सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४

Change your story...


 #change_your_story
माणसाला बदलाची भीती कायम वाटत असते. कारण कुठलाही बदल घडताना काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात तर काही गोष्टी नव्याने अंगिकाराव्या लागतात. आणि या प्रवासात आपण हमखास मागे सुटलेल्या गोष्टींचा विचार करत असतो. बऱ्याचदा त्या टप्प्यापर्यंत पोहोचताना आपण काय कमावलं आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. 
Read that again.

दुर्दैवाने ज्या गोष्टी आपल्याला सोडाव्या लागल्या आहेत किंवा ज्या आपल्या आयुष्यातून आपोआप वजा झाले आहेत आपण त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो. पण तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त लक्ष आपण आयुष्यात काय मिळवू शकतो किंवा आपल्याला काय मिळायला हवे याकडे नसते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण काय डिझर्व्ह करतो हेच आपल्याला माहीत नसते. 

कधी कधी आपल्या हातात असलेली छोटीशी गोष्ट आपण घट्ट धरून ठेवलेली असते. ती घट्ट धरून ठेवण्यामागे अर्थातच आपल्या मनात गमावण्याची भीती असते. पण त्या भीतीच्या दुसऱ्या टोकाला बऱ्याचदा काहीतरी खूप मोठं आणि आपल्याला अनपेक्षित असणार सुखद सरप्राईज असतं. अर्थात जोपर्यंत ती गोष्ट आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपला तिच्यावर विश्वास बसत नाही हे मात्र नक्की.‌

पण एक गंमत सांगू का? ही मनात असलेली भीती नकळतच आपल्या मनाचे, हृदयाचे नवीन काहीही स्वीकारण्याचे सगळे दरवाजे बंद करून टाकते. मग या बंद दरवाजांपर्यंत दुर्दैवाने काहीच पोहोचू शकत नाही. 
मग अशा वेळेला काय करायचं? तर काही साध्या सोप्या गोष्टी असतात त्या प्रामाणिकपणे स्वतःला विचारायच्या आणि त्यांची मनाशी संवाद साधल्यानंतर मिळणारी उत्तर स्वीकारण्याचा प्रयत्न करायचा. 
मी स्वतः वापरते अशा काही छोट्याशा टिप्स - 
👉🏼 माझ्यासोबत ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या स्वीकारण्याची संधी मी स्वतःला देते आहे का? 
How much am I ALLOWING myself to receive at this moment?

हा प्रश्न स्वतःला विचारल्यानंतर स्वतःचे नीट निरीक्षण करा.‌ आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये काय बदल घडत आहेत ते बारकाईने तपासा. 
👉🏼तुम्ही आत्ता ज्या स्थितीमध्ये आहात तिथे तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही याचा विचार करा. 
👉🏼 दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना आपण पुरेसा ऑक्सिजन आत मध्ये घेत आहोत की नाही याकडे लक्ष द्या. त्यानंतर हळूहळू श्वास सोडा. 
👉🏼 या अतिशय आपसूक घडणाऱ्या गोष्टी आहेत. आपण आवर्जून कधीही यांच्यावर लक्ष केंद्रित करत नाही. 
👉🏼हीच गोष्ट आपल्याकडून आपल्या बाबतीत घडणाऱ्या चांगल्या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा होते. आपण बऱ्याचदा चांगल्या गोष्टी, चांगल्या व्यक्ती ह्यांना गृहीत धरत असतो. आणि त्यामुळे आपल्या विचारांचा फोकस हा आपल्याला काय मिळालेलं नाही यावर जास्त असतो. 

गोष्टी हातातून निघून गेल्यानंतर त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यापेक्षा त्या हातात असताना कृतज्ञता व्यक्त करणे कधीही चांगलंच असतं. त्यामुळे नकळतच आपण आपल्याकडे येणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी वाट करून देत असतो. "आपण जे देतो ते दाम दुपटीने आपल्याकडे परत येतं" हे नेहमी आपण दुसऱ्याच्या बाबतीतच का म्हणतो?? स्वतःसाठी का नाही?? जर आपण आपल्यासाठी चांगले विचार केले, आपल्यासाठी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, तर नकळतच आपल्या दिशेने येणाऱ्या चांगल्या गोष्टींमध्ये चांगल्या अनुभवांमध्ये भर पडू शकते. 

