आता अस काय घडलं होत ते कळेलच हळूहळू तोपर्यंत पहिला भाग कसा वाटला नक्की कळवा. 
क्रमशः
#गौरीहर्षल

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

ट्विस्ट अँड टर्न

#ट्विस्ट_अँड_टर्न 
सिरियल्सना कितीही नाव ठेवली तरी आपण सगळे सिरियल्स, डेली सोप बघतो. त्यात रमतो, कुणी चेष्टा करण्यासाठी बघतात तर काही जण आपापल्या दुःखाना विसरण्यासाठी बघतात. पण इथे तो विषयच नाहीये. 

इथे सिरियलच्या गोष्टीतली गोष्ट आहे. म्हणजे बघा ना सगळ्या सिरियलमध्ये त्या हिरो हिरोईनला इतर पात्रांना दोन ते तीन वेळा चान्स मिळतो नव्याने आयुष्य सुरू करण्याचा. आणि तेही मेक ओव्हर सहित.

बऱ्याच जणांना हे बघायलाच जास्त आवडतं.
कारण खऱ्या आयुष्यात असलं काही घडत नाही न. 

पण सध्या घडतंय की , आपल्या सगळ्यांचं आयुष्य स्थिर झालं आहे एका ठिकाणी येऊन कुणीही पुढे जात नाहीये कुणीही मागे रहात नाहीये. 

सगळे फक्त जगण्याची उमेद धरून ठेवण्याची धडपड करत आहेत. 
प्रत्येक जण आपापल्या परीने कसल्या न कसल्या गोष्टीत मन रमवण्याचा प्रयत्न करतोय.
ह्यात कधी कधी चिडचिड होतेय भांडणं, वादही होताहेत.

पण ते सगळं बाहेरच्या नकारात्मक परिस्थितीशी जुळवून घेताना होणारच. 
 
असो तर आपण बोलत होतो सिरियलसारख्या खऱ्या आयुष्यात आलेल्या ट्विस्ट आणि टर्न बद्दल. 

हा ट्विस्ट सध्या भरपूर बदल घडवतोय. 
काही गोष्टी काही माणसं नव्याने भेटत आहेत , कळत आहेत. 
स्वतःबद्दल बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत.
आपल्या माणसांना पारखण्याची , ओळखण्याची एक संधीच आपल्याला मिळाली आहे.

आणि आपल्याला काय करायचं आहे नेहमीप्रमाणे मागे रेलून बसत शांतपणे फक्त निरीक्षण करायचं आहे. 

सिरीयलसारखे एकामागे एक सीन समोर येत जाणार आपण मात्र त्यातून निरीक्षण करत हवं ते घ्यायचं आहे.

आता कुणाला काय हवं हे तर जो तो ठरवणार त्यामुळे ते काही मी सांगत नाही.

पण एक सल्ला मात्र देते सिरियलमध्ये कस चांगलं घडावं म्हणून आपण वाट बघतो तसच इथेही व्हावं ही एक इच्छा आपल्याला मनात सतत जागी ठेवावी लागेल. 

आणि मग कदाचित आपल्या आयुष्याच्या डेली सोपची स्टोरी आपल्या मनाप्रमाणे लिहिली जाईल.

अन् ह्या ट्विस्ट नंतर जो टर्न येईल न तो अनपेक्षित असे चांगले अनुभव घेऊन येईल.

बघूया कितपत जमतंय ते.
तोपर्यंत मनाला गुंतवा स्वतःच्या कथेत. 
बेस्ट लक शुभं भवतु!!!
©®गौरीहर्षल

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

जिंदगी धूप तुम घना साया

#जिंदगी_धूप_तुम_घना_साया

तसे ते दोघेही कानसेन सगळ्या प्रकारचं संगीत ऐकायचं मग त्यातल्या आवडलेल्या आणि न आवडलेल्याही गाण्यांवर चर्चा करायची. हा दोघांचा आवडता छंद सोबतीला चहा असायचाच कधी वाफाळणारा तर कधी iced टी सुद्धा पण ते मुडवर अवलंबून असे. 

