सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

दुर्गे दुर्घट भारी भाग १

#दुर्गे_दुर्घट_भारी १



काही गोष्टी घडून येण्यासाठी योग्य वेळेची वाट बघावी लागते. काही गोष्टी आपोआपच योग्य वेळी घडून येतात. 

पण अनुभूती मात्र तुमच्या तयार होण्याची वाट बघत असते. कारण जोपर्यंत ते अनुभव त्यांची ताकद पेलण्यास तुम्ही मानसिक पातळीवर तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांचा आवाका कळण्याची सुतराम शक्यता नसते. 

वेगळी वाट जेव्हा आपल्यासाठी तयार केली जात असते तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते. स्वतःला आणि जवळच्या लोकांना अगणित शारीरिक यातना , मानसिक पातळीवर उलथापालथ, आजूबाजूला ज्यांच्यावर आपला अतिविश्वास असतो अशा कित्येकांचे खरे रूप समोर येते. कित्येकदा आपण कोलमडून पडतो. असे आणि ह्यापेक्षा विचित्र असे कित्येक प्रसंग तुमच्यासोबत घडतात. 

आता कुणी म्हणतील अस का? तर त्याचं उत्तर एकच आयुष्यात पुढे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सगळ्या पातळींवर सक्षम करणे. कुठलाही आणि कसलाही प्रसंग आला तरी तुम्ही न डगमगता त्या गोष्टींचा सामना करावा म्हणून हा सगळा प्रपंच. 

बऱ्याच जणांना वाटत असते अरे वा ह्याचं बरंय ह्यांना अध्यात्मिक अनुभव येतात, देव ह्यांना सतत सुखात ठेवतो. 
तर अस अजिबात होत नाही. अध्यात्मिक अनुभव आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या, भोग, त्रास ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 

अध्यात्मिक अनुभव घेणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला प्रापंचिक त्रासातून सुटका मिळत नाही. रादर बऱ्याचदा लोकांच्या समस्या सोडवताना त्यांच्या त्रासातून काही गोष्टी स्वतःकडे येतात आणि स्वतःच्या त्रासात भरच पडते. पण असो काही गोष्टी टाळता येत नाहीत. 

हे सगळं लिहायचं प्रयोजन म्हणजे मला माझे अनुभव मांडण्यासाठी परवानगी दिली गेली. पण लिहावं काय ते मात्र माझं काही ठरत नव्हतं. कारण खूपदा मी आजूबाजूला बघितलं आहे की कुणी जर असे अनुभव लिहिले तर त्या व्यक्तीची , त्याच्या अनुभवांची खिल्ली उडवली जाते. मला स्वतःला ह्या गोष्टी खूप त्रासदायक वाटतात. 

आय मिन तुम्हाला एखादी गोष्ट पटत नाही, तुम्ही ती अनुभवली नाही म्हणजे ती गोष्ट अस्तित्वात नाही असं नसत न.... नाही पटत , नाही आवडत मग सोडून द्या, वाद घालू नका असं माझं साधं सोपं मत आहे. 

तर आता वळते माझ्या गोष्टीकडे. 

ही खरंतर माझी गोष्ट नाहीये. ही त्यांच्या आणि माझ्या सोबतीची गोष्ट आहे. जे कुणी माझं लेखन वाचतात त्यांना आत्तापर्यंत माझी दत्तासोबत असलेली मैत्री, त्या मैत्रीमुळे मला आलेले अनुभव , माझ्या अनुभवांमुळे लोकांना आलेले अनुभव हे माहीत असेलच. 

घरात दत्ताशी गप्पा ह्या लहान असताना सुरू झाल्या होत्या. पण आपल्या बाबतीत काही गोष्टी वेगळ्या घडतात, काही वेगळे अनुभव येतात , हे मात्र सगळ्या देवांवर रुसून त्यांचं करायचं सोडलं तेंव्हा कळायला लागल्या. 

करायचं का सोडलं? तर लग्नानंतर सात वर्षे माझ्यासाठी प्रचंड अवघड होती. सततच्या हॉस्पिटलमध्ये वाऱ्या, महिनाअखेरीस पदरी पडणारी निराशा, पुनः त्याच चक्रातून जाणे, मग सततचे गर्भपात त्यातही क्यूरोटीन , त्यानंतरच डिप्रेशन हे मी सात वर्षे अनुभवलं. माझ्याप्रमाणे बऱ्याच जणींनी असे अनुभव घेतले असणार. आणि हाच काळ माझ्या परीक्षेचा काळ होता. 

वैतागून एके दिवशी मी सगळं करायचं बंद केलं. पण  करायचं बंद केलं होतं बोलायचं नाही. मला सतत समोर असलेल्या फोटोंशी , देवघरात असलेल्या मूर्तींशी बोलायची सवय होती. काही झालं की सांगायचं , मग ते चांगलं असुदे किंवा वाईट. तो संवाद कधीच थांबला नाही. म्हणजे तस म्हणायला गेलं तर फक्त रूढ मार्ग सुटला होता, पूजाअर्चा, जपजाप्य ह्यांचा. पण मनाने जी नाळ जोडली गेली होती ती मात्र त्या काळात अजूनच बळकट होत गेली. 

क्यूरोटीन करून आल्यावर माझ्याकडे असलेल्या फोटोंशी मी जशी भांडायचे तशीच त्यांनाच जवळ घेऊन रडरड रडायचे सुद्धा. माझ्या बलिशबुद्धीला तेंव्हा सतत काही तरी चमत्कार घडावा अस वाटत असायचं. आणि तस मी भावनेच्या भरात बोलून दाखवायचेही. पण नंतर लक्षात यायचं अरे आपलं आयुष्य म्हणजे काही सिनेमा नाहीये. इथे गोष्टी त्यांच्या वेळेवरच घडतील. त्यात काही करू शकत नाही. मग अशी माझ्याकडूनच माझी समजूत घातली जायची. 

ह्या सगळ्या प्रवासात मी माझ्याच वागण्याचं सतत आत्मपरीक्षण ही करायचे. एखाद्या गोष्टीची इच्छा तीव्र होऊ लागली की स्वतःला विचारायचे हे सगळं इतकं गरजेचं आहे का? आतून उत्तर आलं की मग पुढचा मार्ग शोधायचा. 
हळूहळू माझा प्रवास स्वतःच्या दिशेने होण्याकडे माझी वाटचाल सुरू झाली. 

दत्तभक्ती नसानसात भिनलेली होती पण आपण राहून राहून महिषासुर मर्दिनीकडे का ओढले जातो हे काही कळायला मार्ग नव्हता. 