गरज असते ती फक्त आपल्या दृष्टिकोनाला पुन्हा पुन्हा रिसेट करण्याची... हे काही फार अवघड नसतं. पण ते करण्यासाठी आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यावं लागतं हे मात्र नक्की. 

शेवटी म्हणतात ना, आपण जर कधी गोष्टी संपवण्याचा विचार करत असो तर एकदा आपण एवढा टप्पा पूर्ण करून इथपर्यंत कसे पोहोचलो आहोत याचा सुद्धा विचार करावा. कारण आपण आज जिथे उभे आहोत तिथे येण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागले आहेत. आणि त्या कष्टांचे चीज तेव्हाच होईल जेव्हा आपण स्वतःसाठी निवडलेल्या मार्गावर सातत्याने चालत राहू. 
सो, आजचा हा रिमाइंडर ज्याला तुम्ही affirmation सुद्धा म्हणू शकता, नक्कीच लक्षात ठेवा, 
I am always a work in progress. I am never done. I am constantly improving, upgrading, expanding, growing, experimenting, exploring and discovering a better version of myself. 
बाकी? बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!! 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
लेखन - गौरी हर्षल कुलकर्णी 
(एम ए क्लिनिकल सायकॉलॉजी, समुपदेशन )

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

Prisoner of your own thoughts 6/8

Prisoner of your own thoughts 

 दत्तगुरु 👉🏼चाणक्य👉🏼 आणि मी
चाणक्य लिहीत असताना हल्ली बऱ्याचदा माझ्या ज्ञानात भर पडत असते. आणि खरं तर ती पडायलाच हवी. कारण कधी काळी मित्रासमोर बसून रडत रडत केलेल्या तक्रारीवर चाणक्य हा उपाय आहे असं मला वाटत. मला नाही कळत रे तुझ्या जगाचे छक्के पंजे असं मी नेहमी म्हणायचे. हे ऐकून ऐकून कदाचित दत्त वैतागले असतील 🫣 आणि म्हणाले असतील घे बाई एका दगडात दोन पक्षी मारतो. तू बिझी पण राहशील आणि खरे छक्के पंजे कसे असतात हे पण कळेल. ते सुद्धा त्यामध्ये "द" असलेल्या माणसाच्या चरित्रातून🤷 
खरा गुरू हा एका जागी बसवून शिकवत नाही हे मात्र खरं. तो आपल्या शिष्याला स्वतः प्रयत्न करण्यासाठी भाग पाडतो. 
मग ते एखादं नवीन स्किल शिकणं असो किंवा स्वतःच्या मनातल्या भीतीवर मात करणं. जोपर्यंत शिष्य त्यातून योग्य तो धडा शिकत नाही तोपर्यंत सराव कम्पल्सरी... 
सो गेल्या काही महिन्यात एक गोष्ट सातत्याने समोर आली ती म्हणजे, गुलामगिरी मग ती नात्यातली असुदे किंवा विचारांची... जोपर्यंत माणूस स्वतः त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्याची सुटका होत नाही. नात्यातली गुलामगिरी म्हणजे आजच्या भाषेत toxic relationships, red flags वगैरे वगैरे... आणि विचारांची गुलामगिरी म्हणजे तर मोठी लिस्ट आहे.... overthinking, negative thoughts, negative self talk, negative self image बला... ब्ला....ब्ला....

तर तुम्ही स्वतः जोपर्यंत काही गोष्टी स्वीकारत नाही तोपर्यंत आयुष्याचा प्रवास सुकर होत नाही. इथे गरज असेल तेंव्हा बाहेरची मदत सुद्धा घ्यावी पण कुणाची तर एखाद्या तज्ञ व्यक्तीची. उगाचच कुठल्याही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे पेजेस पाहून त्यांच्याकडे जाऊ नये. 
असो, जाता जाता एकच सांगते, माझ्या गुरूने माझ्यासाठी जसा अजून एक गुरू पाठवला. तसं तुम्हीही योग्य वेळी योग्य गुरूला शरण जा. 
शिकवत तर सगळेच असतात एकमेकांना 
पण गुरूचं शिकवणं वेगळचं असतं...
हे अनुभवा अंती सांगते. 
खरा गुरू तुम्हाला अनुभवांच्या भट्टीतून तावून सुलाखून बाहेर काढल्याशिवाय थांबत नाही. फक्त आपल्याला ते कळायला हवं. 
गुरूवार = संकल्पदिन 
#दृष्टिकोन_बदला_आयुष्य_बदलेल
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
६/८








Shadows of yesterday 5/8

Shadows of yesterday....