आताशा दोघेही व्यापातून निवांत झाले होते. पिल्लं अजून घरट्यातून उडाली नव्हती,पण आता त्यांची विश्व निर्माण झाली होती. त्यामुळेच ह्या दोघांना स्वतःला आणि एकमेकांना देण्यासाठी हवा तसा अन् तेवढा वेळ काढता येत होता. ते ही धडपड करतच होते कारण इतक्या वर्षांच्या काळात त्यांना एकमेकांना दिलेलं पहिलं वचन निभवायचं होतं. कोणत? मनापासून जगण्याचा आनंद घेण्याचं. 

लग्नाआधी जेव्हा ते एकदाच एकमेकांना भेटले होते तेंव्हाही दोघांची चर्चा गाण्यावरच झाली होती. ते भेटले त्या हॉटेलमध्ये बॅकग्राऊंडला जगजितच्या गझल सुरू होत्या. हॉटेल मालकच फॅन होता वाटतं कारण एकसे एक गझल , गाणी कानावर पडत होती. 

त्यातच तुमको देखा तो ये खयाल आया सुरू झालं आणि एकाचवेळी दोघांनी एकमेकांकडे बघितलं. मनाची मनाला खूण पटली आणि अवघडलेपण गळून पडले. 
"मला हे गाणं प्रचंड आवडतं" दोघेही एकत्रच बोलले आणि हसलेही. 
"आपल्या आत्ताच्या प्रसंगात अगदी फिट झालं ना हे ?"
त्याचा आवाज हळवा झाला होता.
तिचेही डोळे नकळतच भरून आले. 
आपापल्या घरी दोघेही मोठे होते. दोघांचंही नशीब इतकं सारख होत की थोड्याफार फरकाने घरादाराची जबाबदारी दोघांच्याही खांद्यावर फार लवकर आली होती. मग त्यातून वाट काढताना त्यांना स्वतःसाठी वेळच उरला नव्हता. सगळ्यांचं सगळं मार्गी लावल्यावर मग त्यांचा विचार करावा अस कुणालातरी सुचलं होत तेही म्हातारपणी त्यांच्या जबाबदाऱ्या नको म्हणून. 
कुणी प्रत्यक्ष बोललं नसलं तरी त्या दोघांनाही ते जाणवलं होतं. त्या काळच्या मानाने उशीर झाला असला तरी दोघेही संसार थाटायला तयार झाले. 
आवडीनिवडी कधीच बाजूला पडून गेल्या होत्या पण एकमेकांशी मैत्री मात्र निभवायची अस ठरवत ते एकत्र आले. 
पहिल्या रात्री तो तिला बघून त्याच गझलच्या दोन ओळी गुणगुणला होता, 
तुमको देखा तो ये खयाल आया,
जिंदगी धूप तुम घना साया.....

त्याला जेव्हा जेव्हा भरून येत असे तो ह्या दोनच ओळी गुणगुणत असे हे तिला आता सरावाने कळलं होतं. तिचीही अवस्था काही वेगळी नसायची.
तशातच तिचं कॅलेंडरकडे लक्ष गेलं आजच्याच दिवशी ते भेटले होते. Iced टी घेऊन ती तो बसला होता तिथे येऊन बसली. त्याच्या हातावर हात ठेवून त्याला डोळ्यांनी आश्वस्त करत तिने म्युझिक प्लेयर सुरू केला. 
आपापल्या आवडीच्या जागी बसत दोघेही सुरात कधी गुंतले त्यांनाही कळलं नाही. 

आयुष्याच्या वेगळ्या वळणावर एकत्र आलेल्या त्या दोन जिवांसाठी सावलीची उणीव त्या शब्दांनीच तर भरून काढली होती. नकळतच ते एकमेकांसाठी घना साया कधी झाले ते त्यांनाही कळलं नव्हतं.
©गौरीहर्षल

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

ख्वाहिशे

कभी दबे पाँव जो मिलने आती है ,
कोई देख न ले जाते हुए इसलिए 
चुपकेसे चली जाती है ख्वाहिशें।
समझदारी ने कंधोपे जो बोझ रख दिया है 
वो देखके जाते जाते 
हल्केसे मुस्कुराती है ख्वाहिशें।
हमारी मुलाकात में 
मुझे मिल जाता है सुकून
न जाने कैसा,
हलका हलका लगने लगता है
उतरा हो कोई कर्ज जैसा।
५.३.२०२०
#गौरीहर्षल

