शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९

शुद्ध बिजापोटी....

#शुद्ध_बिजापोटी...
नुकतीच एक गोष्ट वाचण्यात आली एका राजाची आणि चंदनाच्या व्यापाऱ्याची. व्यापारी त्याचा धंदा होत नसतो म्हणून राजाच्या मरणाची अपेक्षा करत असतो. त्यामुळे होतं काय राजाच्या मनातही त्याला न बघता , न भेटता फाशीवर लटकवायचा विचार येऊ लागतो. गोष्टीचं तात्पर्य अस होतं की आपण मनात ज्या व्यक्तीबद्दल , जसे विचार करत असतो तशीच प्रतिक्रिया त्या व्यक्तीकडून नकळत आपल्याला दिली जाते. कारण आपल्या विचारांचे व्हायब्रेशन्स त्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल विष किंवा साखर पेरण्याचं काम करत असतात. पेरलेले उगवतेच फक्त ते आपल्या फायद्याचे ठरते की नाही हे वेळ ठरवते.
सरिता ला सुद्धा अशीच सवय होती.कुठल्याही नवीन ठिकाणी नवीन लोकांना भेटायचं अस ठरलं की तिच्या मनाचे घोडे नको त्या दिशेने उधळायचे. अशातच तिच्या नवऱ्याची बदली दुसरीकडे झाली. सध्या ज्या गावात ते राहत होते तिथे सासर माहेर जवळच होतं. त्यामुळे अडीअडचणीला मदत वगैरे सहज मिळत होती. पण आता नवीन गाव, नवीन लोक म्हटलं की सरीताच सुरू झालं नेहमीप्रमाणे. नवऱ्याने तिला आधीच सांगितलं होतं की प्रत्यक्ष कुणाचा अनुभव आल्याशिवाय कुठेही काहीही बोलू नकोस. पण ऐकेल ती सरिता कसली नवीन ठिकाणी आली की तिने नुसत्या हाय हॅलो वरून सगळ्या शेजारच्या लोकांबद्दल बोलायला सुरुवात केली. पाटील असे,  पवार तसे वगैरे वगैरे. हळूहळू ज्या शेजारणी तिच्यासारख्या होत्या त्यांच्याशी तिचं गुळपीठ मस्तच जमलं. रोज मुलं, नवरा शाळा ऑफिसमध्ये गेले की एकमेकींना आवाज देत त्या सगळ्या जमू लागल्या. बायको रमली म्हणून नवराही काही म्हणत नसे. अशातच सोसायटी मध्ये एक नवीन कुटुंब राहायला आलं. नवरा बायको दोघेचजण 2,3 दिवस घर लावण्यात गेले मग तीही ह्या सगळ्या जणींमध्ये मिसळू लागली. ह्या काळात सरिता नवरा आणि मुलासोबत गावी गेली होती त्यामुळे तिला काहीच कल्पना नव्हती. गावाहून आल्यानंतर जेंव्हा सरिता नेहमीप्रमाणे गप्पा मारायला आली तेंव्हा नव्या शेजारणीचा विषय निघाला. कुणीतरी म्हणत होते किती छान राहते न ती, घरही टापटीप असतं. कौतुक सुरू होतं. तितक्यात सरीताची जिवलग मैत्रीण वनिता म्हटली त्यात काय मुलं होस्टेलवर आहेत म्हटल्यावर हे राजराणी मज्जाच करणार ना? 😏 तितक्यात ती नवीन शेजारीण म्हणजे नीता तिथे आली आणि सगळ्याजणी शांत बसल्या. तीही सगळ्यांशी बोलत होती. तस बघायला गेलं तर तिने अजून कुणालाही घरची पार्श्वभूमी सांगितली नव्हती पण म्हणतात न रिकाम डोकं सैतानाच घर त्या नुसार ह्या सगळ्यानी मिळून ऐकीव माहितीवर आपले अंदाजच खरे अस ठरवलं होतं. सरिता मॅडम तर त्यात सगळ्यात पुढे गेल्या अजून पुरेशी ओळख न होताच तिला म्हणाली तुमची मज्जा आहे न मुलं होस्टेलवर सासुसासरे पण लांब आमचा इथं काम करून करून जीव जातो. नीता शांतपणे हसली आणि म्हटली अस काही नाही हो उलट कुणीच नाही त्यामुळे घर खायला उठत पण नोकरीही महत्त्वाची आहे त्यामुळे काही करता येत नाही. नीता दुखावली पण तिने स्वतःला कंट्रोल करत तिथून निघून जाणच निवडलं. सरीताने ह्यावरून काहीतरी शिकायला हवं होतं पण जित्याची खोड मेल्याशिवाय कुठली जाणार ती अजून अजून कुरघोड्या करु लागली नीताला त्रास देण्यासाठी . नीता आणि तिचा नवरा दोघेही जॉबच्या धावपळीत ह्या गोष्टींकडे लक्ष देत नव्हते.