ही अगदी ताजी म्हणजे दोन ते तीन वर्षांपूर्वी माझ्या लक्षात आलेली गोष्ट हं! इतकी वर्षे मी माझा वाढदिवस रामनवमीच्या आदल्या दिवशी दुर्गाष्टमीला येतो म्हणून माझं नाव गौरी ठेवलं आहे एवढंच जाणून होते आणि त्यातच खुशही होते. पण अलीकडच्या काळात जेव्हा गोष्टी बघण्यात वाचण्यात आल्या तेंव्हा समजलं की अरे हे सगळं खूप विलक्षण आहे. 

चैत्र शुद्ध नवरात्र दुर्गाष्टमीला तर तुळजाभवानीचा उत्पत्तीदिन असतो.  आता मात्र मला माझ्या बाबतीत घडणाऱ्या कित्येक गोष्टींचा अर्थ लागायला सुरुवात झाली. 

आपली जन्मतिथी , आपलं जन्मगाव(तुळजापूर)  आणि आपलं सध्याच राहण्याच ठिकाण(अहमदनगर) हे सगळे तुळजाभवानीशी इतके संलग्न आहेत की आपण काही संबंध नसताना लग्न होऊन सासर सोडून अहमदनगर मध्येच कस काय स्थायिक झालो ? हे सगळं कोडं क्षणार्धात सुटलं.

माझी जन्मभूमी तिची कर्मभूमी आहे  आणि तिची जन्मभूमी तिने माझी कर्मभूमी  बनवली. माझ्यासाठी हे सगळंच फील गुड लेव्हलवर न थांबता पुढच्या टप्प्यावर आलं होतं. 

आयुष्यात अजून काही विलक्षण गोष्टी वाट बघत होत्या आणि त्या माझ्या तयारीची वाट बघत होत्या. 

ती वेळही आली माझ्या आयुष्यातील तुळजाभवानीच्या सहवास पर्वाची सुरुवात झाली चैत्र शुद्ध प्रतिपदा , गुढीपाडवा २०१८. त्या वर्षीची दुर्गाष्टमी स्पेशल होती. बाय ऑल मिन्स. 

मी तिला एकच गोष्ट विचारली , "आफ्टर ऑल धिस टाइम?" 

तिने हसून उत्तर दिलं, " ऑलवेज " 

आणि निश्चिन्तपणे तिच्या हातात स्वतःला सोपवत मी ह्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज झाले. 

#आई_राजा_उदे_उदे  

#महाष्टमी ३ ऑक्टोबर २०२२

बाकी? 

बाकी सगळं जगदंबार्पणमस्तु 🙏 शुभं भवतु!!!

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 

दुर्गे दुर्घट भारी

#दुर्गे_दुर्घट_भारी 

#विश्वास



एवढीशी कथा 15 भागात संपवून टाकू म्हणून सुरू केली होती. पण तिने आत्तापर्यंत 72 भाग घेतले. 

मानगुटीवर बसून लिहून घेणं काय असतं ते मला विश्वास मुळे कळलं. 5 मिनिटे एका जागी स्वस्थ न बसणारी मी आता एक तास सहज तंद्री लागल्यासारखी बसलेली असते. 

स्वतःला शोधताना ह्या माझ्या फेसबुक पेज आणि ब्लॉगच नाव ह्या कथेने खरं केलं. आत्तापर्यंतच्या 35 वर्षाच्या छोट्याश्या संपुर्ण आयुष्यात मिळाले नसते एवढे अनुभव जून 2021 ते सप्टेंबर 2022 ह्या वर्षात मिळाले. 

अतर्क्य अनुभव त्यांची व्याप्ती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं अस्तित्व किती खुजे आहे ह्याची जाणीव सतत होऊ लागली. पण आपल्या एवढ्याशा अस्तित्वाची त्यांनी दखल घेतली आहे हे लक्षात आल्यावर अंगावर काटा आला. 

माणसांनी माणसावर जबाबदारी टाकणे आणि त्या वर बसलेल्या शक्तीने आपल्यावर जबाबदारीची कामे देणे ह्यामध्ये किती फरक आहे हे कळत गेलं. 
खूप गोष्टी, व्यक्ती ह्या प्रोसेसमध्ये दुरावल्या ह्याचं कारण मला जस समजलं त्याप्रमाणे तरी चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार करणं हेच आहे. 

हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे माझ्यासाठी सुद्धा. पण प्रयत्न करणार आहे हे सगळे अनुभव शब्दांत मांडण्याचा.  

चैत्र नवरात्र दुर्गाष्टमी  ते शारदीय नवरात्र महाष्टमी माझा प्रवास नक्की वाचा 

#आई_राजा_उदे_उदे  

बाकी? 

बाकी सगळं जगदंबार्पणमस्तु 🙏 शुभं भवतु!!!

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

और तुम

#और_तुम 

इन्स्टाग्राम रिल्सवर मध्यंतरी काही दिवसांपूर्वी सतत अमितकुमारांच्या आवाजातील बडे अच्छे लगते हैं गाण्याचं एकच कडवं ट्रेंडिंग होतं. 

हम तुम कितने पास हैं कितने दूर है चाँद सितारे
सच पुछो तो मन को झूठे लगते है ये सारे 
मगर सच्चे लगते है, ये धरती, ये नादिया, ये रैना,
और तुम

गाणं आवडतं असल्याने मीही काम करताना गुणगुणत होते. लेकाच्या कानावरही पडत होतं. 

दोन दिवसांपासून मात्र एक दोन वेळा लक्षात आलं की छोटे कुलकर्णी हळू आवाजात काहीतरी म्हणत असतात. 
मला वाटलं असेल नेहमीप्रमाणे अशक्य ही शक्य करतील स्वामी कारण ते त्याचं 24×7 आवडतं वाक्य, गाणं, मंत्र आहे . कारण त्याचे बजोबा (स्वामींना तो लाडाने आजोबा ऐवजी बजोबा म्हणतो ❤️) ,तर बजोबा आपले ऑल टाइम आवडते दोस्त आहेत. 

पण आज मात्र सकाळी आगावपणा केला सायकल घेऊन ओट्यावर चढण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मग अम्माकडून ओरडा खाल्ला, दोन फटकेही खाल्ले. शेवटी अम्मा काही ऐकत नाही हे लक्षात आलं मग एक कोपरा पकडला आणि बसून घेतलं. 

माझं लक्ष होतंच पण लगेच राग सोडला की मग अर्थ नसतो आधीच्या रागावण्याला. सो मी गप्प बसले. 


