रविवार, ९ जुलै, २०१७

मुड्स

#सुप्रभात_स.न.वि.वि.
#मूड
सकाळी सकाळी मस्त सूर्यप्रकाश आहे आभाळही मोकळं आहे असं वातावरण असलं की किती छान वाटत राहतं न दिवसभर??? मूड बन जाता है अगदीच!!! आणि मग पुढचा सगळा दिवस एकदम झकास जाणार याची मनाला खात्री वाटते.
       या मुड्स वर आपलं आयुष्य किती अवलंबून असत ना? कुणाच्या तरी छानशा बोलण्यानेही आपला मूड एक लय पकडतो. ती लय मग पुढे हातात येणाऱ्या सगळ्या कामांवर आपला चांगला प्रभाव पाडत राहते.
     नकळतच होणाऱ्या कृतीने जर इतकं चांगलं होत असेल, तर जाणूनबुजून मूड का नाही सांभाळत आपण ?  खूप लांब जायची काही गरज नाही स्वतःपासूनच सुरुवात करायची. सकाळी उठल्यावर इतर कुणाला गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा स्वतःच स्वतःला म्हणायचं तेही एकदम प्रेमाने. हो आपण इतरांचे मूड सांभाळताना कसे प्रेमाने वागतो मग स्वतःशीही तसच वागायला हवं की नई? स्वतःच स्वतःला आवडतील रुचतील आणि विशेष म्हणजे ज्यामुळे आपलं शरीर, मन प्रसन्न राहील अशा गोष्टींचा आनंद घ्यायचा. अगदी मनापासून जर आपल्याला छानसे बदल घडवून आणायचे असतील तर एवढं तर करायलाच हवं ना?  मुड्स मुळे आपण नाही नाचायचं तर मुड्स ना नाचवायचं. यासाठी फक्त स्वतःवर प्रेम करत असतानाच स्वतःला थोडासा आदर देण्याची गरज असते. आयुष्यात चढउतार तर येतच असतात पण त्यामुळे आपण बऱ्याचदा स्वतःला हरवत असतो. आपले धावपळ करणारे मुड्स तेच तर आपल्याला सुचवत असतात, की बाबा रे तू आम्हाला सांभाळ नाहीतर आम्ही तुम्हाला सळो की पळो करू 😉😙
मग मी तर प्रयत्न करतेय स्वतः मुड्स बदलण्याचा तुम्ही???
#गौरीहर्षल
१०.७.२०१७

शनिवार, ८ जुलै, २०१७

गुरुपौर्णिमा

#गुरुपौर्णिमा
आज गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपोर्णिमा. आपण आईच्या गर्भात असल्यापासूनच शिकत असतो असे म्हटले जाते. त्या अर्थाने आई ही आपली पहिली गुरू. पुढे आयुष्यात शिक्षण, नोकरी, आवडीनिवडीचं क्षेत्र अशा अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे गुरू भेटतच असतात. ते आपलं आयुष्य घडवताना खूप मोलाची जबाबदारीही उचलतात. आपल्यापैकी बरेच जण आजच्या दिवशी ह्या आपल्या सगळ्या गुरूंची कदाचित आठवणही काढत असतील कदाचित कृतज्ञता ही व्यक्त करत असतील. पण आपण गुरुपौर्णिमा फक्त एक सण म्हणून साजरी तर करत नाही न हेही बघायला हवं. आपले आईवडील, गुरू हे जसे सदैव आपल्या चांगल्याचाच विचार करत असतात तसंच आपणही इतरांच्या बाबतीत करतो का?
    गुरुपौर्णिमा त्या दिवशी खऱ्या अर्थाने सफल होईल ज्या दिवशी आपण आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून चांगला गुण घेऊनही अहंकार बाळगणार नाही. आणि आपल्याकडे आधीपासूनच असणारं ज्ञान ज्यांना खूप गरज असते अशांपर्यंत कुठलाही गवगवा न करता पोचवू. तरच आपल्या गुरूंनी आपल्यावर केलेले संस्कार आपल्याला समजले असं म्हणता येईल.
तर या गुरुपौर्णिमेला एक छोटासा संकल्प करू.......प्रत्येकाला स्वतःहून मदत करण्याचा आणि प्रत्यक्ष कृतीतून आपल्या गुरूंना वंदन करण्याचा. ही कृती प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते बर का!! मीही प्रयत्न करणारच आहे तुम्हीही बघा जमतंय का.....
       आजच्या गुरुपौर्णिमेला प्रत्येकाला एक तरी क्षण चांगली कृती करण्याची संधी देणारा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु 🙏🙏 शुभं भवतु!!!!
#गौरीहर्षल
९.७.२०१७

