मंगळवार, ६ जून, २०२३

learn from experience...2-365 days of self care

"आर्यन, झालं की नाही तुझं आवरून? उशीर होत आहे आपल्याला.", असं म्हणतच शिला आर्यनच्या खोलीत आल्या.
आर्यन खिडकीजवळ बसून टेबलवर असलेल्या त्या फोटोंकडे एकटक बघत होता. आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

त्याची अवस्था बघून शिलाला सुद्धा भरून आलं. आणि चार वर्षांपूर्वीचा आर्यन समोर उभा राहिला. पडलेले खांदे, रडवेला चेहरा आणि कोलमडून गेलेलं मन अशा अवस्थेतच आर्यन पीजी मधून घरी आला होता.

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शक्य ते प्रयत्न आर्यन करत होता. त्यासाठी तो वाट्टेल ते कष्टही घेत होता.
पण एकामागे एक संकटांची मालिका सुरू झाली. आणि कुठेतरी आर्यनचा आत्मविश्वास डळमळीत झाला.

शीला आणि रमेश मात्र ह्या काळात खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभे राहिले. रमेशची त्याच्या बिझनेस मध्ये पैसे गुंतवण्याची तयारी असूनही आर्यनने त्याला नकार दिला.

नकार देताना आर्यनने त्या दोघांनाही सांगितलं की , "माझ्या बुद्धिमत्तेच्या आणि कष्टाच्या जोरावर मला काही तरी करून दाखवायचे आहे. जर ह्या वेळीही  मला यश मिळालं नाही तर मी नक्की तुमची मदत घेईन. पण मला पुन्हा एकदा प्रयत्न करून बघू द्या. "
त्या दोघांनाही आर्यन ला पुन्हा उभं राहिलेलं बघायचं होतंच. त्यामुळे त्यांनी त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याची साथ द्यायचे ठरवले.

आणि रात्रंदिवस एक करून आर्यन ने घेतलेल्या कष्टाचं चीज झालं. त्याचा बिझनेस हळूहळू का होईना मार्गी लागला.

पण म्हणतात न, पडत्या काळात आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांपैकी कोण आपले खरे हितचिंतक आहेत हे लक्षात येतं. आर्यन ही काही वेगळा नव्हता. त्यानेही हा अनुभव घेतला.

आयुष्याच्या शाळेने त्याला असे काही अनुभव दिले की तो त्यातून तावून सुलाखून बाहेर पडला.

आणि आजच तो दिवस होता, आर्यनला एके ठिकाणी तरुण मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं होते.

मागे वळून पाहताना आज आर्यन ला जाणवलं होतं की अनुभव नावाचा हा गुरू त्याचं आयुष्य किती समृद्ध करून गेला होता.

आर्यन ने तर घेतला होता त्याच्या अनुभवातून योग्य तो धडा म्हणून तर त्याच्या प्रयत्नांना यश मिळालं.  पण आपण त्या दृष्टिकोनातून लक्ष देतो का?

वाचक मित्रमैत्रिणींनो , प्रत्येक अनुभव मग तो चांगला असो किंवा वाईट आपल्याला काही तरी शिकवत असतो.

आणि जोपर्यंत आपण त्या अनुभवातून योग्य तो धडा घेत नाही,  तोपर्यंत आपल्याला त्याच त्याच पद्धतीचे अनुभव येतात.
नकळतच आपण म्हणतो ना की सारखं सारखं हे असच माझ्यासोबत का घडतं?

तर ती नियतीची योजना असते आपण त्या अनुभवातून योग्य तो धडा घेत #स्वतःला_घडवण्यासाठी.
अशावेळी खाली दिलेला सुविचार लक्षात ठेवायचा...
𝑫𝒐𝒏𝒕 𝒃𝒆 𝒂𝒇𝒓𝒂𝒊𝒅 𝒕𝒐 𝒔𝒕𝒂𝒓𝒕 𝒐𝒗𝒆𝒓.
𝑻𝒉𝒊𝒔 𝒕𝒊𝒎𝒆 𝒚𝒐𝒖'𝒓𝒆 𝒏𝒐𝒕 𝒔𝒕𝒂𝒓𝒕𝒊𝒏𝒈 𝒇𝒓𝒐𝒎 𝒔𝒄𝒓𝒂𝒕𝒄𝒉,
𝒚𝒐𝒖'𝒓𝒆 𝒔𝒕𝒂𝒓𝒕𝒊𝒏𝒈 𝒇𝒓𝒐𝒎 𝒆𝒙𝒑𝒆𝒓𝒊𝒆𝒏𝒄𝒆.
#learn_from_experience
#2/365_days_of_selfcare
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 



