शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

हरलेली पिढी

#हरलेली_पिढी
#वयोगट_१५_ते_४०
हो हरलेय ही पिढी नाती सांभाळताना, आयुष्य जगताना, यशस्वी होताना. मीसुद्धा ह्यांच्यातलीच एक पण वेळोवेळी आपल्या बरोबरीच्याना कोसळताना बघतेय. काय हवंय नेमकं आम्हाला आयुष्यात?? आम्हाला नुसतं शिक्षण नको तर पहिल्या नंबरच्या हव्यासापोटी धावाधाव करायची आहे. नंतरही नुसती नोकरी किंवा बिझनेस नको तिथेही टॉप पोझिशन हवीच आहे. पुढे जोडीदार भेटतो तर त्या नात्यातही आम्हाला खूप काही हवंच आहे. आयुष्याचं कुठलंही क्षेत्र घ्या आम्हाला फक्त जिंकायचं आहे. खरं पाहता ही रॅट रेस कुणी दुसऱ्याने आमच्यावर नाही लादली आम्ही स्वतःच हिच्यात सहभागी आहोत. एखादी वस्तू दुसऱ्याकडे बघितली की जीव तोडून ती मिळवण्यासाठी आम्ही पळतो. आम्हाला सगळं काही हवं आहे पैसा, पॉवर , पोझिशन, स्टेटस आणि ते मिळवण्यासाठी आम्ही जगणं विसरतोय.
आमच्या आधीच्या पिढीनेही हे सगळं मिळवलं आहे नाही असं नाही पण त्याच्याकडे हे मिळवताना एक गोष्ट होती अन् ती म्हणजे "पेशन्स". जे आमच्या पिढीकडे अजिबात नाहीत काही अपवाद असतीलही पण बहुतांश जणांना ती इन्स्टंट ची सवय लागली आहे. मग एखादी गोष्ट नाही मिळाली किंवा ती मिळवताना अपयश आलं तर ते आम्हाला पचवता येत नाही. वास्तविक पाहता जवळचं कुणीतरी प्रत्येक वळणावर उभं असतं मदतीचा, मैत्रीचा हात पुढे करून पण आम्हाला ते स्वीकारण्यात कमीपणा वाटतो. यंग जनरेशन कडे बघत तिचं कौतुक करत मागची पिढी खूप काही आत्मसात करतेय पण ही यंग जनरेशन मात्र स्वतःच स्वतःभोवती उभ्या केलेल्या अपेक्षांच्या काटेरी कुंपणात अडकली आहे.
काय होईल एखादी अपेक्षा पूर्ण नाही झाली तर??? काय होईल एखाद्या कामात अपयश आलं तर?? काय होईल जर हातात घेतलेलं काम संपवण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर??? फार फार तर पैसा, वेळ आणि क्षणभंगुर असणार ते स्टेटस जाईल पण अशा परिस्थितीतही कुणीतरी आपल्या सोबत उभचं असतं. कुणीतरी नक्की असतं ज्यांची सगळी आस फक्त आपल्या असण्यावर अवलंबून असते मग ते आईवडील असो, जोडीदार असो किंवा इतर कुणी.
मान्य आहे जगात जगण्यासाठी पैसे, पत गरजेची असते पण ती फक्त गरज असते आवश्यकता नाही. त्यांच्या शिवायही समाधानी आणि सुखी होता येतं. कधी कळणार हे आमच्या पिढीला???
का हरतोय आम्ही ??? आमच्या आधीच्या पिढीने शून्यातून संसार उभे केल्याची उदाहरणं समोर असूनही आम्हाला मात्र समोर वाढून ठेवलेल्या भरगच्च ताटाचा आस्वादही घेता येऊ नये??? ताण येतातच पण त्यांना तोंड देण्यासाठी लागणारी आमचीच प्रतिकारशक्ती कुठेतरी कमी पडतेय.
आयुष्य परीक्षा बघणारच आहे पण त्या परीक्षेत पास नापास असं काही नसतं हे कळायला हवं. परीक्षेत येणारे अनुभव घेत जगायला शिकता आलं तर तुम्ही त्या परीक्षेत पास झालात.
आज इतर कुणी मदतीचा हात पुढे करण्याआधी ह्या पिढीने स्वतः स्वतःला मदत करण्याची गरज आहे. नाती, नोकरी, बिजनेस कुठल्याही परिस्थितीत आलेलं अपयश स्वीकारत त्यातून धडा घेत बदल घडवून आणले पाहिजेत तर आणि तरच आयुष्याला जिंकता येईल.
अजून एक छोटंसं काम माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना करता येईल ते म्हणजे स्वतःसोबत दुसऱ्यालाही motivate करण्याचं. आपल्या संपर्कातलं कुणी कुठल्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत असेल तर त्याला फक्त तू करू शकतोस हा धीर द्या. आपले दोन समजून घेणारे शब्द आणि आश्वासक स्पर्श मनातल्या नको त्या विचारांना दूर करतील. जवळच्या लोकांना तुम्ही हवे आहात ही जाणीव करून घ्या. आणि हे सगळं करताना स्वतःवर प्रेम करायला विसरू नका. तुम्हीही महत्वाचे आहातच की. सुरुवात तर करूया स्वतःपासून, जिवलगांपासून हळूहळू . मीही करतेय तुम्हीही करा.
शुभं भवतु
#गौरीहर्षल
३०.७.२०१७