भूतकाळ ही काही अडकून पडण्याची गोष्ट नाही. पण आपल्यापैकी बरेच जण भूतकाळातच अडकलेले असतात. त्या ऐवजी त्या भूतकाळाला एक स्टेपिंग स्टोन म्हणून घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. भूतकाळात घडलेल्या गोष्टी कधीकधी आपल्याला त्रासदायक ठरत असतात. पण अशा घटनांना स्वीकारून त्या अनुभवातून योग्य तो धडा घेणे आणि स्वतःच्या व्यक्तीमत्त्वामध्ये त्या दिशेने बदल करणे हे खूप जास्त गरजेचे असते. हे असं करणं सोपं नक्कीच नसतं.

 पण त्या आव्हानाला एकदा स्वीकारल्यानंतर आयुष्य जगण्याची खरी मजा कशात आहे हे मात्र माणसाला कळतं. मग अशा कितीही चुकीच्या घटना घडल्या संकटं आली तरी माणूस ठामपणे त्यांना सामोरे जातो. शिवाय भूतकाळ स्वीकारून त्यातून योग्य तो धडा शिकलेला व्यक्ती पुन्हा पुन्हा त्या घटना, त्या व्यक्ती समोर आल्या तरी कमकुवत होत नाही. शेवटी भूतकाळात रमून भविष्यकाळावर किती परिणाम करत राहायचं हे आपल्या हातात असतं. 

माझ्या लेखांमध्ये बऱ्याचदा उल्लेख असतो की भूतकाळात घडून गेलेल्या घटना मधून आपण काय शिकलो ते आठवा. त्यावर मनन चिंतन करा. आणि त्या गोष्टींना मार्गातला अडथळा बनवण्यापेक्षा भविष्याच्या दिशेने जाणारी पायरी बनवा. 
माफ करण्याचा प्रयत्न करा. मग ते माफ करण स्वतःला असू दे किंवा इतरांना.... माफ केल्याने भूतकाळाच्या सावल्यांपासून स्वतःची सुटका करून घेण्याचा मार्गच आपण सुकर करत असतो. 
Start where you are....
मी असं केलं तर.... तसं होईल.... असा विचार करत बसण्यात आपण भरपूर वेळ वाया घालवत असतो. त्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यासाठी पाऊल उचलणं गरजेचं असतं. स्वयंशिस्त किंवा self discipline हे कशी गोष्ट आहे जी आपण अंगी बाणवणे गरजेचे असते. आणि त्यासाठी छोट्या छोट्या कृतींमधून पाऊल पुढे टाकावे लागते. म्हणून तर म्हटले आहे की, start where you are... 
तुम्ही आत्ता जिथे आहात तिथून सुरुवात करा. या आधी भलेही काहीही घडलेलं असेल. पण आता त्या गोष्टींना मागे टाकून नव्याने सुरुवात करण्यातच भलाई आहे. हळूहळू आपली पावलं ध्येयाच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात करतील. आणि मग एक दिवस नक्कीच यश आपल्या हातात आलेलं असेल. 


#दृष्टिकोन_बदला_आयुष्य_बदलेल
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
५/८



शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

blind perception 4/8

Blind perception 

या लेखमालेतल्या आधीच्या एका लेखावरती एक कमेंट आली होती. ती म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतो, तेव्हा त्यातली काही लोक मात्र आपल्याला खिजवण्यासाठी आपला अपमान करतात किंवा आपल्याला तुच्छ लेखतात. त्यांना असं वाटतं की त्यांनी जे काही यश मिळवलं आहे. त्याच्यामुळे आता समोरच्याला स्वतःच्या लायकीची जाणीव झाली असेल. 
तर इथे पुन्हा एकदा तुलनेचा मुद्दा येतो. काही लोकांना दुसरे यशस्वी झाले तर पोटात दुखत तर काही लोकांना ते स्वतः यशस्वी झाले की दुसऱ्यांना त्रास द्यावासा वाटतो. पण या दोन्ही कॅटेगरी मधल्या लोकांना इतरांशी आपल्या आयुष्याची तुलना करण्याची सवय असते. आता इथे लोकांनी असं करावं की करू नये हा मुळात वादाचा मुद्दा नाही. 
मुद्दा हा आहे की जेव्हा लोक असे वागतात तेव्हा आपण कशा पद्धतीने त्या गोष्टी घ्यायच्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची की समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करत आहे, हा पूर्णपणे तिचा दृष्टिकोन आहे. त्या व्यक्तीचा दृष्टिकोन जेव्हा आपण स्वीकारतो, तेव्हा नकळतच तिने आपल्याबद्दल केलेल्या कल्पना मग त्या खऱ्या असो किंवा नसो त्या आपण स्वीकारत असतो. तर आपण हे पर्सनली घेणं थांबवायला हवं. 
आपल्याबद्दल इतरांचा दृष्टिकोन आपण कसे आहोत हे ठरवत नाही. तर आपण स्वतः स्वतः बद्दल काय विचार करतो त्यावरून आपले व्यक्तिमत्व ठरते. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल ना की माणसाने घातलेले कपडे, त्याने केलेला मेकअप यापेक्षा सुद्धा तो आत मधून स्वतःबद्दल काय फील करतो त्याने त्याचं व्यक्तिमत्व जास्त ठळक होतं. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या यशाच्या फुटपट्टीतून आपल्या आयुष्याचा मोजमाप काढत असेल तेव्हा ते न स्वीकारणं हाच योग्य मार्ग असतो. 

बाकी स्वभावाला औषध नसतच.‌ आणि जी लोक यशस्वी झाल्यानंतर इतरांशी नीट वागत नाहीत त्या लोकांचे पुढे जाऊन काय होतं ते मी सांगायची गरज नाही. 
बाकी अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी ती म्हणजे या प्रत्येक गोष्टी फिरून फिरून पुन्हा बाउंड्रीज सेट करण्यावर जाऊन थांबतात. नातं जवळच असो किंवा लांबच त्यामध्ये मर्यादा पाळणं हे खूप जास्त गरजेचे असतं. कारण त्या मर्यादा कटू गोष्टी टाळण्यासाठी मदत करतात. 

 जाता जाता एक सांगते, आपण कितीही म्हणालो की पुराणातली वांगी पुराणात.... तरी कुठल्याही प्रकारचे यश मिळाल्यानंतर उतू मातू नये आणि घेतलेला वसा सुद्धा टाकू नये. 
याचा साधा सरळ अर्थ म्हणजे आपण यश मिळवण्यासाठी जे कष्ट केले आहेत त्याच मार्गावर सातत्याने चालत राहावं पुढे यशस्वी होण्यासाठी... 
#दृष्टिकोन_बदला_आयुष्य_बदलेल
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
४/८

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

Turning point = upgrade yourself 3/8

Turning point = upgrade yourself 
कधी कधी आयुष्यात अचानक काही गोष्टी घडतात. एखादं आव्हान समोर उभे ठाकते, अचानक स्मूद चाललेल्या आयुष्याच्या गाडीला ब्रेक लागतो, काहीतरी अनपेक्षित वळण आयुष्य 360 डिग्रीच्या कोनातून बदलून टाकते.... त्यावेळेला आपण आधी असं म्हणतो की मीच का?? माझ्यासोबतच का?? 
आणि खरं सांगायचं तर त्यावेळी आपल्याला त्या फेजमध्ये होणाऱ्या त्रासाशिवाय दुसरं काहीच दिसत नसतं. या गोष्टीला कालांतराने काही वेळ, दिवस, महिने, वर्षं उलटून जातात आणि मग जेव्हा आपण मागे वळून पाहतो.
 तेव्हा आपल्या लक्षात येतं की तो त्रास यातना ते दुःख वेदना हे आपल्याला घडवण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे होते. 
आयुष्यात जोपर्यंत अडथळे येत नाहीत, आव्हान समोर उभं ठाकत नाही, एखादा धक्का बसत नाही. तोपर्यंत आपण आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर जायला तयार नसतो. कदाचित त्यामुळेच नियतीची किंवा देवाची अशी इच्छा असते की आपल्याला बसलेल्या झटक्याने तरी आपण जागे व्हावे. 
सो अशा धक्के खात.... टक्के टोणपे सहन करत.... आयुष्याच्या रोलर कोस्टल राइडवर अजूनही टिकून असणाऱ्या सगळ्यांसाठीच आजचा रिमाइंडर... 
एकदा निवांत वेळ काढून आपल्या पूर्वायुष्यातल्या प्रत्येक अनुभवावर चिंतन करा. 
त्या अनुभवातून आपण कोणकोणत्या चांगल्या गोष्टी शिकलो हे एका ठिकाणी नमूद करून ठेवा. 
शिवाय त्या अनुभवामुळे आपण माणूस म्हणून किती घडलो आहोत याचा आढावा घ्या. 
अनुभव हे धडे देण्यासाठी असतात. पण हे धडे शाळेतल्या धड्यांसारखे शिकून विसरून जायचे नसतात तर ते कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे असतात. आणि त्या धड्यांना गिरवत आयुष्याचा एक एक टप्पा पुढे जायचं असतं. 
गोष्टी घडून गेल्यानंतर कधीतरी आपल्या प्रत्येकाच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडतं जे काही होतं ते चांगल्यासाठीच...
मग योग्य वेळी या चांगल्यासाठी घडणाऱ्या गोष्टी स्वीकारून आपण स्वतःला घडवण्याच्या दिशेने पाऊल टाकूया...
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
३/८