रविवार, ४ जून, २०२३

feel it heal it...from 1-365 days of self care

"मनीषा अजून किती दिवस धावणार आहेस तू या सगळ्या गोष्टींपासून? कधी ना कधीतरी तुला सगळ्या गोष्टींना फेस करावेच लागणार आहे. चार लोकांमध्ये जाऊन मिसळावे लागणार आहे. पुन्हा एकदा जॉब वर जावे लागणार आहे. पण तू आहेस की तुला फक्त घरात एका कोपऱ्यात बसून राहायचं आहे. असं केल्याने कसं चालेल मनीषा?" मनीषाची आई मनीषाला समजावण्यासाठी प्रयत्न करत होती.
मनीषा वय वर्ष 30 च्या आसपास.
असं काय घडलं होतं मनीषाच्या आयुष्यात? की ती सगळ्या गोष्टी सोडून घरात बसून रहात होती.
मनीषाचं वय बघता तुम्हाला एक साधारण अंदाज आला असेल.
तर मनीषा नुकतीच एका विचित्र नात्यातून सुटली होती.

ओळखीने ती त्या व्यक्तीच्या आणि ती व्यक्ती तिच्या संपर्कात आले होते. बघता बघता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्नाचा निर्णय घ्यायची वेळ आली तसं मात्र समोरची व्यक्ती टाळाटाळ करू लागली.

मनीषा ने काही गोष्टी तिच्या मोठ्या बहिणीच्या कानावर घातल्या होत्या. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट बहिणीला सांगितली. बहिणीने तिच्या नवऱ्याच्या मदतीने त्या मुलाची चौकशी केली. तेव्हा लक्षात आलं की, त्याचं ऑलरेडी लग्न झालेल आहे. बायको गावाकडे असते आणि हा शहरात. मनीषा ही त्याच्यासाठी फक्त सोय होती.

बहिणीच्या नवऱ्याने आपल्या पातळीवरती प्रयत्न करत पुरावे जमा केले. त्या सगळ्या गोष्टी त्याने मनीषा आणि त्या मुलाच्या समोर एकत्रच ठेवल्या. कारण नुसतं सांगून मनिषाला पटलं नसतच. 

एकीकडे जिथे मनीषाला धक्का बसला तिथे दुसरीकडे तो मुलगा मात्र मनीषा माझ्या मागे लागली होती असं म्हणू लागला .
त्याचं ते सगळं बोलणं ऐकल्यानंतर मनीषाने तिथेच त्याला आपल्यातलं नातं संपलं असं सांगून जायला सांगितलं.  तो रागा रागातच तडतडत निघून गेला.

त्यानंतर त्या दोघांचा एकमेकांशी काहीही संपर्क उरला नाही. रादर मनीषाच्या बहिणीने आणि तिच्या नवऱ्याने तशी काळजी घेतली. पण मानसिकरित्या मनीषावर जे आघात व्हायचे होते ते झालेच होते. दुखावलं जाणं, विश्वासघात होणं या सगळ्या गोष्टी कुठेतरी तिच्या मनावर खोलवर परिणाम करून गेल्या.

परिणामी गेले काही दिवस मनीषा सुट्टी घेऊन घरात बसून राहिली होती. तिचं हे नातं फारशा कोणाला माहित नसलं तरी लोक काय म्हणतील?कुणाला काय वाटेल? ह्या गोष्टींचा विचार तिच्या मनात पिंगा घालू लागला. घरात आता सगळ्यांना माहीत होतं. पण मनीषाची काही चूक नसल्याने सगळ्यांनी तिला समजून घेण्याचा पवित्र घेतला होता. तिने त्या नात्यातून, त्याच्या कटू आठवणींमधून बाहेर पडावं म्हणून सगळेजण प्रयत्न करत होते. पण मुख्य प्रयत्न तर मनीषानेच करण अपेक्षित होतं. आणि ती मात्र कुठेतरी अपराधीपणा घेऊन बसली होती.

वाचक मित्रमैत्रिणींनो , आपल्या बाबतीत अशा अनेक घटना घडत असतात. ज्यामध्ये बऱ्याचदा समोरची व्यक्ती चूक झाल्यानंतर सगळा ब्लेम आपल्यावर टाकून स्वतः नामानिराळी होते.

आपण मात्र त्या आरोपाला नकळतच स्वीकारतो आणि मग मानसिक पातळीवर त्रास होऊ लागतो. आपल्याला त्रास होऊ लागल्यावर मात्र आपली सगळ्यात पहिली भूमिका असते दुर्लक्ष करण्याची.

आपण आजारपण किंवा दुखणे मग ते शारीरिक असो किंवा मानसिक त्यांना टाळण्याचा प्रयत्न सगळ्यात आधी करतो. कारण आजूबाजूला तेच बघितलेले असते, सल्लेही तसेच मिळालेले असतात.