थँक यु

#थँक यु
सकाळी सकाळी येणाऱ्या सूर्याच्या किरणाने सगळी पृथ्वी नुसती न्हाऊन निघत नाही तर जणू काही प्रभावित होते. सूर्याचं आगमन सगळ्यांमध्ये चैतन्य आणि उत्साह भरतं.  आपल्या आयुष्यात अशीच अनेक माणसं येत असतात. त्यांचा प्रभाव आपलं आयुष्य घडवत असतो. आपले आईवडील, गुरू, मित्र , नातेवाईक, शेजारी सगळेच त्यांच्या परीने आणि पद्धतीने आपल्या जडणघडणीत सहभागी असतात. यापैकी कुणाचा प्रभाव आनंददायक असतो कुणाचा नसतो. पण दोनहीं प्रसंगात आपल्याला काही न काही शिकायला मिळतच. नकळतच आपण कुणाकडून एखादी गोष्ट कशी करावी हे शिकतो तर कुणी जाणूनबुजून कसं वागू नये हे स्वतःच्या कृतीतून शिकवत असतं. आपल्याला गरज असते ती सजग आणि स्वच्छ नजरेने सगळं बघण्याची.  फक्त माणसाचं नाही तर निसर्गही आपल्याला शिकवत असतो. निरपेक्ष वृत्तीने देत राहावं हे आपल्याला तो शिकवतो. प्राणीही न बोलता खूप काही शिकवत असतात. जमतं का पण आपल्याला सगळ्यांकडून सगळं घेणं??? नाहीच जमत सगळं घेणं पण त्यातलं थोडं जरी घेता आलं तरी पुरतं आयुष्यभर.
मग आता या विकएंड ला जरा आळस झटकून खऱ्याखुऱ्या प्रभावी गुरूंना शोधू ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य सुकर आणि सोप्प झालं आहे. शोधून काय करायचं तर फक्त छानसं स्माइल आणि २ शब्द थँक यु / धन्यवाद म्हणून ती कृतज्ञता व्यक्त करू. एक अजून एक गोष्ट करता येईल ती म्हणजे त्या व्यक्तीचा एक चांगला गुण टिपून तो नक्की वापरण्याचा प्रयत्न करायचा. मी पण प्रयत्न करणार आहेच तुम्हीही बघा जमतंय का ??
प्रत्येकाला आज एक तरी क्षण प्रयत्नांना यश देणारा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
८.७.२०१७