त्यातच सरीताच्या नवऱ्याने तिला बातमी सांगितली की त्याचे कुणीतरी बॉस त्यांच्या सोसायटीत राहण्यासाठी आले आहेत. तर त्यांच्या घरच्यांशी नीट वाग आणि मला अजून नाव कळले नाही त्यामुळे कुणीही नवीन असतील तर तोंड उघडून घाण करु नकोस माझं प्रमोशन जवळ आल आहे.पर्सनल गोष्टींमुळे  मला ऑफिसमध्ये कुणाशी शत्रुत्व नको आहे. आता तुम्ही म्हणाल की अस का बोलला तो तर सरीताने आधीच्या बॉसच्या आईसोबत असाच नको त्या काड्या करून पंगा घेतला होता आणि त्यामुळे ह्याला स्वतःच्या प्रमोशन वर पाणी सोडावे लागले होते. कारण प्रत्येक जण सहन करेल किंवा दुर्लक्ष करेल अस होत नाही. आणि चूक सरीताची असल्याने त्याला काही बोलताही आलं नाही. बॉसच्या आईला सरीताच्या मुळेच खूप त्रास झाला होता. असो तर त्यामुळे नवरा आता सतत तिला सूचना देत होता पण सुधारेल ती सरिता कसली.
फायनली कंपनीच्या नेहमीच्या पार्टीची सूचना आली सरीताच्या नवऱ्याचे ऑफिशियल रेकॉर्ड उत्तम असल्याने ह्या वर्षी प्रमोशन मिळणार अस त्याला वाटत होतं. त्याच पार्टीत कंपनीचा नवीन हेड कोण आहे कळणार होत. सरीतासोबत तो पार्टीत पोहोचला. सगळ्यांशी ओळख करून देत असतानाच अचानक सरीताला दोन ओळखीचे चेहरे दिसले आणि ती विवेकला म्हटली हे इथे काय करतात? तो काही बोलणार इतक्यात स्टेजवरून त्याच दोघांच्या नावाचा पुकारा झाला मि. अँड मिसेस जाधव प्लिज स्टेजवर या. आणि विवेकचे बॉस बोलू लागले मला तुम्हांला सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की जाधव यांनी आपली xyz गावाची ब्रँच यशस्वीपणे हाताळल्यामुळे आता कंपनीने त्यांना आपली ब्रँच सांभाळण्यास इथे बोलावले आहे. गेले काही महिने ते अगदी सामान्य कामगारांमध्ये मिसळून सगळं निरीक्षण करत होते. पण आता येणाऱ्या 1 तारखे पासून दोघेही आपापल्या डिपार्टमेंट ची जबाबदारी घेतील. हे सगळं ऐकत असताना सरीताला मात्र दरदरून घाम फुटला होता. आणि त्याचं कारणंही  तिला माहीत होत. कारण होतं मि अँड मिसेस जाधव दुसरं तिसरं कुणी नसून नीता आणि तिचा नवरा होते😂  आणि नीता विवेकची बॉस म्हणून जॉईन झाली होती. विवेकला सरीताची अवस्था पाहून अंदाज आला होता पण त्याने फक्त इतकंच विचारलं हे आपल्या सोसायटीमध्ये राहतात? सरिताने होकारार्थी मान डोलावली. तसा तो म्हटला तुला मी घरी गेल्यावर बघतो. आता सरीताची अवस्था अजूनच अवघड झाली.
स्टेजवरून आभारप्रदर्शन झाल्यावर नीता खाली उतरून सगळ्यांशी बोलू लागली. ती विवेकसमोर आली आणि हात मिळवत म्हटली कसे आहात मि अँड मिसेस काळे? मिसेस काळे तर फार चांगलं ओळखतात आम्हाला हो ना? सरीताला काय बोलावे सुचत नव्हते ती कसनुस हसली. नीता पुढच्या कपलशी बोलू लागली. पार्टीच्या शेवटच्या भागात प्रमोशन कळणार होते. त्यानुसार एकेक नाव घेतले जात होते. नीता आणि तिचा नवरा अभिनंदन करत प्रत्येकाला बुके देत होते. सगळ्यात शेवटी विवेकच्या डिपार्टमेंटची नावं घेतली जाऊ लागली जसजशी लिस्ट पुढे सरकत होती तसतशी सरिता अस्वस्थ होत होती. आणि शेवटी जे व्हायला नको होते तेच झाले पुन्हा एकदा विवेकचे नाव वगळले गेले. पार्टी पुढे सूरु राहील म्हणत सगळे जिकडेतिकडे गेले. नीता सरिता समोर आली आणि म्हटली तो वरचा असतो न सरिता सगळ्यांना संधी देतो व्याजासह परतफेड करण्याची. आम्ही आमच्या परीने दुर्लक्ष करत तुला खूप संधी दिली सुधारण्याची पण तू आमचं कुटुंब जे इथे नसत त्यांच्याबद्दलही वाईट बोललीस तेही तुला काही माहीत नसताना आणि आम्हा दोघांच्या चरित्र्यावरही नको नको ते आरोप केलेस तुझा काही संबंध नसताना, आम्ही शांत होतो कारण सत्य परिस्थिती आम्हाला माहीत आहे. आता हे सगळं आम्हाला कुठून आणि कसं कळलं ह्याचा विचार करण्यापेक्षा तुझ्यामुळे तुझ्या नवऱ्याचं किती नुकसान होत आहे याचा विचार कर. शहाणी असशील तर सुधारशील नाहीतर जे हातात आहे ते ही गमावशील विवेककडे नजर टाकत नीता निघून गेली.