पण एका पॉइंट नंतर मात्र गोष्टी अवघड होतात....
अशा वेळी काय करायचं? ते खाली दिलेलं आहे...
Sit with it. sit with it. sit with it.
Even though you want to run.
Even when it's heavy and difficult.
Even though you are not quite sure of the way through.
Healing happens by feeling... Dr. Rebecca Ray

कितीही त्रास होत असला तरी ती भावना पूर्णपणे काढून टाकण्यासाठी आधी आपल्याला ती स्वीकारावी लागते.
- मला ह्या xyz व्यक्तीच्या ह्या वागण्याचा त्रास होतो आहे.
- कितीही पळून जावसं वाटलं तरी त्या गोष्टीला सामोरे जावे...आज नाही गेलो तर भविष्यात पुन्हा कधीतरी घूम फिरके ती गोष्ट कुठल्या ना कुठल्या रूपात समोर येणार हे नक्की... मग आजच सुरुवात करायची.
- गोष्टी अवघड असतात अशक्य नाही... त्यामुळे आपण प्रयत्न केले तर 99 टक्के त्रासातून सुटका होऊ शकते.
सो आधी प्रयत्न तर करू....
वरच्या quote मध्ये शेवटचं वाक्य आहे healing happens by feeling... ह्या वाक्यात सोप्या भाषेत सांगितल आहे.
"शारीरिक दुखण्यातून बरं व्हायचं असेल तर जसं कडू औषध, इतर ट्रीटमेंट घ्याव्या लागतात. तसच मानसिक पातळीवर गोष्टी बदलायच्या असतील तर त्या स्वीकारून त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करणे गरजेचे असते."

जाता जाता एकच सांगते , त्रासदायक प्रसंग, घटना, आठवणी, व्यक्ती ह्यांना टाळू नका. जितकं टाळण्याचा प्रयत्न कराल तितका जास्त त्रास होईल. त्यापेक्षा त्या गोष्टींवर नीट विचार करून ती भावना समजून घेत त्यावर उपाय शोधून तो त्रास कायमचा दूर करण्यासाठी प्रयत्न करा.

𝙵𝚎𝚎𝚕 𝚒𝚝. 𝚃𝚑𝚎 𝚝𝚑𝚒𝚗𝚐 𝚝𝚑𝚊𝚝 𝚢𝚘𝚞 𝚍𝚘𝚗𝚝 𝚠𝚊𝚗𝚝 𝚝𝚘 𝚏𝚎𝚎𝚕. 𝙵𝚎𝚎𝚕 𝚒𝚝. 𝙰𝚗𝚍 𝚋𝚎 𝚏𝚛𝚎𝚎...

#feel_it_heal_it
#1/365_days_of_selfcare
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 


बुधवार, ३१ मे, २०२३

विश्वास हा ग्रुप आणि त्याची संकल्पना काय आहे?

#विश्वास हा ग्रुप आणि त्याची संकल्पना काय आहे? 


आधी एक शॉर्ट इंट्रोडक्शन माझं 
नमस्कार मंडळी, 
मी गौरी हर्षल कुलकर्णी रा. अहमदनगर
व्यवसायाने मी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक आहे.  पण त्यापेक्षा जास्त मी ओळखली जाते ती माझ्या विश्वास, कालाय तस्मै नमः आणि इतर काही अध्यात्मिक रहस्यकथामुळे. 
"स्वतःला शोधताना - गौरी हर्षल" ह्या नावाने माझं फेसबुक पेज आहे आणि ब्लॉग ही.  ब्लॉग लिंक शेयर केली आहेच. त्यावर माझं लेखन वाचता येईल. 
अध्यात्मिक मार्गदर्शन ही गोष्ट मात्र माझ्या आयुष्यात दत्तगुरुंच्या कृपेने आलेली आहे. त्यामुळे त्याचं सगळ श्रेय त्यांचं आहे. 
आणि ते त्यांच्याच इच्छेने घडत. 

************************************************

विश्वास हा ग्रुप आणि उपक्रम हे अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन्हींच्या माध्यमातून सातत्याने काहीतरी देण्यासाठी राबवले जात आहेत. 
त्यासाठी हे काही वाचावं लागेल. 

दत्त जयंती 7 डिसेंबर 2022
http://gauriharshal.blogspot.com/2022/12/blog-post.html

************************************
सकाळ आणि रात्रीच्या टास्क सहित आहे त्यामुळे काळजीपूर्वक वाचा.
बऱ्याच जणांच्या मनात शंका आहेत की आपण या ग्रुप मध्ये ऍड तर झालोय पण आता नेमकं काय काय आपल्याला करावे लागणार आहे? 
 सो सगळ्याना एक सांगते सीट बॅक अँड रिलॅक्स...
आपल्याला काहीही अवघड अतर्क्य असं करायला जायचं नाहीये . उलट आपल्याकडून ज्या काही गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत, निसटल्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 
 रोजचं आयुष्य,रोजच्या गोष्टी आहेतच आणि असणारच फक्त त्या सोबतीने असं काहीतरी शोधायचं जे जगण्यासाठी टॉनिक ठरेल.  
असं काय असू शकतं की जे तुमच्याकडेच आहे पण इतकी वर्ष तुम्हाला सापडल नाही आहे? 
 अशा बऱ्याच गोष्टी आहेत हळूहळू प्रत्येकाला त्या गोष्टी सापडतील हे नक्की.  पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपण सगळे एका समांतर मार्गाने प्रवास करत आहोत. कोणी थोडं पुढे आहे, कोणी थोडं मागे आहे. 
 पण प्रत्येकाचा प्रवास हा त्याचे/ तिचे  वेगळे अनुभव घेऊन आतापर्यंत आला होता आणि पुढेही येणार आहे. 

