सोमवार, १२ जून, २०१७

मन धागा धागा

#फर्माईश
#असे_कसे_बोलायचे_न_बोलता_आता
      कालपासून वेड्यासारखं हे गाणं मी ऐकतेय. प्रत्येक कडवं मात्र मला वेगळा अर्थ सांगत असल्यासारखं वाटलं. सो, मी नेहमीप्रमाणे कथा वगैरे लिहिण्याऐवजी मला जो अर्थ वाचल्या वाचल्या भिडला तो लिहिण्याचा प्रयत्न करतेय.
१.
       असे कसे बोलायचे न बोलता आता
       तुझ्यासवे तुझ्याविना असायचे आता
       डोळ्यांत या रोज तुला जपायचे रे आता
       सांगा जरा असे कसे लपायचे रे आता
         मन धागा धागा जोडते नवा
          मन धागा धागा रेशमी दुवा
  तसं पाहिलं तर गाणं प्रचंड रोमँटिक आहे, पण मला मात्र ह्या कडव्याचा अर्थ थोडा वेगळा असला तरी चालेल असं वाटलं. म्हणजे एक स्त्री जी पहिल्यांदा आई होणार आहे , ती या ओळींशी कनेक्टेड होऊ शकते. कारण काही गोष्टी अनुभव हे असे असणार जे फक्त आणि फक्त तीच अनुभवू शकते. सांगूनही ते कुणाला कळणार नाहीत. त्यातून अजून तरी हे गुपित तिने गुपितच ठेवलं आहे त्यामुळे डोळ्यांत रोज त्याला जपत असतांनाच त्याचं अस्तित्व लपवू कसं हेही तिला कळत नाही. असो तर हे पहिलं कडवं.....
२.
             एकटी मी दिनरात तरीही तू भोवती
               हातात नाही हात तरीही तू सोबती
                     मन बेभान बेभान होई
                     मग प्रीतीला उधाण येई
                    मन धागा धागा ......
एका सोल्जरची बायको. दूर असूनही घरातल्या प्रत्येक वस्तूशी आणि तिच्याशी त्याच्या अबोल आस्तित्वाचं नातं आणि त्यासोबत तिची चालू असलेली रोजच्या जगण्यातली धावपळ. पदोपदी त्याची आठवण तिला अस्वस्थ करतेच पण त्याचबरोबर तिला बळही मिळतं सगळं निभावून नेण्यासाठी.

३.
                रोज बहाणे नवे शोधून मी थकते
                 तुझ्याच मागे मन येऊन ही चुकते
                    क्षण आतूर आतूर झाले
                       रोज काहूर काहूर नवे
                  मन धागा धागा......
हे तिसरं आणि शेवटचं कडवं. ह्या ओळी मला ना अशी एक वेगळीच आठवण करून देतात. म्हणजे नवीन असं काहीतरी नुकतंच घडू लागलंय आयुष्यात मग ते त्याच्या असो किंवा तिच्या. आणि ते जे काही आहे ते प्रेम वगैरेंपेक्षा वेगळं आहे कदाचित ती एक नवी सुरुवात आहे एखादया नव्या कामाची, छंदाची किंवा सगळं मळभ दूर झाल्यानंतर उगवणाऱ्या नव्या दिवसाची. ज्याची नकळत आपण सगळेच वाट बघत असतो रोज. मनासारखं काहीतरी घडावं असं प्रत्येकाला वाटत असतं कदाचित तेच घडण्याची सुरुवात.......
      Hope so, मी ट्रॅक सोडून लिहिलं नाहीये. बाकी सगळ्यांच्या प्रतिक्रियांची वाट बघतेय.
       कदाचित माझ्यासाठीही नवा अर्थ लपलेला असेल 😝😝
गौरी हर्षल
१२.६.२०१७

