सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

स्वतःला_शोधताना_ते_स्वतःसाठी_बदलताना

#स्वतःला_शोधताना_ते_स्वतःसाठी_बदलताना
#माझा_प्रवास 
#गौरीहर्षल

गेल्या काही दिवसात लक्षात आलं की खरंच गरज आहे का किंवा असते का इतकं टोकाला जाऊन कुणाचं वागणं, बोलणं मनावर घेण्याची??? आपल्याला दुखावून समोरची व्यक्ती जर काही झालंच नाही अशा थाटात जगत असते तर आपण स्वतःला कोणत्या चुकीची शिक्षा देत असतो??  मग मात्र ठरवलं की राग येणं, वाईट वाटण हे तर होतच राहणार आहे पण दरवेळेस असं झालं की आपल्या मनाचा तो दरवाजा उघडायचा जो आपल्याला योग्य ठिकाणी नेईल. ते ठिकाण म्हणजे आपल्या नव्या विचारांचं दालन जे प्रत्येक चुकीची, अयोग्य वाटणारी गोष्ट एका नव्या नजरेतून दाखवेल. हा सगळा प्रवास स्वतःचा स्वतःसोबतच असणार आहे त्यामुळे आपण स्वतः कसे आहोत हे शोधण्याची संधी आपल्याला सतत मिळत राहते. आणि इतर कुणाच्या येण्याची वाट बघत बसण्याचीही गरज नाही.  

ह्याच विचारातून #स्वतःसाठी_बदलताना काय करावं लागेल  ती यादी तयार करायला सुरुवात केली. 
आणि काय सांगू खूप काही सापडलं जे मला सतत जाणवून देत राहील की 
                  "तुझे आहे तुजपाशी, 
                 परि तू जागा चुकलासी"  
मग काय म्हटलं हेही लिहून ठेवूया. कदाचित आपल्यासारखेच रस्ता माहीत असूनही वाट चुकलेले जे आहेत त्यांना उपयोग होईल. 

शेवटी समर्थांनी म्हटलेच आहे न , 
"दिसा माजी काही तरी ते लिहावे | 
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ||
जे जे आपणासी ठावे | 
ते ते इतरांसी शिकवावे | 
शहाणे करुन सोडावे सकल जन ||"

मधल्या काळात आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, विचित्र वागणारी माणसं ह्यांचा त्रास करून घेत स्वतःच्या मनाला जो त्रास दिला तोच आता द्यायचा नाही असा संकल्प उद्या येणाऱ्या #दत्तजयंती च्या निमित्ताने केला आहे. 
बाकी संकल्पच का ? तर पब्लिक न्यू ईयरला संकल्प करते माझ्यासाठी माझं नवीन वर्ष उद्यापासून सुरू होणार अस का कुणास ठाऊक मला वाटलं आणि अर्थातच सगळ्यात जवळच्या मित्राचा वाढदिवस ह्याशिवाय योग्य मुहूर्त कुठला असणार रस्ता चुकलेल्या मनाला मार्गावर आणण्यासाठी? 

ते म्हणतात न , की तुम्ही जर एखाद्या विशिष्ट संकेताची वाट बघत असाल तर तो नक्कीच तुमच्या आसपास असतो. 
सो, बरंच काही पेंडिंग आहे ते मार्गी लावण्यासाठी पुन्हा एकदा स्वतःला शोधण्यासाठी निघायचं आहे. प्रयत्न करण्यात तोटा काहीच नाही झाला तर फायदाच आहे so giving it a chance. 

#स्वतःसाठी_बदलताना ही मी स्वतःसाठी लिहिलेल्या सूचनांची सिरीज आहे असं म्हटलं तरी चालेल. अशा गोष्टी ज्यांचा विसर पडतो आणि मग पुन्हा मन त्याच गल्लीत जाऊन धडकते जिथे जायची गरज नसते. 

