शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

Quote of the day 8

#Quote_of_the_day8

घरी खूप मस्का मारल्यावर नेहाला हव्या त्या डान्सच्या कोर्सला बाबांनी एडमिशन घेऊ दिली होती. कारण तिचं रेग्युलर कॉलेज क्लासेस ह्या सगळ्यात खूप कमी वेळ तिच्याकडे उरत असे. तिला नाही म्हणण्यामागे तिचीच दमणूक होऊ नये असा त्यांचा विचार होता. पण नेहाच्या हट्टापुढे त्यांचं काही चाललं नाही. उत्साहाने क्लास सुरू झाला होता. बडबड्या स्वभावाने तिने इथेही भरपूर मैत्रिणी जमवल्या. ह्या सगळ्यात एक जण होती स्मिता. नेहा आल्यापासून सगळ्या तिच्याभोवती असतात हे ती सुद्धा बघत होती. द्वेष किंवा इर्षेने नाही तर कुतूहलाने कारण स्मिताला अस मोकळं बोलणं वागणं जमतच नसे का कुणास ठाऊक पण ती शांत शांतच असायची. घरीही सगळे तिला समजावत की अग हेच वय आहे मजा मस्ती करण्याचं पण स्मिता आपली स्वतःच्याच विश्वात असे. नेहा मात्र इतरांच्या सोबत स्मितालाही आपल्या मस्तीमध्ये घेत असे. हळूहळू स्मितालाही स्वतःहून ओळख करून घेणं, बोलणं जमू लागलं. 
अशातच एके दिवशी क्लासमध्ये लवकरच मोठ्या कार्यक्रमात स्टेजवर परफॉर्मन्स करण्यासाठी तयारी सुरू झाली. 
सगळ्याच जणी उत्साहात होत्या. फ्युजन प्रकार निवडून काहीतरी नवीन सादर करावं असं ठरलं. मग विषय सुचवणे, त्यावर चर्चा सुरू झाल्या. सगळ्याबाबतीत उत्साही असणारी नेहा इथेही होतीच. तिनेच विषयही सुचवला आयुष्यातील अपयश किंवा वाईट घटनेमुळे खचलेला व्यक्ती आणि मग कशी त्याला प्रेरणा मिळून तो नव्याने उभा राहण्याचा प्रयत्न करतो. विषय पटण्यासारखाच होता. मग काय गाणी , संगीत वगैरे निवडत छोटे छोटे गट करत गोष्ट गुंफली जाऊ लागली. 
प्रॅक्टिस करता करता एक महिना उलटला. आणि तो दिवसही उजाडला. एक एक करत सगळ्या जणी कार्यक्रमाच्या ठिकाणी जमल्या तयारी सुरू झाली. आधी त्यांचा परफॉर्मन्स आणि मग बाकी सगळे अस नवीनच प्रकार होता. स्मिता आणि नेहा सुरुवात करणार असल्याने त्या पुढे होत्या. गार पडलेल्या हातानी स्मिताने नेहाचा हात धरला. ती नर्व्हस झाली आहे हे नेहाच्या लक्षात आलं तिने तसाच तिचा हात हातात ठेवत डोळ्यांनी सांगितलं आपण मस्तच करणार आहोत काळजी नको करुस. स्मिता थोडी रिलॅक्स झाली. नाव पुकारले जाताच दोघीही स्टेजवर गेल्या म्युझिक सुरू झाले आणि अगदी स्टेज ओळखीचं असल्याप्रमाणे दोघींची पावले टाकली जाऊ लागली. हळूहळू गोष्ट पुढे सरकत गेली 15 मिनिटांचा तो परफॉर्मन्स जेंव्हा संपला तेंव्हा सगळं सभागृह उभं राहून टाळ्यांच्या गजरात त्यांना अभिवादन करत होतं. कौतुकाचा स्वीकार करत सगळ्या जणी जाऊन ठरलेल्या जागी बसल्या. मग कार्यक्रमाची प्रस्तावना सांगितली जाऊ लागली. 
तो कार्यक्रम आयोजित केला होता दुर्धर रोग, भयंकर अपघात ह्यातून बरच काही गमावूनही पुन्हा नव्या दृष्टीने आयुष्याकडे बघण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी. हा एक छोटासा क्लब होता जिथे अशा घटनांमधून जाणाऱ्या लोकांना वाईट मनस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी मदत केली जात असे. 
कारण कस असत न माणसाकडे जेव्हा सगळं काही असत तेंव्हा त्याला त्याची किंमत नसते पण जेव्हा एखादी घटना आयुष्यात अशी उलथापालथ घडवते तेंव्हा माणूस कोसळतो. तिथे त्याला सगळ्यात जास्त गरज असते ती मानसिक आधार आणि पाठिंब्याची. तोच देण्याचा प्रयत्न ह्या क्लबचे मेम्बर करत होते जे सर्व कधी न कधी त्यामधून गेले होते आणि काही जण जात होते. 
अशातच नेहाचं नाव घेतलं गेलं आणि तिला स्टेजवर बोलाविले गेले. सगळ्या जणी आश्चर्याने तिच्याकडे बघू लागल्या. हलकेसे हसत ती स्टेजवर गेली आणि जे बोलली त्यामुळे प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आलं. नेहा आणि तिची आई ह्या क्लबच्या सगळ्यात जुन्या सभासद होत्या. होत्या कारण नेहाची आई कॅन्सरशी लढा देत होती. त्याच ट्रीटमेंट च्या वेळी ह्या क्लबची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि मग हळूहळू समविचारी लोक जोडले गेले. नेहाची आई तर ह्या जगात नव्हती पण नेहा मात्र आईचं व्रत हसतखेळत पूर्ण करत होती. हसतखेळत अशासाठी कारण आई गेल्यानंतर काही दिवसातच नेहाचा भयानक अपघात झाला होता आणि त्यात तिचे दोन्ही पाय तिला गमवावे लागले होते. एकामागे एक धक्के कुणालाही मोडून गेले असते पण नेहा तिच्या आईची लेक होती. जिद्दीने ट्रिटमेंटला प्रतिसाद देत तिने कृत्रिम पायांच्या मदतीने सगळ्यावर मात केली होती. सतत सगळ्यांना हसवताना जगण्यासाठी बळ देताना कुणालाही तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागचे हे रहस्य कळत नसे. 
आज मात्र ते समोर आले तेंव्हा स्मिताला ही गोष्ट सगळ्यात जास्त जाणवली कारण खुश रहा ग अस सतत तिला नेहा सांगायची आणि स्मिताला मात्र आपले छोटे छोटे प्रॉब्लेम तिला ऐकवायचे असायचे. नेहाने नकळतच स्मिताला आयुष्यातील एक महत्वाचा धडा दिला होता तो म्हणजे आपल्याला देवाच्या कृपेने जे धडधाकट शरीर मिळाले आहे त्याचा आदर करत आनंदाने जगावं. 
म्हणतात न आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही न काही शिकवत असते त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून. बऱ्याचदा खूप कमी वेळासाठी आयुष्यात आलेली माणसं खूप छान अस काहीतरी मनावर उमटवून जातात. 
Temperory people teach permanent lessons. फक्त ही लेसन्स कोणती आहेत हे कळायला हवं. 
हा होता माझा स्वतःसाठी lesson म्हणजेच #Quote_of_the_day #गौरीहर्षल

सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

Quote of the day 7

Quote of the day 7

ऋतुजा 4 दिवसाच्या सुट्टीनंतर ऑफीसला आली होती. ती आली तसे सगळेच तिच्या आसपास गोळा झाले. कशी झाली ट्रिप वगैरे विचारू लागले. ऋतुजा अगदी मनमोकळी वागणारी आतलं बाहेरचं अस काही नसायचं तिचं त्यामुळे भरपूर मित्रमंडळी जमवलेली. आजही तेच झालं होतं ती आली तसे सगळे बोलण्यासाठी धावले. गर्दीच्या मागे कुणीतरी तिला बघत होते. तिचंही बोलता बोलता त्या व्यक्तीकडे लक्ष गेले. तो चेहरा बघताच ऋतुजाचा चेहरा पडला. कोण होती ती व्यक्ती???

ती होती नयन ऋतुजाची कॉलेजमधली मैत्रीण. ऋतुजा आणि नीरजा ही बेस्ट फ्रेंडची जोडी कॉलेजमध्ये फेमस होती. सगळ्या गोष्टी करताना दोघी सोबत अभ्यासातही आणि मस्ती करताना सुद्धा. अशातच सेकंड इयरला नयनची कॉलेजमध्ये एन्ट्री झाली नवीनच असल्याने ती फारशी कुणामध्ये मिसळत नव्हती. मग हळूहळू तिची ऋतुजा, निरजाशी ओळख झाली. त्याही ती एकटी पडू नये म्हणून मदत करायच्या. पण नयनला मात्र त्यांची मैत्री खटकू लागली होती. कारण तिला असं जिवाभावाचे कुणीच नव्हतं. नयन सतत त्या दोघींचं निरीक्षण करत असायची.काही दिवसांनी तिच्या लक्षात आलं की ऋतुजा बॅलन्सड आहे पण नीरजा मात्र जरा भोळसट आणि पटकन विश्वास टाकणारी आहे. मग नयनने निरजाबरोबर मैत्री वाढवणं सुरू केलं. तस ते फारसं सोपं नव्हतं पण कॉलेजमध्ये येण्याजण्याचा  दोघींचा रस्ता एकच असल्याने तिला तशी संधी मिळाली.  इकडच्या तिकडच्या गप्पा मारत तिने नीरजाला बोलतं करायला सुरुवात केली. मग त्यातून तिला एक नवीन माहिती मिळाली. नीरजाचा एक बालमित्र होता जो तिला आवडायचा त्यानेही तिला तस कबूल केलं होतं. पण शिक्षण पूर्ण होईपर्यंत घरी काही बोलायचं नाही असं त्यांनी ठरवल्याने दोघेही भेटणं बोलणं सगळं एका लिमिटपर्यंत करायचे.  त्या दोघांव्यतिरिक्त हे फक्त ऋतुजा ला माहीत होतं आणि आता नयनला. अशातच कॉलेजचं ते वर्ष संपत आलं. सगळे परीक्षा, अभ्यास ह्यामध्ये बिझी झाले. त्यांनतर मोठया सुट्ट्या असल्याने फिरायला जायचं अस ग्रुपमध्ये ठरलं ग्रुपमध्ये म्हणजे ह्या तिघी आणि निरजाचा मित्र आणि त्याचे काही मित्रमैत्रिणी. 8,10 जण झाले ट्रेकिंग वगैरे चा प्लॅन ठरला. 2 दिवसाचा. हो, नाही करत घरून परवानगी मिळवली आणि सगळे गेले. त्या दोन दिवसात नयनच्या वागण्याबद्दल काही गोष्टी ऋतुजाला खटकू लागल्या तसं तिने निरजाशी बोलून दाखवल पण अस काही नाही ग अस ती म्हणाली. पहिल्यांदा ऋतुजा ला जाणवलं की निरजाच्या मनात वेगळं काही सुरू आहे आणि ती ते मला कळू देत नाहीये. काय सुरू होतं निरजाच्या मनात??
