गुरुवार, २६ मार्च, २०२०

आमराईचा उत्सव

आमराईचा_उत्सव

आज सकाळपासून तिची खूप लगबग सुरू होती. ऑफिसमध्ये ही ती काहीशी गडबडीत असल्याचं तिच्या मित्रमंडळी ना जाणवलं शेवटी कुणीतरी तिला हटकलच कुठे लक्ष आहे म्हणून? मग दुपारी जेवताना बोलू असे म्हणत तिने समोरच काम संपवायला सुरुवात केली. 
सगळं मित्रमंडळ दुपारच्या वेळी ऐकण्यासाठी तयारीत बसलं होतं. ती आली मग सगळ्यांनी जेवणं उरकली. आता मात्र तिच्या जिवलग मैत्रिणी ला राहवेना. " मिथिले , अग सांग ना आतातरी " , अस म्हणत नेत्राने कोंडी फोडली. 
हलकेसे हसत मिथिला म्हटली, "अग हो तेच बोलणार आहे. गेले दोन दिवस मी कसल्या गडबडीत आहे, ह्याबद्दल तुम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे.  तर माझे आजोबा म्हणजे माझ्या बाबांचे बाबा गावाकडे खूप मोठे शेतकरी होते. अडीनडीला लोकांच्या हमखास उपयोगी पडत. पण त्यांना एक दुःख होतं. पाच पिढया घरात मुलगी जन्माला आली नव्हती. कारण पाच पिढ्यांआधी जन्माला आलेली मुलगी  शेतातल्या आंब्याच्या बागेतल्या विहिरीत सापडली होती. आणि त्यानंतर भरभरून आंबे देणारी ती आमराई आणि पाण्याने तुडुंब भरलेली ती विहीर कायमच्या आटल्या." हे ऐकल्यावर सुरक्षित वातावरणात वाढलेल्या सगळ्यांच्याच अंगावर भीतीने रोमांच उभे राहिले.  मिथिला क्षणभर थांबली मग पुढे बोलू लागली,"मग नंतरच्या पिढ्यानपिढ्या मुलींसाठी प्रयत्न करत राहिल्या पण मुलगी झाली नाही. माझ्या आजोबांनी मात्र उपासतापास, गुरू वगैरे करून उपाय शोधला. तो म्हणजे त्यांनी माझ्या आजीकडून ती आमराई आणि विहीर दोघींची खणनारळाने ओटी भरून घेतली. आणि वचन दिले की जर घरात सुदृढ मुलगी जन्माला आली तर तिच्याच हाताने पहिलं रोप ह्या जमिनीवर लावीन."  "मग? " नेत्राने उत्सुकतेने विचारलं. 
"मग? माझ्या आजीला जुळ्या मुली झाल्या त्या म्हणजे माझ्या दोन्ही आत्या त्या वर्षाच्या झाल्यावर त्यांच्या हाताने आजोबांनी पहिली रोपटी तिथे लावली आणि विहीरीची पूजाही केली.  त्या वर्षी पाऊसही भरपूर झाला ती विहीर तुडुंब भरली आणि रोपं रुजली . आता कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणो किंवा आणि काही पण गावात हे घडल्यानंतर मुलीचा जन्म झाला की लोकं असच स्वतःच्या शेतातही करू लागले. आणि आता तर ती एक प्रथा च बनली आहे. फक्त एक गोष्ट दरवर्षी बदलली. ती म्हणजे दरवेळेस फक्त आमराइतच नाही तर शेतातच पेरणी करताना पहिलं प्राधान्य त्या वर्षी जन्माला आलेल्या मुलीला दिल जातं. मगच पुढची कामं केली जातात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी माझ्यापरीने भर घालण्याचा प्रयत्न करतेय. ही कल्पना त्या भागात मुलींची होणारी हत्या थांबवण्यासाठी उपयोगी ठरली अन् फायदाही झाला. तर ह्या वर्षी मान मिळणार आहे माझ्या वहिनीला कारण आमची पिटुकली सरस्वती. त्या जोडीनेच आम्ही तिथे शाळेला काही वस्तूही देतो आहोत म्हणून मी जरा कामात व्यस्त झाले होते. ह्या निमित्ताने मी तुम्हां सगळ्यांना तिथे येण्यासाठी आमंत्रित करतेय आणि हो ड्रेस कोड आहे हं. मुलींसाठी नऊवारी आणि मुलांसाठी धोतर कुर्ता. तेंव्हा त्या तयारीने या." मिथिला इतकं बोलून थांबली तसं नेत्राने तिला मिठीच मारली. बाकी सगळेही ह्या कामासाठी तिचं अभिनंदन करू लागले. मुलीच्या जन्माचा असा उत्सव करण्याची कल्पना सगळ्यांनाच आवडली. 
#गौरीहर्षल #१६.१.२०१९

