#शुभं_भवतु
#भविष्यातलं_सरप्राइज
एखादं नातं खूप जवळचं असतं पण अचानक काही न सांगता, विचारता निघून जात आयुष्यातून. आपण खूप प्रयत्न करतो थांबवण्यासाठी, परत आणण्यासाठी. पण त्या नात्याची वीण इतकी उसवलेली असते की कितीही टाके घातले तरी शिवलं जात नाही. अशावेळी आपली मात्र कसोटी असते रोजची सवय असलेलं ते नातं विसरून जगण्याची. सुरुवातीला खूप सैरभैर होत मन पण हळूहळू कुठेतरी त्याला वास्तवाची जाणीव होते. काही दिवस असेच निघून जातात मग मनाला आतून जाणवणारा सल कमी होतो. आठवणींमुळे डोळ्यात येणारं पाणीही ओसरत जातं.
नात्यांना कितीही जपलं तरी आज न उद्या कुठल्या ना कुठल्या कारणाने कुणीतरी सोडून जाणारच असतं. गरज असते ती आपण झालेल्या बदलाला लवकरात लवकर स्वीकारण्याची.
कारण ह्या सगळ्या गोंधळात आपल्याकडे डोळे लावून बसणारंही कुणीतरी असतं ज्याचा आपल्याला आपल्या दुःखात विसर पडतो. ह्या बाबतीत एक वाक्य मी कुठेतरी वाचलं होतं ते म्हणजे, "God puts people in your life for a reason and removes them from your life for a better reason." याचाच अर्थ उद्या येणाऱ्या भविष्याच्या पोटात नक्कीच काही चांगली नाती, चांगली माणसं लपलेली असतील जी योग्य वेळी योग्य वळणावर आपल्याला भेटतील. म्हणूनच आत्ता आपण आटापिटा करून काही साध्य करण्यापेक्षा पुढे निघालेलं काय वाईट??
प्रयत्न करणं तर आपल्याच हातात आहे ना? करून बघू कदाचित आपण ज्या गोष्टीची मनोमन वाट बघत होतो तीच समोर येऊन उभी राहील. Thats why keep smiling you never know who is watching you 😍😍
शुभं भवतु!!!
#गौरीहर्षल
१५.७.२०१७
शनिवार, १५ जुलै, २०१७
भविष्यातलं सरप्राइज
शुक्रवार, १४ जुलै, २०१७
क्वालिटी टाइम
#क्वालिटी_टाइम
आज सकाळी कधी नव्हे ते चिमण्यांची चिव चिव ऐकून जाग आली. कितीतरी दिवसांनी हा अनुभव घेतला नाहीतर सकाळी उठल्यापासून मागे लागलेली 'घाई' नावाची गोष्ट काही ऐकूच देत नाही. घाईघाईने घर, बाहेरची काम , ऑफिस करण्याच्या ह्या धबडग्यात आपलं मन, मेंदू, शरीर काही सांगत असतात पण आपल्याला ते ऐकायला वेळच नसतो. घड्याळाच्या काट्यावर चालणारे आपण सोमवार ते शुक्रवार मनात कुठेतरी ठरवत असतो की विकेंडला स्वतःला, घरच्यांना क्वालिटी टाइम दयायचा पण खरंच जमतं का हो?? की आपला क्वालिटी टाइम मॉल, पिकनिक ह्या सगळ्यांमध्ये हरवतो??
क्वालिटी टाइमवर सगळेच लेक्चर झाडत असतात पण प्रत्यक्षात किती जण तो खरंच जगण्याचा प्रयत्न करतात? म्हणजे नेमकं काय करायचं हेच आपल्याला कळत नाही. टीव्ही, फोन , लॅपटॉप याना सुट्टी देऊन जरा मस्त वेळ घालवायचा. एकमेकांना समजून घेण्यासाठी गप्पा मारणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे त्यामुळे रोज जे जमत नाही ते करून बघायचं. सगळ्यांनी मिळून काही गोष्टी करायच्या. थोडंसं अवघड जाईल सुरुवातीला कारण हल्ली आपल्याला माणसांपेक्षा फेसबुक आणि वॉट्सअप्प ची जास्त सवय झाली आहे. पण जमेल, जी आपली जिवाभावाची माणसं आहेत ती आयुष्यभर सोबत हवीत ना मग इतकं करायलाच हवं. सगळ्यांना एकमेकांना समजून घेत मदत करायची हा एकच रुल क्वालिटी टाइमसाठी.
