शुक्रवार, २७ मार्च, २०२०

समांतर

दोन समांतर रेषा आहोत आपण
एकाच दिशेने जाणाऱ्या
पण तरीही वाटा वेगळ्याच आहेत आपल्या
स्वतःच्या धुंदीत वळणाऱ्या
तू शोधत आहेस तुझ्या मनातलं सुख चौफेर
माझ्या मनात मात्र सतत आठवणींचा फेर
तुझ्या वाटेवर आहेत असंख्य व्यक्ती 
वेळोवेळी नातं टिकवण्यासाठी धावणाऱ्या
माझ्या वाटेवर आहेत सावल्या
मुखवट्या मागे लपणाऱ्या
तुला झाली आहे सवय 
खोट्यालाही  खर मानून जगण्याची
मला अजूनही आहे जुनीच खोड 
खऱ्यालाही पारखून घेण्याची
चुकून कधी आपल्या नजरा एकमेकांना भिडल्या
तर हसतो आपण सवयीने
पण तुला आणि मला ही माहिती आहे
कायमस्वरूपी वेगळे ठेवले आहे आपल्याला  नियतीने
समांतर असण्याचे आपले असे फायदे आहेत
तुझ्या माझ्या जगाचे आपापले कायदे आहेत

26.2.2020

गीतसप्तक भाग ५

#गीतसप्तक
मन धागा धागा
मला आवडलेलं हे अजून एक गाणं. ह्याचं  प्रत्येक कडवं मला वेगळा अर्थ सांगत असल्यासारखं वाटलं. सो, मी नेहमीप्रमाणे मला जो अर्थ वाचल्या वाचल्या भिडला तो लिहिण्याचा प्रयत्न करतेय. 
१.
       असे कसे बोलायचे न बोलता आता
       तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता
       डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता
       सांगा जरा असे कसे लपायचे रे आता
         मन धागा धागा जोडते नवा
          मन धागा धागा रेशमी दुवा
  तसं पाहिलं तर गाणं प्रचंड रोमँटिक आहे, पण मला मात्र ह्या कडव्याचा अर्थ थोडा वेगळा असला तरी चालेल असं वाटलं. म्हणजे एक स्त्री जी पहिल्यांदा आई होणार आहे , ती या ओळींशी कनेक्टेड होऊ शकते. कारण काही गोष्टी अनुभव हे असे असणार जे फक्त आणि फक्त तीच अनुभवू शकते. सांगूनही ते कुणाला कळणार नाहीत. त्यातून अजून तरी हे गुपित तिने गुपितच ठेवलं आहे त्यामुळे डोळ्यांत रोज त्याला जपत असतांनाच त्याचं अस्तित्व लपवू कसं हेही तिला कळत नाही. असो तर हे पहिलं कडवं.....
२. 
             एकटी मी दिनरात तरीही तू भोवती
               हातात नाही हात तरीही तू सोबती
                     मन बेभान बेभान होई
                     मग प्रीतीला उधाण येई
                    मन धागा धागा ......
एका सोल्जरची बायको. दूर असूनही घरातल्या प्रत्येक वस्तूशी आणि तिच्याशी त्याच्या अबोल आस्तित्वाचं नातं आणि त्यासोबत तिची चालू असलेली रोजच्या जगण्यातली धावपळ. पदोपदी त्याची आठवण तिला अस्वस्थ करतेच पण त्याचबरोबर तिला बळही मिळतं सगळं निभावून नेण्यासाठी. 

३.
                रोज बहाणे नवे शोधून मी थकते
                 तुझ्याच मागे मन येऊन ही चुकते
                    क्षण आतूर आतूर झाले
                       रोज काहूर काहूर नवे
                  मन धागा धागा......
हे तिसरं आणि शेवटचं कडवं. ह्या ओळी मला ना अशी एक वेगळीच आठवण करून देतात. म्हणजे नवीन असं काहीतरी नुकतंच घडू लागलंय आयुष्यात मग ते त्याच्या असो किंवा तिच्या. आणि ते जे काही आहे ते प्रेम वगैरेंपेक्षा वेगळं आहे कदाचित ती एक नवी सुरुवात आहे एखादया नव्या कामाची, छंदाची किंवा सगळं मळभ दूर झाल्यानंतर उगवणाऱ्या नव्या दिवसाची. ज्याची नकळत आपण सगळेच वाट बघत असतो रोज. मनासारखं काहीतरी घडावं असं प्रत्येकाला वाटत असतं कदाचित तेच घडण्याची सुरुवात.......
      कदाचित माझ्यासाठीही नवा अर्थ लपलेला असेल. ©गौरी हर्षल कुलकर्णी
#गौरीहर्षल