समांतर

दोन समांतर रेषा आहोत आपण
एकाच दिशेने जाणाऱ्या
पण तरीही वाटा वेगळ्याच आहेत आपल्या
स्वतःच्या धुंदीत वळणाऱ्या
तू शोधत आहेस तुझ्या मनातलं सुख चौफेर
माझ्या मनात मात्र सतत आठवणींचा फेर
तुझ्या वाटेवर आहेत असंख्य व्यक्ती 
वेळोवेळी नातं टिकवण्यासाठी धावणाऱ्या
माझ्या वाटेवर आहेत सावल्या
मुखवट्या मागे लपणाऱ्या
तुला झाली आहे सवय 
खोट्यालाही  खर मानून जगण्याची
मला अजूनही आहे जुनीच खोड 
खऱ्यालाही पारखून घेण्याची
चुकून कधी आपल्या नजरा एकमेकांना भिडल्या
तर हसतो आपण सवयीने
पण तुला आणि मला ही माहिती आहे
कायमस्वरूपी वेगळे ठेवले आहे आपल्याला  नियतीने
समांतर असण्याचे आपले असे फायदे आहेत
तुझ्या माझ्या जगाचे आपापले कायदे आहेत

26.2.2020

गीतसप्तक भाग ५

#गीतसप्तक
मन धागा धागा
मला आवडलेलं हे अजून एक गाणं. ह्याचं  प्रत्येक कडवं मला वेगळा अर्थ सांगत असल्यासारखं वाटलं. सो, मी नेहमीप्रमाणे मला जो अर्थ वाचल्या वाचल्या भिडला तो लिहिण्याचा प्रयत्न करतेय. 
१.
       असे कसे बोलायचे न बोलता आता
       तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता
       डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता
       सांगा जरा असे कसे लपायचे रे आता
         मन धागा धागा जोडते नवा
          मन धागा धागा रेशमी दुवा
  तसं पाहिलं तर गाणं प्रचंड रोमँटिक आहे, पण मला मात्र ह्या कडव्याचा अर्थ थोडा वेगळा असला तरी चालेल असं वाटलं. म्हणजे एक स्त्री जी पहिल्यांदा आई होणार आहे , ती या ओळींशी कनेक्टेड होऊ शकते. कारण काही गोष्टी अनुभव हे असे असणार जे फक्त आणि फक्त तीच अनुभवू शकते. सांगूनही ते कुणाला कळणार नाहीत. त्यातून अजून तरी हे गुपित तिने गुपितच ठेवलं आहे त्यामुळे डोळ्यांत रोज त्याला जपत असतांनाच त्याचं अस्तित्व लपवू कसं हेही तिला कळत नाही. असो तर हे पहिलं कडवं.....
२. 
             एकटी मी दिनरात तरीही तू भोवती
               हातात नाही हात तरीही तू सोबती
                     मन बेभान बेभान होई
                     मग प्रीतीला उधाण येई
                    मन धागा धागा ......
एका सोल्जरची बायको. दूर असूनही घरातल्या प्रत्येक वस्तूशी आणि तिच्याशी त्याच्या अबोल आस्तित्वाचं नातं आणि त्यासोबत तिची चालू असलेली रोजच्या जगण्यातली धावपळ. पदोपदी त्याची आठवण तिला अस्वस्थ करतेच पण त्याचबरोबर तिला बळही मिळतं सगळं निभावून नेण्यासाठी. 

३.
                रोज बहाणे नवे शोधून मी थकते
                 तुझ्याच मागे मन येऊन ही चुकते
                    क्षण आतूर आतूर झाले
                       रोज काहूर काहूर नवे
                  मन धागा धागा......
हे तिसरं आणि शेवटचं कडवं. ह्या ओळी मला ना अशी एक वेगळीच आठवण करून देतात. म्हणजे नवीन असं काहीतरी नुकतंच घडू लागलंय आयुष्यात मग ते त्याच्या असो किंवा तिच्या. आणि ते जे काही आहे ते प्रेम वगैरेंपेक्षा वेगळं आहे कदाचित ती एक नवी सुरुवात आहे एखादया नव्या कामाची, छंदाची किंवा सगळं मळभ दूर झाल्यानंतर उगवणाऱ्या नव्या दिवसाची. ज्याची नकळत आपण सगळेच वाट बघत असतो रोज. मनासारखं काहीतरी घडावं असं प्रत्येकाला वाटत असतं कदाचित तेच घडण्याची सुरुवात.......
      कदाचित माझ्यासाठीही नवा अर्थ लपलेला असेल. ©गौरी हर्षल कुलकर्णी
#गौरीहर्षल

