मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

नावडतीचं मीठ अळणी

#नावडतीचं_मीठ_अळणी 

स्निग्धा आणि मुग्धा या दोघी जिवलग मैत्रिणी होत्या. शाळा कॉलेजपर्यंत एकत्र असणाऱ्या त्या लग्नानंतर मात्र वेगवेगळ्या शहरात शिफ्ट झाल्या होत्या.
मुग्धाच्या अंगावर बऱ्यापैकी जबाबदाऱ्या असल्याने तिला शक्यतो बाहेरच्या गोष्टींमध्ये फारसं पडण्यासाठी वेळ मिळत नव्हता, तर स्निग्धाचा मात्र छोटासं कुटुंब असल्यामुळे घरातल्या आणि बाहेरच्या गोष्टी मॅनेज करत तिला बॅलन्स राखावा लागत होता. 
मुळातच पहिल्यापासून या दोघी इतरांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या असल्यामुळे नवीन शहरात सुद्धा त्यांनी इतर व्यक्तींबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण घरातल्या व्यक्ती सोडल्या तर बाहेरच्या लोकांबरोबर जुळवून घेताना त्यांना बऱ्यापैकी विचित्र अनुभव आले. 
आधी उत्साहाने बोलवणाऱ्या सोसायटीतल्या बायका मुग्धाला टाळतात हे तिच्या लक्षात आलं होतं. तर अशीच गोष्ट स्निग्धाच्या बाबतीत ऑफिसमध्ये घडली होती. 
एका सुट्टीत जेव्हा त्या दोघी एकमेकींना भेटल्या. तेव्हा एकमेकींसोबत चर्चा करताना त्यांनी आपल्या मनातली ही खदखद एकमेकींसमोर व्यक्त केली. 
मुग्धाच्या बाबतीत घडलेली गोष्ट ऐकल्यानंतर नकळतच स्निग्ध म्हणाली, " मुग्धे कदाचित असं असू शकेल का? म्हणजे बघ तू एकत्र कुटुंब बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेस. आणि तुझ्या आजूबाजूला बऱ्यापैकी छोटी कुटुंब आहेत. तू जरी इतरांना स्वतःसारखं वागा म्हणून जबरदस्ती करणार नसलीस तरी कुठे ना कुठेतरी त्यांच्या मनात याबद्दल वेगळे विचार असू शकतात. आणि त्याच असुरक्षिततेमुळे ते सर्वजण तुला टाळत असतील." 
यावर मुग्धा म्हणाली, " बरोबर आहे तुझं! मी त्या दृष्टिकोनातून विचार केलाच नव्हता. आता मी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवीन की इथे प्रॉब्लेम माझ्या वागण्यामध्ये नसून इतर व्यक्तींच्या मनात असलेल्या असुरक्षिततेबद्दल आहे. आणि त्याबाबतीत मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने एक्सेप्ट करायला हव्यात." 
स्वतःच्या समस्येवर काही अंशी उत्तर मिळाल्यानंतर अचानकच मुग्धा स्निग्धाकडे बघून म्हणाली, " स्निग्धा, तुझ्या बाबतीत पण तर असच झालं असेल असं नाही का वाटत तुला?? म्हणजे बघ तू तुझ्या कामात पहिल्यापासूनच एफिशियंट आहेस. त्यामुळे जॉब सुरू केल्यापासून तू इतरांपेक्षा लवकर प्रमोशन्स मिळवले आहेत. शिवाय तुझ्या कामात चुका नसतात त्यामुळे बऱ्याचदा तू कौतुकास पात्र असतेस. कुठे ना कुठेतरी ही गोष्ट सुद्धा तुझ्या इतर सहकारी व्यक्तींच्या मनात ईर्षा आणि असुरक्षितता निर्माण करत असेल. पण पुन्हा आपण तेच म्हणूया की हा त्यांचा प्रश्न आहे आपला नाही. आपल्याला आपल्या दिशेने येणाऱ्या या अशा वागण्याला हॅण्डल करणे मात्र शिकायला हवं हे नक्की." 
हे ऐकल्यावर स्निग्धा म्हणाली, " परफेक्ट, आत्ताच बघ ना बोलता बोलता आपल्याला एकमेकींच्या प्रश्नांवर उत्तरं सापडली. बाकी काही असो नसो पण आपण आपल्या मनातल्या गोष्टी एकमेकींकडे व्यक्त करण्यासाठी तरी निदान आपण वेळ काढायलाच हवा." 

मुग्धा आणि स्निग्धाला तर त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं. पण तुम्ही सुद्धा जर अशा सिच्युएशन्स फेस करत असाल तर कदाचित तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम सोल्युशन पुढे मिळेल... त्यासाठी वाचत राहा... 

एखाद्या व्यक्तीला जेंव्हा आपण आवडत नसतो. तेव्हा ती व्यक्ती तिचे आपल्याबद्दलचे विचार कुणासोबत तरी शेयर करते. आणि बऱ्याचदा आपल्याला जाणीव होण्याआधी आपला तिरस्कार करणाऱ्या, आपण न आवडणाऱ्या लोकांचा एक मोठा ग्रुप तयार झालेला असतो. तुम्ही सुद्धा हे अनुभवलं आहे का? 
कधी न कधीतरी प्रत्येक जण ही गोष्ट अनुभवतोच. 
तर असो आज आपण याच परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

तुम्ही तटस्थपणे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की यामागे तुमच्याबद्दल असणारा तिरस्कार हे कारण मुळात नसतेच. मग काय कारण असते? त्यामागे असते ती तुमची खरी पॉवर... तुमचा या सगळ्या व्यक्तींवर असणारा प्रभाव. जो सहन न झाल्याने तुमच्याविषयी नकारात्मक विचार मनात असणाऱ्या व्यक्ती एकत्र येतात. मुळात तुमचे व्यक्तिमत्व कसे असते की ज्याला कितीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तरी टाळता येत नाही. त्यामुळे या सगळ्या व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल बोलत असतात, तुमच्याबद्दल विचार करत असतात आणि त्यांचे एकमेकांसोबत असणारे नातेच मुळात तुमच्याविषयी असणाऱ्या भावनांमुळे असते. यालाच प्रभाव असे म्हणतात. 

पण तुम्हाला माहित आहे का त्यातली महत्त्वाची गोष्ट काय आहे??? तर या सगळ्या लोकांचा हा नकारात्मक स्वभाव तुम्ही कसे आहात ते ठरवत नाही. मुळात तुमचा स्वभाव तुम्ही या सगळ्या नकारात्मकतेला कशा पद्धतीने प्रतिसाद देता त्यावर ठरतो. जर तुम्ही या सगळ्या व्यक्तींचे वागणे मनावर घेतले तर सहाजिकच आहे की त्याचा तुमच्या मनस्थितीवर चुकीचा परिणाम होतो. पण जर तुम्ही या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले. ते म्हणजे की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला विरोध करण्यासाठी सुद्धा लोकांना एकत्र यावे लागते. तर सहाजिकच आहे तुमच्या आत्मविश्वासामध्ये भर पडते. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने विचार करू लागतात तेव्हा आपोआपच तुम्ही स्वतःच्या बाबतीत चांगल्या गोष्टी आकर्षित करायला सुरुवात करतात. तुम्हाला मनापासून प्रोत्साहन देणारे, पाठिंबा देणारे आणि तुमच्या सोबत नातं जोडण्यासाठी तयार असणाऱ्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतात. 

सो, इतरांच्या दृष्टिकोनातून स्वतःला बघून स्वतःमध्ये बदल घडवण्यापेक्षा तुम्ही जसे आहात तसेच स्वतःला स्वीकारा. कारण जेव्हा तुम्हाला विरोध करण्यासाठी लोक एकत्र येतात. तेव्हा एक लक्षात घ्या - तुमचा स्वतःचा प्रवास सुद्धा एका वेगळ्या आणि प्रभावी दिशेने सुरू झालेला असतो. 
स्वतःला शोधताना _ गौरी हर्षल 2/ 2025 
गौरी हर्षल कुलकर्णी 
एम ए क्लीनिकल सायकॉलॉजी आणि समुपदेशन
 




सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५

Why do I take things personally?

#Why_do_I_take_things_personally? 
अनिता, समुपदेशनासाठी आलेली क्लायंट... 
तक्रार काय? तर तिला आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्याबद्दल तक्रार होती. संभाषणाची सुरुवात झाली ती तिच्या आजूबाजूची लोकं बऱ्याचदा तिच्या बाबतीत टीका करतात किंवा टोमणे मारतात यावरून. हळूहळू केस हिस्टरी घेताना लक्षात आलं की आजूबाजूच्या लोकांनी इतर कोणाला उद्देशून काहीही बोललं तरी ते आपल्यालाच उद्देशून आहे असं अनिताला वाटत होतं. आणि मग कुठे ना कुठेतरी तिच्यामध्ये आणि त्या व्यक्तींमध्ये गैरसमजाची सुरुवात होत होती. सहाजिकच अनिता कधी सुद्धा समोरून त्या व्यक्तीला जाब विचारत नसल्याने गैरसमज खोडून काढण्याचे प्रसंग फार कमी वेळा येत होते. म्हणजे ज्या व्यक्ती तिला गैरसमज झाला आहे हे लक्षात आल्यानंतर तिच्यापर्यंत तो गैरसमज दूर करण्यासाठी येत होते. त्यांच्यासोबत तिचे नाते पुन्हा पहिल्यासारखे होत होते. पण ज्या नात्यांच्या बाबतीत ही गोष्ट घडत नव्हती त्या ठिकाणी मात्र त्या गैरसमजाला कळत नकळत खत पाणी घातले जात होते. 
मग आता इथे बोलता बोलता तिच्या स्वतःच्या लक्षात आलेली गोष्ट अशी की मी बऱ्याचदा खरं खोटं न करता गोष्टी स्वतःवर ओढवून घेते का? आणि जर असं होत असेल तर मी काय करायला हवं? why do I take things personally?? 

कौन्सिलिंगच्या माध्यमातून तिला मदत करता करता सुचलेले काही मुद्दे या लेखांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का?  की एखाद्या व्यक्तीने कुठलीतरी कमेंट पास केली किंवा कुठल्यातरी संदर्भात एखादी टीका केली.... अन् प्रत्यक्षात त्या दोन्ही गोष्टींचा तुमच्याशी संबंध नसताना सुद्धा तुम्ही दुखावले गेलात? 
किंवा आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात, ज्यांना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या बाबतीत जोडून घेण्याची सवय असते. साध्या शब्दात सांगायचं झालं तर ते इतरांचं बोललेलं, वागलेलं सगळं काही मनाला लावून घेतात. अशावेळी अशा वागण्यामागची कारणे, गैरसमज वेळीच ओळखणे.  त्यामुळे होणारे तोटे, त्याबाबतीत आवश्यक असलेले उपाय जसे की भावनिक लवचिकता आणि नाती जोपासण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मर्यादा ठरवणे या सगळ्यांवर काम करणे अपेक्षित असते. 

आता सगळ्यात आधी आपण या मागची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून असणारी कारणे जाणून घेऊया...
१.  बालपणीचे अनुभव...
एखादी व्यक्ती लहान मूल असताना ते ज्या व्यक्तींच्या सहवासात जास्त वेळ वाढते, त्या व्यक्ती म्हणजे जसे की आई-वडील, आजी-आजोबा किंवा त्यांना सांभाळणाऱ्या इतर प्रौढ व्यक्ती. या सर्व व्यक्तींच्या आपापल्या समजुती, त्यांची तत्वं, त्यांच्या वागण्याच्या पद्धती,  त्या मुलासोबत व इतरांसोबत त्यांचे असणारे वर्तन यांचा प्रभाव कळत नकळत त्या लहान मुलाच्या व्यक्तिमत्वावर होत असतो. 
ते लहान मूल त्याला मिळणारा नकार, होणारी टीका किंवा एखाद्या बाबतीत समोरच्याकडून हवे असणारे प्रतिसाद यावरून कुठे ना कुठेतरी प्रौढावस्थेत येताना व्यक्ती म्हणून बदलत जाते. लहानपणी त्याच्या सहवासात असणाऱ्या प्रौढ व्यक्तींनी या सर्व गोष्टींना दिलेल्या प्रतिक्रिया त्याच्या मनात खोलवर रुजलेल्या असतात. 
उदाहरण द्यायचे झाले तर जर एखाद्या व्यक्तीने लहानपणी आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून स्वतःच्या प्रत्येक कृतीसाठी टीका सहन केली असेल तर ती व्यक्ती मोठी झाल्यानंतर कळत नकळत तिच्या आजूबाजूच्या लोकांशी वागताना सुद्धा त्याच पद्धतीचे प्रतिसाद देण्यास सुरुवात करते. 

२. Attachment style - संलग्नता 
अटॅचमेंट थियरीनुसार आपल्या प्रत्येकाची एक अटॅचमेंट स्टाईल असते... त्यामध्ये secure, anxious, or avoidant असे काही प्रकार असतात. या सर्वांचा व्यक्ती जेव्हा इतरांसोबत संपर्कात येते तेव्हा त्याच्या वागण्यावर आणि इतरांसोबत असणाऱ्या नात्यांवर प्रभाव पडत असतो. बऱ्याचदा ही अटॅचमेंट स्टाईलही त्याच्या लहानपणीच्या अनुभवांवरती आधारित असते. 
याचे सगळ्यात सोपे उदाहरण म्हणजे लहानपणी व्यक्तीचे तिच्या आई-वडिलांशी ज्या पद्धतीचे संबंध असतील कुठे ना कुठे तरी त्या संबंधांची सावली त्याच्या प्रौढवयातील नातेसंबंधांवरती पडत असते. 

जेव्हा एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तीचं प्रत्येक बोलणं मनाला लावून घेते, तिला ते सोडून देणं जमत नाही, तेव्हा त्या मागची मुख्य कारणं काय आहेत ते आपण जाणून घेतलं. आता आपण या गोष्टीच्या लक्षणांकडे वळूया... 

1. Hypersensitivity to Feedback: टीके बाबत अति संवेदनशीलता
अशा व्यक्तींना इतरांकडून केली गेलेली टीका किंवा दिला गेलेला फीडबॅक सहजासहजी पचवता येत नाही. ती गोष्ट स्वीकारणे त्यांना जड जाते. आणि त्यामधूनच बऱ्याचदा त्यांचे समोरच्या व्यक्तीसोबत वाद होतात. कारण समोरची व्यक्ती कुठल्या हेतूने आपल्याला काय सांगत आहे हे अतिसंवेदनशील स्वभावामुळे त्यांच्या लवकर लक्षात येत नाही. आणि मग नकळतच त्यांच्याकडून समोरच्या व्यक्तीला चुकीच्या प्रतिक्रिया दिल्या जातात, ते स्वतः भावनिक पातळीवर ताण अनुभवतात, आणि कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टी त्यांच्या वैयक्तिक ग्रोथ साठी अडथळा ठरतात. 

2. Defensive Behavior: संरक्षणात्मक पवित्रा
बऱ्याचदा अशा व्यक्ती कुठे ना कुठेतरी स्वतःच्या वागण्याचे समर्थन करत असताना त्या गोष्टींचा दोष इतरांवर टाकणे किंवा सरळ सरळ गोष्टी धुडकावून लावणे, शिवाय दुर्लक्ष करणे अशा पद्धतीने रिस्पॉन्स देतात.  अशा वागण्यामुळे कुठे ना कुठेतरी अशा व्यक्ती स्वतःला एकटं ठेवण्याकडे वळतात आणि त्यामुळे गैरसमज अजून वाढतात. 

3. Emotional Reactivity: भावनिक पातळीवर प्रतिसाद - 
समोरच्या व्यक्तीचे वागणे स्वतःवर ओढवून घेतल्याने बऱ्याचदा अशा व्यक्तींकडून ज्या भावनिक प्रतिक्रिया दिल्या जातात, त्यामध्ये राग येणे, वाईट वाटणे, टोकाची अस्वस्थता आणि एखाद्या व्यक्तीच्या किंवा प्रसंगाच्या समोर येण्याने ट्रिगर होणे हे दिसून येते. 
बऱ्याचदा या सगळ्या गोष्टी मनात असलेल्या इन्सिक्युरिटीज आणि भरून न आलेल्या भावनिक जखमा यांच्याकडे बोट दाखवत असतात. 

मग लोकांचं वागणं आपण स्वतःशी जोडून घेऊ नये किंवा स्वतःवर ओढवून घेऊ नये म्हणून नेमकं काय करायचं??? 
१. दृष्टिकोन बदलणे आवश्यक असते 
आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल असुरक्षितता, निश्चित केलेला दृष्टिकोन, आणि त्यांचे स्वतःचे मत असू शकते हे आपल्याला समजायला हवे. या गोष्टी कधी होतात? तर जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला त्याच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण वेगळ्या दृष्टिकोनातून परिस्थितीकडे बघण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा नकळतच आपल्याला आपल्यासमोर आलेल्या समस्यांवरती उपाय सापडतात. शिवाय आपण इतरांकडे आणि स्वतःकडे सुद्धा तटस्थपणे बघू शकतो. यानंतर कुठे ना कुठेतरी इतरांसोबत आपली नाती सुधारण्यासाठी आपल्याला मदत होते, शिवाय इतरांसोबत होणारे वाद सुद्धा सोडवता येतात. 

२. Boundary Setting / नात्यांची मर्यादा निश्चित करणे...
ज्या नात्यांमध्ये बऱ्याचदा वितुष्ट येते किंवा वाद होतात, अशा नात्यांमध्ये मर्यादा ठरवून घेणे खूप जास्त गरजेचे असते. नात्यांमध्ये मर्यादा ठरवून घेतल्यामुळे कुठे ना कुठेतरी त्या नात्यांमध्ये संवाद वाढीस लागतो आणि गोष्टी पर्सनली घेण्याबद्दल जी मानसिकता असते त्यामध्ये फरक पडतो. 
आपल्याला नेमकं काय हवं आहे हे योग्य वेळी स्पष्ट केल्यामुळे कुठे ना कुठेतरी दोन्ही बाजूच्या व्यक्ती एकमेकांशी आदराने आणि समजूतदारपणे वागू शकतात. 
नात्यांमध्ये मर्यादा निश्चित केल्यामुळे त्या नात्यांमधून मिळणाऱ्या समाधान आणि इतर गोष्टींमध्ये सुद्धा फरक पडतो. 

३. Growth Mindset, 
आपण आपली मानसिकता म्हणजेच माइंडसेट बदलत असताना जर ग्रोथ माईंडसेट वरती काम करायला सुरुवात केलं तर कुठे ना कुठेतरी आपल्याला आपले अपयश वैयक्तिक पातळीवरती स्वीकारणे सोपे जाते. जेव्हा आपल्यामध्ये भावनिक लवचिकता वाढीस लागते तेव्हा इतरांकडून येणारी टीका आणि मिळणारे फीडबॅक सुद्धा आपण शांतपणे स्वीकारू शकतो. त्या व्यतिरिक्त व्यक्तीला बाहेरून कुठल्याही प्रकारे मोटिवेशन ची गरज पडत नाही.  तो स्वतः स्वतःला कुठल्याही परिस्थितीमध्ये मोटिवेट करू शकतो. पण हे सर्व कधी घडते??  जेव्हा तो ग्रोथ माईंडसेटच्या दिशेने प्रयत्न करतो. 

४. Practice Mindfulness / जागरूकता - 
मांडफुलनेस ची प्रॅक्टिस करत असताना मेडिटेशन किंवा सेल्फ रिफ्लेक्शन वरती भर दिला गेल्याने व्यक्ती स्वतःचे विचार आणि त्याच्या भावना यांच्या बद्दल जागरूक होतो. इतरांशी वागत असताना, त्यांना प्रतिसाद देत असताना कुठे ना कुठेतरी आपल्या मनातली भीती आणि ट्रिगर्स या दोन्हीला हाताळत तो प्रतिसाद देऊ शकतो. 
माइंडफुलनेस प्रॅक्टिसमुळे व्यक्तीला भावनिक पातळीवरती स्वतःच्या व्यक्त होण्यावर लक्ष केंद्रित करता येते. 