 नयनने तिला सतत भरीला घालुन तिचं आणि अर्णवच नातं पुढे नेण्याबद्दल विचार करायला लावला होता. जेव्हा ती ऋतुजाला आवडणार नाही असलं काही अस म्हणाली तेंव्हा ऋतुजाला बॉयफ्रेंड नाही म्हणून ती जळते तुझ्यावर आणि म्हणून तुला पुढे जाऊ देत नाही असं सांगितलं. सतत हे बोललं गेल्याने निरजाचा तिच्यावर विश्वास बसत गेला. ती नकळतच ऋतुजापासून दूर होऊ लागली. आणि वेगळ्याच दृष्टीने तिला बघू लागली. अर्णव त्या दोघींचाही मित्र होता पण तो ऋतुजाला बहिणीच्या जागी बघतो हे नीरजा विसरली. 2 दिवसांनी सगळे परत आले. ऋतुजा ने निरजाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती आता तिला टाळू लागली होती. तिने अर्णवला सुद्धा सांगितले की आमच्या दोघींपैकी एकीला निवड. नयनसोबत फिरणं आता निरजाला आवडत होतं. तिच्या आणि अर्णव बद्दलच्या सगळ्या गोष्टी ती बिनधास्त नयनला सांगू लागली. अशातच कॉलेजमधल्या काही मैत्रिणी निरजाला एकदा भेटल्या. त्यातल्या एकीने सहज हसत हसत अर्णवचा उल्लेख करत तिला टोमणा मारला. तुम्हाला कस माहीत अस विचारल्यावर तुझ्याच बेस्ट फ़्रेंड ने सांगितलं अस म्हणत कुणाचंही नाव न घेता त्या निघून गेल्या. निरजाच्या डोक्यात फक्त ऋतुजा आली. ती तशीच तडक ऋतुजाकडे आली. तिला समोर बघताच ऋतुजाला खूप आनंद झाला. पण निरजाने मात्र पुढचा मागचा विचार न करता तिला धारेवर धरलं. ऋतुजाने शांतपणे तिला बोलू देत सगळं ऐकून घेतलं. मग ती तिला म्हणाली हे जे प्रसंग तू सांगितले ते जेव्हा घडले तेव्हा आपण संपर्कात होतो का??हा प्रश्न ऐकताच नीरजा पटकन खुर्चीवर बसली. तिला समजावत ऋतुजा पुढे म्हणाली मी तुला हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की तिच्यावर इतका विश्वास टाकू नकोस पण तुझ्या डोक्यावर संशयाचे भूत स्वार होते. असो झाले ते झाले  ह्या गोष्टींवर मी आणि अर्णवने आधीच विचार केला होता. हे सगळं बाहेरून घरी कळण्याआधी तो बोलणार आहे तू काळजी नको करुस. ऋतुजाचं बोलणं ऐकून निरजाच्या डोळ्यात पाणी आले,ती तिची माफी मागत गळ्यात पडून रडू लागली. तिला शांत करत ऋतुजा म्हणाली, वेडाबाई आता तरी शहाणी हो आणि लोकांवर लगेच विश्वास ठेवणार नाही असं ठरव. नीरजा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव ,
ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं, ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. #गौरीहर्षल
गोड बोलणारा प्रत्येक माणूस आपला हितचिंतक असतोच अस नाही. काही विघ्नसंतोषी असतात तर काही प्रत्येक गोष्टीत स्वतःचा काय फायदा होतो हे बघत असतात. अशी लोकं आपल्या वागण्याने समोरच्याला काय त्रास होईल ह्याचा विचार करत नाहीत. आपण मात्र सगळं गुपित उघड करून नंतर पश्चाताप करत बसतो. म्हणूनच आपल्याला इतरांबद्दल काय वाटत , चांगलं की वाईट हे फक्त आणि फक्त योग्य व्यक्तीशी बोलावं जो खरंच आपला जवळचा आहे. नाही तर सरळ गप्प बसावं. बाकी ज्याचा त्याचा प्रश्न.  

