शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

Turning point = upgrade yourself 3/8

Turning point = upgrade yourself 
कधी कधी आयुष्यात अचानक काही गोष्टी घडतात. एखादं आव्हान समोर उभे ठाकते, अचानक स्मूद चाललेल्या आयुष्याच्या गाडीला ब्रेक लागतो, काहीतरी अनपेक्षित वळण आयुष्य 360 डिग्रीच्या कोनातून बदलून टाकते.... त्यावेळेला आपण आधी असं म्हणतो की मीच का?? माझ्यासोबतच का?? 
आणि खरं सांगायचं तर त्यावेळी आपल्याला त्या फेजमध्ये होणाऱ्या त्रासाशिवाय दुसरं काहीच दिसत नसतं. या गोष्टीला कालांतराने काही वेळ, दिवस, महिने, वर्षं उलटून जातात आणि मग जेव्हा आपण मागे वळून पाहतो.
 तेव्हा आपल्या लक्षात येतं की तो त्रास यातना ते दुःख वेदना हे आपल्याला घडवण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे होते. 
आयुष्यात जोपर्यंत अडथळे येत नाहीत, आव्हान समोर उभं ठाकत नाही, एखादा धक्का बसत नाही. तोपर्यंत आपण आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर जायला तयार नसतो. कदाचित त्यामुळेच नियतीची किंवा देवाची अशी इच्छा असते की आपल्याला बसलेल्या झटक्याने तरी आपण जागे व्हावे. 
सो अशा धक्के खात.... टक्के टोणपे सहन करत.... आयुष्याच्या रोलर कोस्टल राइडवर अजूनही टिकून असणाऱ्या सगळ्यांसाठीच आजचा रिमाइंडर... 
एकदा निवांत वेळ काढून आपल्या पूर्वायुष्यातल्या प्रत्येक अनुभवावर चिंतन करा. 
त्या अनुभवातून आपण कोणकोणत्या चांगल्या गोष्टी शिकलो हे एका ठिकाणी नमूद करून ठेवा. 
शिवाय त्या अनुभवामुळे आपण माणूस म्हणून किती घडलो आहोत याचा आढावा घ्या. 
अनुभव हे धडे देण्यासाठी असतात. पण हे धडे शाळेतल्या धड्यांसारखे शिकून विसरून जायचे नसतात तर ते कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे असतात. आणि त्या धड्यांना गिरवत आयुष्याचा एक एक टप्पा पुढे जायचं असतं. 
गोष्टी घडून गेल्यानंतर कधीतरी आपल्या प्रत्येकाच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडतं जे काही होतं ते चांगल्यासाठीच...
मग योग्य वेळी या चांगल्यासाठी घडणाऱ्या गोष्टी स्वीकारून आपण स्वतःला घडवण्याच्या दिशेने पाऊल टाकूया...
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
३/८



 

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

comparison 2/8

आपल्या आयुष्यात आपल्याला अशा काही व्यक्ती भेटतात, ज्यांना दुसऱ्यांना कुठल्याही गोष्टीत यश मिळालं तरी पोटात दुखतं. मग अगदी त्या स्वतः रनिंग रेस मध्ये पहिल्या आल्या असल्या आणि दुसरी व्यक्तीची लिंबू चमचाच्या शर्यतीत पहिली आली असली, तरी त्यांना दुसऱ्याच्या लिंबू चमचाच्या शर्यतीत पहिलं येण्याने त्रास होत असतो. आणि तो त्रास त्या व्यक्त सुद्धा करत असतात. पण आपल्या असं करण्याने इतर लोक दुखावली जात आहेत हे त्यांच्या गावी सुद्धा नसतं. कधी कधी चुकून आपण सुद्धा असं वागतो बर का...

यामध्ये जी दुखावलेली लोक असतात ना? ती मात्र बऱ्याचदा स्वतःला एक प्रश्न विचारत असतात, की माझ्या यशाने या समोरच्या व्यक्तीच्या यशात किंवा आयुष्यात काहीच फरक पडणार नाहीये. मग हिला एवढा त्रास का होतोय?? तर त्याचं मुख्य कारण फक्त एवढंच असतं की त्या व्यक्ती स्वतःचा आयुष्य दुसऱ्यांबरोबर सातत्याने कम्पेअर करत असतात. 
त्यांना दुसऱ्याच्या आनंदात, यशात सहभागी व्हावेसे वाटत नाही. अर्थात यामुळे कोणाचाही यश किंवा आनंद कमी होत नाही. पण जनरली जर आसपासच्या लोकांना गोष्टी पर्सनली घ्यायची सवय असेल तर त्यांना मात्र फार त्रास होतो. जिला आपण जवळची व्यक्ती समजत आहोत. ती आपल्या आनंदात, यशात सहभागी होत नाहीत याचं दुःख होतं.  