५.  Challenge Negative Beliefs/ नकारात्मक विचारांना दूर करणे. 
आपल्या मनात येणारे नकारात्मक विचार वेळीच ओळखणे आणि त्यांना दूर करण्यासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा तेवढेच गरजेचे असते. नकारात्मक विचार दूर करत असताना बऱ्याचदा आपल्याला परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघत वास्तविक पद्धतीने मूळ समस्येवर लक्ष केंद्रित करावे लागते. भावनिक पातळीवर कुठल्याही गोष्टीला प्रतिसाद देणे थांबवण्यासाठी हे खूप जास्त गरजेचे असते. 
यामध्ये आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना पुन्हा पुन्हा रिफ्रेम करणे आवश्यक असते. शिवाय आपण नकारात्मक विचारांच्या कोणकोणत्या पॅटर्न्स ना सातत्याने रिपीट करतो हे सुद्धा ओळखणे गरजेचे असते. 

६. तज्ञांची मदत घेणे...
जेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या पातळीवर सोडवता येत नाहीत, तेव्हा योग्य वेळी योग्य व्यक्तींची मदत मागणे गरजेचे असते. 

तात्पर्य - 
गोष्टी स्वतःवरती ओढवून घेण्यामध्ये  बऱ्याचदा परिस्थिती, नाते,  आजूबाजूच्या व्यक्ती आणि काही मानसिक गोष्टी सुद्धा समाविष्ट असतात.  ज्यांचा व्यक्तीच्या भावनिक लवचिकतेवरती आणि त्याच्या स्वतःच्या अस्तित्वावरती प्रभाव पडत असतो. 
हे सगळं समजून घेताना आपल्याला आपल्या मनातील चुकीच्या समजुती, स्वतःबद्दल असणारे काही ग्रह आणि इतरांसोबत आपले असणारे वर्तन या सगळ्यांच्या बाबतीत काम करावे लागते. 
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींसोबत आपले नाते सुधारण्यासाठी आणि स्वतः सोबत सुद्धा आपले वागणे सुधारण्यासाठी आपण स्वतःच्या विचारांच्या पद्धती, आपली तत्वं, आपली मानसिकता म्हणजेच माइंडसेट याबाबतीत सेल्फ रिफ्लेक्शन पद्धत वापरणे खूप जास्त गरजेचे असते. कारण त्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये काय बदल करता येतील हे लक्षात येते. 
एक गोष्ट लक्षात घ्या कुठल्याही मानसिक त्रासाच्या बाबतीत सगळ्यात आधी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू करते, तेव्हा तिला तिच्या आयुष्यात अपेक्षित असे बदल हळूहळू दिसू लागतात. 

तर अशा पद्धतीने why do I take things personally आणि स्वतःकडून गोष्टी पर्सनली घेतल्या जाऊ नयेत म्हणून  काय उपाय करावे या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. 
बाकी ? 
बाकी बऱ्याच गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्ती परत्वे वेगवेगळ्या असू शकतात. शिवाय प्रत्येकाची परिस्थिती सुद्धा वेगवेगळी असते. पण ते पुन्हा कधीतरी.... तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे...
स्वतःला शोधताना _ गौरी हर्षल 1 / 2025 
गौरी हर्षल कुलकर्णी 
एम ए क्लीनिकल सायकॉलॉजी आणि समुपदेशन

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२५

कालाय तस्मै नमः (भाग १२ ते १५)

कालाय तस्मै नमः| भाग १२

जाणीव स्व अस्तित्वाची


एकीकडे माई आणि काका स्वराला भविष्यात येणाऱ्या गोष्टीवर मात करण्यासाठी तयार करत होते. तर दुसरीकडे अजूनही कुणीतरी स्वराच्या मदतीसाठी तयारी सुरू केली होती. 


भविष्यात असे काय घडणार होते? त्याची झलक स्वरा सात वर्षाची झाली तशी जाणवू लागली.


 एके रात्री अचानक ती झोपेत दचकली. माई शेजारीच झोपल्या होत्या त्यामुळे त्यांना पटकन ते जाणवले. तसे त्यांनी घाबरलेल्या स्वराला जवळ घेतले ती तशी अजूनही झोपेतच होती. पण बडबडत होती. माईंनी नीट कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला तसे काही अस्पष्ट शब्द त्यांना ऐकू आले, तिकडे जाऊ नको अस काहीसं. त्या काही विचारणार तेवढ्यात स्वरा कूस पालटत त्यांच्या कुशीत शिरून झोपून गेली. 


सकाळी उठल्यावर त्यांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीच आठवत नव्हते. स्वरा दुपारी शाळेतून घरी आली तशी नेहमीप्रमाणे माईंच्या खोलीत आली नाही म्हणून माई तिला शोधत तिच्या खोलीत गेल्या. तर ती दप्तर एकीकडे टाकून गुढघ्यात तोंड घालून मुसमुसत कोपऱ्यात बसली होती. तिच्या डोक्यावरून हात फिरवत माईनी विचारले, “काय झाले राणूबाई?” तशी ती डोळ्यातलं पाणी कसंबसं थांबवत म्हणाली, “बघ ना ग माई. शाळेत सगळे चिडले माझ्यावर?” 


“का?” माईनी विचारले


“आम्ही न मधल्या सुट्टीत खेळत होतो. तर ती रचना झाडावर चढायला लागली. सगळे तिला चियर करत होते, पण मला काय झालं काय माहिती मी तिला नको चढू खाली उतर म्हणत होते. आणि मग अचानक मला वाटले की ती पडणार आहे म्हणून मी तिला खाली उतरविण्यासाठी पुढे जात होते तर सगळ्यांनी मला मागे ओढून तिथून जा असे सांगितले. मी गुपचूप लांब जाऊन उभी राहिले. आणि तिकडे बघतच होते तर रचना पडली तिला खूप लागले. मग बाई येऊन सगळ्यांना ओरडत होत्या तर सगळ्यांनी माझंच नाव घेतलं. पण मी तिथे नव्हते हे बाईंना माहीत होतं म्हणून त्या मला काहीच म्हणाल्या नाहीत उलट बाकीच्याना रागवल्या.  तर सगळ्यांनी आता मला तू आमच्यात येऊ नको असं सांगितलं.” 


“असं झालं होय,” माई तिला शांत करत म्हणाल्या. स्वरा मात्र अचानक काहीतरी आठवल्यासारखं माईना म्हणाली, “माई मी रात्री झोपेत न असंच काहीतरी बघितलं ग.” माईंना ती काय सांगतेय ते समजलं,  पण तिने जास्त विचार करत बसू नये म्हणून तो विषय टाळण्यासाठी त्या तिला म्हणाल्या,  “अरु , (कधी कधी त्या तिला अरु म्हणून हाक मारायच्या तिलाही ते आवडत असे) मी तुझ्या आवडीचा चिवडा केला आहे. चल बरं, पटकन कपडे बदलून ये. सगळं जागेवर ठेव. आपण दोघी अंगणातल्या झोक्यावर बसून खाऊ या.” स्वरा हो अशी मान डोलवत आवरण्यासाठी गेली. दारात उभ्या असणाऱ्या काकांनी हे सगळं ऐकलं होतं. त्यांनी माईंना नजरेनेच शांत रहा असं खुणावले. ते दोघे जरी शांत राहिले असले तरी सत्य शांत नव्हतेच. 


रचनाची आई संध्याकाळी घरी आली होती स्वराचे आभार मानण्यासाठी. त्यांच्या रचनाच्या म्हणण्यानुसार ती स्वराचं ऐकून उतरण्यासाठी प्रयत्न करत होती तेव्हा घसरली. पण रचनाच्या आईलाही माहीत होतं स्वरा रचनाची किती जवळची मैत्रीण आहे ते. रचना त्यांचं एकुलते एक अपत्य होते ते ही १५ वर्षांनी झालेलं. त्यामुळे तिची जरा जास्तच काळजी असे त्यांना. स्वरावर माई काकांचे संस्कार असल्याने त्या रचनाला तिच्यासोबतच राहण्याची ताकीद देत असत. आणि म्हणूनच आज त्यांना वाटत होते की स्वरामुळे रचना वाचली. माई काका त्यांच्याशी जुजबी बोलले आणि त्या गेल्या.



 इकडे संगीता मात्र स्वरावर खूप चिडली होती. स्वरा खेळून झाल्यावर घरात आली तशी संगीता तिला ओरडू लागली. घाबरलेल्या स्वराला आपलं काय चुकलं हेच कळत नव्हतं. ती चुपचाप कोपऱ्यात उभी होती. माईंनी तिला आधी बोलू दिले आणि मग नेमका प्रकार सांगितला. त्यावेळेपुरते तरी  संगीताला सगळे समजले आहे असे माईना वाटले पण सत्य परिस्थिती नेहमीप्रमाणे वेगळीच होती. 


लहानग्या स्वराला आईबाबांना आपण का नकोसे आहोत हेच समजत नसे. पण अशाच वातावरणात ती स्वतःला स्ट्रॉंग ठेवायला शिकत होती. माई आणि काका दोघेही तिला सतत योग्य गोष्टीची जाणीव करून द्यायचे. 

स्वरा हळूहळू मोठी होत होती, तसतसे तिला येणारे अनुभवही वाढत होते. तिच्या आसपासच्या, जवळच्या एखाद्या व्यक्तींबद्दल जर काही वाईट अघटित घडणार असेल तर ते स्वराला समजू लागले होते आणि आता वयानुसार ती आपल्या स्वप्नांचा अर्थही समजून घेण्यासाठी प्रयत्न करत होती. माई एकीकडे तिला शारीरिक, मानसिक बळ मिळावे म्हणून प्रयत्न करत असत; तर दुसरीकडे काका तिच्या स्वप्नांमुळे तिला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत होते. 


एव्हाना आपण इतरांपेक्षा वेगळ्या आहोत ह्याची पुसटशी जाणीव तिला होऊ लागली होती. तिच्या जागी दुसरे कुणी असते तर ते शेफारून गेले असते पण  आपल्या वेगळं असण्याचा आईबाबांना त्रास होतो ही जाणीव तिला जास्त प्रमाणात त्रास देत असे. मग ह्या सगळ्या गोष्टी दूर ठेवण्यासाठी ती काकांना आणखी प्रश्न विचारत असे. काकांना कधी कधी उत्तरे देता येत नसत मग ते तिला म्हणत की तू तुझे प्रश्न एका ठिकाणी लिहून ठेव आणि तुझा मोठा काका आला न की त्याला विचार. हा सल्ला मात्र स्वरा पाळत होती. अशातच एके दिवशी श्रीपादने तो परत येतो आहे असे सांगितले. 


श्रीपाद येणार म्हणून माईंना जास्तच आनंद झाला होता. तसा तो वर्षातून एकदा चक्कर मारतच असे पण आता तो कायमचा येणार होता. स्वराही आता  बरीच मोठी झाली होती. तिला काही गोष्टी समजावून सांगत तिची शक्ती योग्य दिशेने वळवणे खूप गरजेचे होते. त्यासाठीच तो परत येणार होता. पण तो एकटाच येणार नव्हता, त्याच्या सोबत अजूनही कुणीतरी येणार होते ज्याच्या येण्याने स्वराच्या प्रश्नांची उत्तरे तिला मिळणार होती. 


आणि अजून एक छानसे सरप्राईज ही तिच्यासाठी वाट बघत होते. 


श्रीपादच्या येण्याचा दिवस जवळ येत होता तशी का कुणास ठाऊक स्वराची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कोण येईल काकासोबत?   


इकडे श्रीपादने गेल्या काही वर्षात स्वराबद्दलची प्रत्येक गोष्ट नीट लक्षात ठेवून काही गोष्टी ठरवल्या होत्या. ती जसजशी मोठी होणार होती तसतशी तिला तिच्या कडे काय आहे त्याची जाणीव होणार होती. पण त्या गोष्टीचा ओघ चांगल्या दिशेने जाण्यासाठी काय करावे हे त्याने फार पूर्वीच ठरवले होते. आणि ते नकळतच माई अन् काकांकडून करूनही घेतले होते. 


स्वरावर सकारात्मक संस्कारांचा पगडा इतका जबरदस्त बसला होता की आता ती चुकूनही वेगळ्या वाटेकडे वळणार नव्हती. हो पण छोट्या छोट्या गोष्टी आपण इच्छा केली तर घडतात हे आताशा तिला कळू लागले होते. पण ते सगळे तिने  फारच निष्पाप पणे येऊन काकांना सांगितले आणि त्यांनी श्रीपादला. त्यावेळी तो फक्त हसून काकांना म्हणाला विद्यार्थी तयार होतोय आता त्याच्या कसोटीचा क्षण लवकरच येईल. ह्या कसोटीच्या क्षणी तिला पाठिंब्याची गरज पडेल तो खंबीर पाठिंबा तिला एक कसलेला खेळाडूच देऊ शकतो. त्यालाही मी घेऊन येतोय. 



कोण आहे तो? सुज्ञ वाचकांना अंदाज आला असेलच. बरोबर तो म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून श्रीपाद- अरुंधतीचा ‘कैवल्य’. 


स्वरा फक्त त्याला नावाने ओळखत होती. कारण तो तिच्या बारश्यानंतर परत आला होता. पण तो जेव्हा जेव्हा आला तेव्हा स्वरा घरी नसल्याने तिने त्याला पाहिले नव्हते. ती कधी तिच्या आजोळी होती तर कधी तिच्या काकू किंवा आत्याकडे. 


कैवल्यही नंतर त्याच्या शिक्षणात गुरफटला कारण त्याला फक्त औपचारिक गोष्टींचं शिक्षण नव्हतं घ्यायचं.  खरे तर तो बऱ्याच गोष्टी शिकत होता.  



स्वरा आणि कैवल्यमध्ये एक बंध होता जो ह्या भेटीने अजून मजबूत होणार होता. 


तिकडे ललिता आपली भूमिका तशीच पार पाडत होती. माई काकांनी तोंड बंद ठेवल्याने त्यांना वाटेतून बाजूला करण्याची गरज तिला वाटली नव्हती. पण इथेच ती चुकली होती. ती ह्या गैरसमजात राहिली की तिचं कारस्थान कुणालाही समजलं नाहीये पण प्रत्यक्षात ती आणि तिचे दोन्ही साथीदार आता नियतीच्या जाळ्यात अलगद अडकले होते. त्याचे परिणाम जाणवत असूनही ते मान्य करण्याचे धैर्य मात्र त्या तिघांपैकी कुणाकडेही नव्हते. 


पण आता त्याच्यामधला जो सगळ्यात जास्त कच्चा खेळाडू होता तो मागे फिरू बघत होता. कोण असेल तो? 

__________________________________

कालाय तस्मै नमः|भाग १३

कैवल्यचे आगमन

श्रीपाद येणार म्हणून माई त्याच्या आवडीचे काय काय पदार्थ करायचे ह्या विचारात दंग होत्या. तेवढ्यात कुणीतरी मागून येऊन अलगद त्यांचे डोळे झाकले. माईंनी त्या हातावरून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण काही समजेना.  तेवढ्यात ज्याने डोळ्यावर हात ठेवले तो जोरजोराने ओरडू लागला, कुणीतरी त्याला मागून झाडूने मारले होते. 


माईंनी वळून बघितले तर एक ताडमाड उंच तरुण मुलगा पाठमोरा उभा होता. हातात झाडू घेऊन स्वरा त्याच्या मागे लागली होती. तिला वाटले की तो माईला काहीतरी करत आहे. ती पुन्हा त्याच्या मागे धावू लागली तसा तो माईंच्या मागे जाऊन लपला आणि म्हणू लागला, “माई थांबव ग तिला. किती मारतेय ती.” माईंनी हसत हसत स्वराला सांगितले की अग तो तुझा काऊ दादा आहे. तशी डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत ती म्हणाली, “मग त्याला सांगता येत नव्हतं का ते?” 


हसत हसत कैवल्य तिच्या जवळ गेला आणि तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाला, “तू मला संधी दिली का बोलण्यासाठी? ते ही जाऊदे, तू माझं सरप्राईज पण खराब केलंस. माई मला ओळखते की नाही हे बघत होतो मी, पण त्याआधीच तू मला मारत सुटलीस.” 


“अरे, पण मला काय माहिती तू आहेस ते? मला वाटलं,” तिला मधेच थांबवत तो म्हणाला, “की चोर आहे न? डिटेक्टिव्हगिरी कधी बंद करणार तू? अजूनही तशीच आहेस. आणि चोर सगळं घर सोडून म्हाताऱ्या लोकांसोबत लपाछपी खेळेल का? डोकं नीट तरी वापरत जा गं,” तसे सगळेच हसू लागले. ते बघून स्वरा गाल फुगवून पाय आपटत आत निघून गेली. 


“असू दे येईल थोड्या वेळाने ती स्वतःच. तू येणार आहेस हे का कळवलं नाहीस पण? आणि बाबा कुठे आहे तुझा?”  काकांनी त्याला विचारलं.


“अहो आजोबा, बाबा उद्या येणार आहेत ते कामात अडकले होते.  आम्ही दोघे वेगवेगळ्या ठिकाणी होतो. मधल्या स्टेशनवर भेटून एकत्र येणार होतो. पण माझं काम संपलं, मग मीच बाबांना म्हणालो की मी पुढे जातो.” कैवल्य माई आणि काकांना नमस्कार करत म्हणाला. 


"कसे आहात काका काकू?", विचारत त्याने भास्कर संगीतालाही नमस्कार केला. आणि इकडे तिकडे तो बघतच होता तेवढ्यात फुगा झालेल्या स्वराने उत्तर दिलं, "दादा नाहीये घरात तो गेला भटकायला.",आणि डोळे मिचकावले. 


तशी संगीता तिच्यावर चिडली,तू  का ग सारखी त्याच्या मागे पडतेस? ती पुढे काही बोलणार तेवढ्यात काका घसा खाकरत म्हणाले, "तुमचं रोजचंच आहे. तो प्रवासातून आला आहे आधी त्याला काय हवं नको ते बघा."


काकांनी जबरदस्ती विषय थांबवला हे कैवल्यच्या लक्षात आलं पण तो त्यावेळी गप्प बसला. आता आलोच आहोत तर कळेल हळूहळू असा विचार करत फ्रेश होण्यासाठी आतमध्ये गेला. 


स्वराला वाईट वाटले, पण ती चुपचाप मान खाली घालून आईला मदत करू लागली. जमेल तेवढी कामं करून ती कॉलेजसाठी बाहेर पडली. ह्या वर्षी कॉलेजच्या पहिल्या वर्षात होती ती. वयाच्या पेक्षा जास्तच समंजसपणा तिच्याकडे होता त्यामुळे बऱ्याच गोष्टी ती ऐकून घ्यायची. पण तिच्या उलट समीरच्या बाबतीत घडत असे. त्याला मुलगा म्हणून मोकळीक तर होतीच पण तो चुकला तरी ते काकांपासून लपवण्यासाठी आईबाबा प्रयत्न करत असत. 


कैवल्यला आल्यापासून काका काकूंच्या स्वराबाबत वागण्यातला बदल दिसत होताच,पण रात्री तो काकांच्या सोबत बोलत होता तेव्हा त्यांनीही त्याला सगळं सांगितलं. त्याला कळलं स्वराने इतक्या कमी वयातच आपल्या सारखंच बरंच काही बघितलं, अनुभवलं आहे. तो स्वराशीही बोलण्यासाठी तिच्या खोलीकडे गेला. दरवाजा फक्त ढकलला होता बंद नव्हता त्यामुळे आत काहीतरी गडबड आहे हे त्याला जाणवलं. तो आत गेला तसे त्याने बघितले स्वरा एका कोपऱ्यात मुसमुसत बसली होती. त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तसे तिने वरती बघितले.


 तिचा मूड चेंज करण्यासाठी तो म्हणाला, “बापरे आज पाऊस पडणार बहुतेक.” तसं थोड्याशा रागात तिने त्याच्याकडे बघितले आणि म्हणाली, “तुला भिजायचं आहे का काऊ दादा?” तिच्या आवाजातला बदल जाणवून तो जरासा चमकला. पण तिला ते जाणवू न देता तो म्हणाला, “हो पण कस काय होणार ना?” तशी ती त्याच्याकडे न बघता म्हणाली, “आत्तापासून दहाव्या मिनिटाला पाऊस पडतो की नाही बघ. स्टॉप वॉच लाव.” आणि गॅलरीत जाऊन उभी राहिली. कैवल्यला अस काही होणार ह्याचा अंदाज होताच त्यासाठीच तर तो आला होता. 