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

Quote of the day 6

#Quote_of_the_day6

सारिकाच्या लग्नाला 5 वर्षं झाली होती. त्या निमित्ताने घरातच पूजा आणि छोटंसं गेट टुगेदर करावं असं तिने आणि तिच्या नवऱ्याने सचिन ने ठरवलं. त्यानुसार एक छान सोयीचा मुहूर्त निवडत तयारी सुरू झाली. हवापालट म्हणून गावी  गेलेल्या माई आणि आबांना आणण्यासाठी गाडीही दुसऱ्या दिवशी जाणार असल्याचे ठरले. माई आबा म्हणजे सचिनचे आईवडील. गावी सचिनचा भाऊ सुरेश त्याची पत्नी  सुनीता आणि मुलगा राहत होते. गावी राहणं हा त्या दोघांचा निर्णय होता कारण तिथे राहून काहीतरी करावं अशी सगळ्यांचीच इच्छा होती. त्यात सुनीतालाही तिथलं वातावरण आवडल्याने तिने तिथंच राहू अस ठरवलं. त्या हेतूने गावाकडच्या घरातही सगळ्या सोयीसुविधा करून घेतल्या गेल्या. सचिन आणि सुरेशला एक बहीण ही होती सपना तिचं लग्न जवळच्या गावातच झालं होतं पण ते नवराबायको नोकरीनिमित्त वेगळ्या शहरात होते आणि सासुसासरे गावी असायचे.  असा आपापल्या विश्वात रमलेल्या तरीही जिवलगांचा हा गोतावळा सुखी होता.  गेट टूगेदरच्या निमित्ताने सगळेच सचिन-सारिका कडे जमले होते.
 ह्या सगळ्यात अजून एक व्यक्ती ही आपल्या कुटुंबासह सहभागी झाली होती. ती म्हणजे सपनाची जाऊ रेश्मा. ती तिच्या मुलांसह आणि नवऱ्यासह आदल्या दिवशीच आली होती. सपना आपल्या माहेरच्या शिकवणुकी मुळे आणि आपल्या दोन्ही भाऊ वहिनीच्या तालमीत नाती जोडायला शिकली होती. ह्या सगळ्यामुळे ती लांब रहात असूनही सासुसासरे तिचं कौतुक करत असत. रेश्माही लांबच होती पण गावातच आणि भांडून वेगळी झालेली त्यामुळे थोडासा मनाने दुरावा होताच. सपनाच्या कौतुकाने रेश्माला खूप त्रास होऊ लागला आपण तसे वागू शकत नाही हे तिला चांगलं माहीत होतं. मग आता काय सतत संधी मिळाली की सपनाला टोचुन बोलणं , अपमान करणं सुरू झाले. सुरुवातीला सपनाने दुर्लक्ष केलं. पण हळूहळू त्रास देण्याचं प्रमाण वाढलं तसं कुणाशीच बोलत नसल्याने सपना आतूनच खंगु लागली. त्याचा तिच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ लागला. 
आज समोर आलेल्या सपनाला बघताच सारिका आणि सुनीता दोघींनाही काहीतरी गडबड आहे हे कळलं. पूजा वगैरे आटोपल्यावर सगळे निघाले तसे त्या दोघींनि आग्रह करून आराम करण्यासाठी म्हणून सपनाला ठेवून घेतले. वेळ मिळताच दोघीही सपनाशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागल्या. आणि हळूहळू काय होतंय हे ही काढून घेतले. मुद्दा लक्षात येताच त्यांनी आधी सपनाला रडून मोकळे होऊ दिले. मग कुठल्याही परिस्थितीत माहेरचे सगळे तुझ्या बाजूने असतील हे सांगितलं. सपना थोडी स्थिर झाली. मग सारिका तिला म्हणाली की हे बघ सपना आपली चूक नसताना तू हे सगळं सहन केलं हे तुझं चुकलंच. मान्य आहे ती मोठी आहे पण तुझा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तू वेळीच गोष्टी सासुसासर्यांना , नवऱ्याला नाही तर आम्हाला तरी सांगायच्या होत्या. असो आता जे झालं ते तर आपण बदलू शकत नाही पण इथून पुढे जशास तसे उत्तर न घाबरता दे. आणि सगळ्यात आधी तिच्या आरशात स्वतःला बघणं बंद कर. ती जे करते वागते ते तिचं प्रतिबिंब आहे तुझं नाही. तू जशी आहेस तशीच सगळ्यांना आवडतेस अगदी तुला स्वतःलाही. नवीन नाती जोडून ठेवताना स्वतःलाही जपायला शिक.  आयुष्यात अशी खूप लोकं भेटतील जी तू कशी आहेस हे तुलाच सांगायचा प्रयत्न करतील. पण तुला स्वतःला माहीत आहे न तू कशी आहेस मग बास त्यावर विश्वास ठेव. आणि इतरांच्या वाईट वागण्याचा परिणाम तुझ्या आरोग्यावर नको करून घेऊ. नाहीतर येणाऱ्या बाळाचं काय होईल हळूच हसत सुनीता म्हणाली. सपनाने चमकून दोघींकडे बघितलं तशा त्या म्हणे लाडकी आहेस तू आमची आम्हाला तुला बघतानाच जाणवलं होतं म्हणून तर तुला ठेवून घेतलं. आता 7,8 दिवस मस्त लाड करून घे मग जा तुझ्या काळजीवाहू नवऱ्याकडे. तिघीही समाधानाने हसू लागल्या. 
आपल्या बद्दल जेंव्हा कुणी काही बोलत तेंव्हा बऱ्याचदा आपण स्वतःला दोष देऊ लागतो. स्वतःवर बोट ठेवतो. पण अस करण्याआधी हा विचार करत नाही की अरे माझ्यासोबत माझ्याशिवाय जास्त वेळ कुणीही घालवलेला नाहीये. म्हणजे हे म्हणतात तशी मी नक्कीच नाहीये.  लोकं नकळतच आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आपण स्वतः कसे आहोत हे दाखवत असतात. त्याचं योग्य निरीक्षण करायचं आणि आपण कसे होऊ नये हे ठरवायचं😜  After all, 
The way people treat you is a statement about who they are as a human being. It is not a statement about you. #गौरीहर्षल

कसा वाटला हा #Quote_of_the_day नक्की सांगा ?? थॅंक्यु ❤️❤️

Quote of the day 5

#Quote_of_the_day5

रचना एक खूप चुणचुणीत चटकन कुणाच्याही नजरेत येईल अशी गोड मुलगी. धाकटी असल्याने सगळ्यांची आवडती. जितकी घरच्यासमोर साधी तितकीच बाहेर त्या उलट असे. पण स्वतःच्या मर्यादा तिने आखून घेतलेल्या असल्याने घरचे कधीही तिला कशासाठी अडवत नव्हते. नुकतंच तिने शिक्षण पूर्ण केलं होतं आणि आता नव्यानेच नोकरीही हातात आली होती. सुरुवातीचे दिवस असल्याने घरून एक दोन महिने पगार हवा तसा वापरायची तिला परवानगी होती. मग काय मस्त मज्जा करणं सुरू होतं. पण त्यातही ती घरच्यांना विसरली नव्हती पहिल्या पगारात सगळ्यांना आवडतील असे सरप्राईज दिले होते तिने ह्या कृतीमुळे आईबाबांना आपल्या मुलीबद्दल असलेली खात्री अजूनच पक्की झाली होती. मित्रही भरपूर होते तसे तिला पण घरचं वातावरण मोकळं असल्याने घरी सर्व माहिती असे. हल्लीच मात्र मित्रमंडळी मध्ये एक नवीन चेहरा सतत दिसू लागला होता. तो होता समीर रचनाचा कलीग समवयस्क असल्याने तो त्यांच्या ग्रुपमध्ये कधी मिसळला कुणाला कळलंच नाही. हळूहळू रचना आणि समीरची फक्त मैत्री नसून पुढे काहीतरी आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले होते. तसे आडून आडून सगळे छेडतही असत. पण अजून त्या दोघांनी काही मान्य केलं नव्हतं. विशेष म्हणजे रचनाला काही गोष्टी आधीच स्पष्ट करायच्या असल्याने ती तटस्थपणे स्वतःच्या भावना बघत होती. समीरबद्दल फक्त जुजबी माहिती तिच्याकडे होती त्याच्या घरचे, मित्रमंडळी बाकी गोष्टी त्याने कधी स्वतःहून सांगितल्या नव्हत्या. आणि विचारलं तर तो टाळतो हे तिला समजलं होतं. मग ह्यावर उपाय म्हणून तिनेच तिच्या जवळच्या एक दोन मित्रांना आणि भावाला विश्वासात घेत सगळं सांगितलं पण पुढे जाण्याआधी मला समीरबद्दल सगळं जाणून घेण्यासाठी मदत करा असंही ती म्हणाली. मग हळूहळू सगळे आपापल्या परीने कामाला लागले. समीरची फॅमिली कुठे असते , काय करते शोधू लागले. ह्या सगळ्या शोधमोहीमेत फार अविश्वसनीय माहिती मिळाली. इकडे समीरला ह्या सगळ्याची कल्पना नव्हती. त्यामुळे तो रचनाला कस प्रपोज करावं ह्या विचारात होता.  खरी माहिती मिळाल्यावर रचनाला खूप धक्का बसला पण वेळीच सगळं कळलं म्हणून तिला बरं वाटलं. समीरने आपल्या नावासह सगळी ओळख बदलण्याचा प्रयत्न केला होता. पण म्हणतात न सत्य बाहेर येतंच. त्याच्या घरचं गुंडगिरी असणार वातावरण, ज्यात समीर ही सहभागी होता. तो नसता तर कदाचित वेगळा विचार करता आला असता. पण हळूहळू त्या गोष्टींची खोली लक्षात आल्याने रचनाला तिच्या भावाने सावध केले. पण तिचं आधीच ठरलेलं होतं  त्यामुळे समीर जेंव्हा तिला प्रपोज करेल अस वाटू लागलं. त्या आधीच बाबांनी आणलेल्या मुलाशीच आपण लग्न करणार अस म्हणत तिने स्वतःच्या भावना प्रॅक्टिकली हाताळल्या. जे प्रचंड गरजेचे होते. ह्या सगळ्यात तिलाही भरपूर त्रास झाला कारण ती तिच्या पातळीवर त्याच्यात गुंतली होती पण समजूतदार कुटुंब पाठीशी असल्याने तिला फायदा झाला. समीरला वेळीच हिंट मिळाल्याने तो मागे फिरला. अर्थात अपवाद ठरला.  
इथं ही कथा आहे पण प्रत्यक्षात अशी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येतात ज्यांच्या आपल्या आयुष्यात असल्याने आपण प्रचंड भावनिक उलथापालथ अनुभवत असतो. वेगवेगळ्या नात्यांच्या रूपाने भेटणाऱ्या अशा लोकांमुळे आपलं आयुष्य डिस्टर्ब होत असत. अशा लोकांना योग्य वेळी योग्य पद्धतीने हाताळून एक अंतर ठेवून वागायला शिकावं लागतं. नाही तर त्रास होणारच. कधी कधी तर काही लोकांना दूरही करावं लागतं. कुणी आपला फायदा उचलत असतं, कुणी उगाच demotivate करत असत. पण आपण जर स्वतःला स्वतःची पहिली priority ठरवलं न तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आधी करू लागतो. मग आपलं सुखदुःख, आनंद, यशापयश हे इतरांची नाही आपली जबाबदारी होतात. आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदाही आपल्यालाच होतो. 
हा #Quote_of_the_day ही असच काही सांगतो, बघा पटतंय का ??     #गौरीहर्षल
Not everyone you loose is a loss. 