हळूहळू जवळ येऊन मागून गळ्यात हात टाकून तोंडाने पुटपुटणे सुरू झाले. आधी काही कळेना, मग विचारलंच म्हटलं काय म्हणतो आहेस? 

मग छानपैकी कपाळावर हात मारून घेत म्हणे , अग और तुम ,और तुम. 

आता मात्र मला कळलं की अय्या (हे माझंच संबोधन) रागावली म्हणून तिला मस्का मारण्यासाठी गाणं म्हणत होता. 

चंगोंची माफी मागून,

इतकं गोड कुणी मस्का मारणार असेल तर 
रागावण्याला ही अर्थ आहे
तोडक्यामोडक्या भाषेतलं मनवणं ऐकण्यात तर 
आयुष्याचं सार्थक आहे 

#वयवर्षेपावणेतीन
#पद्माक्ष_गौरीहर्षल_कुलकर्णी
#गौरीहर्षल 

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

यु टर्न (भाग 5) ©®गौरीहर्षल ( 31/12/2016)

यु टर्न (part ५) 

सकाळी उठल्यापासून नेहाची चाललेली गडबड पाहून तिच्या नवऱ्याने राघवने न राहवून तिला विचारलच कि काय शिजतंय तिच्या डोक्यात? आपल्या प्लानचा त्याला थोडक्यात अंदाज देत ती आवरत होती. गरज पडलीच तर तुला फोन करेन असं त्याला हक्काने सांगून ती निघाली. आज वातावरण किती छान आहे असं स्वतःशीच म्हणत तिने गाडी चालू केली  आणि ती थेट ऑफिसला आली. तिकडे सारंग स्वतःसुद्धा सानिकाला कसं मनवायच याचा विचार करत होता. त्यासाठी त्याने नेहाचीच मदत घ्यायची असं ठरवलं. सारंगचा सकाळी सकाळी आलेला मेसेज पाहून नेहाला आश्चर्य वाटलं. त्याने तिला भेटायला बोलावलं होतं.
संध्याकाळी सारंग तिला भेटला आणि त्याने तिला सानिकाबाबत सांगून एक सुखद धक्काच दिला. जी गोष्ट कशी करायची याचा विचार नेहा दिवसभर करत होती तिचं करण्यासाठी सारंग स्वतः तिची मदत  मागत होता. सारंगच्या म्हणण्यानुसार नेहाला फक्त सानिकाला कॅफे यु टर्न मध्ये दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आणायचं होतं. त्यासाठी नेहाने लगेच सानिकाला फोन केला आणि तिने केलेल्या सगळ्या मदतीसाठी तिला एकदा भेटून बोलायचं आहे असं सांगीतल. सानिकाने सुरुवातीला नको म्हणत टाळायचा प्रयत्न केला पण नेहाचा आग्रह ती मोडू शकली नाही आणि संध्याकाळी कॅफेमध्ये येण्यास तयार झाली. सारंग मनापासून नेहाला थॅँक्स म्हणत ते दोघे निघाले. 
इकडे सानिका क्लीनिकमधून गाडीवर घरी निघाली होती “अभी न जाओ छोडकर कि दिल अभी भरा नही” असे शब्द कानावर पडताच सानिका थबकली. तिला तिची आणि सारंगची ती भेट आठवली जेंव्हा त्याने तिला हे गाणे चालू असताना खूप रोमॅन्टिक पद्धतीने प्रपोज केले होते. ते क्षण आठवताच नकळत तिचा चेहरा उजळला. आणि हे अचानक आपल्याला काय होतंय याचा विचार करत ती घरात निघाली. पण नेहमीप्रमाणे समोरून कोण आलाय याकडे लक्ष नसल्याने ती अमेयला जाऊन धडकली. तिचा ब्लश करणारा चेहरा पाहून त्याने तिला चिडवायला सुरुवात केली. कशीबशी त्याच्या तावडीतून तिने स्वतःला सोडवले. पण आज सारंग आणि त्याच्या आठवणी मात्र तिचा पिच्छा सोडत नव्हत्या. त्या आठवणींच्या ताब्यातून स्वतःला सोडवत असतानाच तिला झोप लागली. आकाशातला चंद्रहि उद्या भेटणाऱ्या पौर्णिमेच्या आठवणीत अडकला होता. तशीच काहीशी अवस्था सारंगची सुद्धा होती.
दुसऱ्या दिवशी सानिका खूप काम असल्याने बिझी इतकी होती कि तिला संध्याकाळ बद्दल नेहाने आठवण करून दिली. तर तिकडे सारंगला मात्र खूप काम असूनही संध्याकाळ शिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. संध्याकाळी ठीक ७ वाजता सानिका कॅफे यु टर्न च्या पार्किंग मध्ये आली आज कॅफेचं वातावरण तिला काहीसं ओळखीचं वाटत होतं शिवाय विकेंड असूनही तिथे फारशी गर्दी नव्हती. हे पाहून तिला थोडं आश्चर्य वाटलं. तिने नेहाला ती कुठे आहे हे विचारण्यासाठी फोन केला तर तिला अजून १५ मिनिटे लागतील असं कळाल. तोपर्यंत काय हा विचार करत ती उभी असताना कॅफेच्या मॅनेजरने तिला नेहमीच्या टेबलवर बसायला सांगितलं. ती तिथे बसली आणि काही सेकंदातच कॅफेमधले लाईट गेले. आणि कुणी काही बोलायच्या आत समोर असणाऱ्या मोठ्या स्क्रिनवर एका खूप सुंदर कपलचे फोटो दिसू लागले ते सगळं बघून सानिका थक्क झाली. कारण ते फोटो तिचे आणि सारंगचे होते. त्यांच्या सुंदरश्या आठवणी आणि प्रत्येक आठवणीसोबत एक मेसेज. सानिकाची माफी मागणारा झालं गेलं ते विसरून जायचं प्रयत्न कर असं म्हणणारा. सानिकाची भिरभिरती नजर आता फक्त त्या व्यक्तीला शोधत होती. क्षणार्धात सगळा कॅफे उजळला आणि सरप्राईज असं म्हणत तिच्या, सारंगच्या घरचे , त्यांचे सगळे फ्रेंड्स यांचा गराडा सानिकाभोवती पडला. सगळ्यांशी बोलत असतानाच तिला बॅकग्राऊंडला तेच गाणं ऐकू आलं 

“ अधुरी आस छोडके, अधुरी प्यास छोडके 
       जो रोज युंही जाओगी तो किस तरह निभाओगी,
        के जिंदगी कि राह में जवा दिलोंकी चाह में ,
 कई मकाम आयेंगे जो हमको आजमायेंगे...........” 
पुढचं सगळं गाणं तिच्या समोर सारंगला बघताच तिच्या डोळ्यातून वाहणार पाणीच म्हणत होतं. तो हळूच तिच्यासमोर आला आणि दोघांनी सॉरी म्हणण्यासाठी एकत्रच एकमेकांचे कान धरले. तसा अख्खा हॉल हसण्यात बुडला.............................
समाप्त
गौरी हर्षल



सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

#कु:संतानापेक्षा_नि:संतान_बरे ©®गौरीहर्षल

#कु:संतानापेक्षा_नि:संतान_बरे ©®गौरीहर्षल

(सत्य अनुभवावर आधारित ही छोटीशी कथा)

"हुश्श ,आले बाई एकदाची सगळं निस्तारून.", असं म्हणत समिता घरी येऊन सोफ्यावर बसली. 

