शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

फिरुनी नवी जन्मेन मी

नव्यानेच उमलणारी लाजरी, हसरी , नाचरी बाहुली होती ती.  नुकतेच स्वप्नांच्या पावलांनी १६व्या वर्षात पाऊल टाकले होते. 

   शाळेचे धरलेले बोट सुटून सुटली कॉलेजच्या हातात हात दिला होता. जसे जसे नवे विश्व खुणावत होते तसे तिचे पंख भरारी मारण्यासाठी उत्सुक झाले होते. 

 

अशातच एक दिवस बाबांनी हातात नव्याकोऱ्या स्कुटीची चावी टेकवली. आतातर काय आभाळ ठेंगणे झाले. उत्साहाने आवडीच्या सगळ्या ठिकाणी ती गाडीवर भटकून आली. 

  

गाडीच्या वाढलेल्या वेगासोबत मैत्री करताना शरीर देत असलेली सूचना मात्र तिने धुडकावून लावली. आणि अचानक साध्या सरळ मार्गाने निघालेल्या तिच्या आयुष्याला ब्रेक मिळाला. निमित्त झालं एका छोट्या अपघाताचं. डोक्यावर पडल्याने सुरक्षितता म्हणून काही चाचण्या डॉक्टरांनी करायला सांगितल्या. 


निदान - ब्रेन ट्युमर, प्राथमिक सुरुवात होती पण ट्युमर म्हणजे ऑपरेशन. 

जवळचे सगळे हवालदिल झालेले. ही मात्र तशी शांत होती. लवकरात लवकर ऑपरेशन केले तर फायदेशीर ठरेल असे डॉक्टर सांगत होते. हो, नाही करत तिने सगळ्यांना तयार केले. डॉक्टरांनी ऑपरेशनची तारीख दिली पुढच्याच आठवड्यातली. 


तारीख बघताच तिच्या आईवडिलांचे उसने अवसानही ओसरले. तिचा वाढदिवस होता त्या दिवशीच. आपल्या लेकीला ज्या दिवशी पहिल्यांदा हातात घेतले त्याच दिवशी तिच्या ऑपरेशनच्या फॉर्मवर सही करायची हे विचारच त्यांना सहन होत नव्हते. 


तिने मात्र धीराने घेत दोघांनाही समजावून सांगितले की, 'देव मला पुन्हा एकदा संधी देतो आहे नव्याने सुरुवात करण्यासाठी म्हणून तर इतका स्पेशल दिवस निवडला आहे.' 


ठरलेल्या दिवशी ऑपरेशन करण्यात आले. ती दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आली. डोळे उघडताच समोर आईबाबा दिसले. एवढया त्रासातही चेहऱ्यावर हसू आणून 

त्यांना चियर अप करण्यासाठी गाऊ लागली, 

"एकाच ह्या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा"

गौरी हर्षल कुलकर्णी

२६ जुलै २०२०




जरा विसावू या वळणावर....

"भले बुरे जे घडून गेले

विसरून जाऊ सारे क्षणभर

जरा विसावू या वळणावर"

ह्या ओळी गुणगुणत असतानाच तिचा काम करणारा हात आणि विचारात भरकटणारं मन दोघेही थांबले.


खरंच रोजच्या जगण्यात किती आणि काय काय सुटून गेलं नं? जी माणसं कधी काळी खूप जवळची होती ती आज कुठेच नाहीयेत. असं का होतं? मग आठवणींचा पट उलगडतच राहिला अन् नकळतच तिचे डोळे भरून आले.


कसे कोठुनी येतो आपण

कसे नकळता जातो गुंतून

उगाच हसतो उगाच रुसतो

क्षणात आतुर क्षणात कातर


लहानपणीचं घर तिथलं अंगण ,अंगणातलं कैरीचं झाड आयुष्यातले पहिले सवंगडी तिथेच मिळाले.

त्यातले काही इतके दूर गेले की चेहरेही धूसर झाले त्यांचे. काही मात्र अजूनही त्या आठवणी ताज्या करत मनात आणि आयुष्यातही टिकले.


