गुरुवार, २६ मार्च, २०२०

कधीतरी मला हवं तसं

कधीतरी मला हवं तसं वाग ना रे आयुष्या
हव्याहव्याशा आनंदाच्या पावसात भिज ना रे आयुष्या

कितीतरी गोष्टी राहून गेल्या आहेत रे करायच्या
मनाच्या कप्प्यात जपून ठेवल्या आहेत याद्या त्यांच्या
निसटलेलं बालपण अन्  न जगलेले असंख्य क्षण
रोज एकदा तरी येऊन जाते मला त्यांची आठवण

आशेच्या झोपाळ्यावर झुलायचे अजून किती
तिथे आजूबाजूला आहेत मोडलेल्या स्वप्नांच्या भिंती
सतत त्या मला खुणावतात वेडावून दाखवल्यासारख्या  
डोळ्यासमोर येतात त्या आठवणी जखमांसारख्या

कधीतरी मला हवं तसं वाग ना रे आयुष्या
हव्याहव्याशा आनंदाच्या पावसात भिज ना रे आयुष्या

न मागता मिळेल असं काहीच नाही ह्या जगात
अन्  मागूनही मिळावं अशी अपेक्षा नाही मनात 
म्हणूनच हे मागणं करतेय, मी तुला आणि मला 
ह्यावेळी तरी देऊ संधी आपल्या त्या जगण्याला

नेमकं मला हवं आहे काय? 
खुप काही नाही फक्त एकदा,
हसायचं आहे मनापासून डोळ्यात पाणी येईपर्यंत
झोपाळ्यावर झुलायचे आहे तो आकाशी नेईपर्यंत 
साधी सोपी स्वप्नं आहेत ज्यांना लागत नाही पैसा
सोबतीला मात्र हवा आहे श्वास मला पुरेसा

खेळ आपला लपंडाव, 
तुझ्यामागे सतत चालू माझी धावाधाव 
कुठेतरी थांबून घ्यायची आहे विश्रांती
प्रवास करताना रस्ता चुकू नये ही हवी आहे खात्री
सगळं नीट होणारच आहे हे कळायला हवे
त्यासाठी आयुष्या आपले नाते जुळायला हवे

म्हणूनच म्हणते ....
कधीतरी मला हवं तसं वाग ना रे आयुष्या, 
हव्याहव्याशा आनंदाच्या पावसात भिज ना रे आयुष्या,
                                     भिज ना रे आयुष्या....
#गौरीहर्षल #२.१०.२०१८


तुमसे ही

#तुमसे_ही
 

गाणं तसं फुल रोमँटिक वगैरे टाइप आहे बर का ...
पण मला आपलं नेहमीची खोड आहे वेगळंच काहीतरी शोधायची ते कसं ते सांगते ....

कशाच्या तरी शोधात निघालेला एक जीव , ज्याला खूप काही हवं आहे आयुष्याकडून. अगदी टिपिकल सामान्य माणसाच्या सारखं सगळी सुखं हवी आहेत. तो ती सतत त्या वरच्याकडे मागत फिरत असतानाच त्याला अस काही गवसतं जे सहजासहजी आजवर कुणालाच मिळालेलं नाही असेच काही पहिल्या कडव्यात येते.....
ना है ये पाना
ना खोना ही है
तेरा ना होना जाने
क्यूँ होना ही है
म्हणजे ज्या शोधात  मी निघालो होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक अस काहीतरी मिळालं आहे आणि ते शब्दातीत आहे. जे असूनही नाहीये आणि नसूनही आहे. 

तुमसे ही दिन होता है
सुरमई शाम आती
तुमसे ही, तुमसे ही
हर घड़ी साँस आती है
ज़िंदगी कहलाती है
तुमसे ही, तुमसे ही…

ते जे काही गवसलं आहे न ते सगळ्या चराचरात व्यापून उरलं आहे. त्याच्यामुळेच ही सृष्टी सुरळीत चालू आहे तिला जिवंतपणा, रसरशीत पणा लाभला आहे.जो आयुष्य म्हणवला जातो.