गीतसप्तक भाग ४

#गीतसप्तक
कितीक् हळवे, कितीक् सुंदर, 
किती शहाणे आपूले अंतर
हे गाणं ऐकताना मला नेहमी असं वाटत राहतं की असं समंजस मैत्रीचं नातं कुणासोबत तरी जुळवून यावं. एकमेकांना समजून घेत असतानाच एकमेकांना हवी तितकी स्पेस देणंही तितकंच गरजेचं असतं. अर्थात ही प्रक्रिया दोन्हीकडून व्हायला हवी तरच अपेक्षित असा प्रतिसाद मिळतो.
आणि हे खरं तर फक्त मैत्रीतच होण्याऐवजी प्रत्येक नात्यात व्हावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाला आपल्या पद्धतीने याचा वेगळा अर्थही सुचेल कदाचित. 
पण कधी कधी स्वतःच्या असण्याचा हट्ट न धरताही बरेच जण आपल्या मनात घर करून जातात. अशा लोकांना रोज भेटण्याची,बोलण्याची गरज नसते. पण गरज पडलीच तर पहिल्या हाकेला ह्या व्यक्ती धावत येतील ही खात्री असते. अशी माणसं, अशी नाती मनापासून जपण्याची हल्ली खूप गरज पडतेय. कारण योग्य वेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर ह्या व्यक्ती अलिप्त होतात त्यांच्याही नकळत. अर्थात नातं तोडणं त्यांना कधीच मान्य नसतं खरतर त्यांना जमणारच नसतं. पण मग असून अडचण नसून खोळंबा होण्यापेक्षा थोड्याश्या अंतरावरूनच ते सर्व काही बघत राहतात. व्यक्तिपरत्वे जसे स्वभाव वेगळे तसे अनुभवही. 
अगदी असाच मित्र दुसऱ्या कुणी आपल्यासाठी होण्यापेक्षा आपणच कुणासाठी होऊन बघावं. आपल्यासाठी कुणीतरी आहे ही भावनाही हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात अजून धावण्यासाठी बळ देते. करून तर बघायला हवं त्यासाठी आधी  स्वतःशीच मैत्री करावी लागेल. ©गौरी हर्षल कुलकर्णी
#गौरीहर्षल

गीतसप्तक भाग ३

#गीतसप्तक
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
'चॉकलेटचा बंगला' कल्पनाच किती मस्त आहे ना? चॉकलेट आवडत नाही अशी फार कमी माणसं आजूबाजूला सापडतील. लहान मुलांना आपल्या पार्टीत घ्यायचं म्हटलं की मोठया ताईदादांच्या कडून हमखास दाखवलं जाणारं आमिष. 
प्रमाणाबाहेर खाल्लं तर त्याचे तोटेही आहेतच. पण आज नको त्यावर बोलायला. पूर्वी काही ठराविक चॉकलेट मिळायची आता मात्र इतके सगळे प्रकार, इतक्या सगळ्या चवी असतात की खाणारा गोंधळून जातो. 
लहान मुलांच्या मनोराज्यात हळूच शिरून लहान होऊन गेल्याचं फिलींग हे गाणं देतं. ह्या गाण्याच्या संकल्पनेशी मिळताजुळता एक धडाही होता मला. त्यात कलिंगडाचं घर होतं. भर उन्हाळ्यात अशा मस्त कलिंगडाच्या घरात आपण राहतोय ही आयडियाच भारी वाटायची खरंतर अजूनही वाटते.  किती छान असतं ना ते विश्व कसल्याच चिंता काळज्या नसतात. कुणाशी शत्रुत्व नसतं,कसलेही हेवेदावे नसतात. फक्त आणि फक्त निखळ आनंद असतो आयुष्यात. मैत्री,नाती सगळी अगदी मनापासून निभावली जातात. म्हणून तर अगदी प्रत्येकाला मोठं झालं की बालपण खुणावत असतं. जितकं निरागस मुलांचं विश्व असतं तितकंच किंबहुना त्याच्या जवळपास सुद्धा न जाणारं जग मोठेपणी त्यांना भेटतं. आणि मग हळूहळू ते छोटं मूल आत मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात स्वतःला आक्रसून घेतं. फार काही नाही करायचं पण मुलातलं मूल जपताना स्वतः मधल्या मुलालाही जपायला हवं. सगळ्या जगाला एका स्वच्छ नजरेने बघता यायला हवं. दुसऱ्या कुणासाठी नाही पण स्वतःसाठी आणि आपल्या जवळच्या लोकांसाठी तरी आनंद निर्माण करता यावा. हळूहळू का होईना बाकी परिस्थितीही बदलेल. आधी आपण तर सुरू करू चॉकलेटचा बंगला बांधायला आयुष्य तर तसंही गोडच आहे अजून गोड होईल. ©गौरी हर्षल कुलकर्णी
#गौरीहर्षल