बुधवार, ७ जून, २०१७

ती, तो आणि पाऊस २

ती, तो आणि पाऊस २
तो - किती आवडायचं तुला पावसात भिजायला, मला तुझ्या त्या वेडामुळेच तू आवडली होतीस खरंतर. पण रोजच्या धावपळीत सांगायचंच राहून गेलं बघ. आणि आज तो मनापासून बरसतोय तुझ्या माझ्या अंगणात तू लावलेल्या चाफ्यावर. पण आपण मात्र हरवलोय आयुष्याचा गाडा ओढताना. कधी नव्हे ते आज मी लवकर आलोय तू नसताना उगाच उदास झालेल्या घराकडे बघत होतो तोच पाऊस आला. आज ठरवलं की तुला तुझ्या पावसासोबतच सरप्राइज द्यायचं. लवकर ये गं मग तू , मी आणि पाऊस सेलिब्रेट करूया आपल्या नात्याच्या नव्याश्या या अर्थाला....Miss you

ती--  कसला छान कोसळतोय पाऊस आणि आज नेमकी मी ट्रॅफिक मध्ये अडकलेय. घरी असते तर मस्त चाफ्याखाली भिजले असते तुझ्यासोबत. तुला आवडत नाही माहीत आहे मला पण तू सोबत असलास की माझ्या असण्याला एक अर्थ येतो. एकत्र येऊन सेलिब्रेट केलेले पावसाळे कमीच ना रे आपले. तू तुझ्या कामात बिझी मी माझ्या. आयुष्य जगायचं जगायचं म्हणत असताना आयुष्यच नाही ना रे हरवत चाललं??

15 मिनिटानंतर दाराची बेल वाजते.
तो ओंजळीत चाफा घेऊन दार उघडतो आणि
ती हरवून जाऊन त्याला बघत बसते.....

नवीशी सुरुवात
पावसासोबत
नव्याने होते......
गौरी हर्षल
७.६.२०१७

गुरुवार, १ जून, २०१७

ती,तो आणि पाऊस

ती,तो आणि पाऊस
        ती-:  पहिला पाऊस पडला की हमखास आठवण येते तुझी. आयुष्यातला सगळ्यात धुंद पावसाळा तुझ्या सोबत तर अनुभवला मी. अगदी मनमुराद भिजत भटकणं असो किंवा चिंब भिजून आडोश्याला कुडकुडत उभं राहणं. तूच होतास ज्याने मला दोन्ही हात पसरून पावसाला कवेत घ्यायला शिकवलं. तू पहिल्यांदा भेटलास तेही पावसातच. तो पावसाळा मी जगले अक्षरशः आणि अजूनही जगते प्रत्येक वेळेस. आता तू कुठे आहेस माहित नाही. अजूनही तसाच पावसाला झेलतच असशील कदाचित मला आठवतही असशील.💖💖💖

तो -:     आज पुन्हा आभाळ भरून आलं. कुठेस ग तू??? पहिला पाऊस, ते भटकणं, तुझं शहारणं प्रचंड मिस करतो मी. नकळतच खूप दूर गेलो ना आपण. पण हा पाऊस आहे ना परत परत येऊन त्या आठवणींत नेतोच. तू होतीस म्हणून मीही मनमुराद जगायला शिकलो. आजही तू असतेस चेहऱ्यावर येणाऱ्या टपोऱ्या थेंबात. हल्ली खूप कमी भिजतो गं मी. पण जेव्हा भिजतो तेंव्हा तू सोबत असतेस. तुलाही अजून आठवत का पावसात भिजणं💖💖💖
गौरी हर्षल
१.६.२०१७
          

मंगळवार, २३ मे, २०१७

याद पिया की आए.......