बाकी माझा संकल्प तडीस नेण्यासाठी माझा मितवा आहेच माझ्या सोबत तसा तो असतोच. 
तर माझ्यातर्फे #स्वतःला_शोधताना च्या सगळ्या वाचक मित्रमैत्रिणींना दत्तजयंतीच्या शुभेच्छा. 
थोडीशी सकारात्मकता मनात आणून उद्यापासून खूप काही चांगलं घडणार आहे ह्या  विचारावर लक्ष केंद्रित करत बाकी सगळं #दत्तात्रेयार्पणमस्तू करूया. 

https://www.facebook.com/109012627448262/posts/120681526281372/

सगळं काही दत्तात्रेयार्पणमस्तु!!! 🙏🙏
#गौरीहर्षल
२८.१२.२०२०



बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२०

विषारी सकारात्मकता - गौरीहर्षल

#विषारी_सकारात्मकता
#toxic_positivity

टायटल बरोबरच आहे. आपल्या कुणाच्याही ध्यानीमनी नसताना कोरोना आपल्या आयुष्यात आला आणि त्याने गेल्या काही महिन्यात यथेच्छ धुमाकूळ घालत आपल्या आयुष्यात नको तितके बदल घडवून आणले. त्यातले काही बदल अर्थातच चांगले आहेत तर काही नाहीत. पण ह्या सगळ्यात ज्या गोष्टीचा गवगवा सोशल मीडियावर जास्त झाला ते म्हणजे सकारात्मकता किंवा positivity. 
जो तो उठला आणि सांगत सुटला की आपण आलेल्या परिस्थितीत सकारात्मक विचार करत कसं जगायला हवं. पण म्हणतात नं अति तिथे माती तसंच काहीसं ह्या सकारात्मकतेच्या दृष्टिकोनाचंही झालंय. आणि त्यातून आता हे नवीन पिल्लू बाहेर पडले आहे ज्याचं नाव आहे 
#विषारी_सकारात्मकता अर्थात #toxic_positivity.

आता प्रश्न आहे की सकारात्मकता सुद्धा घातक ठरू शकते का? तर हो. कशी?
टॉक्सिक पॉझिटिव्हीटी म्हणजे नेमकं काय आहे ते आधी बघू. 
टॉक्सिक पॉझिटिव्हीटी म्हणजे आयुष्यात कितीही अडचणी,अवघड प्रसंग आले तरीही त्यामुळे होणारा त्रास लपवत सतत आनंदी किंवा सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणे. 
आता कुणी म्हणेल ह्यात काय चुकीचं आहे? तर आनंदी,सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणे ह्यात काहीच चुकीचं नाहीये चुकीचा आहे तो दृष्टीकोन जो मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करत सतत सकारात्मक राहायला सांगतो. 
माणूस आनंदी कधी होईल जेव्हा त्याला योग्य मनस्थितीच्या  मदतीने आलेल्या वाईट परिस्थितीत ही जगण्याचा मार्ग सापडेल. मग जर आपल्याला एखाद्या गोष्टीने दुःख होत आहे, त्रास होत आहे तर त्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन उत्तर शोधायचं की फक्त आनंदी असल्याचं चित्र उभे करून जगायचं? 
एखादी दुःखी, त्रासदायक भावना जर सतत दडपून टाकण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात ती जास्त तीव्रतेने त्रासदायक ठरू शकते. 
टॉक्सिक पॉझिटिव्हीटी बाबतही हेच होतं -
वस्तुस्थितीचा स्विकार करून त्यातून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी बरेच जण ती अमान्य तरी करतात किंवा चक्क दुर्लक्ष करून आहे तेच ठीक आहे असं स्वतःला सांगत राहतात. 
​इतरांना दाखवण्यासाठी अनेक जण सोशल मीडियावर स्वतःच्या श्रीमंतीचे , आनंदी असण्याचे प्रदर्शन करत असतात. 
सतत वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टेटस म्हणून बी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह vibes ओन्ली अशा अर्थाचे स्टेटस शेयर करतात. 
जर कुणी प्रॉब्लेम मध्ये असेल आणि त्याने अशा व्यक्ती जवळ ते सांगायचा प्रयत्न केला तर ह्या व्यक्ती त्यात काय एवढं वगैरे म्हणत ऐकून घेण्याआधी तो प्रॉब्लेम किती क्षुल्लक आहे हे सांगतात.