तिचं हे वाक्य ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू आले आणि वडिलांच्या कपाळावर एक सूक्ष्म त्रासिक आठी उमटली. 

त्याला कारणही तसंच होतं, समिता वय वर्षे 30 च्या आसपास, लग्न झाल्यावर नको त्या टोकाला जाऊन सासरी भांडण करून कायमची माहेरी आलेली अत्यंत उद्धट, उर्मट मुलगी. कोर्टातली केस अजून मार्गीही लागली नव्हती तोवरच समिताचं उच्शृंखल आणि व्यभिचारी वागणं आईवडिलांच्या समोर आलं. 

त्यांनी तिला समजावण्यासाठी साम, दाम ,दंड ,भेद सगळे मार्ग वापरून बघितले पण परिणाम शून्य. शिक्षण यथातथाच असल्याने अक्कल आणि बाहेरचं जग समजण्याची कुवत जवळपास नव्हतीच. पण आपल्या अशा वागण्याने आपलंच नाव सगळीकडे खराब होणार हेही तिला कळत नव्हतं. असो

तर आत्ता जे निस्तारून आले असं ती म्हणत होती ती गोष्ट होती तिच्या उदरात वाढणारा गर्भ, जो तिच्या नको त्या संबंधांची खूण होता. ही गोष्ट आईवडिलांच्या लक्षात येताच त्यांना ब्रह्मांड आठवले होते. बातमी बाहेर पडली तर समिताच्या सासरचे लोक अर्थातच त्या गोष्टीचा फायदा घेणार होते. त्यामुळे शेवटी पुन्हा एकदा आपल्या रागाला आवर घालत वडिलांनी तिला डॉक्टरकडे नेले. कॉम्प्लिकेशन असल्याने डॉक्टरांनी आधी नकारच दिला पण शेवटी मात्र समिताच्या वडिलांवर दया येऊन त्यांनी प्रोसिजर पूर्ण केली. ओळखीचे डॉक्टर असल्याने गोष्टी गुप्तपणे उरकल्या गेल्या. 

पण ज्या गोष्टींमुळे आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली होती ती गोष्ट समिताच्या दृष्टीने अतिशय फालतू होती. ना तिला स्वतःच्या चुकीची जाणीव होती आणि ना ही इतरांना होणाऱ्या त्रासाची काळजी. इथे एक गोष्ट हीसुद्धा होती ती म्हणजे समिताच्या पोटातील मूल ज्या व्यक्तीचे होते तो त्याच्या संसारात अगदी आनंदात होता आणि ते समिताला माहिती  असूनही तिने नाते इतके पुढे नेले होते. हे सगळं कळल्यानंतर तर आपलंच नाणं खोटं आहे दुसऱ्याला काय बोलणार असं तिच्या आईला तिचे वडील म्हणाले. त्या दोघांची अवस्था खरंच अवघड झाली होती. 

त्यामुळेच घरी आल्यावर जेव्हा ती म्हणाली, आले निस्तारून ,तेव्हा आईवडिलांच्या मनात कु:संतानापेक्षा नि:संतान बरे हा विचार आल्याशिवाय राहिला नाही. 

अशा कितीतरी समिता हल्ली आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात ज्यांना स्वतःच्या चुकीच्या वागण्याची लाज वाटणं तर दूर त्या चुका पुन्हा पुन्हा करायला काही वाटत नाही. 

हल्ली समाजात ही अप्पलपोटी,स्वार्थी प्रवृत्ती वाढण्याची काय कारणे असू शकतात ? तुम्हाला काय वाटतं?

#स्वतःला शोधताना
#गौरीहर्षल



सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

तुम्ही काय फॉलो करत आहात हल्ली?


#तुम्ही_काय_फॉलो_करत_आहात_हल्ली?©®गौरीहर्षल

आपण आपल्या मनाला, मेंदूला कुठली माहिती पुरवतो ह्यावर आपला दिवस कसा जाणार हे अवलंबून असतं. कसं ते वाचा ह्या ओळखीच्या गोष्टीत......

मानसी आज जास्तच गडबडीत होती. लॉकडाउन वगैरे मुळे आधीच कामाचा भार वाढला होता आणि त्यात आज तिचं एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं. सकाळी लवकर उठून घरातील बाकीची कामं जमेल तेवढी आवरून घेत तिने स्वतःसाठी मस्त आलं घालून चहा केला. चहाचा वाफाळता मग घेऊन ती शांतपणे बाल्कनीत येऊन बसली. तिची बाल्कनी तिच्यासाठी स्ट्रेस बस्टर होती. 

सासूबाईंनी कौतुकाने लावलेली चार रोपं, लेकीच्या बालहट्टामुळे टांगलेले बर्डफिडर, आणि तिची आवड म्हणून बसवलेला छोटासा झोपाळा ह्या सगळ्या गोष्टी बाल्कनीला एक जिवंतपणा देत असत. छोट्या छोट्या पक्ष्यांची नाजूक आवाजात सुरू असलेली बडबड मनावर कितीही ताण असला तरी सुखावून जात असे. त्यामुळेच महत्वाच्या कामाच्या दिवशी मानसी ठरवून थोडासा वेळ तरी का होईना बाल्कनीत  फक्त स्वतःसाठी राखून ठेवत होती. 

घरात अजून कुणाला जाग आली नव्हती सो तिला आज सगळं आवरल्या नंतर बराच निवांत वेळ मिळाला होता. तो मी टाईम ती स्वतःसोबत छानपैकी एन्जॉय करत होती. 
अजून काही क्षण असे घालवल्यावर तिने लॅपटॉप घेत प्रेझेंटेशनची सगळी तयारी चेक केली. आणि मग ऑल ओके 👍 असा मेसेज टीमच्या वॉट्सअप्प ग्रुपवर पाठवून दिला. 