#याद पिया की आए
              संयोगीता जितक्या आर्ततेने सुरांना आळवत होती तेवढ्याच तीव्रतेने अश्रू  तिच्या पापण्यांच्या कडांना ओलांडत होते. आज कित्येक दिवसानंतर ती रियाज करत होती. सूर मनासारखा लागलंय हे  ओसंडून वाहणारे तिचे डोळेच सांगत होते. शेवटच्या आलाप संपवून तिने डोळे उघडले. नेहमीप्रमाणे गुरूंना मनोमन अभिवादन करत तिने रोजच्या कामांना सुरुवात केली.
         संयोगीता वयाच्या अवघ्या चार वर्षांपासून ती शास्त्रीय संगीत शिकत होती. तशी तिच्या आईवडिलांची इच्छाच होती. पुढे तिलाही त्यात गोडी वाटू लागल्याने संगीतच तिचा श्वास बनले होते. तिच्या गुरू वंदनाताई सुद्धा तिच्यासारखी शिष्या मिळाल्यामुळे तृप्त झाल्या होत्या. आपल्याकडे असेल नसेल तितकं ज्ञान त्यांनी संयोगीताच्या ओंजळीत टाकलं होतं.
                 वंदनाताईंच्या घरच्यांनाही संयोगीता आता घरातील एक वाटत होती. ताईंचा मुलगा मार्दव आणि संयोगीता एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. पुढे दोन्ही घरांच्या संमतीने त्यांनी लग्नाचा निर्णयही घेतला. साखरपुडा झाला आणि मार्दवला कंपनीच्या कामानिमित्त काही महिन्यांसाठी अमेरिकेला जावं लागलं. रोज तसंही फेसबुक , वॉट्सअप्प होतंच बोलण्यासाठी त्यामुळे फारसा दुरावा जाणवत नव्हता. तो परत येताच लग्नाची तारीख काढायची असं ठरलं.  हळूहळू मार्दवच्या येण्याची तारीख जवळ आली. त्याने निघतानाच फेसबुकला स्टेटस अपडेट केलं कमिंग बॅक टू इंडिया. फ्लाईट कनेक्टेड असल्याने त्याला येईपर्यंत सकाळ होणार होती. संयोगीताच्या मनात मात्र उगाच शंकेची पाल चुकचुकली. पहाटेच उठून ती अस्वस्थ मनाने रियाजाला बसली पण आज तिचे सूर का कुणास ठाऊक रुसले होते. इतक्यात तिचा फोन वाजला वंदनाताई बोलत होत्या परतून येत असताना मार्दवचा अपघात झाला होता. क्षणभर संयोगीताच्या नजरेसमोर अंधार पसरला. जेंव्हा ती जागी झाली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होती. मार्दव अपघातातून वाचला तर होता पण कोममध्ये गेला होता. आता खरी कसोटी होती. पण वंदनाताईनी संयोगीताला पूर्ण स्वातंत्र्य दिले त्या नात्यातून बाहेर पडण्याचं. संयोगीताने मात्र मार्दवची वाट बघायची असं आधीच ठरवलं होतं. आज ६ महिने झाले होते मार्दवच्या तब्येतीत फरक नव्हता. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला घरीच लाइफ सिस्टीमवर ठेवण्यात आले. त्याला साद घालण्यासाठी म्हणून संयोगीता रोज न चुकता त्याच्या खोलीतच रियाज करत होती. "जौबन बिता जाए रे हाय राम याद पिया की आए......" आज खूप दिवसांनी तिचे सूर मनासारखे लागले होते. तृप्त मनाने ती मार्दवच्या जवळ येऊन बोलत बसणार तोच तिला मार्दवच्या डोळ्यांत हालचाल जाणवली. आणि पुढच्याच क्षणी त्याने डोळे उघडले होते. खऱ्या अर्थाने तिच्या पियाने तिची ती आर्त साद ऐकली होती.
गौरी हर्षल
२३.५.२०१७

#गेले द्यायचे राहून........