यामागे आपली एक जुनी मानसिकताही घातक ठरते ती म्हणजे आपला त्रास मग तो पुरुष असो किंवा स्त्री कुणालाही कळू द्यायचा नाही. पिढ्यानपिढ्या आपल्या मनावर लोक काय म्हणतील? हेच बिंबवले जाते. मग कितीही त्रास होत असला तरी ही तो लपवण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे तो त्रास कमी होण्याऐवजी अजून वाढत जातो. 
प्रत्येकाला ह्या गोष्टीचं स्वतःपुरत तरी निरीक्षण करून लक्षात येईल की आपण असे वागत आहोत का? जर ऊत्तर हो असेल तर काय करता येईल? हाही विचार करायला हवा. 
--- आयुष्यात घडलेल्या एखाद्या घटनेने,प्रसंगाने जर आपल्याला वाईट वाटतंय,निराश झाल्यासारखे वाटतेय तर सगळ्यात आधी  त्या भावनेचा स्वीकार करायला शिका.  
--- ती भावना जरी नकारात्मक असली तरी त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका, मनात कुठल्याही प्रकारचा अपराधीपणा येऊ देऊ नका. 
---उलट स्वतःला सांगा की चढउतार, यशापयश हे आयुष्याचा एक भाग असतात  संपूर्ण आयुष्य नाही.
--- सोशल मिडिया वरील जे अकौंटस बघून तुम्हाला स्वतःला बदलावेसे वाटते, स्वतः बद्दल कमीपणा वाटतो ती सगळी अकौंटस अनफॉलो करा. 
--- आपल्या मनातल्या भावना लिहून काढा. लिहून काढल्याने मनातल्या भावनांचा निचरा होण्यास मदत होते. 
--- तुमच्या आयुष्यात खरे पॉझिटिव्ह बदल तेंव्हाच घडतील जेव्हा तुम्ही स्वतःला स्वतःच्या नजरेतून बघाल. स्वतःला आहे तसे स्विकारून जगण्याचा प्रयत्न कराल. 

आता ह्यावरून जर तुम्हाला तुमच्या जवळपास कुणी असं करताना दिसत आहे तर काय कराल? 
तू हे असले स्टेटस का टाकतोस किंवा टाकतेस म्हणून लगेच त्यांना बोलायला सुरुवात करू नका. 
तर त्या व्यक्तीच्या बाजूने विचार करण्याचा प्रयत्न करा. त्याला काही प्रॉब्लेम आहे का ते शोधून काढण्याचा प्रयत्न करा. 
"तुला काय वाटतंय ते बोलण्याचा प्रयत्न कर, मी ऐकतोय"  ह्याची जाणीव करून दया.  बऱ्याचदा मदतीपेक्षाही कुणीतरी आपलं ऐकावं हीच अपेक्षा असते. 
त्याला किंवा तिला बोलते करण्याचा प्रयत्न करा. 
आवश्यक असल्यास तज्ञांची मदत घ्या. 
आपली एक छोटीशी कृती कुणासाठी तरी खूप महत्त्वाची ठरू शकते हे लक्षात घ्या. 
          वाचक मित्रांनो जग जर फक्त ब्लॅक अँड व्हाईट असते तर आपण इतके आनंदी असतो का ? नाही नं! 
मग तसेच भावनांचेही आहे. सकारात्मक आणि नकारात्मक ह्या भावनाही अशाच आहेत, पण कोणत्या वेळी कुठली भावना मनात येते हे मात्र ओळखणे आपल्या हातात आहे. त्या भावनेला योग्य प्रकारे प्रतिसाद दिला तर प्रश्न सुटण्यासाठी मदतच होते. हे जमत नसेल अवघड जात असेल तर वेळीच योग्य ठिकाणाहून मदत घ्या. 
जाता जाता इतकंच म्हणेन ,
Toxic Positivity is not positive. Face it. 
इतरांच्या दिखाव्याला भुलून स्वतःच्या आयुष्यात विष कालवू नका. चकाकतं ते सगळं सोनच नसतं हे लक्षात ठेवा. 
#गौरीहर्षल



शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

फिरुनी नवी जन्मेन मी

नव्यानेच उमलणारी लाजरी, हसरी , नाचरी बाहुली होती ती.  नुकतेच स्वप्नांच्या पावलांनी १६व्या वर्षात पाऊल टाकले होते. 

   शाळेचे धरलेले बोट सुटून सुटली कॉलेजच्या हातात हात दिला होता. जसे जसे नवे विश्व खुणावत होते तसे तिचे पंख भरारी मारण्यासाठी उत्सुक झाले होते. 

 

अशातच एक दिवस बाबांनी हातात नव्याकोऱ्या स्कुटीची चावी टेकवली. आतातर काय आभाळ ठेंगणे झाले. उत्साहाने आवडीच्या सगळ्या ठिकाणी ती गाडीवर भटकून आली. 

  

गाडीच्या वाढलेल्या वेगासोबत मैत्री करताना शरीर देत असलेली सूचना मात्र तिने धुडकावून लावली. आणि अचानक साध्या सरळ मार्गाने निघालेल्या तिच्या आयुष्याला ब्रेक मिळाला. निमित्त झालं एका छोट्या अपघाताचं. डोक्यावर पडल्याने सुरक्षितता म्हणून काही चाचण्या डॉक्टरांनी करायला सांगितल्या. 


निदान - ब्रेन ट्युमर, प्राथमिक सुरुवात होती पण ट्युमर म्हणजे ऑपरेशन. 

जवळचे सगळे हवालदिल झालेले. ही मात्र तशी शांत होती. लवकरात लवकर ऑपरेशन केले तर फायदेशीर ठरेल असे डॉक्टर सांगत होते. हो, नाही करत तिने सगळ्यांना तयार केले. डॉक्टरांनी ऑपरेशनची तारीख दिली पुढच्याच आठवड्यातली. 


तारीख बघताच तिच्या आईवडिलांचे उसने अवसानही ओसरले. तिचा वाढदिवस होता त्या दिवशीच. आपल्या लेकीला ज्या दिवशी पहिल्यांदा हातात घेतले त्याच दिवशी तिच्या ऑपरेशनच्या फॉर्मवर सही करायची हे विचारच त्यांना सहन होत नव्हते. 


तिने मात्र धीराने घेत दोघांनाही समजावून सांगितले की, 'देव मला पुन्हा एकदा संधी देतो आहे नव्याने सुरुवात करण्यासाठी म्हणून तर इतका स्पेशल दिवस निवडला आहे.' 


ठरलेल्या दिवशी ऑपरेशन करण्यात आले. ती दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आली. डोळे उघडताच समोर आईबाबा दिसले. एवढया त्रासातही चेहऱ्यावर हसू आणून 

त्यांना चियर अप करण्यासाठी गाऊ लागली, 

"एकाच ह्या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा"

गौरी हर्षल कुलकर्णी

२६ जुलै २०२०




जरा विसावू या वळणावर....

"भले बुरे जे घडून गेले

विसरून जाऊ सारे क्षणभर

जरा विसावू या वळणावर"

ह्या ओळी गुणगुणत असतानाच तिचा काम करणारा हात आणि विचारात भरकटणारं मन दोघेही थांबले.


खरंच रोजच्या जगण्यात किती आणि काय काय सुटून गेलं नं? जी माणसं कधी काळी खूप जवळची होती ती आज कुठेच नाहीयेत. असं का होतं? मग आठवणींचा पट उलगडतच राहिला अन् नकळतच तिचे डोळे भरून आले.