तिने सहजच इतर वॉट्सअप्प मेसेज, स्टेटस चेक करायला सुरुवात केली. मेसेज बऱ्यापैकी फॉरवर्डच होते. मग तिने आपला मोर्चा कधी नव्हे ते स्टेटस बघण्याकडे वळवला. कुणी कसल्या शुभेच्छा दिल्या होत्या, कुणी श्रद्धांजली वाहत होत, कुणी प्राण्यांचे व्हिडीओ शेयर केले होते तर कुणी काय. सगळं बघता बघता तिची नजर रश्मीच्या स्टेट्सवर येऊन थांबली. 

रश्मी मानसीची शाळेपासूनची जिवलग मैत्रीण. स्वभावाने अतिशय चंचल पण मनाने खूप चांगली. लग्न झाल्यावरही  दोघींच्या मैत्रीत काही फरक पडला नव्हता ह्याचं कारण होती रश्मी. तिने तिच्या स्वभावाने मानसीच्या सासरीही स्वतःसाठी जागा तयार केली होती. तशा काही दोघी आता सतत भेटत नव्हत्या पण काही नात्यांना सतत भेटण्याची, बोलण्याची गरज नसते ना तसच त्यांचंही नातं होतं. 

पण आज रश्मीचं नकारात्मक आणि डिप्रेशन दाखवणारं स्टेटस बघून का कुणास ठाऊक मानसीला जाणवलं की आपण रश्मीशी बोलायला हवं.
दुपारी ऑफिसच्या कामातून फ्री होताच तिने रश्मीला फोन लावला. पहिल्यांदा तर फोन लागला नाही आणि मग चौथ्यांदा केल्यावर तो उचलला गेला. 

पलीकडून त्रासिक आवाजात रश्मी बोलत होती. 

"हॅलो, बोल ग मनु. ", तिचा असा आळसावलेला, चिडखोर आवाज ऐकून क्षणभर मानसीला वाटलं की आपण चुकून दुसऱ्या कुणाला तरी फोन लावला. पण रश्मीलाच फोन लावला होता. 


"अग काय हे? तू ह्यावेळी झोपली होतीस की काय?", मानसीने विचारलं. 

रश्मी - " नाही ग झोपतेय कसली, आधीच डबल काम करून पिट्टा पडला आहे. इथे पाच मिनिटं निवांत बसायला वेळ मिळत नाही आणि तू म्हण झोपली होतीस का? "

मानसी - " रशु काही बिनसलं आहे का? म्हणजे घरात, आईंसोबत, जिजूंसोबत किंवा कामावर? नाही म्हणजे तू इतकी फ्रस्ट्रेटेड का वाटत आहेस?"

रश्मी - " नाही ग , अस काही नाही. पण सध्या न माझी खूप चिडचिड होतेय. का ते कळत नाहीये. रुटीन तर सगळं तेच आहे पण असं का होतंय काय माहीत?"

मानसी -" हं, मला एक सांग ,हल्ली नवीन काय करते आहेस? म्हणजे लिहिते, वाचते की बघते आहेस?"

रश्मी - "नवीन अरे हो ,तुला सांगायचंच राहील की! ऑफिसमध्ये एका नवीन वेबसिरीजवर चर्चा सुरू होती त्या xyz अँपवर आहे बघ ती abc वेबसिरीज, मग मागचे दहा,बारा दिवस झाले तीच बघते आहे. त्यामुळे दुसरं काही सुचतच नाही ग." 

रश्मीच्या उत्तरावर मानसीला काही तरी सापडल्यासारखं वाटलं. 

मानसी आता रश्मीचं बोलणं ऐकत होती. रश्मी भरभरून त्या वेबसिरीजबद्दल, त्यातल्या गोष्टींबद्दल बोलत होती. रश्मीला पहिल्यापासूनच अशा गोष्टींमध्ये रस होता. पण ती त्या सगळ्यात कधी कधी इतकी गुंगून जात असे की त्या गोष्टींचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावरही होतो हे तिच्या लक्षात येत नसे. 


"......तर असं आहे बघ. त्या वेबसिरीजमध्ये त्या माझ्या आवडत्या अभिनेत्रीने डिप्रेस व्यक्तीचा रोल इतका छान केला आहे की आपल्याला सुद्धा ते फील होतं.तू नक्की बघ." आता रश्मीचं बोलून झालं होतं.

"तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? नाही ते फील होणं वगैरे त्या व्यक्तीसाठी त्याच्या कामाची पावती असेलही पण तुझ्यावर त्याचा काय परिणाम होत आहे दिसत नाही का तुला? त्या सगळ्याला तू तुझ्या आयुष्यात का आमंत्रण देत आहेस? तुला आवडतं तू बघ पण आपण काय बघतोय , त्याने आपली मनस्थिती तर बिघडत नाही ना ह्याकडे पण जरा लक्ष दे. तुला आठवतंय मी प्रेग्नंट असताना मला खूप मूड स्विंग व्हायचे तेंव्हा मी डिप्रेस होऊन तुला फोन करायचे तर तू मला काय सांगायचीस? 

तू नेहमी मला फ्रेश वाटेल, आनंदी वाटेल अशा गोष्टी माझ्याशी बोलत होतीस. मला सगळी उत्तम पुस्तक, त्या काळात मनस्थिती छान राहील अशा वेबसिरीज, जुन्या सिरीयल, चित्रपट अगदी शोधून शोधून आणले होतेस. 

आपण त्यानंतरही कितीतरी वेळा उत्तम कलाकृतींचा आस्वाद घेतला. अगदी आपल्या कुटुंबासोबतही. पण इतकं फ्रस्ट्रेशन ,चिडचिड करताना मी तुला कधीच बघितल नव्हतं. 

एकदा नीट समजून घे कधी कधी काही गोष्टी खरोखरच निगेटिव्ह वाईब्ज देत असतात. एखादं पुस्तक, एखादा सिनेमा ,एखादं गाणं किंवा अगदी जाहिरातही आपल्या मनातल्या अशा दुखऱ्या नसेवर बोट ठेवते की आपण चिडचिड करू लागतो. अशा गोष्टींचा आहारी जायचं की आपल्या मनाला, मेंदूला आणि पर्यायाने शरीराला आनंदी, उत्साही , फ्रेश वाटेल अशा गोष्टी पुरवायच्या हे आपण ठरवायचं असतं. 

आपल्याला स्वयंपाक शिकवताना काकू म्हणायची बघ, एखादी स्त्री जेव्हा तिच्या कुटुंबासाठी मन लावून स्वयंपाक करते न तेव्हा ती तिच्या मनातलं प्रेम , माया त्यात ओतत असते. त्यामुळे ते अन्न तिच्या माणसांना समाधान देतं आणि त्यांचा आत्माही तृप्त होतो. म्हणून ....."