#गेले द्यायचे राहून
          स्वतःच्या केबिन मध्ये अनय शांतपणे बसून होता. त्याला कारणही तसंच काहीसं होतं पैसा, पॉवर, स्टेटस मिळवताना खूप काही निसटून गेलं होतं. वळून मागे बघितल्यावर त्याला जाणवलं की या सगळ्या चढाओढीत आपण आपल्या माणसांना हरवून बसलोय.
            स्वराचा आवाज त्याच्या कानात गुणगुणत होता,"गेले द्यायचे राहुनी , तुझे नक्षत्रांचे देणे". खूप छान गायची ती आणि तितकीच छान माणूसही होती. हो , होतीच कारण आता ती या जगात नव्हती. तिचं जाणं अकाली होतं पण ते तिने मात्र हसत हसत स्वीकारलं होतं.
         अनय तिचा खूप जवळचा मित्र, जिवापाड प्रेम होतं तिचं त्याच्यावर. पण त्याला मात्र खूप यशस्वी व्हायचं होतं आणि त्या धुंदीत त्याने तिचं प्रेम आणि मैत्री दोन्ही धुडकावली.
आज जेंव्हा ती गेली असं त्याला समजलं तेंव्हा त्याला आपल्या यशातला फोलपणा जाणवला. तिच्या सगळ्या आठवणी फेर धरून त्याच्याभोवती नाचू लागल्या. कारण हे प्रोजेक्ट संपताच तिची माफी मागून तिला लग्नासाठी मागणी घालण्याचा त्याचा विचार होता. पण तिने मात्र त्याला तशी संधीच शिल्लक ठेवली नव्हती. 
                  हरवलेल्या अनयची पावलं नकळत सावलीकडे वळली. सावली अनाथाश्रम इथेच तो आणि स्वरा लहानाचे मोठे झाले आणि इथेच पहिल्यांदा भेटलेही. त्यामुळेच स्वराचं जाणं अनय ला पुन्हा आश्रमात घेऊन आलं. तिथे गेल्यावर त्याच्या कानावर तेच सूर पडले तसा तो धावत धावत त्या दिशेने निघाला. बंद दारामागून येणारे ते सूर आणि तो आवाज ऐकून त्याला वाटलं की स्वराच्या जाण्याची बातमी खोटी आहे. पण दार ढकलताच त्याला जे दिसलं त्यामुळे त्याच्या डोळ्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. त्या खोलीत ५ वर्षांची इटूकली नीरा गात होती. नीरा सावली आश्रमात आली तेंव्हा १५ दिवसांची होती तेंव्हाच स्वराने तिची जबाबदारी उचलली होती. अनय मात्र विसरून गेला होता हे सगळं. आत्ता हे सगळं काही सेकंदात त्याच्या डोळ्यासमोरून गेलं , आणि निरु ला कवटाळून त्याने ठरवलं काहीतरी मनाशी. 
           सावली अनाथाश्रमच्या ऑफिसमध्ये त्याने देशमुख सरांना निरु ला दत्तक घेण्याची इच्छा बोलून दाखवली आणि सोबतच कायमस्वरूपी आश्रमाचा जास्तीत जास्त खर्च उचलण्याचं ठरवलं. लवकरच सर्व सोपस्कार पूर्ण झाले. आज स्वराच्या वाढदिवसाच्या दिवशी जे तिला द्यायचं राहून गेलं होतं ते सर्व निरु सोबतच इतर गरजू मुलांनाही देण्याचा निश्चय करत अनयने  निरुचं बोट धरून आयुष्याची एक नवी सुरुवात  केली.
गौरी हर्षल
२३.५.२०१७