माणसं अशीच हरवत राहतात का प्रत्येक वळणावर??? पण जरी ती हरवली तरी आठवणी तर असणार आहेतच ना त्यांच्या कायमचं तिने स्वतःच स्वतःला उत्तर दिलं. शोधायचं म्हटलं तर सगळे सापडतील लगेच पण तोच निरागस मैत्रीत पुढे केलेला हात पुन्हा तितक्याच निरागसपणे हातात येईल का? की उगाच फेसबुक, वॉट्सअप्प वर जगाला दाखवण्याच्या नादात कैरीच्या , लिंबाच्या, आंब्याच्या कडूगोड आठवणी आठवणीच होऊन राहतील? तरीही ती हूरहूर लागतेच मनाला.


जुनी खेळातली नावं, लुटुपुटूची भांडणं, रुसवे, फुगवे, भातुकली सगळं कसं आत्ता घडत असल्यासारखं नजरेसमोर नाचलं. हातातली कामं आवरत तिने आज जुने अल्बम काढले. प्रत्येक फोटो एक नवीन आठवण आणि खूप दिवस टिकेल, पुरेल असं समाधानाचं हसू देऊन गेला तिला. खूप काही आहे आपल्याजवळ पण आपण उगाचच नवीन काहीतरी शोधत फिरतो असा विचार मनात येताच ती स्वतःशीच हसली.


संध्याकाळी घरी आल्यावर नवरा आणि मुलंही तिचं हे रूप पाहून खुश झाली. तितक्यात तिच्या जुन्या घराजवळचे कुणीतरी काका काकू भेटले आणि काय काय मस्त आठवणी सांगत होते असं नवरा म्हणू लागला. चला, मनातली तगमग योग्य मनापर्यंत पोचली ह्या विचाराने तिला अजूनच छान वाटलं. पुन्हा एकदा ती गुणगुणू लागली.....


खेळ जुना हा युगायुगांचा

रोज नव्याने खेळायाचा

डाव रंगता मनासारखा

कुठली हुरहुर कसले काहूर

जरा विसावू ह्या वळणावर


गौरी हर्षल कुलकर्णी

२६ जुलै २०२०






कितीदा नव्याने

"कितीदा नव्याने तुला आठवावे,

डोळ्यातले पाणी नव्याने वहावे"


गाणं ऐकलं आणि त्याला नकळतच हसू आलं. स्मृतींची पाने उलटून तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाही. 


नकळत्या वयात तिच्या प्रेमात पडला होता तो. ते नक्की प्रेम आहे की आकर्षण हेही समजत नव्हते.


 ती वर्षं त्याच्या आयुष्याच्या, करियरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वर्षं होती. पण मधेच ती भेटली आणि एका क्षणात त्याच्या मनात खळबळ माजली. 


अभ्यास एके अभ्यास करत जगणारा मुलगा सगळं काही सोडून तिच्या स्वप्नांमध्ये रमू लागला. रात्रंदिवस सतत तीच दुसरं काही त्याला सुचेना. ती दिसली की तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिच्या अवतीभवती घुटमळत राहू लागला. 


आजूबाजूला सर्वांनाच जसं हे समजलं तसं तिलाही समजलं होतच.इतर मुलींसारखं तिलाही ते आवडत होतं,पण तीही त्याच्यासारखीच होती करियर वगैरे गोष्टीना पहिली प्रायोरीटी देणारी त्यामुळे इतक्या हुशार मुलाने असं वागलेल तिला आवडलं नव्हतं. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. 


शेवटी एक दिवस त्याने तिला त्याच्या भावना सांगितल्या, तिला कदाचित अंदाज आला होताच. दोन दिवस मागून घेत ती निघून गेली. 


तिच्या वागण्याने गोंधळून गेलेला तो तिला पाठमोरी जाताना बघत होता. दोन दिवसानंतर तिच्या मैत्रिणीने एक पत्र आणून त्याला दिले. ती त्या दिवशी भेटली ती परत आलीच नाही. 