कसे कोठुनी येतो आपण

कसे नकळता जातो गुंतून

उगाच हसतो उगाच रुसतो

क्षणात आतुर क्षणात कातर


लहानपणीचं घर तिथलं अंगण ,अंगणातलं कैरीचं झाड आयुष्यातले पहिले सवंगडी तिथेच मिळाले.

त्यातले काही इतके दूर गेले की चेहरेही धूसर झाले त्यांचे. काही मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या करत मनात आणि आयुष्यातही टिकले.


माणसं अशीच हरवत राहतात का प्रत्येक वळणावर??? पण जरी ती हरवली तरी आठवणी तर असणार आहेतच ना त्यांच्या कायमचं तिने स्वतःच स्वतःला उत्तर दिलं. शोधायचं म्हटलं तर सगळे सापडतील लगेच पण तोच निरागस मैत्रीत पुढे केलेला हात पुन्हा तितक्याच निरागसपणे हातात येईल का? की उगाच फेसबुक, वॉट्सअप्प वर जगाला दाखवण्याच्या नादात कैरीच्या , लिंबाच्या, आंब्याच्या कडूगोड आठवणी आठवणीच होऊन राहतील? तरीही ती हूरहूर लागतेच मनाला.


जुनी खेळातली नावं, लुटुपुटूची भांडणं, रुसवे, फुगवे, भातुकली सगळं कसं आत्ता घडत असल्यासारखं नजरेसमोर नाचलं. हातातली कामं आवरत तिने आज जुने अल्बम काढले. प्रत्येक फोटो एक नवीन आठवण आणि खूप दिवस टिकेल, पुरेल असं समाधानाचं हसू देऊन गेला तिला. खूप काही आहे आपल्याजवळ पण आपण उगाचच नवीन काहीतरी शोधत फिरतो असा विचार मनात येताच ती स्वतःशीच हसली.


संध्याकाळी घरी आल्यावर नवरा आणि मुलंही तिचं हे रूप पाहून खुश झाली. तितक्यात तिच्या जुन्या घराजवळचे कुणीतरी काका काकू भेटले आणि काय काय मस्त आठवणी सांगत होते असं नवरा म्हणू लागला. चला, मनातली तगमग योग्य मनापर्यंत पोचली ह्या विचाराने तिला अजूनच छान वाटलं. पुन्हा एकदा ती गुणगुणू लागली.....


खेळ जुना हा युगायुगांचा

रोज नव्याने खेळायाचा

डाव रंगता मनासारखा

कुठली हुरहुर कसले काहूर

जरा विसावू ह्या वळणावर


गौरी हर्षल कुलकर्णी

२६ जुलै २०२०






कितीदा नव्याने

"कितीदा नव्याने तुला आठवावे,

डोळ्यातले पाणी नव्याने वहावे"


गाणं ऐकलं आणि त्याला नकळतच हसू आलं. स्मृतींची पाने उलटून तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाही. 


नकळत्या वयात तिच्या प्रेमात पडला होता तो. ते नक्की प्रेम आहे की आकर्षण हेही समजत नव्हते.


 ती वर्षं त्याच्या आयुष्याच्या, करियरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वर्षं होती. पण मधेच ती भेटली आणि एका क्षणात त्याच्या मनात खळबळ माजली. 


अभ्यास एके अभ्यास करत जगणारा मुलगा सगळं काही सोडून तिच्या स्वप्नांमध्ये रमू लागला. रात्रंदिवस सतत तीच दुसरं काही त्याला सुचेना. ती दिसली की तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिच्या अवतीभवती घुटमळत राहू लागला. 


आजूबाजूला सर्वांनाच जसं हे समजलं तसं तिलाही समजलं होतच.इतर मुलींसारखं तिलाही ते आवडत होतं,पण तीही त्याच्यासारखीच होती करियर वगैरे गोष्टीना पहिली प्रायोरीटी देणारी त्यामुळे इतक्या हुशार मुलाने असं वागलेल तिला आवडलं नव्हतं. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. 


शेवटी एक दिवस त्याने तिला त्याच्या भावना सांगितल्या, तिला कदाचित अंदाज आला होताच. दोन दिवस मागून घेत ती निघून गेली. 