सोमवार, ९ मार्च, २०२०

ओळखीचा अनोळखी मित्र

Life is all about adjustment. 
प्रत्येक जण कुठेना कुठे, कशासाठी तरी, कुणासाठी तरी एडजस्ट करतच असतो. आणि एडजस्टमेंट करावी लागणार आहे हे कुठेतरी मनात फिक्स असतं. 
    पण कधीतरी काय होतं मन कंटाळलेले असते. बऱ्याच गोष्टी एकदम घडलेल्या असतात म्हणजे घरात , बाहेर, ऑफिसमध्ये काही घटना अचानकच घडतात. अशावेळी चिडचिड सुरू होते प्रत्येकाचीच मग त्यातून वाद होतात. कुणीतरी माघार घेतं अन विषय थांबवला जातो पण तो खरंच थांबतो का हो??
तर नाही मनाचा एक कोपरा त्यावर विचार करत असतो, कदाचित दुखावलेला असतो. काही जण अशा परिस्थितीत शांत बसतात म्हणजे बाहेरून तरी असच दृश्य असतं, काही जण स्वतःशीच बडबड करून चिडचिड करून मोकळे होतात. काही जण सोशल मीडियावर दर्दभरे स्टेटस टाकून मोकळे होतात तर काही जण उगाच पॉझिटिव्ह जगण्याची धडपड सुरू करतात. 
   क्षणिक दिसणारा हा त्रास मनाला मात्र खूप त्रास देत असतो. पण आपल्या कडे पद्धत असते न मनातलं कुणाजवळ बोलायच नाही मग काय करणार ?? मन बसतं आतल्याआत रडत कुढत. त्यातूनही कुणीतरी एखाद्या मित्रमैत्रिण , इतर जवळच्या व्यक्ती यापैकी कुणाजवळ तरी व्यक्त होतात. पण आपण विसरतो ही देखील माणसच असतात कधीतरी ते आपल्याला पटतील असे सल्ले देतात तर कधीतरी कुणाकडून नकळतच आपला त्रागा नको त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. मग वाटू लागतं की कुणाशी बोलायच की नाही?
मला न अशा वेळी बसमध्ये भेटलेल्या काकू आठवतात. अंदाजे 6 वर्षांपूर्वी ची गोष्ट.  मी पुण्याहून अहमदनगर ला परत येत होते. एक साध्याशा दिसणाऱ्या काकू माझ्या शेजारी येऊन बसल्या. त्या काकू असतील 40-50वयोगटातील. सुरुवातीला मीही माझ्या नादात होते पण मग त्यांची जरा चुळबुळ सुरू झाली इकडेच बघ , तिकडेच बघ. मी ते बघून कानातले हेडफोन काढून ठेवले आणि शांत बसले. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या , ताई तुला काही सांगितलं तर ऐकशील का? मला वाटलं माझं फोनवर कुणाला तरी झापण ऐकून आता ह्या मला सल्ला देतात की काय? पण म्हटलं बघू तरी काय म्हणतात, म्हटलं बोला न काकू. तर त्या म्हणे मी अमूक ठिकाणी चाललेय तर मला नगरमधून बस मिळेल का? मी म्हटलं त्यांना मिळेल न तुम्ही शेवटच्या स्टोपला उतरा तिथे मिळेल. मग आणखी काही मिनिटे शांततेत गेली आणि काकू म्हणाल्या, माझी भावजय एडमीट आहे दवाखान्यात तिला बघायला चाललेय. उगाच विचारायचं म्हणून मी विचारलं , बर नाही का त्यांना? 
नाही तशी बरीच आहे पण साप चावला तिला शेतात कामाला गेली होती तेंव्हा पण लवकर कळलंच नाही मग आता सिरीयस आहे. तसा माझा न भावाचा काय संबंध उरला नाही बघ आठ वर्षांनी जातेय मी भावाकडे. ते पण अस झाल्याच कळलं म्हणून. मग काकूंनी एकेक करत बरेच किस्से त्रास सांगितला. सांगताना त्यांचे डोळे सतत भरून येत होते. भावजयीने आईवडिलांना त्रास दिला मग आपल्याला का येऊ नको सांगितलं हे आणि बरच काही. मनातला राग , द्वेष सगळा काही त्यांनी त्यावेळी बोलण्यातून आणि अश्रूंवाटे बाहेर काढला. मीही त्यांना मनसोक्त रडू दिलं थोडया वेळाने बस एके ठिकाणी थांबली तशा त्या उतरून फ्रेश होऊन आल्या. माझ्याकडे बघून मोकळ्या हसल्या. आधीपेक्षा आताच त्यांचं हसणं खूप मनमोकळं होत. मग माझ्या हातावर थोपटत म्हणाल्या, तू कोण , कुठली मला काय बी माहिती नाही. अन् माहिती करून काय उपयोग बी नाही कारण आपण काय परत भेटणार नाही. पण तुझ्याशी बोलून मला लई बर वाटल. किती वर्षं झाली बाकीच्याना त्रास होऊ नये म्हणून मी माझं मन मोकळं केलंच नव्हतं ते सगळं आज बोलले. का बोलले माहिती नाही कदाचित तू मला माझ्या घरच्यांना वळखत नाहीस म्हणून मला सगळं बोलणं जमलं. कारण तू ह्यातलं काय पण त्या कुणाला सांगणार नाही ही खात्री होती मला,म्हणून नवऱ्याला पण जे बोलून दाखवल नाही ते तुला सांगितलं. एवढं बोलून त्या शांत झाल्या. 
कधी कधी मनात अशा काही घटना घर करून गेलेल्या असतात ज्या आपल्या मनाला सतत टोचणी लावत राहतात पण आपण चुकनही त्या कुणाजवळ व्यक्त करू शकत नाही अशा वेळी हा काकूंचा उपाय फारच उपयुक्त ठरु शकतो. 