".....रागारागात कधीही स्वयंपाक करू नये आपले नकारात्मक विचार आपल्याच माणसांना त्रास देऊ शकतात." हसत हसत रश्मीने मानसीचं वाक्य पूर्ण केलं. 

"पाय कुठे आहेत तुमचे माते!" , असं पुढे म्हणताच मानसी म्हणाली," पाय जागेवरच आहेत , पण तू पाय लाव माझ्या घराला ह्या विकेंडला, मुलांना घेऊन ये आईबाबा आणि नवरा जाणार आहेत एका कामासाठी गावी, मला काही ह्यावेळी जाता येणार नाही. सो, तुम्ही तिघे मायलेकर या आम्हीही तिघे आहोत मस्तपैकी हॅरी पॉटर नाईट करूया. आपल्याला ही ब्रेक मिळेल." 

"डन बॉस, आणि थँक्स मला कळण्याआधीच माझा प्रॉब्लेम सोडवल्याबद्दल." असं म्हणत रश्मीने फोन ठेवला. 


मित्रमैत्रिणींनो तुम्हालाही होतं असेलना असं? माध्यम कुठलंही असो जर ते आपल्या मनात निगेटिव्ह विचार निर्माण करून आपली मनस्थिती खराब करत असेल तर त्याचा एक्सेस आपल्यापरीने आपण कंट्रोल करायला हवा. 

बाकी ज्याचा त्याचा प्रश्न. 

#स्वतःला शोधताना
#गौरीहर्षल

तळटीप - कथा कशी वाटतेय ह्यावर चर्चात्मक किंवा तुमच्या अनुभवाच्या प्रतिक्रिया नक्की द्या. 

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

दैव देतं आणि कर्म नेतं

#दैव_देतं_आणि_कर्म_नेतं ©®गौरीहर्षल

#सत्यघटनेवर_आधारित

(काही वर्षांपूर्वी मी ज्या डॉक्टरांकडे प्रॅक्टिस करत होते तिथे समुपदेशनासाठी एक कुटुंब आलं होतं. कुटुंब म्हणण्यापेक्षा एक भाऊ आपल्या बहिणीला घेऊन आला होता. त्या कुटुंबाचा अनुभव मी कथास्वरूपात शेयर करत आहे. 
कथा रूपांतर करताना व्यक्तींची नावे,घटना,प्रसंगात आवश्यक ते बदल केले आहेत.)


महाराष्ट्रातल्या एका गावात राहणारे एक सुखी,सधन चौकोनी कुटुंब. 
सुलेखा आणि पांडुरंग देशमुखांना दोन मुलं थोरला दिलीप,धाकटी शैलजा. इमानेइतबारे आपलं शेत सांभाळत सरळमार्गाने संसार करणाऱ्या देशमुखांनी दोन्ही मुलांवर अतिशय उत्तम संस्कार केले होते. मुलगा दिलीप शिकून सवरून नुकताच एका कंपनीत नोकरीला लागला होता. मुलगी शैलजा आत्ता कुठे पदवीच्या पहिल्या वर्षांत होती. 

दिलीप चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला होता आणि ही बातमी समाजात पसरण्यास फारसा वेळ लागला नाही. कधी उघडपणे तर कधी आडून आडून वधुपित्यांकडून चौकशी केली जाऊ लागली. पण दिलीपला पर्मनंट झाल्याशिवाय लग्न करायचे नव्हते. मुलाचा विचार योग्य आहे हे लक्षात आल्याने देशमुखांनीही फारसा जोर लावला नाही. 

वर्षभरात दिलीपला त्याचं काम बघून कंपनीकडून पर्मनंट झाल्याची ऑर्डर दिली गेली. आता मात्र त्यानेही वडिलांच्या इच्छेचा मान राखत लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी संमती दिली. वधुसंशोधनाला सुरुवात केली गेली. एकामागून एक स्थळं बघणे सुरू झाले. नेहमीप्रमाणे काही मुलींना एकत्र कुटुंब नको होतं,तर काहींना शहरातच राहायचं होतं. ह्या आणि अशा कारणांमुळे होकार- नकार सत्राचा अनुभवही देशमुख कुटुंबाने घेतला. 

शेवटी त्यांचा शोध शेजारच्या गावातून आलेल्या पाटील कुटुंबातील सवितावर येऊन थांबला. 

जसा दिलीप तशीच सविताही दिसायला चारचौघींसारखीच होती आणि शिक्षणही जेमतेमच होते. दिलीपच्या मानाने सविता त्याच्यासाठी योग्यच होती. दोन्ही कुटुंबाचा आर्थिक स्तरही जवळपास सारखाच असल्याने लवकरच सुपारी फोडली गेली. आणि दोन महिन्यांनी लग्न करून सविता पाटीलची सविता दिलीप देशमुख होत सविताने गृहप्रवेश केला. 

सुलेखाताई आणि शैलजाने अगदी उत्साहाने घरात सविताचे स्वागत केले. शैलजाला वाटले की वहिनी आली म्हणजे आता आपल्याला एक जवळची मैत्रीण मिळाली. 
शैलजा तशी स्वभावाने फार बुजरी आणि लाजाळू असल्याने बाहेरच्या जगाशी तिचा फारसा संबंध आला नव्हता. घर ते कॉलेज आणि कॉलेज ते घर एवढंच काय ते ती बाहेर पडत असे. आईबाबा आणि दादा म्हणजे दिलीप हेच तिचं विश्व. तीही घरात सगळ्यांची लाडकी होती. आता तिने सवितालाही आपल्या भावविश्वात जवळची जागा दिली होती. 

पण हा पणच सगळ्या गोष्टींच्या मध्ये आडवा येतो न.....

सविताच्या माहेरी तिच्याव्यतिरिक्त अजून तिची थोरली बहीण आणि धाकटा भाऊ होते. बहिणीचं लग्न सविताच्या सहा महिने आधी झालं होतं. आणि भाऊ नोकरीच्या खटपटीत होता. आर्थिक परिस्थिती बरी असली तरी खाणारी तोंड पाच असल्याने थोडीफार ओढाताण होतच होती. त्यातच सविता जरा जास्तच हट्टी होती. मनासारखं झालं नाही तर तिचा थयथयाट ठरलेला असे. पण इतक्या वर्षात तिला किती महत्व द्यायचं ते माहेरच्यांना कळून चुकलं होतं. 