गीतसप्तक भाग २

#गीतसप्तक भाग २
बस इतना सा ख्वाब है 

जो भी चाहूँ वो मैं पाऊँ
जिंदगी में जीत जाऊं
चाँद तारे तोड़ लाऊं
सारी दुनिया पर मैं छाऊँ
बस इतना सा ख्वाब है 
 आपल्याला कळतही नसतं तेंव्हापासून  आपण स्वप्नं बघत असतो. ही स्वप्न म्हणजे नक्की काय असतं तर आपल्या मनात निर्माण झालेल्या इच्छा. त्या कधी आपण उघड उघड सांगतो कधी नाही सांगत. पण हे गाणं मात्र प्रत्येकाच्याच मनात कधी न कधी येणाऱ्या इच्छा सांगतं. मलातरी आवडतं स्वप्नं बघायला काही क्षणांसाठी का होईना त्या जगात हरवून जायला. 
अर्थात एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंतच तिची ओढ असते. यावरून अजून एका गाण्याची ओळ आठवली, स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा, गोडी अपूर्णतेची लावेल वेड जिवा. एखादं गोष्ट मिळवण्यासाठी माणूस जितकी जिवापाड मेहनत करतो तितकाच किंबहुना जास्त आनंद मिळतो ती गोष्ट मिळाल्यावर. तरीही स्वप्न पाहणं हे कायमच आवडत कारण स्वप्न एक आशा सतत जागी ठेवतात मनात की मिळेल 'कष्टाचं फळ' आज न उद्या नक्कीच मिळेल.
पण इथे मात्र त्या गाण्यातील हिरोला सगळं हवं असतं. अगदी चंद्र, ताऱ्यांपासून ते ऐश्वर्य, प्रसिद्धी, कौतुक सगळंच. झटपट असं सगळं मिळवण्याचा त्याचा प्रयत्न त्याला पुढे योग्य ती समजही देतो. पण आपणही कळत नकळत बऱ्याचदा देवाला मागतच असतो काही न काही.  ते मिळत नाही म्हणून हताशही होऊ नये आणि प्रयत्न करणही सोडू नये.
आता काही जण हेही म्हणतील की नुसती स्वप्नंच बघायची का? तर नाही अशी स्वप्नं बघायची जी आपल्याला एक ध्येय देतील आणि तिथे पोहोचण्यासाठी सतत जागं करत राहतील. जेणेकरून वाटेत येणाऱ्या अडचणी पार करत आपण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहू. बाकी सगळं मिळालं तरी अजून हवच असतं माणसाला. ज्या दिवशी माणूस समाधानी होण्याचं स्वप्न बघून ते पूर्ण करेल तो दिवस खरा. 
©गौरी हर्षल कुलकर्णी