तिच्या वागण्याने गोंधळून गेलेला तो तिला पाठमोरी जाताना बघत होता. दोन दिवसानंतर तिच्या मैत्रिणीने एक पत्र आणून त्याला दिले. ती त्या दिवशी भेटली ती परत आलीच नाही. 


तिच्या न येण्याने तो पुरता कोलमडून गेला होता. पुढचे काही दिवस फक्त आणि फक्त निराशेत, उदास गाणी ऐकण्यात गेले.  ते पत्र अजून उघडून बघितलेही नव्हते त्याने. 


शेवटी कसाबसा मनाचा हिय्या करत त्याने ते पत्र उघडले. त्यात लिहिलेलं वाचल्यावर जे काही घडलं ते कुणालाही अनपेक्षित अस होतं. त्या दिवसानंतर तो आमूलाग्र बदलला. 


एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस. 


आयुष्यात ठरवलेल्या सर्व गोष्टी त्याने प्रचंड कष्ट करून मिळवल्या होत्या. आज जेव्हा त्याला त्यासाठी पुरस्कार मिळत होता तेव्हा तो मात्र त्याच श्रेय तिला देत होता. 


ते पत्र त्याने एक क्षणभरही स्वतःपासून दूर केले नव्हते.


त्यांचं एकत्र येणं कधीच शक्य होणार नव्हते पण ते तिने इतक्या छान पद्धतीने सांगितले की त्याला तिला गमावूनही मिळवल्याची जाणीव झाली. 


त्या समजूतदार पत्राने त्याला प्रेमाचा नवा मार्ग दाखवत सोबतीची उणीव भरून काढली होती. ती आज नसूनही त्याच्यासोबतच होती. 

गौरी हर्षल कुलकर्णी

२७ जुलै २०२०






अंतरंगातला देव

गॅलरीत ठेवलेल्या आरामखुर्चीत बसून आप्पा रेडिओवर गाणी ऐकत होते. पुढचं गाणं सुरू झालं तसा त्यांच्या डोळ्यांसमोर एक चेहरा तरळून गेला. 

तो दिवस आठवल्यावर त्यांच्या अंगावर काटा आला. 


पावसाने सगळीकडे थैमान घातलं होतं. श्रावण महिना असल्याने त्या दिवशी घरात पूजा केली होती. रजत कुरकुर करतच पुजेला बसला होता. त्याचा ह्या सगळ्या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता पण आप्पांचं मन मोडू नये म्हणून तो  करत असे. 

आप्पा त्याला नेहमी समजावत की एक दिवस कुठल्या न कुठल्या रुपात तो नक्की तुला भेटेल. तेंव्हा तूच मला सांगशील. 


अशातच संध्याकाळी मागच्या गल्लीत असणारी चाळ कोसळली अशी बातमी आली. थोड्याच वेळात त्यांच्या इथेही सूचना आल्या गरजेच्या सामानासह दुसरीकडे निघण्याची तयारी सुरु करा अशा. 


आप्पा ही सगळ्यांच्या सोबत ठरलेल्या ठिकाणी आले. 

"काय उपयोग झाला पूजा करून आला का तुमचा देव आपल्याला वाचवायला? उलट घर सोडून आलो आपण." रजत बडबड करू लागला. 


पाण्याचा जोर वाढला होता. सगळ्यांच्याच मनात आता खळबळ माजली होती. सोबत काही लहान मुले,गरोदर स्त्रियाही होत्या. 

हळूहळू त्या सगळ्यांना पुढच्या ठिकाणी पोहोचण्याचं काम सुरू झालं. रजतसोबतच सगळी तरुण मुलं मदतीसाठी पुढे झाली. 

जातपात, वय, स्त्री पुरुष सगळे भेदभाव बाजूला सारून फक्त माणुसकीच्या नात्याने जो तो मदत करत होता. रात्र सरता सरता सगळे टेकडीच्या माथ्यावर असलेल्या मोठ्या मंदिरात जाऊन पोहोचले. 