गीतसप्तक भाग ४

#गीतसप्तक
कितीक् हळवे, कितीक् सुंदर, 
किती शहाणे आपूले अंतर
हे गाणं ऐकताना मला नेहमी असं वाटत राहतं की असं समंजस मैत्रीचं नातं कुणासोबत तरी जुळवून यावं. एकमेकांना समजून घेत असतानाच एकमेकांना हवी तितकी स्पेस देणंही तितकंच गरजेचं असतं. अर्थात ही प्रक्रिया दोन्हीकडून व्हायला हवी तरच अपेक्षित असा प्रतिसाद मिळतो.
आणि हे खरं तर फक्त मैत्रीतच होण्याऐवजी प्रत्येक नात्यात व्हावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाला आपल्या पद्धतीने याचा वेगळा अर्थही सुचेल कदाचित. 
पण कधी कधी स्वतःच्या असण्याचा हट्ट न धरताही बरेच जण आपल्या मनात घर करून जातात. अशा लोकांना रोज भेटण्याची,बोलण्याची गरज नसते. पण गरज पडलीच तर पहिल्या हाकेला ह्या व्यक्ती धावत येतील ही खात्री असते. अशी माणसं, अशी नाती मनापासून जपण्याची हल्ली खूप गरज पडतेय. कारण योग्य वेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर ह्या व्यक्ती अलिप्त होतात त्यांच्याही नकळत. अर्थात नातं तोडणं त्यांना कधीच मान्य नसतं खरतर त्यांना जमणारच नसतं. पण मग असून अडचण नसून खोळंबा होण्यापेक्षा थोड्याश्या अंतरावरूनच ते सर्व काही बघत राहतात. व्यक्तिपरत्वे जसे स्वभाव वेगळे तसे अनुभवही. 
अगदी असाच मित्र दुसऱ्या कुणी आपल्यासाठी होण्यापेक्षा आपणच कुणासाठी होऊन बघावं. आपल्यासाठी कुणीतरी आहे ही भावनाही हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात अजून धावण्यासाठी बळ देते. करून तर बघायला हवं त्यासाठी आधी  स्वतःशीच मैत्री करावी लागेल. ©गौरी हर्षल कुलकर्णी
#गौरीहर्षल

गीतसप्तक भाग ३

#गीतसप्तक
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
'चॉकलेटचा बंगला' कल्पनाच किती मस्त आहे ना? चॉकलेट आवडत नाही अशी फार कमी माणसं आजूबाजूला सापडतील. लहान मुलांना आपल्या पार्टीत घ्यायचं म्हटलं की मोठया ताईदादांच्या कडून हमखास दाखवलं जाणारं आमिष. 
प्रमाणाबाहेर खाल्लं तर त्याचे तोटेही आहेतच. पण आज नको त्यावर बोलायला. पूर्वी काही ठराविक चॉकलेट मिळायची आता मात्र इतके सगळे प्रकार, इतक्या सगळ्या चवी असतात की खाणारा गोंधळून जातो. 
लहान मुलांच्या मनोराज्यात हळूच शिरून लहान होऊन गेल्याचं फिलींग हे गाणं देतं. ह्या गाण्याच्या संकल्पनेशी मिळताजुळता एक धडाही होता मला. त्यात कलिंगडाचं घर होतं. भर उन्हाळ्यात अशा मस्त कलिंगडाच्या घरात आपण राहतोय ही आयडियाच भारी वाटायची खरंतर अजूनही वाटते.  किती छान असतं ना ते विश्व कसल्याच चिंता काळज्या नसतात. कुणाशी शत्रुत्व नसतं,कसलेही हेवेदावे नसतात. फक्त आणि फक्त निखळ आनंद असतो आयुष्यात. मैत्री,नाती सगळी अगदी मनापासून निभावली जातात. म्हणून तर अगदी प्रत्येकाला मोठं झालं की बालपण खुणावत असतं. जितकं निरागस मुलांचं विश्व असतं तितकंच किंबहुना त्याच्या जवळपास सुद्धा न जाणारं जग मोठेपणी त्यांना भेटतं. आणि मग हळूहळू ते छोटं मूल आत मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात स्वतःला आक्रसून घेतं. फार काही नाही करायचं पण मुलातलं मूल जपताना स्वतः मधल्या मुलालाही जपायला हवं. सगळ्या जगाला एका स्वच्छ नजरेने बघता यायला हवं. दुसऱ्या कुणासाठी नाही पण स्वतःसाठी आणि आपल्या जवळच्या लोकांसाठी तरी आनंद निर्माण करता यावा. हळूहळू का होईना बाकी परिस्थितीही बदलेल. आधी आपण तर सुरू करू चॉकलेटचा बंगला बांधायला आयुष्य तर तसंही गोडच आहे अजून गोड होईल. ©गौरी हर्षल कुलकर्णी
#गौरीहर्षल