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

Quote of the day 4

#Quote_of_the_day4

मैथिली एका छोट्या सोसायटी मध्ये राहत होती. पंचकोनी कुटुंब सासुसासरे, मैथिली ,तिचा नवरा अमेय आणि मुलगी इरा. नणंद त्याच गावात पण तिच्या सासरी होती. ओव्हर ऑल बाहेरून बघताना एक छान हसतखेळत जगणार कुटुंब. ह्या जागी 2bhk फ्लॅट घेऊन नव्यानेच ते शिफ्ट झाले होते. हळूहळू तिथलं वातावरण , शेजार ह्यांच्याशी ताळमेळ जुळवण्याचा प्रयत्न सुरू होता. नवराबायको दोघेही काळाची गरज असल्याने नोकरी करणारे त्यामुळे ओघाने मुलीची थोडीशी जबाबदारी आजीआजोबांवर यायची. घरोघरी मातीच्या चुली ह्या नियमाला हे घरही अपवाद नव्हतं पण अमेयच्या वडिलांची शिकवण होती जे काही वाद असतील ते घरातच मिटवायचे. बाहेरच्या कुणालाही त्याची पुसट कल्पना सुध्दा नको. त्यामुळे फारसे विकोपाला जाणारे वाद होत नसतं. आता हल्ली टीव्हीवर असणाऱ्या सासुसुनांची कृपा की लोकांना कुठेही आसपास हसून खेळून राहणारी जोडी दिसली की ते डोकावतात. हे सगळं इतकं छान कसं???असाच प्रकार ह्या कुटुंबाबाबतही होऊ लागला. शेजारच्या पाटील काकूंना जरा जास्तच कुतुहल होतं की सून घरी नसते तर सासू काहीच चिडचिड का करत नाही? मग आपल्या रिकाम्या डोक्याचा काय उपयोग असा विचार करत त्यांनी हळूहळू सासुशी मैत्री वाढवली. पण तरीही काही हाताला लागेना. कारण घरचा नियम सगळे मनापासून पाळत असत. मग पाटीलकाकूंनी दुसरं अस्त्र वापरले त्या आपल्या सुनेच्या कागळ्या करू लागल्या जेणेकरून तरी मैथिलीच्या सासूबाई काहीतरी बोलतील पण पुन्हा तेच. उलट त्या पाटील काकूंनाच थोडस जुळवून घेण्याचा सल्ला देऊ लागल्या. हेही फेल म्हटल्यावर आता पाटील काकू नेहमीच्या ग्रुपकडे वळल्या आणि मैथिलीच्या कुटुंबाबद्दल उलटसुलट बोलू लागल्या जे की सर्व  मनानेच तयार केले होते. हे सगळे मैथिलीच्या घरच्यांना तेव्हा कळले जेंव्हा पाटील काकूंच्या मुलाने त्याला विचारलं की घरात इतके प्रॉब्लेम सुरू आहेत तर तू वेगळा का नाही राहत?? अचानक आलेल्या या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे अमेयला सुचेना पण त्याने अरे इतकं तर सगळ्याच घरात होतं वेळ दिला की सुटेल गुंता अस म्हणत वेळ मारून नेली. 
घरी आल्यावर मात्र त्याने जेवल्यानंतर सगळ्यांशी बोलायचं आहे असं सांगितलं. जेवण झाल्यावर इराला झोपवून सगळे हॉलमध्ये जमले. अमेयने आपला अनुभव सांगितला तसाच अनुभव आपल्याला आल्याचे त्याच्या बाबानी पण सांगितले. 
आई आणि मैथिलीच्या मात्र लक्षात हा प्रकार आला. आणि मग सगळं काही त्यांनी त्या दोघांना सांगितलं. लोकांना हल्लीच्या बिझी आयुष्यात दुसऱ्यांच्या घरात काय वाईट घडत आहे ह्यात इतका रस का आहे हे त्यांना कळेचना. ह्या वर उपाय एकच होता सगळ्यांशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवणे आणि आपल्या वागण्यातून घरात सगळं नीटच आहे हे लोकांना पटवणे. 
दुसऱ्याच दिवशी ठरवलेल्या पद्धतीने वागायला सर्वांनी सुरुवात केली. ऑफिसला जाताना मैथिलीला मुद्दाम थांबवत आई किंवा बाबा डबा आणून देत मग ती हसून त्यांचा निरोप घेई. अमेय आईबाबांसोबत जास्त वेळ घालवू लागला. ह्या कामात तिच्या नणंदेनेही मदत केली सुट्टीच्या दिवशी ती तिच्या नवरामुलांसह  येई दिवसभर गप्पाटप्पा , खाणे ह्याने घर नुसते भरून जाई. सलग दोन महिने अशा काही छोट्या छोट्या गोष्टी इतरांच्या लक्षात येत आहेत अशा करत त्यांनी चर्चेला पूर्णविराम दिला खरा पण ह्यावेळी एक नवीनच प्रश्न समोरून आला इतकं सगळं चांगलं कसं?😂😂 ह्या प्रश्नांनी सगळ्यांची हसून हसून पुरेवाट लागली. पण एक गोष्ट चांगली घडली ती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं नातं अजूनच घट्ट झालं. ते सगळे कुटुंब म्हणून अजून जवळ आले. आणि सगळ्यांना हेही लक्षात आलं की लोक बोलणारच आपण मात्र आपलं आयुष्य जगत राहायचं आनंदाने. 
तात्पर्य हेच की आपण कसेही असु समाज मात्र त्याने लावलेल्या चष्म्यातूनच आपल्याकडे बघत असतो. आपलं वाईट होत असेल तर फुकटचे सल्ले देतो आणि चांगलं होत असेल तर बोटं मोडतो. ह्या सगळ्यांवर एकच उपाय असतो तो म्हणजे आपल्या छोट्याशा  विश्वात एकमेकांना समजून घेणे, विश्वास ठेवणे आणि मुख्य म्हणजे आहे त्या क्षणांना भरभरून जगणे. आहे त्या परिस्थितीतही समोरचा आनंदी कसा काय हे लोकांना जास्त कोड्यात पाडते. कुणी आपलं घर तोडण्यासाठी, नात्यात दुरावा आणण्यासाठी प्रयत्न करत असेल तर ते वेळीच ओळखून आपलं नातं घट्ट व्हावं म्हणून आपण प्रयत्न करावेत जे त्या व्यक्तीला जागेवर आणतील. आपण नेहमी रागाच्या भरात म्हणत असतो की हिने / ह्याने माझं वाईट केलं मी पण त्याच करणार पण हा #Quote_of_the_day काय सांगतो बघा तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. #गौरीहर्षल
The best revenge is happiness, because nothing drive's people more crazy than seeing someone actually living a good life. 