“स्वरा तुला कुणी सांगितलं की नाही माहीत नाही पण सांगतो,” 


त्याचं वाक्य मधेच तोडत स्वरा म्हणाली, “माहिती आहे मला मी तुझ्या आईसारखी म्हणजे अरुंधती मावशीसारखी दिसते. ह्याच गोष्टी मुळे कुणी मला जवळ करत नाही. सगळे राग राग करतात माझा. मग मी असं काहीतरी करते.” असं म्हणत तिने हात लांब केला. पावसाचे टपोरे थेंब तिच्या ओंजळीत विसावले होते. 

“बास झालं,” तो जरा रागातच म्हणाला तशी ती दचकली. “हेच जे करायचं नाही ते करतेस तू म्हणून मग अजून चिडचिड सहन करावी लागते सगळ्यांची तुला. तू हे करतेस त्याचा उलटाही परिणाम होतो ग,” तो कळवळून सांगत होता. 


तिने प्रश्नार्थक चेहरा केला तसा कैवल्य म्हणाला, “स्वरा प्रत्येक गोष्टीचे दोन परिणाम होतात. चांगले आणि वाईट. आता तू चिडलीस तुझा राग तू तुझी ताकद वापरून निसर्गावर काढलास. तुला बरं वाटलं. पण ह्या थेंबासोबत तुझ्या वाईट विचारांचे व्हायब्रेशन सगळीकडे गेले. ज्यांना ज्यांना ह्या पावसाचा सामना करावा लागला आता ते सगळे तुझा राग दुसऱ्या कुणावरतरी काढतील. म्हणजे झालं काय जी गोष्ट कमी करायची होती ती नकळतच अनेक पटीत वाढवून अनेक जीवांना नुकसान पोहोचवणार.” 


“मग आता?” स्वरा


“आता काय येत्या दोन दिवसात तुझं ट्रेनिंग सुरू करतोय मी.  पण त्या आधी मला तुझी तयारी किती आहे ते बघायचे आहे. आणि मला शिकताना दुर्लक्ष केलेलं चालणार नाही कळलं?”  कैवल्य


“हो , पण दादा मला कसली कसली स्वप्नं पडतात, कधी कधी ती खरी होतात, त्याचं काय?” स्वरा


“एकदा तुझा हा वेगळा अभ्यास सुरू झाला की कळेल तुला हळूहळू आणि मग त्याच काय करायचं तेही समजेल. आता खूप उशीर झाला आहे झोप. आपल्या अभ्यासासोबतच तुला कॉलेजचा अभ्यासही करायचा आहे. त्यात हयगय नकोय मला. चल गुड नाईट झोप शांतपणे.” असे म्हणून कैवल्य त्याच्या खोलीत निघून गेला. 


कसला अभ्यास करावा लागणार आता ह्या विचारातच स्वराला झोप लागली. 


मध्यरात्री ती नेहमीप्रमाणे दचकून उठली. स्वप्नांत तिला तिची ललिता काकू, श्रीधर काका आणि अश्विनी काकू एका पाठमोऱ्या उभ्या बाईला काहीतरी करत आहेत असे दिसले. स्वप्नातच त्या बाईचा चेहरा बघण्यासाठी ती पुढे सरकली. तेवढ्यात ती स्त्री मागे वळली. स्वरा तो चेहरा बघून जागीच थबकली. तो चेहरा दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून तिचाच होता. पण ती स्त्री वयाने खूप मोठी होती. 


ती त्या तिघांकडे वळून म्हणाली, “मी तुम्हाला ह्या आधी माफ केले आहे. पण आता इतकी शिक्षा भोगत असतानाही जर तुम्ही पुन्हा तेच करणार असाल तर मात्र तुमचे खूप वाईट हाल होतील.” असे म्हणून तिने अश्विनीच्या पायाकडे बघितलं आणि हसली.


 अचानकच तिचं लक्ष स्वराकडे गेलं तसं प्रचंड प्रेमाने भरलेल्या डोळ्यांनी ती स्वराकडे बघू लागली. स्वराला मात्र भीती वाटत होती. ती जसजशी स्वराकडे सरकू लागली तसतशी स्वरा अजूनच घाबरली. तिला दरदरून घाम फुटला, जागचे हलता येईना. आणि ती दचकून उठली. उठून इकडे तिकडे बघितले तर माई तिच्याकडेच बघत होती. माईंनी नेहमीप्रमाणे काही प्रश्न न विचारता तिला पिण्यासाठी पाणी दिले आणि तिला कुशीत घेत त्या थोपटू लागल्या. थोड्या वेळात स्वराला गाढ झोप लागली. मग मात्र तिला सकाळीच जाग आली तेही कैवल्यच्या उठवण्याने. 


त्याने तिच्या तोंडावर पाणी शिंपडून तिला उठवले अन् मग दोघांची मस्ती सकाळी सकाळी सुरू झाली. सगळं आवरून तो तिच्यासोबत त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजे मंदिरात आला.लहानपणी ही त्या मंदिरात येऊन ते दोघे तासनतास एका ठिकाणी बसून राहायचे अर्थात वेगवेगळे. ना रांगेत जाऊन दर्शन ना कुणाशी बोलणं फक्त तिथलं वातावरण आवडायचं म्हणून.


 कैवल्य ने त्याच्या येण्याचं कारण सांगितलं. स्वरा म्हणाली, “दादू मलाही हेच वाटत होतं, म्हणून मीही इथेच येऊन बसते नेहमी. किती छान योगायोग आहे हा.” तसा कैवल्य गालातच हसला आणि म्हणाला, “योगायोग नाही हा आपल्या दोघांमधला धागा आहे जो आपलं नातं अजून घट्ट बनवतो. ते सोड तू मला रात्रीबद्दल काहीतरी सांगणार होतीस.” 


“अरे हो, मला न स्वप्न पडलं,” असं म्हणत स्वराने सगळं काही त्याला सांगितलं आणि त्याच्याकडे उत्तराच्या अपेक्षेने बघू लागली.  


तो म्हणाला, “स्वरा जेव्हा कुणीतरी अशी व्यक्ती जी आपल्या आयुष्याचा भाग होती, पण आता अस्तित्वात नाहीये. अशा पद्धतीने दिसते तेव्हा ती काय सांगते ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत जा. मी असं नाही म्हणत की तुझं सगळं स्वप्न खरं आहे. त्यात काही प्रमाणात मनाचा खेळ असणारच, पण त्यातला मुख्य भाग शोधून काढून त्यावर लक्ष केंद्रित करायलाच तुला शिकायचे आहे. आज बाबा येत आहेत त्यांची परवानगी मिळाली की उद्यापासून मी तुला काही छोट्या छोट्या गोष्टी शिकवतो. मी ह्या गोष्टी माझ्या गुरुकडे शिकलो. अर्थात मला हे सगळं शिकवायचंच असा माझ्या आईचा आग्रहच होता. त्यामुळे मी लहान असताना ती स्वतः माझ्या स्वप्नात येऊन खूप गोष्टी मला शिकवायची. त्यामुळे असेल कदाचित पण मला स्वप्नांची भीती वाटत नाही. मग ते कितीही भीतीदायक का असेना. हं तर मॅडम, हा आपल्या आयुष्यातील एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही. त्यामुळे ह्यातील कोणत्या गोष्टी कुणाजवळ आणि किती प्रमाणात शेयर करायच्या हेही तुला कळेल हळूहळू. ” दोघेही घरी आले.घरातील वातावरण जास्तच तणावाचे वाटत होते. 


कैवल्यने विचारले, “काय झालं?” 

तसा भास्कर म्हणाला, “अरे तुझ्या धाकट्या काका काकूंचा (म्हणजे अशोक आणि अश्विनी) अपघात झाला आहे. काका सिरीयस आहे आणि काकुचे दोन्ही पाय कदाचित ..” पुढे त्याला बोलवेना. कैवल्यने वळून स्वराकडे बघितलं. तिच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती तरळत होती. 


तेवढ्यात श्रीपादचा फोन आला की तुम्ही निघण्याची घाई करू नका. मी तडक तिकडे जातो आणि मग परिस्थिती बघून तुम्हाला सांगतो. श्रीपाद स्वतः जातो आहे म्हटल्यावर माई काकांच्या जीवात जीव आला. पण त्याला लवकर काय ते कळव असे दोनचारदा बजावून सांगतच त्यांनी फोन कैवल्यकडे दिला. 


श्रीपाद कैवल्यला म्हणाला, “जे काम मी आल्यावर सुरू करायच होतं ते तू आजच्या आज सुरू कर. ती खूप गोंधळून जाणार आहे पुढच्या काही काळात. तिला फक्त आणि फक्त तूच सांभाळू शकतोस. आणि हो तिच्यामार्फतच आपण अरुला शांत करू शकतो. हे लक्षात ठेव त्यामुळे ती चिडून जाऊन काही करेल अशी वेळ येऊ देऊ नकोस.”


“ठीक आहे बाबा. मी घेतो सगळ्यांची काळजी तुम्ही नका टेन्शन घेऊ,” असे म्हणत कैवल्यने फोन ठेवला.


दुपारी उशीरा श्रीपादचा फोन आला त्याने सांगितलं की अशोकचा धोका टळला आहे पण काही दिवस त्याला दवाखान्यात ठेवून घेतील. आणि अश्विनीचे पाय थोडक्यात वाचले आहेत पण २ महिने तरी प्लास्टर असेल. हे सगळे कसे काय घडले? ते दोघे गाडीतून जात होते समोरून आलेल्या ट्रकला बघून गाडी वळवण्याचा प्रयत्न अशोक करत असतानाच गाडी दुसरीकडे जाऊन धडकली. 


अश्विनीचे पाय अडकले होते त्यामुळे तिला जास्त लागले. अशोकला डोक्याला लागले होते पण तो लवकर शुद्धीवर आल्याने धोका टळला होता. हे सगळे सांगितल्यावर श्रीपाद म्हणाला की मी उद्या तिकडे येतो मुलांजवळ थांबतो मग तुम्ही चौघे इकडे या. तोपर्यंत श्रीधर-मंदा, विजय-ललिता आहेतच इथे. स्वराने इतक्यातच कुणाच्या समोर येऊ नये असे त्याला वाटत असल्याने मुलांना नको ते वातावरण म्हणून त्याने विषय बंद केला होता. 


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच तो आला. संगीताने घरात सगळं करून ठेवले होते आणि स्वराला सूचनाही दिली. तसा श्रीपाद म्हणाला, “अग आम्ही बापलेक चांगला करतो स्वयंपाक तू कशाला त्या बिचारीला इतकं टेन्शन देतेस.” संगीता हसून त्याला म्हणाली, “दादा तिलाही सवय हवी न. माई काकांच्या मुळे भरपूर लाड होतात तिचे. बर आम्ही निघतो आता संध्याकाळी किंवा सकाळी येऊ परत. समीर येतो म्हणतोय तर त्याला घेऊन जातो. नाहीतर ह्या दोघांची भांडणं तुम्हाला सोडवत बसावी लागतील.”


"ठीक आहे.", असं म्हणत श्रीपाद स्वयंपाक घरातून बाहेर पडला. समीरचे जाणे त्यांच्यासाठी उपयोगीच होणार होते. 

स्वराला कुठल्याही गोष्टीचा व्यत्यय न येता बऱ्याच गोष्टी सांगता येणार होत्या. 

सगळ्यांना निरोप देऊन तो देवघरातील पादुकांसमोर येऊन उभा राहिला. मनात शब्द उमटले, शेवटची लढाई आहे ही. स्वतःच्याच माणसांविरुद्ध. ह्यात यश मिळू दे असं तरी कसं म्हणू. एकच मागतो ज्याच्यासाठी जे योग्य आहे ते घडू दे. तू खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा रहा. ह्या मुलांना त्यांचा मार्ग सापडू दे. 

 सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक विचार, सकारात्मक लोक ह्यांचं अनुकरण करा. जगाला खूप गरज आहे चांगल्या माणसांची तुम्हाला कुणी भेटलं नसेल तर स्वतःच कुणासाठी तरी चांगला माणूस होण्यासाठी प्रयत्न करा. आपल्याला काय आवडतं ते दुसऱ्यांवर लादण्यापेक्षा इतरांचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो हे मान्य करण्याचा प्रयत्न करा. 

__________________________________

कालाय तस्मै नमः|भाग १४

साधनेतील संकेत 


थोड्याच वेळात माई, काका, भास्कर, संगीता आणि समीर गाडी घेऊन अशोक-अश्विनी ला बघण्यासाठी निघून गेले. 


काल फोनवरच श्रीपादने कैवल्यला काही सूचना दिल्या होत्या, त्या प्रमाणे कैवल्य ने स्वराला काय काय येते ते बघण्यासाठी साधनेच्या खोलीत बोलावले होते. तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्तच अभ्यास तिचा आहे. हे बघून नकळतच त्याच्या मनावरचं एक ओझं उतरलं. कारण आता बाकी सगळे समजवताना फारसा संदर्भ द्यावा लागणार नव्हता. 


श्रीपादला आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बद्दल त्याने कल्पना दिली होती. त्यानुसार आता ते तिघेही साधनेसाठी त्या खोलीत आले. 


आपापल्या आसनावर बसण्याआधी त्यांनी स्वराकडे एक नजर टाकली. ती शांतपणे आतमध्ये आली आणि त्या उंच अशा तसबिरीजवळ जात तिने डोके खाली टेकवून नमस्कार केला अगदी अरुंधतीप्रमाणेच. त्यानंतर ती त्याच जागी जाऊन बसली जिथे अरुंधती बसत असे. स्वराच्या रुपात अरुंधतीचा अंशच जन्माला आला होता पण दोघींमध्ये एक मोठा फरक होता. 


अरुंधतीला आईवडील, कुटुंबाचे प्रेम ह्या पॉझिटिव्ह गोष्टी मिळाल्याने ती शांत समंजस अन् विशेष म्हणजे प्रेमळ होत गेली. ह्याउलट स्वराच्या वाटेला सतत नकारात्मक भावना आल्याने कधी कधी तिच्या रागाचा उद्रेक असा काही होत असे की तिच्यासोबतच इतरांनाही त्याची झळ बसे. पण तरीही तिचा मूळचा प्रेमळ समंजस स्वभाव कायम होता. मग रात्री तिला पडणारी अन् खरी होणारी स्वप्नं, त्यांचं काय? ह्यात सगळ्यात मोठा वाटा होता तो स्वराबाबत न थांबणाऱ्या कुरापतींचा. स्वराला नकळत अरुंधती तिचे रक्षण करण्यासाठी तिच्या आसपास असे त्यामुळे जेव्हा ह्या कुरापती वाढत तेव्हा जसा स्वराला त्रास होई तसा तो अरुंधतीलाही होई. त्यात स्वराच्या रागाला शांत करण्यासाठी अरुंधती सर्व काही स्वतःकडे घेत असे त्यामुळे होई काय स्वरा सुरक्षित होत असे, पण अरूधंतीची शक्ती जास्त असल्याने तिला येणारा क्षणिक रागही समोरच्याचे जास्त नुकसान करत असे. 


आता आपण अपघाताकडे वळू. ह्या अपघातात सगळ्यात जास्त इजा अशोकला झाली होती असे का हा प्रश्न होताच. तर अशोक आणि विजयची बायको ललिता हे दोघेच ह्या खेळाचे मास्टरमाइंड होते, त्या साधकाची ललिताशी भेट अशोकनेच घडवून आणली होती. का? कारण होतं श्रीपादबद्दल मत्सर.... 


अशोक लहानपणापासून उनाड होता त्यामुळे जसे इतर ठिकाणी व्हायचे तेच इथेही घडत असे. श्रीपादचा दाखला देऊन सतत त्याला सांगितले जायचे असा वाग तसा वाग. अडनिडे वय असताना हा राग नकळतच त्याच्या मनात घर करून गेला आणि पुढे पुढे त्याचे रूपांतर एका विषारी रोपात कसे झाले ते कुणालाही कळले नाही. 


पुढे जाऊन तोही आयुष्यात स्थिर झाला, पण राग तसाच मनात होता त्यात भर पडली ती विजयच्या बायकोमुळे – ललितामुळे. 


ललिताचा अहंकारी स्वभाव, अरुंधतीचा रागराग करणे ह्यामुळे अशोकला वाटले की जर काही करायचे ठरवले तर ही नक्की आपल्याला मदत करेल आणि झालेही तसेच. त्याचं सुदैव की दुर्दैव पण अश्विनी त्याच्या आयुष्यात आली आणि तीही स्वभावाने तशीच होती. 


ललिता आणि अश्विनीचे विचार इतके जुळले की अशोकला पडद्याआडून पुढे येण्याची गरज भासली नाही. कामे होत गेली. यश(?) मिळत गेले. नंतर श्रीधरही त्यात सामील झाला. 


विजयला आणि श्रीधरच्या बायकोला मंदाला हे सगळे काही काळाने माहिती झाले पण त्यांनी मूक संमती देत शांत रहाणे निवडले. ह्या सगळ्या लोकांच्या नकारात्मक विचारांमुळे ललिता आणि अश्विनीच्या कृतीला बळच मिळत गेले. त्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची अशी होती की त्या जी काही कृत्ये करत असत त्यात सातत्य होतं. खंड पडू नये म्हणून प्रयत्न केले जात. त्यामुळे वाईट शक्तीला सतत खाद्य मिळून ती अजून प्रभावशाली होत असे.



खऱ्या आयुष्यात ही असेच होते. वाईट वागणारे लोक सातत्याने तेच करत असतात त्याचं त्यांना फळही मिळतं. पण उलट चांगल्या लोकांच्या कुठल्याही कृतीत सातत्य नसते. कुठल्या तरी कारणाने खंड पडतो त्यामुळे यश मिळण्यासाठी उशीर होतो.  इथेही तेच झाले होते.


 असो तर अशा पद्धतीने वर्षानुवर्षे ते बऱ्याच कुरघोडी कधी अगदी लहानशा कुणालाही समजणार नाही अशा प्रकारच्या करत होते, पण आता मात्र त्यांचा प्लॅन मोठा होता. 


स्वराला वश करून घेऊन त्यांना तिच्याच हातून वाईट गोष्टी घडवून आणायच्या होत्या. हे जसे अरुंधतीच्या लक्षात आले तसा तिने त्यांना जीव वाचेल पण जिव्हारी लागेल असा फटका दिला होता. त्याचा परिणाम किती झाला आहे हे मात्र वेळच सांगणार होती. 


आपण भूतकाळात फेरफटका मारताना हेच सर्व प्रसंग स्वरूपात ध्यानासाठी बसलेल्या त्या तिघांनाही दिसले स्वरा, श्रीपाद आणि कैवल्यला. जागे झाल्यानंतर काही क्षण तिघेही स्तब्ध होते त्यांच्या सोवळ्या मनाला हे पटतच नव्हते की कुणी इतका राग मनात ठेवून असं कसं वागू शकते? पण जे काही होते ते सत्य होते आता त्या सहित पुढचे पाऊल उचलावे लागणार होते. 


तेवढ्यात त्या तिघांनाही पुन्हा डोळे मिटून घेण्याची आज्ञा झाली. तिघांनीही डोळे मिटून घेतले तसा एक सुगंध हवेत पसरला आणि आजूबाजूचे वातावरण बदलल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपले शरीर अगदी हलके होत असल्याची जाणीव त्यांनी झाली. 

   

  एक धीरगंभीर पण प्रेमळ आवाज खोलीत घुमू लागला, “मला माहित आहे की तुम्हाला ह्या कृतींमागचे कारण जाणून घ्यायची इच्छा आहे. पण इथे ठोस असे काही कारण नाही ह्या मधील काही गोष्टी ह्या तुमच्या आणि त्यांच्या पूर्वजन्मातील देवाणघेवाणीमुळे  घडल्या. तुमच्याकडून नकळत त्यांचे काही नुकसान झाले होते. आणि आता बाकी ते जे काही करत होते ते त्यांचे ह्या जन्मातील दुष्कर्म आहे." 


"योग्य वेळ आली की त्यासाठी त्यांना शिक्षा ही मिळणारच कदाचित ती आताच्या घटनेपेक्षा तीव्रही असू शकते किंवा सौम्यही असेल. त्याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही. हो पण जर त्या शिक्षेतून त्यांनी योग्य तो धडा घेतला तर त्यांचेच कल्याण होईल. पण तसे करण्यासाठी त्यांची स्वतःची तयारी हवी त्यामध्ये तुम्ही किंवा आम्हीही त्यांना जबरदस्ती करू शकत नाही."