प्रवास सुरूच होता पण माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं असं का घडलं?? पुढे त्याच उत्तरही माझं मलाच सापडलं काय  माहीत आहे? आपण अनोळखी व्यक्तीशी मनातला राग , दुःख ,त्रास मोकळेपणाने बोलू शकतो कारण त्या व्यक्तीमुळे आपल्या नात्याला काही हानी होणार नाही ही खात्री आपल्याला असते. पण प्रत्येक वेळी ही अनोळखी व्यक्ती खात्रीशीर असू शकते का हो?? तर नाही मग ह्यावर काहीतरी सोल्युशन असायला हवं असं मलाही वाटत तुम्हाला काय वाटतं?? योग्य ती सावधानता , गुप्तता बाळगत व्यक्त होण्याचा एखादा पर्याय उपलब्ध झाला तर तुम्ही कराल का त्याचा वापर की नाही ?? कारण कित्येकदा आपल्याला सल्ला नको असतो हवी असते ती फक्त साथ. शांतपणे ऐकून घेणारी, मन मोकळं करू देणारी आणि जोडीला सगळं नीट होईल अशी उभारी मनाला देणारी. अशी साथ मिळाली तर??  त्यासंदर्भात तुम्हा सगळ्यांचा फीडबॅक अत्यंत आवश्यक ठरेल. नक्की सांगा. दोन्ही बाजूंनी विचार करून फायदे तोटे तुम्हाला जे वाटतात ते. 
#गौरीहर्षल 