ह्या सगळ्यातून सरिता काय शिकली ते आपण ठरवायचे आहे. अशा अनेक सरिता आपल्याला पावलोपावली भेटतात ज्या काहीही संबंध नसताना पुरेशी माहिती नसताना इतरांबद्दल गरळ ओकत असतात. ही जी जमात असते ती असमाधानी असते स्वतःच्या आयुष्यात अगदी त्यांचे दोन्ही हात सुखानी भरलेले असले तरी त्यांना इतरांना त्रास दिल्याशिवाय, दुखावल्या शिवाय घास घशाखाली उतरत नाही. त्याबतीत आपण ऊँ इग्नोराय नमः हाच मंत्र वापरू शकतो. कारण अस वागून हे लोक स्वतःचं काय नुकसान करून घेत आहेत हे त्यांना कळत नाही. आणि सांगून सुधारण्या इतकी अक्कल त्यातल्या फार कमी लोकांकडे असते.
बाकी नीता म्हणाली तसं तो वरचा संधी देतो आणि कधी कधी तर तोच आपल्या बाजूने परतफेडही करतो. बघण्याची दृष्टी हवी फक्त.#गौरीहर्षल #४.१०.१९

बुधवार, २४ एप्रिल, २०१९

अलक

#अलक

१.  रोज तिच्या "लवकर या बाबा" कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या बाबाच्या गळ्याशी तेच शब्द येऊन अडकले. पण ती मात्र छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन आज कधी न परत येण्याच्या प्रवासाला निघाली होती.
कारण एकच ती मुलगी होती

२. उदया ओपन डे साठी बाबा शाळेत येणार  म्हणून रात्र तिने आनंदात घालवली. पण ते मात्र मिटिंगच कारण देत तिच्या वर्गात न येताच निघून गेले.डोळ्यातलं पाणी आवरत ती गुपचूप बसून राहिली .
कारण तेच ...