गीतसप्तक भाग २

#गीतसप्तक भाग २
बस इतना सा ख्वाब है 

जो भी चाहूँ वो मैं पाऊँ
जिंदगी में जीत जाऊं
चाँद तारे तोड़ लाऊं
सारी दुनिया पर मैं छाऊँ
बस इतना सा ख्वाब है 
 आपल्याला कळतही नसतं तेंव्हापासून  आपण स्वप्नं बघत असतो. ही स्वप्न म्हणजे नक्की काय असतं तर आपल्या मनात निर्माण झालेल्या इच्छा. त्या कधी आपण उघड उघड सांगतो कधी नाही सांगत. पण हे गाणं मात्र प्रत्येकाच्याच मनात कधी न कधी येणाऱ्या इच्छा सांगतं. मलातरी आवडतं स्वप्नं बघायला काही क्षणांसाठी का होईना त्या जगात हरवून जायला. 
अर्थात एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंतच तिची ओढ असते. यावरून अजून एका गाण्याची ओळ आठवली, स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा, गोडी अपूर्णतेची लावेल वेड जिवा. एखादं गोष्ट मिळवण्यासाठी माणूस जितकी जिवापाड मेहनत करतो तितकाच किंबहुना जास्त आनंद मिळतो ती गोष्ट मिळाल्यावर. तरीही स्वप्न पाहणं हे कायमच आवडत कारण स्वप्न एक आशा सतत जागी ठेवतात मनात की मिळेल 'कष्टाचं फळ' आज न उद्या नक्कीच मिळेल.
पण इथे मात्र त्या गाण्यातील हिरोला सगळं हवं असतं. अगदी चंद्र, ताऱ्यांपासून ते ऐश्वर्य, प्रसिद्धी, कौतुक सगळंच. झटपट असं सगळं मिळवण्याचा त्याचा प्रयत्न त्याला पुढे योग्य ती समजही देतो. पण आपणही कळत नकळत बऱ्याचदा देवाला मागतच असतो काही न काही.  ते मिळत नाही म्हणून हताशही होऊ नये आणि प्रयत्न करणही सोडू नये.
आता काही जण हेही म्हणतील की नुसती स्वप्नंच बघायची का? तर नाही अशी स्वप्नं बघायची जी आपल्याला एक ध्येय देतील आणि तिथे पोहोचण्यासाठी सतत जागं करत राहतील. जेणेकरून वाटेत येणाऱ्या अडचणी पार करत आपण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहू. बाकी सगळं मिळालं तरी अजून हवच असतं माणसाला. ज्या दिवशी माणूस समाधानी होण्याचं स्वप्न बघून ते पूर्ण करेल तो दिवस खरा. 
©गौरी हर्षल कुलकर्णी

बिती हुई बतीयां

#बीती_हुई_बतियाँ 

                   बीती हुई बतियाँ कोई दोहराये, 
                  भूले हुए नामों से कोई तो बुलाये
ह्या ओळी गुणगुणत असतानाच तिचा काम करणारा हात आणि विचारात भरकटणारं मन दोघेही थांबले. खरंच रोजच्या जगण्यात किती आणि काय काय सुटून गेलं नं? जी माणसं कधी काळी खूप जवळची होती ती आज कुठेच नाहीयेत. असं का होतं? मग आठवणींचा पट उलगडतच राहिला अन् नकळतच तिचे डोळे भरून आले. 
लहानपणीचं घर तिथलं अंगण ,अंगणातलं  कैरीचं झाड आयुष्यातले पहिले सवंगडी तिथेच मिळाले. त्यातले काही इतके दूर गेले की चेहरेही धूसर झाले त्यांचे. काही मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या करत मनात आणि आयुष्यातही टिकले.  
माणसं अशीच हरवत राहतात का प्रत्येक वळणावर??? पण जरी ती हरवली तरी आठवणी तर असणार आहेतच ना त्यांच्या कायमचं तिने स्वतःच स्वतःला उत्तर दिलं. शोधायचं म्हटलं तर सगळे सापडतील लगेच पण तोच निरागस मैत्रीत पुढे केलेला हात पुन्हा तितक्याच निरागसपणे हातात येईल का? की उगाच फेसबुक, वॉट्सअप्प वर जगाला दाखवण्याच्या नादात कैरीच्या , लिंबाच्या, आंब्याच्या कडूगोड आठवणी आठवणीच होऊन राहतील? तरीही ती हूरहूर लागतेच मनाला.
जुनी खेळातली नावं, लुटुपुटूची भांडणं, रुसवे, फुगवे, भातुकली सगळं कसं आत्ता घडत असल्यासारखं नजरेसमोर नाचलं. हातातली कामं आवरत तिने आज जुने अल्बम काढले. प्रत्येक फोटो एक नवीन आठवण आणि खूप दिवस टिकेल, पुरेल असं समाधानाचं हसू देऊन गेला तिला. खूप काही आहे आपल्याजवळ पण आपण उगाचच नवीन काहीतरी शोधत फिरतो असा विचार मनात येताच ती स्वतःशीच हसली. 
संध्याकाळी घरी आल्यावर नवरा आणि मुलंही तिचं हे रूप पाहून खुश झाली. तितक्यात तिच्या जुन्या घराजवळचे कुणीतरी काका काकू भेटले आणि काय काय मस्त आठवणी सांगत होते असं नवरा म्हणू लागला. चला, मनातली तगमग योग्य मनापर्यंत  पोचली ह्या विचाराने तिला अजूनच छान वाटलं. पुन्हा एकदा ती गुणगुणू लागली.....
बीती हुई बतियाँ कोई दोहराये,
भूले हुए नामों से कोई तो बुलाये💖💖
#गौरीहर्षल
२८.१२.२०१७

टेक अ चान्स

#टेक_अ_चान्स
"Take a chance because you never know how absolutely perfect something could turn out to be. "