शुक्रवार, ६ मार्च, २०२०

यशातलं अपयश

यशातलं अपयश
चाळिसाव्या मजल्यावर असणाऱ्या त्या आलिशान पेंट हाऊसच्या फ्रेंच विंडोमधून सगळं शहर दिसत होतं. पण ते बघण्याची शुद्ध कुठे होती त्याला.
गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांचा क्रम त्याच्या डोळ्यासमोरून सरकत होता. त्याचं हे वैभव काही एका रात्रीत आलं नव्हतं. पण लोकांना त्याच्या जवळच्या लोकांनाच अस वाटत होतं. ते लोक ज्यांनी त्याच्या पडत्या काळात त्याच्याकडे पाठ फिरवली होती. त्याचे आईवडील, भाऊबहीण, मित्र सगळेच सतत त्याच्या प्रत्येक कृतीवर आक्षेप घेत ,टोमणे मारत त्याचं मानसिक खच्चीकरण करत होते. पण तो मात्र ठामपणे त्याच्या वाटेवरून चालत राहिला होता. आणि आज त्याचं फळ त्याला मिळालं होतं. पण जोडीने असतील शिते तर जमतील भुते ह्या म्हणीचा प्रत्यय ही त्याला आला होता. 
संध्याकाळी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात तीच ती पाठ फिरवून निघून गेलेली सगळी नाती त्याला दिसली. 
प्रेम तर तस त्याच्या आयुष्यात आलंच नव्हतं पण जे काही आलं ते स्वार्थासाठी आहे हे लक्षात यायला त्याला वेळच लागला होता. मग असे सत्काराचे प्रसंग जसजसे वाढत गेले तसतसे त्याला लोकांचे खरे चेहरे समजत गेले. 
आज तो यशाच्या शिखरावर होता पण एकटा. आणि हे एकटेपण त्याने निवडलं नव्हतं तर समाजाने जवळच्या लोकांनी त्याच्यावर लादलं होतं. त्याने तर आटोकाट प्रयत्न केले होते आपल्या लोकांना धरून ठेवण्यासाठी वेळोवेळी मदतीला धावून गेला , जीवापाड प्रेम दिले पण सगळ्यांना फक्त त्याचा पैसा दिसत होता. त्याला गरज असताना नोकर आहेत न काळजी घेण्यासाठी असे सल्ले देत जेंव्हा जन्मदात्यांनीही काढता पाय घेतला तेंव्हा तो खऱ्या अर्थाने खचला.
चूक खरे तर त्याचीच होती पण पूर्णपणे त्याची नव्हती. लोकांची वृत्तीच अशी बनली होती. जो मदत करत आहे त्याच्याकडून शक्य तेवढी मदत मग ती कुठल्याही स्वरूपात का असेना घ्यायची आणि आपलं काम झालं की आम्ही तुम्हाला बोलावलं नव्हतं अस सांगत मनाच आणि घराचंही दार लावून घ्यायचं. 
लोक फक्त त्याच्याशीच अस वागत होते अस नाही. पण त्याच्या मनाला हे वातावरण त्यात मिसळणे जमत नव्हते. तत्वनिष्ठ वगैरे नव्हता तो उलट अगदी साधा सरळ नाकासमोर चालणारा होता. पण त्याच वृत्तीची खिल्ली उडवली जात असे तेंव्हा तो दुखवून ही काही बोलत नसे. त्याने प्रयत्नही केले पण नाहीच जमले त्याला अरे ला कारे करणे अन् जिथे जमले तिथे त्याला उद्धट कृतघ्न वगैरे विशेषणे मिळाली मग सोडूनच दिले त्याने बोलणे. एक छोटस विश्व मनात तयार करून तिथेच रमू लागला तो.  त्यातुनच त्याची कला जन्माला आली आणि त्याला अमाप यश देऊन गेली. 
आता मात्र तो शिकला होता. आज सोहळ्यात त्याने सगळ्यांकडे दुर्लक्ष करत स्वतःच्या यशाचे श्रेय स्वतःला दिले तेंव्हा उतरलेले चेहरे त्याला दिसले. क्षणभरच त्याच्या मनात अपराधी भाव आले पण लगेच तो सावरला. हसून तिथून निघून गेला. माणसात रमणारा होता तो कधी काळी पण आता तीच माणसं वाचता येऊ लागली आणि त्याच मन कुठेच रमेना. 
विचारांच्या खोल गर्तेत हरवत कधी त्याचे डोळे मिटले त्यालाही कळले नाही. सकाळी येणाऱ्या नोकराने स्वतःकडच्या चावीने दार उघडले तेंव्हा आरामखुर्चीत हसऱ्या चेहऱ्याने झोपलेला तो बघून त्याला जरा आश्चर्यच वाटले. जवळ जात त्याने हात लावला तेंव्हा कळले तो कायमचा त्याच्या विश्वात रमण्यासाठी कधीचाच निघून गेला होता. 