दिलीपच्या स्थळाबद्दल सगळी चौकशी केल्यानंतरच सविताला घरच्यांनी लग्नासाठी तयार केलं होतं. छोटं कुटुंब,फारशी जबाबदारी नाही हे बघितल्यावरच सविताने लग्नाला होकार दिला होता. नाहीतर तिच्या आडमुठ्या स्वभावामुळे वैतागून आधी आणलेल्या सगळ्या स्थळांनी समोरून नकार कळवला होता. 

ते म्हणतात ना लग्नाच्या गाठी वरती बांधलेल्या असतात तसच काहीसं दिलीप आणि सविताच्या बाबतीत झालं होतं. सविताच्या स्वभावाचा वरवर अंदाज देशमुख कुटुंबालाही देण्यात आला होता पण बाकी सगळ्या गोष्टी अनुकूल असल्याने नवीन ठिकाणी नवीन माणसात आल्यावर स्वभावही बदलेल असं वाटून त्यांनी होकार कळवला होता. 

पहिले काही महिने सविताने आणि घरातही सगळ्यानी एकमेकांना समजून घेत काढले. इतर कुणाला नाही पण दिलीपला मात्र सविता प्रचंड हट्टी आहे हे लक्षात आले होते. पण आपल्यामुळे आणि आपल्या बायकोमुळे घरात इतरांना त्रास नको म्हणून तो बऱ्याचदा सविताची बाजू सावरून घेत असे. 

पण एके दिवशी मात्र सविताच्या खऱ्या स्वभावाची झलक त्याला आणि इतर तिघांनाही बघायला मिळाली. आणि त्यांना आपण कशाला आमंत्रण दिले आहे ह्याचा अंदाज आला. 

शैलजा आणि दिलीपने त्यांच्या आईला वाढदिवसानिमित्त सरप्राईज द्यायचे ठरवले होते आणि त्यामुळे त्यांची घरात इतर कुणालाही न सांगता गुपचूप तयारी सुरू होती. काही तरी कामानिमित्त सासूबाई सोबत बाजारात गेलेल्या सविताने दिलीप आणि शैलजाला बाजारात बघितले पण ती हाक मारणार तोपर्यंत ते दोघेही दिसेनासे झाले. तिने लगेच दिलीपला फोन लावला आणि विचारले. जसे तिने त्या दोघांना बघितले होते तसे शैलजानेही त्या दोघींना बघितले होते. सविताला आत्ता कळले तर आईलाही सरप्राईज कळेल म्हणून दिलीपने काही तरी कारण सांगून वेळ मारून नेली. पण दुसरीकडे सविताच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी सुरू झालं होतं. 

घरी आल्यावरही दिलीपच्या डोक्यातून बाजाराचा विषय निघून गेला असल्याने सविताला सांगण्याचा विसर पडला. 
दुसऱ्या दिवशी आईबाबांना बाहेर पाठवून दिलीप आणि शैलजा वाढदिवसाची तयारी करू लागले. शैलजाने वहिनीला सगळं सांगून तयारीसाठी मदत करायला बोलावले होते. 
सविताला आता सगळे समजले होते पण तिला वगळल्याचा राग तिच्या मनात घर करून बसला होता. दिलीपने तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यावर जास्त वेळ घालवण्यापेक्षा त्याला तो दिवस साजरा करणे महत्त्वाचे वाटले. शेवटी त्याने सविताला विनंती केली आणि तो तयारी करू लागला. 

संध्याकाळी घरी आल्यावर मुलांनी केलेली तयारी बघून सुलेखताईना खूप आनंद झाला. मन मारून सविताही सगळ्या गोष्टींत सहभागी झाली होती. 

पण दिलीप आणि शैलजाच्या नात्याकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन मात्र पूर्णपणे बदलला होता. 

सगळेजण आनंदाने जेवणासाठी बसणार तोच सविता कडाडली," शैलजा, कसं वागायचं हेपण मी तुला शिकवायचं का? बाहेर तर एकत्र फिरताच तुम्ही पण आता घरातपण तू सतत माझ्या नवऱ्याच्या आसपास घुटमळत असतेस. मी किती दिवस झाले सगळं बघतेय पण इतर कुणालाच तुझं वागणं ,बोलणं खटकत नाही. त्यांना चालत असेल पण मला नाही चालणार हे असलं वागणं.", सविताचं बोलणं ऐकून दिलीपसहित सगळ्यांनाच धक्का बसला. 

शैलजाला तर काय बोलावं तेच सुचेना कळायला लागल्यापासून ज्या भावाचं बोट धरून चालायला सुरुवात केली त्या आपल्या दादाबद्दल आणि आपल्याबद्दल वहिनी असा विचार करते हे तिला पटतच नव्हतं. 

शेवटी प्रसंग बघून पांडुरंगराव मध्ये बोलले,"सुनबाई , शब्द सांभाळून बोलत जा. आपण कधी ,कुठे कुणावर कसले आरोप करत आहोत ह्याच भान ठेवा. आमच्या मुलांवर आम्ही उत्तम संस्कार केले आहेत त्यामुळे ते असलं काही वागू शकतात ह्यावर आमचा विश्वास नाही. तुमचा कदाचित गैरसमज झाला असेल असं आम्हाला वाटत त्यामुळे आता ह्या दोघांशी बोलून तुम्ही हे सगळं मिटवा. परत असल्या खालच्या थराला गाठून काही बोलू नका. आल्या दिवसापासून तुमचं तुसड वागणंही आम्हाला दिसत आहे पण आम्ही तुम्हाला सतत संधी दिली. त्यामुळे असल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा संसारात लक्ष घाला.सगळ्यानी जेवणं उरका आणि मगच ताटावरून उठा.", त्यांच्या ह्या शब्दापुढे बोलण्याची हिम्मत कुणातही नव्हती. सगळ्यानी खाली मान घालून दुखावल्या मनानेच जेवणं केली. जेवण होताच कशालाही हात न लावता सविता फणकाऱ्याने खोलीत निघून गेली. ती गेली तसा इतका वेळ आवरून धरलेला शैलजाचा बांध फुटला ती आईच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडू लागली. 

दिलीपने कसंबसं आई आणि बहिणीची माफी मागितली तो वडिलांच्या दिशेने वळला तर त्यांनी त्याला खड्या शब्दांत सविताला नीट समजावून सांगायला सांगितले. 

तो स्वतःला सावरत खोलीत आला आणि सविताशी एकही शब्द न बोलता भिंतीकडे तोंड करून झोपला. पुढचा पूर्ण आठवडा घरात कुणीही कुणाशी बोलत नव्हते पण सविताला त्यामुळे काही फरक पडत नव्हता. 

मग एके दिवशी तिच्या वडिलांचा सासरी फोन आला आणि त्यांनी सविताला कुठल्या तरी सणासाठी माहेरी पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार तिचा भाऊ येऊन तिला घेऊन गेला. बहिणीच्या सासरच्यांनी केलेलं थंड स्वागत बघून त्याला शंका आली पण वयाने लहान असल्याने त्याने काही विचारलं नाही. घरी आल्यावर मात्र त्याने ही माहिती आईच्या कानावर घातली. आईने मात्र सविताला खोदून खोदून विचारलं तेंव्हा तिने झालेली गोष्ट सांगितली. आईने कपाळावर हात मारून घेत सविताला चार गोष्टी सुनावल्या आणि सोबतच तिच्या संशयी स्वभावाला आवर घालण्याचा सल्लाही दिला. सवितानेही आईच्या हो ला हो करत मान डोलावली. 

काही दिवस माहेरी राहून सविता सासरी परत आली. ह्यावेळीही दिलीपने सुट्टी न मिळाल्याचे सांगत आणून सोडायला सांगितले. शेवटी भाऊच सोडायला तयार झाला. मस्त माहेरपण एन्जॉय करून सविता भावासोबत सासरी पोहोचली. 

दारातच घरातून हसण्याखिदळण्याचे आवाज कानावर पडले. दारात बऱ्याच चपलाही होत्या. आत गेल्यावर कळलं की सुलेखताईंच्या दोन भाच्या कुटुंबासह जाता जाता धावती भेट घेण्यासाठी अचानक आलेल्या होत्या. त्या आल्याचे कळल्यावर दिलीपही सुट्टी घेऊन घरी आला. दिलीपला कामावरून घरात आल्याचे बघताच सविताला पुन्हा एकदा राग आला. सगळ्या पाहुण्यांकडे दुर्लक्ष करून ती खोलीत निघून गेली. बिचाऱ्या भावाला काहीच न सुचल्याने तो तसाच एका कोपऱ्यात उभा राहिला होता. शेवटी शैलजाने त्याला बसायला सांगितले. दिलीपने पुन्हा एकदा सविताच्या हातापाया पडत तिला पाहुण्यांसमोर नीट वागण्याची विनंती केली. सविताचा अहंकार सुखावला पाहुणे आणि तिचा भाऊ पाहुणचार घेऊन निघून गेले. 

रात्री दिलीपच्या खोलीतून वाढलेले आवाज ऐकू आले तसं सुलेखताईंनी दार वाजवलं. सविताने रागातच दार उघडलं आणि ती बाहेर आली. ह्यावेळी तिने पुन्हा तेच सगळे आरोप दिलीप आणि शैलजावर केले. 


सुलेखताईंनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न करताच तिने त्यांच्यावरही आवाज चढवला आणि शैलजा आणि तिच्या बाबांबद्दलही नको नको ते बरळू लागली. हे सगळं ऐकल्यावर आता मात्र देशमुखांपैकी कुणालाही काहीच सुधरेना. सुलेखाताई उभ्या जागीच डोकं धरून बसल्या. पांडुरंगराव सुन्नपणे सगळ्यांकडे बघत होते. तेवढ्यात दिलीपने मात्र पुढे होत जोरदारपणे सविताच्या कानाखाली मारली आणि मागून शैलजाचा आवाज त्याला ऐकू आला. ती अस्ताव्यस्तपणे फरशीवर कोसळली होती. तो तिच्या दिशेने धावला. 

शेजाऱ्यांना मदतीला घेऊन आईबाबांना सोबत घेत दिलीपने शैलजाला दवाखान्यात एडमीट केले. तिथे तिच्या काही तपासण्या करण्यात आल्या. जबरदस्त मानसिक ताण आणि धक्का बसल्याने शैलजा बेशुद्ध पडली होती. 

ती शुद्धीत आल्यावरच अजून काही प्रॉब्लेम आहे का ते कळू शकत होते. दुसऱ्या दिवशी शैलजा शुद्धीवर आली पण तिची मनस्थिती पूर्णपणे बिघडली होती. भाऊ आणि वडिलांना ती आपल्या जवळपासही फिरकू देत नव्हती. शेवटी सुलेखाताईनी शेजारच्या एका मुलीच्या मदतीने तिचं सगळं आवरलं. ती इतर कुणाशीही काही बोलायला तयार नव्हती. मुलीची अवस्था बघून आईवडिलांनाही धक्का बसला होता पण आत्ता तिला सावरणे गरजेचे होते. 

दिलीपने बहिणीची अवस्था बघितली आणि त्याला सविताचा प्रचंड राग आला. त्याने तिरिमिरीतच तिच्या वडिलांना फोन लावला आणि तिला घेऊन जायला सांगितलं. 

फोनवरचा दिलीपचा आवाज ऐकून पाटील कुटुंबीय हादरले होते ते दोघेही सविताच्या सासरी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांना दिसले ते आपल्या मुलीच्या वागण्याने उध्वस्त झालेले एक सुखी कुटुंब. 

सविताच्या आईला सगळं खरं कळताच त्यांनी सगळ्यांच्या समोर तिच्या कानाखाली वाजवली. कारण आपल्या मुलीच्या स्वभावाचा त्यांना पूर्णपणे अंदाज होता. त्यांनी तिला तशी जाणीवही सतत करून दिली होती पण आज सविताने स्वतःच्या हाताने सगळं उध्वस्त केलं होतं. 

सविताला तिच्या आईवडिलांनी कायमचं माहेरी आणलं होतं. दिलीपच्या घरच्यांनी डिव्होर्ससाठी कोर्टात केस दाखल केली. केस बरेच वर्ष चालणार होती कारण कोर्टातही सविताने तेच घाणेरडे आरोप लावले होते. 

ह्या सगळ्या गोष्टींचा खोलवर आणि जास्त वाईट परिणाम मात्र शैलजाच्या आयुष्यावर झाला. तिला त्या सगळ्यातून सावरण्यासाठी जवळपास दोन वर्षे लागली. तिचा नात्यांवर आणि माणसांवर आता पुन्हा सहजपणे विश्वास बसत नव्हता. 

सांगायचं तात्पर्य हे की माणसाची मनोवृत्ती त्याच्या सोबतच इतरांचेही न भरून येणारं नुकसान करत असते. 

तुम्हाला काय वाटतं?

#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

तळटीप - कथा कशी वाटतेय ह्यावर चर्चात्मक किंवा तुमच्या अनुभवाच्या प्रतिक्रिया नक्की द्या.