तिच्या न येण्याने तो पुरता कोलमडून गेला होता. पुढचे काही दिवस फक्त आणि फक्त निराशेत, उदास गाणी ऐकण्यात गेले.  ते पत्र अजून उघडून बघितलेही नव्हते त्याने. 


शेवटी कसाबसा मनाचा हिय्या करत त्याने ते पत्र उघडले. त्यात लिहिलेलं वाचल्यावर जे काही घडलं ते कुणालाही अनपेक्षित अस होतं. त्या दिवसानंतर तो आमूलाग्र बदलला. 


एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस. 


आयुष्यात ठरवलेल्या सर्व गोष्टी त्याने प्रचंड कष्ट करून मिळवल्या होत्या. आज जेव्हा त्याला त्यासाठी पुरस्कार मिळत होता तेव्हा तो मात्र त्याच श्रेय तिला देत होता. 


ते पत्र त्याने एक क्षणभरही स्वतःपासून दूर केले नव्हते.


त्यांचं एकत्र येणं कधीच शक्य होणार नव्हते पण ते तिने इतक्या छान पद्धतीने सांगितले की त्याला तिला गमावूनही मिळवल्याची जाणीव झाली. 


त्या समजूतदार पत्राने त्याला प्रेमाचा नवा मार्ग दाखवत सोबतीची उणीव भरून काढली होती. ती आज नसूनही त्याच्यासोबतच होती. 

गौरी हर्षल कुलकर्णी

२७ जुलै २०२०






अंतरंगातला देव

गॅलरीत ठेवलेल्या आरामखुर्चीत बसून आप्पा रेडिओवर गाणी ऐकत होते. पुढचं गाणं सुरू झालं तसा त्यांच्या डोळ्यांसमोर एक चेहरा तरळून गेला. 

तो दिवस आठवल्यावर त्यांच्या अंगावर काटा आला. 


पावसाने सगळीकडे थैमान घातलं होतं. श्रावण महिना असल्याने त्या दिवशी घरात पूजा केली होती. रजत कुरकुर करतच पुजेला बसला होता. त्याचा ह्या सगळ्या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता पण आप्पांचं मन मोडू नये म्हणून तो  करत असे. 

आप्पा त्याला नेहमी समजावत की एक दिवस कुठल्या न कुठल्या रुपात तो नक्की तुला भेटेल. तेंव्हा तूच मला सांगशील. 


अशातच संध्याकाळी मागच्या गल्लीत असणारी चाळ कोसळली अशी बातमी आली. थोड्याच वेळात त्यांच्या इथेही सूचना आल्या गरजेच्या सामानासह दुसरीकडे निघण्याची तयारी सुरु करा अशा. 


आप्पा ही सगळ्यांच्या सोबत ठरलेल्या ठिकाणी आले. 

"काय उपयोग झाला पूजा करून आला का तुमचा देव आपल्याला वाचवायला? उलट घर सोडून आलो आपण." रजत बडबड करू लागला. 


पाण्याचा जोर वाढला होता. सगळ्यांच्याच मनात आता खळबळ माजली होती. सोबत काही लहान मुले,गरोदर स्त्रियाही होत्या. 

हळूहळू त्या सगळ्यांना पुढच्या ठिकाणी पोहोचण्याचं काम सुरू झालं. रजतसोबतच सगळी तरुण मुलं मदतीसाठी पुढे झाली. 

जातपात, वय, स्त्री पुरुष सगळे भेदभाव बाजूला सारून फक्त माणुसकीच्या नात्याने जो तो मदत करत होता. रात्र सरता सरता सगळे टेकडीच्या माथ्यावर असलेल्या मोठ्या मंदिरात जाऊन पोहोचले. 

रजत एका वयोवृद्ध आजोबांना पाठीवर घेऊन आला होता. त्यांना व्यवस्थित जागा बघून त्याने बसविले तसे त्याचे दोन्ही हात घट्ट धरून डोळ्यांना टेकवत आजोबांनी नमस्कार केला. 