शुक्रवार, ७ जुलै, २०१७

जाणीव

#जाणीव
सकाळी सकाळी लगबगीने सूर्य किरणांना पसरवत जाणीव करून देत असतो नवा दिवस उगवल्याची. नव्या दिवसासोबत नवी पहाट, नवी स्वप्न घेऊन जगा असंच तर सांगत नसतो ना? पण आपल्याला होते का खरंच जाणीव? आपलं आयुष्य रसरशीत आहे अशी. बऱ्याचदा उगाच आपण नको त्या दुःखांना कवटाळून समोर आलेले सुरेख क्षण वाया घालवतो.
जाणीव असायला हवी स्वतःच्या जिवंत असण्याची, चांगलं वागण्याची. फक्त रुटीन फॉलो करण्यापेक्षा त्यात एक उत्स्फूर्तता भरण्याची जाणीव . ती कशी समोर येणार काम, व्यक्ती आपल्या आवडीची असो व नसो आपल्याला आपलं काम इमानेइतबारे करायचं आहे. कुठलं काम ? छानसा प्रतिसाद देत संवाद सुरू करण्याचं. मनात कितीही कटुता असली तरी आपल्या आवडत्या / नावडत्या ठिकाणी ती येऊ न देण्याची जाणीव सतत ठेवावी.ही जाणीव खूप काही सोप्प करेल. तुमचा सदैव हसरा चेहरा लोकांना कोड्यात पाडत चांगलं वागायला भाग पाडेल. लगेच नाहीच होणार कुणाकडूनच ना आपल्याकडून ना समोरच्याकडून पण सुरुवात तर करून  बघावी. आपण सदैव ह्या जाणिवेत असलो की त्याचं सुरेख रिफ्लेक्शन आपल्या नजरेत येईल. आणि तुम्हाला माहित आहेच डोळे न बोलता ही खूप काही बोलतात. मग ठेवायची न जाणीव छान प्रतिसाद देत राहण्याची???
प्रत्येकाला आज एक तरी क्षण सुरेख साद प्रतिसाद असलेला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
७.७.२०१७

गुरुवार, ६ जुलै, २०१७

प्रॉब्लेम

#प्रॉब्लेम
खूप काही बोलायचं असतं, खूप काही सांगायचं असतं. पण बऱ्याचदा योग्य व्यक्तीच सापडत नसते. किंवा आपण जिला योग्य समजतो ती खरं तर फक्त गॉसिप करण्याचा विषय म्हणून आपल्याकडे बघत असते. अशावेळेस एक तर आपण अलिप्त होऊन जातो त्या गोष्टीपासून किंवा त्या व्यक्तीपासून. मनातल्या भावना मात्र तशाच राहतात. हळूहळू अशा भावनांचा ढिगारा साचतच राहतो. त्यांचा योग्य पद्धतीने निचरा करणं खूप गरजेचं असतं. ते करण्यासाठी खुप काही करावं लागतं नाही फक्त एकदा तटस्थ दृष्टीने स्वतःकडे आणि त्या त्रास देणाऱ्या प्रॉब्लेमकडे बघायचं. त्याची तीव्रता काय आहे, तो कशामुळे प्रॉब्लेम वाटतोय , खूप सारी एनर्जी खर्च करावी असा आहे का? लगेच नाही पण हळूहळू काही उत्तरं आपोआप सापडतील, काही शोधावी लागतील. सुरुवातीला मन दुःखाला कवटाळून बसण्याचा प्रयत्न करेल पण आपणच त्याला समजावून लाडिगोडी लावून दुसरीकडे वळवायचं. प्रॉब्लेम तर येतातच मुळी आपल्याला तावून सुलाखून तयार करण्यासाठी. गरज असते ती फक्त त्यांना ओळीने उभं करून स्वतःशी सावकाश वागत सोडवण्याची.
मीही प्रयत्नच करतेय तुम्हीही बघा ट्राय करून. बेस्ट लक
शुभं भवतु!!!
#गौरीहर्षल
६.७.२०१७

