आज कुछ अच्छा पढते हैं

#आज_कुछ_अच्छा_पढते_हैं 
सकाळी उठल्यावर मनात चांगले विचार आणले तर दिवस चांगला जातो असं आपण ऐकत आलो आहोत. 
पण खरंच असं होतं का? रोज कितीही ठरवलं तरी आजूबाजूच्या वातावरणाचा, परिस्थितीचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होत असतो. मग अशा वेळेला काय करायचं? 
असच एक ॲप चाळत असताना मला मॉर्निंग पेजेस ही संकल्पना सापडली. तशी ती बरीच जुनी आहे. 
1992 च्याच आसपास julia कॅमेरॉन ह्या लेखिकेने the artist's way म्हणून एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाची बेसिक संकल्पना होती spiritual path to higher creativity. 
असो तर मुख्यत्वे या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेला काय अपेक्षित होतं ते सांगते. 
तिच्या म्हणण्यानुसार सकाळी कमीत कमी 20 मिनिटे स्वतःला देत 3 पानं तरी रोज लिहायची. 
या लिहिण्याला कुठलेही बंधन नाही. मनात येतील ते चांगले, वाईट विचार कागदावर उतरविण्यास सुरुवात करायची. फक्त लिहायचं. लिहायचंच का? कारण लिहिताना आपल्याला विचार करण्यास पुरेसा वाव मिळतो. आपल्या विचारांना सुसूत्रतेने कागदावर लिहून काढण्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक विचार करू लागतो. आपल्या भावना आणि विचार यांचा ताळमेळ आपोआपच जुळतो आणि मनातले विचार सुस्पष्ट शब्दात कागदावर येतात. 
त्याउलट टायपिंग करताना आपण बऱ्यापैकी घाईत असतो. अन् मुख्य म्हणजे यांत्रिकपणे काम करत असतो. 
तर क
तर कॅमेरॉन बाईंनी अजून एक गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे हे लिहिलेलं पुन्हा वाचायचं नाही. त्याला कुठल्याही फुटपट्टीने मोजायच नाही. स्वतःला जज करायचं नाही. 
शांतपणे मनातले खदखणारे विचार लिहीत जायचं. जेणेकरून मन मोकळं होईल आणि त्याला नवीन गोष्टींचा विचार करण्यासाठी वेळ मिळेल. 
स्वतःचं लिहिलेलं स्वतःच वाचायचं नसल्याने इतरांना ते दाखवण्याचा प्रश्नच येत नाही.
सुरुवातीला अवघड वाटणारी ही गोष्ट सवय लागल्यावर इंटरेस्टिंग होत जाणार हे नक्की. 
कशी? तेही सांगते. 3 पाने भरून रोज सकाळी लिहायचं म्हणजे खायचं काम नाही. सुरुवातीला जरी मनातल्या वाईट, नकारात्मक विचारांना बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळाला तरी हळूहळू मनात नवीन आणि चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होत जाणार. 
उदाहरण द्यायचं झालं तर, मला भेंडीची भाजी आवडते म्हणून मी जर रोज भेंडीची भाजी खायची म्हटलं तर चालेल का? नाही 2च दिवसात कंटाळा येईल. तसंच मनाचही होणार. लिहिताना खोलवर विचार करायला सुरुवात झाली की आपल्याला काय करतो आहोत, काय घडत आहे याची जाणीव होत जाईल. आणि नकळतच बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू होतील. 
आपल्याला जर मनापासून स्वतःसाठी काही करायचे असेल तर हा अतिशय उत्तम आणि स्वस्तातला उपाय आहे. 
पण जर त्या पुढे जाऊन आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला आपल्या मनातला गोंधळ एकट्याने सोडवता येत नाही तर तिथे तज्ञ व्यक्तीची मदत नक्की घ्यावी. 

बाकी? बाकी बरच काही आहे जे आपण आपल्या पातळीवर बदलण्याची गरज असते. 
जे बदलता येत नाही त्यासाठी स्वीकारण्याची गरज असते आणि 
उरलेल्या गोष्टी ज्या आपल्या हातात नसतात त्यासाठी "तो " असतो ना. त्या बाबतीत मात्र म्हणायचं,
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 
2 डिसेंबर 2023 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या मना बन दगड...

मी आणि करुणात्रिपदी