३. लग्नाचा विषय निघाल्यावर इतर मुलींसारखी तीही सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलू लागली. पण घरात होणारे आनंदी बदल तिच्या नजरेतून सुटले नाहीत. इतकी वर्ष समोर न येऊ दिलेली भावना आता मात्र प्रकर्षाने जाणवली. अन् अनेक नकोशा आठवणी डोळ्यांतून वाहू लागल्या.
कारण तेच ....

४. नवीन घरात रुळू लागल्यावर जेंव्हा तिला नणंदेची अवस्था आपल्यासारखीच आहे हे जाणवलं. तेंव्हा नकळतच तिने तिला कुशीत घेत स्वतःच्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
पण ह्यावेळी कारण वेगळं होतं
तिने आता ठरवलं होतं कुणालाही  "नकोशी" असण्याच दुःखच होऊ द्यायचं नाही. नकळतच तिचा हात स्वतःच्या पोटावर निर्धाराने विसावला.
कारण तेच ....

©गौरीहर्षल
#२४.४.२०१९

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

#देवाक_काळजी_रे

#देवाक_काळजी_रे

नुकतंच हे गाणं कानावर पडलं. आणि नेहमीसारखं आम्ही आपले शब्दांवर आणि अर्थावर रेंगाळून गाण्याच्या प्रेमात पडलो. फार काही तत्वज्ञान नाहीये अगदी साधं सोपं आहे सगळं पण माणसाला मात्र साध्या गोष्टींनाही अवघड करायची सवय असते.
आयुष्यातले चढ उतार, सतत होणारे बदल त्यामुळे येणारे चांगले वाईट अनुभव विशेषतः वाईट जास्तच ह्यांच्यामुळे एक क्षण असा येतो की सरळमार्गी माणूसही चुकीच्या मार्गावर जातो किंवा जायचं ठरवतो. आणि हल्लीच्या फास्ट आयुष्यात तर संयम उर्फ पेशन्स फारच कमी लोकांकडे असतात. पण चुकीच्या मार्गाचे फायदे आणि तोटेही  प्रत्यक्ष लक्षात येईपर्यंत न भरून येणारं नुकसान करून मोकळे झालेले असतात. त्यानंतर हाती उरलेली निराशा सगळीकडे फक्त आणि फक्त अंधार दाखवत असताना ज्याची गरज भासते तो असतो "देव". इथे मी देव ही संकल्पना फक्त मूर्ती अशी नाही म्हणत तर माझ्यासाठी देव म्हणजे मनाच्या कोपऱ्यात सदैव वसणारी अशी एक श्रद्धा असते जी योग्य वेळी,योग्य प्रकारे आणि योग्य रूपातही मदतीला धावून येतेच. गरज असते ती फक्त स्वतःवर आणि स्वतःच्या चांगल्या कृत्यांवर किंवा कर्मांवर ठाम विश्वास असण्याची आणि थोड्या संयमाची.

सोबती रे तू तुझाच
अन तुला तुझीच साथ
शोधूनि तुझी तू वाट
चाल एकला
होऊ दे जरा उशीर
सोडतोस का रे धीर
रात संपता पहाट
होई रे पुन्हा