सोमवार, १७ एप्रिल, २०१७

असं जमलं आमचं

#असं जमलं आमचं
      पुणे- नाशिक- पुणे
   ती आपली टॉमबॉय भरपूर मित्रमैत्रिणी जमवून गोंधळ करणारी, तो मात्र मुलींशी कसं बोलू यात अडकलेला. त्याचे जेंव्हा कांद्यापोह्याचे कार्यक्रम सुरू होते तेव्हा ती मात्र मस्तपैकी कॉलेजमध्ये धिंगाणा करण्यात बिझी होती. अशातच तिच्या चुलत बहिणीला बघण्याचा कार्यक्रम ठरला आणि तो मुलीला बघण्यासाठी हिच्या घरी आला. हीच दोघांची पहिली भेट.
           त्याला बघितल्यावर तिची रिएक्शन की काय ध्यान आहे आणि त्याची तिच्याबद्दल प्रतिक्रिया किती गबाळी आहे ही😝ही पृथ्वीवर शेवटची मुलगी असेल तरी मी हिच्याशी लग्न नाही करणार( खरतर तो तिच्या बहिणीला बघायला आला होता आणि मनात हे 😝😝). पुढे ते लग्न जमलं नाही पण या दोघांची मात्र मस्त मैत्री झाली. तिचा स्वभाव बडबडा असल्याने तिने त्याला ही बोलण्यास भाग पाडलंच. आपल्या एकमेकांबद्दलच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर दोघेही प्रचंड हसत सुटले. एकीकडे तो त्याचं MBA  आणि नोकरी ह्यात बिझी होता आणि दुसरीकडे त्याचे कांदेपोहे पण चालूच होते . तिचं तिकडे पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होतं आणि सोबत तो मुली बघून आला की त्यावरून त्याला चिडवणे.
            तिचं कॉलेज संपलं आणि आता ती नोकरी शोधण्यात बिझी झाली. तसं तिच्या आईबाबांना तो आधीच आवडला होता पण हिला काहीच वाटतं नसल्याने त्यांनी विषय काढला नाही. आणि त्यालाही अजून तशी काही जाणीव झाली नव्हती. बाकी दोघेही सतत फोनवर संपर्कात होतेच हो फक्त फोनवरच कारण तो नाशिकला ती पुण्यात त्यामुळे त्या बहिणीच्या प्रोग्रॅम नंतर भेट अशी होणं शक्यच नव्हतं.
         अशाच गप्पा मारण्यात 2 वर्षं कधी निघून गेली दोघांनाही कळालं नाही. त्यात तिचा वाढदिवस आला. आणि तो दुसऱ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी हिलाच टिप्स विचारत होता त्या नादात विसरला. झालं दुसऱ्या दिवशी ती जाम भडकली मग पहिलं वहिलं भांडण झालं.
त्या नंतर त्याला जाणीव झाली की आपण जगभर जिला शोधतोय ती हीच😝😝.
तरीही त्याने मध्ये काही दिवस जाऊ दिले आणि मग शेवटी तिला विचारलं. मॅडम अजूनही लग्न ह्या बाबतीत मंदच होत्या, त्यामुळे त्याला होकार द्यायच्या ऐवजी तू माझ्या आईबाबांना विचार असं सांगून मोकळी झाली. त्याने ही तेच केलं तिला भेटण्यासाठी आणि मागणी घालण्यासाठी तो पुण्यात पोहोचला. आणि मग ३ डिसेंम्बर २०१० ला तिच्या घरच्यांच्या परवानगीने साखरपुडा ठरला.  २३ जानेवारी २०११ ला साखरपुडा होता तोपर्यंत त्याच्यासोबत फिरून भेटून तिला आता जाणीव झाली होती की येस he is the right guy.   आता मात्र मॅडमला स्वर्ग दोन बोटं उरला होता.
         अशी ही टेढी मेढी लव स्टोरी २९ मे २०११ ला नव्या बंधनात अडकली. तिला मात्र त्याला चिडवण्यासाठी आयुष्यभर पुरेल असं कारण मिळालं . हो जी पृथ्वीवर शेवटी उरली तरी तो लग्न करणार नव्हता तीच आता त्याची आयुष्यभराची सोबतीण झाली होती.
       अशा या आमच्या खोडकर नात्याला आता ६ वर्ष पूर्ण होतील. पण तो गोडवा ती ओढ आजही कायम आहे आणि राहील. थँक्यू हर्षल  for the wonderful relationship of togetherness and love💖💖 And also thanks आपण निवडलेल्या वेगळ्या वाटेवर खंबीर साथ देण्यासाठी.
गौरी हर्षल
२९.५.२०१७