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

Quote of the day 17

#Quote_of_the_day17


अमेय अगदीच शांत मुलगा. नाही म्हणायला ओळखीच्या लोकांमध्ये थोडा फार मिसळत असे पण बाकी अगदीच अबोल. अभ्यासात मात्र बऱ्यापैकी हुशार. त्यामुळेच तर कॉलेजमध्ये कॅम्पस सिलेक्शन झालं आणि चांगली नोकरीही मिळाली. एकूणच काय निवांत आयुष्य चाललं होतं त्याचं. थोडया वर्षात लग्नाचं वय झालं म्हणून आईवडिलांनी मुली बघायला सुरुवात केली. अबोल असणाऱ्या अमेयला मात्र अत्यंत बडबड्या सखीने पसंत केले. हो तिनेच पसंत केले कारण हा पठ्ठया मुलगी कशी वाटली विचारलं की नुसता लाजत असे. मग शेवटी तिनेच होकार कळवला. योग्य मुहूर्त बघून लग्नही झालं. 
    अमेयच्या अबोल स्वभावाशी सखी जुळवून घेत होती. पण तिच्या येण्याने त्याच्या आईबाबांना मात्र घर भरल्यासारखं वाटत होतं. सतत तिची चिवचिव , वावरणं त्यांना आवडलं होतं. आवडलं तर अमेयला पण होत पण बोलणार कोण? असो असा त्यांचा संसार छान सुरू होता. वर्ष होत आल होत त्यातच नवीन पाहुण्याची चाहूल लागली.  सगळेच आनंदले. विचारले तरच बोलणारा अमेय आता मात्र हळूहळू बोलू लागला होता, सखीची जास्त काळजी घेत होता. बाळाशी गप्पा मारत होता. त्याच्यातले बदल सगळ्यांनाच सुखावणारे होते. आता सखीला सातवा महिना लागला होता डिलिव्हरी साठी ती माहेरी जाणार होती. त्यातच अमेयला परदेशी जाण्याची संधी आली. एक प्रकारे ते त्याच प्रमोशनच होतं, कारण सहा महिने तिथे जाऊन आल्यानंतर प्रमोशन फिक्स होतं. पण जर ही संधी नाकारली तर पुन्हा मिळणार की नाही ह्याची खात्री नव्हती. अमेयला कळत नव्हतं काय करावं जायचं ठरवावं तर सखीची अवस्था अशी आणि नाही म्हणावं तर भविष्यातल्या काही गोष्टी लांबणार आता तर कुठे त्या गोष्टींची खरी गरज पडणार होती. त्याने विचार करण्यासाठी 3 दिवसाचा वेळ मागितला. कारण निर्णय कळवल्यानंतर पुढच्या महिन्यात जावे लागणार होते. एक महिना वेळ तयारीसाठी दिला होता. 
थोडासा विचारातच तो घरी आला. त्याचा उदास चेहरा बघताच सखीला अंदाज आला होता की काहीतरी बिनसले आहे. फ्रेश झाल्यावर तो सगळ्यांसोबत चहा घेण्यासाठी आला. हळूच तिने विषय काढला काय झालं आहे ? 
दोन सेकंद थांबून अमेयने सगळी परिस्थिती सांगितली. मग प्रश्नार्थक चेहऱ्याने त्या तिघांकडे बघू लागला. आई बाबा दोघेही म्हणाले तुम्ही दोघे मिळून जो निर्णय घ्याल त्यात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्याची काळजी करू नका. 
मग सखी त्याच्या हातावर थोपटत म्हणाली, मला माहीत आहे तू माझ्यामुळे कन्फ्युज होतो आहेस. आणि माझीही इच्छा होती की बाळाच्या जन्माच्या वेळी तू सोबत असावस. पण बघ प्रॅक्टिकली विचार केला तर आपल्याकडे नोकरी हेच उत्पनाचे साधन आहे. आणि सध्या काही वर्षे मी पुन्हा नोकरीचा विचार करू शकत नाही,खर तर मला करायचा नाही कारण बाळाच्या महत्वाच्या दिवसात मला त्याच्यासोबत राहायचे आहे. आपली बऱ्यापैकी सेविंग जरी असली तरी तुझ्यावर जबाबदारी जास्त आहे. त्यामुळे तू ही संधी सोडू नये असं मला वाटतं. आपण हे सगळं बाळाच्या भविष्यासाठी तर करत आहोत न मग त्यासाठी आता तडजोड केली तर काय बिघडलं. आणि राहिली गोष्ट सोबत असण्याची तर आता इंटरनेट मुळे आपण कधीही एकमेकांना बघू शकतो. तेंव्हा तू बिनधास्त जा, दोन्ही आईबाबा आहेत माझ्यासाठी. आणि सहा महिन्यांचा तर प्रश्न आहे असे संपतील. अमेयच्या डोळ्यात नकळतच पाणी आलं. ऑफिसमध्ये होकार कळवत अमेय तयारीला लागला आणि गेलाही. पुढे ठराविक दिवसांनी सखीची डिलिव्हरी झाली आणि गोंडस असा मुलगा झाला. अमेयने व्हिडीओ कॉलवरच समाधान मानले पण मन मात्र आता तयार नव्हते थांबण्यासाठी. लवकरच तो परतला अपेक्षित यश मिळाले. 
काही वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की काय निर्णय घ्यावा तेच कळत नाही. त्या क्षणी समोर असणाऱ्या गोष्टींचा विचार करावा की भविष्याचा. आपल्या जवळच्या माणसांचं मत नक्की विचारात घ्यावं. कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो कदाचित आपल्याला जास्त योग्य उत्तर मिळू शकते. कुठल्याही निर्णयाचा भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो हा विचार नक्की करावा 
Because,
The decisions you make today will determine the stories you tell tomorrow.
कसा वाटला Quote of the day नक्की कळवा.
थॅंक्यु❤️❤️ #गौरीहर्षल