 

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

comparison 2/8

आपल्या आयुष्यात आपल्याला अशा काही व्यक्ती भेटतात, ज्यांना दुसऱ्यांना कुठल्याही गोष्टीत यश मिळालं तरी पोटात दुखतं. मग अगदी त्या स्वतः रनिंग रेस मध्ये पहिल्या आल्या असल्या आणि दुसरी व्यक्तीची लिंबू चमचाच्या शर्यतीत पहिली आली असली, तरी त्यांना दुसऱ्याच्या लिंबू चमचाच्या शर्यतीत पहिलं येण्याने त्रास होत असतो. आणि तो त्रास त्या व्यक्त सुद्धा करत असतात. पण आपल्या असं करण्याने इतर लोक दुखावली जात आहेत हे त्यांच्या गावी सुद्धा नसतं. कधी कधी चुकून आपण सुद्धा असं वागतो बर का...

यामध्ये जी दुखावलेली लोक असतात ना? ती मात्र बऱ्याचदा स्वतःला एक प्रश्न विचारत असतात, की माझ्या यशाने या समोरच्या व्यक्तीच्या यशात किंवा आयुष्यात काहीच फरक पडणार नाहीये. मग हिला एवढा त्रास का होतोय?? तर त्याचं मुख्य कारण फक्त एवढंच असतं की त्या व्यक्ती स्वतःचा आयुष्य दुसऱ्यांबरोबर सातत्याने कम्पेअर करत असतात. 
त्यांना दुसऱ्याच्या आनंदात, यशात सहभागी व्हावेसे वाटत नाही. अर्थात यामुळे कोणाचाही यश किंवा आनंद कमी होत नाही. पण जनरली जर आसपासच्या लोकांना गोष्टी पर्सनली घ्यायची सवय असेल तर त्यांना मात्र फार त्रास होतो. जिला आपण जवळची व्यक्ती समजत आहोत. ती आपल्या आनंदात, यशात सहभागी होत नाहीत याचं दुःख होतं.  

या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट काय असते माहित आहे ती म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही विशिष्ट गोष्टी घडण्याची वेळ ठरलेली असते. शिवाय थोड्याफार फरकाने जे काही घडत असतं ते सारखंच असतं. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मधल्या वेळात प्रत्येक माणूस सारख्याच स्थित्यंतरातून जात असतो. काही जण पूर्व संचितामुळे हे टप्पे लवकर पार करतात तर काहीजणांना वेळ लागतो इतकंच. 

शिक्षण, नोकरी, लग्नं, मुलं, संसार या इतरांशी तुलना करण्याच्या गोष्टी नाहीत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरून इतरांसोबत आपल्या आयुष्याची तुलना करण्यापेक्षा आपण काल काय होतो आणि आपण आज काय आहोत याची तुलना केलेलं जास्त चांगलं राहिलं. 