या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट काय असते माहित आहे ती म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही विशिष्ट गोष्टी घडण्याची वेळ ठरलेली असते. शिवाय थोड्याफार फरकाने जे काही घडत असतं ते सारखंच असतं. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मधल्या वेळात प्रत्येक माणूस सारख्याच स्थित्यंतरातून जात असतो. काही जण पूर्व संचितामुळे हे टप्पे लवकर पार करतात तर काहीजणांना वेळ लागतो इतकंच. 

शिक्षण, नोकरी, लग्नं, मुलं, संसार या इतरांशी तुलना करण्याच्या गोष्टी नाहीत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरून इतरांसोबत आपल्या आयुष्याची तुलना करण्यापेक्षा आपण काल काय होतो आणि आपण आज काय आहोत याची तुलना केलेलं जास्त चांगलं राहिलं. 

तसही या सगळ्या गोष्टी प्रत्येक जण करत असल्याने त्यामध्ये नावीन्य असं काहीच नाही. ही गोष्ट तुम्ही आज करत आहात, ती तुमच्या आधी कोणीतरी केलेली आहे आणि तुमच्या नंतर सुद्धा कोणीतरी करणार आहे. मग यात कसलं आलं वेगळेपण?? 

ते वेगळेपण आपल्याला आणावं लागतं... कसं?? स्वतःमध्ये योग्य पद्धतीने बदल घडवून... स्वतःच्या स्वप्नातलं आयुष्य घडवण्यासाठी कष्ट घेऊन... 
इतरांशी तुलना करून रडत बसण्यापेक्षा आपण आत्ता ज्या टप्प्यावर आहोत तो टप्पा एन्जॉय करणं जास्त महत्त्वाचं. ती फेज महत्त्वाची...
तुम्ही जर शिकत आहात, तर नुसतं शिकायचं म्हणून न शिकता ते अंगी बाणवण्याचा आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून त्याचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करा. 
तुमचं जर शिक्षण पूर्ण झालं असेल तर आपलं भविष्य घडवण्यासाठी काय करता येईल त्यावर विचार करून कृती करायला घ्या. 
तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर त्या संदर्भातली आपली कौशल्य तपासून पहा आणि नवीन काही शिकण्याची गरज असेल तर ते शिका. 
तुम्ही जर सिंगल असाल तर एकटे असताना सुद्धा भरभरून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. 
जर तुमचं लग्न झालं असेल किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर त्या रिलेशनशिप मधल्या छोट्या छोट्या गोष्टी आठवणीत राहाव्यात म्हणून प्रयत्न करा. 
थोडक्यात काय तर स्वतःवरती कठोर परिश्रम घेण्याची फक्त तयारी ठेवू नका तर ते परिश्रम घ्यायला सुरुवात करा. इतरांच्या टाईमलाईन, कव्हर पेज, प्रोफाइल पिक्चर, स्टोरी, आणि whatsapp स्टेटस कडे बघून स्वतःच्या आयुष्याला कमी लेखू नका. 

कारण इथे प्रत्येकाची टाईमलाईन आणि डेडलाईन सुद्धा वेगवेगळी आहे...
लक्षात घ्या आपल्या आयुष्याची प्रश्नपत्रिका आपल्यालाच सोडवायची आहे. 
जाता जाता एकच सांगते, कोणी आपल्यापुढे गेलं आहे म्हणून स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि कोणी मागे राहिले आहे म्हणून वाईट सुद्धा वाटून घेऊ नका. आपण काल काय होतो आणि आज काय आहोत याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
२/८