आँखों में आँखें तेरी
बाहों में बाहें तेरी
मेरा ना मुझमें कुछ रहा… हुआ क्या
बातों में बातें तेरी
रातें सौगातें तेरी
क्यूँ तेरा सब ये हो गया… हुआ क्या
इतके दिवस मी हे सगळं माझ्या अज्ञानी डोळ्यांनी बघत होतो पण आता मात्र मला त्याच्या नजरेने ह्या सगळ्याचा एक वेगळाच अर्थ कळतो आहे. जो शब्दांत मांडण्यासारखा नाहीये किंवा खरं तर तो शब्दात वर्णावा असे शब्दच नाहीयेत. निर्सगाशी समरस होणं काय हे मी अनुभवतो आहे. 

मैं कहीं भी जाता हूँ
तुमसे ही मिल जाता हूँ
तुमसे ही, तुमसे ही
शोर में खामोशी है
थोड़ी सी बेहोशी है
तुमसे ही, तुमसे ही…

मी कुठेही जातोय तिथे मला त्याच अस्तित्व जाणवत आहे. इथे अजून एक गाणं आठवलं "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया" अशीच काहीशी अवस्था. शांततेत आणि कोलाहलात सुद्धा जाणवणारे त्याचे अस्तित्व..... कालातीत असे.....

आधा सा वादा कभी
आधे से ज्यादा कभी
जी चाहे कर लूं इस तरह वफ़ा का…
छोड़े ना छूटे कभी
तोड़े ना टूटे कभी
जो धागा तुमसे जुड़ गया वफ़ा का…

त्याला मी आता वचन तरी काय देऊ , त्याच्याकडे मागू तरी काय???? फक्त जोडले गेलेले हे अव्यक्त नाते असेच चिरंतन राहूदे हीच इच्छा....

मैं तेरा सरमाया हूँ
जो भी मैं बन पाया हूँ
तुमसे ही, तुमसे ही…
रास्ते मिल जाते है
मंज़िले मिल जाती है
तुमसे ही, तुमसे ही…

तुझ्या सावलीत मी एक हिस्सा होऊन गेलो आहे , इथून पुढे रस्ते, ध्येय ह्यांची मला काळजी उरली नाही ते आपसूकच मला शोधत येतील ही खात्री आहे.
तू आहेस तिथे कमतरता कशी असेल ???? 
#गौरीहर्षल #७.१०.२०१८

अधीर मत हो मन

अधीर मत हो मन
ये दिन भी जाएंगे
हसते मुस्कुराते खुशी के पल
वापस लौट के आएंगे

तब तक तू धीरज से काम ले
खुदही खुदको थाम ले
रूककर जरा सोच कुछ समय
तभी तो थमेगा ये बिन बुलाया प्रलय

आज तू अगर रुक गया 
समझ बहुत कुछ पाएगा
आनेवाला हर दिन
खुशी भरभर के लाएगा

अधीर मत हो मन
तू ही तुझको संभाल सकता है
तेरा संयम तेरे लिए
वरदान बन सकता है 

थोड़े दिन खामोश रहके 
अपनी ताकत बढा के तो देख
हर कोई जुटा है इसी कश्मकश में 
तू जरा नजर उठा के तो देख

तू अपनी मर्जी का मालिक है
सारी दुनिया जानती है
इसीलिए तो तू खुदको रोक
ना बिना बात के कर नोंक झोंक

मिले हुए पलों में खुशियां बटोर ले 
चार दिन अपनों के साथ बाँट ले
सबकुछ अब तुझपे निर्भर है
तेरे ही हाथों में कल की डोर है

इसीलिए कहती हूँ
अधीर मत हो मन 
उम्मीद से भर दे तू
आज मेरा आँगन
#गौरीहर्षल
२५.३.२०२०

अलक

#अलक

१.  रोज तिच्या "लवकर या बाबा" कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या बाबाच्या गळ्याशी तेच शब्द येऊन अडकले. पण ती मात्र छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन आज कधी न परत येण्याच्या प्रवासाला निघाली होती. 
कारण एकच ती मुलगी होती 

२. उदया ओपन डे साठी बाबा शाळेत येणार  म्हणून रात्र तिने आनंदात घालवली. पण ते मात्र मिटिंगच कारण देत तिच्या वर्गात न येताच निघून गेले.डोळ्यातलं पाणी आवरत ती गुपचूप बसून राहिली .
कारण तेच ...