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

असाही दोस्ताना

असाही दोस्ताना .......
जाने क्यू दिल जानता है तू है तो I will be allright……” असं म्हणत नाचणाऱ्या जॉन अभिषेक आणि प्रियांका ऐवजी अक्षताला ती आणि गायत्रीने सेंड ऑफला केलेला भन्नाट डान्स आठवून हसू येत होत आणि हसता हसता नकळत तिच्या डोळ्यात गायत्रीच्या आठवणीने पाणी आलं.
तेवढ्यात “ आई, किती वाईट आहे ग आराध्या!!” असं म्हणत अक्षताच्या लेकीने घरात एन्ट्री केली. लाडक्या लेकीचं आज काहीतरी बिनसलंय हे अक्षताच्या लक्षात आलं. हातातला लॅपटॉप बाजूला ठेवत ती अंशिकाच्या जवळ गेली. गोबरे गोबरे गाल लाल झाले होते आणि डोळ्यात कितीतरी मोत्यांची गर्दी झाली होती. अक्षताने डोक्यावरून हात फिरवताच सगळे मोती सांडू लागले. अक्षतानेही मग आधी तिचं रडणं संपू दिलं आणि शांत झाल्यावर तिला विचारलं, “काय झाल पिल्लू?” तसं अंशिकाने सांगितलं कि ती नव्हती दोन दिवस स्कूलमध्ये. त्याचवेळेस सगळ्यांचे प्रोजेक्ट कळाले मग आराध्याला दुसरी मुलगी पार्टनर म्हणून मिळाली, मग हिला राग आला आणि ती बोलली तिला काहीतरी. त्यावरून आराध्याला पण राग आला सो अघोषित अबोला चालू झाला आणि त्याचमुळे आज चिडचिड सुरु होती.
लेकीची समजूत घालून अक्षताने तिला खेळायला पाठवले. आणि इकडे तिचे मन भूतकाळात गेले. ती आणि गायत्री सख्ख्या बहिणी वाटाव्या इतकं साम्य होत दोघींमध्ये.तशा त्या लहानपणापासून ओळखत नव्हत्या एकमेकीना पण आतून जुळलेलं नातं होत ते. कुणालाही हेवा वाटावा असं. रिझल्टच्या आधी गावी गेलेली गायत्री ती परत येणार म्हणून खूप खुश होती अक्षता. पण ती कधीच परत आली नाही चौकशी केल्यानंतरही काहीच अक्षताच्याहाती नाही लागले. ती गेल्यानंतर कित्येक दिवस अक्षता तिला वेड्यासारखी शोधत होती. काहीच पत्ता न सापडल्याने शेवटी तिने तो नाद सोडून दिला. त्यानंतर थोड्याच दिवसात ती लग्न करून मुंबईत आली आणि मग हळूहळू जुनं सगळेच धूसर झाले.
 आज अंशिका आणि आराध्या च्या लुटुपुटूच्या भांडणाने तिला गायत्रीची आठवण आली. कशी असेल , कुठे असेल ती याचा विचार करत अक्षता पुन्हा कामाला लागली. तिच्या फोनवर तितक्यात एका अनोळखी नंबर वरून फोन आला.
“हॅलो, अंशिकाच्या आईशी बोलू शकते का?” तिकडून आलेला आवाज ऐकून क्षणभर अक्षताला गायत्रीचा भास झाला. “हो आपण ?” तिने विचारलं.
“ मी आराध्याची आई बोलतेय तन्वी. कालपासून तिचं काय बिनसलंय कळत नाही म्हणून मला वाटलं तुम्हाला कल्पना असेल.”