Distance 1/8

Distance 


आपल्या बाजूला असे कित्येक लोक असतात की ज्यांची ओंजळ ओसंडून वाहत असते....
पण एखाद्या व्यक्तीकडे सगळं असलं तरी सुद्धा 
त्याला दुसऱ्याकडे असणाऱ्या गोष्टींची भुरळ पडतेच...
आणि मग त्या गोष्टी स्वतःकडे नाहीत म्हणून ती व्यक्ती आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असलेल्या लोकांवर सुद्धा जळत राहते. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करते. 
तुम्ही सुद्धा हे अनुभवलं असेलच ना??
आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती शेवटपर्यंत आपल्या सोबत राहीलच असे नसते.
सो जेव्हा काही लोकांमुळे आपल्याला अनादर, अपमान, त्रास या गोष्टींना सामोरे जावं लागतं. तेव्हा त्या लोकांना दूर करणेच योग्य असते. तुम्ही दुरूनही त्या लोकांचं चांगलं व्हावं असा विचार करूच शकता. त्यासाठी सातत्याने तो त्रास सहन करत त्यांच्या संपर्कात राहणे गरजेचे नसते. 
आणि जर काही नाती अशी असतील जी आपण पूर्णपणे तोडून टाकू शकत नाही. त्या नात्यांमध्ये आपला वेळ आणि एनर्जी किती द्यायची हे मात्र आपल्याला ठरवून घ्यावे लागते. 
सोप्या भाषेत सांगायचं तर बाऊंड्री सेट कराव्या लागतात. 
आपण सुद्धा आदराला पात्र आहोत हे नेहमी लक्षात ठेवा. 
तुम्ही आणि तुमचा आयुष्य या दोन्ही गोष्टी मौल्यवान आहेत. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
१/८
 


मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

cup of tea... आणि आपण... १३.८.२०२४

This is not my cup of tea... असं आपण बऱ्याचदा बोलताना म्हणत असतो. पण हीच गोष्ट उलट सुद्धा असते म्हणजे you can't be everyone's cup of tea... याचा अर्थ तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आवडाल किंवा तुमची बाजू समजेल किंवा हे तसा प्रयत्न करतील असं नाही. आणि असं झालं नाही तरीसुद्धा तुम्ही आणि तुमची सिच्युएशन अतिशय नॉर्मल आहात. 
तुम्ही सांगितलेला एखादा विनोद प्रत्येकाला हसवू शकेल असं नसतं...
तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या लोकांना असेलच असंही नसतं...
एखाद्या गोष्टीबद्दल तुमची प्रतिक्रिया समोरच्याला पटेलच असंही नसतं... आणि तरीही सगळं व्यवस्थित असतं. कारण यामध्ये चुकीचं काहीच नाही. 
आपल्यापैकी बऱ्याच जणांना इतरांना खुश करण्याची सवय असते किंवा इतरांनी आपली मर्जी राखावी अशी अपेक्षा असते. पण हे सगळं करताना आपण विसरतो की आपण प्रत्येक जण एक वेगळी व्यक्ती आहोत. आपल्या प्रत्येकासाठी सौंदर्य आणि नॉर्मल असण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत.  

मग एखाद्याला आपण नाही आवडलो तर काय फरक पडतो?? त्यांना दुसरं कोणीतरी आवडत असतं. 
जर एखादी व्यक्ती आपल्याला नाही आवडली तर काय फरक पडतो?? आपल्याला दुसरं कोणीतरी आवडतं. 

आपल्या आजूबाजूच्या किती लोकांना आपण आवडतो यावर बऱ्याचदा आपण स्वतःची किंमत आणि त्या माणसाची आपल्या आयुष्यातील जागा ठरवत असतो. जे की चुकीचं आहे. 

हल्ली बऱ्याचदा एक गोष्ट खूप सातत्याने आढळून येते ती म्हणजे सोशल मीडियावर जर आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत तरच आपलं नातं चांगलं आहे. मग तो मला सोशल मीडियावर लाईक फॉलो करतो म्हणून मी पण प्रत्यक्ष आयुष्यात त्याच्याशी नीट वागणार. आणि एखादा असं करत नाही म्हणून मग मी त्याच्याशी चांगलं वागणार नाही. 

पूर्वपार जी गोष्ट आपण ऐकत आलो आहोत तीच इथेही महत्त्वाची ठरते ती म्हणजे गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र.... 
बाकी आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाला आपल्याबद्दल किंवा आपल्याविषयी काहीना काहीतरी खटकत असतंच. सेम गोष्ट आपल्यालाही इतरांबद्दल वाटत असते. कधी आपण ती बोलून दाखवतो कधी ती आपल्याला इतरांच्या कृती मधून आपल्याबद्दल दिसून येते. 
पण कुणी कसंही वागलं किंवा तसा अविर्भाव जरी आणला तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की इतरांच्या वागण्याने बोलण्याने आपली किंमत ठरत नाही. 