इथून फक्त एक महत्त्वाचा बदल हा असेल की तुम्हाला आयुष्याच्या जास्तीत जास्त चांगल्या क्षणांची शिदोरी सोबत कशी ठेवायची हे कळेल. आणि त्यामुळे गोष्टी सुकर होतील. 

 मी आहेच मदतीसाठी.  तुम्ही कधीही कुठल्याही शंकेसाठी इथे ग्रुप वर संपर्क साधू शकता. 

*** सकाळचे टास्क ***
रोज सकाळी उठल्या नंतर जागीच सुखासनात बसायचं आहे. "पाच" मिनिटे डोळे मिटून शांत बसायचं. 
ज्यांना येत असेल त्यांनी डोळ्यासमोर हाताची ओंजळ धरून खालील श्लोक म्हणायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात एकमेकावर चोळून चेहऱ्यावरून फिरवायचे. 
कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम्॥
(आधीपासून करत असाल तर अतिशय उत्तम) 

*** दात घासत असाल न तेंव्हा आजचा दिवस छान असणार, सगळी कामं मी ठरवली तसं करण्याचा प्रयत्न करणार अस जमेल तितक्या वेळा स्वतः ला सांगा.

झालं की इथे मेंशन करा. उठल्या उठल्या करायचं आहे त्यामुळे सकाळी लगेचच हे होण अपेक्षित आहे हा नियम पाळण्याचा प्रयत्न करा.

*** रात्रीचा टास्क ***
एक छोटीशी गोष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या कमीत कमी तीन चांगल्या गोष्टी, घटना किंवा भेटलेल्या व्यक्ती आठवायच्या आहेत.
घरात कुणासोबत हे करायचं असेल तर अतिशय उत्तम. संवाद वाढतो आणि मुख्य म्हणजे फक्त चांगलं काय घडलं ते आठवायच आहे. 
(कुणी बोलण्यास नसेल तर लिहून ठेवायचं, फोनमध्ये सुद्धा लिहू शकता. )

धावपळ आणि गडबडीत दिवस सरून
सुरू झाली आहे रात्र
मनाच्या कप्प्यात जपून ठेवूया 
दिवसातील तीन सकारात्मक घटनांचे चित्र

झोपण्याआधी करायचं आहे सो त्यानंतर फोन हातात घेऊन बसायच नाही हा नियम पाळण्याचा प्रयत्न करा. 
तुम्ही झोपण्याआधी टास्क करायचा आहे. त्यानंतर शक्यतो फोन बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा.

आणि हो सगळ्यांना एक विनंती वजा सूचना आहे की इथले टास्क बाहेर शेयर करू नका. त्याचा काही उपयोग होणार नाही. 
का? कारण माझी पद्धत वेगळी आहे. त्यामागे माझी साधना आणि दत्तगुरुंची इच्छा असते. 
मी ज्यांची जबाबदारी घेते त्यांनाच त्याचा फायदा होतो. ही त्यांनी 🙏 केलेली सोय आहे. - गौरी हर्षल 

(करुणात्रिपदी अध्ययन वर्ग, घोरकष्टोद्धरण स्तोत्र अध्ययन वर्ग आणि स्वतःला घडवण्यासाठी हा 21 दिवसांचा कोर्स, त्याशिवाय वैयक्तिक मार्गदर्शन हे मात्र माफक फी घेऊन केले जातात.)

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 


गुरुवार, २५ मे, २०२३

कर्मसिद्धांत first draft 16 may 2023

#कर्मसिद्धांत first draft 16 may 2023 
आज मुहुर्तच उत्तम होता. सगळे  एकाच ठिकाणी उपस्थित होते. आणि समोर होता एक जन समुदाय ज्याने पृथ्वीवर देवांच नाव घेऊन श्रेष्ठत्व स्वतःकडे घेतलं होतं. 
पृथ्वीवर त्यांचा कार्यकाल संपल्यामुळे आता ते पुढच्या प्रवासात होते. पण इथे आज मात्र ते सगळे एका विशिष्ट हेतूने हजर असण्याच कारण होतं. 
बऱ्याच गहन विषयांवर त्यांनी खाली असताना हिरीरीने जी मते मांडली होती आणि लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन समाजात रुजवली होती त्याचीच आज इथे चर्चा सुरू होती. 

