गंडांतर

गंडांतर 


वर्ष २०१८ चा जानेवारी महिना, उत्तरायण सुरू झालेले होते. 

१२ जानेवारी २०१८ ला माझ्या सासूबाईंचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. 


ही घटना आमच्यासाठी अक्षरशः प्रचंड अनपेक्षित होती. कारण त्या दिवशी( शुक्रवार ,१२ जानेवारी २०१८ ) संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आई अगदी चालत्या फिरत्या होत्या. 

माझाही दोन दिवस आधीच गाडी चालवताना छोटासा अपघात झाला होता आणि त्यामुळेच त्या दोन तीन दिवसात आमचं बऱ्याचदा फोनवर बोलणं झालं होतं. 

शेजारच्या सगळ्या मैत्रिणींसोबत बसून त्यांनी दुसऱ्या दिवशीची भोगीची भाजी निवडून ठेवली होती. रविवारी संक्रातीच्या दिवशीच हळदीकुंकू आवरून त्या सोमवारी सकाळी माझ्याकडे येण्यासाठी निघणार होत्या. तसं आमचं गुरुवारी फोनवर बोलणं झालं असल्याने आम्ही दोघेही निश्चिन्त होतो. 


पण अचानकच शुक्रवारी रात्री साडे आठ च्या सुमारास मला फोन आला आणि शेजारच्या ताईने फोनवर आधी आई सिरीयस असल्याचे सांगितले आणि मग पुन्हा दहा मिनिटांनी दुसऱ्यांदा फोन करून त्या आता ह्या जगात नाहीत असं सांगितलं. आधीतर मी त्यांना काहीही काय सांगता म्हणत उडवूनच लावले पण जे घडलं होतं ते खरं होतं. 


शेवटी स्वतःला सावरत इकडे तिकडे कळवत आम्ही खाजगी वाहनाने गावी जाण्यासाठी निघालो. 

कालपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी करू म्हणणारी व्यक्ती आज अचानक फक्त एक निर्जीव देह म्हणून समोर होती. माणसाच्या आयुष्यात कुठल्याही क्षणी काहीही घडू शकते ह्याची प्रचिती आम्हाला तेंव्हा आली. जसं आपलं जन्माला येणं आपल्या हातात नसतं तसच आपलं मरणही आपल्या हातात नसतं. 

त्यांचे पुढील कार्य करण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबीय लासलगाव, जिल्हा -नाशिक  इथे एकत्र आलो होतो. 

बातमी कळल्यानंतर आम्ही अक्षरशः हाताला लागतील ते दोन तीन ड्रेस आणि नाशिकच्या थंडीचा विचार आल्याने एकेक स्वेटर एवढंच सामान घेऊन आलो होतो. आणि ती वेळही अशी होती की शिस्तीत बॅग वगैरे भरून निघावं असं काही डोक्यात आलं नाही. 


दहाव्या आणि तेराव्याच्या कार्यासाठी २१ जानेवारीला संध्याकाळी आम्ही सर्वजण नाशिकला मोठ्या दिरांकडे गेलो. 


दहाव्याचे कार्य घाटावर आटोपून आम्ही घरी परतलो होतो. 

दिरांना घराबाहेर जाता येत नसल्याने माझे मिस्टरच दिवसभर सगळ्या धावपळीत होते. त्यातच आलेल्या पाहुण्यांची सोय अजून एका जवळच्या नातेवाइकांकडे केली असल्याने त्यांना तिथेही लक्ष द्यावे लागत होते. 


दुसऱ्या दिवशी मात्र माझे मिस्टर जेवतानाही जरा जास्तच शांत होते. कार्य तसं व्यवस्थित पार पडलं होतं त्यामुळे आता कशाची काळजी आहे हे माझ्या लक्षात येत नव्हतं.


दुपारी एका कामासाठी बाहेर जात आहोत असं सांगून ते बाहेर पडले. मग थोड्या वेळाने मला त्यांचा फोन आला की तुझ्या फोनमध्ये माझ्या पॅनकार्ड, आधार कार्ड ची फोटोकॉपी असेल तर मला पाठव. माझ्याकडे नसल्याने मी त्यांना सांगितलं की तुमच्याच फोनमध्ये दोन्हीही फोटो आहेत पण उगाच हं हं करत त्यांनी फोन ठेवला. आता मात्र माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. 