आपली किंमत आपण स्वतः ठरवायची आणि ती जपायची सुद्धा... यासाठी सुद्धा बरेच उपाय आहेत बरं का...

बाकी?? बाकी भेटू लवकरच..... असंच काहीसं सोबत घेऊन....

स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
१३ ऑगस्ट २०२४







शुक्रवार, २६ जुलै, २०२४

माझ्या मना बन दगड...

माझ्या मना बन दगड... 
शीर्षक विचित्र आहे ना??? पण या ओळीत तथ्य मात्र आहे. समुपदेशन करत असताना किंवा वेगवेगळे वर्कशॉप घेत असताना बऱ्याच जणांकडून विचारला जातो की 
- मॅडम समोरचा हेतूपुरस्सर आपल्याला त्रास देत असेल तेव्हा काय करायचं?? 
- किंवा एखादी व्यक्ती जी प्रचंड टॉक्सिक आहे पण आपण तिला टाळू शकत नाही कारण दुर्दैवाने ती आपल्या फार जवळच्या नात्यातील आहे. अशावेळी त्या व्यक्तीबरोबर वेळ घालवत असताना स्वतःच मानसिक स्वास्थ्य खराब होणार नाही याची काळजी कशी घ्यायची?? 
- दुर्लक्ष करणं हा उपाय उत्तम आहे. पण प्रत्येक वेळी दुर्लक्ष करताच येतं असं नाही. 
- आणि कित्येकदा तर दुर्लक्षच करता येत नाही. इन्स्टंट रिस्पॉन्स जातो. मग हे नियंत्रण मिळवणं कसं शिकायचं?? 

तर आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात ज्यांना आपण टाळू शकत नाही. आपल्याला त्यांच्याबरोबर राहणं भाग असतं. मग त्यांच्याबरोबर राहात असताना स्वतःचे रिस्पॉन्स किंवा प्रतिक्रिया कशा नियंत्रित करायच्या?? 

याच्यावर एक उपाय आहे... तोच जो वरती लिहिला आहे... हो तोच....... "माझ्या मनात बन दगड" ....
अर्थात ही एक मेथड आहे जिला ग्रे रॉक मेथड ( grey Rock method) असं म्हणतात. 

ग्रे रॉक मेथड म्हणजे काय???

ग्रे रॉक मेथड म्हणजे एखाद्या व्यक्तीला समोर असताना सुद्धा रिस्पॉन्स कमी देणे किंवा तिच्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट न दाखवणं. पण इथे फरक हा असतो की त्या व्यक्तीचं वागणं बोलणं हे आपल्याला बऱ्याचदा ट्रिगर करत असतं. म्हणजे तिच्या वागण्या, बोलण्यामुळे, तिच्या संपर्कात येण्यामुळे आपल्या मनस्थितीवर नकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्याकडून नकळत त्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्याला रिस्पॉन्स दिला जातो. हे रिस्पॉन्स देणं कमी करणे किंवा अजिबातच रिस्पॉन्स न देणे म्हणजे ग्रे रॉक मेथड. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या नकारात्मक वागण्याला प्रतिक्रिया देतो. तेव्हा नकळतच तो संवाद वाढत जातो. कधी कधी त्याचे वादात रूपांतर होते. कधी कधी वादात रूपांतर जरी झाले नाही, तरी नंतर आपली मनस्थिती मात्र पूर्णपणे खराब झालेली असते. 
कुठलाही संवाद चालू तेव्हाच राहतो. जेव्हा आपण आपल्या परीने त्याच्यात भर घालत असतो. ते म्हणतात ना की जेव्हा तुम्ही नकारात्मक संवादांना रिस्पॉन्स देणं थांबवता. तेव्हा तुम्ही त्याच्यातली हवा काढून घेत असता.... 
हे अशा प्रकारे एखाद्या गोष्टीला महत्त्व देणं कमी करता यायला हवं.