"अहो आजोबा हे काय करताय?" असे म्हणत रजत मागे सरकला.

"अरे लेका , तुझ्या रुपात माझा देव धावून आला बघ,  आज त्याचं दर्शन झालं मी भरून पावलो. नाहीतर माझ्यासारख्या म्हाताऱ्याकडं सगळ्यांनी दुर्लक्ष केलं होतं. पण त्याने तुझ्यामार्फत माझी मदत केली. दगडातला देव भेटला नाही पण माणसातला भेटला अजून काय पाहिजे?" 


रजतने डबडबलेल्या डोळ्यांनी आप्पांकडे बघितलं आणि त्याच वेळी जवळच्याच पायरीवर बसून एक आंधळा भिकारी गाऊ लागला, 


तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो

नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो

तुझ्यामाझ्यात भेटंल साऱ्यात तो

शोध, नाही कुठे या पसाऱ्यात तो

रोज वृंदावनी फोडी जो घागरी

तोच नाथा घरी वाहातो कावडी

गुंतला ना कधी मंदिरी, राउळी

बाप झाला कधी जाहला माऊली

भाव भोळा जिथे धावला तो तिथे

भाव नाही तिथे सांग धावंल का?

बघ उघडुनी दार अंतरंगातला देव घावल का?


गौरी हर्षल कुलकर्णी

२७ जुलै २०२०




लग जा गले

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो


तिच्या आवाजातली व्याकुळता तो आपल्या मनात नकळतच साठवून ठेवण्याची धडपड करत होता. ड्युटी पुन्हा जॉईन करा असा तडकाफडकी निरोप आल्यावर त्याच्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी तिचा चेहरा आला होता. दोनच दिवसांनी असणारा त्याचा वाढदिवस ह्यावेळी तरी एकत्र साजरा करता येईल म्हणून किती प्लॅन करत होती ती. काही त्याला सांगून तर काही लपून छपून. पण आता मात्र ते शक्य नव्हतं. 


शेवटी मनाचा हिय्या करत त्याने तिला सांगितलंच. क्षणभर तिच्या डोळ्यांत पाणी आलं. पण पुढच्याच क्षणी स्वतःला सावरत ती त्याला म्हणाली, "बरं झालं माझी सगळी तयारी झाली होती ते. तुझे सगळे गिफ्ट्स तरी तुला प्रत्यक्ष देता येतील. आणि तुला अजून काही हवं असेल तर ते ही आणता येईल. उद्या दुपारी जाणार न तू?"


तिचं वागणं बघून तो थक्क झाला होता. आपल्याला कस कळलं नाही कधी एवढी स्ट्रॉंग झाली ही? सायन्सच्या प्रॅक्टिकलला डिसेक्शन करताना घाबरलेली ती आणि आत्ताची ही केवढा फरक पडला. 

ते काहीही असलं तरी मी मात्र अजूनच प्रेमात पडतोय हिच्या. माझ्यासोबत माझी स्वप्नं भरभरून जगतानाही तिने स्वतःच्या स्वप्नांना जिवंत ठेवलं आहे. सोबतच घरच्यांनाही सांभाळते. तो स्वतःशीच विचार करत असतानाच ती आली आणि म्हणाली, चल रे सगळे जमले आहेत टेरेसवर आज मस्त पोटभर गप्पा मारू. 


त्या गप्पाच्या ओघातच त्याने तिला गाणं म्हणायला लावलं होतं आणि रेकॉर्ड पण करून घेतलं होतं. 

ती हसली तेंव्हा तो म्हणाला होता, "आठवणीच जगण्यासाठी मदत करतात ग. अवघड क्षणी डोळे मिटून एक छानशी आठवण जगून घेतो मी कारण ती मला बळ देते समोर आलेल्या संकटाला परतवून लावण्यासाठी. मी एकवेळ माणसाचे चेहरे विसरेन पण आठवण मात्र मनाच्या एका कप्प्यात सुरक्षित असेल. आणि तीच मला नव्याने सुरुवात करताना सोबत करेल." 