हे कडवं तर मला फारच आवडलं. जर काहीतरी वाईट, चुकीचं घडलंय तर सगळं नीट होण्यासाठी किंवा करण्यासाठी दुसऱ्या कुणाची वाट बघण्याची काय गरज?? "त्या"ने आपल्याला निर्माण करताना आवश्यक त्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत मग तरीही आपण त्याची वाट बघत का बसतो? तो सुद्धा विचार करत असेल न की बाबा रे चालू तर लाग पुढे फक्त दहा पावलांवर खूप काही चांगलं होणार आहे. पण नाही आपण प्रत्यक्ष कृतीपेक्षा इतर फाफट पसाऱ्यातच जास्त गुंततो आणि परिणामी गुंता वाढतच जातो.
हातापायाने धडधाकट असण्याऱ्या माणसाला तर जास्तच सवय रडगाण्याची. आणि काही झालं की उत्तरं शोधण्याआधीच मीच का? हा प्रश्न विचारण्याची. अशा लोकांनी विचार करण्याची पद्धत बदलण्याची फार गरज असते.
कर्मकांड वगैरे माझा प्रांत नाही आणि मी देवाला सतत धरते अशातलीही नाही. माझ्या मेंदूला पटतील आणि जगताना योग्य वाटतील अशी साधी सोपी तत्व माझी मी ठरवली आहेत. हरण्याचे प्रसंग माझ्याही आयुष्यात खूप आले मीही इतरांसारखी "त्याच्या" शी भांडले पण त्यातून प्रत्येक वेळी बाहेर पडताना मी मनाला एक बजावलं की कधीही असेल माझा हरी तर नेईल खाटल्यावरी असं नाही करायचं. शक्य असतील ते सगळे प्रयत्न करूनही हरलो तर अर्थातच त्याला प्रश्न विचारण्याचा हक्क तो देतोच. हा माझा अनुभव पण प्रयत्न न करताच त्याच्यासमोर कधीच नाही जायचं.
शेवटी तात्पर्य काय तुमची काळजी घ्यायला तो आहेच पण त्याआधी तुम्ही काहीतरी सुरुवात तर करा.
पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. नुसतं गाणं ऐकूनही बरंच काही कळेल, ऐकून बघा एकदा💐 
#गौरीहर्षल #१४.९.२०१८

#मीच_चांगलं_वागायचं_का?

#मीच_चांगलं_वागायचं_का?
नेहा नव्यानेच आली होती सोसायटीमध्ये. अजून कुणाशी फारशी ओळख नव्हती त्यामुळे ती शांतच असायची. हळूहळू मुलांना खाली खेळण्यासाठी नेल्यानंतर ओळखी होऊ लागल्या. तरीही आपण नवीन आहोत याचं भान ठेवून ती वावरत असे. तशीही तिला इकडंच तिकडे करण्याची सवयही नव्हती.
रोज सगळ्यांसोबत गप्पा मारल्या जाऊ लागल्या. लवकरच  तिला वॉट्सअप्प ग्रुपमध्ये पण घेतलं. पण राहून राहून तिला एक गोष्ट खटकायची घरात असो किंवा बाहेर सगळीकडच्या व्यक्तींबाबत बोलणं सुरू झालं की जास्तीत जास्त जणींचा सूर असायचा #मीच_चांगलं_वागायचं_का? नेहाला समजयचंच नाही की अस का?? म्हणजे इतर सर्वांसारखेच तिच्या घरातही मतभेद, वाद होतेच नाही असं नाही पण तिला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला होता किंवा तिने शोधला होता अस म्हणूया. मग हळूहळू तिच्या लक्षात आलं की ह्या सगळ्या जणींचा मूळ प्रॉब्लेम #मीच_चांगलं_वागायचं_का? हा नसून कुणीच माझं कौतुक करत नाही हा आहे. आणि खरं तर तो अनंत काळापासून स्त्रियांच्या बाबतीतील मोठ्ठा प्रश्न आहे.
होतं काय सणवार म्हटलं की 3,4 जणी एकत्र येतात बरं तिथे त्या एकमेकींना मदत करण्याऐवजी कुरघोडी कशी करता येईल हाच विचार जास्त करत असतात. मग पुढे जाऊन त्याची परिणीती एकमेकींना टोमणे मारणं, कामात अडथळे निर्माण करणं सुरू होतं. परिणामी कामं बिघडतात , घरातलं वातावरण बिघडतं. आनंदाचे चार क्षण एकत्र घालविण्यासाठी आलेली मनं खट्टू होऊन दूर जातात. पुरुषांचं काय त्यांना वेळ मारून  नेण्याशी मतलब असतं त्यामुळे काही ठिकाणी मन मारून वर्षानुवर्षे हे सगळं असंच चालू राहतं. काही ठिकाणी जिथे एखाद्याचं अरेरावी वागणं इतरांना असह्य होतं तिथं फाटे फुटतात. चूक कुण्या एकाचीच असते असे वरवर पाहता सगळे दाखवतात. पण प्रत्यक्षात मात्र सगळेच कळत नकळत त्यात सहभागी असतात. साधी सोपी गोष्ट असते जी करता येते. ती म्हणजे थोडंसं गोड बोलून प्रत्येकाला आपण महत्वाचे आहोत हे जाणवून देणं.

का जमत नाही हे आपल्याला??? प्रत्येक घरात, समाजात दोन प्रकारचे लोक असतात
एक जे प्रत्येक गोष्टीत अरेरावी, आकांडतांडव करून सगळं स्वतःच्या मनाप्रमाणे घडवून आणतात. कधी कधी हे करण्यासाठी हव्या त्या पद्धतीही वापरतात. मग त्यात कुणाला बोलून दुखावणे असो किंवा न बोलता. असे लोक कितीही सगळ्यांमध्ये मिसळल्या सारखे वाटत असले तरी मनाने मात्र कोसो दूर असतात. कारण त्यांना सुख वाटण्यापेक्षा दुःख वाटण्यात जास्त रस असतो. अर्थात कधीनकधी त्यांना त्याचं फळ मिळतच. असो

आता दुसऱ्या प्रकारचे लोक हे आपले गुपचूप आपलं काम भलं नि आपण भले असे असतात. इतर लोक ह्यांच्याशी वाईट वागतात तेंव्हा ह्यांना वाईट वाटतं, प्रसंगी रागही येतो. पण मुळात पिंड सगळं सहन करण्याचा असल्याने वेळ मारून नेत राहतात. मग हळूहळू ह्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना ह्यांना गृहीत धरून चालण्याची सवय लागते. ती जेंव्हा टोकाला जाते तेंव्हा हे लोक जागे होतात पण तोपर्यंत पुलाखालून बरच पाणी वाहून गेलेलं असतं. आता ह्यांच तोंड उघडणे इतरांना त्रासदायक वाटू लागतं आणि मग शेवटी कित्ती वाईट आहेत असा शिक्का माथी बसतो. 🤦

ह्याव्यतिरिक्त ही एक जमात अस्तित्वात आहे पण ती फटकळ, माणुसघाणी ह्या कॅटेगरी मध्ये असते. अशी लोकं शक्यतो खऱ्याला खरं नि खोट्याला खोटं च अस ठणकावून वागत असल्याने त्यांना जनरली सण उत्सव समारंभ अशा ठिकाणी मनापासून वेलकम नसतं. आणि ते पोहोचले तरी सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी बाकी लोक एकत्र येतात😄

तर कुणी म्हणेल ह्या सगळ्याचा नेहाच्या प्रश्नाशी काय संबंध? आहे आहे करते एक्सप्लेन नेहाने ही थियरी आयुष्याच्या प्रत्येक ठिकाणी लागू करत लोकांचे स्वभाव लक्षात ठेवले. त्यामुळे झालं काय कुणाशी कसं वागलं की वाद टाळून सगळं गोड होतं हे तिला कळालं. अर्थात हे काही तिचं स्वतःचं ज्ञान नव्हतं तर तडकू, सनकी अशा आपल्या पणतीला पणजी आजीने सासरी जाण्याआधी हळूच दिलेला कानमंत्र होता. इतर कुणाचं काही न ऐकणार्या नेहाला आजीने आधी हा प्रयोग घरातच करायला लावला. सुरुवातीला तिला काहीच पटलं नव्हतं पण ट्राय करू म्हणून तिने जन्माला आल्यापासून सतत तिच्यावर नाराज असणाऱ्या घरातल्या काही लोकांबाबत आपलं वागणं बदललं. उदा. जी काकू तिला बघितलं की चिडचिड करायची तिच्या ड्रेसिंग सेन्सपासून ते प्रत्येक गोष्टीला दाद देणं नेहाने सुरू केलं. दाद द्यायची म्हणजे नुसतं काहीही बोलायचं नाही हं तर अगदी क्षुल्लक गोष्ट नोटीस करून सांगायची. जड तर गेलंच नेहाला आणि ते पचवताना काकुलाही पण आठवड्यात फरक जाणवला. शॉपिंगला गेल्यावर नेहासाठी काहीही उचलून आणणाऱ्या काकूने तिच्या आवडत्या रंगाचा स्कार्फ आणला चक्क. ही बघितल्यावर नेहाला सवयच लागली सगळीकडे हा फंडा वापरायची. त्याचा फायदा असा झाला की आपलं लेकरू इतकं गुणी कसं झालं अचानक ह्यामुळे आईबाबा कन्फ्युज होऊनही खुश झाले. आणि नेहा तिला तर अलिबाबाची गुहाच सापडली. कारण ज्या लोकांमुळे आनंदाच्या क्षणीही तिचा मूड जायचा आता त्याच लोकांसोबत राहून तिला आनंद साजरा करता येत होता. हे सगळं सुरू असताना आजी गालातल्या गालात हसत तिला एकच प्रश्न विचारायची काय मग नकटु आता म्हणशील का ? #मीच_चांगलं_वागायचं_का?😉
आजीचा हा कानमंत्र इतर मैत्रिणींबरोबर शेयर करायचं तिने ठरवलं. त्यातल्या त्यात ज्या तिला प्रॉमिसिंग वाटल्या त्यांना तिने चहाच्या निमित्ताने बोलावून सहज बोलता बोलता सुचवलं. 15 जणी होत्या त्यातल्या 5 जणींनी लगेच हे वापरून बघायचं ठरवलं त्यातील चौघीना आठवड्यात थोड्याफार फरकाने हवे तसे प्रतिसाद मिळाले मग काय त्यांनी इतरांना सांगताच त्याही ट्राय तर करू म्हणून कामाला लागल्या. अर्थात हे सर्व करताना प्रत्येक वेळी अपेक्षित प्रतिसाद मिळेलच अस नाही हे सांगायला नेहा विसरली नव्हती. कारण प्रत्येक व्यक्ती , तिचा स्वभाव, त्यावेळेसचा मूड, परिस्थिती ह्यावर तिची प्रतिक्रिया अवलंबून असणार होती. कधी कधी कौतुकाऐवजी आधारासाठी हात पुढे करण्याची गरजही पडणार होती तर कधी फक्त एक मनापासून मिळणारी मूक साथही सगळं नीट करू शकत होती. हे सगळं जाणून घेत पाऊल टाकलं तर नाती निभावताना निदान गोष्टी सुसह्य होतील हे मर्म कळालं तर आनंदी आनंद होणार होता.
मग मंडळी आम्ही बायका तर हॉर्मोन्सच्या गोंधळामुळे असे गोंधळ घालतच राहणार आहोत. पण तुमचं काय तुम्हाला कळलं असेलच ना तुम्ही कोणत्या कॅटेगरीत मोडता ते😉😉 जसं हा लेख वाचताना बऱ्याच मैत्रिणींनाही कळलं आहे. कारण मुळात गम्मत अशी होते की आपण माणसं परिस्थितीनुसार कॅटेगरी बदलत असतो अहो 😆😆 एकाच  कॅटेगरीत कुणीच नसतं आयुष्यभर. कधी आपण असे वागतो तर कधी तसे. फक्त चांगलं वागण्यात सातत्य ठेवण अवघड जातं सगळ्यांनाच. आणि मग ओठावर नकळतच प्रश्न येतो #मीच_चांगलं_वागायचं_का?😉😉
आता हे मात्र ज्याचं त्याने ठरवायचं बरं का!!
बाकी कसेही वागलात तरी त्याचे परिणाम आपल्यावरच होतात त्यांना वेलकम करण्याची तयारी ठेवत मजा करा.

बाप्पाच्या आगमनाने एक सकारात्मक सुरुवात तुमच्या , माझ्या सगळ्यांच्याच आयुष्यात होवो ही सदिच्छा.
बाकी ??? दत्तात्रेयार्पणमस्तू ♥️♥️ शुभं भवतू!!!

#गौरीहर्षल #१४.९.२०१८

शनिवार, २ डिसेंबर, २०१७

मितवा

तुझा वाढदिवस जगासाठी जरी तो एक सण वगैरे टाइप दिवस असला तरी माझ्यासाठी मात्र माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राचा बड्डे. अगदी मॉर्डन भाषेत म्हणायचं तर माझ्या पहिल्या आणि शेवटच्या बॉयफ्रेंडचा बड्डे. इतरांपेक्षा मला जास्त उत्सुकता असायची त्या दिवशी. त्याला कारणही तसंच काहीसं तुझं सगळं आवरणं, डेकोरेशन करणं जाम आवडायचं मला. पहिल्यांदा तू घरी आलास तेंव्हा आजीने तुझी काही देव म्हणून ओळख करून दिलीच नव्हती. ती म्हणाली होती , तुला जे काही बोलायचं असेल, सांगायचं असेल ते मोकळेपणाने याला सांग हा तुझं सगळं ऐकेल आणि इतर कुणापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तुला सल्ला पण देईल. मग अगदी घरातून बाहेर पडतानाही तुला येते रे म्हणत बाहेर पडण्याची सवय लागली. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर तू सोबत आहेसच हा विश्वास येणाऱ्या अनुभवांनी हळूहळू पक्का होत गेला. शाळेत किंवा घरी कुठेही काहीही सांगण्यासारखं घडलं की ते सांगण्यासाठी मी तुझ्याकडे धावत येऊ लागले. बाकी सगळे नंतर. तुझं माझं नातं कुणालाही न समजता छानपैकी बहरत राहिलं. मलाही कधी मनातलं बोलून दाखवण्यासाठी दुसऱ्या कुणाची गरज पडलीच नाही. भल्याबुऱ्या सगळ्या प्रसंगातून तू मला अगदी सुखरूप बाहेर काढत आलास. चूक केली तरी त्यातून मार्ग ही शोधून दिलेस. पुढे लग्न झालं मी दुसरीकडे आले पण इथेही तू आहेसच याची प्रचिती पावलोपावली आली. धडपडताना सावरणारा तूच होतास हे तेंव्हा समजत नाहीच नंतर मात्र नक्की लक्षात येतं की आपण जरी नाकारलं तरी तो मात्र आपली मदत करतच राहतो करतच असतो. विनातक्रार, विनाअपेक्षा निरंतर...
आपल्या नात्याला नक्की किती वर्षं झाली माहीत नाही पण आजही तू तितक्याच ठामपणे सगळ्याच बाबतीत माझ्या पाठीशी उभा आहेस. जगासाठी जरी तू देव असलास तरी माझा मात्र कायम मित्रच राहिलास एक असा मित्र ज्याच्याजवळ मी हट्ट करते, ज्याच्यावर हक्काने रागावते, कडाडून भांडते. पण शेवटी मला माहित असत तुझ्याइतकी पक्की साथ मला कुणाकडून मिळणार नाही. खरं तर मी काही अवघड क्षणी तोंड फिरवलही पण तू मात्र सदैव माझ्या सोबत राहिलास. योग्य वेळी स्वतःच्या असण्याची जाणीवही करून दिलीस. माणसांच्या भाषेत जिला खरी मैत्री म्हणतात ती तू निभावलीस. अजून काय लिहू ? लिहावं तितक थोडं आहे शब्द ही तुझेच आणि अर्थही तूच. असाच सदैव माझ्या पाठीशी राहा आणि नेहमीप्रमाणे गरज पडली तर जी पडतेच कानही धर. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा💖💖  जोपर्यंत माणूस पृथ्वीवर आहे त्याला तुझ्या अस्तित्वाचा विसर पडू नये हीच अपेक्षा... बाकी दत्तात्रेयार्पणमस्तू. ।।शुभं भवतु।।
#गौरीहर्षल
२.१२.२०१७