आपण बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला म्हणत असतो की अरे दगडासारखा काय बसला आहेस??? काहीतरी बोल.... पण इथे मात्र आपल्याला दगडासारखं बसायला शिकायचं असतं 😆😆😆

ग्रे रॉक मेथड कशी वापरायची??
1. तटस्थ राहणे.... 
टॉक्सिक व्यक्तीच्या संवादाला कमीत कमी शब्दात, भावनिक न होता, वास्तवदर्शी उत्तर देणे शिकल्यानंतर तटस्थ राहणे जमू लागते. 
2. नजरेला नजर न मिळवता संवाद साधणे. असं केल्याने समोरच्या व्यक्तीला आपण त्या संवादामध्ये सहभागी नाही हे लक्षात येते. 
3. अशा संवादांमध्ये आपली वैयक्तिक माहिती न देणे हे जास्त फायद्याचे असते. 
4. तुम्ही वर्तमान आयुष्यात काय करत आहात?? शिवाय तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात सुरू असणाऱ्या चांगल्या वाईट घडामोडी न सांगणे हा महत्त्वाचा नियम असतो. 
5. समोरच्या व्यक्तीच्या वागण्याला अतिशय शांतपणे आणि संयत स्वरूपात प्रतिक्रिया देणे. 
6. समोरच्या व्यक्तीमुळे आपण कधी ट्रिगर होत आहोत हे ओळखणे गरजेचे असते. 
7. जिथे आवश्यकता असेल तिथे टाळण्यासाठी योग्य प्रकारची कारणे वापरणे. 
8. गरज पडल्यास आपल्या जवळच्या व्यक्ती, मित्र नातेवाईक किंवा व्यावसायिक पातळीवर थेरपीस्ट ची मदत घेणे आवश्यक असते.

ग्रे रॉक मेथड चे फायदे.... 
1. यामुळे आपण मानसिक दृष्ट्या दुखावले जात नाही. 
2. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपण स्वतःसाठी अनुकूल वातावरण तयार करू शकतो. 
3. संवादांमधील ताण आणि त्यामुळे होणारा वाद कमी होतो. 
4. हळूहळू आपल्याला आपल्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणे जमू लागते. 
या पद्धतीचे अजूनही काही फायदे आहेत. जे प्रत्यक्षात वापरल्यानंतर आपल्या लक्षात येतील.  
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की एखाद्या व्यक्तीचे वागणे जर आपल्याला वारंवार दुखावत असेल. तर त्या व्यक्तीला नेहमी त्याच पद्धतीने प्रतिक्रिया न देता आपली प्रतिक्रिया देण्याची पद्धत आपल्याला बदलता यायला हवी. 
बरेच जण असं वागल्यानंतर पुन्हा पुढे जाऊन स्वतःच्या मनात स्वतःच्या वागण्याबद्दल अपराधीपणाची भावना जोपासत राहतात. तर इथे सुद्धा हे लक्षात ठेवायला हवे की आपण आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी करत असलेले हे उपाय आहेत. 
समोरची व्यक्ती जर आपल्याला दुखावताना पुढचा मागचा विचार करत नाही तर आपण स्वतःचा विचार करून स्वतःसाठी काही पावलं नक्कीच टाकू शकतो. 
यामध्ये आपण त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे दुखावत नाही. आपण आपल्या परीने तो संवाद कंटाळवाणा ,निरस करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तो संवाद थांबवण्यासाठी किंवा टाळण्यासाठी प्रयत्न करत असतो. 

बाकी जाता जाता एकच सांगते शक्य असेल तिथे स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे स्वतःला प्रायोरिटी वर ठेवणे. प्रत्येक वेळी इतरांना काय वाटेल याचा विचार करणे कुठे ना कुठेतरी आपल्यासाठी घातक ठरत असते. 

Being less responsive or no response is also response... हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. 

आपल्या प्रतिक्रियेतून कोणी काय अर्थ काढायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो बर का... त्यामुळे पुन्हा असं म्हणू नका की मी असं वागलो/वागले म्हणून समोरची व्यक्ती माझ्याशी भांडायला आली.... काही व्यक्तींना प्रतिक्रिया मिळाल्याशिवाय समाधान मिळत नाही म्हणून ते बऱ्याचदा टोकाला जाऊन समोरच्याला डिवचण्याचा प्रयत्न करत असतात. त्या डिवचून घेण्यालाच आपण ट्रिगर असे म्हणतो. 
हे ट्रीगर ओळखता यायला हवेत आणि वेळीच त्यांच्यावर उपाय सुद्धा करता यायला हवेत. 