प्रत्येकाला आज खूप सारा क्वालिटी टाइम आपल्या माणसासोबत मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
१५.७.२०१७
गुरुवार, १३ जुलै, २०१७
व्यक्त होऊया
#व्यक्त होऊया
व्यक्त होणं सगळ्यांत अवघड आहे आपल्याकडे. मग ते बोलून,हसून,रडून, लिहून कसं का होईना पण मनातलं व्यक्त झालं पाहिजे. आपण कुठलीही भावना व्यक्त करण्याआधी नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी काय म्हणतील असा विचार करतो.आणि मग या सगळया पायऱ्या पार करून जेंव्हा ती भावना व्यक्त होते तोपर्यंत तिच्यातला जिवंतपणा निघून गेलेला असतो बऱ्याचदा.त्यामानाने पुढची पिढी दोन पावले पुढे आहे मनात असेल ते सांगून मोकळे होतात ते. पण आपण त्यांना दटावतो.
खूप छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतात आपल्याला. कधी काहीतरी आवडलेलं असतं मग ते कुणाला सांगायचं , कसं सांगायचं हा मोठ्ठा प्रश्न आपण घेऊन बसतो स्वतःशीच. खरंतर त्याची गरज नसते आणि तो प्रश्न आपल्याव्यतिरिक्त कुणालाच पडलेलाही नसतो. मग अशावेळी उगाच का स्वतःला थांबवायचं?? कुणीच नाही सापडलं सांगायला तर लिहून ठेवायचा तो अनुभव. पण आपल्याला भावलेली, आवडलेली प्रत्येक चांगली गोष्ट करून बघण्याचा नक्की प्रयत्न करायचा.
ज्यांना खूप मोकळेपणाने व्यक्त होता येतं किंवा जमतं त्यांचं मला खूप कौतुक वाटतं. ते म्हणतात ना आयुष्यात शेवटी काही करायचं राहिलं आहे असं नको वाटायला. म्हणून तर व्यक्त व्हा, बोला, लिहा , वाचा, गा,जगा मनापासून, मोकळे व्हा. मस्त अनुभव येतो एकदा घेऊन तर पहा.
आज प्रत्येकाला एक तरी क्षण मनापासून व्यक्त होण्याचा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
१४.७.२०१७
ब्रेक
#ब्रेक
ब्रेक सगळ्यांनाच हवा असतो आणि खरं तर गरजेचा असतो. निसर्गसुद्धा ब्रेक घेतच असतो की, सूर्य पावसाळ्यात अधूनमधून ब्रेक घेतो, चंद्राला तर दर १५ दिवसांनी सुट्टी मिळते. आपण मात्र कधी कधी नोकरी आणि बाकीचे व्याप यांमध्ये इतके गुंतून जातो की ब्रेक घ्यायचंच विसरतो.
मनाच्या बॅकग्राउंडला मेंदू सतत विचार करत असतो, त्याला तर ब्रेक हा शब्दच सापडत नाही.
ब्रेक तर घ्यायलाच हवा पण तो कसा घ्यायचा??? काम करत असताना, विचारात असताना कधी असं वाटलं की आपण खूप दमलो आहोत, तर हळूच काही क्षण स्वतःसोबत घालवायचे. त्या वेळेत स्वतःला जे आवडतं ते करायचं. गाणं ऐकायचं, काहीतरी वाचन करायचं , किंवा नुसतं डोळे मिटून शांत बसायचं पण चुकूनही फोन हातात नाही घ्यायचा. दिवसातला तो काही मिनिटांचा वेळ फक्त आणि फक्त मन , मेंदू आणि शरीराला ब्रेक देण्यासाठी वापरायचा. या वेळेत स्वतःला जाणीव करून द्यायची स्वतःसाठी स्पेशल असण्याची. थोडासा वेळ स्वतःला दिला तर जगात काही बिघडणार नाही फक्त ही वेळ प्रत्येकाला ठरवता आणि पाळता आली पाहिजे. मीही करणार आहे ट्राय तुमचं काय??