        स्वतःच भिंतीवर चिकटवलेलं  हे वाक्य  सायलीच्या डोक्यात अक्षरशः धुमाकूळ घालत होतं. निमित्त होतं तिच्यासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नाचं. 
      सायली, वय वर्षे 40, सुस्वभावी  उच्चशिक्षित गृहिणी. गृहिणी हा तिचा स्वतःचा चॉईस.मुलं लहान असताना धावपळ करत राहिलो तर खूप काही सुटून जाईल असा तिचा समज होता. म्हणून तिनेच मी करेन एडजस्ट म्हणत चांगली सुरू असणारी नोकरी सोडून घरी राहायचं ठरवलं. त्यावेळी सगळ्यांनी तस तिला वेड्यात काढलं. पण आता काही वर्षांनी तिच्या मुलांना , घराला भेट देणाऱ्या प्रत्येकाला तिने घेतलेला निर्णय योग्य होता असंच म्हणावं लागलं. 
       आता कुणी म्हणेल अस वेगळं काय केलं होतं?  खूप काही नाही पण सायली आणि तिचा नवरा राजीव दोघांनी मिळून काही गोष्टी ठरवल्या होत्या . दोघांपैकी एक जण घरात असल्याने त्या गोष्टी त्यांना जरा नीट कार्यन्वित करता आल्या इतकंच. त्यांच्या घरात टीव्ही अजिबात नव्हता पण पुस्तकं मात्र भरपूर होती. मोबाईलचा  वापर अनिवार्यच असल्याने तो घरात होता पण वापरण्याचा वेळ मात्र ठरवलेला होता. या आणि अशा इतर लहानसहान सवयीमुळे मुलं आपोआपच वेगळ्या पद्धतीने विचार करू लागली. अर्थातच त्याचा प्रभाव इतर क्षेत्रात दिसू लागला. 
दोन्ही मुलं  स्वतःच्या आवडीनिवडी ओळखून त्या दिशेने वाटचालही करू लागली होती. असो पण आपली गोष्ट सायलीची आहे . आता मुलांची जबाबदारी कमी झाल्याने सायलीकडे खूप मोकळा वेळ असे. यावेळाच काय करावं हे काही तिला सुचत नव्हतं. अशातच तिच्या घराजवळ एक नवीन कंपनी सुरू झाली. कंपनीची मालकीण म्हणजे शेजारच्याच कॉलनीत राहणारी दीप्ती होती. गृहिणी असणाऱ्या बायकांना लक्षात ठेऊनच तिने काही नवीन पद्धती सुरू केल्या होत्या. पण नवखी असल्याने तिचा थोडाफार गोंधळ उडत असे. सायली आणि तिच्या शेजारच्या सगळ्यांना  तिथे येण्याचे आमंत्रण दिले होते. म्हणून सगळं महिला मंडळ आज लवकर काम आवरून दुपारी त्या छोटेखानी मॉल मध्ये पोहोचले. एकाच छताखाली बऱ्याच सोयी देण्याचा प्रयत्न केला होता. पण फक्त स्त्रियांसाठी अन् तेसुद्धा मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय स्त्रियांसाठी खासकरून.  परवडतील असे दर आणि बचतगट वगैरेंच्या मदतीने चालवली जाणारी दुकानं. 
सायली आणि सगळ्या जणी खूपच खुश झाल्या हे सगळं पाहून. अशातच एका ठिकाणी काहीतरी खूप गोंधळ निर्माण झाला अन् सगळ्यांचं लक्ष तिकडे वेधलं. उत्सुकता म्हणून सगळ्या तिकडे वळल्या. बिल काउंटर वर गोंधळ होऊन चुकून काही झाल होतं. दीप्ती कुणाशी तरी फोनवरून येण्याबद्दल बोलत होती. पण तिथेही काहीतरी प्रॉब्लेम होत असल्याने ती जरा गडबडली होती. सायली हळूच तिच्याजवळ गेली आणि तिने मी बघू का असा विचारलं. दिप्तीला आश्चर्य वाटलं पण तिने होकार दिला. थोड्या वेळातच सायलीने बिलात झालेला घोळ सांगत काय चुकलं हेही दाखवलं आणि योग्य भाषेत काम करणाऱ्या मुलींना समजही दिली. दीप्ती हे सगळं बघत होती आणि अचानक तिने एक निर्णय घेतला. 
तिने सायलीच्या समोर पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन संभाळशील का? असा प्रश्न ठेवला. त्याच प्रश्नावर विचार करता करता सायली आज गोंधळली होती. 
संध्याकाळी राजीव आणि मुलं घरी आली तस तिने झालेला प्रसंग त्यांना सांगितला आणि काय करू असही विचारलं. त्यावर मुलं आणि राजीव अर्थातच उत्साहाने म्हटले की संधी  मिळाली आहे तर सोडू नकोस. त्यांनी गोंधळलेल्या तिला तिनेच चिकटवलेलं वाक्य दाखवलं. तिने दिप्तीला होकार कळवला. रात्री उद्या किती आणि काय आवरत निघावं लागेल याचा विचार करतच ती झोपली.
नेहमी 5च्या ठोक्याला उठणाऱ्या  तिला सकाळी मात्र उशिरा जाग आली. अस कस झालं ह्याचा विचार करत ती स्वयंपाक घरात शिरली आणि समोरच दृश्य पाहून चकित झाली. नवरा आणि मुलं सगळं आवरून नुसते तयारच नव्हते तर तिच्यासाठी नाश्ता, एक फुलांचा गुच्छ टेबलवर ठेवला होता. ती समोर दिसताच मुलं तिला येऊन बिलगली आणि बेस्ट लक म्हणाली.  इथून पुढे मात्र सायलीला स्वतःला सिध्द करायचं होतं. ते अर्थातच ती करणारच होती. आपलं आवडतं वाक्य मनात घोळवतच सायलीच्या नव्या इनिंगची सुरुवात झाली . 

तात्पर्य काय   तर हेच  "Take a chance because you never know how absolutely perfect something could turn out to be." स्वतःला एक संधी तर देऊन बघा कोण जाणे कदाचित सुरेख अस काहीतरी  निर्माण होईल . 
#गौरीहर्षल
१७.७.२०१८