शुक्रवार, २७ मार्च, २०२०

नवी सुरुवात

प्रत्येक नव्या सुरुवातीला जुन्याची काळसर किनार असते
जरी पाटी कोरी केली तरी आधीच्या खुणा दाखवत राहते
पुसत राहण्याचा अट्टहास माणूस सतत करत असतो
कारण पुढे गेल्यावर परत फिरण्यासाठी मार्गच नसतो

तरीही सुरूच असतो नव्याने आयुष्य लिहिण्याचा प्रयत्न
धडपड, धावपळ , निरनिराळ्या उपायांची होतात आवर्तन
कधी कधी ही भट्टी मस्तपैकी जमून येते
त्या काळ्या किनारीची सुंदरशी नक्षी होते

लिहिणं, पुसणं हा खेळ युगानुयुगे चालणारा
माणूस मात्र  होतो फक्त तालावर नाचणारा
खेळतं कोण खेळवतं कोण हे प्रश्न विचारू नयेत असे
प्रत्येक डावाला एकच इच्छा मनासारखे पडावेत फासे

#गौरीहर्षल #१५.११.२०१८

नवीन वर्ष



जीवनातलं अजून एक वर्ष कमी होतंय
काही जुन्या आठवणींना मन मागे सारतंय

काही इच्छा न मागता आपोआप पूर्ण झाल्या
तर काही मात्र ओठांवरही नाही आल्या

काही हात सुटून गेले नकळतच काळाच्या ओघात
काही बंध नव्याने जुळले घेऊन हात हातात

कुठे कुणी उगाचच अडकलं गैरसमजाच्या विळख्यात
कुणाकुणाला मात्र सुख गवसलं नात्यांच्या घट्ट बंधनात

काही जण अजूनही गोंधळात आहेत हवं की नकोच्या
तर काहींना जमलं आहे न्हायला झऱ्यात समाधानाच्या

कुणीतरी जुन्या आठवणीत सुख शोधत बसले आहेत
काहीजण मात्र नव्या आठवणी जोडण्यात गुंतले आहेत

बरंच काही हरवूनही कुणी खूप खुश आहेत
सगळं काही असूनही कुणी खूप दुःखी आहेत

सरत्या वर्षाचा हिशोब प्रत्येक जण मांडत आहे
हात जोडून त्याच्याकडे मनातलं मागत आहे

दिवसांमगून दिवस वर्षांनंतर वर्षं अशीच सरत आहेत
माणसांमधून माणसं नकळतपणे हरवत आहेत 

सुख आणि समाधानाने भरावी ओंजळ हेच आहे साकडे
प्रत्येकाला मिळो योग्य ते मागणे येत्या प्रत्येक क्षणाकडे

#गौरीहर्षल #३०.१२.२०१८




सुरुवात तर करूया

सुरुवात तर करूया
जमलं नाही तर काय
चुकलं सगळंच तर काय
ह्या सगळ्यातून बाहेर पडून नवं काही करूया

सुरुवात तर करूया
राहून गेलेलं करण्यासाठी
पुन्हा एकदा जगण्यासाठी

सुरुवात तर करूया
स्वतःला समजून घेण्यासाठी
स्वतःला वेळ देण्यासाठी

सुरुवात तर करूया 
दुःखातुन उभं राहण्यासाठी
सुखातही जमिनीवर असण्यासाठी

खूप काही नाही करायचं
मिळालेलं आयुष्य भरभरून जगायचं
पण त्यासाठी
सुरुवात तर करूयाव
#गौरीहर्षल
#११.१.२०१९

गोडवा

गोडवा मनांचा हळव्या भावनांचा
न कळेना कुठे हरवून गेला
साद घालणारा ओलावा आवाजाचा
स्मार्टफोनच्या गर्दीत गायब झाला

माणूस अजून जिवंत आहे 
लास्ट सीन सांगू लागले
कुणाला नि कुठे भेटायचं 
स्टेटसवरून कळू लागले

जवळची आणि लांबची नाती 
लाईक वरून ठरू लागली
जन्म,मृत्यू, प्रत्येक बातमी
फेसबुकवर शेयर झाली

पूर्वीच्या काळी माणसांच्या गर्दीत 
शोधावे लागायचे आपले परके 
आता मात्र फ्रेंड लिस्टमध्ये
आपलेच झाले असतात परके 

अशीही ही अधोगती प्रगती म्हणून मिरवतेय
सगळं काही पब्लिक करण्यात माणुसकी मात्र हरवतेय 
#गौरीहर्षल #९.२.२०१९




अवघड

अवघड असतं ना स्वतःला समजावणं
प्रत्येकाच्या चौकटीत सामावून जगणं
तरीही करतात काहीजण अशी कसरत
आयुष्य जगतात स्वतःच्या मनाला मारत
जग देतं त्याला गोंडस नाव चांगुलपणाचं
मग अखंड जगावं लागतं जीवन त्यागाचं
त्यांचा त्रास कुणाला समजत नाही
समजला तरी जाणून कुणी घेत नाही
हळूहळू सवय होते अलिप्त राहून सुखी होण्याची
अन् तीही कधी कधी बळी ठरते स्वार्थी असण्याची
चांगलं वागणं इतकं अवघड होईल हे आता कळू लागतं
पण रक्तात भिनलेलं हे व्रत सोडणं आता शक्य नसतं
गौरी हर्षल