सेकंड चान्स

#शुभं_भवतु
#सेकंड_चान्स
नवीन दिवस नवी सुरुवात. आयुष्यात असं झालं का कधी काहीतरी कुणालातरी सांगायचं होतं, बोलायचं होतं पण ती संधी मिळण्याआधीच ती व्यक्ती दूर निघून गेली ??? कधी परिस्थितीमुळे तर कधी  तिच्या आयुष्यातील बदलांमुळे.
छोट्याश्या गोष्टी असतात पण आपण आपल्या इगोमुळे बऱ्याचदा त्यांना नको इतकं मोठं करतो. नाती तुटतात , माणसं दुरावतात कायमची. कधी कधी एक बाजू प्रयत्न करतेही सगळं नीट ,छान व्हावं म्हणून. पण दुसरी बाजू तसाच रिस्पॉन्स देते का हो?? मग शेवटी प्रयत्न करणारा थकून दूर जाण्याचा निर्णय घेतो. ह्या सगळ्यांवर वेळ हे एकच औषध आहे असं म्हटलं जातं. पण हल्ली आयुष्य इतकं फास्ट झालंय की कोण कधी राहती जागा,गाव,शहर आणि कदाचित जगही सोडून निघून जाईल सांगता येत नाही. अशावेळी नंतर हात चोळत बसणे अन् हळहळणे हेच मागे उरते. मग त्यावर उपाय काय कुणी जर नातं तोडून जात असेल तर तुम्ही प्रयत्न करा त्यांना थांबवण्यासाठी. निदान तुमची बाजू तरी मांडा आणि उलट असेल तर समोरचा काय म्हणतो आहे हे तरी शांत पणे ऐकून घ्या. कदाचित आयुष्यात पुन्हा कधीच तुमची भेट होणार नसेल तेंव्हा मनाला कसलीही चुटपूट नको लागायला. थोडंसं स्वतःला पुश करण्याची गरज आहे सोप्प नसतंच कडू अनुभव विसरुन माफ करणं पण निदान प्रयत्न केलेच नाहीत असं नको वाटायला. मनाला एक समाधान तरी मिळेल की मी पूर्ण प्रयत्न केले. "स्वतःला" पुन्हा संधी द्या. संधी कदाचित जुनी अडकून बसलेली दारं उघडेल किंवा नवीन आयुष्य तुमची वाट बघत असेल. काहीही झालं तरी एक चांगलाच अनुभव पदरात पडेल हे नक्की. आयुष्य खूप छान आहे हे फक्त वाक्य होऊन राहण्यापेक्षा अनुभव आला तर अजून मजा येईल.
प्रयत्न तर करू बाकी समोरच्याची  आणि देवाची मर्जी.
बेस्ट लक मलाही आणि तुम्हालाही 😍😍
#गौरीहर्षल
३१.७.२०१७

मनाचे प्रतिबिंब

#मनाचे_प्रतिबिंब
असं म्हणतात आपला चेहरा हा आपल्या मनाचं प्रतिबिंब असतो. खूप सगळे विचार आपण करत असतो सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत. त्या त्या क्षणी मनात जन्माला येणारे विचार क्षणभर का होईना आपल्या चेहऱ्यावर उमटतात. आपण खुश असतो ते आपला चेहरा सांगतो, कधी मनातून वाईट वाटलेल असतं पण ते सुद्धा आपल्या चेहऱ्यावर दिसतं. असं हे आपलं प्रतिबिंब नेहमी चांगलं दिसावं लोकांवर त्याचा चांगला परिणाम व्हावा अशीच तर आपली इच्छा असते. पण म्हणून आपण किती प्रयत्न करतो? चांगले विचार , चांगल्या पद्धती जगण्यात आणल्या तर प्रतिबिंबही तसच असेल.
जमेल का??? अर्थातच जमणार जसं शरीराचं बाह्य रूप खुलवण्यासाठी प्रयत्न केले जातात तसंच मनासाठीही करावे.  मनालाही काही पौष्टीक असे विचार , गोष्टी सांगाव्यात जेणेकरून मनाचं स्वास्थ्य सुधारत राहील. यासाठी फार काही करावं लागणार नाही फक्त आपलं वाचन, आपली संगत , आपली विचारसरणी थोडीशी ग्रुम करावी लागेल. ग्रुम कशी करायची हे आजूबाजूला निरीक्षण केले की समजते. मी तर करून बघणार आहे तुम्हीही ट्राय करा....
प्रत्येकाला आज एक तरी क्षण मनाचं स्वच्छ प्रतिबिंब दाखवणारा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
१२.७.२०१७