तन्वीला अक्षताने सगळी स्टोरी सांगितली. मग दोघींनी मिळून संध्याकाळी बागेत भेटण्याचे ठरवले. अक्षताला का कुणास ठाऊक या भेटीची एक ओढ लागली. संध्याकाळी सगळं आवरून ती अंशिकाला घेऊन पार्कमध्ये पोहोचली. आत एन्ट्री करत असतांनाच अंशू...... अशी जोरदार आरोळी कानावर आली आणि त्या मागेच वाऱ्याच्या वेगाने धावत आराध्या अंशिका च्या गळ्यात येऊन पडली. मग लटक्या रागाने एकमेकीना रागावत रुसत दोघी खेळायला निघून गेल्या. त्यांची ती निरागस मैत्री बघण्यात अक्षता इतकी गुंग झाली होती कि तन्वी मागे आल्याच तिच्या लक्षातच नाही आलं.
“कशी आहेस अक्षु?” तब्बल १० वर्षांनी हा आवाज तिच्या कानावर पडत होता पण त्यात जी ओढ होती ती अजूनही तशीच आहे हे जाणवत होतं. गरकन मागे वळून बघितल्यावर अक्षताला धक्काच बसला ती तिच होती जिचा शोध घेण अजूनही अक्षताच्या मनाने थांबवलं नव्हतं. तिची soul sister गायत्री. तिला समोर बघताच अक्षताला काहीच बोलायला सुचेना शांतपणे तिचा हात हातात घेत गायत्रीने तिच्याकडे पहिले. अक्षता तिच्यासमोर गुढघ्यावर बसली कारण गायत्री व्हील चेअर वर होती. पुढचा काही वेळ काहीच न बोलता त्या दोघी बरंच काही बोलल्या. गायत्रीने गावावरून परत येत असताना झालेल्या अपघातात फक्त पायच नाही तर सगळं कुटुंब गमावलं होत. त्यावेळेस खूप पैसा असूनही तिच्यावर एका आश्रमात राहायची वेळ आली होती कारण कित्येक दिवस ती काहीच बोलत नव्हती. मग अशा परिस्थितीत अक्षताला सांगणार तरी कोण? आश्रम ज्यांचा होता त्या डॉ. जोशींनी पुढे होऊन तिला बरं करण्याचा चंगच बांधला. आणि मग २  वर्षांच्या त्यांच्या मेहनतीला फळ आले. गायत्री हळूहळू प्रतिसाद देऊ लागली. तोपर्यंत डॉक्टरांनी तिचं तन्वी असं बारस केलं होत. त्याचं काळात डॉक्टरांच्या मुलाने तिला लग्नाची मागणी घातली आणि ती मिसेस तन्वी जोशी झाली. तन्वीनेही अक्षताला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तोपर्यंत अक्षताचेही घराचे दुसरीकडे निघून गेले होते. मग तीही तिच्या संसारात रमली.
आजचा दिवस मात्र त्या दोघींसाठी आणि त्यांच्या मुलींसाठीही खूप स्पेशल ठरला. त्यानंतर अक्षताने स्वतः तन्वीच्या डॉक्टरांची भेट घेत तिच्या पायाच्या बाबतीत चौकशी केली तेंव्हा तिला कळाले कि तिचे पाय अजूनही नीट होऊ शकतात पण प्रंचड मानसिक धक्क्यामुळे तन्वीच शरीर मेडीसिनला हवं तसं प्रतिसाद देत नाही. आता कसोटी अक्षताची होती ती स्वतः सगळे डिटेल्स घेत तन्वीला प्रोत्साहन देऊ लागली आणि काही महिन्यातच तिच्या प्रयत्नांना यश आलं.
आज तब्बल २ वर्षांनतर अक्षता आणि तन्वी मुलींसोबत सायकल राईडला निघाल्या होत्या. बॅकग्राउंडला गाणं वाजत होतं.
जाने क्यू दिल जानता है तू है तो I will be allright, I will be allright...... 

गौरी हर्षल

२३ फेब्रुवारी २०१७