एकीकडे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपलं मत मांडत होते. तर तिथेच दुसरीकडे थोडसं बाजूला काही लहान मुलं खेळत होती. त्या मुलांना तिथे बघून तसं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं पण कुणाची काही बोलायची हिंमत नव्हती. अन् ती मुले ही त्यांच्या खेळात मग्न होती.  

पण काही क्षणानंतर मात्र हळूहळू वातावरण तापू लागले. त्यांच्यापैकी एक गौरवर्णीय व्यक्तीसदृश आकृती तिच्या वागण्याचं समर्थन करीत तिने कसं सगळं योग्य केलं हे सांगू लागली. त्याच गर्दीत काही जण त्याचे पृथ्वीवरील समर्थक ही होते. चर्चा सुरू असल्याने बरोबर ठराविक मुद्द्याला त्यांनाही त्या गोष्टी पुन्हा आठवल्या आणि ते पुन्हा त्याचं समर्थन करू लागले. 

समोरच्या उच्चासनावर बसलेल्या सगळ्यांच्या मागे बसून कुणीतरी ही चर्चा अजून तरी शांतपणे ऐकत होते. 

पण जसजसं त्या सगळ्यांनी पुन्हा आपल्या खऱ्या वृत्तीत प्रवेश केला.... 
तसे मागे बसलेल्या त्यांनी आपले डोळे उघडले आणि हलकेच हसत त्या लहान मुलांकडे नजर टाकली. त्यांची तिथे नजर पडताच एक मोठा धुळीचा लोट उठला. सगळ्यांचं लक्ष तिकडे वेधलं गेलं. आता तिथे फक्त घोंघवणारे धुळीचं वादळ होतं. मघाशी खेळणारी ती लहान मुलं कुठेच नव्हती. 

त्या तावातावाने बोलणाऱ्या गौरवर्णीय व्यक्तीवर मात्र या गोष्टीचा काही प्रभाव पडला नव्हता. ती अजूनच त्वेषाने तिचे मुद्दे मांडत होती. हळूहळू ते वादळ एका भोवऱ्यात बदललं आणि त्यातून क्षणभरासाठी एका छोट्याशा मुलीचा हसरा चेहरा डोकावला. 

तो चेहरा बघताच गर्दीच्या लक्षात आलं की ती मुलगी इतका वेळ तिथे खेळत होती. वादळ आता गर्दीच्या दिशेने वेगाने सरकत होते. ते जसे गर्दीच्या समोर आले तशी गर्दी दुतर्फा उभी राहिली. गर्दीच्या एका टोकाला वादळ तर दुसऱ्या टोकाला ती व्यक्ती होती. 
वादळ पुढे पुढे जात त्या व्यक्तिपासून काही अंतरावर थबकले पण थांबले नक्कीच नाही. 

वादळाला जागं केलेल्या त्या व्यक्तीने गालातल्या गालात हसत डोळे मिटून हुंकार भरला. तसं वादळाच्या पायऱ्या करत एक तरुण मुलगी खाली उतरून आली. तिच्या चेहऱ्यावर रागीट भाव होते. तीन पायऱ्या वरच थांबून तिने त्या गौरवर्णीय व्यक्तीवर आपली नजर टाकली. तिची नजर पडताच तो नखशिखांत हादरला. त्याच्या डोळ्यात मूर्तिमंत भीती बघताच तिच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. 

आणि ती फक्त एकच शब्द बोलली "कर्मसिद्धांत"...

ती पुढे काही बोलणार इतक्यात तिला बोलवणारे ते जागी उठून उभे राहिले. 
त्याचं उठून उभे राहणं कुणालाही अपेक्षित नव्हतं त्यामुळे सगळेच उठले. 

ज्यांना माहीत होतं ते कोण आहेत आणि ज्यांना त्यांना बघूनच लक्षात आलं होतं की हे कुणीतरी महत्वाचं व्यक्तिमत्व आहे... सगळेच उभे राहिले. 

ती मात्र अजूनही रागात धुमसत होती. तिने त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी तिला स्वतःच्या दिशेने येण्याची खूण केली. 
ती खूण बघताच क्षणार्धात वादळ हवेत विरले आणि त्या जागी एक तीन- साडेतीन वर्षे वयाची लहान मुलगी होती. 
सगळ्यांकडे आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी बघत ती त्यांच्या दिशेने गेली. आणि त्यांनी पुढे केलेलं बोट हाताने धरून चालू लागली. 
जणू काही सगळ्या गोष्टींचा तिच्याशी काही संबंधच नव्हता. 

पण इथे त्या गौरवर्णीय व्यक्ती च्या डोळ्यासमोर मात्र काजवे चमकले. त्या मुलीच्या चेहऱ्यात त्याला त्या सगळ्या ओळखी अनोळखी स्त्रियांचे चेहरे दिसले ज्यांना त्याच्यामुळे त्रास झाला होता. 

आणि सगळ्यात शेवटी त्याला ती म्हणाली तो शब्द आठवला आणि त्याचं ते अस्तित्वही थरथरले....कर्मसिद्धांत....