३. लग्नाचा विषय निघाल्यावर इतर मुलींसारखी तीही सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलू लागली. पण घरात होणारे आनंदी बदल तिच्या नजरेतून सुटले नाहीत. इतकी वर्ष समोर न येऊ दिलेली भावना आता मात्र प्रकर्षाने जाणवली. अन् अनेक नकोशा आठवणी डोळ्यांतून वाहू लागल्या.
कारण तेच ....

४. नवीन घरात रुळू लागल्यावर जेंव्हा तिला नणंदेची अवस्था आपल्यासारखीच आहे हे जाणवलं. तेंव्हा नकळतच तिने तिला कुशीत घेत स्वतःच्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. 
पण ह्यावेळी कारण वेगळं होतं 
तिने आता ठरवलं होतं कुणालाही  "नकोशी" असण्याच दुःखच होऊ द्यायचं नाही. नकळतच तिचा हात स्वतःच्या पोटावर निर्धाराने विसावला. 
कारण तेच ....

#गौरीहर्षल
#२४.४.२०१९ 

प्रश्न ही तूच उत्तरही तूच

#प्रश्नही_तूच_अन्_उत्तरही_तूच
ध्यान संपवून त्यांनी डोळे उघडले तशी ती मोठया आशेने समोर बसलेली त्यांना दिसली. तिच्याकडे बघत त्यांनी मंद स्मित केलं. आणि मग आपले गंभीर पण आश्वस्त डोळे तिच्या नजरेत मिसळत ते म्हटले, "बोल, कशाचं उत्तर हवंय?" 
थोडंस चुळबुळतच ती म्हणाली, "उत्तर नकोय मला ह्यावेळी. सुटका हवीय ह्या सगळ्यातून. चूक नसताना जे गमावलं ते तर कधीच परत येणार नाही. पण हुरहूर मात्र कायम राहील. म्हणूनच सुटका हवीय मला." 
अत्यंत प्रेमाने तिच्याकडे बघत ते बोलु लागले,"सुटका अशी मागून मिळत नसते लेकरा. तुझं नुकसान भरून येईल असं मी म्हणत नाही पण निदान येणारा काळ त्यावरच औषध असेल हे नक्की. राहिला प्रश्न तुझ्या ह्या सुटका प्रश्नाचा तर ती तुझी सध्याची मनस्थिती बोलते आहे. आत्ताच तुला सत्य कळालं आहे ते पचवणं त्यातून बाहेर पडणं ह्यासाठी मनाला वेळ लागेल. चुकार मेंढरासारखं ते अजून काही दिवस तुला त्रास देणारच. पण त्याला सतत योग्य मार्गावर आणण फक्त तुझ्या हातात आहे आणि ते तुला जमेल ह्याची मला खात्री आहे." मग थोडंस थांबून त्यांनी तिच्याकडे बघितलं कुठेतरी तिच्या मनात सुरू असलेली खळबळ जरा शांत झाली आहे ह्याचा त्यांना अंदाज आला. दीर्घ श्वास घेत ते पुढे बोलू लागले, "तुला प्रश्न पडतात आणि उत्तरं ही हवी असतात. पण तुला संयम नसतो. काही गोष्टींची वेळ ठरलेली असते त्याशिवाय त्याबाबतीत प्रत्यक्ष परमेश्वर ही ढवळाढवळ करू शकत नाही. मग अशावेळी चुकूनही होणारी चूक भयंकर महागात पडू शकते. बाकी तुला राग येईल पण नव्याने तुझ्या मनात जन्म घेतलेल्या प्रश्नांच्या बाबतीत मी इतकंच म्हणेन की योग्य वेळ आली की योग्य व्यक्ती उत्तरं घेऊन तुझ्यापर्यंत नक्की येतील. तोपर्यंत काळजी घे आणि पेशन्स म्हणजेच संयम ठेव." अस म्हणत त्यांनी पुन्हा डोळे बंद केले. पण ह्यावेळी चेहऱ्यावर गंभीर भाव नव्हते तर प्रसन्नता होती. तिचं प्रसन्नता आहेरसारखी सोबत घेत तीही तिच्या वाटेने निघाली. 
#अध्यात्मवगैरे 
©गौरीहर्षल १७.६.२०१९