इतनीसी खुशी

#इतनीसी_खुशी
जगण्यासाठी काय महत्वाचं असतं?? पैसे की आनंद जो आपण त्या पैशात शोधत असतो? आनंद अगदी लहान मुलांच्या निरागस हसण्यातही असतो आणि वृद्धांच्या समाधानी हसण्यातही.
छोट्या छोट्या गोष्टींमधून फक्त तो टिपता आला पाहिजे अलगद. असं जर झालं तर सगळंच खूप छान होऊन जाईल. आपण जसजसे आनंद टिपत निघू तसा आयुष्याची बाग फुलत राहील. प्रयत्न तर करून बघू फार काही नाही करायचं फक्त डोळे उघडे ठेवून निरीक्षण करायचं. मी तर करणारच आहे तुम्हीही ट्राय करा.
प्रत्येकाला आज खूप सगळ्या छोट्या छोट्या आनंदाचे क्षण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!
#गौरीहर्षल
१६.७.२०१७

गैरसमज

#गैरसमज
गैरसमज आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. बऱ्याचदा ते आपण स्वतः नकळतच करून घेतलेले असतात. एखादी व्यक्ती तिचं वागणं, बोलणं जाणून घेण्यासाठी वेळ जाऊ द्यायचा असतो. पण आपण इतक्या घाईत असतो की आपल्याला पटकन माणूस कळावा असं वाटतं. आणि मग अर्धवट माहिती, अपुऱ्या संपर्काच्या आधारावरच आपण आपली समजूत पक्की करतो. बरं हे सगळं घडतंय आणि ते कुठेतरी चुकतंय असं आपल्याला जाणवतही असतं. पण आपलं मन इतकं पुढे निघून गेलेलं असत की त्याला पुन्हा मागे ओढून आणून नातं जुळवण्यासाठी खूप कसरत करावी लागते. जवळची नाती अशाच गैरसमजांमुळे तुटतात अनेकदा. कधी कधी दोन्हीकडून गैरसमज होतात कधी कधी एका बाजूने. कधी कधी ते दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातात तर कधी कुणी ते अजून वाढावे म्हणून प्रयत्न करत राहतात. नातं, माणसं दुरावण्याचं दुःख दोन्ही बाजूंना असतं पण हल्ली तर कुणाकडे वेळच नसतो. किंवा डोळ्यांवर अशी काही झापड असते की ती भविष्यात येणाऱ्या अनुभवांनीच दूर होते. मग प्रयत्न करायचेच नाहीत का? प्रयत्न तर करायचे पूर्ण शक्तीनिशी करायचे पण समोरची व्यक्ती ,तिचा प्रतिसाद याकडेही लक्ष ठेवायचे. जर तिचा प्रतिसाद सकारात्मक असेल तर आपले प्रयत्न योग्य दिशेने होत आहेत हे कळतं. आणि जर नकारात्मक असेल तर कुठे थांबायचं हेही लक्षात येतं. थोडंसं सजग आणि उघड्या डोळ्यांनी नात्याला आणि आजूबाजूच्या व्यक्तींना परखायचं सोबतच स्वतःलाही तराजूत तोलायचं. लगेच नाही जमणार पण हळूहळू निदान गैरसमज टाळण्याचं भान तरी येईल. कोण आपलं कोण परकं हे दाखवण्यासाठी वेळ तत्पर असतेच पण आपण आपलं काम चोख केलं तर आपलंच शारीरिक, मानसिक आणि आर्थिकही नुकसान टाळता येतं.
            सो, आजचा मंत्र हाच की गैरसमजाला खतपाणी घालण्याआधी परिस्थिती, व्यक्ती आणि स्वतःची वागणूक या सगळ्यांचे अवलोकन करीन.  श्रावणातील नवीन व्रत म्हणूया हवं तर 😊😊 मी तर प्रयत्न करणार आहे तुमचं काय??
आज प्रत्येकाला एक तरी क्षण भान ठेवून रुसलेली मनं वळवण्यासाठी संधी देणारा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!
#गौरीहर्षल
२४.७.२०१७