संध्याकाळी अगदी जेवणाच्या वेळेला ते आणि नणंदबाईंचे मिस्टर घरी आले. काही क्षणातच जेवणं न करताच ते दोघेही परत बाहेर जातो म्हणत निघाले. 

मला कळताच मी धावत जाऊन दोघानाही जिन्यात गाठलं आणि मग मला दिवसभर सुरू असलेल्या धावपळीच्या मागचं खरं कारण कळाल. 


आमच्या ज्या नातेवाइकांकडे जास्तीचे लोक थांबले होते. त्यांच्या शेजारच्या एका बाईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्या बाईंचे कितीतरी लाखांचे दागिने जे त्यांनी नवऱ्याला कळू न देता बँकेतून काढून आणले होते, ते एका चोराने पाळत ठेवून बँकेतून बाहेर पडल्यावर अर्थातच हिसकावून पळवले होते. त्या बाईंचे म्हणणं होतं की माझे मिस्टरच ते चोर आहेत आणि त्यांनीच ते दागिने पळवले आहेत. 

दुर्दैवाने आपल्याकडे पोलीस तक्रार करणारी स्त्री असली की काहीही विचारपूस न करता आधी पकडून नेण्यासाठी येतात. आमच्या केसमध्येही तेच झालं होतं आणि माझ्या मिस्टरांचं काही म्हणणं ऐकू न घेता त्यांना पोलीस ठाण्यात बसवून घेतले होते. 

ही घटना घडली होती १६ जानेवारीला आणि १६ जानेवारीला आम्ही सगळेजण लासलगाव इथे होतो. माझे मिस्टर कळकळीची विनंती करत सांगत होते की माझं फोन लोकेशन चेक करा, तुम्हाला लगेच कळेल मी कुठं होतो. मी अहमदनगर इथे एका रेप्युटेड बँकेत मॅनेजर आहे आणि मी स्वतः तिथल्या कित्येक पोलिसांना बँकेच्या सोयी उपलब्ध करून देतो. नाशिकमध्ये मी माझ्या दिवंगत आईच्या कार्यासाठी आलो आहे आणि ते ही बऱ्याच वर्षानंतर. ह्या बाईंना मी कधी बघितलंही नाही तर बाकी सगळं तर लांबच राहील. पण त्या हवालदाराला काय झालं होतं माहीत नाही तो काहीही ऐकण्यासाठी तयार नव्हता.


ज्या हवालदाराने त्यांना पोलीस ठाण्यात नेलं होतं काही वेळाने त्याची ड्युटी संपली, तो घरी गेला. मग पुढच्या व्यक्तीने काही वेळासाठी घरी जाऊन येण्याची परवानगी देत पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये बोलवले होते.  नेमकं त्या वेळी मला हे सगळं कळलं होतं. आता हे माहीत असणारे घरात आम्ही फक्त पाच व्यक्ती होतो. मी, माझे मिस्टर, नणंदेचे मिस्टर, माझे चुलत सासरे आणि एक दीर. 

जे घडलं आहे ते कुणालाही कळू देऊ नकोस अस सांगत ते चौघे बाहेर पडले. 


तसं बघायला गेलं तर आमची काही चूक नसल्याने आम्हाला घाबरण्याचे काही कारणंच नव्हते, पण म्हणतात ना संकटं आली की सगळ्या दिशांनी येतात. आमचंही असंच काहीसं झालं होतं, आधीच ध्यानीमनी नसताना आईंच्या जाण्याचं दुःख त्यातच ही गोष्ट घडली होती. त्यातच मध्यमवर्गीय माणसाला पोलीस स्टेशनमध्ये जायचं म्हटलं की ब्रह्मांडच आठवतं. इथे तर ती स्त्री आणि तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो हवालदार अगदी ठामपणे आरोप करत होते. माझ्या मिस्टरांनीही मात्र तितक्याच ठामपणे स्वतःचं म्हणणं लावून धरलं होतं. 