Quote of the day 3

#Quote_of_the_day3
हवीहवीशी_तुलना
शीर्षक जरा विचित्रच आहे न? गोष्टही अशीच आहे विचित्र पण सगळ्यांच्या ओळखीची. गोष्ट म्हणण्यापेक्षा किस्से म्हणूयात. किस्से आपले, आपल्या मनात लपलेले. आपण आपल्या दिसण्यापासून ते वागणं , बोलणं, खाणं पिणं सगळ्याच बाबतीत जास्त जागरूक असतो. कुठे एखादी आकर्षक व्यक्ती दिसली की नकळतपणे आपण स्वतःची तुलना तिच्याशी करू लागतो. कधी कधी ह्या तुलनेमुळे स्वतःला त्रासही होतोय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. काही लोक तर अस कुणी भेटलं तर त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी आणि ती टिकविण्यासाठी नको तेवढे बदल स्वतःमध्ये करायला सुरुवात करतात. ह्या सगळ्या धावपळीत आपण खरे कसे आहोत हेच विसरतात. 
फेसबुकमुळे एक गोष्ट चांगली होते ती म्हणजे आपल्याच जुन्या आठवणी बघून आपण किती घडलो आहोत हे कळतं. तसे आपण बदलतच असतो अगदी दररोज. पण अट्टहासाने दुसऱ्यासारखं होण्यासाठी केलेले बदल कुठेतरी मनाला पटत नसतात. जी खूप जवळची आणि जेन्युईन लोकं असतात ती आडून आडून आपल्याला हे सुचवतात सुद्धा पण डोळ्यावर पट्टी असते न. आरशात बघताना नकळतच हे आपल्याला जाणवतं सुद्धा की आपण हे नाही आहोत पण मान्य कोण करणार??? असो
तुलना करणं हा मानवी स्वभाव आहे. पण तुलना कुणाशी , कधी कुठे करावी ह्याचं भान बाळगणं प्रचंड गरजेचं असतं. Just because आपल्या आसपास कुणीतरी  वेगळ्या लाइफस्टाइलने जगणारी व्यक्ती आली आहे.आणि मग तिला दाखविण्यासाठी मी पण तसच करणार , तसच वागणार हा अट्टहास का? ती व्यक्ती, तिच्या जगण्याच्या पद्धती, त्या मागची खरी खोटी कारण आपल्याला माहीत असतात का नाही ना?? मग आपण जसे आहोत तेही त्या व्यक्तीलाही माहिती नसतं. 

एक छोटीशी गोष्ट आठवली इथे रमा आणि रीमा एकमेकींच्या शेजारणी झाल्या होत्या नव्यानेच. रमा अगदी सालस , सोज्वळ वगैरे टाइप तर रीमा मॉडर्न. पहिल्या भेटीनंतर रमा विचार करू लागली की मी किती गावंढळ दिसते रोज अगदी घरच्या कपड्यात असते. माझं राहणीमान पण आकर्षक नाही. त्यावरून एक दोन वेळा ती नवऱ्याला बोलली सुद्धा की तुम्हाला मी अशी राहते म्हणून आवडत नाही का?? नवरा दोन मिनिटे शांत झाला मग बोलला मी तुझ्या साध्या सरळ स्वभावाला आणि राहण्याला बघूनच तुझ्या प्रेमात पडलो होतो. आणि कितीही वर्ष झाली तरी त्यात बदल होणार नाही. पण जर तुला स्वतःहून स्वतःसाठी काही करायचं असेल तर मी तुझ्यासोबत नेहमीच असेन. क्षणभरच रमाला बरं वाटलं पण लगेच मॉडर्न रीमा आणि तिच्याबद्दल सगळीकडे होणारी चर्चा आठवली. दुसरीकडे रीमा होती जिच्याबद्दल इतकी चर्चा सुरू असताना तिला मात्र तिच्या घर आणि नोकरी चक्रातून वेळच मिळत नसे. पण जेव्हा जेव्हा ती रमाला बघे तिला वाटायचं की किती छान आहे न ही, कधी काळी मीही अशीच होते. पण नोकरी करणं ही गरज झाल्याने स्वतःत बदल घडवले आणि स्वतःला हरवून बसले. 
अशा ह्या रमा आणि रिमा ची एका कार्यक्रमात भेट होते. हळूहळू अवघडलेपण जात मस्त गप्पा मारतात दोघीही. एकमेकींबद्दल काय वाटतं हे जेव्हा त्या ऐकतात तेंव्हा दोघींनाही पटत की आपल्याला जे हवंय ते आपल्याकडेच आहे. आपण जर स्वतःला स्वतःहून स्वीकारलं तरच आपण स्वतःला आवडू शकतो. मग एकमेकींच्या मदतीने स्वतःतल्या हरवलेल्या तिला शोधण्याचा प्रयत्न करायचा अस ठरवत त्या एकमेकिंचा निरोप घेतात. 
हे लिहिण्याचं प्रयोजन इतकंच की स्वतःमध्ये बदल घडवताना स्वतःला काय आवडत पटत,रुचतं आणि शोभत हे लक्षात घेऊन बदल घडवले तर व्यक्तिमत्व खुलून येतं आणि ते चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं. 
तुलनाही करावी पण ती फक्त स्वतःशीच. आपल्या जुन्या आणि नव्या व्हर्जन मध्ये. मग आपल्याच लक्षात येईल नेमकं काय बदलल तर आपल्याला आपण सापडू? स्वतःला स्वतःचा शोध लागणं गरजेचं आहे. नाहीतर सोशल मीडियाच्या चकचकीत रूपाने आपण कधी हरवू कळणारही नाही. 
मॉडर्न होण्यापेक्षा क्लासी होणं जास्त योग्य. हो पण आपल्याकडे मॉडर्न किंवा क्लासि फक्त कपड्यांनीच होता येतं असा गोड गैरसमज आहे. प्रत्यक्षात खऱ्या जगात मात्र आपले विचारच आपली परिपक्वता दाखवतात आणि कपडे कसेही असले तरी आपल खरं रूप समोर येतं.
So try to be unique not copy of someone else. 