तेच गाणं तो ड्युटीवर परत जाताना रिपीट मोडवर ऐकत होता. पण प्रत्येक वेळी त्याला तिची नवीन आठवण हसवून जात होती. 


काही दिवसानंतर

इकडे आता त्याचा संपर्क तुटल्यापासून पंधरा दिवस झाले होते. 

शोध जरी सुरू असला तरी तो कधी सापडणार? कशा अवस्थेत ह्याची काही कल्पना नव्हती.मनातून मात्र  प्रत्येकाला आपल्या शंका खोट्या ठराव्यात असच वाटत होतं. 

 शेवटी शोध लागेल कधीतरी अस म्हणत सगळेच आपापल्या मार्गाला लागले. तीही आशेच्या हिंदोळ्यावर झुलत त्याची वाट बघत होती. पण मन मानेल तर ना? 


आणि एक दिवस तिला अपेक्षित बातमी आली. तो सापडला होता. बेशुद्ध अवस्थेत पण जिवंत होता. ती मिळेल त्या वाहनाने त्याच्या जवळ पोहोचली. पण त्याच्या डोळ्यात ओळखीची खूण नव्हती. बऱ्याच उंचावरून पडल्याने आणि वेळेत उपचार न मिळाल्याने आठवणी धूसर झाल्या होत्या. 


जखमा ताज्या असल्याने मेंदूवर ताण देऊन चालणार नव्हते. तेव्हा फक्त जुजबी ओळख पटवून देत तिने त्याला घरी येण्यासाठी तयार केले होते. 

सगळे सोपस्कार पार करून त्याने स्वतःच्याच घरी गृहप्रवेश केला. माणसं जरी त्याला अनोळखी वाटत असली तरी त्यांचे डोळे त्याला सतत काहीतरी वेगळं दाखवत होते. 


आईवडिलांसाहित सगळ्यांनी मिळून आधी त्याच्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. तो मान्य करून तो ही आता त्यांच्यामध्ये मिसळू लागला होता. 

तिचीच कल्पना होती ती पण ती स्वतः मात्र जरा जपून त्याच्या आसपास वावरत होती. कारण तो तिच्याकडे बघितलं की अस्वस्थ व्हायचा. ही व्यक्ती आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती आहे हे त्याला जाणवत होते पण तिचं आणि आपलं नातं नेमकं काय आहे हेच त्याला आठवत नव्हते. इतरांना त्रास नको म्हणून त्याने वरवर जरी नवराबायको आहोत हे मान्य केले होते तरी एकांतात मात्र त्याने तिला वेळ मागितला होता. तिनेही त्याला तो दिला होता कारण त्याच्या आठवणींच्या थियरीवर तिचा पूर्ण विश्वास होता. 


अशातच एके दिवशी तिला सहज गाणं म्हणायची हुक्की आली तो घरात नव्हता त्यामुळे ती मस्त मोकळ्या आवाजात मनापासून सूरांना आळवत होती. 


पास आइये कि हम नहीं आएंगे बार-बार

बाहें गले में डाल के हम रो लें ज़ार-ज़ार

आँखों से फिर ये प्यार कि बरसात हो न हो

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो


मनातलं सगळं दुःख तिच्या आवाजात स्पष्ट जाणवत होतं. शेवटची ओळ म्हणत असताना ती मागे वळाली आणि जागेवरच थबकली. समोर तो उभा होता डोळ्यात अश्रू पण ओठांवर मात्र आज ओळखीचं हसू आलं होतं. त्याच्या आठवणीनी अखेर त्याला तिची ओळख पटवून दिली होती. 

गौरी हर्षल 




बुधवार, २२ जुलै, २०२०

मला आवडलेलं पुस्तक भाग १

#मला_आवडलेलं_पुस्तक
जिवात्म जगाचे कायदे / laws of spiritual world 
लेखिका - खोरशीद भावनगरी

मागच्या वर्षी एका ग्रुपवर अशीच पुस्तकावर चर्चा सुरू होती तिथे ह्या पुस्तकाचा विषय निघाला. कुणाला आवडले होते कुणाला नाही. 