"राहिली गोष्ट स्वराच्या शक्तींची तर त्याबाबत श्रीपादला योग्य सूचना मिळतील. त्यानुसार स्वराला साधनेत प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन करावे लागेल. स्वरा मला माहित आहे तू खूप दुखावली आहेस, पण  काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्या जशा आहेत तशा स्वीकारणे गरजेचे असते. ते करणे अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही. अजून काहीच वर्षे तुम्ही तिघेही ह्या कुटुंबाशी बांधील राहाल, त्यानंतर मात्र समाज नियमानुसार फक्त काही विशिष्ट प्रसंगीच तुम्हाला ह्यांच्या आयुष्यात डोकवावे लागेल. लवकरच तुम्हाला तुमचे कार्य कळेल. ते कुणाजवळ उघड करायचे कुणाजवळ नाही हे ही सांगितले जाईल." 


"जाता जाता एकच गोष्ट सांगतो, येणारा काळ हा तुमच्या कुटुंबियांना अवघड असणार आहे आणि तुम्हाला त्यात काहीही करता येणार नाही. तसा प्रयत्नही करू नका. शुभं भवतु!” असे म्हणत आवाज विरत गेला. 


 डोळे मिटून बसलेल्या स्वराला आपल्या डोक्यावर प्रेमाने फिरवलेला हात जाणवला आणि बऱ्याच वाईट क्षणांचं ओझं उतरून मन पिसासारखं हलकं झालं आहे अशी जाणीव झाली. 


सगळं कळल्यानंतर आलेला राग आता त्या सगळ्यांबद्दल वाटणाऱ्या दयेत बदलला होता. एकमेकांशी काहीही न बोलता ते तिघेही खोलीतून बाहेर पडले.


 स्वरा बागेतील झोक्यावर जाऊन बसली. श्रीपाद देवघराच्या दिशेने वळला. तर कैवल्य शांतपणे त्या खोलीतून बाहेर पडणाऱ्या त्या पुसट आकृतीकडे बघत होता. ती आकृती त्याच्या दिशेने आली आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले. तिच्याही डोळ्यात पाणी होते. जणूकाही ती त्याला डोळ्यांत साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. हळूहळू ती हवेत विरत गेली आणि दिसेनाशी झाली. होय ती अरुंधतीचीच आकृती होती. 


इकडे श्रीधरच्या मनात आता विचारांचे काहूर माजले होते. अशोक ची अवस्था पाहून त्याला भीती वाटत होती. त्याने ते ललिताजवळ बोलून दाखवले तशी ती चिडली आणि म्हणाली की आता असे मधेच मागे फिरता येणार नाही. नाहीतर आपण आमंत्रण देऊन बोलावलेली ती वाईट शक्ती आपल्यावरच उलटेल. हे ऐकल्यावर तर तो अजूनच घाबरला. पण दुसरा पर्याय त्याला दिसतही नव्हता त्यामुळे तो शांत बसला. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या अशोकला मात्र राहून राहून आता आपले कसे होणार ह्याबद्दल विचार सतावत होते. पण जित्याची खोड - म्हणजे इतकं सगळं घडूनही तो मार्ग सोडण्याची त्याची तयारी नव्हती. 


आता कुणी म्हणेल का? तर ह्या मार्गावर एका बाजूला त्यांना पैसा भौतिक सुख म्हणजे बंगला गाडी प्रॉपर्टी हे सगळे इतके मिळाले होते की त्यापुढे हा शारीरिक त्रास त्याना छोटा वाटत होता. व्यसनी माणसाला कस त्याचं व्यसन सुटत नाही तसेच. पण हे व्यसन पुढे जाऊन किती घातक ठरू शकते ह्याची अजून त्यांना कल्पना नव्हती. 


माई, काका आणि बाकीचे तिघेही त्यांना भेटून परत आले. आईवडील म्हणून माईकाकांना काळजी तर वाटतच होती पण प्रत्यक्षात आपल्या मुलांची वागणूक बघितल्यावर त्यांची मनं दुखावली गेली. कारण भेटण्यासाठी आपल्या वयाचा विचार न करता आलेल्या आईवडिलांशी नीट बोलण्याचे कष्टही त्यांच्या पैकी कुणी घेतले नव्हते. तशीच वागणूक भास्कर संगीताला ही मिळाली होती. पण सगळं काही गिळून आरामा साठी गावी या असे सांगून ते तिथून निघाले. 


वाटेतून येताना देवीच्या देवळात ओटी भरण्याची इच्छा माईंनी व्यक्त केली. तसे ते तिकडे गेले परतीच्या वाटेवर भास्कर संगीताला मात्र स्वराची उणीव पहिल्यांदा जाणवली. 


हा एक सुखद बदल होता. काकांनी मनोमनच देवीचे आभार मानले. त्यांना घरी पोहोचण्यासाठी बराच उशीर झाला होता. पण इकडे ह्या तिघांनी मात्र त्यांच्यासाठी मस्त जेवणाची तयारी करून ठेवली होती. सगळं काही स्वराने केलं आम्ही फक्त मदत केली हे जेव्हा कैवल्य म्हणाला तेंव्हा संगीताला लेकीचं फार कौतुक वाटलं ते तिला दाखवताही आलं नाही आणि लपवताही आलं नाही त्यामुळे तिचे डोळे भरून आले. 


तशी तिच्या गळ्यात हात टाकत स्वरा म्हणाली, “असू द्या हो मातोश्री, नका टेन्शन घेऊ .कुणाला काही होणार नाही माझं हातचं खाऊन.” तसे सगळे हसू लागले. आगाव कुठली अस म्हणत संगीताने तिला हसतच हलकासा धपाटा मारला.


 चला जेवू या सगळे अस म्हणत कैवल्यने समीरला मदत करण्यासाठी आत नेले. आईबाबांची बदललेली वागणूक बघून स्वराच्या चेहऱ्यावर हसू आले. 


त्या रात्री बऱ्याच गोष्टी बदलल्या. एकीकडे स्वराला आपली वेगळी वाट सापडली आणि त्या सोबतच काही सुखद अनुभव आले. तर दुसरीकडे ह्या उलट पडलेल्या डावापासून अनभिज्ञ अशा ललिता आणि अशोकच्या डोक्यात नवीन काहीतरी गडबड सुरू झाली. 


आता खेळ पूर्णपणे काळाच्या हातात गेला होता. त्यात कुठलेही बदल घडवणे ना प्याद्यांच्या हातात राहिले होते ना ही खेळणाऱ्यांच्या. 


पण श्रीपाद मागील भागात म्हणाला तस प्रत्येकासाठी योग्य काय आहे हे ठरले होते आणि आता ते घडणार होते. 


आणि तेच होते खरं तर.... 


आपल्या बाबतीत कुरघोड्या डावपेच करणाऱ्या व्यक्ती आपल्याला वरवर कितीही खुश दिसत असल्या तरी पडद्याआडचे चित्र काही वेगळेच असते. 


चांगल्या माणसांचं सगळं नेहमीच चांगलं होतं. फक्त त्या चांगल्याची व्याख्या वेगळी असते. 


तुम्हाला काय वाटते अशोक ललिताने ह्या अपघातानंतर काय करतील? त्यांच्या वागण्यात बदल घडतील की ते पुन्हा स्वराला त्रास देण्यासाठी नवीन मार्ग शोधून काढतील?

_______________________________

प्रतिक्रियांची वाट पहात आहे...


बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू !!! शुभं भवतु!!!

स्वतःला शोधताना गौरी हर्षल 


शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

90 दिवसांचे चॅलेंज म्हणजे काय?

90 दिवसांचे चॅलेंज म्हणजे काय? 
तुम्हाला कधी आपल्या डोक्यात विचारांची गर्दी झाली आहे असं वाटतं का? आणि मग नकळतच त्या विचारांच्या गर्तेत आपण अतिविचार करत आहोत हे जाणवतं का?? 

अशावेळी काय करायचं?
 कोणत्याही मानसशास्त्र तज्ञ आणि कौन्सेलर कडे जर तुम्ही गेलात तर ते तुम्हाला तुमच्या मनातले विचार कागदावर लिहून काढायचा सल्ला देतात. ह्याला सध्याच्या भाषेत brain dump अस म्हणतात. म्हणजे मनात, डोक्यात जो नको असलेल्या विचारांचा कचरा साठलेला असतो त्याला बाहेर काढणे. 

पण हे सहज जमते का? तर नाही ... 

म्हणून हे 90 दिवसांचे चॅलेंज... 

सगळ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा विचार करून मी काही प्रश्न तयार केले आहेत. काही टास्क सुद्धा आहेत. 
पण मुख्य काम मात्र लिहिण्याचेच आहे. 
सो थोडक्यात सांगायचे तर आपल्या मनात साठलेलं बाहेर काढण्याची ही एक योग्य पद्धत आहे. 
यासाठी नियम आहेत का? 
हो 
1. स्वतःच्या हाताने लिहिणं
2. कुणालाही न सांगता हे चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे. 
3. सातत्य राखण्यासाठी प्रयत्न करणे. 
बास एवढच!!! 
90 दिवसांनंतर एकदा का तुमच्या मनाला मेंदूला सवय झाली की मग ही गोष्ट तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होणार हे नक्की. 

फायदे काय?? 
✓मनातलं सांगण्यासाठी आपल्याला कुणाची तरी गरज असते. पण प्रत्येक वेळी योग्य व्यक्ती मिळेलच असं नाही. 
मग अशा वेळी ही युक्ती कामी येते. 
✓ गोष्टी गुपित राहतात. 
✓ कुणीही जज करू शकत नाही. कारण कुणाला माहीतच नाही. 
✓ मोकळेपणाने स्वतःशी संवाद साधला जातो. 
✓ आपल्या चुका आणि आपले प्लस पॉइंट आपल्यालाच लक्षात येतात. 
आणि
अजून बरंच काही...
सगळच सांगण्यापेक्षा काही गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेऊन अनुभवायला हव्यात. 


तुम्हाला जर सहभागी व्हायचं आहे तर  लवकरात लवकर आपला सहभाग निश्चित करा. 

आयुष्यात नवीन काही तरी तेंव्हाच घडतं जेंव्हा आपण नवीन कृती करण्यासाठी पाऊल उचलतो. 

बाकी? 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू !!!  शुभं भवतु!!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 

संपर्क
गौरी हर्षल कुलकर्णी 
एम ए क्लिनिकल सायकॉलॉजी, समुपदेशन (12+ वर्षांचा अनुभव) 
9730961014( whatsapp only)

कालाय तस्मै नमः भाग ९ ते ११

कालाय तस्मै नमः| भाग ९

सरप्राईज

 अंगणात छानपैकी टेबल मांडलं होता. त्याच्या पलीकडे सगळी नातवंडं हातात Happy birthday चे एकेक अक्षर स्वतःच्या मोडक्या तोडक्या अक्षरात लिहिलेले बोर्ड घेऊन उभी होती. मागे सगळी मुलं मुली त्यांच्या जोडीदारासोबत उभे होते.  

माईही त्यांच्या ह्या सरप्राईज मध्ये सामील होत्या. आज तारखेने अन् दुसऱ्याच दिवशी तिथीने काकांचा 75 वा वाढदिवस होता. त्याचीच गुपचूप तयारी करून सगळे जण जमा झाले होते. काकांसाठी जसे ते सरप्राईज होते तसे सकाळपर्यंत माईंसाठीही होते. पण सकाळी भास्कर ला आलेला फोन माईनी उचलला आणि पलीकडून अशोकचा आवाज आला की अरे आम्ही सगळे शेजारच्या पाटलांच्या वाड्यात आलो आहोत तुम्ही कधी पोहोचत आहात. अजून सगळी तयारी करायची आहे. ते ऐकल्यावर माईनी त्याला रागातच विचारले, मग काय माईना सामील करावेच लागले. 

शेजारच्या वाड्यात तसेही कुणी नसायचे त्यामुळे सगळ्यांना तिथे तयारी करणे सोपे झाले. रात्री उशिरापर्यंत जागून सगळे जण गप्पा मारत होते. बऱ्याच वर्षांनी सगळ्या मुलां-नातवंडांना आजूबाजूला बघून काकांनाही छान वाटत होते. शेवटी गायत्री सगळ्यांना ओरडली,"अरे उद्याही बरेच काम आहे चला झोपा आता." तसे सगळेजण एकेक करून झोपायला गेले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लवकरच उठले होते. घरात पूजा होणार होती. आणि संध्याकाळी बाहेर एक हॉल घेऊन ओळखीच्या लोकांसाठी मेजवानी होती. त्याचे आमंत्रण, तयारी हेच सगळे जण करत होते. तिन्ही मुली सकाळीच माई काकांच्या खोलीत आल्या. हातात सामानाच्या पिशव्या होत्या. 

गायत्री म्हणाली, “काका, हे आम्हा तिघींकडून तुमच्या दोघांसाठी संध्याकाळी घालून या.” काका काही बोलणार तेवढ्यात धाकटी रोहिणी म्हणाली, “आधी उघडून तर बघा म्हणजे आम्हालाही कळेल तुम्हाला आमचं गिफ्ट आवडलं का?” माईंसाठी पैठणी आणि काकांसाठी धोतर कुर्ता होता, ते ही खास तयार करून घेतलेले. त्यासोबतच काकांसाठी सोन्याची चेन होती. 

मैथिलीही म्हणाली, “काका तुम्ही दोघांनी आजपर्यंत आमच्यासाठी जे केलं आहे ही काही त्याची परतफेड नाही. दरवेळी हक्काने तुमच्याकडून घेताना वाटायचं आपणही द्यावं. मग सहजच ही कल्पना आली आणि आम्ही तिघीही पैसे जमवत राहिलो. आणि त्यातून हे घेतले. हे पैसे आमचे आहेत तुमच्या जावयाचे नाहीत त्यामुळे अजिबात काही मनात येऊ देऊ नका. आणि हो आम्हाला फक्त तुमचे आशीर्वाद हवे आहेत बाकी काही नको. आता पटकन तयार होऊन या.” 


दुपारपर्यंत पूजा आटोपली, सगळ्यांची जेवणेही झाली. तोपर्यंत चार वाजतच आले होते. श्रीपाद आणि श्रीधर आता सगळ्यांना स्पेशली महिलामंडळाला आवरण्यासाठी घाई करू लागले. कार्यक्रम जरी ७ वाजता असला तरी वेळ तर लागणार होताच. छानपैकी आवरून सगळेजण हॉलवर पोहोचले. पाहुणे आधीच येऊन पोहोचले होते. 

माई आणि काकांसाठी दरवाजातून ते बसण्याची व्यवस्था केलेल्या जागेपर्यंत मस्त पाकळ्यांनी पायघड्या घातल्या होत्या. सगळं बघताना काकांना अगदी भारावून गेल्यासारखं झालं होतं. आप्तेष्ट, मित्रमंडळी कौतुकाने सगळा सोहळा बघत होते.

श्रीधर, विजय आणि अशोकनेच जवळपास सगळं ठरवलं होतं. काकांच्या जवळची असणारी मंडळी त्यांच्याबद्दलच्या मजेशीर आठवणी सांगणार होते. मुलांनी लहानपणीचे किस्से सांगितले. सुनांनी आणि नातवंडांनी मिळून एक छोटेसे नाटुकले सादर केले. 

सगळे झाल्यानंतर ओळखीचेच एक गायक त्यांची कला सादर करणार होते. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता. सगळ्यात शेवटी सगळे जण निवांत बसलेले असताना अशोकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत स्टेजकडे बघण्यास सांगितले. मागे असणाऱ्या भिंतीवर एक मखमली पडदा लावलेला होता ज्याचे अनावरण काका करणार होते. त्याने माई आणि काकांना स्टेजवर बोलवले. 

बसलेल्या जागेपासून ते स्टेजवर जाण्यासाठी सगळी नातवंडं त्यांना नेण्यासाठी आली. स्टेजवर आल्यावर काकांनी रिबीन ओढत पडदा सरकवला.

 एक सुरेख कोलाज होतं हाताने तयार केलेले. घरातील प्रत्येकाचे फोटो त्यात होते. सोबतच एक छानसा अल्बम होता जो सगळ्या मुलांनी काकांना दिला. त्यात काकांच्या लहानपणापासूनच्या आठवणी होत्या फोटोरूपाने. नकळतच काकांचे डोळे भरून आले. मग काकांनीही आपल्या काही छान आठवणी,बालपणीचे किस्से सांगितले. शेवटी माईंच्या आवाजातले एक सुरेल गाणे सादर होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. 

सगळे दिवस सारखे नसतात दुःखामागून सूख आणि सुखामागून दुःख ह्यांच्यामुळे तर जगण्याची आस कायम राहते. तसेच चांगलं आणि वाईट ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

कुठलीही व्यक्ती कधीच पूर्णपणे चांगली किंवा वाईट नसते. ते सर्वस्वी परिस्थितीवर आणि निर्णयावर अवलंबून असते. माणसं चुकतातच, मग ते कुठल्याही नात्यात असुदे, कुठल्याही वयाचे असुदे. पण चुकांमधून योग्य तो धडा घेत जो पुढे जातो तो शहाणा ठरतो. 
  
   हे लिहिण्याचं कारण आपल्या कथेतही वाईट व्यक्ती आहेत पण त्या सतत २४ तास तशाच नसतात. त्यांच्याही आयुष्यात असे काही क्षण येतात जिथे काही वेळासाठी का होईना त्यांना आपण चुकीचं वागतोय ह्याची जाणीव होते. आणि नकळतच ते चांगलं वागून जातात. ह्यालाच तर काळाचा महिमा असं म्हणतात ना. 

आपल्या आजूबाजूला सुद्धा असे अनेक जण असतात. आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळी मध्ये जे इतरांच्या सुखात मिठाचा खडा टाकण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. पण अश्या लोकांना कित्येकदा स्वतःच्या वागण्याची जाणीव होते. आणि ते चांगलही वागतात. 
मग आपणही त्यांना तोडून टाकत नाहीच जसे आहेत तसे स्विकारत जगत असतोच. 

इथेही सगळं छान झालं म्हटल्यावर ललिताच्या पोटात दुखत होतच. तिच्या धुसफूस करण्याचा परिणाम अश्विनीवरही झाला होता. ती ही काही न काही खुसपट काढून कार्यक्रम नासवण्याचा प्रयत्न करत होती. पण ह्या वेळी अशोकनेच सगळी परिस्थिती बघत त्या दोघींनाही दमात घेतले होते. 

श्रीपादवर त्याचा कितीही राग असला तरी माई आणि काका त्याचे जन्मदाते होते. आणि त्यांच्या आनंदावर त्याला विरजण पाडायचे नव्हते. 

मुलं सुना , लेक जावई , नातवंडं ह्या सगळ्या गोतावळ्यात माई आणि काकांना खुश बघून अशोक आणि त्याच्या जोडीला श्रीधरलाही कुठेतरी काही वेळासाठी आपल्या वागण्याची लाज वाटली होती. 

"ललिता, अश्विनी आज इथे कसलाही तमाशा व्हायला नकोय. माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे आणि तो आनंदातच साजरा झाला पाहिजे. तुम्हाला दोघींनाही त्रास होत असेल तर मी तुम्हाला गाडी आणि ड्रायव्हरची सोय करून देतो. तुम्ही आपापल्या माहेरी निघून जा. मी आणि विजय मुलांना घेऊन नंतर थेट आपल्या घरी येऊ.", अशोकनेच त्या दोघींना सांगितलं. 

आता अशोकच असं म्हणत आहे म्हटल्यावर त्या दोघींनाही काही बोलता आलं नाही. मन मारून का होईना हसतमुख चेहऱ्याने त्यांना त्या सगळ्यात सामील व्हावे लागले. 

आणि आधी नाईलाजाने सहभागी झालेल्या त्या दोघीही नकळतच सगळ्यात मिसळून गेल्या. 

रात्री झोपताना राहून राहून आजचा दिवस काकांच्या डोळ्यांसमोर येत होता. ह्या सगळ्या आठवणी मनाच्या कप्प्यात जपून ठेवण्याचा निर्णय घेत त्यांना झोप लागली. 
बऱ्याच दिवसांनी आपल्या माणसांसोबत एक मनासारखा दिवस सगळेच जगले होते. आजच्या दिवसाने सगळ्यांना आठवणींचा एक मोठा खजिना दिला होता. 

काकांना कित्येक दिवसांनी असं शांत झोपलेलं बघून माईंना बरं वाटलं. त्याही काही वेळातच निद्रेच्या आधीन झाल्या. 