Compare yourself only to who you were yesterday. Be your own competition.

हाच होता आजचा #Quote_of_the_day. #गौरीहर्षल

Quote of the day 2

#Quote_of_the_day2

प्रतिक्षा आणि तिच्या जिवलग मैत्रिणीचं दिक्षा च एकत्रच पण वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पस सिलेक्शन झालं होतं. प्रतिक्षाला नव्याने मार्केटमध्ये आलेल्या एका ठिकाणी नोकरी मिळाली तर दिक्षाच मात्र एका मोठ्या कम्पनीत सिलेक्शन झालं. पगार दोघींना जवळपास सारखाच होता पण प्रतीक्षा मात्र नाराज झाली. अर्थातच कारण योग्य होत तिच्या दृष्टीने. हळूहळू दोघीही कामाच्या ठिकाणी रुळू लागल्या. दीक्षा जिथे होती तिथे कामाचे स्वरूप आणि नियम ठराविक होते आणि ते तसेच असावे असासुध्दा नियम होता. त्याउलट प्रतिक्षाच्या कंपनीत मात्र नवनवीन प्रयोग , कल्पना मांडणे , चर्चा करणे व्हायचे. कामाची पद्धत प्रतिक्षाला  सुरुवातीला कळतच नसे. कारण वर्षानुवर्षे आजूबाजूला सगळ्यांना एका साच्यातच काम करताना बघितलं होतं. पण जसजसा वेळ गेला तिलाही वेगळ्या पद्धतीने विचार करणं, तो ठामपणे मांडणं जमू लागलं. खरं तर सिलेक्शन च्या वेळी ग्रुप डिस्कशन मध्ये  तिला हिरीरीने बोलताना बघूनच तिचं सिलेक्शन झालं होतं. इथे फक्त एकच केलं जातं होत की एखाद्या महिन्याचा वेळ प्रत्येक एम्प्लॉयीला न सांगता दिला जात असे. ह्या महिन्यात ती व्यक्ती काम कस करतेय, की फक्त सांगेल तेवढंच करतेय , आऊट ऑफ द बॉक्स आहे का हे निरीक्षण करून मगच लेटर हातात मिळे. अर्थात ही कल्पना आधी दिलेली असायची की आमच्या पद्धतीत, विचारसरणी मध्ये तुम्ही फिट असाल तर आम्ही तुम्हाला कंटीन्यु करू. 
प्रतीक्षा हळूहळू सगळं एन्जॉय करत काम करू लागली. एक दिवस तिची आणि दिक्षा ची भेट झाली. दिक्षा रुटीनला खूप वैतागली होती. तिचं सगळं ऐकून प्रतीक्षा घरी आली तेच विचारांच्या नादात. तिच्या बाबांनी तिला थांबवत विचारलं तेव्हा ती म्हणाली की तिलाही आधी वाटलं होतं आपल्याला तिथे जॉब का नाही मिळाला. पण आता अस वाटतय की जे आहे ते खूप छान आहे. मी बरच काही शिकते आहे स्वतःला डेव्हलप करतेय. हे त्या ठिकाणी कदाचित शक्य झालं नसतं. मग तिचे बाबा हसून तिला म्हणाले की मी तुला हेच समजावून सांगत होतो की आत्ता जिथे आहेस तिथून पुढे जायचं आहे हे नक्की. पण त्यासाठी आत्ता जे समोर आले आहे ते नको नाकारू. 
Appreciate where you are in your journey even if it's not where you want to be.  Every season serves a purpose.
एक दिवस नक्की तू तुला हव्या असलेल्या ठिकाणी असशील पण त्यासाठी प्रवासातला प्रत्येक प्रसंग, ठिकाण काय शिकवत आहे त्याकडे लक्ष दे. त्या गोष्टींचा भविष्यात उपयोग नक्कीच होईल. 
आपण खऱ्या आयुष्यात पण असेच वागतो बऱ्याचदा आपल्याकडे जे असतं, आपण जिथे असतो त्या गोष्टीची किंमत नसते आपल्याला. उलट समोरच्या कडे असणाऱ्या गोष्टी आपल्याकडे का नाही म्हणून आपण हळहळत बसतो.  Every season serves a purpose , फक्त तो हेतू ओळखून स्वतःला ग्रुम करणं जमायला हवं. आपली लेटेस्ट फेज कोणती का असेना मग विद्यार्थी, शिक्षक, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी.  आताच्या परिस्थितीत जर बदल घडवून आणायचा असेल तर त्या परिस्थितीला स्वीकारून आवश्यक ते बदल करायला हवेत. हाच होता आजचा #Quote_of_the_day❤️❤️ #गौरीहर्षल