तसही या सगळ्या गोष्टी प्रत्येक जण करत असल्याने त्यामध्ये नावीन्य असं काहीच नाही. ही गोष्ट तुम्ही आज करत आहात, ती तुमच्या आधी कोणीतरी केलेली आहे आणि तुमच्या नंतर सुद्धा कोणीतरी करणार आहे. मग यात कसलं आलं वेगळेपण?? 

ते वेगळेपण आपल्याला आणावं लागतं... कसं?? स्वतःमध्ये योग्य पद्धतीने बदल घडवून... स्वतःच्या स्वप्नातलं आयुष्य घडवण्यासाठी कष्ट घेऊन... 
इतरांशी तुलना करून रडत बसण्यापेक्षा आपण आत्ता ज्या टप्प्यावर आहोत तो टप्पा एन्जॉय करणं जास्त महत्त्वाचं. ती फेज महत्त्वाची...
तुम्ही जर शिकत आहात, तर नुसतं शिकायचं म्हणून न शिकता ते अंगी बाणवण्याचा आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून त्याचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करा. 
तुमचं जर शिक्षण पूर्ण झालं असेल तर आपलं भविष्य घडवण्यासाठी काय करता येईल त्यावर विचार करून कृती करायला घ्या. 
तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर त्या संदर्भातली आपली कौशल्य तपासून पहा आणि नवीन काही शिकण्याची गरज असेल तर ते शिका. 
तुम्ही जर सिंगल असाल तर एकटे असताना सुद्धा भरभरून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. 
जर तुमचं लग्न झालं असेल किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर त्या रिलेशनशिप मधल्या छोट्या छोट्या गोष्टी आठवणीत राहाव्यात म्हणून प्रयत्न करा. 
थोडक्यात काय तर स्वतःवरती कठोर परिश्रम घेण्याची फक्त तयारी ठेवू नका तर ते परिश्रम घ्यायला सुरुवात करा. इतरांच्या टाईमलाईन, कव्हर पेज, प्रोफाइल पिक्चर, स्टोरी, आणि whatsapp स्टेटस कडे बघून स्वतःच्या आयुष्याला कमी लेखू नका. 

कारण इथे प्रत्येकाची टाईमलाईन आणि डेडलाईन सुद्धा वेगवेगळी आहे...
लक्षात घ्या आपल्या आयुष्याची प्रश्नपत्रिका आपल्यालाच सोडवायची आहे. 
जाता जाता एकच सांगते, कोणी आपल्यापुढे गेलं आहे म्हणून स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि कोणी मागे राहिले आहे म्हणून वाईट सुद्धा वाटून घेऊ नका. आपण काल काय होतो आणि आज काय आहोत याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
२/८





Distance 1/8

Distance 


आपल्या बाजूला असे कित्येक लोक असतात की ज्यांची ओंजळ ओसंडून वाहत असते....
पण एखाद्या व्यक्तीकडे सगळं असलं तरी सुद्धा 
त्याला दुसऱ्याकडे असणाऱ्या गोष्टींची भुरळ पडतेच...
आणि मग त्या गोष्टी स्वतःकडे नाहीत म्हणून ती व्यक्ती आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असलेल्या लोकांवर सुद्धा जळत राहते. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करते. 
तुम्ही सुद्धा हे अनुभवलं असेलच ना??
आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती शेवटपर्यंत आपल्या सोबत राहीलच असे नसते.
सो जेव्हा काही लोकांमुळे आपल्याला अनादर, अपमान, त्रास या गोष्टींना सामोरे जावं लागतं. तेव्हा त्या लोकांना दूर करणेच योग्य असते. तुम्ही दुरूनही त्या लोकांचं चांगलं व्हावं असा विचार करूच शकता. त्यासाठी सातत्याने तो त्रास सहन करत त्यांच्या संपर्कात राहणे गरजेचे नसते. 
आणि जर काही नाती अशी असतील जी आपण पूर्णपणे तोडून टाकू शकत नाही. त्या नात्यांमध्ये आपला वेळ आणि एनर्जी किती द्यायची हे मात्र आपल्याला ठरवून घ्यावे लागते. 
सोप्या भाषेत सांगायचं तर बाऊंड्री सेट कराव्या लागतात. 
आपण सुद्धा आदराला पात्र आहोत हे नेहमी लक्षात ठेवा. 
तुम्ही आणि तुमचा आयुष्य या दोन्ही गोष्टी मौल्यवान आहेत. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
१/८