Quote of the day 16

#Quote_of_the_day16


स्टेजवर मुलीचा सत्कार करण्यात येत होता. पण रजनीचे डोळे मात्र सतत भरून येत होते. कारणही तसंच होत रजनी आणि  तिच्या दोन्ही मुलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगण्यातून मार्ग काढत आजचे यश मिळवले होते. इथे मुलीचा सत्कार बेस्ट बिझनेसवुमन म्हणून होत होता तर दोन दिवसांनी मुलाला त्याच्या क्षेत्रातल्या संशोधनासाठी सुवर्णपदक मिळाले म्हणून नावाजले जाणार होते. ह्या सगळ्यात जर कुणी त्यांच्यासोबत होते तर तो म्हणजे फक्त आणि फक्त त्यांचा आत्मविश्वास. 
रजनीच्या नवऱ्याने अगदी मोक्याच्या क्षणी तिची आणि मुलांची साथ सोडून दिली होती ते ही नको त्या लोकांवर विश्वास ठेवून. तिने खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. नोकरी होती म्हणून रजनीला तशी काही आर्थिक काळजी नव्हती. पण अचानक आलेल्या या संकटाने ती नाही म्हटलं तरी कोलमडली. तिच्या मनस्थितीला समजून घेत वरिष्ठांनी काही  दिवस  तिला ब्रेक घ्यायला लावला. मुलं शाळेत गेली की रजनी तासनतास रडत असे. अशीच एके दिवशी ती विचार करत असताना तिची जवळची मैत्रीण स्मिता तिला भेटायला आली. रजनीला बघताच तिला अंदाज आला की ती काय करत होती.  तिने तिच्या ओळखीच्या एका बाईना सोबत आणले होते त्यांना घरकाम समजावून सांगत तिने आपला मोर्चा रजनिकडे वळवला. हे बघ रजनी जे झालं ते झालं, तू शक्य तेवढे प्रयत्न ही केलेस पण जर नाही समोरचा ऐकत तर काय करणार? तुझ्या सुदैवाने तू आर्थिक बाबतीत कुणावरही अवलंबून नाहीस. त्यामुळे तू आणि मुलं ह्या घरात निवांत राहू शकता. पण ज्या माणसाची लायकीच नाही त्याच्यासाठी तू अजून किती दिवस अश्रू ढाळत बसणार आहेस. विसरलीस का ती रजनी जी स्वतःबरोबर दुसऱ्यांसाठीही खंबीरपणे उभी असायची?  बाहेर पड ह्या सगळ्यामधून तुझी मुलं तुझ्याकडे आशेने बघत आहेत. तू कालही त्यांची हिरो होतीस आणि आजही आहेस. अस बघू नकोस मला आज इथे मुलांनीच यायला लावलं. मुलं मोठी झाली आहेत रजनी तुला आता अजून खंबीरपणे त्यांच्यासाठी आणि स्वतःसाठीही उभं राहावं लागणार आहे. आम्ही सतत सोबत आहोतच पण वाट मात्र तुझी तुलाच चालायची आहे हो न?? 
ह्यानंतरही असे कमकुवत क्षण आले रजनीच्या आयुष्यात नाही असं नाही. पण मुलं आणि जवळच्या लोकांच्या मदतीने ती त्यातून बाहेर पडली. आज दोन्ही मुलांचं जस स्वतंत्र अस्तित्व होत तसच रजनीचही होतं. ह्या सगळ्या गोष्टींचा अजून एक साक्षीदार होता तो म्हणजे स्मिताने कामासाठी आणलेल्या सखुबाई. त्या सतत निरीक्षण करत होत्या की कस रजनीने सगळं स्वीकारले. हे सगळं नुसतं बघतच नव्हत्या तर त्यातून धडा घेत त्यांनी स्वतःच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहणं शिकवलं होतं.  आणि जमेल तसं त्या रजनीला अशाच काही स्त्रियांना समजून सांगण्यासाठी भेटायची गळ घालत असत.
ह्या सगळ्या गोष्टींचा काही जणींना फायदा नक्कीच झाला होता. 
परिस्थिती नेहमीच एकसारखी राहत नाही. ती कधी चांगली असते तर कधी वाईट. वाईट परिस्थितीतही खंबीरपणे उभं रहात जो स्वतःला सावरतो. त्याचं आयुष्य नक्कीच पुढे जाऊन एक उदाहरण म्हणून दिल जातं. परिस्थितीशी दिन हात करताना आपल्याला हे माहीत नसतं की कोण आपल्याला बघत आहे. पण जेव्हा आपण काही मिळवतो एका पदावर पोहोचतो. अन् कुणी कधीतरी येऊन सांगत की ही गोष्ट तुमच्याकडे बघून आम्ही शिकलो तेव्हा नकळतच जबाबदारी कळते. कदाचित ती गोष्ट छोटीशीही असू शकते पण समोरच्या व्यक्तीला जर त्याचा उपयोग झाला आहे तर ती नक्कीच महत्वाची आहे. 
So folks , 
Be strong...
You never know who you are inspiring.