बिती हुई बतीयां

#बीती_हुई_बतियाँ 

                   बीती हुई बतियाँ कोई दोहराये, 
                  भूले हुए नामों से कोई तो बुलाये
ह्या ओळी गुणगुणत असतानाच तिचा काम करणारा हात आणि विचारात भरकटणारं मन दोघेही थांबले. खरंच रोजच्या जगण्यात किती आणि काय काय सुटून गेलं नं? जी माणसं कधी काळी खूप जवळची होती ती आज कुठेच नाहीयेत. असं का होतं? मग आठवणींचा पट उलगडतच राहिला अन् नकळतच तिचे डोळे भरून आले. 
लहानपणीचं घर तिथलं अंगण ,अंगणातलं  कैरीचं झाड आयुष्यातले पहिले सवंगडी तिथेच मिळाले. त्यातले काही इतके दूर गेले की चेहरेही धूसर झाले त्यांचे. काही मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या करत मनात आणि आयुष्यातही टिकले.  
माणसं अशीच हरवत राहतात का प्रत्येक वळणावर??? पण जरी ती हरवली तरी आठवणी तर असणार आहेतच ना त्यांच्या कायमचं तिने स्वतःच स्वतःला उत्तर दिलं. शोधायचं म्हटलं तर सगळे सापडतील लगेच पण तोच निरागस मैत्रीत पुढे केलेला हात पुन्हा तितक्याच निरागसपणे हातात येईल का? की उगाच फेसबुक, वॉट्सअप्प वर जगाला दाखवण्याच्या नादात कैरीच्या , लिंबाच्या, आंब्याच्या कडूगोड आठवणी आठवणीच होऊन राहतील? तरीही ती हूरहूर लागतेच मनाला.
जुनी खेळातली नावं, लुटुपुटूची भांडणं, रुसवे, फुगवे, भातुकली सगळं कसं आत्ता घडत असल्यासारखं नजरेसमोर नाचलं. हातातली कामं आवरत तिने आज जुने अल्बम काढले. प्रत्येक फोटो एक नवीन आठवण आणि खूप दिवस टिकेल, पुरेल असं समाधानाचं हसू देऊन गेला तिला. खूप काही आहे आपल्याजवळ पण आपण उगाचच नवीन काहीतरी शोधत फिरतो असा विचार मनात येताच ती स्वतःशीच हसली. 
संध्याकाळी घरी आल्यावर नवरा आणि मुलंही तिचं हे रूप पाहून खुश झाली. तितक्यात तिच्या जुन्या घराजवळचे कुणीतरी काका काकू भेटले आणि काय काय मस्त आठवणी सांगत होते असं नवरा म्हणू लागला. चला, मनातली तगमग योग्य मनापर्यंत  पोचली ह्या विचाराने तिला अजूनच छान वाटलं. पुन्हा एकदा ती गुणगुणू लागली.....
बीती हुई बतियाँ कोई दोहराये,
भूले हुए नामों से कोई तो बुलाये💖💖
#गौरीहर्षल
२८.१२.२०१७

टेक अ चान्स

#टेक_अ_चान्स
"Take a chance because you never know how absolutely perfect something could turn out to be. "