पुढचा हवालदार  ड्युटीला  येईपर्यंत ते स्टेशनमध्ये वाट बघत बसणार होतो खरं तर बसावंच लागणार होतं. 


त्यातही आमचं दुर्दैवी नशीब काही आमची पाठ सोडायला तयार नव्हतं. ती चोरीची घटना जिथे घडली तिथलं सीसीटीव्ही फुटेज आलं होतं. आणि त्या फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर सेम तसेच कपडे होते जसे माझ्या मिस्टरांनी घातले होते. पण फरक एकच होता त्या व्यक्तीला दाढीमिशा होत्या आणि मिस्टरांचं मात्र 13 तारखेलाच मुंडन झालं होतं. ही आमच्यासाठी जमेची बाजू होती. 

 

संध्याकाळी सात वाजता हे लोक स्टेशनमध्ये गेले होते. मला मात्र अशा वेळी काही सुचत नव्हतं. आणि एका क्षणी मला ‘घोरकष्टोद्धारणस्तोत्र’आठवलं. आठवल्या मिनिटापासून मी स्तोत्र म्हणण्यास सुरुवात केली. काहीही करून ह्या संकटातून आमची कुठल्याही आरोपशिवाय सुटका व्हावी एवढी एकच इच्छा माझ्या मनात होती. 


जवळपास रात्री साडे अकरा वाजता सगळेजण परत आले तोपर्यंत कुणीही फोन लावला तर उचलत नव्हतं. त्यामुळे स्टेशनमध्ये पुढे काय घडलं हे कळायला काही मार्ग नव्हता. तीन साडे तीन तासात मी कितीवेळा स्तोत्राचे पठण केले हेही माझ्या लक्षात नव्हते. 


मला असं करताना बघून घरातल्या इतरांना बरेच प्रश्न पडत  होते पण मी पठण सुरु करण्याआधीच सगळं झाल्यावर सांगते अस सांगितल्याने सगळे गप्प बसले. आणि बाकीची काम बघू लागले. 


मिस्टरांना रात्री दारात सुखरूप बघितल्यानंतर माझ्या जिवात जीव आला. मनापासून देवाचे आभार मानून मी पठण संपवले. 


जेवायला बसल्यानंतर त्यांनी आधी सगळ्यांना सकाळपासून जे जे घडले ते सांगितले. सगळ्यांना अजून एक धक्का बसला होता. मग पुढे ड्युटी बदलल्यावर काय झाले हे सांगायला सुरुवात केली. 


ड्युटी बदलल्यानंतर स्टेशनमध्ये दुसरे लोक आले होते. चार्ज घेतलेल्या हवालदारानेही आधीप्रमाणेच बसायला सांगितले होते. 


पण तेवढ्यात तिथे एक ओळखीचा चेहरा दिसला. ती व्यक्ती म्हणजे माझ्या मिस्टरांच्या गावातल्या फार जुन्या घराजवळचे शेजारी आणि वर्गमित्राचे थोरले बंधू होते. त्यांनी चेहरा बघताच मिस्टरांना ओळखले आणि विचारपूस केली. 


माझ्या सासूबाईंचे निधन झाल्याची बातमी त्यांच्याही कानावर आली असल्याने ह्या सगळ्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये बघून त्यांना आश्चर्य वाटले होते. मग त्यांनी स्वतः पुढे होऊन केस बघितली आणि त्या हवालदाराला जरा दबाव देऊन विचारलं तर त्या बाईने काहीतरी देण्याचे कबूल केल्याने तो तिचं ऐकत होता. भरीस भर पडली ती त्या बाईंच्या नवऱ्याच्या येण्याने खरा प्रकार आमच्या नातेवाईकांकडून कळल्याने त्यांनी स्टेशनमध्ये धाव घेतली होती.  माझ्या मिस्टरांची माफी मागत त्यांनी मिस्टरांचा ह्या प्रकरणाशी काही संबंध नाही हे लिहून दिले. 


आणि अशा रीतीने सकाळपासून सुरू झालेल्या गंडांतराची सांगता झाली. सगळी कागदपत्रे, मोबाईल ताब्यात घेऊन सगळेजण घरी परत आले. 


बऱ्याचदा काय होतं आपण खरे असतो, आपलं कर्म चांगलं असतं पण आपली वेळ चांगली नसते. अशावेळी गरज असते ती त्या शक्तीने आपल्याला फक्त पाठीशी असल्याची जाणीव करून देण्याची. आणि आमच्याबरोबर असंच काहीसं घडलं बाजू खरी असूनही वेळ वाईट असल्याने आमचं खरं बोलणंही खोट समजलं जात होतं. 

पण अचानकच चमत्कार घडावा असं सगळं जुळून आलं आणि त्या खोट्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. 


आम्ही दोघेही पहिल्यापासून एका गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतो आणि ती म्हणजे देवाचं अस्तित्व, तो असतो सतत आपल्या आजूबाजूला , गरज असते ती फक्त त्याला मनापासून हाक मारण्याची. आणि आपली हाक नक्की ऐकली जाते. 


घोरकष्टोद्धारणस्तोस्त्राचा आम्हाला आलेला हा पहिला अनुभव. पण हा अनुभव आम्हाला बरच काही शिकवून गेला. 


वाचकांच्या माहितीसाठी घोरकष्टोद्धारणस्तोत्राची  संपूर्ण माहिती खाली देत आहे.


सार्थ घोरकष्टोद्धारणस्तोत्र

‘घोरकष्टोद्धारणस्तोत्र’ या नावामध्येच या स्तोत्राचे फलीत आहे. ‘घोर+कष्ट+उद्धार’ अशी याची फोड केल्यास, असे लक्षात येते की मनुष्य जन्म हाच मुळी, पाप आणि पुण्य याच्या संमिश्रणातून साकार होतो. अशा ‘मनुष्य’ जन्माला आल्यानंतर. या ‘जन्म आणि मृत्यू’ या चक्रात अखंडपणे फिरताना होणार्‍या ‘घोर’ कष्टाची जाणीव झाल्यामूळे आणि यातून सुटण्याची जीवाची असहाय्यता लक्षात आल्यामूळे होणारी जीवाची ‘तडफड’ पाहून अतिशय करूणा आल्यामूळे स्वतः प. पू. श्री सदगुरु भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वरूप प. प. श्री वासूदेवानंद सरस्वती, श्री टेंब्येस्वामी यांनी या स्तोत्राची रचना केली आहे.


श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधि देव ।

भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥

त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं । त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वं ।

त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥

पापं तापं व्याधिंमाधिं च दैन्यं । भीतिं क्लेशं त्वं हराऽशुत्व दैन्यम् ।

त्रातारं नो वीक्ष ईशास्त जूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वतो देव त्वं शरण्योऽकहर्ता ॥

कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥४॥

धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् । सत्संगप्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।

भावासक्तिर्चाखिलानंदमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥५॥

॥श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम् ॥

॥प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत् ॥

श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीविरचितं घोरकष्टोद्धरण स्तोत्रम्


।। श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ।।


या दृष्टीने पाहू गेल्यास या स्तोत्राचे फलीत अगोदर पाहू यात.


धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिं |

सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं

भावासक्तिंचाखिलानन्दमूर्ते |

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||५||


श्रीगुरूमुखातून मिळालेल्या या स्तोत्राच्या पठणाने सद-धर्माविषयी प्रेम, सु-मति (सद्-बुद्धी), भक्ति, सत्-संगती याची प्राप्ति होते. त्यामूळे याच देहात भुक्तिं म्हणजेच सर्व ऐहिक आणि पारलौकिक कामनांची पुर्तता झाल्यामूळे, अंतिमतः ‘मुक्तिं’ या चतुर्थ पुरुषार्थाचा लाभ होतो. म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाची पुर्तता होऊन “भाव आसक्तिं च आखिल आनंद मूर्ते” रुपी, श्रीदत्तात्रेय-आनंद स्वरुपाची, म्हणजेच ‘भक्ति’ या पंचम पुरुषार्थाची निश्चितपणे प्राप्ती होते.


आता थोडक्यात अर्थ पाहू,


श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव |

श्री दत्तास्मान पाहि देवाधीदेव |

भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ते |

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || १ ||


हे प. पू. प. प. श्रीपाद श्रीवल्लभा, देवाधीदेवा, ‘मी’ आपणास शरण आलो आहे. हा माझा भाव लक्षात (ग्राह्य मानून) घेऊन, आपण माझे सर्व क्लेश दूर करावेत आणि माझा या घोर संकटातून कृपया उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो.


त्वं नो माता त्वं पिताप्तो दिपस्त्वं |

त्रातायोगक्षेमकृसद्गुरुस्त्वम |

त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते |

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || २ ||


हे प्रभो, विश्वमूर्ते, माझे माता-पिता-बांधव-त्राता आपणच आहात. आपणच सर्वाचे ‘योग-क्षेम’ पहाता. माझे सर्वस्व आपणच आहात. म्हणून आपण कृपावंत होऊन या संसाररुपी-भवसागररुपी घोर संकटातून माझा उद्धार करावा. हे प्रभो आपणास माझा नमस्कार असो.


पापं तापं व्याधीमाधींच दैन्यम |

भीतिं क्लेशं त्वं हराsशुत्व दैन्यम |

त्रातारंनो वीक्ष इशास्त जूर्ते |

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ३ ||


आपण आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक, अशा पापयुक्त त्रिविधतापातून माझी सुटका करावी. माझ्या शारिरीक-मानसिक व्याधी, माझे दैन्य, भीति इ. क्लेश दूर करावेत आणि या घोर-कलीकाळापासून या घोरसंकटातून माझा उद्धार करावा. हे श्री दत्तात्रेया, आपणास माझा नमस्कार असो.


नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता |

त्वत्तो देवं त्वं शरण्योकहर्ता |

कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते |

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ४ ||


हे श्री अत्रिनंदना, आपणाशिवाय मला अन्य कोणी समर्थ ‘त्राता’ नाही. आपणासम दानशूर ‘दाता’ ही नाही. आपणासम भरण-पोषण करणारा ‘भर्ता’ ही नाही. हे आपण लक्षात घेऊन, हे शरणागताची कोणत्याही प्रकारे उपेक्षा न करणार्‍या देवाधिदेवा, आपण माझा या ‘घोर’ संकटातून, माझ्यावर ‘पुर्ण-अनुग्रह’ करून उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो.


धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् ।

सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।

भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते ।

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ ५॥


श्लोकपंचकमेतधो लोक मंगलवर्धनम् ।

प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥


“धर्मे प्रीतीम सन्मतिं” सर्व प्रकारच्या कष्टातून, हे प्रभो, तू मला सोडव. त्या सगळ्यातून का सोडव, तर मला “धर्मा बद्दल प्रीती, सन्मती, विवेकपूर्ण चांगली बुद्धी (वरील कष्ट दूर झाल्या नंतर) उत्पन्न होण्यास मदत होईल आणि  तुझ्याबद्दलचा (पूज्य) भाव प्राप्त होईल. म्हणून मला वर दिलेल्या सर्व आपत्तीतून सोडव. पहिल्या ४ श्लोकांमध्ये व्यावहारिक गोष्टी आहेत, पण खरे इंगित म्हणजे व्यावहारिक कष्टातून सुटका झाल्याशिवाय सर्वसामान्य माणूस परमार्थात नीट लक्ष घालू शकणार नाही.


श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम |

प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत || ६ ||


अशा प्रकारे या पाच श्लोकाचे ‘नित्य’ पठण करणार्‍या कर्त्याचे, सर्वार्थाने ‘मंगल’ होते. असा अनन्य भक्त, प्रभु श्री दत्तात्रेयाना अतिप्रिय होतो.


इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं 

घोरकष्टोद्धरण स्तोत्र सम्पूर्णम् ||


|| दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिंगबरा ||

#स्वतःला शोधताना

#गौरीहर्षल




टिप्पण्या

Unknown म्हणाले…
ओम् सद्गुरू वासुदेवाय नम
Unknown म्हणाले…
Tai Tumhi kadhitari mangaon sindhudurg yethe tembe swaminch mandir aahe Tithe bhet dya.tasech vengurla yethe swaminchya atmapaduka aahet.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी