शनिवार, ४ मार्च, २०२३

गारूड

गारुड

विकेंडच काम नाही म्हटलं तरी बरंच लांबल होतं. 
शेवटच्या बसमध्ये कसाबसा घुसत तो गावाकडे निघाला होता. ती बससुद्धा आज काही बिघाड झाल्यामुळे त्याला मिळाली होती. नाही तर रात्री ८ नंतर गावाकडे जाण्यासाठी एकही बस नसायची.

बायको आधी बाळंतपण म्हणून आणि मग बाळाच्या   दोन्ही आजीआजोबांचा हट्ट म्हणून हल्ली गावीच राहत होती. त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता. कारण सुरुवातीला  बाळाला आणल्यानंतर  काही दिवस दोघांची प्रचंड तारांबळ उडत होती. त्यात त्याच्या घरी येण्याची वेळ निश्चित नव्हती. मग शेवटी अजून काही महिने तरी बाळ गावीच राहील अस ठरलं होतं आणि त्याला सांगण्यात आलं होतं. 

गावी काय हाकेच्या अंतरावर सासर माहेर असल्याने बायकोही निवांत झाली होती. पण त्याची काळजी मात्र तिला असायची. ती होती तोपर्यंत त्याचं सगळं वेळच्या वेळी होत होतं पण नसताना सुद्धा अडणार नाही हे तिने बघितलं होतं. 

विकेंडला आला की कोरड्या फराळाचे डबे सोबत जात होते. आणि इतर वेळेसाठी तिने जवळच्या एका मावशींकडे डब्याची सोय केली होती. इनशॉर्ट स्वतःच्या बाळाला जरी आई आणि सासूच्या हातात सोपवलं असलं तरी सासूच्या बाळाची काळजीही ती घेत होती. 

गाडीत बसायला जागा मिळाली, तस त्याने सीटवर मागे डोकं टेकवून डोळे मिटून घेतले. थकल्यामुळे त्याचा डोळा लागला. जाग आली तेंव्हा गाडी सेकंड लास्ट स्टॉपवर होती. त्याचा शेवटचा स्टॉप होता. गाडीत आता बोटावर मोजण्याएव्हढी माणसं उरली होती. 

इकडे तिकडे नजर फिरवताना त्याचे डोळे एका ठिकाणी स्थिर झाले. ड्रायव्हरच्या मागची सीट होती. तिथे कुणीतरी बसलं होतं. कोण आहे हे पाठ असल्याने लक्षात येत नव्हतं. ती स्त्री आहे हे त्याला तिचा पदर हलला तेव्हा लक्षात आलं. आता ती मागे वळणार तेवड्यात कुणीतरी मागून भराभर चालत उतरण्यासाठी पुढे गेला. आता त्या सीटवर कुणीच दिसत नव्हतं. 

आपल्याला भास झाला अस समजून त्याने खिडकीबाहेर नजर टाकली तर गाडी स्लो झाली तिथे कुणीतरी त्याच्याकडे बघून हात हलवत होतं. त्याला काही समजलं नाही. तो काही रिएक्शन देणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. 

फोनच्या रिंगटोन मुळे तोच काय सगळी बस भानावर आली. आणि चकव्या कडे  जाणारी बस गावाच्या दिशेने वळली. 

त्याने फोन उचलून बायकोला जवळच आलो आहे असं सांगितलं आणि तो आजूबाजूला बघू लागला. 

ड्रायव्हर जवळ जाऊन कंडक्टर काहीतरी विचारत होता. आणि ते दोघे पुन्हा पुन्हा वळून त्याच्याकडे बघत होते. त्याला जरा विचित्रच भासलं सगळं पण  तेवढ्यात कंडक्टर त्याच्या दिशेने आला आणि त्याने त्याला विचारलं , "ओ भाऊ जरा तुमचा नंबर देता का? किंवा मग ही रिंगटोन द्या " 

"कशासाठी?", त्याने विचारलं. 

" सांगतो उतरल्यावर पण इथं फोनच नेट नाही चालणार एखाद्या वेळी निदान रिंगटोन तरी वाजवता येईल. "कंडक्टर अजिजीने म्हणाला. 

त्याने रिंगटोन दिली. आणि नंबरसुद्धा. 

गावाच्या अगदी अलीकडे बस स्लो झाली आणि बसमधलं वातावरण अचानक बदललं. 
अचानकच खूप सारे हसण्याखिदळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. सोबतच बांगड्या, पैंजण ह्यांची किणकिण सुरू झाली. दिसत कुणीच नव्हतं पण आवाज ऐकू येत होते. 

ड्रायव्हर कसाबसा बस चालवण्याकडे लक्ष देत होता. 

तर कंडक्टर बसच्या दाराकडे डोळे मोठे करून बघत होता. 

उरलेले प्रवासीही काही तरी विचित्रच वागत होते जस काही ते गाडीत नाही बारमध्ये बसले आहेत. 

हा सगळा अनुभव त्याच्यासाठी नवीन होता. त्याने कंडक्टर कडे बघितलं आणि तो ज्या दिशेने बघत होता तिकडे बघितलं एक स्त्री चालत्या बसमध्ये चढत होती. अगदी निवांतपणे. जणूकाही ती हवेवर तरंगत आहे. 

अंगात आहे नाही तेवढं त्राण गोळा करून कंडक्टर पुढे झुकत त्याला म्हणाला ," चुकुन सुद्धा तिच्या डोळ्यात बघू नका. जमलं तर ती रिंगटोन लावा. ", कारण गडबडीत त्याचा फोन सीटखाली पडला होता आणि तो फोन उचलायला वाकला तसा कुणीतरी त्याचा हात धरला होता. 

पण कंडक्टर च्या सांगण्याआधीच त्याने तिच्या डोळ्यात बघितलं होतं. आणि तो  सीटवरून उठून तिच्यामागे चालू लागला. 

इकडे त्याच्याशी बोलल्यापासून त्याच्या बायकोचा जीव वरखाली होत होता. तिने पुन्हा त्याचा नंबर डायल केला पण तो लागला नाही. शेवटी तिला काय वाटलं माहीत नाही पण देवासमोर जाऊन बसत तिने फोन लावायला सुरुवात केली. 

जवळपास दहा मिनिटांनी फोन लागला आणि .....

फोनची रिंगटोन वाजू लागली. त्याला एक जोरदार झटका बसला आणि तो भानावर आला. 

तो चालत्या गाडीतून बाहेर पाय टाकणार होता. 

ड्रायव्हर आणि कंडक्टर च्या तोंडातून भितिने शब्द फुटत नव्हते. 

त्याची रिंगटोन बंद झाल्याने त्याच्या पुढे असलेली ती रागाने मागे वळत होती. 

पण अचानकच पुन्हा एकदा वातावरण बदलले होते. तेवढ्यात सावरत कंडक्टर ने खाली पडलेला फोन उचलून ती रिंगटोन वाजवायला सुरूवात केली. 

ड्रायव्हरने जीव खाऊन बस गावाच्या हद्दीत घुसवली. 

सगळ्यानी मागे वळून बघितलं तर अर्धवट जळलेल्या कलामंदिराच्या आवारात  विचित्र अवतारात असलेल्या त्या सगळ्या जणी त्यांच्याकडे जळजळीत नजरेने दातओठ खात बघत होत्या. 

आज बऱ्याच दिवसांनी १३ जण त्यांच्या हाती येता येता निसटले होते. 

पहिल्यांदा गावाच्या वेशीबाहेर असलेल्या कलामंदिराच्या गारुडातुन कुणीतरी निसटले होते. 

कंडक्टरचा फोन अजूनही तीच रिंगटोन वाजवत होता. 

त्या रिंगटोन च्या आवाजात घुंगराचा आवाज हळूहळू कमी होत गायब झाला होता.

काय होती रिंगटोन? तुम्हीच सांगा बघू तुम्हाला लक्षात येतेय का? 

नाहीतर बघा हं आज नेमकं विकेंड आहे तिच्या नजरेच्या गारुडात अडकला तर कुणीही वाचवायला येणार नाही. 

#गौरीहर्षल 

शुक्रवार, ३ मार्च, २०२३

नकार देण्याची कला भाग 2

#नकार_देण्याची_कला_भाग 2
मागच्या लेखात आपण बघितलं की कोणाला नकार देताना 
 -  आपल्या मनात गिल्ट फिलिंग येते
 - सोबतच आपल्याला बरेच प्रश्न पडलेले असतात
 - आपण स्वतःला बऱ्याचदा या सगळ्या प्रोसेस मध्ये कुठेतरी मागे टाकत असतो 
- स्वतःला प्रायोरिटी वरती ठेवणं आपल्याला जमत नाही.  
आणि त्याच सोबत काही टर्म्स आणि कंडिशन सुद्धा आपण बघितल्या. 
 तसंच मी एक छोटासा टास्क सुद्धा दिला आहे जो तुम्हाला सात दिवसांमध्ये करायचा आहे.  तुम्ही कधीही करू शकता त्याचं काही आपल्याला बंधन नाहीये.

 तर आता पुढे आपण बघूया की आपण इतरांची मने राखताना स्वतःला कशा पद्धतीने त्रास करून घेत असतो? 
 बऱ्याच जणांना सवय असते ना की स्वतःच्या महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाची काम कुठेतरी बाजूला ठेवायची आणि समोरून कोणी काही काम सांगितलं की आधी त्या व्यक्तीचं काम करून द्यायचं.
 मग भलेही आपल्याला आपल्या कामांमध्ये आपल्या गोष्टींमध्ये उशीर झाला नुकसान झालं तरी चालेल आणि हे कुठेतरी एका भीतीपोटी सुद्धा होतं मनात एक भीती असते की लोक काय म्हणतील मी नकार दिला तर? त्यांना वाईट वाटेल आणि मग ते दुखावले जातील, मग आमचं नातं बिघडेल. 

 असं करताना मग आपण कुठेतरी स्वतःला प्रचंड ताण देत राहतो.  आणि  इतरांची मन राखायच्या प्रोसेस मध्ये कुठेतरी ही गोष्ट लोकांना ही कळून चुकते की ही व्यक्ती स्वतःला त्रास करून घेईल पण आपलं काम अडकू देणार नाही. 
 कदाचित अशा संदर्भातली स्वतःबद्दलची काही मतही तुम्ही ऐकली असतील आणि तुम्हाला त्याबद्दल प्रचंड अभिमानही वाटला असेल. पण त्या अभिमानाची किंमतही तुम्ही तेवढी चुकवलेली असणार बरोबर ना???

हा सगळा अट्टाहास आपण कशासाठी करतो? तर लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं,चारचौघांमध्ये आपलं कौतुक व्हावं आणि कुठेतरी आपली जी इमेज आहे ती खूप चांगली व्यक्ती अशी व्हावी पण खरंच असं होतं का? तर याचे उत्तर "नाही" असच आहे. 
कारण एक युनिव्हर्सल नियम आहे तुम्ही कोणासाठी कितीही करा कुठे ना कुठेतरी त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी तक्रार असतेच. 
मग अचानक कधीतरी आपल्याला जाणवत की सगळेजण आपल्याला गृहीत धरत आहेत.  जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते आपली मनस्थिती, परिस्थिती यांचा जरा सुद्धा विचार न करता स्वतःच्या गरजा आपल्यासमोर मांडतात आणि आपल्याकडून मदतीची अपेक्षा सुद्धा ठेवतात. कोणालाही नकार अपेक्षित नसतो .कित्येकदा तर तुझ्याशिवाय दुसरं कोणीच माझी मदत करू शकणार नाही असं म्हणून ते काम करण्यासाठी गळ घातली जाते. मग इथे आपण सुद्धा आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन  समोरच्याच मन राखण्यासाठी ते काम करतो. परिणामी आपण पुन्हा एकदा त्याच सिच्युएशन मध्ये असतो. 
या सगळ्या प्रोसेस मध्ये आपलं नुकसान तर होतच असतं पण स्वतःची काम स्वतःच्या गोष्टी वेळेवर न करता आल्यामुळे कुठेतरी आपण स्वतःला दोष देऊ लागतो. कारण आपली परिस्थिती कळतंय पण वळत नाही अशी असते.

 कधी कधी काही नाती खूप जवळची असतात आणि मग त्यांच्यासाठी मी हे केलंच पाहिजे अन् मीच हे केलं पाहिजे अशी भावना आपल्या मनात असते. किंवा भावना म्हणण्यापेक्षा असा पगडा आपल्या मनावरती असतो.आणि त्याच्या ओझ्याखाली आपण सातत्याने त्या गोष्टी करत जातो. मग इथे कोणी म्हणेल की सरसकट सगळ्यांना नकार द्यायचा का? तर मुळात आपण इथे सगळ्यांना नकारच द्यायचा किंवा वाटेलाच लावायचं असं नाही म्हणत आहोत.

 इथे आपल्याला आपल्या गरजा ओळखणे, त्या योग्य शब्दात मांडणं, त्यांची प्राथमिकता स्वीकारणं ह्या गोष्टी शिकायच्या आहेत .

तुम्ही इतरांना मदत करू नका असा त्याचा अर्थ होत नाही इतरांना मदत करण्याच्या आधी तुम्ही स्वतःच्या गोष्टी पूर्ण करा, स्वतःच्या गोष्टींना अग्रक्रम द्या जेणेकरून तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटणार नाही.  आपल्याला कुठल्या क्षणी कशाची गरज आहे हे ओळखून ते योग्य शब्दात ठामपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं असतं. 

 उदाहरण द्यायचं झालं तर, आपली बाजू ठामपणे आत्मविश्वासाने मांडू न शकणाऱ्या व्यक्तीला बऱ्याचदा अचानक बोलल्यानंतर ही गोष्ट ऐकायला मिळते. 

एक छोटसं उदाहरण देते समजा मीना नावाची एक स्त्री आहे तिने तिच्या सासू-सासर्‍यांना किंवा आई-वडिलांना एका विशिष्ट कामासाठी नकार देताना सांगितलं की,"या वेळेस मला तुमची मदत करणे शक्य नाहीये तर तुम्ही मिताची मदत घ्या." 
 इथे मीनाला समोरून जे उत्तर मिळालं ते बऱ्याच जणांनी ऐकलं असेल,"मीता कशी काय आमची मदत करेल? तुला माहित आहे ना तिला काहीही सांगायला गेलं की ती प्रचंड चिडचिड करते, राग राग करते, भांडण करते. आमचं तिच्यासमोर काहीही चालत नाही. तू समजून घे ना. तू समजूतदार आहेस ना!!!"
आणि मग हे उत्तर ऐकल्या नंतर अर्थातच मीना मनाविरुद्ध ते काम करते. पण कुठेतरी तिच्या मनात आपण स्वतःसाठी उभे राहू शकलो नाही,ठामपणे स्वतःला होणारा त्रास मांडू शकलो नाही याबद्दल विचार चालू होतात. सोबतच बऱ्याचदा समोरची व्यक्ती तिच्या स्वभावातील आक्रमकता दाखवून सगळ्या गोष्टींमधून अंग काढून घेते हे लक्षात आल्यामुळे चिडचिड होऊ लागते. कारण इथे या उदाहरणात मीनाला माहीत असतं की तिने कितीही प्रामाणिकपणे ते काम केलं तरीही त्याच्यात चुका काढल्या जाणार आहेतच. 
त्यामुळे तिला ते काम केल्याच समाधानही मिळणार नसतं. त्याउलट समोरची व्यक्ती मात्र काहीही न करता आपल्या निवडीच आयुष्य जगत असते. 

"इथे आपण दोन गोष्टी बघत आहोत एक ठामपणे आत्मविश्वासाने स्वतःची बाजू मांडणे आणि दुसरी आक्रमकतेने स्वतःची बाजू समोरच्याच्या गळी उतरवणे."

दुसऱ्या बाबतीमध्ये अर्थातच वरवर जरी कितीही चांगल्या गोष्टी दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्या तशा नसतात.त्यामुळे आपल्याला नकार देणं शिकताना सगळ्यात आधी आपली बाजू मांडायला शिकायचं आहे. 

मग जर इथे कोणाला वाटत असेल की प्रत्येक वेळेला स्पष्टीकरण द्यायचं का? तर नाही जिथे ज्या ठिकाणी गरज आहे (हे तुम्ही स्वनिरीक्षणाने ओळखायचं) तिथे आणि फक्त तिथेच आपली बाजू मांडायची------ स्पष्टीकरण द्यायचं असं मी म्हणत नाही. 

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा आपण स्वतःसाठी बोलायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तींकडूनच सगळ्यात जास्त विरोध होतो. 
आपल्याकडून तर विरोध होतोच त्याबद्दल आपण आधीच्या लेखात बोललो आहोत. पण जेव्हा आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींकडून विरोध होतो. तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास व्हायला सुरुवात होते. 

कधीकधी आपण आपल्या जवळच्या व्यक्तींच्या वाट्याचा वाईटपणा स्वतःकडे घेतो. पण असं करताना आपण हे विसरतो की आपण जरी त्यांच्यावरच्या प्रेमापोटी त्या गोष्टी करत असलो तरीही इतर लोकांसाठी आपण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत. त्यामुळे आपली केली जाणारी कृती हे आपल्याशी जोडली जाणार आहे. आपण कुणासाठी केली आहे त्याच्याशी नाही.

उदाहरणार्थ , मीना आणि तिच्या नवऱ्याचं कुठेतरी जायचं ठरलेल आहे. कुठलं तरी फॅमिली फंक्शन आहे. आणि अचानक जाणं कॅन्सल होतं. समोरच्या व्यक्तीला हे कसं कळवायचं ही जबाबदारी नवरा मीनावरती टाकतो कारण त्याला माहीत असतं आपण समोरून जर नकार दिला तर अर्थातच समोरची व्यक्ती दुखावली जाणार आणि त्याचा परिणाम नात्यावरती होणार. मीनाला सुद्धा हे काम करण्याची इच्छा नसते पण दोघांपैकी कोणीतरी तर सांगणं गरजेचं आहे आणि जर नवरा त्या गोष्टीसाठी तयार होत नाहीये तर अर्थातच तिला ती गोष्ट करणे भाग आहे मग अशा वेळेला तिने काय करावे?
एक म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अजिबात खोटं बोलायला जाऊ नये. आपल्याला जरी समोरच्या व्यक्तीला पूर्ण परिस्थिती आहे तशी सांगता येत नसेल, तरीही सौम्य भाषेत ती गोष्ट सांगणं शक्य असतं. 
 उदाहरणार्थ मीना म्हणू शकते की येण्याची खूप इच्छा होती पण अचानक काही महत्त्वाचं काम आल्यामुळे आम्हाला येणं शक्य नाहीये. पण मी लवकरच प्रत्यक्ष येऊन भेटेन किंवा आपण त्यावर बोलू. 
इथे जेव्हा आपण खोटं बोलत नाही तेव्हा आपल्याला नंतरच्या गोष्टींचा विचार करण्याची गरज पडत नाही. 

वाचक मित्र-मैत्रिणींनो नकार मिळणं ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला स्वतःलाही लवकर पचवता येत नाही मग समोरच्याकडून सुद्धा तशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे न? 
 
नकार मिळाल्यानंतर सौम्य किंवा तीव्र प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. पण त्या प्रतिक्रियांचा आपल्यावरती किती परिणाम करून घ्यायचा हे आपल्या हातात आहे आणि असतं. 
जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या सगळ्या वागण्याची जबाबदारी घ्यायला सुरुवात करते. तेव्हा तिला काही गोष्टी स्वीकारायची सुद्धा तयारी ठेवावी लागते . आणि तसं जर जमत नसेल, ते करताना जर अडचणी येत असेल तर अशा ठिकाणी तज्ञांची मदत नक्की घ्यावी. 

तुम्हालाही जर मीनाच्या दोन्ही सिच्युएशनच्या संदर्भात स्वतःची काही मत मांडायची असतील तर नक्की मांडू शकता. 
आत्ता साठी इथेच थांबते लवकरच पुढचा भाग घेऊन येईन. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
क्रमशः 
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

गुरुवार, २ मार्च, २०२३

नकार देण्याची कला भाग 1

#नकार_देण्याची_कला_भाग1
"मला नाही म्हणता येत नाही हो मॅडम.", ती टेबलवर समोर ठेवलेल्या पेनशी खेळत म्हणाली. पेनशी खेळणं तिच्या मनात असलेली अस्वस्थता दाखवत होते. 
"म्हणजे मी खूपदा ठरवते की आता पुन्हा तीच गोष्ट करण्यासाठी होकार द्यायचा नाही. पण समोरच्या व्यक्तीने गळ घातली की माझ्याकडून नकळतच हो म्हटल जातं. आणि मग पहिले पाढे पंचावन्न. ", हे बोलता बोलता नकळतच तिच्या डोळ्यात पाणी आलं होत. कौन्सिलींग सेशनमध्ये आलेल्या व्यक्तीचं हळव होऊन रडणं हे अपेक्षितच असतं. 
ती , तुमच्या माझ्या सारखीच एक व्यक्ती, गृहिणीही असू शकते किंवा नोकरी-व्यवसाय करणारीही, स्त्रीही असू शकते किंवा पुरुषही. 

 मी नेहमी म्हणते की, आपण प्रत्येकाने आयुष्यात स्वतःला कधीतरी हो म्हणून बघावं. पण ते म्हणण्याआधी स्वतःच्या मनाची तयारी केलेली हवी. 
इतरांच्या नजरेत वाईट होऊ नये म्हणून आपण बऱ्याचदा स्वतःला नकार देत इतरांना होकार देत असतो. परिणामी आपलं बरच नुकसान होतं. 

तुमचं ही असंच होतं का? दर वेळेला तुम्ही ठरवता की आता पुढच्या वेळी स्पष्ट शब्दात नकार कळवायचा पण त्या वेळेला भिडस्तपणामुळे नकार कळवता येत नाही?
शिवाय मनात ही भीती सुद्धा असते की मी नाही म्हणालो तर समोरची व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल? इतर लोकांना काय सांगेल? आणि मग आपण मनाविरुद्ध होकार देऊन मोकळे होतो. 

एखाद्या गोष्टीला नकार कळवणं म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अपमान करणे असा त्याचा अर्थ होत नाही. तर तो नकार म्हणजे ती गोष्ट आपल्याला करता येणं शक्य आहे की नाही? ती गोष्ट करण्याव्यतिरिक्त आपल्यासमोर कोणत महत्त्वाचं काम आहे? हे योग्य भाषेत आणि योग्य शब्दात समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे जे आपल्याला जमायला हवं. 

 सातत्याने जर आपल्याकडून इतरांचं मन राखण्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध होकार दिला जात असेल तर कालांतराने लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात. 
आणि मग कधीतरी अचानक आपल्याला आपण या सगळ्यांमध्ये अडकल्याची जाणीव होते. स्वतःच्या मनासारखं जगता येत नाही, कुठली गोष्ट करता येत नाही, कुठे जाता येत नाही कारण आपल्याला इतरांना नाही म्हणता येत नाही. 
 इतरांची मन राखताना आपण आपल्या मनाचं ऐकायचं बंद करून टाकतो का? 
 आणि जर खरंच आपल्याबरोबर असं होत असेल तर त्यावर वेळीच काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे. 
 जर एकीकडे आपण असं म्हणतो की आपल्याला निदान आपल्या जवळच्या लोकांसाठी तरी काहीतरी करायच आहे पण त्यामध्ये आपण स्वतःसाठी करायचं विसरून जातो तर आपल्यासाठी आपणच जवळचे नसतो का? 
अशावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण शिकणं गरजेचं असतं ती म्हणजे नकार देण्याची कला. 
येस.... समोरच्या व्यक्तीला न दुखवता, नात्यात दरी येऊ न देता आपला नकार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे शिकणं गरजेचं आहे. 
आणि सोबतच काही टर्म्स आणि कंडीशन लक्षात ठेवणेही आवश्यक आहे. 
टर्म्स आणि कंडीशन कसल्या तर...

***पहिली गोष्ट ही की नकार देण्यासाठी आपली मनाची तयारी झालेली हवी. कारण बऱ्याचदा आपण नकार देतो पण मग कुठेतरी मनात अपराधीपणाची भावना (गिल्ट फिलिंग) घर करू लागते. तर ते होऊ नये म्हणून प्रयत्न करावे लागतील. 

***दुसरी गोष्ट म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला कितीही जेन्युईनपणे आपली बाजू सांगितली तरीही ती व्यक्ती तिच्या मनस्थिती , दृष्टिकोन ह्यानुसारच प्रतिक्रिया देणार. प्रत्येक जण तुमचा नकार मनापासून स्विकारेलच अस नाही. पण मग नकार देऊन काय उपयोग? असंही तुम्हाला वाटेल. तर त्यासाठी तिसरा मुद्दा वाचा. 

***होकार किंवा नकार हा आपण इतरांना खुश किंवा दुःखी करण्यासाठी देत नाही आहोत तर होकार / नकार देण्यामागचं आपलं कारण हे स्वतःला प्राथमिकता देणं आहे. स्वतःच्या गरजांना,भावनांना ओळखणे हे आहे. आणि जेंव्हा आपण स्वतःला प्रायोरिटी म्हणून बघायला सुरुवात करतो तेंव्हा सगळ्यात जास्त विरोध स्वतःकडूनच होतो.
 तीच ही पहिली पायरी असते जिथे आपल्याला गरज पडल्यास योग्य तज्ञ व्यक्तीशी बोलणही गरजेचं असतं. 
कारण नवीन सुरुवात करायची ठरवून चालत नसते तर त्या मार्गावर चालण्यासाठी शक्य ती मदत स्विकारण्याची तयारीही ठेवावी लागते. 

तर इथे एक छोटासा टास्क सांगते. पुढचा एक आठवडा म्हणजे सात दिवसात कमीत कमी दोन तरी गोष्टी अशा करण्याचा प्रयत्न करा ज्या करताना तुम्हाला मनापासून आनंद मिळतो. मग ते गल्लीत क्रिकेट खेळणे असो किंवा गोळा खाणे किंवा अजून काही तुम्ही ठरवा. स्वतःला नकार द्यायचा नाही ही अट आहे बर का!!!
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
नवीन काहीतरी ऑन द वे आहे ✌️✌️✌️
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

बोलनेसे सब होगा

#बोलनेसे_सब_होगा

मीनल आणि स्नेहल दोघी नणंद भावजय होत्या. स्नेहल मिनलच्या भावाची बायको. सतत हसतमुख,प्रसन्न चेहरा, वेळ कशीही येवो खंबीरपणे सगळं निभावून नेणारी. त्याउलट मीनल सतत चिडचिड, रागराग करणारी, अवघड प्रसंगी इतरांकडून अपेक्षा ठेवणारी. 

पण आपसात मात्र दोघींचं मस्त पटत होतं. शेवटी दोघी एकाच वयाच्या होत्या न. स्नेहल च्या लग्नाला आता वर्ष होत आल होतं. वर्षभरात मीनल स्नेहलच वागणं बघत होती. मिनलच्या आईबाबांनी, दादाने आवाज चढवला तर मीनल मध्ये पडत असे पण स्नेहल मात्र शांतपणे तिला काय म्हणायचं आहे हे नंतर स्पष्ट शब्दांत सांगत असे. परिणामी हळूहळू सतत चिडखोर असलेलं घर आता शांतपणे एकत्र बसून समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू लागलं होतं. 

मिनलवरही नाही म्हटलं तरी या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट झाला होताच. काही दिवसातच तिचंही लग्न झालं. ती सासरी आली. तिच्या कुटुंबाप्रमाणेच कुटुंब होतं. 5 माणसं फक्त. मिनलच्या नणंदेच शिक्षण सुरू होतं. 

चिडखोर मिनलच्या वागण्यात लग्नानंतर बराच फरक पडला होता. कारण सासरी आधीपासूनच वातावरण शांत होतं. सगळेजण मिळून मिसळून वागणारे, चेष्टा मस्करी करणारे असे होते. 

सासुसासरे तर मिनलला मुलगी असल्यासारखेच वागवत होते. मिनलला कुठलीही बंधनं नव्हती. ना साडी नेसायचं टेन्शन आणि ना घरातील कामांची पूर्ण जबाबदारी तिच्यावर होती. ती , सासू आणि नणंद तिघी मिळून सगळं करत होत्या. आणि सुटीच्या दिवशी तर चक्क तिचे सासरे आणि नवरा निखिल स्वयंपाकघर सांभाळत होते. 

हे सगळं जवळून बघायला मिळत असल्याने आता फक्त मिनलच्याच नाही तर तिच्या माहेरच्या लोकांच्याही स्वभावात फरक पडू लागला होता. ते सुद्धा मिनलच्या वहिनीला स्नेहलला आता जास्त प्रेमाने वागवू लागले होते. 

सासरीच भरभरून माहेरचं सुख अनुभवणारी मीनल आता माहेरच्या बदलांमुळे पण खुश झाली होती. 

पण म्हणजे सासरी सगळंच गोडगोड होतं असं नाही फक्त वादविवाद होणार अशी परिस्थिती हाताळण्याची पद्धत वेगळी होती. 

पण एके दिवशी मात्र ह्या वातावरणात एक वादळ येऊन धडकलं. मिनलच्या आतेसासूबाई मंदा … 

त्या सगळ्याच बाबतीत जरा जास्तच कडक होत्या. मिनलच्या सासूबाई तर सोडा सासरे सुद्धा बहिणीला घाबरत होते. 

पण त्या कशाही वागल्या तरी ते दोघे मात्र आनंदाने सगळं करत होते. आठ पंधरा दिवस त्यांच्या छत्रछायेखाली काढल्यानंतर मिनलची अवस्था तुरुंगातल्या कैद्याला सुटका झाल्यावर कशी होईल तशी झाली होती. 

नवरा ऑफिसमुळे आणि नणंद अभ्यासामुळे ह्या सगळ्या गोष्टीतुन निसटले होते. ही नवी नवरी आणि तिचे सासुसासरे तेवढे अडकले. 

आत्या त्यांच्या घरी परत गेल्या तेंव्हा सुटकेचा निश्वास सोडणाऱ्या मिनलला बघून सासुसासरे हसू लागले. 

तशी फुरंगटून मीनल म्हणाली ," काय हो आई , तुम्ही दोघेही मला हसत आहात?", 

"अग हसू नाही तर काय करू ? आम्ही दोघेही हेच झेलत आहोत कित्येक वर्ष तुझी अवस्था पाहून आम्हाला आमचे सुरुवातीचे दिवस आठवले म्हणून हसू आलं.", सासूबाई म्हणाल्या. 

"अग मिनल तुला सांगतो तुझ्या ह्या आईला माझ्या ताईने पहिल्यांदा आल्यावर इतकं पळवले होतं की ती गेल्यावर ही चक्क भांडून माहेरी निघून गेली होती. पण त्या नंतर मात्र हळूहळू आमचा सहवास वाढला, आम्ही एकमेकांना ओळखू लागलो. मग आम्ही दोघांसाठी आणि स्वतःसाठी एक नियम केला की इतर कुणाच्या वागण्याचा परिणाम स्वतःच्या मनस्थितीवर , नात्यावर होऊ द्यायचा नाही. एखादी गोष्ट जर आपल्याला आनंद देतेय तर तो भरभरून घ्यायचा. आणि त्या वेळी इतर कोण काय म्हणतंय हे अक्षरशः एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. ", सासरे म्हणाले. 

" आता तूच आठव , तुझं आणि निखीलच (मिनलचा नवरा) आत्या आल्यापासून किती वेळा वाजलं. भलेही तुम्ही इतरांसमोर काही दाखवलं नाही बाळा पण आम्हाला ते जाणवलं. त्याच्याशी बाबा बोलणारच आहेत पण तू सुद्धा लक्षात घे. सगळ्यात आधी तुम्ही दोघे एकमेकांशी बांधील आहात. तू खुश असशील तर तो आपोआपच होईल आणि तो असेल तर तू होशील. म्हणून आपल्या आनंदाची जबाबदारी आपल्यावर घ्या. नातं जास्त खुलेल. बाकी भांडणं हवीच ती नसतील तर नवराबायकोचं नातं फक्त फॉर्मलिटी होऊन राहतं. ", सासूबाई बोलत होत्या पण त्यांना थांबवत सासरे मधेच बोलू लागले. 

"आत्या आपल्याकडे का येतात माहीत आहे? कारण त्यांच्या कडे सगळेच असे फॉर्मल वागतात एकमेकांशी. पण तो त्यांचा प्रश्न आहे. तिथे जे त्यांना अनुभवायला मिळत नाही ते त्या इथून घेऊन जातात. आमच्यावर चिडतानाही त्यांच्या मनात मिळणाऱ्या प्रतिक्रियांची ओढ असते. संवाद कसाही झाला तर तो त्यांना हवा असतो. म्हणून आम्ही दोघेही लहान होऊन त्यांचा हा हट्ट पूर्ण करतो. "

"तरीच त्या दिवशी निखिल चिडून गेला तर त्या मला म्हणाल्या की आता गप्प बसून राहू नको त्याची समजूत काढ. बोल त्याच्याशी. ", मीनल विचार करत म्हणाली. 

" हो त्या अशा म्हणाल्या कारण निखिल त्या बाबतीत त्यांची कार्बन कॉपी आहे त्यालासुद्धा रुसला की लाड करून घ्यायला आवडतात. आणि बरका दुसरं कुणी रुसलं तरी निखिल त्यांचे तेवढेच लाड करतो. म्हणजे तुला भरपूर स्कोप आहे वसुली करायचा. चल आता मस्तपैकी आपल्या तिघांसाठी कॉफी करून आणते. तोपर्यंत तू आणि बाबा एवढी भाजी निवडून ठेवा. ", असं म्हणून सासूबाई हसत हसत उठून गेल्या. 

आणि तिच्या डोळ्यांसमोरून त्या दिवशीचा प्रसंग सरकू लागला. 

निखिलच्या महत्वाच्या गोष्टी त्यांच्या बेडरूममध्ये असलेल्या कपाटाच्या एका विशिष्ट कप्प्यात ठेवलेल्या असायच्या. अशीच कुठली तरी फाईल त्याला त्या दिवशी सापडत नव्हती. आणि त्यावरून त्याची चिडचिड सुरू होती. 

मिनलला हाक मारली तर ती कामात असल्याने लगेच येऊ शकली नाही. त्यावरून त्याने बडबड सुरू केली. झालं शब्दाने शब्द वाढला आणि मिनल चिडून जिव्हारी लागेल असं काही तरी म्हणाली. 

निखिल दुखावला. आणि मग तो तसाच ऑफिसमध्ये निघून गेला. तिथे गेल्यावर त्याच्याही लक्षात आलं की तो जी फाईल शोधत होता ती त्याने ऑफिसमध्येच ठेवली आहे. झालं साहेबांच्या लक्षात आलं की आपण ग्रँड माती खाल्ली आहे. पण मग काय करायचं? मग त्याने ठरवलं की ह्या बाबत बाबांशी बोलून मिनलला काही तरी सरप्राईज द्यायचं. 

दोघानाही आपापली चूक कळली, त्यांनी ती मान्यही केली. आणि शेवटी सगळं नीट झालं पण त्या साठी प्रयत्न सगळ्या घराने केले. घरं अशीच तर उभी राहत असतात एकमेकांना समजून घेत, चुकता चुकता शिकत हो की नाही? 

मंडळी, कुठल्याही नात्यात सगळ्यात जास्त काही महत्वाचं असेल तर तो असतो संवाद. 
 
आणि हा संवाद जर हेल्दी असेल न तर बरेच गैरसमज चुटकीसरशी दूर होतात. 

एखादी व्यक्ती आपल्याला जर आपल्या आयुष्यात हवीहवीशी आहे तर त्या व्यक्तीसोबत संवाद होत राहणं गरजेचं आहे. ती व्यक्ती रुसली तर तिचा रुसवा नक्की काढा. होईल त्याचा तो नीट असं म्हणून सोडून देऊ नका. 

माणूस दुखावलेला असताना त्याला एकटं सोडलं न की तो अजून जास्त दुखावतो. नकळतच त्याच्या मनात माझी कुणाला गरज नाही, मी कुणासाठी महत्वाचा नाही असे विचार घर करू लागतात. 

ज्या व्यक्ती हळव्या मनाच्या असतात त्या बऱ्याचदा अशा घटना मनाला लावून घेतात. आणि स्वतःला त्रास करून घेतात. परिणामी त्यांची मनस्थिती तर खराब होतेच पण आजूबाजूचं वातावरण सुद्धा खराब होतं. 

आणि हो , स्त्री असो किंवा पुरुष कुणालाही देवाने दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे हे ओळखण्याची शक्ती दिलेली नाही. त्यामुळे तुम्हाला काय वाटत, तुम्ही कशामुळे हर्ट झाला आहात हे समोरच्या व्यक्तीला स्पष्ट शब्दात सांगा. अस केल्याने गैरसमज टळतात आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा हळूहळू तुम्हाला काय आवडतंय, काय म्हणायचं आहे हे लक्षात येऊ लागतं. 

आरोप- प्रत्यारोप, हेवेदावे , अबोला ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम दोन व्यक्तींच्या नात्यावर आणि इतरांवरही होत असतो तेव्हा हे टाळण्यासाठी संवाद साधत राहा. 

मीच करायचं का? हा इगो , अहंकार नाती आणि आनंद सगळंच संपवू शकतो. सो , त्याचा हात धरून स्वतःचं नुकसान करून घेण्याआधी एकदा तरी तुमच्या नात्यातले आनंदी क्षण आठवा इतके दिवस आपण हे नातं का धरून ठेवलं आहे ह्यांचं उत्तर सापडेल. 

शेवटी गुगलची एड आठवा बोलनेसे सब होगा 😂 
११.५.२०२२
#स्वतःला शोधणारी मी 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

सेकंड चान्स

#सेकंड_चान्स
नवीन दिवस नवी सुरुवात. आयुष्यात असं झालं का कधी काहीतरी कुणालातरी सांगायचं होतं, बोलायचं होतं पण ती संधी मिळण्याआधीच ती व्यक्ती दूर निघून गेली ??? कधी परिस्थितीमुळे तर कधी तिच्या आयुष्यातील बदलांमुळे. 
छोट्याश्या गोष्टी असतात पण आपण आपल्या इगोमुळे बऱ्याचदा त्यांना नको इतकं मोठं करतो. नाती तुटतात , माणसं दुरावतात कायमची. कधी कधी एक बाजू प्रयत्न करतेही सगळं नीट ,छान व्हावं म्हणून. पण दुसरी बाजू तसाच रिस्पॉन्स देते का हो?? मग शेवटी प्रयत्न करणारा थकून दूर जाण्याचा निर्णय घेतो. ह्या सगळ्यांवर वेळ हे एकच औषध आहे असं म्हटलं जातं. पण हल्ली आयुष्य इतकं फास्ट झालंय की कोण कधी राहती जागा,गाव,शहर आणि कदाचित जगही सोडून निघून जाईल सांगता येत नाही. अशावेळी नंतर हात चोळत बसणे अन् हळहळणे हेच मागे उरते. मग त्यावर उपाय काय कुणी जर नातं तोडून जात असेल तर तुम्ही प्रयत्न करा त्यांना थांबवण्यासाठी. निदान तुमची बाजू तरी मांडा आणि उलट असेल तर समोरचा काय म्हणतो आहे हे तरी शांत पणे ऐकून घ्या. कदाचित आयुष्यात पुन्हा कधीच तुमची भेट होणार नसेल तेंव्हा मनाला कसलीही चुटपूट नको लागायला. थोडंसं स्वतःला पुश करण्याची गरज आहे सोप्प नसतंच कडू अनुभव विसरुन माफ करणं पण निदान प्रयत्न केलेच नाहीत असं नको वाटायला. मनाला एक समाधान तरी मिळेल की मी पूर्ण प्रयत्न केले. "स्वतःला" पुन्हा संधी द्या. संधी कदाचित जुनी अडकून बसलेली दारं उघडेल किंवा नवीन आयुष्य तुमची वाट बघत असेल. काहीही झालं तरी एक चांगलाच अनुभव पदरात पडेल हे नक्की. आयुष्य खूप छान आहे हे फक्त वाक्य होऊन राहण्यापेक्षा अनुभव आला तर अजून मजा येईल. 
प्रयत्न तर करू बाकी समोरच्याची आणि देवाची मर्जी. 
बेस्ट लक मलाही आणि तुम्हालाही 😍😍
#गौरीहर्षल
३१.७.२०१७

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

व्हॉईस वर्सा

व्हाईस वर्सा

कविश आज जरा आनंदातच रूमवर परत आला. पण तिथे येऊन बघतो तर त्याचा रूमी आदर्श तोंड पाडून बसलेला होता.