प्रत्येकाला आज हवाहवासा ब्रेक काही मिनिटं तरी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
१३.७.२०१७
सोमवार, १० जुलै, २०१७
नात्यांचा रिचार्ज
नात्याचं_रिचार्ज
माणूस जन्माला येणार अशी चाहूल लागली की नाती त्याला चिकटतात. काही नाती रक्ताची, काही मनाची, काही स्वतः स्वीकारलेली तर काही आपसूकच येऊन गळ्यात पडलेली. या सगळ्या नात्यांच्या गुंत्यात काही नाती तरी नक्कीच असतात जी खूप महत्त्वाची असतात, स्पेशल असतात. अशा नात्यांना जपणं खूप गरजेचं असतं. व्यक्तिसापेक्ष ही नातीही वेगवेगळी असतात.
माणूस नात्यांकडून मिळणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनुभवांमधून खूप काही शिकत असतो. शिकता शिकता घडत असतो. बरेवाईट अनुभव तर येतातच . पण आपण स्वतः कधी लक्ष देतो का की त्या त्या नात्याची नेमकी गरज काय आहे? उदाहरणार्थ एखाद्या नात्यात आधी खूप सामंजस्य होते पण जसजसे सहवास वाढला त्याची जागा गृहीत धरण्याने घेतली. एखादं नातं आधी खूप खोडकर होतं पण वयानुसार त्यात फक्त गंभीर गोष्टीच उगळल्या जात असतील.
खूप छोट्याश्या गरजा असतात नात्यांच्याही आणि माणसांच्याही. त्या पूर्ण करण्यासाठी पैश्यांपेक्षा काळजीपूर्वक एकमेकांना नात्याला ओब्जार्व करण्याची गरज असते. हळूहळू राग व्यक्त करण्याऐवजी प्रेम व्यक्त करावे. आवर्जून ते नातं, ती व्यक्ती किती गरजेची आणि मुख्य म्हणजे हवीहवीशी आहे हे सांगावे. हा नियम आईमुलांपासून ते मित्रमैत्रिणी मध्येही लागू पडतो. आपण फक्त कुणाला हवेसे आहोत ही भावनाच व्यक्तीला आत्मविश्वास देते. हल्ली सतत जाणवणारे ताणतणाव माणसाला कुठेतरी आतून एकटं करत असतात. अशावेळी गरज असते ती एकमेकांना ओळखून नात्यांना एक नवा रिचार्ज देण्याची. हे रिचार्ज आपला एक आश्वासक स्पर्श, प्रेमळ नजर, दोन गोड शब्द आणि सोबत असण्याची खात्री देऊ शकतात. फक्त आपण वेळोवेळी आपल्या जवळच्या नात्यांना ते दिलं पाहिजे.
नात्याचं रिचार्ज नात्यात बांधल्या गेलेल्या सगळ्यांनाच एक रिफ्रेशमेंट देतं. त्याचा खूप चांगला आणि लॉंग टर्म प्रभाव आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात टिकून राहतो.
प्रत्येकाला असंच एक रिफ्रेशिंग रिचार्ज आज मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना!! शुभं भवतु!!
#गौरीहर्षल
#११.७.२०१७
रविवार, ९ जुलै, २०१७
मुड्स
#सुप्रभात_स.न.वि.वि.
#मूड
सकाळी सकाळी मस्त सूर्यप्रकाश आहे आभाळही मोकळं आहे असं वातावरण असलं की किती छान वाटत राहतं न दिवसभर??? मूड बन जाता है अगदीच!!! आणि मग पुढचा सगळा दिवस एकदम झकास जाणार याची मनाला खात्री वाटते.
या मुड्स वर आपलं आयुष्य किती अवलंबून असत ना? कुणाच्या तरी छानशा बोलण्यानेही आपला मूड एक लय पकडतो. ती लय मग पुढे हातात येणाऱ्या सगळ्या कामांवर आपला चांगला प्रभाव पाडत राहते.