        स्वतःच भिंतीवर चिकटवलेलं  हे वाक्य  सायलीच्या डोक्यात अक्षरशः धुमाकूळ घालत होतं. निमित्त होतं तिच्यासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नाचं. 
      सायली, वय वर्षे 40, सुस्वभावी  उच्चशिक्षित गृहिणी. गृहिणी हा तिचा स्वतःचा चॉईस.मुलं लहान असताना धावपळ करत राहिलो तर खूप काही सुटून जाईल असा तिचा समज होता. म्हणून तिनेच मी करेन एडजस्ट म्हणत चांगली सुरू असणारी नोकरी सोडून घरी राहायचं ठरवलं. त्यावेळी सगळ्यांनी तस तिला वेड्यात काढलं. पण आता काही वर्षांनी तिच्या मुलांना , घराला भेट देणाऱ्या प्रत्येकाला तिने घेतलेला निर्णय योग्य होता असंच म्हणावं लागलं. 
       आता कुणी म्हणेल अस वेगळं काय केलं होतं?  खूप काही नाही पण सायली आणि तिचा नवरा राजीव दोघांनी मिळून काही गोष्टी ठरवल्या होत्या . दोघांपैकी एक जण घरात असल्याने त्या गोष्टी त्यांना जरा नीट कार्यन्वित करता आल्या इतकंच. त्यांच्या घरात टीव्ही अजिबात नव्हता पण पुस्तकं मात्र भरपूर होती. मोबाईलचा  वापर अनिवार्यच असल्याने तो घरात होता पण वापरण्याचा वेळ मात्र ठरवलेला होता. या आणि अशा इतर लहानसहान सवयीमुळे मुलं आपोआपच वेगळ्या पद्धतीने विचार करू लागली. अर्थातच त्याचा प्रभाव इतर क्षेत्रात दिसू लागला. 
दोन्ही मुलं  स्वतःच्या आवडीनिवडी ओळखून त्या दिशेने वाटचालही करू लागली होती. असो पण आपली गोष्ट सायलीची आहे . आता मुलांची जबाबदारी कमी झाल्याने सायलीकडे खूप मोकळा वेळ असे. यावेळाच काय करावं हे काही तिला सुचत नव्हतं. अशातच तिच्या घराजवळ एक नवीन कंपनी सुरू झाली. कंपनीची मालकीण म्हणजे शेजारच्याच कॉलनीत राहणारी दीप्ती होती. गृहिणी असणाऱ्या बायकांना लक्षात ठेऊनच तिने काही नवीन पद्धती सुरू केल्या होत्या. पण नवखी असल्याने तिचा थोडाफार गोंधळ उडत असे. सायली आणि तिच्या शेजारच्या सगळ्यांना  तिथे येण्याचे आमंत्रण दिले होते. म्हणून सगळं महिला मंडळ आज लवकर काम आवरून दुपारी त्या छोटेखानी मॉल मध्ये पोहोचले. एकाच छताखाली बऱ्याच सोयी देण्याचा प्रयत्न केला होता. पण फक्त स्त्रियांसाठी अन् तेसुद्धा मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय स्त्रियांसाठी खासकरून.  परवडतील असे दर आणि बचतगट वगैरेंच्या मदतीने चालवली जाणारी दुकानं. 
सायली आणि सगळ्या जणी खूपच खुश झाल्या हे सगळं पाहून. अशातच एका ठिकाणी काहीतरी खूप गोंधळ निर्माण झाला अन् सगळ्यांचं लक्ष तिकडे वेधलं. उत्सुकता म्हणून सगळ्या तिकडे वळल्या. बिल काउंटर वर गोंधळ होऊन चुकून काही झाल होतं. दीप्ती कुणाशी तरी फोनवरून येण्याबद्दल बोलत होती. पण तिथेही काहीतरी प्रॉब्लेम होत असल्याने ती जरा गडबडली होती. सायली हळूच तिच्याजवळ गेली आणि तिने मी बघू का असा विचारलं. दिप्तीला आश्चर्य वाटलं पण तिने होकार दिला. थोड्या वेळातच सायलीने बिलात झालेला घोळ सांगत काय चुकलं हेही दाखवलं आणि योग्य भाषेत काम करणाऱ्या मुलींना समजही दिली. दीप्ती हे सगळं बघत होती आणि अचानक तिने एक निर्णय घेतला. 
तिने सायलीच्या समोर पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन संभाळशील का? असा प्रश्न ठेवला. त्याच प्रश्नावर विचार करता करता सायली आज गोंधळली होती. 
संध्याकाळी राजीव आणि मुलं घरी आली तस तिने झालेला प्रसंग त्यांना सांगितला आणि काय करू असही विचारलं. त्यावर मुलं आणि राजीव अर्थातच उत्साहाने म्हटले की संधी  मिळाली आहे तर सोडू नकोस. त्यांनी गोंधळलेल्या तिला तिनेच चिकटवलेलं वाक्य दाखवलं. तिने दिप्तीला होकार कळवला. रात्री उद्या किती आणि काय आवरत निघावं लागेल याचा विचार करतच ती झोपली.
नेहमी 5च्या ठोक्याला उठणाऱ्या  तिला सकाळी मात्र उशिरा जाग आली. अस कस झालं ह्याचा विचार करत ती स्वयंपाक घरात शिरली आणि समोरच दृश्य पाहून चकित झाली. नवरा आणि मुलं सगळं आवरून नुसते तयारच नव्हते तर तिच्यासाठी नाश्ता, एक फुलांचा गुच्छ टेबलवर ठेवला होता. ती समोर दिसताच मुलं तिला येऊन बिलगली आणि बेस्ट लक म्हणाली.  इथून पुढे मात्र सायलीला स्वतःला सिध्द करायचं होतं. ते अर्थातच ती करणारच होती. आपलं आवडतं वाक्य मनात घोळवतच सायलीच्या नव्या इनिंगची सुरुवात झाली . 