स्वतःला शोधताना

स्वतःला शोधताना
आपल्या आजूबाजूला जिवंत माणसंच राहतात हे विसरतोय का आपण? विशेष असं काही नाही पण सहजच फोनच्या गॅलरीकडे आज नजर टाकली. जास्त प्रमाणात निराश, दुःखी मनस्थिती असताना सेव्ह केलेल्या वाक्यांच्या इमेजेस सापडल्या. त्या उडवत असतानाच जाणवत राहीलं की मी एकटीच अशी नाहीये बरेच जण हेच करत आहेत. राग आला म्हणून, वाईट वाटलं म्हणून अशा इमेजेस फेसबुक किंवा वॉट्सएप च्या स्टेटसवर अडकवायच्या. ह्या मागे इच्छा एकच असते ज्याचा राग आला आहे त्याला ते समजावं आणि जगालाही कळावं की आपण वाईट मनस्थितीत आहोत. मी तर गेले कित्येक दिवस हे सगळं करतेय मलाही ठाऊक नाही. पण कुठेतरी असं वाटलं की असं केल्याने मला किंवा त्या परिस्थितीत माझ्या मते दोषी असणाऱ्या व्यक्तीला फरक पडला आहे का? तर उत्तर अर्थातच नाही असं मिळालं. का?? कारण 
१. मी किंवा समोरच्याने संवादच साधला नाही. त्यामुळे प्रश्न आहे तिथेच राहिला आणि गैरसमजांचा घडा मात्र भरत गेला. परिणामी नातं फक्त तोंडावर हसून वेळ मारुन नेण्याइतक जिवंत राहिलं. 
२. समोरच्याला माझ्या मनात काय आहे हे न कळल्याने मला मात्र जास्तच त्रास झाला. त्याचा परिणाम माझं खाणंपिणं, विचार करणं आणि एकंदरीत रुटीन लाइफ हे बिघडण्यात झाला. 
मग यावर उपाय काय??? उपाय नेहमीचा जो खूपच चावून चोथा झाला आहे तोच दुर्लक्ष करणे😝😝 हो पण यात एक गंमत मी स्वतःसाठी शोधली ती म्हणजे जेंव्हा जेंव्हा असे वाईट,दुःखी विचार मनात आले मी त्याच्या उलट विचार सगळीकडे शोधू लागले. म्हणजे सकारात्मक विचार जे मला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतील. फक्त एवढंच नाही तर प्रत्येकवेळी त्या मनस्थितीच्या उलट विचार शोधला आणि तो समोर आल्यावर मनात काय काय विचार येतात ते कागदावर उतरवत गेले. बदल अर्थातच लगेच नाही घडला कारण सुरुवातीला फक्त मनातली खदखद बाहेर पडत असे. पण तेही होऊ दिलं हळूहळू मात्र खदखद संपून खरंच त्या प्रसंगातून स्वतःला काय शिकायला मिळालं ते लिहिलं जाऊ लागलं. हे सगळं फक्त स्वतःपुरत बरका😝😝 पण मग 15 दिवसात लक्षात आलं की खरंच गरज आहे का किंवा असते का इतकं टोकाला जाऊन कुणाचं वागणं, बोलणं मनावर घेण्याची??? आपल्याला दुखावून समोरची व्यक्ती जर काही झालंच नाही अशा थाटात जगत असते तर आपण स्वतःला कोणत्या चुकीची शिक्षा देत असतो??  मग मात्र ठरवलं की राग येणं, वाईट वाटण हे तर होतच राहणार आहे पण दरवेळेस असं झालं की आपल्या मनाचा तो दरवाजा उघडायचा जो आपल्याला योग्य ठिकाणी नेईल. ते ठिकाण म्हणजे आपल्या नव्या विचारांचं दालन जे प्रत्येक चुकीची, अयोग्य वाटणारी गोष्ट एका नव्या नजरेतून दाखवेल. हा सगळा प्रवास स्वतःचा स्वतःसोबतच असणार आहे त्यामुळे आपण स्वतः कसे आहोत हे शोधण्याची संधी आपल्याला सतत मिळत राहते. आणि इतर कुणाच्या येण्याची वाट बघत बसण्याचीही गरज नाही.  
मला तरी सापडतय बरच काही बघा तुम्हाला काही सापडतय का ?? कदाचित रोजच्या व्यवहारात हरवून गेलेले तुम्हीच सापडताल. प्रयत्न करण्यात तोटा काहीच नाही झाला तर फायदाच आहे so give it a chance. 
बाकी दत्तात्रेयार्पणमस्तु!!! 
#गौरीहर्षल
१४.७.२०१८

रिते रिते

कधी रिते रिते होऊन हरवून जाते
कधी भरलेल्या आभाळासारखे बरसते
मनाचे तर असेच असते...

कधी धरते फेर आठवणींच्या घोळक्यात
कधी शांत बसून राहते आपल्याच नादात
स्वतःच्या तालावर सगळ्यांना नाचवते
मनाचे तर असेच असते...

कधी भिजते चिंब पावसात
कधी रात्र रात्र सरते आसवात
हरवलेल्या क्षणांना आठवत राहते 
मनाचे तर असेच असते...

कधी होते लहान मूल
कधी निर्माल्यातले फूल
कोमेजूनही टवटवीत असण्याचा प्रयत्न करते 
मनाचे तर असेच असते...

©गौरी हर्षल ११.७.२०१९