गरज असेल तिथे कौन्सिलर किंवा सायकॉलॉजिस्टची मदत घ्या.‌ 
मानसिक स्वास्थ्य सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे शारीरिक स्वास्थ्य.... 

बाकी??? बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!!

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
गौरी हर्षल कुलकर्णी 
(एम ए क्लिनिकल सायकॉलॉजी, समुपदेशन ) 
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल

सोमवार, ११ मार्च, २०२४

way out

वे आऊट 
जवळपास एक आठवडा होत आला अजूनही मला प्रीतीने फोन नाही केलाय. अनुष्का तिच्याच विचारात गुंतलेली होती.
"प्रीती" तिची सगळ्यात जवळची मैत्रीण.
 एकच शाळा, एकच कॉलेज आणि त्यानंतर नोकरी सुद्धा एकाच बिल्डिंगमध्ये पण वेगवेगळ्या ऑफिसमध्ये.
ऑफिस जरी वेगवेगळे असले तरी जाता येता दोघे एकत्र असायच्या. त्यामुळे सातत्याने एकमेकींच्या आयुष्यात काय घडतंय हे एकमेकींसोबत शेअर करणं हे ओघाने आलच.

 नवीन ऑफिस जॉईन केल्यानंतर हळूहळू अनुष्काला मात्र जाणवायला लागलं की प्रीती तिला टाळण्याचा प्रयत्न करते.
 कधी कधी प्रीती तिला सांगायची की मला बरं वाटत नाहीये आणि त्या दिवशी ती बाहेर फिरायला गेलेली असायची.
 कधी दोघींचा प्लान करायचा आणि तो लास्ट मिनिटला ती कॅन्सल करायची.
 या गोष्टी अनुष्काने तेवढ्या मनावर घेतल्या नाहीत.
 पण नुकतंच जे काही तिने स्वतः बघितलं ते बघितल्यानंतर मात्र ती मनातून दुखावली गेली.

 ज्या प्रीतीच्या वाढदिवसासाठी अनुष्का सरप्राईज प्लान करत होती. ती प्रीती अनुष्काला टाळून इतरांबरोबर तो वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅनिंग करत होती.
 जर त्या दिवशी अनुष्का हॉटेलमध्ये प्रीतीच्या मागच्याच टेबल वरती बसलेली नसती तर तिला ती गोष्ट कधीच कळली नसती.
 पण तिचं सुदैव म्हणून प्रीती तिच्याबद्दल काय विचार करते हे तिला समजलं. 
 प्रीती तिच्या ऑफिसच्या नवीन मैत्रिणींबरोबर वाढदिवसाचं सेलिब्रेशन प्लॅन करत होती.
 वीकेंडला रिसॉर्टवर जाऊन सेलिब्रेट करण्याचा त्यांचा प्लॅन होता. त्या मैत्रिणींपैकी कोणीतरी तिला विचारलं की," अगं अनुष्काला बोलवणार आहेस का?"
 त्यावर प्रीतीचे रिएक्शन अशी होती की," सारखं सारखं तिला नाही बोलवायला आवडत मला. किती वर्ष झाले आम्ही एकत्र आहोत. पण ती कधीच मला माझी स्पेस देत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा सहभाग... खरं सांगायचं तर तिचं असं सारखं मला चिकटून असणं मला कधीच आवडलं नाही. पण मला तिच्यामुळे फायदा होत होता म्हणून मी तिच्याबरोबर होते. 
आणि मला शक्य झालं असतं तर मी तिच्यासारख्या मुली बरोबर मैत्री पण केली नसती.",
"तिच्यासारख्या म्हणजे?", तिथे बसलेल्या मुलींपैकी एकीने विचारलं.
 "अग तिच्यासारख्या म्हणजे ती बरीच वेगळी आहे. तिच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. तिला पब पार्ट्या या गोष्टी आवडत नाहीत. ती फारशी मुलांची क्लोज होत नाही. आणि तिच्यामुळे मलाही कधी कोणाबरोबर मिक्स होता आलं नाही. आताही बघ ना पैसे आहेत तर आपण छान मॉडर्न लाइफस्टाइल अफोर्ड करू शकतो पण तिला मात्र तसंच राहायचं आहे. काकूबाई कुठली.",असं म्हणून प्रीती हसू लागली.
 बाकीच्यांनीही तिच्या हसण्यात सहभाग नोंदवणं योग्य समजलं. 

हे सगळं ऐकणारी अनुष्का मात्र मनातून प्रचंड मोडून पडली. साहजिकच होतं जवळपास बारा-पंधरा वर्ष त्या दोघी एकत्र होत्या.
 अगदी वयात येण्यापासून ते चेहऱ्यावर पहिल्यांदा मेकअप करण्यापर्यंत सगळं काही ज्या मैत्रिणीसोबत शेयर केलं ती कधीच आपल्याला मैत्रीण मानत नव्हती हे ऐकल्यानंतर अनुष्काला वाईट वाटलं. त्यादिवशी अनुष्का तिथून घरी निघून आली. पण तो विचार मात्र तिच्या मनातून निघत नव्हता. दुसऱ्या दिवशी तिने सवयीने सकाळी प्रीतीला फोन लावला. प्रीती अर्थातच तिची वाट बघत होती. कारण ती नेहमीच अनुष्का सोबत तिच्या गाडीवर ऑफिसला जायची. प्रीतीकडे स्वतःची गाडी होती पण ती गाडी प्रीती कधीच आणत नसे.

 आता अनुष्काला बऱ्याच गोष्टींचा अंदाज येऊ लागला होता. शक्य तेवढ्या गोष्टी, वस्तू, पैसे अनुष्काचे वापरून घेऊन प्रीती तिला मात्र स्वतःपासून स्वतःच्या गोष्टींपासून लांब ठेवत असे. म्हणजे एकंदरीत इतकी वर्ष प्रीतीने अनुष्काचा फायदा उचलला होता. प्रीतीच्या मनासारख्या गोष्टी घडल्या नाही की ती रुसून बसत असे,अनुष्काशी बोलणं बंद करून टाकत असे.
 अशा वेळेला अस्वस्थ होणारी अनुष्का प्रीतीला मनवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करत असे. प्रयत्न करताना स्वतःला त्रास होतोय स्वतः हे लक्षात येऊन सुद्धा अनुष्का प्रीतीच्या मैत्रीखातर हे सगळं करत असे. आता मात्र अनुष्काला या सगळ्या गोष्टी आणि त्या मागची कारण कळून चुकली होती. पण त्यावर आपण नेमकं कसं वागायचं हे तिला कळत नव्हतं. कोणाला तोंडावर बोलून तोडून टाकणं हा तिचा स्वभाव नव्हता. मग यावर उपाय म्हणून अनुष्काने आपल्या परीने उपाय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 

तुमच्या सोबत सुद्धा असं काही झालं आहे का वाचक मित्रमैत्रिणींनो? 
जवळच्या एखाद्या नात्यात आपण स्वतःला झोकून देऊन involve असतो. त्या व्यक्तीला खुश करण्यासाठी आपण जीव तोडून प्रयत्न करत असतो. आणि आपली वेळ आली की ती व्यक्ती मात्र मला असलं काही येत नाही अशा आविर्भावात असते. 
People pleasing ही टर्म हेच सांगते इतर लोकांची मर्जी सांभाळण्यासाठी स्वतःला त्रास करून घेणे . 
या चक्रातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न हे स्वतःलाच करावे लागतात. कारण आपण आपल्या वागण्यातून समोरच्या व्यक्तीला कुठेतरी आपल्याला गृहीत धरण्याची सवय लावलेली असते. 
आणि कधी कधी समोरची व्यक्ती सुद्धा संधीसाधू असते. 
जेंव्हा आपण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू करतो तेंव्हा अर्थातच आपल्याला विरोध केला जातो. 
कधी कधी तर हा विरोध इतरांपेक्षा जास्त स्वतःकडून केला जातो. 

स्वतःला प्रायोरिटी दिल्याने अपराधी वाटणे हे त्याचंच लक्षण. 

स्टेप बाय स्टेप स्वतःला या गोष्टी पटवून देत कृती करण्यावर भर दिला तर नक्कीच हे सगळं बदलू शकतं. 
पण आपल्याला सुरुवातीला वाटणारे गिल्ट, इतरांचा विरोध, वाद, रुसवे फुगवे आणि काही प्रसंगी दूर होणारी नाती हे सगळं सहनच होत नाही. आणि पुन्हा पुन्हा आपण तेच करणे स्वीकारत राहतो. 

जुनाट आजार नीट होण्यासाठी कसं मुळापासून दिनचर्या बदलावी लागते हेही तसच काहीसं असतं. 
फक्त इथे स्वतःचे शरीर, मन , मेंदुच नाही तर इतर लोकांकडूनही या बदलांसाठी विरोध केला जातो. 
हा विरोध मोडून काढण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. कारण गोष्ट आपल्या मनस्वास्थ्याशी संबंधित असते. 

वरच्या गोष्टीत असलेल्या अनुष्कानेही असेच प्रयत्न सुरू केले. 
तिला जसा त्यातून बाहेर पडण्यासाठी त्रास झाला तसाच त्रास इथे प्रितीलाही झाला. कारण तिला अनुष्काचा फायदा उचलून जगण्याची सवय झालेली होती. तिने त्यासाठी अनुष्काला मनस्ताप देण्याचा प्रयत्न केला. पण अनुष्का आपल्या बाजूने ठाम होती. 

अनुष्काने मात्र समोरासमोर वाद घालणे टाळत स्वतःसाठी इतर मार्ग शोधले. जसं की ऑफिस ब्रांच बदलणे, नवीन काही क्लासेस जॉईन करणे. जेणेकरून तिला प्रितीसोबत जास्त वेळ राहावे लागणार नाही. या गोष्टी सोप्या नव्हत्याच पण तिने त्या जमवल्या. स्वतःसाठी, स्वतःच्या चांगल्या भविष्यासाठी. 

जर एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यात आपल्याला जागा देत नसेल तर त्यासाठी आपण जबरदस्ती करून काही उपयोग होत नाही. 
ते म्हणतात ना की, If they don't see the value of having you, then don't try to convince them.

आपल्याला शारीरिक, मानसिक पातळीवर त्रासदायक असणाऱ्या गोष्टी, व्यक्ती जर आपल्याला स्वतःपासून दूर करता येत नसतील तर अर्थातच आपली परिस्थिती "अग अग म्हशी मला कुठं नेशी" अशी असते. 

आणि महत्वाचा मुद्दा प्रत्येक वेळी दूर करणे म्हणजे तोडून टाकणं नसते. प्रत्येक नात्यात मर्यादा निश्चित करून नाती सांभाळता येतात. सगळा त्रास आपणच सहन करायला हवा ही मनोवृत्ती मात्र त्यागणे जमलं पाहिजे. 

गौरी हर्षल कुलकर्णी 
(एम ए क्लिनिकल सायकॉलॉजी, समुपदेशन ) 
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

प्रत्येकाचा मार्ग वेगळा ...

आपण सगळेच जण आपल्या जवळच्या लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असतो. कधी कधी तर अनोळखी लोकांना सुद्धा आपण न मागता मदत करण्यास तयार होतो. 
अशावेळी आपण त्यांना ते सगळे उपाय सांगत असतो जे आपल्याला उपयोगी पडलेले असतात. पण ते उपाय स्विकारण्याची त्यांची तयारी आहे किंवा नाही हे आपल्याला माहित नसतं.
मात्र आपल्याला असा ठाम विश्वास असतो की जे पुस्तकं किंवा औषध, किंवा एखादं मोटिव्हेशनल भाषण जसं आपल्या मनाला, शरीराला उभारी देण्यासाठी उपयोगी पडले तेच त्यांनाही तशीच सकारात्मक ऊर्जा देईल. 
पण आपण हे विसरतो की, आपण ज्या फेजमध्ये आहोत किंवा होतो त्याच फेजमध्ये समोरची व्यक्ती नाहीये. 
त्यामुळे अर्थातच हे उपाय कितीही प्रभावी असले तरीही जोपर्यंत एखाद्या व्यक्तीची ते स्विकारण्याची मानसिक तयारी नसते तोपर्यंत त्यांचा काहीही उपयोग होत नाही. 
म्हणूनच मदत करताना ती समोरच्या व्यक्तीवर लादली जात नाही ना हे लक्षात घ्यावं. 
त्रास शारीरिक असो किंवा मानसिक प्रत्येक व्यक्तीची त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा महत्वाची असते नेहमीच. 
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
मानसशास्त्रतज्ञ