शनिवार, १८ एप्रिल, २०२६

वड्याचे तेल वांग्यावर कशासाठी?

#वड्याचे_तेल_वांग्यावर_कशासाठी?
आपल्याकडे एक जुनी आणि अतिशय अर्थपूर्ण म्हण आहे— 'वड्याचे तेल वांग्यावर काढणे'.  आजकाल माणसांच्या वागण्याचंही अगदी असंच झालंय.हे वागणं खरंच खूप विचित्र असतं, पण आजकाल पावलोपावली पाहायला मिळतं. 
आपल्या आयुष्यात आपण अनेकदा अशा माणसांना भेटतो जे विनाकारण आपल्यावर डाफरतात किंवा तुसडेपणाने वागतात. आपण विचार करतो, "अरे, मी तर यांचं काहीच बिघडवलं नाही, मग हे माझ्यावर का चिडलेत?" पण सत्य हे असतं की, त्या रागाचं मूळ आपल्यात नसतं, तर त्यांच्या भूतकाळात कोणा दुसऱ्याने दिलेल्या जखमेत असतं.
माणूस स्वभावतः खूप गुंतागुंतीचा आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणीतरी खूप जवळचं माणूस फसवतं, अपमानित करतं किंवा मानसिक त्रास देतं, तेव्हा त्या त्रासाची एक 'गाठ' मनात तयार होते. ही गाठ कधी सुटली नाही की ती रागाचं रूप घेते. मग होतं असं की, ज्याने त्रास दिला त्याच्यासमोर आपण काहीच करू शकत नाही—कधी भीतीपोटी, तर कधी नात्याच्या दबावापोटी.
आणि मग सुरू होतो 'बदल्याचा' चुकीचा प्रवास.
कोणीतरी जुना राग मनात धरून बसलेलं असतं आणि मग एखादा निष्पाप मित्र, घरातील लहान मुलं किंवा ऑफिसचा सहकारी समोर येतो. त्यांच्याकडून एखादी साधी चूक झाली, तरी हा माणूस त्यांच्यावर तुटून पडतो. खरं तर तो त्या व्यक्तीवर नाही, तर त्या जुन्या त्रासावर ओरडत असतो. "दगड मारला एकाने, पण त्याची कळ आपण दुसऱ्यावरच काढतो."
हे वागणं म्हणजे कसं आहे माहितीये? जसं एखाद्याने आपल्याला अंधारात धक्का मारला आणि आपण चिडून समोरून येणाऱ्या दिव्यावरच दगड भिरकावला. यामुळे अंधार कमी होत नाही, उलट जो उजेड मिळणार होता तोही आपण गमावून बसतो.
माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी—ज्याने तुम्हाला दुःख दिलंय, त्याला माफ करणं किंवा त्याच्यापासून लांब जाणं हाच त्यावरचा उपाय आहे. पण त्या दुःखाचं भांडं दुसऱ्या कोणाच्यातरी डोक्यावर फोडणं, हे त्या व्यक्तीवर केलेला अन्याय आहे. आपण ज्यांना त्रास देतोय, त्यांचा दोष काय? फक्त एवढाच की ते आपल्या आयुष्यात 'आहेत' आणि ते आपलं ऐकून घेतात?
स्वतःला विचारून बघा...
⚠️तुमच्या आजूबाजूला अशी माणसं आहेत का, ज्यांचा राग तुम्हाला विनाकारण सहन करावा लागतोय?
 ⚠️पण त्याहून महत्त्वाचं...कळत-नकळत तुम्हीही तुमच्या जुन्या जखमांचा राग अशा माणसांवर काढत नाही ना, ज्यांनी तुम्हाला फक्त प्रेम आणि साथ दिली आहे?
🔔विचार करा... ज्या व्यक्तीचा दोष नाही, तिला तुमच्या भूतकाळाची शिक्षा का?
टीप: या प्रश्नांची उत्तरं शोधताना स्वतःशी प्रामाणिक राहणं, हाच तुमच्या मानसिक स्वास्थ्याचा पहिला टप्पा आहे.

लक्षात घ्या कुठलाही बदल एका रात्रीत घडत नसतो आणि जेव्हा आपण मानसिक पातळीवर काम करायला सुरुवात करतो.  तेव्हा बऱ्याचदा आपल्याला त्रास होऊ लागतो अशावेळी तज्ञांची मदत घेणे योग्य असते. 
तुम्हाला सुद्धा जर तुमच्या स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचे असतील आणि एका नवीन प्रवासाला सुरुवात करायची असेल तर संपर्क करा...
Gauri Harshal Kulkarni
Clinical Psychologist & Counselor
📩 WhatsApp: 9730961014 (paid counselling)