त्याने आदर्शला कारण विचारले तर कळले की आदर्श ज्या कलिगवर सगळ्यात जास्त विश्वास ठेवत होता, त्यानेच आदर्शच्या आयडिया स्वतःच्या आहेत असं सांगून कंपनीच्या मॅनेजमेंट समोर मांडून प्रमोशन मिळवले होते.
त्याच्या गोड बोलण्याला फसून आदर्शनेच बोलता बोलता  सगळं त्याला सांगितलं होतं. आणि आता परिणाम दिसत होते.

आदर्श समोर पुढच्या संधीपर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. पण ह्यामुळे त्याला एक उत्तम धडा मिळाला होता तो म्हणजे सहजपणे कुणावरही विश्वास ठेवून आपल्या सगळ्या गोष्टी सांगू नयेत.

कविश समोर मनातलं बोलल्यावर आदर्शला आता बरंच काही लक्षात आलं होतं. तो सावरला होता.
त्याने कविशला सॉरी म्हणत विचारलं की तो एवढा खुश का होता?

त्यावर कविश म्हणाला ," अरे तुझ्या अगदी उलट माझ्यासोबत घडलं. ज्या बॉसला मी रोज शिव्या देत होते त्याच बॉसने बदली होऊन जाता जाता माझी शिफारस त्याच्या जागेसाठी केली. आणि तो स्वतःच मला म्हणाला की डोळे उघडे ठेवून वावर. दिसतं तस नसतं. ज्या माणसाला मी शत्रू समजत होतो तो मित्र निघाला बघ. ", कविशचा किस्सा ऐकून ते दोघेही हसू लागले.

आज दोघांना एक गोष्ट प्रकर्षाने कळली होती ती म्हणजे माणसं चांगली असो किंवा वाईट ती काही तरी शिकवूनच जातात. गरज असते ती आपण त्यातून योग्य ते शिकण्याची. #गौरीहर्षल

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

चांगलं वागण्याची किंमत काय?

(कृपया लेख नावासहितच शेयर करा. ) 

#चांगलं_वागण्याची_किंमत_काय? 
चांगलं वागण्याचे पैसे पडत नाहीत,पण संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी चांगलं वागण्याची किंमत मात्र आपल्याला चुकवावी लागू शकते. कशी काय? तर त्यासाठी वाचूया ही गोष्ट. 

"मंजिरी, काय गरज असते? प्रत्येक वेळेला तुला समोरच्या व्यक्तीशी चांगलं वागण्याची?",मंजिरीची मैत्रीण तिला तावातवाने जाब विचारत होती. 
 मंजिरी मात्र शांतपणे शून्यात नजर लावून बसली होती. त्याला कारणही तसेच होतं. 

 मंजिरीचा पहिल्यापासून एक ग्रह होता की, मी जर चांगल वागत आहे तर समोरची व्यक्ती ही कधीतरी चांगली वागेलच. आणि पुढे जाऊन तिला असंही वाटायचं की चांगलं वागण्याने कुठे माझं नुकसान होतंय? किंवा मला पैसे खर्च करावे लागतात? 

 पण दर वेळेला ती ही गोष्ट मात्र विसरून जायची की तिच्या याच स्वभावाचा फायदा उचलून लोक स्वतःची काम साधून घेतात आणि मंजिरीच्या वाट्याला मात्र मनस्ताप येतो. 
आता मंजिरीचा स्वभाव मुळातच फारसा बोलका नसल्याने वाट्याला आलेला मनस्ताप ती जवळच्या ठराविक लोकांकडेच व्यक्त करत होती. 

अन् त्या सगळ्यांकडून तिला नेहमी हेच वाक्य ऐकायला मिळायचं की, "इतक्या वेळा अनुभव घेऊन सुद्धा तुला समोरच्या व्यक्तीशी चांगलं का वागायचं असतं? तुला का लक्षात येत नाही की प्रत्येक वेळेला घडणारा प्रसंग घटना ही तुला अनुभवाने शहाणं होण्याचा सल्ला देत आहे. तू चांगली आहेस याचा अर्थ असा नाही की समोरची व्यक्ती ही चांगलंच वागेल तुझ्याशी किंवा इतर कोणाशी कसं वागायचं हे त्या व्यक्तीचं आधीच ठरलेला असतं. आणि तो त्या व्यक्तीचा स्वभाव धर्म झाला. कोणीतरी झोकून देऊन त्याची मदत केली म्हणून तो झोकून देऊन दुसऱ्या कोणाची तरी मदत करेल ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. उलट अशा लोकांशी चांगलं वागून आपण नकळतच त्यांना समोरच्या व्यक्तीशी चुकीचं वागण्यासाठी समर्थन देत असतो. आपल्या विरोध न करता चांगलं वागण्याने त्यांची आपल्याशी आणि आपल्यासारख्या इतरांशी फायद्यापुरतं जवळीक साधण्याची हिंमत वाढत जाते. म्हणून अशा लोकांना जशास तसे या पद्धतीने वागवून बघावं बऱ्याच गोष्टी लक्षात येतात." 

मंजिरीला स्वतःला सुद्धा या गोष्टीची जाणीव बऱ्याचदा झाली होती की तिने सरसकट सगळ्यांशी चांगलं नाही वागलं पाहिजे आणि विशेषतः त्या लोकांसोबत तर अजिबात नाही जे फक्त फायद्या पुरते तिच्याजवळ येतात आणि काम झाल्यानंतर निर्लज्जपणे तिलाच दोषी ठरवून मोकळे होतात. आत्ताही तिची जवळची मैत्रीण याच विषयावरून तिचं बौद्धिक घेत होती. 

मंजिरीची एक जवळच्या नात्यातली बहीण होती आणि त्या बहिणीचा स्वभाव प्रचंड स्वार्थी होता. ती पहिल्यापासूनच आपल्या प्रत्येक कामासाठी मंजिरीला वापरत आली होती. चुकून कधी मंजिरीने काम करण्यासाठी नकार दिला तर ती एकतर मंजिरीला इमोशनल ब्लॅकमेल करून काम करून घ्यायची नाहीतर सगळ्या ओळखीच्या नात्यातल्या लोकांजवळ मंजिरी कशी माझ्याशी वाईट वागली हे तिखट मीठ लावून सांगायची. 

 आता याचा परिणाम काय व्हायचा?कधी कधी स्वतःच्या डोक्यावर ,स्वतःच्या कामाचा डोंगर असताना सुद्धा मंजिरी तिचं काम करून द्यायची. पर्यायी मंजिरीची स्वतःची काम मागे पडायची आणि तिचं कुठल्या ना कुठल्या रूपात नुकसान व्हायचं. जर मंजिरीने काम केलं नाही तर अर्थातच इतर वेळेला न विचारणारी बऱ्यापैकी सो कॉल्ड ओळखीची लोक त्या बहिणीचा फोन गेल्यानंतर मात्र मंजिरीला हक्काने जाब विचारण्यासाठी संपर्क करायची. ह्या गोष्टीमुळे मंजिरीच्या मनस्तापात अजूनच भर पडायची आणि हे सगळं टाळण्यासाठी मंजिरी पुन्हा पुन्हा ती बहीण कितीही वाईट वागली तरी तिची मदत करत राहायची. यावेळेसही असंच काहीसं घडलं होतं. 

 नुकताच मंजिरीला एका सो कॉल्ड सजग मावशीचा जाब विचारण्यासाठी फोन आला होता. मावशीच्या वयाचा मान ठेवत मंजिरीने नेहमीप्रमाणे सगळं ऐकून घेतलं. पण त्यानंतर मात्र तिला मानसिक पातळीवर गोष्टी हँडल करणे असह्य झालं. आणि तिने तिच्या जवळच्या मैत्रिणीकडे स्वतःच मन मोकळं केलं. 
 त्या मैत्रिणीने तिला आधी पोटभर रडू दिल आणि तिचा रडण्याचा भर ओसरला. तसं तिने मंजिरीशी त्या विषयावर बोलायला सुरुवात केली. 

" हे बघ मंजिरी हे तुझ्यासोबत आज पहिल्यांदा घडत नाहीये. तू जितक्या वेळा या लोकांना संधी देत राहशील तितक्या वेळा हे सर्वजण असेच वागत राहणार आहेत. तुझ्या त्या बहिणीला तू एकदाच खडसावून का सांगत नाहीस की हे सगळं करणं बंद कर. तू तिच्याकडून कर्ज घेतलं आहेस का?की तिला दिलं आहेस? एखाद्या व्यक्तीशी नातं आहे म्हणून स्वतःला स्वतःच्या शारीरिक मानसिक मर्यादेच्या बाहेर जाऊन त्रास देत ते नातं निभावण्यात कुठला शहाणपणा आहे ? मी गेले कित्येक वर्ष बघतीये अगदी शाळेपासून. आता तर तुम्हा दोघींची लग्नही झाली आहेत. तुम्हाला तुमचे संसार आहेत मग तरीही तूच तिची मदत करावी असं का?"

 "आणि जेव्हा तुला मदतीची गरज असते तेव्हा ती तोंडावर तुला नकार कळवते हेही मी अनुभवलं आहे. मान्य आहे की आता इतक्या वर्षात तिने सर्व लोकांच्या समोर तुझी जी इमेज उभी केली आहे ती सहजासहजी पुसली जाणार नाही." 

"पण तुला एक सांगू,जी लोक दुसऱ्यांच्या सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवून एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवतात ना ती आपली जवळची लोकं नसतात. जी लोक प्रत्यक्ष आपल्याशी बोलतात, आपल्या संपर्कात असतात, आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगी स्वतःहून आपल्या सोबत संवाद साधतात ती आपली जवळची माणसं असतात आणि त्यांना अशा कुठल्याही गोष्टीने फरक पडत नाही."
" तुझ्या सुदैवाने तुझ्या आयुष्यात अशी लोक आहेत आणि ही लोक तुला कधीही एकटं सोडून जाणार नाहीत. त्यामुळे मला आता असं वाटतं की तुला तुझ्या आयुष्यातल्या चांगल्या लोकांवर लक्ष केंद्रित करायची गरज आहे. आणि तुझ्या बहिणी सारख्या लोकांना एका सेफ डिस्टन्स वर ठेवून जगायला शिकण्याची ही गरज आहे. 

"तू नातं तोड, संपर्क बंद कर असं मी अजिबात म्हणणार नाही. पण ज्या गोष्टी केल्याने तुला त्रास होतो त्या गोष्टी मर्यादेच्या पलीकडे जाऊन करू नकोस. चांगलं वागण्याचे जरी पैसे पडत नसले तरी प्रत्येक व्यक्तीशी चांगलं वागण्याची गरज नसते आणि ज्या व्यक्ती स्वार्थी, अप्पलपोटी स्वभावाच्या असतात त्यांच्याशी गरज नसताना चांगलं वागलं की आपल्याला पैशांपेक्षाही जास्त मोठी किंमत मोजावी लागू शकते. 
आणि हाच धडा तुला तुझे अनुभव शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत एक गोष्ट लक्षात घे अनुभव चांगला असो किंवा वाईट तो नेहमी आपल्याला काहीतरी शिकवत असतो. आपल्याला ते शिकण्याची खरच गरज असते नाहीतर अनुभव सातत्याने रिपीट होत राहतात. "

 "आणि हे वाईट अनुभवांच्या बाबतीत प्रकर्षाने घडतं. ते घडल्यानंतर आपण मात्र मीच का? हा प्रश्न विचारत बसतो. त्यापेक्षा ह्यावेळी मला काय शिकणं गरजेचं आहे? हा प्रश्न स्वतःला विचारावा बरेच प्रॉब्लेम्स चुटकीसरशी सुटतात. समजतंय ना मी काय म्हणते ते?" मंजिरीच्या मैत्रिणीने तिच्या डोक्यात टपली मारत विचारलं.
"समजलं, सगळं समजलं आणि आजपासून हे सगळं करण्याचा प्रयत्नही करणार आहे. माहित आहे मला सुरुवातीला थोडा त्रास होईल, जड जाईल, मी सातत्याने लोकांना काय वाटेल?लोक काय म्हणतील? याचा विचार करून चिडचिड करेन. पण हळूहळू मला लक्षात येईल की मी आयुष्यातली बरीच वर्ष नको त्या लोकांचा विचार करून, त्यांना मदत करून स्वतःला त्रास करून घेतला आहे."

" चांगलं वागणं हा माझा स्वभाव धर्म आहे आणि तो मला सोडायचा नाहीच. पण कोणाशी आणि किती चांगलं वागायचं हे मात्र आता माझ्या हातात असेल. आणि त्यावरचा होल्ड मी सुटू देणार नाही.", मंजिरीचं बोलणं ऐकून तिची मैत्रीण गालातल्या गालात हसत म्हणाली, "चला मुलगी शिकली प्रगती झाली." आणि दोघीजणी खळखळून हसू लागल्या.

तर मंडळी मंजिरीला तर लक्षात आलं की तिला काय करायचे आहे. तुम्हालाही कळलं ना? मग आता त्यानुसार आपल्या वागण्यात काय बदल करायचे यावर विचार करायला सुरुवात करा. नाहीतर चांगलं वागण्याच्या बदल्यात बरंच काही गमवावे लागतं हे तुम्हाला माहित आहेच. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
#स्वत:ला_शोधताना
#गौरीहर्षल