नकळतच होणाऱ्या कृतीने जर इतकं चांगलं होत असेल, तर जाणूनबुजून मूड का नाही सांभाळत आपण ? खूप लांब जायची काही गरज नाही स्वतःपासूनच सुरुवात करायची. सकाळी उठल्यावर इतर कुणाला गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा स्वतःच स्वतःला म्हणायचं तेही एकदम प्रेमाने. हो आपण इतरांचे मूड सांभाळताना कसे प्रेमाने वागतो मग स्वतःशीही तसच वागायला हवं की नई? स्वतःच स्वतःला आवडतील रुचतील आणि विशेष म्हणजे ज्यामुळे आपलं शरीर, मन प्रसन्न राहील अशा गोष्टींचा आनंद घ्यायचा. अगदी मनापासून जर आपल्याला छानसे बदल घडवून आणायचे असतील तर एवढं तर करायलाच हवं ना? मुड्स मुळे आपण नाही नाचायचं तर मुड्स ना नाचवायचं. यासाठी फक्त स्वतःवर प्रेम करत असतानाच स्वतःला थोडासा आदर देण्याची गरज असते. आयुष्यात चढउतार तर येतच असतात पण त्यामुळे आपण बऱ्याचदा स्वतःला हरवत असतो. आपले धावपळ करणारे मुड्स तेच तर आपल्याला सुचवत असतात, की बाबा रे तू आम्हाला सांभाळ नाहीतर आम्ही तुम्हाला सळो की पळो करू 😉😙
मग मी तर प्रयत्न करतेय स्वतः मुड्स बदलण्याचा तुम्ही???
#गौरीहर्षल
१०.७.२०१७
शनिवार, ८ जुलै, २०१७
गुरुपौर्णिमा
#गुरुपौर्णिमा
आज गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपोर्णिमा. आपण आईच्या गर्भात असल्यापासूनच शिकत असतो असे म्हटले जाते. त्या अर्थाने आई ही आपली पहिली गुरू. पुढे आयुष्यात शिक्षण, नोकरी, आवडीनिवडीचं क्षेत्र अशा अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे गुरू भेटतच असतात. ते आपलं आयुष्य घडवताना खूप मोलाची जबाबदारीही उचलतात. आपल्यापैकी बरेच जण आजच्या दिवशी ह्या आपल्या सगळ्या गुरूंची कदाचित आठवणही काढत असतील कदाचित कृतज्ञता ही व्यक्त करत असतील. पण आपण गुरुपौर्णिमा फक्त एक सण म्हणून साजरी तर करत नाही न हेही बघायला हवं. आपले आईवडील, गुरू हे जसे सदैव आपल्या चांगल्याचाच विचार करत असतात तसंच आपणही इतरांच्या बाबतीत करतो का?
गुरुपौर्णिमा त्या दिवशी खऱ्या अर्थाने सफल होईल ज्या दिवशी आपण आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून चांगला गुण घेऊनही अहंकार बाळगणार नाही. आणि आपल्याकडे आधीपासूनच असणारं ज्ञान ज्यांना खूप गरज असते अशांपर्यंत कुठलाही गवगवा न करता पोचवू. तरच आपल्या गुरूंनी आपल्यावर केलेले संस्कार आपल्याला समजले असं म्हणता येईल.
तर या गुरुपौर्णिमेला एक छोटासा संकल्प करू.......प्रत्येकाला स्वतःहून मदत करण्याचा आणि प्रत्यक्ष कृतीतून आपल्या गुरूंना वंदन करण्याचा. ही कृती प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते बर का!! मीही प्रयत्न करणारच आहे तुम्हीही बघा जमतंय का.....
आजच्या गुरुपौर्णिमेला प्रत्येकाला एक तरी क्षण चांगली कृती करण्याची संधी देणारा मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु 🙏🙏 शुभं भवतु!!!!
#गौरीहर्षल
९.७.२०१७
-
The Art of Self-Compassion: Being Kind to Yourself in the Face of Adversity संकटाच्या वेळी स्वतःशी दयाळूपणे वागण्याची कला ती मा...
-
How to Deal with Negative People: नकारात्मक लोकांसोबत कसे वागावे? काही लोकांना नकारात्मक वातावरण, नकारात्मक विचारांमध्ये गुंतून पडणे आवडत ...
-
Clearing the Mental Clutter: How the Simple Act of a Brain Dump Can Boost Your Well-being? मनातील गर्दी दूर करणे: 'ब्रेन डं...
Contact form |
Tags |