चर्चा वाचून शेवटी पुस्तक मागवलं. हे पुस्तक मात्र नेहमीप्रमाणे एका बैठकीत वाचून संपवलं नाही. निवांत वेळ काढत एकेक प्रकरण वाचलं. आणि मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. 

पुस्तक लिहिले आहे खोरशीद भावनगरी ह्यांनी. पुस्तकाच्या नावावरून विषयाचा अंदाज येतोच पण तरीही सांगते. हे पुस्तक हा त्यांच्या दोन दिवंगत मुलांच्या आत्म्यांशी असलेला संवाद आहे. असा संवाद जो व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील बऱ्याच सवयी, पद्धती ह्यांच्यावर पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडतो. 

पुस्तक कुठलीही अंधश्रद्धा पसरवत नाही कारण तसं काहीच ह्या पुस्तकात नाही. ह्या आत्म्यांशी संवाद हा विशिष्ट पद्धतीने साधला गेला आहे. त्या पद्धतीही त्याचं उत्तम ज्ञान घेऊनच वापरल्या आहेत. (Planchet वगैरे फालतू प्रकार नाहीत? )

मला हे पुस्तक आवडण्याचं कारण म्हणजे एक तर वयाच्या मानाने बऱ्यापैकी लवकर ते माझ्या हातात पडले आहे. आणि दुसरे म्हणजे जेव्हा आयुष्यात एखादी वाईट किंवा चुकीची गोष्ट घडते तेव्हा आपण आपलं नशीब, देव किंवा इतरांना बोल लावत बसतो. पण हा विचार कधीच करत नाही की अरे मी कधी न कधी कळत नकळत त्या व्यक्तीचं, प्राण्याचं काही नुकसान केलं आहे का? 

कारण हे पुस्तक पूर्वजन्मापासून ते मृत्यूनंतर घडणाऱ्या अनेक गोष्टी साध्या सोप्या भाषेत सांगते. अर्थात  ज्या मला पटल्या आहेत. 


छोटी छोटी उदाहरणे देत सत्यकथेवर आधारित हे पुस्तक वाचताना आयुष्याची एक नवीन बाजू सांगते हे मात्र नक्की. 

(वाचायचे असल्यास पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध आहे.)
#गौरीहर्षल
#पुस्तकवाचन


मंगळवार, २१ जुलै, २०२०

रंजीश ही सही🎶🎶 भाग १

रंजीश ही सही 🎶🎶

भाग १ 

आपल्या छोटयाशा घरात असणाऱ्या मोठ्या खिडकीत टांगलेल्या झोपाळ्यावर झोके ती बाहेर कोसळणारा पाऊस बघत होती. 

मागे बॅकग्राऊंडला रुना लैलाच्या आवाजात तिची आवडती गझल बरसत होती अगदी रिपीट मोडवर. 
(Lyrics By: अहमद फ़राज़)

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ

अब तक दिल-ए-खुशफ़हम को हैं तुझ से उम्मीदें
ये आखिरी शम्में भी बुझाने के लिये आ
रंजिश ही सही...

इक उम्र से हूँ लज्ज़त-ए-गिरया से भी महरूम
ऐ राहत-ए-जां मुझको रुलाने के लिये आ
रंजिश ही सही...

कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिये आ
रंजिश ही सही...

माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ
रंजिश ही सही...

जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ
रंजिश ही सही...

पहले से मरासिम ना सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रहे दुनिया ही निभाने के लिये आ
रंजिश ही सही...

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफा है तो ज़माने के लिये आ
रंजिश ही सही...

एका क्षणी तिला मनावरचा भार इतका नकोसा झाला की मेंदूचं न ऐकता डोळे पाझरू लागले. 