तात्पर्य काय   तर हेच  "Take a chance because you never know how absolutely perfect something could turn out to be." स्वतःला एक संधी तर देऊन बघा कोण जाणे कदाचित सुरेख अस काहीतरी  निर्माण होईल . 
#गौरीहर्षल
१७.७.२०१८

चले आओ

चले आओ इक बार फिर 
उसी मोड़ पर 
जहाँ कभी सूरज डूबा था
हमें देखते हुए
चले आओ इक बार फिर 
उसी मोड़ पर
जहाँ हमारी हँसी सुनकर 
माहौल खुश हुआ करता था
चले आओ इक बार फिर 
उसी मोड़ पर
क्योंकि
आज भी वो मोड़ 
तुम्हारी याद लिए यूँही बैठा है
खुश होनेकी चाह में
आज भी सूरज 
हमारे चेहरे की वो रोशनी ढूँढता है
फिरसे आनेकी चाह में
उम्र छीन ले गयी वो मासूमियत पर 
दिल अभीभी वहीं है
फिरसे जीने की चाह में
चले आओ बस.....
#गौरीहर्षल #१९.१०.२०१९

उधार का इतवार

उधार का इतवार
इतवार  उधार का  लगता है आजकल
पूछूँ मिले तो कहा है मेरे वो अपने पल
अजनबी रास्तो और गलियों में अपना कोई मिलता नहीं
क्या करें अपनोकी गलीसे आजकल मैं भी तो गुजरता नहीं
दरवाजे पर दस्तक मेरे नाम की तो होती है
पर खोलने के बाद मुलाकात काम से ही होती है
बचपन का इतवार लाता था मस्ती के साथ सुकूनभरे पल
आज का इतवार स्क्रीन के साथ ही होता है आंखोंसे ओझल
किसी को मिले अगर सुकूनभरा वो इतवार
मिलवाना जरूर, मुझे भी है उसका इंतजार
#गौरीहर्षल
६.१.२०२०



सामान्य

खरच छान आहे सामान्य असणं
सगळं जगच आपलं आहे असं वाटणं
हसणं, रुसणं, बोलणं , वागणं
असूनही नसणं, नसूनही असणं
कुणाला तरी आठवणीत आठवण
कुणाच्या तरी आठवणीत रेंगाळण

स्वप्नांचे इमले बांधत राहणं
पूर्ण होवो न होवो
सतत स्वप्न बघत राहणं
त्यात रमूनही वास्तवात जगणं
खरच छान आहे सामान्य असणं

असंच रहावं सगळं साधंच
स्वप्नांच्या दारावर सतत तोरण आशेच
वास्तवात न मिळणारी सुखं शोधण्यासाठी
बळ मिळत राहावं प्रकाशाचं
9.1.2020
#गौरीहर्षल

सुखाची व्याख्या

सुखाची व्याख्या असते प्रत्येकाची वेगळी
भौतिक, आत्मिक आणि निरनिराळी
कुणीतरी आनंदी असतं आनंदाच्या कल्पनेत
कुणालातरी सुख गवसतं पैश्याच्या दुनियेत
सुखाच्या शोधात सगळे धडपडत असतात
त्यातले किती जण स्वतःला सापडतात??
दुसऱ्याला आनंदात बघतात आणि होतात दुःखी
असे कसे हे जीव इतरांवर जळून होतील सुखी??
मनापासून सुखात साद हल्ली कुणी घालत नाही
दुःखात मात्र इतरांच्या सोबतीची हवी ग्वाही
सुख म्हणजे काय असतं? 
हाती न लागणारं मृगजळ
सुख म्हणजे काय असतं?
हातातलं सोडून पळत्याच्या पाठीमागे धावपळ
सुख म्हणजे काय असत? 
कुणालाही अजूनही सापडलं नाही
तरी त्याच्या मागे आयुष्य खर्ची करणं 
माणसाने सोडलं नाही.
सुख असतं समाधानाने जगण्यात,
आपल्यासोबत इतरांना सुखी असुदे म्हणण्यात.
सुख असत लहान मुलांच्या निरागस हसण्यात, 
नको नको म्हणताना मायेने भरवलेल्या घासात.
सुख असत आपल्या माणसाच्या सहवासात,
कसलीही जाहिरात न करता घालवलेल्या क्षणात.
सुख असत आपल्याच हातात, मनात आणि विचारात,
छोटया छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्यात. 
लिस्ट तशी मोठी सुख सापडणाऱ्या जागांची 
पण 
प्रत्येकाची वेगळी असते न व्याख्या सुखाची......
#गौरीहर्षल
४.१.२०२०