रजत एका वयोवृद्ध आजोबांना पाठीवर घेऊन आला होता. त्यांना व्यवस्थित जागा बघून त्याने बसविले तसे त्याचे दोन्ही हात घट्ट धरून डोळ्यांना टेकवत आजोबांनी नमस्कार केला. 

"अहो आजोबा हे काय करताय?" असे म्हणत रजत मागे सरकला.

"अरे लेका , तुझ्या रुपात माझा देव धावून आला बघ,  आज त्याचं दर्शन झालं मी भरून पावलो. नाहीतर माझ्यासारख्या म्हाताऱ्याकडं सगळ्यांनी दुर्लक्ष केलं होतं. पण त्याने तुझ्यामार्फत माझी मदत केली. दगडातला देव भेटला नाही पण माणसातला भेटला अजून काय पाहिजे?" 


रजतने डबडबलेल्या डोळ्यांनी आप्पांकडे बघितलं आणि त्याच वेळी जवळच्याच पायरीवर बसून एक आंधळा भिकारी गाऊ लागला, 


तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो

नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो

तुझ्यामाझ्यात भेटंल साऱ्यात तो

शोध, नाही कुठे या पसाऱ्यात तो

रोज वृंदावनी फोडी जो घागरी

तोच नाथा घरी वाहातो कावडी

गुंतला ना कधी मंदिरी, राउळी

बाप झाला कधी जाहला माऊली

भाव भोळा जिथे धावला तो तिथे

भाव नाही तिथे सांग धावंल का?

बघ उघडुनी दार अंतरंगातला देव घावल का?


गौरी हर्षल कुलकर्णी

२७ जुलै २०२०




लग जा गले

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो


तिच्या आवाजातली व्याकुळता तो आपल्या मनात नकळतच साठवून ठेवण्याची धडपड करत होता. ड्युटी पुन्हा जॉईन करा असा तडकाफडकी निरोप आल्यावर त्याच्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी तिचा चेहरा आला होता. दोनच दिवसांनी असणारा त्याचा वाढदिवस ह्यावेळी तरी एकत्र साजरा करता येईल म्हणून किती प्लॅन करत होती ती. काही त्याला सांगून तर काही लपून छपून. पण आता मात्र ते शक्य नव्हतं. 


शेवटी मनाचा हिय्या करत त्याने तिला सांगितलंच. क्षणभर तिच्या डोळ्यांत पाणी आलं. पण पुढच्याच क्षणी स्वतःला सावरत ती त्याला म्हणाली, "बरं झालं माझी सगळी तयारी झाली होती ते. तुझे सगळे गिफ्ट्स तरी तुला प्रत्यक्ष देता येतील. आणि तुला अजून काही हवं असेल तर ते ही आणता येईल. उद्या दुपारी जाणार न तू?"


तिचं वागणं बघून तो थक्क झाला होता. आपल्याला कस कळलं नाही कधी एवढी स्ट्रॉंग झाली ही? सायन्सच्या प्रॅक्टिकलला डिसेक्शन करताना घाबरलेली ती आणि आत्ताची ही केवढा फरक पडला. 

ते काहीही असलं तरी मी मात्र अजूनच प्रेमात पडतोय हिच्या. माझ्यासोबत माझी स्वप्नं भरभरून जगतानाही तिने स्वतःच्या स्वप्नांना जिवंत ठेवलं आहे. सोबतच घरच्यांनाही सांभाळते. तो स्वतःशीच विचार करत असतानाच ती आली आणि म्हणाली, चल रे सगळे जमले आहेत टेरेसवर आज मस्त पोटभर गप्पा मारू. 


त्या गप्पाच्या ओघातच त्याने तिला गाणं म्हणायला लावलं होतं आणि रेकॉर्ड पण करून घेतलं होतं. 

ती हसली तेंव्हा तो म्हणाला होता, "आठवणीच जगण्यासाठी मदत करतात ग. अवघड क्षणी डोळे मिटून एक छानशी आठवण जगून घेतो मी कारण ती मला बळ देते समोर आलेल्या संकटाला परतवून लावण्यासाठी. मी एकवेळ माणसाचे चेहरे विसरेन पण आठवण मात्र मनाच्या एका कप्प्यात सुरक्षित असेल. आणि तीच मला नव्याने सुरुवात करताना सोबत करेल." 

तेच गाणं तो ड्युटीवर परत जाताना रिपीट मोडवर ऐकत होता. पण प्रत्येक वेळी त्याला तिची नवीन आठवण हसवून जात होती. 


काही दिवसानंतर

इकडे आता त्याचा संपर्क तुटल्यापासून पंधरा दिवस झाले होते. 

शोध जरी सुरू असला तरी तो कधी सापडणार? कशा अवस्थेत ह्याची काही कल्पना नव्हती.मनातून मात्र  प्रत्येकाला आपल्या शंका खोट्या ठराव्यात असच वाटत होतं. 

 शेवटी शोध लागेल कधीतरी अस म्हणत सगळेच आपापल्या मार्गाला लागले. तीही आशेच्या हिंदोळ्यावर झुलत त्याची वाट बघत होती. पण मन मानेल तर ना? 


आणि एक दिवस तिला अपेक्षित बातमी आली. तो सापडला होता. बेशुद्ध अवस्थेत पण जिवंत होता. ती मिळेल त्या वाहनाने त्याच्या जवळ पोहोचली. पण त्याच्या डोळ्यात ओळखीची खूण नव्हती. बऱ्याच उंचावरून पडल्याने आणि वेळेत उपचार न मिळाल्याने आठवणी धूसर झाल्या होत्या. 


जखमा ताज्या असल्याने मेंदूवर ताण देऊन चालणार नव्हते. तेव्हा फक्त जुजबी ओळख पटवून देत तिने त्याला घरी येण्यासाठी तयार केले होते. 

सगळे सोपस्कार पार करून त्याने स्वतःच्याच घरी गृहप्रवेश केला. माणसं जरी त्याला अनोळखी वाटत असली तरी त्यांचे डोळे त्याला सतत काहीतरी वेगळं दाखवत होते. 


आईवडिलांसाहित सगळ्यांनी मिळून आधी त्याच्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. तो मान्य करून तो ही आता त्यांच्यामध्ये मिसळू लागला होता. 

तिचीच कल्पना होती ती पण ती स्वतः मात्र जरा जपून त्याच्या आसपास वावरत होती. कारण तो तिच्याकडे बघितलं की अस्वस्थ व्हायचा. ही व्यक्ती आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती आहे हे त्याला जाणवत होते पण तिचं आणि आपलं नातं नेमकं काय आहे हेच त्याला आठवत नव्हते. इतरांना त्रास नको म्हणून त्याने वरवर जरी नवराबायको आहोत हे मान्य केले होते तरी एकांतात मात्र त्याने तिला वेळ मागितला होता. तिनेही त्याला तो दिला होता कारण त्याच्या आठवणींच्या थियरीवर तिचा पूर्ण विश्वास होता. 


अशातच एके दिवशी तिला सहज गाणं म्हणायची हुक्की आली तो घरात नव्हता त्यामुळे ती मस्त मोकळ्या आवाजात मनापासून सूरांना आळवत होती. 


पास आइये कि हम नहीं आएंगे बार-बार

बाहें गले में डाल के हम रो लें ज़ार-ज़ार

आँखों से फिर ये प्यार कि बरसात हो न हो

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो


मनातलं सगळं दुःख तिच्या आवाजात स्पष्ट जाणवत होतं. शेवटची ओळ म्हणत असताना ती मागे वळाली आणि जागेवरच थबकली. समोर तो उभा होता डोळ्यात अश्रू पण ओठांवर मात्र आज ओळखीचं हसू आलं होतं. त्याच्या आठवणीनी अखेर त्याला तिची ओळख पटवून दिली होती. 

गौरी हर्षल