शनिवार, १५ जुलै, २०१७

भविष्यातलं सरप्राइज

#शुभं_भवतु
#भविष्यातलं_सरप्राइज
एखादं नातं खूप जवळचं असतं पण अचानक काही न सांगता, विचारता निघून जात आयुष्यातून. आपण खूप प्रयत्न करतो थांबवण्यासाठी, परत आणण्यासाठी. पण त्या नात्याची वीण इतकी उसवलेली असते की कितीही टाके घातले तरी शिवलं जात नाही. अशावेळी आपली मात्र कसोटी असते रोजची सवय असलेलं ते नातं विसरून जगण्याची. सुरुवातीला खूप सैरभैर होत मन पण हळूहळू कुठेतरी त्याला वास्तवाची जाणीव होते. काही दिवस असेच निघून जातात मग मनाला आतून जाणवणारा सल कमी होतो. आठवणींमुळे डोळ्यात येणारं पाणीही ओसरत जातं.
नात्यांना कितीही जपलं तरी आज न उद्या कुठल्या ना कुठल्या कारणाने कुणीतरी सोडून जाणारच असतं. गरज असते ती आपण झालेल्या बदलाला लवकरात लवकर स्वीकारण्याची.
कारण ह्या सगळ्या गोंधळात आपल्याकडे डोळे लावून बसणारंही कुणीतरी असतं ज्याचा आपल्याला आपल्या दुःखात विसर पडतो. ह्या बाबतीत एक वाक्य मी कुठेतरी वाचलं होतं ते म्हणजे, "God puts people in your life for a reason and removes them from your life for a better reason." याचाच अर्थ उद्या येणाऱ्या भविष्याच्या पोटात नक्कीच काही चांगली नाती, चांगली माणसं लपलेली असतील जी योग्य वेळी योग्य वळणावर आपल्याला भेटतील. म्हणूनच आत्ता आपण आटापिटा करून काही साध्य करण्यापेक्षा पुढे निघालेलं काय वाईट??
प्रयत्न करणं तर आपल्याच हातात आहे ना? करून बघू कदाचित आपण ज्या गोष्टीची मनोमन वाट बघत होतो तीच समोर येऊन उभी राहील. Thats why keep smiling you never know who is watching you 😍😍
शुभं भवतु!!!
#गौरीहर्षल 
१५.७.२०१७

शुक्रवार, १४ जुलै, २०१७

क्वालिटी टाइम

#क्वालिटी_टाइम
आज सकाळी कधी नव्हे ते चिमण्यांची चिव चिव ऐकून जाग आली. कितीतरी दिवसांनी हा अनुभव घेतला नाहीतर सकाळी उठल्यापासून मागे लागलेली 'घाई' नावाची गोष्ट काही ऐकूच देत नाही. घाईघाईने घर, बाहेरची काम , ऑफिस करण्याच्या ह्या धबडग्यात आपलं मन, मेंदू, शरीर काही सांगत असतात पण आपल्याला ते ऐकायला वेळच नसतो. घड्याळाच्या काट्यावर चालणारे आपण सोमवार ते शुक्रवार मनात कुठेतरी ठरवत असतो की विकेंडला स्वतःला, घरच्यांना क्वालिटी टाइम दयायचा पण खरंच जमतं का हो?? की आपला क्वालिटी टाइम मॉल, पिकनिक ह्या सगळ्यांमध्ये हरवतो??
क्वालिटी टाइमवर सगळेच लेक्चर झाडत असतात पण प्रत्यक्षात किती जण तो खरंच जगण्याचा प्रयत्न करतात? म्हणजे नेमकं काय करायचं हेच आपल्याला कळत नाही. टीव्ही, फोन , लॅपटॉप याना सुट्टी देऊन जरा मस्त वेळ घालवायचा. एकमेकांना समजून घेण्यासाठी गप्पा मारणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे त्यामुळे रोज जे जमत नाही ते करून बघायचं. सगळ्यांनी मिळून काही गोष्टी करायच्या. थोडंसं अवघड जाईल सुरुवातीला कारण हल्ली आपल्याला माणसांपेक्षा फेसबुक आणि वॉट्सअप्प ची जास्त सवय झाली आहे. पण जमेल, जी आपली जिवाभावाची माणसं आहेत ती आयुष्यभर सोबत हवीत ना मग इतकं करायलाच हवं. सगळ्यांना एकमेकांना समजून घेत  मदत करायची हा एकच रुल क्वालिटी टाइमसाठी.
प्रत्येकाला आज खूप सारा क्वालिटी टाइम आपल्या माणसासोबत मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
१५.७.२०१७