कर्मसिद्धांत त्याला कधी ना कधी गाठणार होताच पण इतक्या लवकर ती वेळ येईल याची कल्पना त्याला नक्कीच नव्हती. 

#गौरीहर्षल #स्वतःला_शोधताना १६.५.२०२३

ह्याची कथा, दीर्घ कथा काही होईल की नाही माहीत नाही पण एक एपिसोड म्हणून वाचून घ्या. 🙈

सोमवार, २२ मे, २०२३

Quote of the day 20 डोन्ट रश,जे घडायचं आहे ते नक्की घडणार

#जे_घडायचं_आहे_ते_नक्की_घडणार #डोन्ट_रश 
"काय करतेस केया? ",बाल्कनीत कुंड्याजवळ बसलेल्या केयाला तिच्या आजीने विचारलं. 
"आजी बघ ना, हे झाड काही उगवून आलं नाही अजून.", केयाने उदास होऊन उत्तर दिलं. 
आजी गालात हसत तिच्याजवळ आली. शेजारी असलेल्या खुर्चीवर बसत तिने केयाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. केया अजूनही तिच्या छोट्याशा कुंडीकडे बघत होती. 
"केयु, अग दोनच दिवस झाले आहेत तू ते बी म्हणजे सिड्स त्या कुंडीत लावून. इतक्या लवकर कसं काय झाड येईल बाळा? " आजी म्हणाली. 
"अग पण मग मी नेक्स्ट वीकमध्ये टीचर ना काय दाखवू? ", केयाने प्रश्न विचारला. 
तिच्या जागी तिची काळजी स्वाभाविक होती. सुट्टी आहे म्हणून शाळेतून मुलांना हा प्रोजेक्ट सांगितला होता. त्याचा प्राथमिक उद्देश अर्थातच मुलांना कशात तरी गुंतवून ठेवण्याचा होता. 
केया कुतूहलापोटी रोज वाट बघत बसत होती. फोनवर मैत्रिणींशी सुद्धा त्यावरच बोलणं होत होतं. इनमिन 5 वर्ष वय पण त्या रोपट्याबद्दल अशी चर्चा सुरू असायची की घरातले ऐकत बसायचे. 
तरी बरं की त्यांच्या टीचर ने लवकर उगवतील अशीच झाडं लावायची अस वॉट्सॲपवर पालकांना सांगितलं होतं. कारण मुलांना सेपरेट लिस्ट दिली होती ज्यावर त्यांना नोंद करायची होती. 
केयाची एकूणच जडणघडण आईबाबा, आणि दोन्ही कडचे आजीआजोबा ह्यांच्या तालमीत उत्तम सुरू होती. 
त्यातच केयाच्या सध्याच्या शाळेत मीटिंग असल्याने त्यांना बोलावलं होतं.  
        मुलं आपापली रोपं घेऊन शाळेत हजर झाली होती. कुणी खूप खुश होतं तर कुणी थोडस उदास. सगळ्या टीचर मुलांशी बोलत त्यांना चियर अप करत होत्या. थोड्या वेळात सगळ्या मुलांना त्या उपक्रमासाठी आईबाबांकडूनच सर्टिफिकेट दिली गेली. आणि त्यांना खेळण्यासाठी सोडलं. मुलं आनंदाने गेली. 