सुखी माणसाचा सदरा

#सुखी_माणसाचा_सदरा
सिग्नलला गाडी थांबली की माणसांचं निरीक्षण करण्यात मज्जा येते. कुणी मस्त हसून जात असतो, कुणी जोरजोरात फोनवर बोलताना दिवसभराचा कार्यक्रम सगळ्या जगाला ऐकवत असतो. प्रत्येकाची निराळी तऱ्हा आज मात्र दोन विरोधी दृश्य एकाच वेळी दिसली अन् कुठेतरी माणसाच्या मनोवृत्तीबद्दल आश्चर्य वाटलं.
पहिलं दृश्य 
हातगाडीवर फळं विकणाऱ्या नवराबायकोची जोडी.
दुपारची वेळ असल्याने गाडी बाजूला लावून  दोघेही रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाखाली गोणपाट अंथरून जेवायला बसले होते. त्याही ठिकाणी आग्रह करून करून एकमेकांना वाढत आणि गप्पा मारत आनंदात होते. टचवूड अगदी अस वाटलं.
तर दुसरं दृश्य
जराशी जुन्या मॉडेलची चारचाकी. चालवणारे वडील आणि किती भिकारड्या गाडीत मला बसवलं आहे असा चेहरा करून बसलेले चिरंजीव. गाडी जुनी असली तरी टकाटक होती. मुलाच्या चेहऱ्यावर असणारे भाव लक्षात आल्याने वडीलही अक्षरशः सूड उगवल्यासारखे गाडी चालवत होते. कदाचित बाकी आधी काही घडलं असेल ही त्यांची मनस्थिती खराब होण्यासारखं. पण गाडीबद्दल राग आहे हे ते ज्या नजरेने इतर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या न्याहाळत होते त्यावरून कळलं. 
क्षणभरासाठी त्या गाडीसाठी वाईट वाटलं ती तर तिचं काम चोख करत होती त्यांना उन्हापासून वाचवत होती. कदाचित कित्येक वर्षांपासून तिने कितीतरी वेळा त्यांना उन्हापासून पावसापासून वाचवलं असेल अशावेळी मस्त हसरा चेहरा ठेवून तिला वागवलं तर काय वाईट. पण माणसाची खोड असते त्याला समोर असलेल्या सुखापेक्षा नसलेल्या गोष्टीचं दुःख जास्त त्रास देतं. दुसरीकडे ते साधस जोडपं मात्र आहे त्यात सुखी होतं आनंदात होतं. खऱ्या अर्थाने श्रीमंत होतं त्या क्षणी.
घर बंगला, गाडी , ट्रिप , महागड्या वस्तू, ह्या गोष्टी मागे ऊर फुटेपर्यंत धावताना कुठेतरी बरंच काही हरवतो आपण हल्ली. सोशल मीडियावर चकचकीत दिसणाऱ्या गोष्टी म्हणजेच आयुष्य हे आईवडील नकळतच मुलांमध्ये रुजवत आहेत. ह्या मॅरेथॉन मध्ये फक्त धावायचं का कशासाठी कुठे पोचायचं आहे ह्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच अस नाही. पण ह्या सगळ्यात सुख मात्र निसटत चाललंय. सुखाची व्याख्या ही मात्र ज्याने त्याने ठरवावी अन् ठरली तर थोडी हिंमत करावी खऱ्या अर्थाने सुखी होण्यासाठी. 
सुखी माणसाचा सदरा खरंच मिळेल का ते नाही माहीत पण प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही. 
बाकी दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु!!!# गौरीहर्षल
२८.११.२०१९