देण्यातला आनंद

#देण्यातला_आनंद
#सुप्रभात
मस्त चाललंय ना सगळं? चालूच असणार पावसामुळे सगळं कसं छान टवटवीत दिसतंय. निसर्ग किती भरभरून देतो न आपल्याला. कधी कधी कमी जास्त होतं पण ती माणसाची चूक निसर्गाची नाही. तो त्याच देण्याचं काम अगदी आनंदाने सढळ हाताने करत राहतो.
देण्यातला आनंदच काही वेगळा असतो त्यातही निरपेक्ष, काही देतो आहोत ही भावना मनात न ठेवता दिलं तर त्यातुन एक वेगळंच बक्षीस मिळतं. हे बक्षीस आपल्या मनात रेंगाळत राहतं खूप वेळ आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्याला एक वेगळीच लकाकी देऊन जातं.
आता कुणी म्हणेल की मग सारख देतच रहावं का? पण मुळात देतच असतो की आपण सारख काहीतरी फक्त ते आपल्या लक्षात येत नाही. कधी कधी नकळत आपण हसतो अनोळखी माणसाकडे पाहून तेंव्हा आपण त्याला एक छान क्षण देतो. कधी सहजच कुणाला मदतीचा हात देतो अगदी बस, लोकल मध्ये चढताना जरी दिला तरी ती व्यक्ती मनोमन सुखावतेच की.
हल्लीच एक गोष्ट वाचली फेसबुक आणि वॉट्सअप्प वर त्यात लेखिका(माझ्या माहितीनुसार) सांगते की ती  मैत्रिणीला पिकअप करण्यासाठी जात असताना तिला रस्त्यावर राहणार कुटुंबातलं लहान मूल रस्त्यावर खेळताना रोज दिसत असतं. मनात असूनही त्यांना मदत काही तिच्याकडून होत नाही. पण तिच्यासमोर एक भंगार गोळा करणारी व्यक्ती मात्र स्वतः कफल्लक असूनही हातात असलेलं सफरचंद सहज त्या मुलाला देऊन हसत हसत निघून जाते. देण्याचा आनंद मिळवून.
तात्पर्य काय मंडळी, माणसाने आयुष्य जगण्यासाठी धडपड करत असताना असा छोटासा "देण्यातला आनंद" मिळवायला काय हरकत आहे. फार काही लागत नाही हो फक्त सुरुवात करायला हवी. ती सुरुवात आपण कुठूनही करु शकतो अगदी बायकोला सरप्राइज सकाळचा चहा देऊनही😝😝 . पटलं तर करून बघा खूप छान छान रिटर्न गिफ्ट्स मिळतील ज्यांची सर पैशाने विकत घेतलेल्या वस्तुंना कधीच येणार नाही.
प्रत्येकाला आज या सुरेख देवाण घेवणीतला आनंदाचा एक तरी क्षण मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु !!
#गौरीहर्षल
६.७.२०१७

मंगळवार, ४ जुलै, २०१७

मनाचे व्रत

#मनाचं व्रत
कधी कधी आकाशात ढग दाटून येतात. त्यामुळे सूर्याचं अजिबातच दर्शन होत नाही. आपल्या मनावरही असंच विचारांचे ढग दाटून मळभ येते. अशा परिस्थितीत सगळंच बिनसल्यासारखं होतं. हे मळभ दूर करणे सर्वस्वी आपल्याच हातात असतं.  ते कसं? साध्या सोप्या पद्धतीने करता येतं ते म्हणजे विचारांचा , मनाचा उपवास.
मनाचा उपवास करायचा,कसा? जसं आपण उपवास करताना मनाला खाण्याच्या बाबतीत यावर घालतो तसंच वाईट  विचार मनात आले की मनाला बजावत राहायचं. 
खरं तर याला उपवास म्हणण्यापेक्षा व्रत म्हणता येईल.
आयुष्य अजून थोडंसं मधुर करण्याचं व्रत. कधीही कुठेही करता येईल असं. गरज आहे ती फक्त मनावरचं मळभ दूर करून दृष्टिकोन स्वछ राहण्यासाठी प्रयत्न करत राहण्याची.
मलाही कुठे जमतंय अजून पण करतेय अडखळत प्रयत्न. जरासं अवघड आहे पण अशक्य नाही.  पटलं तर ट्राय करून बघा.
प्रत्येकाला आज एक तरी क्षण व्रतस्थ ,मानासिक समाधान देणारा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!!!
#गौरीहर्षल
४.७.२०१७