श्रीपादला मात्र कुठेतरी हे सगळं जसं दिसत आहे तसेच कायमस्वरूपी राहणार नाही ह्या गोष्टींची जाणीव झाली होती. शेवटी मानवी स्वभावाला औषधं नसते. पण अरुंधती गेल्यापासून तो ह्या सगळ्या गोष्टींकडे त्रयस्थपणे बघत होता. 

कैवल्यची जबाबदारी तर त्याची होतीच पण भविष्यात स्वराचीही जबाबदारी त्यालाच घ्यावी लागणार होती. 

त्रयस्थपणे निरीक्षण करून तो सतत सगळ्यांच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता. जेणेकरून त्यांच्या स्वभावातील खुनशीपणाचा अंदाज बांधता येईल. आणि त्याच्या परीने काही गोष्टींना आवर घालता येईल. 

असो तर इथेही अशाच काही क्षणांमुळे सगळ्या वाईट गोष्टींचा विसर सगळ्यांनाच पडला. आणि दिवस आनंदात गेला. पुढचा दिवस त्याचं रहस्यमय गाठोडं घेऊन तयारीतच होता. 
_____________________________________

कालाय तस्मै नमः| भाग १०

खेळ मनाचे 

वाढदिवस साजरा झाला. एक दिवस थांबून सगळे आपापल्या घरी परत गेले. कुणी आनंदाची शिदोरी घेऊन तर कुणी दुसऱ्याचं नीट का सुरू आहे ह्या दुःखात. 

माणसाचं मन मोठं विचित्र असतं. त्याला स्वतःच्या समोरचं हात पसरून बोलावणारं सुख दिसत नाही, दुसऱ्याच्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टी खुणावतात. त्या बघून त्याचा इगो सुखावतो. मग मनातून नकळतच तो हा खेळ सुरू करतो. आपल्याच जवळच्या माणसांचं चांगलं झालेलं बघून दुःखी होण्याचा. पण त्याला हे कळत नाही की जे आपण दुसऱ्याच्या बाबतीत घडू दे असं म्हणत आहोत त्याला आपल्याही नकळत आपल्याच आयुष्यात आपण बोलवत आहोत. 

कर्म ही गोष्ट तो पूर्णपणे विसरतो, जे देऊ तेच परत मिळणार. ही खूप महत्त्वाची आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे बघू या जमतंय का ते.

आता गणपतीतच सगळे जण एकत्र येणार होते. तोपर्यंत प्रत्येकाची आपापली कामं होती, जबाबदाऱ्या होत्या. सगळी छोटी मुलंही आपसात काय मज्जा करायची हे ठरवून मोकळी झाली होती. 

स्वरा आता घरात एकटी मुलगी नव्हती. तिच्यानंतर तिघींचा जन्म झाला होता. त्यामुळे आपल्यालाही खेळायला कुणीतरी आहे म्हणून ती खुश असायची. लहान मुलं निरागस, निष्पाप असतात. 

कपट, ईर्षा, राग हे सगळं ती हळूहळू अनुकरणातून शिकतात. आपले आईवडील कुणाच्या समोर कसे वागतात आणि मागे कसे वागतात ह्यावर त्यांचं बारीक लक्ष असतं. काही वेळा प्रश्न विचारतात तर कधी कधी ते स्वतःच उत्तर शोधून काढतात. पण ह्यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडत जातं. इथेही असंच काहीसं घडत होतं. मुलांच्याही नकळत मुलांना आपल्याच भावंडांशी वैरभावनेने वागण्याची तालीम मिळत होती. 

श्रीधर-मंदा, विजय-ललिता, अश्विनी-अशोक ह्याचं मनातून जरी एकमेकांशी पटत नव्हतं तरी ते ठरवून एकत्र येत होते. ह्यामागचा हेतू अर्थातच अजून कुणीही बोलून दाखवला नव्हता. सध्या तरी 'तेरी भी चूप मेरी भी चूप' असं होतं. पण लवकरच काहीतरी घडणार होतं ज्यामुळे ह्या सगळ्यांची आयुष्यं एक यु टर्न घेणार होती. 

त्या दोन व्यक्ती गेले बरेच दिवस शांतपणे सगळं बघत होत्या. त्यांना जी तयारी करायची होती ती जवळपास पूर्ण झाली होती. पण पुढचा प्लॅन अंमलात आणण्यासाठी त्यांना अजून काही जणांना आपल्या कटात सामील करून घ्यावे लागणार होते. तसे त्यांचे चाचपणे सुरू होते. आणि तो दिवसही आला जेव्हा त्यांना त्यांचा तिसरा साथीदार मिळाला होता. त्याला सगळी योजना त्यांनी समजावून सांगितली. जमेल तशी त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आता फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघावी लागणार होती. ह्यावेळी हा खेळ कसा खेळला जाणार आहे हे अजून गुलदस्त्यातच होते. 

श्रावण आला तशी सणांची रेलचेल सुरू झाली. वाड्यावरही माई उत्साहात सगळं काही करत होत्या. पण हल्ली त्यांची तब्येत फारशी साथ देत नव्हती. संगीता जबरदस्ती त्यांना आराम करायला लावत होती. पण माईंचं काही एका जागी बसणं होत नसे. अशातच गणपती जवळ आल्याने दुप्पट उत्साहाने त्या हे करू ते करू म्हणू लागल्या. शेवटी काकांनी रागावून त्यांना सक्तीची विश्रांती घेण्यास भाग पाडले. 

दोन दिवस आधीच बाकीच्या सुना आणि नातवंडं येणार होती. काकांच्या लेकीही ह्या वर्षी येणार होत्या. मुलं मात्र नंतर येणार होती गणपती गौरीच्या दिवशीच विसर्जित होणार असल्याने कुणी बसण्याच्या दिवशी तर कुणी विसर्जनाच्या दिवशी येणार होते. एकंदरीत वातावरण छान होते. पण त्या सगळ्याचा मागे हलक्या पावलाने अजून कुणीतरी येणार होते की आले होते?

बाप्पाचं आगमन झाले तसा घरात एक वेगळा उत्साह होता. एकीकडे त्याच्या येण्याने सगळं नीट होईल अशी अपेक्षा होती तर दुसरीकडे कुणीतरी आपलं जाळं पसरवत होते.
 
घर जरी मोठे असले तरी सगळे एकत्र आल्यानंतर ओसरीतच झोपत असत. तेथेच अंथरूण घातल्यावर मुलांची दंगामस्ती सुरू झाली. सगळे जण मुलांना एकेक करून पकडून झोपवण्याचा प्रयत्न करत होते. कुणीतरी मात्र कधी हा गोंधळ संपतोय ह्याची वाट बघत होते. कारण आजच त्यांचा प्लॅन सुरू होणार होता. थोड्याच वेळात सगळे निद्रेच्या आधीन झाले. 

एक भयंकर शांतता जाणवू लागली. त्या तिघांनाही आता काम संपवण्यासाठी घाई झाली होती. पण ह्यावेळी कुणीतरी बघू नये अशा व्यक्तीने त्यांना बघितलं होतं. ते त्यांच्यामधील एकाच्या लक्षात आलं होतं. इतर दोघांना कळू न देता त्या बघणाऱ्याचा काटा काढायचा असे त्याने स्वतःशीच ठरवले. 

रात्रीच्या अंधारात त्या तिघांची खुसफूस सुरू होती. सगळ्यात मोठी व्यक्ती होती तिने विचारलं, “झालं का सगळं सांगितल्याप्रमाणे?” दुसरीने मान डोलवत हो असं. उत्तर दिलं. एक खुनशी हास्य एकाच वेळी त्यांच्यासह अजून काही चेहऱ्यांवर उमटलं. 

"ह्यावेळी जर आपला प्लॅन यशस्वी झाला तर बरंच काही साध्य होईल." पहिली व्यक्ती

"पण कशावरून मागच्या वेळेस जशी अरुंधती आडवी आली तसा ह्यावेळी श्रीपाद येणार नाही?" , दुसऱ्या व्यक्तीने आपल्या मनातली शंका बोलून दाखवली. 

"असं नाही होणार , कारण सध्या श्रीपाद त्याच्या मुलामध्ये गुंग आहे. त्यामुळे आपण त्याच्या नाकाखाली काय करत आहोत हे त्याच्या सहजासहजी लक्षात येणार नाही. आणि जोपर्यंत त्याच्या लक्षात येईल, तोपर्यंत आपलं सावज आपल्या ताब्यात आलेलं असेल.", पहिली व्यक्ती ज्या आत्मविश्वासाने म्हणाली ते बघून इतर दोघांना आता आपलं काम १००%पूर्ण होणारच अशी खात्री पटली. 

पण माणूस जसं ठरवतो तसच कधीही घडत नाही. व्यक्ती चांगलं वागणारी असुदे किंवा वाईट वागणारी असुदे, नियती प्रत्येकाचा प्लॅन फिस्कटवण्यासाठी तयारीत बसलेली असते. 

चांगल्या किंवा वाईट कुठल्याही मार्गावर यश इतक्या सहजपणे ओंजळीत येऊन पडत नाही. 

कृतीमध्ये, कष्टांमध्ये सातत्य असेल तरच गोष्टी घडतात. 

त्या तिघांचं बोलणं ऐकणार्या व्यक्तीला त्या तिघांच्याही मनात खदखदत असणाऱ्या रागाचा, द्वेषाचा अंदाज आला होता. पण उघडपणे समोर गेलं तर त्याने गोष्टी नको त्या थराला जाण्याची शक्यता होती म्हणून ती व्यक्ती शांत बसून सगळं ऐकत होती. 

उद्याची सकाळ कुणाच्या तरी आयुष्यात बरेच काही बदल घडवून आणणार होती. 
हे सगळं शांतपणे बघणाऱ्या त्या व्यक्तीने मात्र नकळतच वरती बघून हात जोडले आणि कालाय_तस्मै_नमः| म्हणत सगळं काही त्याच्यावर सोपवलं. 

त्या तिन्ही व्यक्ती आता घरातले सगळे झोपले होते तिथे आल्या. सगळी मुलं गाढ झोपेत होती. त्यातच त्यांचं टार्गेटही होतं. जगातल्या छक्क्या पंजाची कल्पना नसलेलं ते लेकरू आपल्याच स्वप्नातल्या विश्वात रमून झोपेतच खुदूखुदु हसत होते. उद्यापासून आपल्या आयुष्यात काय होणार आहे ह्याची काडीमात्र खबर त्याला नव्हती. पुढे काय होणार हे येणारी वेळच सांगू शकत होती...

वरवर पाहता आपल्याला बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य खूप छान चाललं आहे असं वाटतं पण खरी परिस्थिती काही वेगळीच असते. कुणीतरी आयुष्यभर भरल्या घरात एकटे असते. कुणीतरी सगळी भौतिक सुखं पायाशी असूनही त्यांचा उपभोग घेऊ शकत नसते. 

अशी बरीच दुःख असतात जी उघडपणे सांगता येत नाहीत पण ती व्यक्तीच्या मनावर नकळत आघात करत असतात.
 हा सुडाचा खेळ कशासाठी? 

काहीवेळा माणसाकडे पैसा तर भरपूर असतो पण ते नसतं ज्याच्यासाठी तो जगत असतो. अशा गोष्टी ज्या पैशांनी विकत घेता येत नाहीत. आणि त्या मिळवण्यासाठी स्वतःच्या वाईट स्वभावाला मुरड घालणे ह्या लोकांना शक्य नसते. म्हणून मग मनात सुडाची भावना जागी होते आणि कधी व्यक्ती तिच्या प्रभावाखाली जातो त्यालाही कळत नाही. 

तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या जर कुणी आपल्यावर जळत असेल तर दुर्लक्ष करा किंवा आपल्याला कुणाबद्दल असे वाटत असेल तर मनोमन त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करा. ईर्षेपोटी कधीही कुणाचं वाईट चिंतू नका.
_____________________________________

कालाय तस्मै नमः| भाग ११

ललिताच्या अचानक येण्यामागचे रहस्य

वाड्यावर नेहमीप्रमाणे आता दिनक्रम सुरू होता. पण माईंमध्ये झालेला बदल काकांना जाणवला होता. हल्ली त्या जास्त वेळ स्वरासोबत घालवत होत्या. सतत तिला काही न काही सांगत होत्या. पाचच वर्षाचं ते लेकरूही जमेल तसं सगळं समजून घेत होतं. काकांना अंदाज आला होता पण त्यांना नेमकं काय घडलं आहे ते माईंच्या तोंडून ऐकायचं होतं. 

गणपती होऊन काही दिवस झाले होते. त्यामुळे आता तसा निवांत वेळ होता दोघांकडे. अशातच एके दिवशी विजय आणि ललिता त्यांच्या जुळ्या लेकींसह - सई आणि जुई - गडबडीत आले होते. विजयला एका मोठ्या कामासाठी काही दिवसांसाठी परदेशी जायचं होतं. तसा तो आधीही गेला होता त्यामुळे ह्याचवेळी अचानक त्याने बायको मुलींना इकडे आणून सोडलं तेव्हा काकांना जरा आश्चर्यच वाटलं. 

इथे माईंच्या अस्वस्थतेमध्ये मात्र भर पडली होती. का कुणास ठाऊक पण ललिताचं वावरणं काकांनाही विचित्र वाटत होतं. पण पुरुष माणूस, त्यात सासरे, मग कसं बोलणार म्हणून ते गप्प होते. कारण ललिता तशी फारशी घरच्या लोकांमध्ये मिसळणारी नव्हती. ती सगळ्यांशीच फटकून वागत असे. माहेरच्या संपत्तीचा आणि स्वतःच्या सौंदर्याचा जरा जास्तच गर्व होता तिला. पण एकत्र कुटुंब असल्याने फारशी वेगळी वागणूक तिला कधी कुणी दिली नव्हती. ती माई काकांशीही कामापुरतंच बोलत असे. ते ही तिच्यापासून थोडेसे दूरच राहायचे. मुलाचा संसार नीट चालावा हीच त्यामागे त्यांची इच्छा असायची. पण ह्यावेळी मात्र तिच्या वागण्यात फारच बदल झाला होता. तो वरून चांगला दिसत असला तरी चांगला भासत नक्कीच नव्हता. 
     

माईंना आपल्याला काही तरी सांगायचे आहे हे काकांना जाणवले होते. पण माई बोलण्यासाठी आसपास आल्या की ललिता काहीतरी काम काढून तिथेच घुटमळत असायची हेही त्यांच्या लक्षात आले. शेवटी त्यांनी माईंना एका ओळखीच्या कडे भेटायला जायचे आहे असे सांगून बाहेर निघण्याचे ठरवले. दोघेही निघणार तेवढ्यात आतून जिवाच्या आकांताने मारलेली किंकाळी ऐकू आली. माईंच्या छातीत धस्स झाले. त्या वेगाने घराच्या आतल्या बाजूला गेल्या तर जुई डोक्यावर पडली होती. आजूबाजूला रक्ताचा सडा होता. ललिताने रडत रडत जुईला उचलले आणि बाहेर आली. परंतु बाहेर येताना तिने जर तोंड उघडले तर मग काय होईल कळले ना असा कटाक्ष माईंकडे टाकला. 

माईंचं लक्ष जाताच त्यांचा चेहरा भीतीने काळवंडला. जुईला डॉक्टर कडे नेण्यात आले. टाके पडले होते अन् रक्तही बरेच गेले होते. माई तिच्या उशाशी बसून होत्या. मनात विचार करत होत्या की काय कमी पडतंय म्हणून ललिता अशी वागते आहे? त्या रात्री त्या तिघांनी जे काही केलं ते बघितल्यावर मला खात्रीच वाटत नव्हती की माझ्याच घरात ही माझीच लेकरं अशी एकमेकांना पाण्यात बघत असतील. पण ललितातर स्वतःच्या लेकीच्याही जीवावर उठली आहे मग माझ्या स्वराचं काय होईल? आधीच तिचं असामान्य असणं तिच्या आईबापालाच सहन होत नाही. 

संगीता आणि भास्कर एके दिवशी स्वराबद्दल बोलत होते ते चुकून माईंच्या कानावर पडल होतं. भास्करला स्वराच्या जन्माला येण्याचा फारसा आनंद नव्हता त्याला तर दुसराही मुलगाच हवा होता. आणि संगीता, तिला आपल्याच लेकराच्या गुणांबद्दल प्रॉब्लेम होता. त्यावेळी ती कुणाच्याही प्रभावाखाली नव्हती. तर ते तिचे विचार होते.


आपल्या समाजात अशी बरीच कुटुंब सापडतील, जिथे बाहेर दाखवताना मुलगी आमच्यासाठी खूप स्पेशल आहे असं दाखवलं जातं. पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी असते. ते शेवटपर्यंत कुणालाही कळत नाही. असो. 

इथे मात्र ह्या दोघांच्या मनात स्वराबद्दल असणारे विचार इतरांच्या पथ्यावर पडले होते, कारण नकळतच त्यांच्या करणीला बळ मिळाले होते. आणि आता त्यांना फक्त ह्या दोघांचे हेच विचार सतत तेल घालून पेटवत ठेवायचे होते. 


माईंनी मनाशी काहीतरी ठरवत आधी हे सगळं काकांच्या कानावर घालायचे ठरवले. त्या घाईने काकांच्या खोलीत आल्या. काका काहीतरी लिहिण्यात गुंतले होते. ते बघून माई मागे फिरल्या तेवढ्यात काका म्हणाले, “सरस्वती जे बोलायचं आहे ते बोल. आत्ता कुणीही घरात नाहीये.” बोलताना कुणीही ह्या शब्दावर त्यांनी दिलेला जोर माईंच्या लक्षात आला. 

शब्दांची जुळवाजुळव करत माईंनी काकांना त्या रात्री घडलेला प्रसंग सांगितला. त्या रात्री तीन व्यक्ती होत्या पण मला मात्र फक्त ललिताचाच चेहरा दिसला हेही त्या म्हणाल्या सोबतच इतर दोन व्यक्ती मध्ये एक पुरुष होता हेही त्यांनी सांगितले. 

काका काहीसे विचारात पडले. मग म्हणाले, “असं काहीतरी होणार ह्याची कल्पना होती मला. श्रीपादनेही सांगितलं होतं. पण त्याचं म्हणणं आहे की आपण सध्या काही करू शकत नाही. आपण फक्त स्वरावर लक्ष ठेवून तिला उत्तमोत्तम संस्कार देऊ शकतो. आणि आपल्याला जे काही ज्ञान आहे ते तिच्यापर्यंत पोहोचवू शकतो. ही तिची लढाई आहे जी बरीच वर्षे चालणार आहे. आपण आज आहोत उद्या कदाचित नसू. तेव्हा आपले संस्कारच तिला बळ देतील आपल्याच माणसांपासून सुरक्षित राहण्यासाठी.” 

शेवटच्या वाक्यावर माईंनी चमकून काकांकडे बघितले. तसे काका म्हणाले, “प्रत्येक जण आपलं नशीब स्वतः घडवत असतो. जसं आपली वयाने मोठी असलेली लेकरं स्वतःच्या नशिबाशी खेळ करत आहेत, तशी आपली ही लहानशी पोर सगळ्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करेल. तिला खूप सोसावे लागणार आहे. त्यासाठी आपले आशीर्वाद तिला नेहमी तयार करतील. एकटी असूनही ती सगळ्या वाईट गोष्टींना भारी पडेल. 
तिच्यासारख्या खूप मुली आहेत, मुलगेही आहेत जे स्वतःच्याच घरात, माणसात हे सगळं भोगतात अशा सगळ्यांसाठी स्वरा नकळतच आदर्श होईल बघ. 
तू अजिबात काळजी करू नकोस असं मी म्हणणार नाही, पण ह्या काळजीचा उपयोग तू स्वराला घडवण्यासाठी कर. आपण कितीही थकलो असलो तरी ही जबाबदारी पार पडल्याशिवाय आपल्याला सुट्टी मिळणार नाहीये.”

 काका हसत हसत म्हणाले. माईही मान डोलवत हसून खोलीतुन बाहेर पडल्या. काळजीचे सावट तसेच असले तरी त्यांच्या मनातल्या भीतीची जागा आता विश्वासाने घेतली होती. विश्वास होता त्याच्यावर ज्याने सगळ्यांना घडवले आहे. सईसोबत खेळत असणाऱ्या स्वराकडे बघून माईंना जाणवलं की ही पोर आयुष्यात इतरांना कधीही निराश करणार नाही. पण आपल्याला तिला स्वतःला सांभाळायला शिकवायचे आहे. 


स्वरामध्ये अस वेगळं काय होतं? तसं बघायला गेलं तर काहीच नव्हतं. हो अगदी सामान्य रंग, किडकिडीत तब्येत होती. पण तिचा स्वभाव मात्र खूप गोड होता. तिच्यावर थोडंसंही प्रेम करणाऱ्या माणसाला ती खूप जीव लावायची. इतकी लहान असतानाही ती आईबाबा चिडचिड करू नये म्हणून हट्ट करत नसे. 

माई आणि काकांसोबत मात्र ती मनातलं सगळं बोलत असे. त्यांनी तिला तिच्या आवडत्या देवबाप्पाला ही सगळं सांगायची सवय लावली होती. पण हेच समजुतदार असणं तिच्यासाठी शत्रू ठरलं होतं. कारण तिच्या सगळ्या बहिणी, भाऊ दिसायला देखणे होते तरीही त्या सगळ्यांमध्ये हे ध्यान मात्र लक्ष वेधून घेत असे. आणि हीच गोष्ट इतरांना खटकत असे. त्यांना भीती वाटत असे की ही मुलगी भविष्यात आपल्या मुलांना जड जाईल.

 प्रत्यक्षात मात्र सगळी मुलं आपल्या ह्या बहिणीशी प्रेमाने वागत असत कारण त्यांच्या मनाला अजून असल्या भावनांचा स्पर्श झाला नव्हता. पण पुढेही त्या सगळ्यांच्या स्वराबद्दलच्या भावना अशाच असणार का हे येणारी वेळ आणि परिस्थितीच सांगणार होती. 

प्रत्येक जण आपल्या आयुष्यात एक लढाई लढत असतो. कधी स्वतःशी, कधी जवळच्या लोकांशी, कधी समाजाशी. आपण मात्र समोरून दिसणारे चित्र बघूनच त्या त्या व्यक्तीवर एक शिक्का मारून मोकळे होत असतो. ते म्हणतात न काय ते judgemental होतो.

 व्यक्तीसमोर अवघड परिस्थिती मध्ये कोणते पर्याय होते, त्याने ते का निवडले, कसे निवडले आपल्याला काहीच माहीत नसते. म्हणून लगेच कुठलाही निष्कर्ष काढू नये. कारण प्रत्यक्षात कोण काय सहन करत आहे ह्याची आपल्याला काडीमात्र जाणीव नसते. कधी कधी फक्त सोबत कुणीतरी आहे एवढा विश्वास द्यावा बास.
____________________________________
प्रतिक्रियांची वाट बघत आहे. 

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू !!! शुभं भवतु !!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५

कालाय तस्मै नमः (भाग ७-८)

कालाय तस्मै नमः| भाग ७

भूतकाळात फेरफटका

अरुंधतीच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली असली तरी आयुष्य थांबणार नव्हते. अरुंधतीचे सर्व कार्य आटोपल्यावर महिनाभरात घरातील सर्व सोय बघून निघावे असे श्रीपादने ठरविले. तसे त्याने काकांना बोलूनही दाखवले. ते बोलणे माईंनी ऐकले आणि त्या श्रीपादला बघत म्हणाल्या, “निघावे म्हणजे? ती गेली म्हणजे तूही जाणार का तुझ्या वाटेने? कैवल्य - त्याचं काय?” 

श्रीपाद माईंना समजावत म्हणाला, “माई मी जातोय म्हणजे निघून नाही जात. बदली झाली आहे माझी, खरे कारण सांगायचे त्याने टाळले. आणि कैवल्यला ह्या वातावरणापासून दूर घेऊन गेलो तरच तो सावरेल नाही तर त्याला सतत आईची आठवण येत राहील. नवीन ठिकाणी नवीन माणसांमध्ये तो गोष्टी विसरून रमेल. आणि जेव्हा जेव्हा तू मला मनापासून हाक मारशील मी नक्की येईन. ह्या घराला, तुम्हाला माझी गरज असताना मी तुमच्या सोबत असेन. आणि मलाही ह्या घरात तिच्या बाबतीत जे झाले सतत तेच तेच आठवून गुदमरून गेल्या सारखे होते. त्यामुळे तू मला परवानगी दे.” 

माईंनाही मनातून त्याचे बोलणे पटले, पण आईचं काळीज होतं ते. त्यात श्रीपाद त्यांची दुधावरची साय म्हणजे कैवल्यलाही घेऊन जाणार म्हटल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले. श्रीपादने जवळ घेत माईंना पोटभर रडू दिले.
 गेल्या काही दिवसात बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. भास्कर संगीताही श्रीपाद जाणार म्हटल्यावर थोडेसे धास्तावले. इतके दिवस तशी जबाबदारी त्यांच्यावर नव्हती, पण आता मात्र त्यांना सगळं बघावं लागणार होते. श्रीपादने त्यांनाही समजावले. जिथे जाणार आहे तिथला पत्ता आणि नंबर कळवेन काहीही गरज पडली तर कुठल्याही क्षणी तू मला कळवु शकतोस हेही सांगितले. 


सगळ्या मुली काही दिवस राहून सासरी परत गेल्या होत्या. लाडक्या वहिनीच्या जाण्याने त्यांनाही घर सुने वाटत होते. श्रीधर मंदा आता परत जाणार होते. अशोक , विजयने त्यांना स्वतःकडे येण्याची गळ घातल्याने तिकडे जाऊन मग ते तसेच जाणार होते. 

श्रीपाद एकेक कामं हातावेगळी करत होता. भास्करला सगळ्या गोष्टी सांगत होता. श्रीपादने नाही म्हटलं तरी माई काका , कैवल्य आणि भास्करच्या कुटुंबाचा विचार करून बऱ्याच गोष्टी केल्या होत्या. भास्करला मदतीची गरज पडेल आणि ती त्याला कुणाकडेही मागावी लागू नये ह्याची काळजी घेण्याची कल्पना अरुंधतीची होती. त्यामुळे तिने सांगितल्याप्रमाणे श्रीपादने काही गुंतवणूक केली होती. इतरांकडून त्यांना तशी फारशी अपेक्षाही नव्हती. भास्करला मात्र जबाबदारी बघूनच दडपण आले. “दादा, मला नाही जमणार रे हे सगळे. तूच बघ ना,” तो श्रीपादला म्हणू लागला. तसा श्रीपाद म्हणाला, “असं करून नाही चालणार भास्कर. माझ्या वाटणीच्या गोष्टी मी करणारच आहे. पण तू इथे आहेस म्हणजे अडीअडचणीच्या वेळी तुला हे सगळं माहिती हवं. संगीताला सगळं माहिती आहे तिची मदत घे. ती अरुंधतीचीच बहीण आहे तुझ्या प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत ती तुझ्यासोबत खंबीरपणे उभी असेल.” सगळी कागदपत्रे त्याच्या हातात सोपवत श्रीपादने समजावले.


श्रीपाद आणि कैवल्यच्या निघण्याचा दिवस आला. मनाला समजावत माई सगळी तयारी करत होत्या. काही दिवस अरुंधतीचे आईबाबा त्या दोघांसोबत राहणार होते. ते दोघे नेमके कुठे जाणार आहेत हे कुणालाही सांगितले नव्हते. सगळी व्यवस्था झाली की काय ते कळवतो असे श्रीपादने सांगितले होते. काकांनीही फारसे काही न विचारता होकार दिला होता पण तरीही त्यांना ते पचवणे अवघडच जात होते.  

दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वेने श्रीपाद, कैवल्य आणि अरुंधतीचे आईबाबा निघाले. गेल्या काही दिवसांत कैवल्यच्या वागण्यात खूप बदल झाले होते. तीन-चार वर्षांचे ते लेकरू अचानक खूप समंजस झाले होते. अरुंधतीच्या आजारपणाच्या काळात त्याला तिच्यापासून दूर ठेवलं जात असल्याने कदाचित आता आपल्याला आई शिवायच रहावे लागणार ही नोंद त्याच्या बालमनाने घेतली होती. त्यामुळे बाबांनी जायचं म्हटल्यावर त्याने चुपचाप मान डोलावली होती. 

श्रीपादलाही आईविना लेकरू म्हणून मिळणाऱ्या सहानुभूतीची सवय त्याला होऊ द्यायची नव्हती. ते त्याच्या आईला अरुंधतीलाही आवडले नसते. म्हणूनच तो दूर निघाला होता. येणारा नवीन प्रवास बरेच काही नवीन घेऊन स्वागतासाठी तयार होता. 

इकडे काका आणि भास्कर घरी आले होते. घरी आल्यावर मोकळे मोकळे घर बघून काकांना कसेतरी झाले पण आता ह्याची सवय करून घ्यावीच लागणार होती. संगीता आणि भास्कर समीरच्या साथीने आता माई काकांना सांभाळण्यासाठी तयार झाले होते.
    

 दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने, वर्षांमागून वर्षे जात होती. प्रत्येक सणावाराच्या दिवशी माईकाकांना दिवसभर श्रीपाद येईल असे वाटत असे पण तसे काही घडत नसे. शेवटी त्यांनी आता आशाच सोडून दिली होती. मधल्या दिवसांमध्ये घरात आणखी 'नातू' आले होते. पण ‘ती’ च्या येण्याची चाहूल कुठेच नव्हती. शब्द दिल्याप्रमाणे दरवर्षी काका सगळ्यांना घेऊन कुलदैवताला जात होते. चार वर्षे लोटली होती आणि मग संगीताने ती बातमी दिली. 


संगीताची परिस्थिती नाजूकच होती. त्यामुळे तिला माहेरी न पाठवता तिच्या आईलाच माईंनी बोलावून घेतले होते. पूर्ण नऊ महिने त्या येऊन जाऊन राहत होत्या. 

संगीताला डोहाळेही विचित्रच लागत होते. पण तिच्या आईला मात्र कुठेतरी ह्या सगळ्यामुळे अरुंधतीची आठवण येत होती. कारण अरुंधतीच्या जन्मावेळी तिच्या आईला म्हणजेच संगीताच्या मावशीला असेच डोहाळे होते. घरात सतत पूजा व्हावी जपजाप्य सुरू असावे, सतत मंत्रोच्चार कानावर पडत राहावेत असे तिला वाटत होते. तिने तसे बोलून दाखवताच काकांनीही यथाशक्ती सगळ्या गोष्टी करणे सुरू केले. त्याचाच परिणाम म्हणून की काय संगीताचा त्रास हळूहळू कमी झाला. तिची प्रकृतीही स्थिर झाली. आणि घराला मिळालेला तो शाप दूर होण्याची आशा काकांच्या मनात निर्माण झाली. 

हे सगळं बघून त्या दोन व्यक्तींनी मात्र पुन्हा आपली तयारी सुरू केली होती. पण ह्यावेळी त्यांना प्रत्येक केलेल्या वाराचे प्रत्युत्तर लगेच मिळणार आहे ह्याची कल्पना नव्हती.  

काका आणि माईंची पुर्वपुण्याई अन् अरुंधतीने दिलेल्या बलिदानाचे फळ म्हणून ‘स्वरा’ सुखरूप जन्माला आली होती. तिच्या जन्मानंतर डॉक्टरांनी काकांना भेटण्यासाठी बोलावले. डॉक्टर ओळखीचेच असल्याने काकांना समजले काहीतरी वेगळं आहे. 
      

काका आत गेले तसे डॉक्टर म्हणाले, “काका, मी तुम्हाला तुमच्या कुटुंबाला खूप वर्षांपासून ओळखतो. पण आजचा अनुभव खूप वेगळा होता. नऊ महिने जिथे मला संगीता सुखरूप राहील का नाही ह्याची खात्री नव्हती तिथे सगळं नीट पार पडणं हा चमत्कार होता. त्यात आज आम्ही ऑपरेशनची तयारी ठेवली होती. कारण कुठल्याही प्रकारचा धोका नको होता. पण आतमध्ये जाताच एक वेगळं वातावरण मी अनुभवलं. संगीताच्या आसपास कुणीतरी वावरत आहे असं मला जाणवलं. आश्चर्य म्हणजे इतर कुणालाही हे जाणवलं नाही. ते जे काही होतं ते खूप आश्वासक होतं. जणूकाही धीर देत आहे. सगळं नीट होईल घाई करू नका असे शब्द ही मला ऐकू आले. मला वाटलं मला भास झाला पण संगीताने मला नंतर सांगितले की डॉक्टर तो भास नव्हता ती माझी ताई होती. माझी आणि बाळाची सुखरूप सुटका व्हावी म्हणून ती सतत माझ्या उशाशी बसून होती. ताई म्हणजे अरुंधतीच न काका?” काकांनी डोळ्यातले पाणी टिपत होकारार्थी मान डोलावली. 

डॉक्टर पुढे म्हणाले, “खरे तर मी फारसा देवावर विश्वास नाही ठेवत, पण गेले काही महिने मी जे अनुभवले त्यावरून माझा त्या सकारात्मक शक्तीवर मात्र पूर्ण विश्वास बसत आहे. बाळ आणि बाळाची आई अगदी ठणठणीत आहेत.” काका त्यांचे आभार मानून बाहेर आले. 

संगीताला ज्या खोलीत ठेवले होते तिथे आले. समीर कुतूहलाने ते छोटंसं गाठोडं बघत होता. तुझी बहीण आहे असं सांगताच त्याला खूप आनंद झाला. माईंनी बाळाला काकांच्या हातात दिले. तिचे डोळे हुबेहूब अरुंधतीसारखे होते. प्रेमळ दुसऱ्याला आश्वस्त करणारे. काकांकडे बघत बाळाने हळूच डोळे मिचकावले. जणूकाही ते सांगत होतं आता मी आले आहे न आता सगळे नीट होईल. काकाही हळूच हसले.

आणि आजचा दिवस होता बारश्याचा. स्वराने तिच्या काकाला श्रीपादला घरी येण्यासाठी भाग पाडले होते. सोबत कैवल्य ही आला होता. 

काका भूतकाळातून बाहेर आले. पहाट झाली होती. दूरवरून मंदिरातली काकडआरती ऐकू येत होती. सगळे घर तसे अजूनही झोपेच्या आधीनच होते. 

काका मात्र जागे झाले. आन्हिके उरकून त्यांनी देवपूजा आणि पादुकांची पूजा केली. एकीकडे तोंडाने रोजची स्तोत्रे म्हणणे सुरू होते. पण आज अचानकच त्यांना संकटनाशन गणपती स्तोत्र म्हणावेसे वाटले त्यांनी खड्या आवाजात सुरू केले, 

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् । 
भक्तावासं स्मरेनित्यं आयुःकामार्थसिद्धये ॥१॥

पहिल्या दोन ओळी म्हणत असतानाच अजून कुणीतरी आपल्या सोबत म्हणत आहे ह्याची जाणीव त्यांना झाली. मागे वळून बघताच त्यांना समजलं, दुसरं कोण असणार - कैवल्य होता तो. गालातल्या गालात हसत काकांनी स्तोत्र तसेच सुरू ठेवले. 

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् । 
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च । 
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् ॥३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् । 
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः । 
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् । 
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् । 
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् । 
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥

॥इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम गणेशस्तोत्रं संपूर्णम् ॥

‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत देवाला नमस्कार करून ते कैवल्य जवळ आले. एवढासा तो पण अंघोळ उरकून तिथे येऊन बसला होता. काकांनी विचारले, “इतक्या लवकर का उठलास?”   

“मला जाग आली आजोबा. मग तुम्ही उठला आहात हे कळले बाबांनी अंघोळीची तयारी केली होती मग काय मी आवरले आणि येऊन बसलो. तुम्ही स्तोत्र म्हणू लागलात मलाही वाटलं म्हणावं मग मी ही सुरू केले. बरोबर म्हटलं ना मी?”   
“अगदी बरोबर. कुणी शिकवलं तुला?”  
“आईने.”  

काका क्षणभर गोंधळले. “आईने?” 

“हो. ती कधी कधी माझ्या स्वप्नात येते. खूप बोलते माझ्याशी. हे तिनेच शिकवलं मला.” तेवढ्यात मागे उभ्या असलेल्या श्रीपादने त्याला हाक मारली आणि माई उठली आहे तिच्याकडे जा अस सांगितलं. 

तो काकांकडे वळून पाहत म्हणाला, “ती भेटते त्याला स्वप्नात की काय मला नाही माहित, पण सगळ्या चांगल्या गोष्टी त्याला देऊन जाते. आता कदाचित नाही भेटणार. होईल त्याला सवय.” इतकंच बोलून तो निघून गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत काका तिथेच थांबले. मग वळून पादुकांकडे बघितलं आणि हात जोडून म्हणाले, “सगळं काही तूच सांभाळ आता.....” 

समोरून कितीही साधं सरळ वाटलं तरी सामान्य माणसाच्या आयुष्यात बरीच उलथापालथ होत असते. निराशेचे क्षण येतात, मन उदास होते, सगळं नकोसं वाटतं. अशा वेळी आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याच्यावर सगळं सोपवून मोकळं व्हावं. मनापासून त्याला साद घालत योग्य मार्ग दाखवण्याची विनंती करावी. मार्ग नक्की मिळतो. तसे संकेत मिळतात. स्वतःला मदत करण्यासाठी आधी आपण तयार व्हावे तरच तो ही आपल्याला मदत करतो.

_____________________________________

कालाय तस्मै नमः|भाग ८

संमोहन 

काही दिवस सगळ्यांसोबत घालवून श्रीपाद कैवल्यसोबत परत गेला. बाकी सगळे जणही आता आपापल्या घरी गेले. पण स्वराच्या रुपात अरुंधतीचं परत येणं अजूनही कुणी स्वीकारलं नव्हतं. 

स्वरा जसजशी मोठी होत होती तसतशी तिच्या वागण्यात, बोलण्यात अरुंधतीची छाप जाणवू लागली होती. इतर मुलांना जशा गोष्टी शिकवाव्या लागतात तसे तिचे नव्हते. कधी कधी ती असं काही करायची जे ४-५ वर्षाच्या मुलाला सुचणार नाही. संगीताला लेकीचं कौतुक बघून कुठेतरी आनंदही व्हायचा पण दुसऱ्या क्षणी अरूधंतीची अवस्था आठवली की तिच्या काळजाचा थरकाप होत असे. नकळतच ती स्वराचा रागराग करत असे. 

माई तिला समजावून सांगत असत की दरवेळी असंच कसं घडेल? आणि ती हुशार आहे, थोडीफार अरुंधती सारखी वागते म्हणजे ती तसंच नशीब घेऊन आली आहे असं असणार आहे का? माईंचे शब्द ऐकून तेव्हढ्यापुरता तिच्या जीवाला दिलासा मिळत असे. 

पण ह्या गोष्टी - म्हणजे स्वराचा रागराग करणे आता वारंवार घडत आहेत हे बघून माईंनी काकांच्या कानावर घातले. काकाही विचारात पडले. कारण इतर सर्व नातवंडांपैकी स्वरावर त्यांचा जास्तच जीव होता. आणि इतरांना त्याचा त्रास होत असेल तर ठीक पण स्वराच्या आईला का होतोय तेच त्यांना कळेना. अशातच एके दिवशी संध्याकाळी त्यांना घरातल्या फोनवर एक फोन आला. त्यावेळी मोबाईल नव्हते त्यामुळे लँडलाईन हेच संपर्काचे साधन होते. 

श्रीपादने माई काकांशी कधीही संपर्क साधता यावा म्हणून स्वतःच्या ओळखी वापरून जाण्याच्या आधी घरात फोन कनेक्शन घेतले होते. असो. 

तर काका फोनवर बोलत होते म्हणजे खरं तर फक्त ऐकत होते. पलीकडची व्यक्ती कोण आहे, ती काय बोलतेय हे त्यांना जाणवलं. त्यांना जेवढा राग आला त्यापेक्षा कितीतरी जास्त धक्का बसला होता. 

फोन ठेवल्यावर श्रीपादचं नाव घेत ते तिथेच बसून राहिले. काही वेळाने पुन्हा फोन वाजला रिंगच्या आवाजाने काका भानावर आले त्यांनी फोन कानाला लावला.