का इतक्या हतबल झालो आपण? ती स्वतःलाच विचारू लागली. का आपण एकदाही प्रयत्न केला नाही स्वतःच्या समाधानासाठी? जी मुलगी स्वतःच्या सुखासाठी तडजोड करत नव्हती ती त्या व्यक्तीच्या एका शब्दाखातर सगळं सोडून कशी काय निघून आली? 

दुसरीकडे तिच्याच मनाने त्या प्रश्नांची उत्तरे दिली, मग काय करू शकणार होतीस तू? त्या क्षणी तुझ्या सुखापेक्षा इतरांची आयुष्य जास्त महत्वाची होती. 
    आणि आफ्टर ऑल द ग्रेट पौरवी देशमुख ह्यांना त्याग करून मोठ्ठं व्हायचं होतं न? शेवटचं वाक्य ऐकताच तिच्या अंगावर काटा आला. 

खरंच अस होतं सगळ्यांच्या नजरेत मोठेपणा हवा म्हणून मी अशी वागले की मला त्या सगळ्यांचं सुख महत्वाचं वाटलं? 
मोठेपणाच हवा होता तर घरच्यांना हव्या असलेल्या मुलाशी लग्न करूनही मिळवता आला असता की.
 पण मला ते नव्हतं करायचं मला स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि त्यालाही दाखवून द्यायचं होतं की पौरवी देशमुख काय चीज आहे. 
जिने एकदा नातं जोडलं की मग ती त्या व्यक्तीसाठी काहीही करू शकते. आणि जर नातं तोडलं तर त्याचं लोकांना कायमचं विसरून जगुही शकते. 

काय म्हणाला होता तो मला? तू जळतेस माझ्यावर! अरे हट मी जर तुझ्यावर जळले असते न तर तुझ्या हातात माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीचा हात कधीच दिला नसता. 

आरुषी , तिचं नाव ओठांवर आणि चेहरा क्षणार्धात पौरवीच्या नजरेसमोर येऊन गेला. लग्नाच्या वेळी आरु च्या चेहऱ्यावर असणारा तो आनंद बघण्यासाठी तर पौरवीने आयुष्यभरासाठी वनवास स्विकारला होता. 

मुंबईत असणारे सरळसोट पण जीव की प्राण आयुष्य सोडून  ती  ह्या मनालीजवळ असणाऱ्या गावात येऊन राहिली होती. सगळ्या सुखसोयी सोडून स्वतःच्या जीवावर मागच्या दोन वर्षात तिने बरीच प्रगती केली होती. 

आज तिच्याकडे छोटंसं घर, गाडी तर होतीच पण अहोरात्र मेहनत करून तिने तिच्या बुटीकच्या दोन शाखा तिने मनालीत उभ्या केल्या होत्या. पण तिला शांत वातावरण खूप आवडतं असल्याने तिने घर घेताना ते गाव निवडलं होतं. तिथून मनालीला  जाण्यास फारसा वेळ लागत नव्हता त्यामुळे तिला ते सोयीचं होतं. 

आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेलच की ही नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळी कथा आहे. 
तर ही गोष्ट आहे एका अशा मुलीची जिचा प्रवास सुरू झाला मुंबई मध्ये आणि सध्या तो येऊन थांबला आहे हिमाचल प्रदेशात असणाऱ्या मनालीत. 
पौरवी देशमुख , एका नाकासमोर चालणाऱ्या मराठी कुटुंबात जन्माला आलेली ज्येष्ठ कन्या. अभ्यासात प्रचंड हुशार असायलाच हवी न कारण मध्यमवर्गीय लोकांना त्याशिवाय पर्यायच नसतो. पण तरीही तिने फॅशन डिझायनिंगचं क्षेत्र निवडलं आहे. 

त्या क्षेत्रात ती थोडीफार धडपडत उभी रहातच होती पण तेवढ्यात तिच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की तिला सगळं काही सोडून द्यावे लागले. 

आता अस काय घडलं होत ते कळेलच हळूहळू तोपर्यंत पहिला भाग कसा वाटला नक्की कळवा. 
क्रमशः
#गौरीहर्षल