टीचर आईबाबांशी बोलू लागल्या. 
" दरवर्षी प्रत्येक बॅच मधील मुलांना हा प्रोजेक्ट आम्ही एका विशिष्ट हेतूने देतो. तो म्हणजे मुलं एक रोपट वाढवताना आतून कशी घडत आहेत हे पालकांच्या लक्षात येईल. मुलांसाठी जसं ते रोप , त्याची वाढ हे महत्वाचे विषय आहेत, तसच मुलं आणि त्यांची वाढ हे पालकांसाठी असतात. सगळ्याच पालकांना आपल्या मुलांना बेस्ट द्यायची इच्छा असते. पण इथे प्रत्येक पाल्याची गरज वेगवेगळी असते. 
जसं कुणाकडे रोप जास्त लवकर वाढलं तर कुणाकडे कमी. का? कारण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आधी त्या रोपाला काय हवं ते दिलं आणि मग त्या रोपाला काय हवंय हे लक्षात आल्यावर बदल केले. 
जर मुलांच्या बाबतीत ही गोष्ट आधीच लक्षात आली तर तुमचा आणि मुलांचाच पुढचा प्रवास सोपा होईल. 
मला माहित आहे की आता तुम्ही सगळे जण मुलांसाठी पुढच्या दृष्टीने शाळा शोधत आहात. त्याच अनुषंगाने ही गोष्ट आहे. 
तुम्हाला सगळ्यांनाही मुलांचं निरीक्षण केलं तर त्यांच्यासाठी काय योग्य आहे हे कळेलच.
𝑫𝒐𝒏'𝒕 𝒕𝒓𝒚 𝒕𝒐 𝒓𝒖𝒔𝒉 𝒕𝒉𝒆 𝒕𝒉𝒊𝒏𝒈𝒔 𝒕𝒉𝒂𝒕 𝒏𝒆𝒆𝒅 𝒕𝒊𝒎𝒆 𝒕𝒐 𝒈𝒓𝒐𝒘. " असं म्हणत टीचरने आपलं बोलणं संपवलं. 
केयाच्या आईबाबांना तर कळल होत की त्यांना काय करायचं आहे पण तुम्हाला काय कळल? 
𝑫𝒐𝒏'𝒕 𝒕𝒓𝒚 𝒕𝒐 𝒓𝒖𝒔𝒉 𝒕𝒉𝒆 𝒕𝒉𝒊𝒏𝒈𝒔 𝒕𝒉𝒂𝒕 𝒏𝒆𝒆𝒅 𝒕𝒊𝒎𝒆 𝒕𝒐 𝒈𝒓𝒐𝒘.
ही गोष्ट आहे आपल्या सगळ्यांचीच ... कशी काय? आपण म्हणतो न अती घाई संकटात नेई. काही गोष्टी घडून येण्यासाठी वेळ द्यावा लागतो तेंव्हाच त्या गोष्टींचा योग्य परिणाम साधला जातो.  
आपण बऱ्याचदा बऱ्याच गोष्टींमध्ये असच करतो ना? जसं की मैत्री, ओळख, नाते आणि अजूनही बरच काही. 
हल्ली तर फार पटकन आपल्या अशा झटपट यश मिळवून देणाऱ्या गोष्टींवर विश्वास बसतो. 
कुणीतरी म्हणत आहे की 4 दिवस xyz गोष्ट केली आणि त्याला/तिला फायदा झाला. इथे आपल्यालाही वाटत की झट की पट जर आयुष्यात भारी, मस्त mindblowing बदल घडत आहेत तर मी सातत्याने प्रयत्न करायची काय गरज आहे? 
जाता जाता इतकचं सांगेन की, दोन मिनिटात तर मॅगी पण शिजत नाही मग आयुष्यात बदल कसे घडतील? 
नवीन आणि जास्त काळ टिकणारे असे काही बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न ही जास्त काळ करावे लागणार. 
आता आपण स्वतः स्वतःची काळजी घ्यायची की दुसरं कुणी माझ्यासाठी काहीतरी करेल म्हणून वाट बघत बसायची हा #ज्याचा_त्याचा_प्रश्न. 
 हा आहे आजचा #quote_of_the_day20 कसा वाटला नक्की सांगा. 
#quote_of_the_day 20
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 

गुरुवार, १८ मे, २०२३

गीतसप्तक भाग १

#गीतसप्तक
"हमको मन की शक्ति देना"
आजचं पहिलं गीत आहे "हमको मन की शक्ति देना" . 
शाळेची प्रार्थना होती आमच्या. सुरुवातीला फारसा अर्थही कळत नव्हता. पण आज वळून पाहताना समजतंय की प्रार्थनेतूनही खूप काही शिकवायचं होतं शाळेला.  
"हमको मन की शक्ति देना, मन विजय करें
दूसरों की जय से पहले, खुद को जय करें "
दुसऱ्यांच्या आधी स्वतःला एक माणूस म्हणून स्विकारतानाच स्वतःच स्वतःला आदर देणं. जे खूप जास्त गरजेचं आहे पण नकळतच विसरतो आपण . समाजातल्या सो कॉल्ड चौकटीत बसण्यासाठी आपल्यालाच इतकी घाई झालेली असते की स्वतःच्या कितीतरी चांगल्या गोष्टी आपण नाकारत राहतो. मग ते दिसणं असुदे किंवा वागणं. नंतर हळूहळू आपल्या लक्षातही येतं पण कितीजण पुन्हा स्वतःला मनापासून साद घालतात? 
"भेदभाव अपने दिल से, साफ़ कर सकें 
दोस्तों से भूल हो तो, माफ़ कर सकें 
झूठ से बचे रहें, सच का दम भरें "
हल्ली तर ह्या ओळींची ओळख पदोपदी पटते. सगळ्याच क्षेत्रात कळत- नकळत होत असणारे भेदभाव. आपल्या ही वागण्यातून उमटतच असतात. सुशिक्षित असूनही काही चुकीच्या जुन्या आणि नविनही गोष्टी आपण करतो.  जिवलग मित्र, आप्त, नातेवाईक ह्यांच्या चुका तर कुणीच सहजासहजी विसरू शकत नाही त्यावर समर्थनही केलं जातं. हे खरं तर जमायला हवं. जुन्या आठवणी उगाळत बसण्याने जितका त्रास आपल्याला होतो तो दुसऱ्या कुणालाही होत नसतो. म्हणजे ते सगळं विसरून जाऊन एका परीने आपण स्वतःलाच सुखी करणार असतो हो की नाही? 
ह्या कडव्यातली शेवटची ओळ "झूठ से बचे ऱहे, सच का दम भरे" हे तर सगळ्यात अवघड काम झाले आहे हल्ली. त्यात फेसबुक, वॉट्सअप्प तर मदतच करत असतात आपलं खोटं बोललेलं अजून छान पध्दतीने खऱ्या रुपात मांडण्यात. खरं बोलणं, वागणं खरंच इतकं अशक्य झाले आहे का? थोडासा प्रयत्न तर करून बघायलाच हवा. 
"मुश्किलें पड़ें तो हम पे, इतना कर्म कर 
साथ दें तो धर्म का, चलें तो धर्म पर 
खुद पे हौसला रहे, बदी से ना डरें"
कुठल्याही परिस्थितीत योग्य मार्गावरच चालण्याची आम्हाला ताकद दे आणि स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नको असंच ह्या ओळी सांगतात. पण बऱ्याचदा असं होतं अडचणी आल्या की
आपला सगळ्यात आधी स्वतःवरचा विश्वास उडतो. वस्तुस्थिती ही असते की आपल्याशिवाय आपली 100% मदत करणारं ह्या जगात कुणीही नसतं. आपण जर स्वतःची मदत करण्यासाठी सज्ज झालो तर जगात कुठेही जा कसलाही प्रॉब्लेम येऊदे आपण त्याला खंबीरपणे तोंड देऊ शकतो. 
तात्पर्य काय तर आत्मविश्वास असणारा , इतरांच्याही आधी स्वतःला आदर देणारा असा एक खरा माणूस होण्यासाठी मनाला तयार केले पाहिजे.  एक साधीशी प्रार्थना योग्य वयात कानावर पडत राहिली तर नक्कीच बदल घडवू शकते. 
#गौरीहर्षल   ||शुभं भवतु||