 पलीकडून श्रीपाद बोलत होता, “काका काय झालं? मला अचानक जाणवलं की तुम्ही मला बोलवत आहात.” काकांनी आसपास कुणीही नाही हे बघून आधीचा प्रकार त्याच्या कानावर घातला. तसा तो म्हणाला, “मला शंका होतीच. पण तुम्ही काळजी करू नका. दोन दिवसांनी तुमच्याकडे एक व्यक्ती येईल. तुम्ही चौघे आणि दोन्ही मुलांसाठी काहीतरी देईल. ती वस्तू सतत तुम्हा सगळ्यांच्या शरीरावर असली पाहिजे ह्याची तुम्ही काळजी घ्या. आणि हो संगीतावर अजिबात चिडू नका तिच्या आई असण्याचा फायदा घेतला जातो आहे. आपण कुणी जर चिडलो तर ती अजून त्या लोकांच्या प्रभावाखाली जाईल. स्वराला शक्यतो लांब ठेवा. सध्या तरी तिची काळजी करण्याची गरज नाही पण बारीक लक्ष असू दे. काळजी घ्या. मी आहे काही वाटलं तर कळवा.” इतकं बोलून त्याने फोन ठेवला. 

त्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती आता काकांच्या लक्षात आली होती. पण सरळ सरळ जर काही बोललं गेलं असतं तर गोष्टी हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. म्हणूनच काकांनी शांत रहाण्याचं ठरवलं. 


दोन दिवसांनी श्रीपादने सांगितल्याप्रमाणे तो माणूस आला. त्याने हातातली पिशवी काकांकडे दिली आणि त्यांना सर्व काही सांगितले. इकडे तिकडे बघत असतानाच त्याची नजर एका बंद दरवाज्याकडे गेली. ते बघताच काका म्हणाले, “ती अडगळीची खोली आहे. जास्तीच नको असलेले सामान असतं तिथे.” तो त्यांच्यासोबत आत गेला मागच्या वेळी ज्या काही वस्तू श्रीपादला सापडल्या होत्या त्या त्याच ठिकाणी त्याला पुन्हा सापडल्या. त्याने त्या सोबत घेत काकांना काळजी करू नका असे सांगितले. जाता जाता घराकडे एक नजर टाकत तो काहीतरी पुटपुटला आणि काकांना म्हणाला, “सगळ्या खोल्यांमधून तुळशीपत्र घेऊन दिलेले गंगाजल शिंपडा. सगळं नीट होईल. ते पाठीशी आहेत.” देवघराच्या दिशेने नजर जाताच त्याच्या चेहऱ्यावर ओळखीचे हसू आले आणि निरोपाचा हात वर करुन तो बाहेर पडला. तो गेल्यावर काकांनी पिशवी उघडली त्यात काही दोरे विशिष्ट वेष्टनात गुंडाळलेले होते. आणि एक छोटा गडू होता ज्यात गंगाजल होते. सर्व काही पादुकांसमोर ठेवून त्यांनी नमस्कार केला. 

संध्याकाळी दिवेलगणीच्या वेळी प्रत्येकाला त्याच्या वाटेची गोष्ट त्यांनी दिली, मुलांना स्वतः बांधली. स्वरा समीरसोबत खेळण्यात गुंगली. काका तिथेच बसून तिच्याकडे बघत होते. समीरचा स्वरावर खूप जीव होता पण फोनवरून ऐकलेल्या गोष्टीनंतर काकांना कुणाचाच भरवसा वाटत नव्हता. असं काय ऐकलं होतं त्यांनी? 


“संगीता, आम्ही जे सांगतोय ते कळतंय न तुला?”
संगीताच फोनवर आहे असं वाटल्याने समोरच्या व्यक्तीने थेट बोलायला सुरुवात केली होती. काकांनीही फक्त हुंकार भरत ऐकणे सुरू ठेवले. “हे बघ ती मुलगी तुला आणि तुझ्या नवऱ्याला खूप मोठया संकटात टाकेल भविष्यात. तू जरी तिला जन्म दिला असला तरी ती कोण आहे हे तुला कळलेच असेल, तेव्हा सावध राहा, तिला दूरच ठेव.” 

आणि बरंच काही बोललं गेलं. बोलणाऱ्याच्या आवाजात असे काही वजन होते की काकाही काही वेळासाठी संभ्रमित झाले. संमोहित करून संगीताला वापरून घेण्यासाठी हे केले जाते आहे हे जसे काकांना लक्षात आले, तसे त्यांनी ते श्रीपादला कळवले आणि त्या गोष्टीला आळा बसला. 

ही घटना घडून आता वर्षाचा कालावधी उलटून गेला होता. त्या उपायांमुळे संगीता पुन्हा पहिल्यासारखी प्रेमाने स्वराचं सगळं करत होती. काकांनी नकळतच सुटकेचा निश्वास सोडला. 

इकडे शहरात विजयच्या घरी सगळे जण जमले होते. कसलं तरी प्लॅनिंग करणं सुरू होतं. 

श्रीपादला आणि भास्करला त्याची पुसटशी कल्पना नव्हती. श्रीपादला फक्त ठराविक तारखेला वाड्यावर ये महत्वाचं बोलायच आहे असा निरोप श्रीधरच्या मार्फत दिला होता. तो ही गोंधळात पडला की आता काय नवीन समोर येणार. तसाही तो कैवल्यला घेऊन जाणारच होता काही कारणाने. त्यामुळे त्याने आणखी दोन दिवस जास्त सुट्टी घेत जायचं ठरवलं.

माई आणि काकांना मात्र ह्या सगळ्याचा पत्ताच नव्हता. ते त्यांच्याच विश्वात मग्न होते. पण सकाळपासून दोघांनाही कसलीतरी हुरहूर वाटत होती. काय ते काही समजत नव्हतं. शेवटी न राहवून काकांनी एकेक करून सगळ्या मुलांना फोन लावला तर कुणी ऑफिसमध्ये कुणी बाजारात कुणी मुलांच्या शाळेत असे निरोप मिळाले. शेवटी निदान सगळे ठीक आहेत अशी मनाची समजूत घालत दोघे शांत बसले. 

संध्याकाळी संगीता आणि भास्करही मुलांना घेऊन कुणाच्या तरी घरी कार्यक्रम आहे म्हणून बाहेर गेले. शक्यतो वाड्यात एकटं राहण्याची वेळ माई काकांवर कधी येतच नसे. त्यामुळे आज रिकामा वाडा त्यांना अगदी खायला उठला. 

दिवेलगणीची वेळ झाली म्हणून माईनी देवासमोर दिवा लावला आणि त्या कुठली तरी भाजी निवडायला घेऊन काका बसले होते तिथेच येऊन बसल्या. तेवढ्यात अचानक लाईट गेले. देवघरातील आणि तुळशीपुढचा दिवा सोडला तर मिट्ट काळोख झाला. 

काकांनी दारातून बाहेर बघितले तर सगळीकडे वीज आहे असे त्यांच्या लक्षात आले. मग वाड्यातलीच कशी काय गेली? विचार करत ते आले माईही जागेवर नव्हत्या. आता ही कुठे गेली म्हणत काका आत जाऊन त्यांना शोधू लागले. अंधारात काही दिसत नव्हते त्यामुळे माईना एक दोन वेळा आवाज देऊन बघितला. पण काहीच उत्तर नाही म्हटल्यावर काका जरासे घाबरले. बाहेर जावे तर आता तुळशीजवळची पणतीही वाऱ्याने शांत झाली होती. काळोख जरा जास्तच गडद झाला. 

तेवढ्यात बाहेरच्या मोकळ्या जागेत काहीतरी हालचाल होते आहे असे काकांना जाणवले. त्यांनी एकदम शांतपणे हात लांबवून बसण्याच्या जागेजवळच असणारी काठी उचलली. ते वळाले आणि एक सावली जवळून गेल्याचे त्यांना जाणवले. कुजूबुज ज्या दिशेने येत होती ते त्या दिशेने हळूहळू पुढे सरकू लागले तेवढ्यात घरात काहीतरी भांडे पडल्याचा आवाज आला. काठी धरलेला हात खाली घेत काका स्वयंपाक घराच्या दिशेने गेले. तिथे काहीच पडले नव्हते असे कसे काय झाले काकांना नकळतच भीती वाटू लागली.

 ते पुन्हा बाहेर आले तुळशीजवळच पोहोचले होते तेवढ्यात वीज आली आणि समोरचं दृश्य बघताच त्यांचे डोळे विस्फारले गेले.......

काय होतं समोर? ते कळेलच पुढच्या भागात तोपर्यंत मजेत रहा चांगले विचार, चांगली माणसं ह्यांचं अनुकरण करा. मनासोबतच फोन स्वच्छ करत जा म्हणजे नकारात्मक फोटो वगैरे काढून टाका . . 
_____________________________________
प्रतिक्रियांची वाट बघत आहे. 

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

कालाय तस्मै नमः (भाग ४ -६)

कालाय तस्मै नमः| भाग ४

आस्तनीतले साप 

श्रीपाद दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साधनेच्या खोलीतून बाहेर आला. साधनेच्या वेळी त्याला काही गोष्टींचा अंदाज आला होता त्यामुळे तो बऱ्यापैकी स्थिरावला होता. अरुंधतीच्या तब्येतीत फारशी सुधारणा नव्हती. पण वैद्यांच्या औषधांमुळे तिचा त्रास बराच सुसह्य झाला होता. तिच्या तब्येतीची बातमी एव्हाना बाकीच्यांकडे पोहोचली होती. 


झालं गेलं बाजूला ठेवून सगळेजण एकेक करत वाड्यावर येण्यासाठी तयारी करत होते. सगळे येण्यापूर्वीच अरुंधतीला काकांना काहीतरी सांगायचे होते. त्यासाठी तिने श्रीपादला तशी कल्पना दिली. तसे काकांना त्याने सांगितले. त्यांनाही अंदाज आला होता. ते अरुंधतीच्या खोलीत गेले. जिला बघताक्षणी महालक्ष्मीचा भास काकांना होत असे, ती अरुंधती अगदी कृश अवस्थेत पहुडलेली होती. पण त्या अवस्थेतही तिच्या चेहऱ्यावरचं तेज अजिबात कमी झालेलं नव्हतं. उलट एका वेगळ्या आणि विलक्षण प्रकाशाचं वलय तिच्या आसपास त्यांना जाणवलं. प्रचंड त्रास होत असतानाही ती तो हसतमुखाने सहन करत होती. 


काका शेजारीच असलेल्या खुर्चीवर बसले. डोळ्यात जमा झालेल्या अश्रूंना त्यांनी नकळतच टिपण्याचा प्रयत्न केला. पण तिला ते समजलेच. 
हळुवार हसत ती म्हणाली, “काका तुम्ही नात्याने जरी माझे सासरे असलात तरी तुम्ही कधीही मला सुनेसारखे वागवले नाही. मीही तुम्हाला सदैव बाबांच्या जागी मानत आले. वयाने आणि मानाने मोठे असूनही तुम्ही माझ्या अटी कुठल्याही प्रश्नाशिवाय मान्य केल्या तेव्हा तर माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर द्विगुणित झाला. तुम्ही श्रीपादबरोबरच मलाही माझ्या साधनेबाबत मोकळीक दिली. त्यामुळेच आज खरे तर मी तुमच्याशी बोलू शकते आहे. "

"काका आपल्याशी कुठल्याही नात्यांनी जोडली जाणारी सगळी माणसं काही ना काही देवाणघेवाण करण्यासाठीच आयुष्यात आलेली असतात. काही जण आपल्या प्रगतीत वाटेकरी होतात तर काहीजण फक्त आणि फक्त अधोगती करण्यासाठी आलेले असतात. प्रत्येकाचा मुखवट्यामागचा चेहरा वेगळाच असतो तो सामान्य माणसाला सहसा लवकर समजत नाही कित्येकदा तो समजू नये अशीच त्याची म्हणजे परमेश्वराची इच्छा असते. कारण कोण कुठल्या हेतूने आले आहे हे जर आधीच समजले तर माणसाला ना सुखाची आस राहील ना तो दुःखातून सुटण्यासाठी धडपड करेल. त्यामुळे योग्य ती शिकवण मिळेपर्यंत त्याच त्याच स्वरूपाच्या व्यक्ती भेटत असतात, घटना घडत असतात. त्यातून जेव्हा काय शिकायचं हे समजतं तेव्हाच तो धडा पूर्ण होतो. "

"कालचक्र असतं ते . हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आपल्याही कुटुंबात काही अशा विघ्नसंतोषी व्यक्तींनी प्रवेश केला आहे. त्या कोण हे तुम्हाला योग्य वेळ आल्यावर योग्य व्यक्तीकडून समजेल. मी ती व्यक्ती नाही. पण त्या वाईट शक्तींच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तीमुळे आपल्या सगळ्या कुटुंबाची खूप मोठी हानी होणार आहे. अर्थात हे सगळे त्याने ठरविल्याप्रमाणेच जरी घडणार असले तरी तुम्ही, माई, मी, श्रीपाद एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्याची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. "

"माझं जाणं हा माझा ह्यातला सहभाग आहे ह्या जन्मातील, पण माझी आणि त्या शक्तीची लढाई इथेच संपणार नाही. तिला तिच्या चुकांची जाणीव होऊन प्रायश्चित्त करण्याची एक संधी मी जाता जाता देत आहे. जर तसं झालं तर फार बरं होईल आणि मला परतण्याचा मार्ग मोकळा होईल.” 
आश्चर्य वाटून काका तिच्याकडे बघतच होते, 

तेवढ्यात ती पुढे बोलली, “माझा मृत्यू जरी मी स्वीकारला असला तरी त्यासाठी कारण ठरलेल्या व्यक्तीला आणि तिच्यासोबतच कुटुंबालाही त्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. माझ्या अशा मृत्यूमुळे ह्या घरात सहजासहजी मुलीचा जन्म होणार नाही. वंशाला जरी दिवा हवा असला तरीही त्याला जगात आणण्यासाठी स्त्रीचीच गरज असते. पण हे शक्य व्हावे यासाठी त्या व्यक्तींसोबतच सर्वांनी दरवर्षी एका ठराविक वेळी कुलदैवताचे दर्शन घेऊन सर्व काही रीतीने करावे. तिथे तिची मनोमन माफी मागावी असे केले तरच ह्या घरात मुलगी जन्माला येईल. "

"तुम्ही कुटुंबप्रमुख आहात काका त्यामुळे हे करून घेणे तुमच्याच हातात आहे आणि गरजेचे आहे. ह्या गोष्टींमुळे भविष्यात घडणाऱ्या घटनांची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. कदाचित बराच वेळ लागू शकतो पण होईल नक्की. अजून एक महत्त्वाची गोष्ट ह्या घरात पहिली मुलगी जी जन्माला येईल ती मी असेन काका. माझं कार्य पूर्ण होण्यासाठी मला परत यावेच लागणार आहे."  

"तसेच माझ्या मृत्यूनंतर ह्यांना आणि कैवल्यला तुम्ही इथे थांबण्यासाठी आग्रह करू नका. मी त्यांना काही विशिष्ट हेतूने दूर जाण्यास सांगितले आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला, ह्या घराला त्यांची गरज असेल ते इथे येतील. कैवल्यला भविष्यात घडणाऱ्या घटनांसाठी तयार करायचे आहे त्यामुळे तो दूरच असेल. "

"तुमची पुण्याई माझ्या पुनर्जन्मातही माझ्या सोबत लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आणि माईंनी खंबीर असणं खूप गरजेचं आहे. मी मागत आहे ते खूप अवघड आहे काका माहिती आहे मला पण अशक्य नक्कीच नाही. ह्या वास्तूला तिच्यात राहणाऱ्या चांगल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी तयार केलं आहे मी. पण त्याच्यात भर घालण्याचे काम तुम्हाला करावं लागणार आहे आणि ते कसं करायचं ते तुम्हाला ठाऊक आहे. "

"माझी एक विनंती आहे ,आज मी जे काही तुम्हाला सांगितलं ते योग्य वेळ येईपर्यंत कुणालाही सांगायचं नाही. योग्य वेळ आली की तसे संकेत तुम्हाला मिळतील आणि कुणाला सांगायचं हेही कळेल. त्याच वेळी त्या वाईट शक्तीच्या प्रभावाखाली कोण आहेत आणि किती जण आहेत हेही उघड होईल. माझ्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी कराल ना?”

अरुंधती काकांकडे बघत म्हणाली. तसे भानावर येत त्यांनी होकार दिला. ते म्हणाले, “खूप मोठी जबाबदारी दिलीस गं मला. तू माझ्या घरात सून म्हणून आलीस तेव्हाच मला तुझ्या रूपाने दैवी शक्ती च्या आगमनाची जाणीव झाली होती. वेळोवेळी तू आम्हाला सावरलंस, वाचवलंस आणि आता आमच्यासाठी स्वतःची आहुतीही दिलीस. तुझे खूप मोठे ऋण आहे आमच्या घरावर. तू जे सांगितलंस ते करून ते ऋण थोडेतरी फेडण्याचा प्रयत्न मी नक्की करेन.” 

दिवेलागणीची वेळ झाली होती, त्यामुळे काका खोलीतून निघून सरळ देवघरात गेले. माईंचं दिवा लावून दोन्ही मुलांकडून (अरुंधतीचा कैवल्य आणि संगीताचा समीर) शुभंकरोती म्हणून घेणं सुरू होतं. क्षणभर तिथे थांबून देवाला नमस्कार करून काका बाहेर येऊन बसले. 

श्रीपाद त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, “एक विचारायचं होतं काका. खरं तर परवानगी हवी होती.”
“कशासाठी?”, काकांनी विचारलं. 

“परवा पर्यंत सगळे जण येणार आहेत पण त्याआधीच मला घरात गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. अरुंधतीची तशी इच्छा आहे शेवटची,” असं म्हणत त्याने आवंढा गिळला. काका उसनं हसतच म्हणाले, “मग त्यात विचारतोस काय? कर की. तूच करणार आहेस की नेहमीच्या गुरुजींना बोलवायचे?” 

“मीच करणार आहे तशी मी सुटीची तजवीज केली आहे.” “ठीक आहे. मग बाकी तयारी करण्यासाठी माईला सांग.” हो म्हणत श्रीपाद माईंशी बोलण्यासाठी गेला. काका पुन्हा विचारांमध्ये हरवले. 

येणारा प्रत्येक दिवस घरात आणि नात्यात खूप काही बदलून टाकणार होता, ह्याची जाणीव त्यांना क्षणासाठी अस्वस्थ करून गेली. नकळतच आकाशाच्या दिशेने त्यांचे हात जोडले गेले आणि मुखातून बाहेर पडले, कालाय तस्मै नमः| ......

कुठल्याही व्यक्तीला त्रास सहन केल्याशिवाय काहीच मिळत नाही जर एखादी गोष्ट सहज मिळत असेल तर हे नेहमी लक्षात ठेवावे की कुठेतरी कुणीतरी त्याची किंमत नक्की मोजली आहे आपल्यासाठी, आपल्यावरच्या प्रेमासाठी. 

_____________________________________

कालाय तस्मै नमः| भाग ५ 

पारायण 

पहाटेच साधना आवरून श्रीपाद खोलीबाहेर आला. माई आणि संगीताची तयारी करून झाली होती. अरुंधतीला थोडंसं बरं वाटत असल्याने ती आज लवकर उठून आवरून बसली होती. 

घरात वेगवेगळ्या पूजा , पारायणे सतत होत असत त्यामुळे त्यासाठी एक विशिष्ट जागा तयार केली होती, जिथून संपूर्ण घराकडे नजर टाकणे शक्य होत असे. आणि वाचनाचा आवाजही घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जात असे. 

ह्या जागेच्या अगदी समोर एक खोली होती, जिथे अरुंधतीच्या बसण्याची व्यवस्था केली होती. तिला खूप वेळ बसून राहून ऐकणे शक्य नसल्याने झोपून ऐकता येईल अशी सोय होती. तसेच मधल्या जागेत इतरांसाठी बसण्याची सोय होती. 
           
 देवाला नमस्कार करून श्रीपादने संकल्प सोडत वाचनास सुरुवात केली. वाचनाच्या दरम्यान अरुंधतीला त्रास होऊ लागला, पण त्याची कल्पना त्याला आणि तिला स्वतःला आधीपासूनच होती. माई पूर्ण वेळ तिच्याजवळच बसून होत्या. तिच्या जीवाची होणारी तगमग त्यांना बघवत नव्हती पण दुसरा पर्याय नव्हता. 

खरे तर शक्य तेवढी नकारात्मक ऊर्जा घरातून आणि सगळ्यांमधून बाहेर पडावी म्हणून अरुंधतीनेच हा मार्ग श्रीपादला सुचवला होता. श्रीपादनेही साधना करताना त्याच्या गुरूंना साद घातली, तेव्हा त्यांनीही त्याला संमती देत असं केल्यास होणारा त्रास कमी होईल असं सुचवलं. 


शक्य तेवढं स्वतःला शांत ठेवत अरुंधती सहन करत होती. काही वेळातच वाचन पूर्ण झालं. बाकी सर्व आवरून श्रीपादही अरुंधती जवळ आला. आज तिला खूप त्रास झाला होता, पण पारायण पूर्ण होईपर्यंत हा त्रास कमी होईल अशी अपेक्षा होती. तिचा चेहरा खूप थकल्यासारखा दिसत होता पण तरीही ती समाधानी वाटत होती. थकव्यामुळे तिला झोप लागली तसा तो बाहेर पडला. 

घरातच काही गोष्टी त्याला शोधायच्या होत्या. अडगळीच्या खोलीत बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर त्याला जे अपेक्षित होतं ते सापडलं. आज पहिलाच दिवस असूनही घरातील वातावरणात बराच फरक पडल्याचं जाणवत होतं. संध्याकाळी विजय, अशोक त्यांच्या कुटुंबासह आले.
नुकतेच बाहेरून आल्यामुळे सगळेजण आधी हातपाय धुवून मगच अरुंधतीच्या खोलीकडे आले. ती जराशी ग्लानीतच होती. तिची अवस्था बघून ललिता आणि अश्विनीला रडू आवरलं नाही, त्यांना शांत करत सर्वचजण बाहेर आले. 

विषप्रयोग केल्याची माहिती इतर कुणालाही द्यायची नाही हे आधीच ठरल्याने ह्या सगळ्यांना असाच काहीतरी आजार झाल्याचं सांगितलं होतं. सगळेचजण झालेल्या घटनेने कुठेतरी हादरले होते. सकाळ होता होता श्रीधर आणि मंदाही पोहोचले. 

आज पारायणाचा दुसरा दिवस होता. पण आज घरातील सर्व व्यक्ती हजर होत्या. काका , श्रीपाद दोघांचंही वाचताना बारीक लक्ष सगळ्यांवर असणार होतं. जरी योग्य वेळ आल्यावर ती व्यक्ती कळणार असली तरी मानवी मनाला एकदा एखाद्या गोष्टीबद्दल उत्सुकता निर्माण झाली की ते त्याला शांत बसू देत नाही हे इथे कळते. श्रीपादने वाचन सुरू केले तसे सगळेचजण एकेक करून येऊन बसले. माई अरुंधतीचा हात हातात घेऊन कालच्यासारख्याच आजही तिच्याजवळ बसल्या होत्या. जसाजसा एकेक अध्याय पूर्ण होत होता, आज अरुंधतीला जास्त त्रास होत होता.

 एक क्षण असा आला की अरुंधतीची शुध्द हरपली. माई आणि संगीताचा एकच गोंधळ उडाला. श्रीपाद वाचन थांबवू शकत नव्हता, पण फक्त एक सेकंदासाठी थांबत त्याने अरुंधतीकडे बघितले. तो पुन्हा वाचू लागला. सगळ्यांचं लक्ष विचलित झालं होतं. पण ह्या गोष्टीचा फायदा घेत त्या व्यक्ती तिथून निसटल्या होत्या. पण कुणीतरी त्यांना जाताना बघितलं होतं. त्यांच्या मध्ये एका बाजूला बोलणं सुरू होतं. 

पहिली व्यक्ती-- बरं झालं तिला चक्कर आली, मला बसवत नव्हतं तिथे. 

दुसरी -- हो न. हा पारायणाचा घाट का घातला ह्या लोकांनी? आधीच माहित असतं तर आपण आलोच नसतो. 

पहिली-- मग काय आता इतक्या दिवसांची मेहनत पाण्यात जाणार आपली. जाऊ दे आपल्या वाटेतला मोठा अडसर दूर होतो आहे हे काही कमी आहे का?

दुसरी--- श्रीपादचे काय करायचं? तो येईलच ना आडवा? 

पहिली-- हं बघू, त्याचंही करू काहीतरी. आता चला पटकन नाहीतर कुणाला तरी शंका येईल. 

इकडे कुणीतरी माईंसमोर पाण्याचा ग्लास धरला. माईनी तो घेत अरुंधतीला पाणी पाजून बसतं केलं. आता तिला बऱ्यापैकी शुद्ध आली होती. 

पाण्याचा ग्लास घेऊन आलेली व्यक्ती मात्र अजूनही आपण जे ऐकलं ते खरं होतं की आपला भास होता ह्या संभ्रमात होती. 


श्रीपादचं वाचन सुरूच होतं. हळूहळू पुन्हा सगळे स्थिर झाले. ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. त्या दोन व्यक्ती ही स्वतःला होणाऱ्या त्रासावर नियंत्रण ठेवत बसण्याचा प्रयत्न करत होत्या. कुणीतरी त्यांना लक्षात येऊ नये अशा पद्धतीने त्यांचे निरीक्षण करत होते. पण श्रीपाद आणि काकांना मात्र ती व्यक्ती सापडलीच नव्हती. 


नकारात्मक गोष्टी किती आणि कोणत्या थराला जाऊन व्यक्तीकडून काय काय करून घेतात हे आता लक्षात आलंच असेल. आपण जेव्हा काहीतरी बाहेरचं आहे वगैरे ऐकतो तेव्हा काय करतो? काही जण विश्वास ठेवतात, काही जण खिल्ली उडवतात. 

हा प्रत्येकाचा अनुभव आणि दृष्टीकोन असतो. पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर जितका वाईट प्रभाव तंत्र मंत्र अशा गोष्टींचा असतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तो विचारांचा असतो. 
चांगले विचार चांगलं वर्तन घडवून आणतात आणि त्यांचे परिणामही चांगलेच होतात. त्याउलट वाईट विचार वाईट कृतींना प्रोत्साहन देतात त्यामुळे होतं काय वाईट गोष्टी घडतात. आपण मात्र दोष त्याला देत राहतो. 


हल्लीच्याच नाही आधीच्या काळापासून हे असं होत आहे. का? कारण वाईट विचार हे आपली पाठ सहजासहजी सोडत नाहीत, चांगले विचार मनात टिकवण्यासाठी मात्र सातत्याने प्रयत्न करत रहावे लागते. 

अध्यात्म आणि विज्ञान जर हातात हात घालून आपल्या मदतीला सिद्ध असतील तर त्यांचा योग्य ठिकाणी योग्य पध्दतीने वापर करणं आपल्याला शिकलं पाहिजे. 
उदाहरण द्यायचं तर आपल्याला कधी कधी वाटतं काहीतरी वाईट घडणार आहे असा विचार दूर सारण्याऐवजी मन अजून त्यावरच विचार करू लागतं. होतं काय? आपल्याकडूनच नकळत त्या नकारात्मक उर्जेला खतपाणी मिळतं. त्यामुळे सकारात्मक असणं आणि त्यावर टिकून राहणं खूप गरजेचं आहे. 

खूपच तात्त्विक झालं ना? पण काय करणार कथेचा गाभा असाच आहे. माणसाला जोपर्यंत स्वतःमध्ये असणाऱ्या सकारात्मक शक्तीची जाणीव होत नाही तोपर्यंत तो कालचक्रात भरडला जातो.

चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माणसाची निवड ठरवते तो चांगला आहे की वाईट. इतरांच्या नजरेत चांगले होण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत चांगले होण्यासाठी प्रयत्न करत रहावे.
_____________________________________

कालाय तस्मै नमः| भाग ६

अरुंधतीला निरोप

पारायण सात दिवसांचं होतं. सगळा त्रास सहन करत अरुंधती रोज हट्टाने बसण्याचा प्रयत्न करत होती. आज सातवा दिवस होता. उद्यापन ही असणार होतं. 

घरातील सगळ्या स्त्रिया उद्यापनासाठी लागणाऱ्या तयारीत गुंतल्या होत्या. माई अरुंधतीच्या जवळ राहूनच छोटी छोटी मदत करत होत्या. सात दिवसात तिची तब्येत जरा नाजूकच झाली होती. पण चेहऱ्यावर असणारं तेज मात्र काहीतरी वेगळीच जाणीव करून देत होते.
 
त्या दोन्ही व्यक्तींनी आपलं काम आता काही काळासाठी थांबवलं होतं. कारण घरात सुरू झालेल्या परायणामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केल्यास काय फटका बसेल ह्याची कल्पना त्यांना त्यांच्या मार्गात मदत करणाऱ्या ‘त्या’ साधकाने दिली होती. 


सध्या तरी शांत राहून जे होत आहे त्याचं निरीक्षण करत रहा आणि मला कळवा असे त्याने सांगितलं होतं. ही व्यक्ती वयाने बरीच वृद्ध होती. आणि अघोरी तंत्र मंत्र साधनेसहच विशिष्ट औषधांचं ज्ञानही तिला होतं. तिनेच ते विष पुरवलं होतं पण ते कुणावर वापरलं जाणार आहे हे तेव्हा त्या व्यक्तीलाही माहित नव्हते. जेव्हा तिला ते कळलं तेव्हा आपण नकळतच एका दैवी शक्तीला त्रास दिला आहे हे तिला जाणवलं. म्हणूनच आता ती त्या सगळ्यांमधून अंग काढून घेत होती. ह्या दोघांना शांत राहण्यास सांगणं हे त्याचं पहिलं पाऊल होतं. 


पण जसं आधीही मी नमूद केलं आहे की खेळ सुरू जरी ह्यांच्या हातून झाला असला तरी तो किती आणि कशी वळणं घेत जाईल हे कुणाच्याही हातात उरणार नाही. 
त्या साधकाने आपल्या परीने प्रायश्चित्त करण्यासाठी सुरुवात केली होती. वाट अर्थातच खडतर असणार होती. त्याचे परिणामही त्याला दिसू लागले होते. वाड्यातले पारायण संपताच तेथील त्या दोघांना ह्या गोष्टीची कल्पना द्यायची आणि हा नाद सोडून द्या असं सांगायचं त्याने ठरविलं. 

इकडे पारायणाची सांगता झाली होती. आरती पूर्ण होऊन नैवेद्य दाखवला जात असतानाच दारावर कुणीतरी आल्याची जाणीव काकांना झाली. 

एक अत्यंत दयनीय अवस्थेतील माणूस दारात उभा होता. एका बाजूला जिथे ब्राम्हणांची पंगत बसणार होती त्या शेजारीच पण वेगळं असं आसन तात्काळ श्रीपादने मांडलं. 

माईंनी लगबगीने तिथे रांगोळीची चार बोटे ओढत ताट मांडलं. काका त्या माणसाला घेऊन आत आले. त्याला हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं आणि त्या आसनावर बसण्यास सांगितलं. तो बसताच इतरांनाही बसण्यासाठी विनंती केली. पहिला घास घेताच त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित आलं. जेवण झाल्यानंतर श्रीपाद सर्वांना दक्षिणा देत नमस्कार करत होता. तो त्याच्या जवळ आला तसे त्याने श्रीपादला अर्ध्यातूनच उठवून मिठी मारली. त्या व्यक्तीच्या शरीराला येत असणारा सुगंध क्षणार्धात श्रीपादला जाणवला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले. त्या अश्रूंचा अर्थ फक्त काकांना कळला. 


पारायण सफल झालं होतं. “कुठे आहे ती?,” त्या व्यक्तीने विचारले. श्रीपाद त्यांना घेऊन अरुंधतीच्या खोलीत गेला. आत जाताच त्याने दरवाजा बंद केला. काही वेळाने ते बाहेर पडले. काका त्यांना सामोरे गेले, तसे त्यांनी काकांकडे अत्यंत प्रेमपूर्वक बघितले. ते म्हणाले, “मला माहित आहे की हे सगळं सावरणं जमेल की नाही अशी शंका तुमच्या मनात आहे. पण काळजी करू नका. कितीही अवघड परिस्थिती निर्माण झाली तरी मी सदैव तुमच्या पाठीशी असेन. माझ्या अस्तित्वाची जाणीव वेळोवेळी तुम्हाला होत राहील. अरुंधती आणि श्रीपाद ह्या कुटुंबात आहेत ही सुध्दा माझ्या अस्तित्वाची एक खूणच आहे." काकांच्या मनातले भाव ओळखत ते पुढे म्हणाले, 


“ज्या गोष्टी जेव्हा घडायच्या आहेत त्या घडणारच. कालचक्रात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणालाही नाही. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हेच तर कालचक्राचे महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यातून जर देवाची सुटका झाली नाही तर मग माणसाची कशी होणार?” 
काकांना जणू काही ते काय बोलत आहेत ते समजले. त्यांनी होकारार्थी मान डोलावली. तेवढ्यात लहानसा कैवल्य तिथे आला.

 त्यांनी त्याला उचलून घेतले तसे त्याने विचारले, “तुम्ही माझ्या बाबांचे मित्र आहात?” त्यांनी हसून उत्तर दिले, “हो आणि तुझाही मित्र आहे. पुन्हा भेटशील न मला?” त्याला खाली ठेवत त्यांनी विचारले. त्यानेही निरागसपणे “हो” असे उत्तर दिले. तसे त्याच्या डोक्यावर हात ठेवत ते काहीतरी पुटपुटले, ते कुणालाही ऐकू आले नाही. 

फक्त शेवटचे कल्याणमस्तु तेवढे श्रीपादला ऐकू आले. 

निरोप घेऊन ते घराच्या बाहेर पडले. आत येताना जी पिशवी हातात होती ती विसरलेली श्रीधरच्या लक्षात आली तसा तो ती देण्यासाठी बाहेरच्या दिशेने गेला. पण वाड्याच्या समोरची वाट पूर्ण रिकामी होती तिथे कुणीही नव्हते. वाड्यापासून मूळ रस्त्यापर्यंत जाण्यासाठी कमीतकमी पाच मिनिटांचा सरळ रस्ता होता त्याला कुठेही फाटे फुटत नव्हते. त्यामुळे तो माणूस कुठे गायब झाला ह्या विचारातच श्रीधर पिशवी घेऊन परत आला.

 प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याने काका आणि श्रीपादला बघितले. त्यांनी त्यालाच ती पिशवी उघडण्यास सांगितले. त्या पिशवीतून दोन छोट्या पादुका त्याच्या हातात आल्या. पण जशा त्या त्याच्या हातात पडल्या तसे त्याला चटका बसल्याची जाणीव झाली. त्याने पटकन त्या श्रीपादच्या हातात दिल्या. आणि तो लगबगीने आत निघून गेला. आत गेल्यानंतर त्याने थंड पाण्यात आपले हात बुडवले. मग त्या हाताकडे बघितले त्यावर एका पादुकेचा आकार हुबेहूब उमटला होता. जणू काही ते त्याला जाणीव करून देत होते की तू जे काही करायचे ठरवत आहेस ते विचारपूर्वक ठरव. त्याचे परिणाम ह्यापेक्षा भयंकर असतील. 


श्रीधरच ती व्यक्ती होता ज्याने त्या दोघांचे बोलणे ऐकले होते. पण मग त्याला चटका का बसला? कारण ते बोलणे ऐकल्यानंतर हळूहळू श्रीधरच्या मनातही तसेच विचार येऊ लागले होते. आणि तो त्या व्यक्तींना सामील होण्याच्या मार्गावर होता. म्हणूनच त्याला ही सूचना मिळाली होती. आता त्यातून तो काय धडा घेणार की तो त्या मार्गाने जाणार हे तर येणारा काळच ठरवणार होता. 


दुसरीकडे त्या दोन व्यक्ती तशा अस्वस्थच होत्या. पण त्याचं कारण वेगळं होतं. त्या साधकाने त्यांना रात्री उशीरा भेटण्यासाठी बोलावलं होतं. घरातून निसटायचं कसं ह्यावर त्यांच्या डोक्यात विचार सुरू होते. 

रात्री निजानीज झाल्यानंतर त्या दोन्ही व्यक्ती घराबाहेर पडल्या आणि ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्या. 

तो साधक आधीच तिथे येऊन बसला होता. त्याला बघताच नकळत त्यांच्या दोघांच्या मनात चर्र झालं. त्याची अवस्थाच अशी झाली होती. 


तो बोलू लागला, “तुम्ही मला फसवून माझी मदत घेतलीत. मला दैवी शक्ती विरुद्ध वापरले म्हणून आज माझी ही अवस्था झाली आहे. नीट बघून घ्या, मी आता काही दिवसांचाच सोबती आहे. तुम्हीही हा मार्ग सोडून द्या अन्यथा तुमचे हाल माझ्यापेक्षा वाईट होतील.” 


तसे त्या दोघांच्या मधील एक जण बोलला, “इतक्या फालतू गोष्टीसाठी तू आम्हाला बोलावलंस? आम्हाला चांगलंच माहिती आहे आम्ही काय करत आहोत आणि कुणाच्या विरोधात करत आहोत. तुला नसेल मदत करायची तर नको करुस आता आम्हाला इतकं ज्ञान नक्कीच मिळालं आहे की आम्ही स्वतः पुढच्या गोष्टी करू शकतो.” 


तो फिकटसा हसला आणि म्हणाला, “अर्धवट ज्ञान नेहमीच भयंकर परिणाम करतं. पण काय करणार विनाशकाले विपरीत बुद्धी.” आणि निघून गेला. 


तो गेला त्या दिशेने बघत त्या व्यक्तीही क्षणभर तिथे थांबल्या आणि वाड्यावर निघून आल्या. त्यांना परत येताना श्रीधरने बघितले होते. पण सध्या तरी तो गोंधळात पडला होता. 

एकीकडे त्याला फायदे दिसत होते तर दुसरीकडे होणारे तोटे. 

श्रीपाद मात्र ह्या सगळ्यांमधून लक्ष काढून घेऊन अरुंधतीच्या उशाशी बसला होता. खोलीत आल्यावर त्याने त्याचे खरे रूप प्रकट केले होते. 


तो अरुंधतीच्या भेटीला आला म्हणजेच आता अरुंधतीची जाण्याची वेळ जवळ आली हे नक्की होते. जाता जाता त्याने पादुकाही दिल्या होत्या. त्याचाच अर्थ श्रीपादच्या आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण होत आले होते. आता नवीन अध्यायाला सुरुवात होणार होती. हा अध्याय किती आणि काय काय रहस्य घेऊन येणार होता हे एक रहस्यच होते. 

हातात असणारा अरुंधतीचा हात थंड पडलेला श्रीपादला जाणवले. त्याच वेळी काकांच्या गंभीर स्वरातला तारक मंत्र त्याच्या कानावर पडला, काकांना जेव्हा जेव्हा भीती वाटत असे किंवा वाईट घटना घडणार आहे असे वाटे तेव्हा ते मनाला शांत करण्यासाठी तारक मंत्र म्हणत असत. 

नि:शंक हो निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी,

जिथे स्वामीपाय तिथे न्यून काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला,

उगाची भितोसी भय हे पळु दे.
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा.

खरा होई जागा श्रद्धेसहीत,
कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त.
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगू स्वामी देतील साथ,

विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.

काकांच्या मनातली भीती खरी ठरलेली त्यांना कशी सांगावी हेच त्याला सुचेना. 

श्रीपाद शांतपणे काकांच्या समोर येऊन पायाजवळ बसला. त्याच्या डोळ्यातून दोन अश्रू त्यांच्या पायांवर पडले. तसे त्यांनी अरुंधतीच्या खोलीकडे धाव घेतली. थोड्याच वेळात बातमी सगळीकडे गेली. 

सगळेजण दुःखात बुडाले होते. त्या व्यक्तीही वाईट वाटल्याचे दाखवत होत्या पण मनोमन मात्र त्यांना आनंद झाला होता. असतात अशीही माणसं. 

फक्त टीव्ही मालिकेत नाही तर ह्या खऱ्या खऱ्या जगात असतात. पण खऱ्या आयुष्यात त्यांचे मुखवटे सहजासहजी उतरत नाहीत त्यामुळे समजून येत नाही. असो. 

तोपर्यंत मनाला सकारात्मक विचारांकडे वळवत रहा. कितीही दुःखं, संकटं आली तरी खचून जाऊ नका माणसाने मदत नाही केली तरी आपल्या स्वतःमध्ये वास करणारी ती शक्ती आपल्याला नेहमीच योग्य मार्ग दाखवते. तेव्हा आपल्या आतल्या आवाजाला ऐकण्याचा प्रयत्न करा. 

अवघड आहे अशक्य नक्कीच नाही. आणि स्वामी आहेत ना अशक्य ते शक्य करण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी त्यांची नावं जरी वेगळी असली तरी ते कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या मदतीला नक्की येतात. गरज असते ती स्वतःवर आणि त्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची.

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू !!! शुभं भवतु !!! 
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल