ती , तो आणि माईंड रिडींग

ती , तो आणि माईंड रिडींग 

ती (एक्साईट होऊन) - " लोकांच्या मनात काय सुरू आहे हे कळलं तर काय मज्जा येईल न? "

तो (सुस्कारा सोडत नकारार्थी मान हालवत) - "सगळ्यात वाईट फॅन्टसी आहे ही तुझी." 

ती (अजून स्वप्नाळू स्वरात) - " का? विचार करून बघ की जरा न बोलता, न सांगता प्रत्येकाला काय हवंय ते कळेल. किती तरी इच्छा पूर्ण करता येतील." 

तो (कसं होणार हिचं अशा अर्थाने तिच्याकडे बघत) - "स्वप्नांच्या राज्यातून जमिनीवर या मॅडम. ह्या सगळ्यांच्या जोडीने अजून बरंच काही घडेल ते तुमच्या अजून लक्षात आलं नाहीये." 

आता मात्र ह्याच सगळं आधी ऐकून मगच आपण बोलू असं ठरवून ती छानपैकी टेबलावर दोन्ही कोपरे टेकवून स्वतःच्या दोन्ही हाताच्या मधोमध स्वतःचा चेहरा धरत त्याच्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यातले भाव ओळखून त्यानेही हातातला फोन बाजूला ठेवला. 
आणि सावरून बसत तो बोलू लागला. 
तो - "म्हणजे बघ हे तुझं गुडी गुडी कल्पना वगैरे ठीक आहे, पण जर खरच लोकांच्या मनात कुठल्या क्षणी काय विचार सुरू आहे हे कळू लागलं तर बरीच नाती जुळायच्या आधीच तुटून जातील. कारण बऱ्याच वेळेला माणूस मनात विचार वेगळाच करत असतो आणि बोलत वेगळंच असतो. उदाहरण द्यायचंच झालं तर बघ हं , एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मदत मागितली. मदत मागणारा सध्या फक्त विवंचनेत आहे म्हणून त्याच्या डोक्यात तेच सुरू आहे. पण ज्याला मदत मागितली आहे त्याला जर ती करायची नसेल तर? त्याच्या मनात ह्याला कसं टाळू, काय कारण देऊ असे विविध प्रकारचे विचार आले आणि ते समोरच्याला ऐकू आले तर तो किती दुखावला जाईल? 
बरं हे झालं अडचणीच्या वेळेचं."

"इतर नॉर्मल वेळी आपल्या आजूबाजूला आपण किंवा परिस्थितीने निवडलेली बरीच माणसं असतात. ही सगळी माणसंच काय आपण स्वतःसुद्धा जनरली आपल्या चेहऱ्यावर एक मुखवटा ओढून वावरत असतो. आपण मनातून कुणाबद्दल ,कशाबद्दल खरोखरच कसा विचार करतो हे फक्त आणि फक्त आपल्याला माहीत असतं. 
मग आता तूच सांग समजा तू जिला किंवा ज्याला तुझा बेस्टफ्रेंड समजतेस ती व्यक्ती मनातून तुला जवळचं समजतच नाही हे कळलं तर तुला काय वाटेल?"

आता मात्र ती विचारात पडली. 
अरेच्चा खरंय की हे. अज्ञानात सुख असतं असं म्हणतात ते हेच असेल का? माणसाचे खरं रूप हळूहळू उलगडण्यात जे थ्रिल आहे ते मनातलं जाणून घेण्यात नाही. माणसं कधी कधी अचानक जे अनप्रेडिक्टेबल वागतात त्यामुळे मिळणारे अनपेक्षित धक्के कधी आनंद देतात तर कधी दुःख आणि ह्या सगळ्यावर तर आयुष्य सुरू राहतं. 

" हं ,बरोबर आहे तुझं, अनपेक्षित गोष्टी जास्त चांगला अनुभव देतात. त्या अनुभवातून तर माणूस घडतो. " 

तुम्हाला काय वाटतं? माणसांना कळायला हवं का एकमेकांच्या मनातलं? कळलं तर काय होईल नाती अजून घट्ट होतील की विखरून जातील? 

#असंच_सुचलेलं
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

आज कुछ अच्छा पढते हैं

मी आणि करुणात्रिपदी