कसा वाटला हा Quote of the day नक्की कळवा. 
प्रतिक्रिया द्या. थॅंक्यु❤️❤️#गौरीहर्षल

शनिवार, २८ डिसेंबर, २०१९

Quote of the day 15

#Quote of the day 15

यश आणि जय दोघे सख्खे भाऊ. यश थोरला तर जय धाकटा. यश जरा अभ्यासू त्यातच जास्त रमणारा अगदी आदर्श टाईप. त्याउलट जयला मात्र शेंडेफळ असल्याने सगळं काही स्वतःला आवडेल तेच करायला आवडत असे. जय लहान असल्यापासून जरा आईच्या मागेच जास्त वेळ असायचा. त्यामुळे त्याला स्वयंपाकाची गोडी कधी लागली त्यालाही कळालं नाही. आधी अगदी इमर्जन्सी किंवा फारच मूड आला तर एखादा पदार्थ करणारा जय हळूहळू जास्त रस घेऊन सगळं बघत असे. आईने आपल्या टिपिकल स्वभावधर्माला धरून विरोध केला पण थोडासाच. मुलांनी स्वयंपाक करू नये वगैरे काही तिचे विचार नव्हते पण जयने काहीतरी वेगळं करावं असं तिला वाटायचं. जसं चार लोक यशच कौतुक करतात जयच सुद्धा करावं अशी तिची इच्छा होती. 
      जयच्या आवडीला गृहीत धरून आईबाबा आणि यश नेहमीच त्याला प्रोत्साहन देत. पण जयला अजून स्वतःबद्दल तेवढा विश्वास वाटत नव्हता. ह्यावर उपाय म्हणून यश सतत त्याला नवनवीन प्रयोग करायला लावत असे. अभ्यासात फारशी गती नसल्याने हॉटेल मॅनेजमेंट करणं शक्यच नव्हतं. पण म्हणून जे कौशल्य आहे ते का वाया घालवायचे? मग बाहेरून ग्रॅज्युएशन करता करता यशच्या मदतीने जय वेगवेगळ्या ठिकाणच्या पदार्थांची खासियत शिकण्याचा प्रयत्न करू लागला. यशही स्वतःचे व्याप सांभाळून जमेल तेवढी मदत करत असे. आई आणि आजीच्या हाताखाली तयार झाल्याने त्याला पारंपरिक पद्धतीचे पदार्थ अगदी छान जमत होते. मग यशने त्याला फ्युजन करता येईल का ते बघ असा सल्ला दिला. घाबरतच जयने सुरुवात केली. पहिली ऑर्डर छोटीशीच होती पण त्या ठिकाणी दिलेले पदार्थ सगळ्यांना फार आवडले. त्यासोबतच अजून तीन ठिकाणी ऑर्डरही मिळाली. पहिली कमाई जयने यशच्या हातात ठेवली. ती पुन्हा त्याच्याच हातात टेकवत यश त्याला म्हणाला, सुरुवात केली तर सगळं जमत बघ पण आपण सुरुवातीला कच खातो. मला रुटीन लाईफ आवडतं पण ह्याचा अर्थ असा नाही की तुलाही तेच आवडावं. तुला स्वतःवर विश्वास असेल तर सगळं शक्य आहे. इथून पुढेही ते नक्कीच होईल.
गोष्ट साधीशीच पण खरा अर्थ सांगते. आपल्याला खूप काही येत असत पण चार लोकांसमोर ते आत्मविश्वासाने मांडणं जमत नाही. किंवा भीती वाटते. जर आपणच स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर जगात कुणीही ठेवणार नाही. ते म्हणतात न बोलणाऱ्याची मातीही खपते पण न बोलणाऱ्याच सोनही खपत नाही. 
So If you do not believe in yourself....
chances are nobody else will. 
कसा वाटला हा Quote of the day नक्की कळवा. थॅंक्यु❤️❤️#गौरीहर्षल


 

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

Quote of the day 14

#Quote of the day 14

निकिता आणि निखिलचं अरेंज मॅरेज. निकिताच्या माहेरी जशी जॉइंट फॅमिली होती तशी निखीलकडे नव्हती. निखिलच्या घरात तो , त्याचे आईबाबा आणि बहीण एवढेच लोक. बाकी नातेवाईक येऊन जाऊन असत पण ते कधीतरी  निमित्तापुरते. त्यामुळे घरातील व्यवस्था आईच्या हातात होती. आणि इतक्या वर्षांची एकटीने सगळं करण्याची सवय त्यांनाही लागली होती. त्यात सुनेच्या येण्याने बदल होणार हे जरी गृहीत धरले होते तरी तसा अनुभव दोघींचाही पहिलाच असणार होता. इतर घरात जस होत असे तस त्यांच्या घरातही होई भांड्याला भांडं लागलं की आवाज होणारच. 
निकिताला मिळून मिसळून गोष्टी कराव्या वाटत तर सासूबाई ची एक पद्धत ठरली होती त्यांना ते तस हवं असे. ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण निखिल आणि त्याचे बाबा करत होते. पण सोल्युशन काय काढावं त्यांना समजेना. वयानुसार आईही नमतं घ्यायला तयार नाही मग शेवटी निखिलने वेगळं व्हायचं ठरवलं. त्याच सोसायटीमध्ये पण दुसऱ्या विंगमध्ये त्यांचा एक फ्लॅट होता तो आणि निकिता तिथे राहू लागले. हळूहळू गाडी रुळावर आली. दोघीही आपल्या आवडीच्या कामात मन रमवू लागल्या. आई आणि निकिता दोघींनाही चूक कळली होती. पण आता बाबा आणि निखिल दोघांचंही म्हणणं होतं जे जस आहे ते तसच राहूदे. आपल्या सगळ्यांना एका स्पेसची गरज असते ती आपल्याला वेगवेगळ्या घरात राहून मिळतेय. कमी काम असल्याने दोघींनाही स्वतःच्या इतर गोष्टींना वेळ देता येतो आहे. आई इतकी वर्ष जे  करू करू म्हणत होती पण एकटीने घर सांभाळताना ते शक्यच नव्हतं आता तिला ते सगळं करता येईल. गरज पडली तर जवळच असल्याने आपण लगेच एकमेकांना बघू शकतो. त्यामुळे उगाच एकत्र राहण्याचा अट्टहास नको. ते दोघींनाही म्हणाले, तुम्ही बायका घरासाठी जगताना स्वतःला विसरता. तुमच्या आवडीनिवडी, छंद हे सगळं कुठेतरी हरवून जातं. आणि मग एका काळाने जेव्हा आयुष्यात तोचतोचपणा येतो तेव्हा साहजिकच चिडचिड सुरू होते. आम्हाला काय घरी आल्यावर तुमचे हसरे चेहरे बघितले की बरं वाटतं पण जेव्हा चिडचिड होते तेव्हा एकामागे एक सगळेच त्यात ओढले जातात. रुटीनमधून ब्रेक घेणं, स्वतःच्या आवडीनिवडी जपणं हेही तितकंच महत्वाचं असतं कारण त्यामुळे तुमचा दिवस चांगला जातो. आणि अर्थातच तुम्ही हे का विसरता की, You are someone's reason to smile.
छोटे छोटे प्रॉब्लेम असतात आयुष्यात पण आपण त्यांना मोठं करतो उगाचच आणि मग आपलं हसणंच हरवत जातं. एक गोष्ट नोटीस करा कधी कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीला ही खळखळून हसताना बघून नकळतच आपल्याही चेहऱ्यावर हसू येतं. मग जवळच्या लोकांना आनंदी बघितल्यावर तर नक्कीच जास्त आनंद मिळेल न?? 
So all readers keep smiling, stay happy always. You never know who is getting his/her reason to smile😊😊. 

कसा वाटला हा Quote of the day नक्की सांगा. 
2020 येतंय मग काय काय संकल्प करायचे आहेत आणि त्यातले पूर्ण किती करायचे आहेत ते ठरवलं की नाही?? मग ठरवा. 
ब्लॉगबद्दल प्रतिक्रिया नक्की द्या थॅंक्यु ❤️❤️#गौरीहर्षल