तुम्ही सांगितलेला एखादा विनोद प्रत्येकाला हसवू शकेल असं नसतं...
तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या लोकांना असेलच असंही नसतं...
एखाद्या गोष्टीबद्दल तुमची प्रतिक्रिया समोरच्याला पटेलच असंही नसतं... आणि तरीही सगळं व्यवस्थित असतं. कारण यामध्ये चुकीचं काहीच नाही.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना इतरांना खुश करण्याची सवय असते किंवा इतरांनी आपली मर्जी राखावी अशी अपेक्षा असते. पण हे सगळं करताना आपण विसरतो की आपण प्रत्येक जण एक वेगळी व्यक्ती आहोत. आपल्या प्रत्येकासाठी सौंदर्य आणि नॉर्मल असण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत.
मग एखाद्याला आपण नाही आवडलो तर काय फरक पडतो?? त्यांना दुसरं कोणीतरी आवडत असतं.
जर एखादी व्यक्ती आपल्याला नाही आवडली तर काय फरक पडतो?? आपल्याला दुसरं कोणीतरी आवडतं.
आपल्या आजूबाजूच्या किती लोकांना आपण आवडतो यावर बऱ्याचदा आपण स्वतःची किंमत आणि त्या माणसाची आपल्या आयुष्यातील जागा ठरवत असतो. जे की चुकीचं आहे.
हल्ली बऱ्याचदा एक गोष्ट खूप सातत्याने आढळून येते ती म्हणजे सोशल मीडियावर जर आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत तरच आपलं नातं चांगलं आहे. मग तो मला सोशल मीडियावर लाईक फॉलो करतो म्हणून मी पण प्रत्यक्ष आयुष्यात त्याच्याशी नीट वागणार. आणि एखादा असं करत नाही म्हणून मग मी त्याच्याशी चांगलं वागणार नाही.
पूर्वपार जी गोष्ट आपण ऐकत आलो आहोत तीच इथेही महत्त्वाची ठरते ती म्हणजे गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र....
बाकी आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाला आपल्याबद्दल किंवा आपल्याविषयी काहीना काहीतरी खटकत असतंच. सेम गोष्ट आपल्यालाही इतरांबद्दल वाटत असते. कधी आपण ती बोलून दाखवतो कधी ती आपल्याला इतरांच्या कृती मधून आपल्याबद्दल दिसून येते.
पण कुणी कसंही वागलं किंवा तसा अविर्भाव जरी आणला तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की इतरांच्या वागण्याने बोलण्याने आपली किंमत ठरत नाही.
आपली किंमत आपण स्वतः ठरवायची आणि ती जपायची सुद्धा... यासाठी सुद्धा बरेच उपाय आहेत बरं का...
बाकी?? बाकी भेटू लवकरच..... असंच काहीसं सोबत घेऊन....
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
१३ ऑगस्ट २०२४
1 टिप्पणी:
Khup chan sangitle Tai.
टिप्पणी पोस्ट करा