आमराईचा उत्सव

आमराईचा_उत्सव

आज सकाळपासून तिची खूप लगबग सुरू होती. ऑफिसमध्ये ही ती काहीशी गडबडीत असल्याचं तिच्या मित्रमंडळी ना जाणवलं शेवटी कुणीतरी तिला हटकलच कुठे लक्ष आहे म्हणून? मग दुपारी जेवताना बोलू असे म्हणत तिने समोरच काम संपवायला सुरुवात केली. 
सगळं मित्रमंडळ दुपारच्या वेळी ऐकण्यासाठी तयारीत बसलं होतं. ती आली मग सगळ्यांनी जेवणं उरकली. आता मात्र तिच्या जिवलग मैत्रिणी ला राहवेना. " मिथिले , अग सांग ना आतातरी " , अस म्हणत नेत्राने कोंडी फोडली. 
हलकेसे हसत मिथिला म्हटली, "अग हो तेच बोलणार आहे. गेले दोन दिवस मी कसल्या गडबडीत आहे, ह्याबद्दल तुम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे.  तर माझे आजोबा म्हणजे माझ्या बाबांचे बाबा गावाकडे खूप मोठे शेतकरी होते. अडीनडीला लोकांच्या हमखास उपयोगी पडत. पण त्यांना एक दुःख होतं. पाच पिढया घरात मुलगी जन्माला आली नव्हती. कारण पाच पिढ्यांआधी जन्माला आलेली मुलगी  शेतातल्या आंब्याच्या बागेतल्या विहिरीत सापडली होती. आणि त्यानंतर भरभरून आंबे देणारी ती आमराई आणि पाण्याने तुडुंब भरलेली ती विहीर कायमच्या आटल्या." हे ऐकल्यावर सुरक्षित वातावरणात वाढलेल्या सगळ्यांच्याच अंगावर भीतीने रोमांच उभे राहिले.  मिथिला क्षणभर थांबली मग पुढे बोलू लागली,"मग नंतरच्या पिढ्यानपिढ्या मुलींसाठी प्रयत्न करत राहिल्या पण मुलगी झाली नाही. माझ्या आजोबांनी मात्र उपासतापास, गुरू वगैरे करून उपाय शोधला. तो म्हणजे त्यांनी माझ्या आजीकडून ती आमराई आणि विहीर दोघींची खणनारळाने ओटी भरून घेतली. आणि वचन दिले की जर घरात सुदृढ मुलगी जन्माला आली तर तिच्याच हाताने पहिलं रोप ह्या जमिनीवर लावीन."  "मग? " नेत्राने उत्सुकतेने विचारलं. 
"मग? माझ्या आजीला जुळ्या मुली झाल्या त्या म्हणजे माझ्या दोन्ही आत्या त्या वर्षाच्या झाल्यावर त्यांच्या हाताने आजोबांनी पहिली रोपटी तिथे लावली आणि विहीरीची पूजाही केली.  त्या वर्षी पाऊसही भरपूर झाला ती विहीर तुडुंब भरली आणि रोपं रुजली . आता कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणो किंवा आणि काही पण गावात हे घडल्यानंतर मुलीचा जन्म झाला की लोकं असच स्वतःच्या शेतातही करू लागले. आणि आता तर ती एक प्रथा च बनली आहे. फक्त एक गोष्ट दरवर्षी बदलली. ती म्हणजे दरवेळेस फक्त आमराइतच नाही तर शेतातच पेरणी करताना पहिलं प्राधान्य त्या वर्षी जन्माला आलेल्या मुलीला दिल जातं. मगच पुढची कामं केली जातात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी माझ्यापरीने भर घालण्याचा प्रयत्न करतेय. ही कल्पना त्या भागात मुलींची होणारी हत्या थांबवण्यासाठी उपयोगी ठरली अन् फायदाही झाला. तर ह्या वर्षी मान मिळणार आहे माझ्या वहिनीला कारण आमची पिटुकली सरस्वती. त्या जोडीनेच आम्ही तिथे शाळेला काही वस्तूही देतो आहोत म्हणून मी जरा कामात व्यस्त झाले होते. ह्या निमित्ताने मी तुम्हां सगळ्यांना तिथे येण्यासाठी आमंत्रित करतेय आणि हो ड्रेस कोड आहे हं. मुलींसाठी नऊवारी आणि मुलांसाठी धोतर कुर्ता. तेंव्हा त्या तयारीने या." मिथिला इतकं बोलून थांबली तसं नेत्राने तिला मिठीच मारली. बाकी सगळेही ह्या कामासाठी तिचं अभिनंदन करू लागले. मुलीच्या जन्माचा असा उत्सव करण्याची कल्पना सगळ्यांनाच आवडली. 
#गौरीहर्षल #१६.१.२०१९