गुरुवार, ११ मे, २०२३

स्मरणगामी

"अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी"
फक्त दोनच ओळी मनात घोळवत ती शांतपणे खिडकीतून बाहेर बघत बसली होती. 
आणि अचानक तिला जाणवलं की आपल्या डोळ्यासमोर एक वेगळं दृश्य साकार होतंय. ते काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न जितका तिचा मेंदू करत होता, तितक्याच उत्कटतेने तिच्या मनाला आपण काय अनुभवत आहोत ह्याची खात्री पटत होती. 
क्षणार्धात मेंदूकडून येणाऱ्या सगळ्या सूचना धुडकावून लावत तिने मनाचा कौल स्विकारला. आणि डोळ्यांनी ते दृश्य तिच्यासमोर पूर्ण करून उभं केलं. 
खिडकीतून बाहेर बघताना दिसणाऱ्या आकाशाच्या , ढगांच्या बॅकग्राऊंडवर ते डोळे उमटले होते. 
ज्या डोळ्यांना बघितलं की माणसाची सगळी दुखः, त्रास ,यातना एका क्षणात नाहीशा होतील असे ते डोळे. 

ती त्या दृश्याकडे भान हरपून पाहत होती. 
नकळतच तिला जाणीव झाली की ही अशी गोष्ट आहे जी अनुभवण्यासाठी माणसं जंगजंग पछाडतात आणि त्यांनी आपल्यासारख्या वेडीसाठी ती गोष्ट सहजसाध्य करून टाकली का? कारण मनात अजूनही अशक्य ही शक्य करतील स्वामी सुरूच होतं. 

 हल्ली तिला सवयच लागली होती काहीही घडो चांगल किंवा वाईट तोंडात हे वाक्य हमखास येणार. आणि समोरच्या व्यक्तीने समजा चिडून विचारलं की काय सुरू आहे हे तुझं??? की मग तोंडातून स्पष्टीकरण म्हणून पुन्हा त्याच दोन्ही ओळी बाहेर पडणार... कोणत्या??? अहो त्या काय पुढे लिहिलेल्या 
"अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी" 
तसं बघायला गेलं तर त्यात चुकीचं काही नव्हतच. जगात काहीही घडतं ते त्यांच्याच इच्छेने. 
कधी कधी वाईट प्रसंगात आपण प्रचंड त्रागा करतो , त्यांना वाट्टेल ते बोलतो पण काही दिवसानंतर अचानक आपल्याला जाणीव होते की तो वाईट प्रसंग घडणही गरजेचं होतं. जर तो प्रसंग घडला नसता तर आज जे चांगलं घडत आहे ते घडलं नसतं. 
मला तर हमखास असा अनुभव येतो म्हणून तर मी आपली माझ्या मित्राशी मनापासून भांडते कारण मला पूर्ण खात्री आहे जगात कुणीही माझ्या बाजूने असो किंवा नसो तो मात्र असणार आहे. तसाच कायम after all this time.... Always म्हणत. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!! ११ मे २०२३
#गुरूवार #अनुभवाच्या_पोतडीतून #संकल्पदिन
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल