मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

boundaries style quiz


आपण जेंव्हा म्हणतो की आसपासची लोकं मला गृहीत धरतात किंवा मला ठरवून सुद्धा त्रासदायक लोकांपासून अंतर ठेवून वागता येत नाही तेंव्हा आपल्याला त्या नात्यात अपेक्षित मर्यादा स्पष्ट करता येत नाही हे नक्की. 
पण जर आपल्याला आपल्या मर्यादा किंवा boundaries चा अंदाज आला किंवा त्याबद्दल नेमक्या काही गोष्टी समजल्या तर?? 
म्हणूनच तर ही प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. लक्षात घ्या ही कोणतीही मानसशास्त्रीय चाचणी नाही. हे काही साधे सोपे प्रश्न आहेत जे आपल्याला आपल्याच वागण्याचे प्रतिबिंब दाखवतील. ज्यावरून आपण नेमके काय बदल करायला हवेत हे आपल्याला समजेल. 
Boundaries चे चार प्रकार असतात आपण त्यापैकी कोणत्या प्रकारात मोडतो हे जाणून घ्यायचे असेल तर या प्रश्नांची प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 
सूचना - खाली दिलेल्या प्रश्नांच्या पर्यायांपैकी जो पर्याय तुमच्या स्वभावाचे अचूक किंवा साधर्म्य दाखवणारे वर्णन करतो तो निवडा. 
1. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला मदत मागते तेव्हा तुम्ही काय करता?
a) ते काम तुम्हाला जमणार आहे की नाही याची खात्री नसताना सुद्धा लगेच होकार देता. 
b) होकार देण्याआधी काही प्रश्न विचारून सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न करता. 
c) नकार देता किंवा विचार करून सांगतो असं कळवता. 
d) त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता किंवा त्या व्यक्तीला टाळता. 
2. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्ही स्पष्ट करून सुद्धा तुमच्या ठरवलेल्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या गरजांचा अनादर करते तेव्हा तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता? 
a) तुम्ही रागावता किंवा बचावात्मक पवित्रा घेता, पण शेवटी हार मानता. 
b) तुम्ही शांतपणे आणि ठामपणे तुमच्या गरजा आणि मर्यादा स्पष्ट सांगत संवाद साधता. 
c) तुम्ही वादविवाद टाळता आणि गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न करता. 
d) तुम्ही आक्रमक पवित्रा घेता. 
3. जर एखादे काम समूहासोबत करण्याची वेळ आली तर...
a) तुम्ही सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेऊन सर्व काही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता. 
b) इतरांसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करता, पण सोबतच स्वतःच्या गरजा आणि मर्यादा आधीच स्पष्ट करून सांगता. 
c) इतरांना पुढाकार घेऊ देता आणि स्वतःच्या गरजा स्पष्ट करून सांगणे टाळता. 
d) कामामध्ये दिरंगाई करता किंवा जबाबदारी घेण्याचे टाळत इतरांना गोष्टी करू देण्याकडे तुमचा कल असतो. 
4. तुम्ही स्वतःच्या गरजा आणि इच्छा यांची प्रायोरिटी कशी ठरवता?
a) तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करत नेहमीच इतरांना प्राधान्य देता. 
b) तुम्ही स्वतःच्या गरजा आणि इच्छा यांना प्राधान्य देता पण बरोबरीने इतरांना सुद्धा मदत करता. 
c) तुम्ही स्वतःच्या गरजा आणि इच्छा यांना प्राधान्य देता पण त्याचवेळी तुम्ही इतरांकडे मात्र दुर्लक्ष करता. 
d) आपल्या महत्त्वाच्या गरजा आणि इच्छा काय आहेत हेच तुम्हाला माहीत नाही. 
5. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला गरज नसताना सल्ला देते किंवा तुमच्याविषयी अतिशय टोकाची प्रतिक्रिया व्यक्त करते तेव्हा तुम्ही काय करता?? 
a) ती गोष्ट मनाला लावून घेत आक्रमक पवित्रा स्वीकारता. 
b) समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करता. 
c) अतिशय नम्रपणे त्या व्यक्तीचे आभार मानता पण स्वतःच्या मतांना आणि गरजांना प्राधान्य देता. 
d) त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करता आणि त्यांचा सल्ला उडवून लावता. 
6. आपण बऱ्याचदा अति आश्वासन देऊन अंगावर जास्तीच्या जबाबदाऱ्या ओढवून घेत आहोत असं तुम्हाला वाटतं का??
a) Yes, all the time हो नेहमीच
b) Sometimes कधीतरी
c) Rarely कमी वेळेला
d) Never कधीच नाही
7. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला इच्छा नसतानाही एखादे काम करण्यासाठी सांगते तेव्हा ती परिस्थिती तुम्ही कशी हाताळता? 
a) तुम्ही मनात नसताना सुद्धा ते काम करण्यासाठी तयार होता. आणि ते काम करता. 
b) तुम्ही दुसरा एखादा मार्ग शोधण्याचा किंवा तडजोड करण्याचा प्रयत्न करता. 
c) तुम्ही स्पष्टपणे नकार कळवता पण नंतर तुम्हाला अपराधी किंवा अस्वस्थ वाटत राहते. 
d) तुम्ही स्पष्टपणे नकार कळवता आणि त्यानंतरही तुम्ही आत्मविश्वासाने आणि सकारात्मक पद्धतीने गोष्टी हाताळता. 
8. तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांना, मित्रमंडळींना, सहकाऱ्यांना नकार देणे जीवावर येते का?? 
a) Yes, it's very hard for me
b) Sometimes
c) Rarely
d) Never
9. तुम्ही स्वतःच्या मानसिक आणि भावनिक गरजांची प्राथमिकता किंवा प्रायोरिटी कशी ठरवता? 
a) तुम्ही स्वतः पेक्षा नेहमीच इतरांना जास्त प्राधान्य देता. 
b) तुम्ही स्वतःच्या गरजांना प्राधान्य देत स्वतःसाठी आवर्जून वेळ काढता. 
c) तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावनिक गरजांना प्राधान्य देता, परंतु काहीवेळा इतरांच्यावर अवलंबून राहता. 
d) तुम्हाला तुमच्या भावनिक गरजा नेमक्या काय आहेत हेच स्पष्ट झालेले नाही. 
10. जेव्हा कोणी तुमच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तुम्ही:
 a) स्वतःची हार मान्य करत त्या व्यक्तीला हवे तसे वागू देता. 
 b) खंबीरपणे उभे राहता आणि आपल्या गरजा ठामपणे सांगता 
 c) तडजोड करता आणि मध्य साधण्याचा प्रयत्न करता
 ड) परिस्थिती पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करता
11. जेव्हा इतर लोक तुमच्या सीमांचा आदर करत नाहीत तेव्हा तुम्हाला अनेकदा नाराजी वाटते किंवा राग येतो का?
a) Yes, all the time
b) Sometimes
c) Rarely
d) Never
12. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला अपराधीपणा जाणवून देत एखादे काम करून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा तुम्ही परिस्थिती कशी हाताळता?? 
a) तुम्ही स्वतःची हार मान्य करत ते जे सांगत आहेत तसं करण्याचा प्रयत्न करता. 
b) तुम्ही त्यांच्याशी बोलून तडजोड करण्याचा किंवा दुसरा एखादा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करता. 
c) तुम्ही तुमच्या गरजा आणि मर्यादा अतिशय ठामपणे सांगता. 
d) तुम्ही ती परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करता. 
13. तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर नात्यांमधली मर्यादा किंवा सीमा निश्चित करणे अवघड जाते का?? 
a) Yes, it's very hard for me
b) Sometimes
c) Rarely
d) Never
14. तुम्ही स्वतःच्या शारीरिक गरजांना किती प्राधान्य देता? 
a) तुम्ही स्वतः ऐवजी इतरांच्या शारीरिक गरजांना प्राधान्य देता. 
b) तुम्ही स्वतःच्या गरजांना प्राधान्य देत स्वतःसाठी आवर्जून वेळ काढता. 
c) तुम्ही तुमच्या स्वतःच्या शारीरिक गरजांना प्राधान्य देता, परंतु काहीवेळा इतरांच्यावर अवलंबून राहता. 
d) तुम्हाला तुमच्या शारीरिक गरजा नेमक्या काय आहेत हेच स्पष्ट झालेले नाही. 
15. जेव्हा कोणी तुम्हाला पैसे उसने मागते, तेव्हा तुम्ही:
a) तुम्ही तुम्हाला शक्य नसताना सुद्धा होकार देता. 
b) तुम्ही दुसरा एखादा मार्ग शोधण्याचा किंवा तडजोड करण्याचा प्रयत्न करता. 
c) तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने आणि ठामपणे नकार देता. 
d) तुम्ही नकार देता पण त्यानंतर तुम्हाला अपराधीपणाची किंवा अस्वस्थतेची भावना जाणवू लागते. 
16. इतरांच्या गरजा पूर्ण करत असताना तुम्ही बऱ्याचदा थकून जाता का?? 
a) Yes, all the time
b) Sometimes
c) Rarely
d) Never
17. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या वागण्या बोलण्यावरून तुम्हाला जज करते तेव्हा तुम्ही परिस्थिती कशी हाताळता? 
 a) ती गोष्ट मनाला लावून घेत आक्रमक पवित्रा स्वीकारता. 
b) समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करता. 
c) अतिशय नम्रपणे त्या व्यक्तीचे आभार मानता पण स्वतःच्या मतांना आणि गरजांना प्राधान्य देता. 
d) त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करता आणि त्यांचा सल्ला उडवून लावता. 
18. तुम्हाला तुमच्या अतिशय जवळच्या कुटुंबीयांसोबत नात्यांमध्ये सीमा ठरवणे अवघड जाते का?? 
a) Yes, it's very hard for me
b) Sometimes
c) Rarely
d) Never
19. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला बोलताना मध्येच थांबवते किंवा तुमचे मत तडकाफडकी उडवून लावते तेव्हा तुम्ही काय करता? 
a) तुम्ही रागावता किंवा बचावात्मक पवित्रा घेता. 
b) तुम्ही शांतपणे आणि ठामपणे तुमच्या गरजा आणि मर्यादा स्पष्ट सांगत संवाद साधता. 
c) तुम्ही वादविवाद टाळता आणि गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न करता. 
d) तुम्ही आक्रमक पवित्रा घेता. 
20. इतरांसोबत वावरताना तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक वावरावे लागते असे वाटते का?? 
a) Yes, all the time
b) Sometimes
c) Rarely
d) Never
21. इतरांच्या विरोधी मागण्यांचा सामना करताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या गरजांना प्राधान्य कसे देता?
a) तुम्ही नेहमीच इतरांच्या गरजांना प्राधान्य देता. 
b) तुम्ही तडजोड करून मध्यम मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. 
c) तुम्ही स्वतःच्या गरजांना प्राधान्य देता पण सोबतीने इतरांकडे सुद्धा लक्ष देता. 
d) आपल्या गरजांची प्रायोरिटी कशी ठरवावी हेच तुम्हाला माहीत नाही. 
22. तुम्हाला तुमच्या पेक्षा वरिष्ठ ठिकाणी असणाऱ्या व्यक्तींना नकार देताना अडचण जाणवते का?? उदा. घरात वयाने मोठे आणि ऑफिस मध्ये सिनिऑरिटीने 
a) Yes, it's very hard for me
b) Sometimes
c) Rarely
d) Never
23. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला कंट्रोल करण्याचा किंवा तुमचे वागणे ठरवण्याचा प्रयत्न करते तेव्हा तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता?? 
a) तुम्ही स्वतःची हार मान्य करत ते जे सांगत आहेत तसं करण्याचा प्रयत्न करता. 
b) तुम्ही त्यांच्याशी बोलून तडजोड करण्याचा किंवा दुसरा एखादा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करता. 
c) तुम्ही तुमच्या गरजा आणि मर्यादा अतिशय ठामपणे सांगता. 
d) तुम्ही ती परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करता. 
24. कधी कधी एखाद्या नात्यामध्ये तडजोड करताना आपण स्वतःलाच हरवून बसत आहोत असं तुम्हाला वाटतं का?? 
a) Yes, all the time
b) Sometimes
c) Rarely
d) Never
25. तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावनिक स्वास्थ्याला प्राधान्य कसे देता?
a) तुम्ही नेहमीच इतरांच्या गरजांना प्राधान्य देता. 
b) तुम्ही तडजोड करून मध्यम मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. 
c) तुम्ही स्वतःच्या गरजांना प्राधान्य देता पण त्यासाठी इतरांवर अवलंबून राहता. 
d) आपल्या भावनिक गरजांची प्रायोरिटी कशी ठरवावी हेच तुम्हाला माहीत नाही. 
26. तुमचा वेळ आणि उर्जेच्या बाबतीत सीमा निश्चित करण्यात तुम्हाला अडचण येत आहे का?
a) Yes, it's very hard for me
b) Sometimes
c) Rarely
d) Never
27. जेव्हा वारंवार सांगूनही एखादी व्यक्ती नात्यांमध्ये मर्यादेचे उल्लंघन करते तेव्हा तुम्ही परिस्थिती कशी हाताळता?? 
a) तुम्हाला राग अनावर होतो.
b) तुम्ही अतिशय शांतपणे आणि ठामपणे स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करता. 
c) तुम्ही वादविवाद टाळून परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करता.
d) तुम्ही नाराज होता.
28. एखाद्या नात्यामध्ये जबाबदारीचे सर्व ओझे आपल्याच खांद्यावर आले आहे असे तुम्हाला नेहमी वाटते का?? 
a) Yes, all the time
b) Sometimes
c) Rarely
d) Never
29. तुम्ही स्वतःच्या शरीराच्या गरजा आणि शारीरिक स्वास्थ्याची प्रायोरिटी कशी ठरवता? 
a) तुम्ही नेहमीच इतरांच्या गरजांना प्राधान्य देता. 
b) तुम्ही स्वतःच्या गरजा ओळखून स्वतःची काळजी घेण्यासाठी आवर्जून वेळ काढता. 
c) तुम्ही स्वतःच्या गरजांना प्राधान्य देता पण त्यासाठी इतरांवर अवलंबून राहता. 
d) आपल्या गरजांची प्रायोरिटी कशी ठरवावी हेच तुम्हाला माहीत नाही. 
30. स्वतःच्या मर्यादा ठामपणे आणि आत्मविश्वासाने सांगण्याबाबत तुम्हाला अडचण जाणवते का? 
a) Yes, it's very hard for me
b) Sometimes
c) Rarely
d) Never

स्वतःला शोधताना गौरी हर्षल 

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४

Change your story...


 #change_your_story
माणसाला बदलाची भीती कायम वाटत असते. कारण कुठलाही बदल घडताना काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात तर काही गोष्टी नव्याने अंगिकाराव्या लागतात. आणि या प्रवासात आपण हमखास मागे सुटलेल्या गोष्टींचा विचार करत असतो. बऱ्याचदा त्या टप्प्यापर्यंत पोहोचताना आपण काय कमावलं आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. 
Read that again.

दुर्दैवाने ज्या गोष्टी आपल्याला सोडाव्या लागल्या आहेत किंवा ज्या आपल्या आयुष्यातून आपोआप वजा झाले आहेत आपण त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो. पण तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त लक्ष आपण आयुष्यात काय मिळवू शकतो किंवा आपल्याला काय मिळायला हवे याकडे नसते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण काय डिझर्व्ह करतो हेच आपल्याला माहीत नसते. 

कधी कधी आपल्या हातात असलेली छोटीशी गोष्ट आपण घट्ट धरून ठेवलेली असते. ती घट्ट धरून ठेवण्यामागे अर्थातच आपल्या मनात गमावण्याची भीती असते. पण त्या भीतीच्या दुसऱ्या टोकाला बऱ्याचदा काहीतरी खूप मोठं आणि आपल्याला अनपेक्षित असणार सुखद सरप्राईज असतं. अर्थात जोपर्यंत ती गोष्ट आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपला तिच्यावर विश्वास बसत नाही हे मात्र नक्की.‌

पण एक गंमत सांगू का? ही मनात असलेली भीती नकळतच आपल्या मनाचे, हृदयाचे नवीन काहीही स्वीकारण्याचे सगळे दरवाजे बंद करून टाकते. मग या बंद दरवाजांपर्यंत दुर्दैवाने काहीच पोहोचू शकत नाही. 
मग अशा वेळेला काय करायचं? तर काही साध्या सोप्या गोष्टी असतात त्या प्रामाणिकपणे स्वतःला विचारायच्या आणि त्यांची मनाशी संवाद साधल्यानंतर मिळणारी उत्तर स्वीकारण्याचा प्रयत्न करायचा. 
मी स्वतः वापरते अशा काही छोट्याशा टिप्स - 
👉🏼 माझ्यासोबत ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या स्वीकारण्याची संधी मी स्वतःला देते आहे का? 
How much am I ALLOWING myself to receive at this moment?

हा प्रश्न स्वतःला विचारल्यानंतर स्वतःचे नीट निरीक्षण करा.‌ आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये काय बदल घडत आहेत ते बारकाईने तपासा. 
👉🏼तुम्ही आत्ता ज्या स्थितीमध्ये आहात तिथे तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही याचा विचार करा. 
👉🏼 दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना आपण पुरेसा ऑक्सिजन आत मध्ये घेत आहोत की नाही याकडे लक्ष द्या. त्यानंतर हळूहळू श्वास सोडा. 
👉🏼 या अतिशय आपसूक घडणाऱ्या गोष्टी आहेत. आपण आवर्जून कधीही यांच्यावर लक्ष केंद्रित करत नाही. 
👉🏼हीच गोष्ट आपल्याकडून आपल्या बाबतीत घडणाऱ्या चांगल्या गोष्टींच्या बाबतीत सुद्धा होते. आपण बऱ्याचदा चांगल्या गोष्टी, चांगल्या व्यक्ती ह्यांना गृहीत धरत असतो. आणि त्यामुळे आपल्या विचारांचा फोकस हा आपल्याला काय मिळालेलं नाही यावर जास्त असतो. 

गोष्टी हातातून निघून गेल्यानंतर त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यापेक्षा त्या हातात असताना कृतज्ञता व्यक्त करणे कधीही चांगलंच असतं. त्यामुळे नकळतच आपण आपल्याकडे येणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी वाट करून देत असतो. "आपण जे देतो ते दाम दुपटीने आपल्याकडे परत येतं" हे नेहमी आपण दुसऱ्याच्या बाबतीतच का म्हणतो?? स्वतःसाठी का नाही?? जर आपण आपल्यासाठी चांगले विचार केले, आपल्यासाठी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, तर नकळतच आपल्या दिशेने येणाऱ्या चांगल्या गोष्टींमध्ये चांगल्या अनुभवांमध्ये भर पडू शकते. 

गरज असते ती फक्त आपल्या दृष्टिकोनाला पुन्हा पुन्हा रिसेट करण्याची... हे काही फार अवघड नसतं. पण ते करण्यासाठी आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यावं लागतं हे मात्र नक्की. 

शेवटी म्हणतात ना, आपण जर कधी गोष्टी संपवण्याचा विचार करत असो तर एकदा आपण एवढा टप्पा पूर्ण करून इथपर्यंत कसे पोहोचलो आहोत याचा सुद्धा विचार करावा. कारण आपण आज जिथे उभे आहोत तिथे येण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागले आहेत. आणि त्या कष्टांचे चीज तेव्हाच होईल जेव्हा आपण स्वतःसाठी निवडलेल्या मार्गावर सातत्याने चालत राहू. 
सो, आजचा हा रिमाइंडर ज्याला तुम्ही affirmation सुद्धा म्हणू शकता, नक्कीच लक्षात ठेवा, 
I am always a work in progress. I am never done. I am constantly improving, upgrading, expanding, growing, experimenting, exploring and discovering a better version of myself. 
बाकी? बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!! 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
लेखन - गौरी हर्षल कुलकर्णी 
(एम ए क्लिनिकल सायकॉलॉजी, समुपदेशन )

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

Prisoner of your own thoughts 6/8

Prisoner of your own thoughts 

 दत्तगुरु 👉🏼चाणक्य👉🏼 आणि मी
चाणक्य लिहीत असताना हल्ली बऱ्याचदा माझ्या ज्ञानात भर पडत असते. आणि खरं तर ती पडायलाच हवी. कारण कधी काळी मित्रासमोर बसून रडत रडत केलेल्या तक्रारीवर चाणक्य हा उपाय आहे असं मला वाटत. मला नाही कळत रे तुझ्या जगाचे छक्के पंजे असं मी नेहमी म्हणायचे. हे ऐकून ऐकून कदाचित दत्त वैतागले असतील 🫣 आणि म्हणाले असतील घे बाई एका दगडात दोन पक्षी मारतो. तू बिझी पण राहशील आणि खरे छक्के पंजे कसे असतात हे पण कळेल. ते सुद्धा त्यामध्ये "द" असलेल्या माणसाच्या चरित्रातून🤷 
खरा गुरू हा एका जागी बसवून शिकवत नाही हे मात्र खरं. तो आपल्या शिष्याला स्वतः प्रयत्न करण्यासाठी भाग पाडतो. 
मग ते एखादं नवीन स्किल शिकणं असो किंवा स्वतःच्या मनातल्या भीतीवर मात करणं. जोपर्यंत शिष्य त्यातून योग्य तो धडा शिकत नाही तोपर्यंत सराव कम्पल्सरी... 
सो गेल्या काही महिन्यात एक गोष्ट सातत्याने समोर आली ती म्हणजे, गुलामगिरी मग ती नात्यातली असुदे किंवा विचारांची... जोपर्यंत माणूस स्वतः त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्याची सुटका होत नाही. नात्यातली गुलामगिरी म्हणजे आजच्या भाषेत toxic relationships, red flags वगैरे वगैरे... आणि विचारांची गुलामगिरी म्हणजे तर मोठी लिस्ट आहे.... overthinking, negative thoughts, negative self talk, negative self image बला... ब्ला....ब्ला....

तर तुम्ही स्वतः जोपर्यंत काही गोष्टी स्वीकारत नाही तोपर्यंत आयुष्याचा प्रवास सुकर होत नाही. इथे गरज असेल तेंव्हा बाहेरची मदत सुद्धा घ्यावी पण कुणाची तर एखाद्या तज्ञ व्यक्तीची. उगाचच कुठल्याही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे पेजेस पाहून त्यांच्याकडे जाऊ नये. 
असो, जाता जाता एकच सांगते, माझ्या गुरूने माझ्यासाठी जसा अजून एक गुरू पाठवला. तसं तुम्हीही योग्य वेळी योग्य गुरूला शरण जा. 
शिकवत तर सगळेच असतात एकमेकांना 
पण गुरूचं शिकवणं वेगळचं असतं...
हे अनुभवा अंती सांगते. 
खरा गुरू तुम्हाला अनुभवांच्या भट्टीतून तावून सुलाखून बाहेर काढल्याशिवाय थांबत नाही. फक्त आपल्याला ते कळायला हवं. 
गुरूवार = संकल्पदिन 
#दृष्टिकोन_बदला_आयुष्य_बदलेल
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
६/८








Shadows of yesterday 5/8

Shadows of yesterday....

भूतकाळ ही काही अडकून पडण्याची गोष्ट नाही. पण आपल्यापैकी बरेच जण भूतकाळातच अडकलेले असतात. त्या ऐवजी त्या भूतकाळाला एक स्टेपिंग स्टोन म्हणून घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. भूतकाळात घडलेल्या गोष्टी कधीकधी आपल्याला त्रासदायक ठरत असतात. पण अशा घटनांना स्वीकारून त्या अनुभवातून योग्य तो धडा घेणे आणि स्वतःच्या व्यक्तीमत्त्वामध्ये त्या दिशेने बदल करणे हे खूप जास्त गरजेचे असते. हे असं करणं सोपं नक्कीच नसतं.

 पण त्या आव्हानाला एकदा स्वीकारल्यानंतर आयुष्य जगण्याची खरी मजा कशात आहे हे मात्र माणसाला कळतं. मग अशा कितीही चुकीच्या घटना घडल्या संकटं आली तरी माणूस ठामपणे त्यांना सामोरे जातो. शिवाय भूतकाळ स्वीकारून त्यातून योग्य तो धडा शिकलेला व्यक्ती पुन्हा पुन्हा त्या घटना, त्या व्यक्ती समोर आल्या तरी कमकुवत होत नाही. शेवटी भूतकाळात रमून भविष्यकाळावर किती परिणाम करत राहायचं हे आपल्या हातात असतं. 

माझ्या लेखांमध्ये बऱ्याचदा उल्लेख असतो की भूतकाळात घडून गेलेल्या घटना मधून आपण काय शिकलो ते आठवा. त्यावर मनन चिंतन करा. आणि त्या गोष्टींना मार्गातला अडथळा बनवण्यापेक्षा भविष्याच्या दिशेने जाणारी पायरी बनवा. 
माफ करण्याचा प्रयत्न करा. मग ते माफ करण स्वतःला असू दे किंवा इतरांना.... माफ केल्याने भूतकाळाच्या सावल्यांपासून स्वतःची सुटका करून घेण्याचा मार्गच आपण सुकर करत असतो. 
Start where you are....
मी असं केलं तर.... तसं होईल.... असा विचार करत बसण्यात आपण भरपूर वेळ वाया घालवत असतो. त्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यासाठी पाऊल उचलणं गरजेचं असतं. स्वयंशिस्त किंवा self discipline हे कशी गोष्ट आहे जी आपण अंगी बाणवणे गरजेचे असते. आणि त्यासाठी छोट्या छोट्या कृतींमधून पाऊल पुढे टाकावे लागते. म्हणून तर म्हटले आहे की, start where you are... 
तुम्ही आत्ता जिथे आहात तिथून सुरुवात करा. या आधी भलेही काहीही घडलेलं असेल. पण आता त्या गोष्टींना मागे टाकून नव्याने सुरुवात करण्यातच भलाई आहे. हळूहळू आपली पावलं ध्येयाच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात करतील. आणि मग एक दिवस नक्कीच यश आपल्या हातात आलेलं असेल. 


#दृष्टिकोन_बदला_आयुष्य_बदलेल
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
५/८



शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

blind perception 4/8

Blind perception 

या लेखमालेतल्या आधीच्या एका लेखावरती एक कमेंट आली होती. ती म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतो, तेव्हा त्यातली काही लोक मात्र आपल्याला खिजवण्यासाठी आपला अपमान करतात किंवा आपल्याला तुच्छ लेखतात. त्यांना असं वाटतं की त्यांनी जे काही यश मिळवलं आहे. त्याच्यामुळे आता समोरच्याला स्वतःच्या लायकीची जाणीव झाली असेल. 
तर इथे पुन्हा एकदा तुलनेचा मुद्दा येतो. काही लोकांना दुसरे यशस्वी झाले तर पोटात दुखत तर काही लोकांना ते स्वतः यशस्वी झाले की दुसऱ्यांना त्रास द्यावासा वाटतो. पण या दोन्ही कॅटेगरी मधल्या लोकांना इतरांशी आपल्या आयुष्याची तुलना करण्याची सवय असते. आता इथे लोकांनी असं करावं की करू नये हा मुळात वादाचा मुद्दा नाही. 
मुद्दा हा आहे की जेव्हा लोक असे वागतात तेव्हा आपण कशा पद्धतीने त्या गोष्टी घ्यायच्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची की समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करत आहे, हा पूर्णपणे तिचा दृष्टिकोन आहे. त्या व्यक्तीचा दृष्टिकोन जेव्हा आपण स्वीकारतो, तेव्हा नकळतच तिने आपल्याबद्दल केलेल्या कल्पना मग त्या खऱ्या असो किंवा नसो त्या आपण स्वीकारत असतो. तर आपण हे पर्सनली घेणं थांबवायला हवं. 
आपल्याबद्दल इतरांचा दृष्टिकोन आपण कसे आहोत हे ठरवत नाही. तर आपण स्वतः स्वतः बद्दल काय विचार करतो त्यावरून आपले व्यक्तिमत्व ठरते. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल ना की माणसाने घातलेले कपडे, त्याने केलेला मेकअप यापेक्षा सुद्धा तो आत मधून स्वतःबद्दल काय फील करतो त्याने त्याचं व्यक्तिमत्व जास्त ठळक होतं. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या यशाच्या फुटपट्टीतून आपल्या आयुष्याचा मोजमाप काढत असेल तेव्हा ते न स्वीकारणं हाच योग्य मार्ग असतो. 

बाकी स्वभावाला औषध नसतच.‌ आणि जी लोक यशस्वी झाल्यानंतर इतरांशी नीट वागत नाहीत त्या लोकांचे पुढे जाऊन काय होतं ते मी सांगायची गरज नाही. 
बाकी अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी ती म्हणजे या प्रत्येक गोष्टी फिरून फिरून पुन्हा बाउंड्रीज सेट करण्यावर जाऊन थांबतात. नातं जवळच असो किंवा लांबच त्यामध्ये मर्यादा पाळणं हे खूप जास्त गरजेचे असतं. कारण त्या मर्यादा कटू गोष्टी टाळण्यासाठी मदत करतात. 

 जाता जाता एक सांगते, आपण कितीही म्हणालो की पुराणातली वांगी पुराणात.... तरी कुठल्याही प्रकारचे यश मिळाल्यानंतर उतू मातू नये आणि घेतलेला वसा सुद्धा टाकू नये. 
याचा साधा सरळ अर्थ म्हणजे आपण यश मिळवण्यासाठी जे कष्ट केले आहेत त्याच मार्गावर सातत्याने चालत राहावं पुढे यशस्वी होण्यासाठी... 
#दृष्टिकोन_बदला_आयुष्य_बदलेल
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
४/८

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

Turning point = upgrade yourself 3/8

Turning point = upgrade yourself 
कधी कधी आयुष्यात अचानक काही गोष्टी घडतात. एखादं आव्हान समोर उभे ठाकते, अचानक स्मूद चाललेल्या आयुष्याच्या गाडीला ब्रेक लागतो, काहीतरी अनपेक्षित वळण आयुष्य 360 डिग्रीच्या कोनातून बदलून टाकते.... त्यावेळेला आपण आधी असं म्हणतो की मीच का?? माझ्यासोबतच का?? 
आणि खरं सांगायचं तर त्यावेळी आपल्याला त्या फेजमध्ये होणाऱ्या त्रासाशिवाय दुसरं काहीच दिसत नसतं. या गोष्टीला कालांतराने काही वेळ, दिवस, महिने, वर्षं उलटून जातात आणि मग जेव्हा आपण मागे वळून पाहतो.
 तेव्हा आपल्या लक्षात येतं की तो त्रास यातना ते दुःख वेदना हे आपल्याला घडवण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे होते. 
आयुष्यात जोपर्यंत अडथळे येत नाहीत, आव्हान समोर उभं ठाकत नाही, एखादा धक्का बसत नाही. तोपर्यंत आपण आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर जायला तयार नसतो. कदाचित त्यामुळेच नियतीची किंवा देवाची अशी इच्छा असते की आपल्याला बसलेल्या झटक्याने तरी आपण जागे व्हावे. 
सो अशा धक्के खात.... टक्के टोणपे सहन करत.... आयुष्याच्या रोलर कोस्टल राइडवर अजूनही टिकून असणाऱ्या सगळ्यांसाठीच आजचा रिमाइंडर... 
एकदा निवांत वेळ काढून आपल्या पूर्वायुष्यातल्या प्रत्येक अनुभवावर चिंतन करा. 
त्या अनुभवातून आपण कोणकोणत्या चांगल्या गोष्टी शिकलो हे एका ठिकाणी नमूद करून ठेवा. 
शिवाय त्या अनुभवामुळे आपण माणूस म्हणून किती घडलो आहोत याचा आढावा घ्या. 
अनुभव हे धडे देण्यासाठी असतात. पण हे धडे शाळेतल्या धड्यांसारखे शिकून विसरून जायचे नसतात तर ते कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे असतात. आणि त्या धड्यांना गिरवत आयुष्याचा एक एक टप्पा पुढे जायचं असतं. 
गोष्टी घडून गेल्यानंतर कधीतरी आपल्या प्रत्येकाच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडतं जे काही होतं ते चांगल्यासाठीच...
मग योग्य वेळी या चांगल्यासाठी घडणाऱ्या गोष्टी स्वीकारून आपण स्वतःला घडवण्याच्या दिशेने पाऊल टाकूया...
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
३/८



 

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

comparison 2/8

आपल्या आयुष्यात आपल्याला अशा काही व्यक्ती भेटतात, ज्यांना दुसऱ्यांना कुठल्याही गोष्टीत यश मिळालं तरी पोटात दुखतं. मग अगदी त्या स्वतः रनिंग रेस मध्ये पहिल्या आल्या असल्या आणि दुसरी व्यक्तीची लिंबू चमचाच्या शर्यतीत पहिली आली असली, तरी त्यांना दुसऱ्याच्या लिंबू चमचाच्या शर्यतीत पहिलं येण्याने त्रास होत असतो. आणि तो त्रास त्या व्यक्त सुद्धा करत असतात. पण आपल्या असं करण्याने इतर लोक दुखावली जात आहेत हे त्यांच्या गावी सुद्धा नसतं. कधी कधी चुकून आपण सुद्धा असं वागतो बर का...

यामध्ये जी दुखावलेली लोक असतात ना? ती मात्र बऱ्याचदा स्वतःला एक प्रश्न विचारत असतात, की माझ्या यशाने या समोरच्या व्यक्तीच्या यशात किंवा आयुष्यात काहीच फरक पडणार नाहीये. मग हिला एवढा त्रास का होतोय?? तर त्याचं मुख्य कारण फक्त एवढंच असतं की त्या व्यक्ती स्वतःचा आयुष्य दुसऱ्यांबरोबर सातत्याने कम्पेअर करत असतात. 
त्यांना दुसऱ्याच्या आनंदात, यशात सहभागी व्हावेसे वाटत नाही. अर्थात यामुळे कोणाचाही यश किंवा आनंद कमी होत नाही. पण जनरली जर आसपासच्या लोकांना गोष्टी पर्सनली घ्यायची सवय असेल तर त्यांना मात्र फार त्रास होतो. जिला आपण जवळची व्यक्ती समजत आहोत. ती आपल्या आनंदात, यशात सहभागी होत नाहीत याचं दुःख होतं.  

या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट काय असते माहित आहे ती म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही विशिष्ट गोष्टी घडण्याची वेळ ठरलेली असते. शिवाय थोड्याफार फरकाने जे काही घडत असतं ते सारखंच असतं. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मधल्या वेळात प्रत्येक माणूस सारख्याच स्थित्यंतरातून जात असतो. काही जण पूर्व संचितामुळे हे टप्पे लवकर पार करतात तर काहीजणांना वेळ लागतो इतकंच. 

शिक्षण, नोकरी, लग्नं, मुलं, संसार या इतरांशी तुलना करण्याच्या गोष्टी नाहीत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरून इतरांसोबत आपल्या आयुष्याची तुलना करण्यापेक्षा आपण काल काय होतो आणि आपण आज काय आहोत याची तुलना केलेलं जास्त चांगलं राहिलं. 

तसही या सगळ्या गोष्टी प्रत्येक जण करत असल्याने त्यामध्ये नावीन्य असं काहीच नाही. ही गोष्ट तुम्ही आज करत आहात, ती तुमच्या आधी कोणीतरी केलेली आहे आणि तुमच्या नंतर सुद्धा कोणीतरी करणार आहे. मग यात कसलं आलं वेगळेपण?? 

ते वेगळेपण आपल्याला आणावं लागतं... कसं?? स्वतःमध्ये योग्य पद्धतीने बदल घडवून... स्वतःच्या स्वप्नातलं आयुष्य घडवण्यासाठी कष्ट घेऊन... 
इतरांशी तुलना करून रडत बसण्यापेक्षा आपण आत्ता ज्या टप्प्यावर आहोत तो टप्पा एन्जॉय करणं जास्त महत्त्वाचं. ती फेज महत्त्वाची...
तुम्ही जर शिकत आहात, तर नुसतं शिकायचं म्हणून न शिकता ते अंगी बाणवण्याचा आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून त्याचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करा. 
तुमचं जर शिक्षण पूर्ण झालं असेल तर आपलं भविष्य घडवण्यासाठी काय करता येईल त्यावर विचार करून कृती करायला घ्या. 
तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर त्या संदर्भातली आपली कौशल्य तपासून पहा आणि नवीन काही शिकण्याची गरज असेल तर ते शिका. 
तुम्ही जर सिंगल असाल तर एकटे असताना सुद्धा भरभरून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. 
जर तुमचं लग्न झालं असेल किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर त्या रिलेशनशिप मधल्या छोट्या छोट्या गोष्टी आठवणीत राहाव्यात म्हणून प्रयत्न करा. 
थोडक्यात काय तर स्वतःवरती कठोर परिश्रम घेण्याची फक्त तयारी ठेवू नका तर ते परिश्रम घ्यायला सुरुवात करा. इतरांच्या टाईमलाईन, कव्हर पेज, प्रोफाइल पिक्चर, स्टोरी, आणि whatsapp स्टेटस कडे बघून स्वतःच्या आयुष्याला कमी लेखू नका. 

कारण इथे प्रत्येकाची टाईमलाईन आणि डेडलाईन सुद्धा वेगवेगळी आहे...
लक्षात घ्या आपल्या आयुष्याची प्रश्नपत्रिका आपल्यालाच सोडवायची आहे. 
जाता जाता एकच सांगते, कोणी आपल्यापुढे गेलं आहे म्हणून स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि कोणी मागे राहिले आहे म्हणून वाईट सुद्धा वाटून घेऊ नका. आपण काल काय होतो आणि आज काय आहोत याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
२/८





Distance 1/8

Distance 


आपल्या बाजूला असे कित्येक लोक असतात की ज्यांची ओंजळ ओसंडून वाहत असते....
पण एखाद्या व्यक्तीकडे सगळं असलं तरी सुद्धा 
त्याला दुसऱ्याकडे असणाऱ्या गोष्टींची भुरळ पडतेच...
आणि मग त्या गोष्टी स्वतःकडे नाहीत म्हणून ती व्यक्ती आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असलेल्या लोकांवर सुद्धा जळत राहते. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करते. 
तुम्ही सुद्धा हे अनुभवलं असेलच ना??
आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती शेवटपर्यंत आपल्या सोबत राहीलच असे नसते.
सो जेव्हा काही लोकांमुळे आपल्याला अनादर, अपमान, त्रास या गोष्टींना सामोरे जावं लागतं. तेव्हा त्या लोकांना दूर करणेच योग्य असते. तुम्ही दुरूनही त्या लोकांचं चांगलं व्हावं असा विचार करूच शकता. त्यासाठी सातत्याने तो त्रास सहन करत त्यांच्या संपर्कात राहणे गरजेचे नसते. 
आणि जर काही नाती अशी असतील जी आपण पूर्णपणे तोडून टाकू शकत नाही. त्या नात्यांमध्ये आपला वेळ आणि एनर्जी किती द्यायची हे मात्र आपल्याला ठरवून घ्यावे लागते. 
सोप्या भाषेत सांगायचं तर बाऊंड्री सेट कराव्या लागतात. 
आपण सुद्धा आदराला पात्र आहोत हे नेहमी लक्षात ठेवा. 
तुम्ही आणि तुमचा आयुष्य या दोन्ही गोष्टी मौल्यवान आहेत. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 
१/८
 


मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

cup of tea... आणि आपण... १३.८.२०२४

This is not my cup of tea... असं आपण बऱ्याचदा बोलताना म्हणत असतो. पण हीच गोष्ट उलट सुद्धा असते म्हणजे you can't be everyone's cup of tea... याचा अर्थ तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आवडाल किंवा तुमची बाजू समजेल किंवा हे तसा प्रयत्न करतील असं नाही. आणि असं झालं नाही तरीसुद्धा तुम्ही आणि तुमची सिच्युएशन अतिशय नॉर्मल आहात. 
तुम्ही सांगितलेला एखादा विनोद प्रत्येकाला हसवू शकेल असं नसतं...
तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या लोकांना असेलच असंही नसतं...
एखाद्या गोष्टीबद्दल तुमची प्रतिक्रिया समोरच्याला पटेलच असंही नसतं... आणि तरीही सगळं व्यवस्थित असतं. कारण यामध्ये चुकीचं काहीच नाही. 
आपल्यापैकी बऱ्याच जणांना इतरांना खुश करण्याची सवय असते किंवा इतरांनी आपली मर्जी राखावी अशी अपेक्षा असते. पण हे सगळं करताना आपण विसरतो की आपण प्रत्येक जण एक वेगळी व्यक्ती आहोत. आपल्या प्रत्येकासाठी सौंदर्य आणि नॉर्मल असण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत.  

मग एखाद्याला आपण नाही आवडलो तर काय फरक पडतो?? त्यांना दुसरं कोणीतरी आवडत असतं. 
जर एखादी व्यक्ती आपल्याला नाही आवडली तर काय फरक पडतो?? आपल्याला दुसरं कोणीतरी आवडतं. 

आपल्या आजूबाजूच्या किती लोकांना आपण आवडतो यावर बऱ्याचदा आपण स्वतःची किंमत आणि त्या माणसाची आपल्या आयुष्यातील जागा ठरवत असतो. जे की चुकीचं आहे. 

हल्ली बऱ्याचदा एक गोष्ट खूप सातत्याने आढळून येते ती म्हणजे सोशल मीडियावर जर आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत तरच आपलं नातं चांगलं आहे. मग तो मला सोशल मीडियावर लाईक फॉलो करतो म्हणून मी पण प्रत्यक्ष आयुष्यात त्याच्याशी नीट वागणार. आणि एखादा असं करत नाही म्हणून मग मी त्याच्याशी चांगलं वागणार नाही. 

पूर्वपार जी गोष्ट आपण ऐकत आलो आहोत तीच इथेही महत्त्वाची ठरते ती म्हणजे गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र.... 
बाकी आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाला आपल्याबद्दल किंवा आपल्याविषयी काहीना काहीतरी खटकत असतंच. सेम गोष्ट आपल्यालाही इतरांबद्दल वाटत असते. कधी आपण ती बोलून दाखवतो कधी ती आपल्याला इतरांच्या कृती मधून आपल्याबद्दल दिसून येते. 
पण कुणी कसंही वागलं किंवा तसा अविर्भाव जरी आणला तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की इतरांच्या वागण्याने बोलण्याने आपली किंमत ठरत नाही. 

आपली किंमत आपण स्वतः ठरवायची आणि ती जपायची सुद्धा... यासाठी सुद्धा बरेच उपाय आहेत बरं का...

बाकी?? बाकी भेटू लवकरच..... असंच काहीसं सोबत घेऊन....

स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 
१३ ऑगस्ट २०२४







शुक्रवार, २६ जुलै, २०२४

माझ्या मना बन दगड...

माझ्या मना बन दगड... 
शीर्षक विचित्र आहे ना??? पण या ओळीत तथ्य मात्र आहे. समुपदेशन करत असताना किंवा वेगवेगळे वर्कशॉप घेत असताना बऱ्याच जणांकडून विचारला जातो की 
- मॅडम समोरचा हेतूपुरस्सर आपल्याला त्रास देत असेल तेव्हा काय करायचं?? 
- किंवा एखादी व्यक्ती जी प्रचंड टॉक्सिक आहे पण आपण तिला टाळू शकत नाही कारण दुर्दैवाने ती आपल्या फार जवळच्या नात्यातील आहे. अशावेळी त्या व्यक्तीबरोबर वेळ घालवत असताना स्वतःच मानसिक स्वास्थ्य खराब होणार नाही याची काळजी कशी घ्यायची?? 
- दुर्लक्ष करणं हा उपाय उत्तम आहे. पण प्रत्येक वेळी दुर्लक्ष करताच येतं असं नाही. 
- आणि कित्येकदा तर दुर्लक्षच करता येत नाही. इन्स्टंट रिस्पॉन्स जातो. मग हे नियंत्रण मिळवणं कसं शिकायचं?? 

तर आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात ज्यांना आपण टाळू शकत नाही. आपल्याला त्यांच्याबरोबर राहणं भाग असतं. मग त्यांच्याबरोबर राहात असताना स्वतःचे रिस्पॉन्स किंवा प्रतिक्रिया कशा नियंत्रित करायच्या?? 

याच्यावर एक उपाय आहे... तोच जो वरती लिहिला आहे... हो तोच....... "माझ्या मनात बन दगड" ....
अर्थात ही एक मेथड आहे जिला ग्रे रॉक मेथड ( grey Rock method) असं म्हणतात. 

ग्रे रॉक मेथड म्हणजे काय???

ग्रे रॉक मेथड म्हणजे एखाद्या व्यक्तीला समोर असताना सुद्धा रिस्पॉन्स कमी देणे किंवा तिच्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट न दाखवणं. पण इथे फरक हा असतो की त्या व्यक्तीचं वागणं बोलणं हे आपल्याला बऱ्याचदा ट्रिगर करत असतं. म्हणजे तिच्या वागण्या, बोलण्यामुळे, तिच्या संपर्कात येण्यामुळे आपल्या मनस्थितीवर नकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्याकडून नकळत त्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्याला रिस्पॉन्स दिला जातो. हे रिस्पॉन्स देणं कमी करणे किंवा अजिबातच रिस्पॉन्स न देणे म्हणजे ग्रे रॉक मेथड. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या नकारात्मक वागण्याला प्रतिक्रिया देतो. तेव्हा नकळतच तो संवाद वाढत जातो. कधी कधी त्याचे वादात रूपांतर होते. कधी कधी वादात रूपांतर जरी झाले नाही, तरी नंतर आपली मनस्थिती मात्र पूर्णपणे खराब झालेली असते. 
कुठलाही संवाद चालू तेव्हाच राहतो. जेव्हा आपण आपल्या परीने त्याच्यात भर घालत असतो. ते म्हणतात ना की जेव्हा तुम्ही नकारात्मक संवादांना रिस्पॉन्स देणं थांबवता. तेव्हा तुम्ही त्याच्यातली हवा काढून घेत असता.... 
हे अशा प्रकारे एखाद्या गोष्टीला महत्त्व देणं कमी करता यायला हवं.

आपण बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला म्हणत असतो की अरे दगडासारखा काय बसला आहेस??? काहीतरी बोल.... पण इथे मात्र आपल्याला दगडासारखं बसायला शिकायचं असतं 😆😆😆

ग्रे रॉक मेथड कशी वापरायची??
1. तटस्थ राहणे.... 
टॉक्सिक व्यक्तीच्या संवादाला कमीत कमी शब्दात, भावनिक न होता, वास्तवदर्शी उत्तर देणे शिकल्यानंतर तटस्थ राहणे जमू लागते. 
2. नजरेला नजर न मिळवता संवाद साधणे. असं केल्याने समोरच्या व्यक्तीला आपण त्या संवादामध्ये सहभागी नाही हे लक्षात येते. 
3. अशा संवादांमध्ये आपली वैयक्तिक माहिती न देणे हे जास्त फायद्याचे असते. 
4. तुम्ही वर्तमान आयुष्यात काय करत आहात?? शिवाय तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात सुरू असणाऱ्या चांगल्या वाईट घडामोडी न सांगणे हा महत्त्वाचा नियम असतो. 
5. समोरच्या व्यक्तीच्या वागण्याला अतिशय शांतपणे आणि संयत स्वरूपात प्रतिक्रिया देणे. 
6. समोरच्या व्यक्तीमुळे आपण कधी ट्रिगर होत आहोत हे ओळखणे गरजेचे असते. 
7. जिथे आवश्यकता असेल तिथे टाळण्यासाठी योग्य प्रकारची कारणे वापरणे. 
8. गरज पडल्यास आपल्या जवळच्या व्यक्ती, मित्र नातेवाईक किंवा व्यावसायिक पातळीवर थेरपीस्ट ची मदत घेणे आवश्यक असते.

ग्रे रॉक मेथड चे फायदे.... 
1. यामुळे आपण मानसिक दृष्ट्या दुखावले जात नाही. 
2. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपण स्वतःसाठी अनुकूल वातावरण तयार करू शकतो. 
3. संवादांमधील ताण आणि त्यामुळे होणारा वाद कमी होतो. 
4. हळूहळू आपल्याला आपल्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणे जमू लागते. 
या पद्धतीचे अजूनही काही फायदे आहेत. जे प्रत्यक्षात वापरल्यानंतर आपल्या लक्षात येतील.  
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की एखाद्या व्यक्तीचे वागणे जर आपल्याला वारंवार दुखावत असेल. तर त्या व्यक्तीला नेहमी त्याच पद्धतीने प्रतिक्रिया न देता आपली प्रतिक्रिया देण्याची पद्धत आपल्याला बदलता यायला हवी. 
बरेच जण असं वागल्यानंतर पुन्हा पुढे जाऊन स्वतःच्या मनात स्वतःच्या वागण्याबद्दल अपराधीपणाची भावना जोपासत राहतात. तर इथे सुद्धा हे लक्षात ठेवायला हवे की आपण आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी करत असलेले हे उपाय आहेत. 
समोरची व्यक्ती जर आपल्याला दुखावताना पुढचा मागचा विचार करत नाही तर आपण स्वतःचा विचार करून स्वतःसाठी काही पावलं नक्कीच टाकू शकतो. 
यामध्ये आपण त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे दुखावत नाही. आपण आपल्या परीने तो संवाद कंटाळवाणा ,निरस करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तो संवाद थांबवण्यासाठी किंवा टाळण्यासाठी प्रयत्न करत असतो. 

बाकी जाता जाता एकच सांगते शक्य असेल तिथे स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे स्वतःला प्रायोरिटी वर ठेवणे. प्रत्येक वेळी इतरांना काय वाटेल याचा विचार करणे कुठे ना कुठेतरी आपल्यासाठी घातक ठरत असते. 

Being less responsive or no response is also response... हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. 

आपल्या प्रतिक्रियेतून कोणी काय अर्थ काढायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो बर का... त्यामुळे पुन्हा असं म्हणू नका की मी असं वागलो/वागले म्हणून समोरची व्यक्ती माझ्याशी भांडायला आली.... काही व्यक्तींना प्रतिक्रिया मिळाल्याशिवाय समाधान मिळत नाही म्हणून ते बऱ्याचदा टोकाला जाऊन समोरच्याला डिवचण्याचा प्रयत्न करत असतात. त्या डिवचून घेण्यालाच आपण ट्रिगर असे म्हणतो. 
हे ट्रीगर ओळखता यायला हवेत आणि वेळीच त्यांच्यावर उपाय सुद्धा करता यायला हवेत. 

गरज असेल तिथे कौन्सिलर किंवा सायकॉलॉजिस्टची मदत घ्या.‌ 
मानसिक स्वास्थ्य सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे शारीरिक स्वास्थ्य.... 

बाकी??? बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!!

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल
गौरी हर्षल कुलकर्णी 
(एम ए क्लिनिकल सायकॉलॉजी, समुपदेशन ) 
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल

सोमवार, ११ मार्च, २०२४

way out

वे आऊट 
जवळपास एक आठवडा होत आला अजूनही मला प्रीतीने फोन नाही केलाय. अनुष्का तिच्याच विचारात गुंतलेली होती.
"प्रीती" तिची सगळ्यात जवळची मैत्रीण.
 एकच शाळा, एकच कॉलेज आणि त्यानंतर नोकरी सुद्धा एकाच बिल्डिंगमध्ये पण वेगवेगळ्या ऑफिसमध्ये.
ऑफिस जरी वेगवेगळे असले तरी जाता येता दोघे एकत्र असायच्या. त्यामुळे सातत्याने एकमेकींच्या आयुष्यात काय घडतंय हे एकमेकींसोबत शेअर करणं हे ओघाने आलच.

 नवीन ऑफिस जॉईन केल्यानंतर हळूहळू अनुष्काला मात्र जाणवायला लागलं की प्रीती तिला टाळण्याचा प्रयत्न करते.
 कधी कधी प्रीती तिला सांगायची की मला बरं वाटत नाहीये आणि त्या दिवशी ती बाहेर फिरायला गेलेली असायची.
 कधी दोघींचा प्लान करायचा आणि तो लास्ट मिनिटला ती कॅन्सल करायची.
 या गोष्टी अनुष्काने तेवढ्या मनावर घेतल्या नाहीत.
 पण नुकतंच जे काही तिने स्वतः बघितलं ते बघितल्यानंतर मात्र ती मनातून दुखावली गेली.

 ज्या प्रीतीच्या वाढदिवसासाठी अनुष्का सरप्राईज प्लान करत होती. ती प्रीती अनुष्काला टाळून इतरांबरोबर तो वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅनिंग करत होती.
 जर त्या दिवशी अनुष्का हॉटेलमध्ये प्रीतीच्या मागच्याच टेबल वरती बसलेली नसती तर तिला ती गोष्ट कधीच कळली नसती.
 पण तिचं सुदैव म्हणून प्रीती तिच्याबद्दल काय विचार करते हे तिला समजलं. 
 प्रीती तिच्या ऑफिसच्या नवीन मैत्रिणींबरोबर वाढदिवसाचं सेलिब्रेशन प्लॅन करत होती.
 वीकेंडला रिसॉर्टवर जाऊन सेलिब्रेट करण्याचा त्यांचा प्लॅन होता. त्या मैत्रिणींपैकी कोणीतरी तिला विचारलं की," अगं अनुष्काला बोलवणार आहेस का?"
 त्यावर प्रीतीचे रिएक्शन अशी होती की," सारखं सारखं तिला नाही बोलवायला आवडत मला. किती वर्ष झाले आम्ही एकत्र आहोत. पण ती कधीच मला माझी स्पेस देत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा सहभाग... खरं सांगायचं तर तिचं असं सारखं मला चिकटून असणं मला कधीच आवडलं नाही. पण मला तिच्यामुळे फायदा होत होता म्हणून मी तिच्याबरोबर होते. 
आणि मला शक्य झालं असतं तर मी तिच्यासारख्या मुली बरोबर मैत्री पण केली नसती.",
"तिच्यासारख्या म्हणजे?", तिथे बसलेल्या मुलींपैकी एकीने विचारलं.
 "अग तिच्यासारख्या म्हणजे ती बरीच वेगळी आहे. तिच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. तिला पब पार्ट्या या गोष्टी आवडत नाहीत. ती फारशी मुलांची क्लोज होत नाही. आणि तिच्यामुळे मलाही कधी कोणाबरोबर मिक्स होता आलं नाही. आताही बघ ना पैसे आहेत तर आपण छान मॉडर्न लाइफस्टाइल अफोर्ड करू शकतो पण तिला मात्र तसंच राहायचं आहे. काकूबाई कुठली.",असं म्हणून प्रीती हसू लागली.
 बाकीच्यांनीही तिच्या हसण्यात सहभाग नोंदवणं योग्य समजलं. 

हे सगळं ऐकणारी अनुष्का मात्र मनातून प्रचंड मोडून पडली. साहजिकच होतं जवळपास बारा-पंधरा वर्ष त्या दोघी एकत्र होत्या.
 अगदी वयात येण्यापासून ते चेहऱ्यावर पहिल्यांदा मेकअप करण्यापर्यंत सगळं काही ज्या मैत्रिणीसोबत शेयर केलं ती कधीच आपल्याला मैत्रीण मानत नव्हती हे ऐकल्यानंतर अनुष्काला वाईट वाटलं. त्यादिवशी अनुष्का तिथून घरी निघून आली. पण तो विचार मात्र तिच्या मनातून निघत नव्हता. दुसऱ्या दिवशी तिने सवयीने सकाळी प्रीतीला फोन लावला. प्रीती अर्थातच तिची वाट बघत होती. कारण ती नेहमीच अनुष्का सोबत तिच्या गाडीवर ऑफिसला जायची. प्रीतीकडे स्वतःची गाडी होती पण ती गाडी प्रीती कधीच आणत नसे.

 आता अनुष्काला बऱ्याच गोष्टींचा अंदाज येऊ लागला होता. शक्य तेवढ्या गोष्टी, वस्तू, पैसे अनुष्काचे वापरून घेऊन प्रीती तिला मात्र स्वतःपासून स्वतःच्या गोष्टींपासून लांब ठेवत असे. म्हणजे एकंदरीत इतकी वर्ष प्रीतीने अनुष्काचा फायदा उचलला होता. प्रीतीच्या मनासारख्या गोष्टी घडल्या नाही की ती रुसून बसत असे,अनुष्काशी बोलणं बंद करून टाकत असे.
 अशा वेळेला अस्वस्थ होणारी अनुष्का प्रीतीला मनवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करत असे. प्रयत्न करताना स्वतःला त्रास होतोय स्वतः हे लक्षात येऊन सुद्धा अनुष्का प्रीतीच्या मैत्रीखातर हे सगळं करत असे. आता मात्र अनुष्काला या सगळ्या गोष्टी आणि त्या मागची कारण कळून चुकली होती. पण त्यावर आपण नेमकं कसं वागायचं हे तिला कळत नव्हतं. कोणाला तोंडावर बोलून तोडून टाकणं हा तिचा स्वभाव नव्हता. मग यावर उपाय म्हणून अनुष्काने आपल्या परीने उपाय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 

तुमच्या सोबत सुद्धा असं काही झालं आहे का वाचक मित्रमैत्रिणींनो? 
जवळच्या एखाद्या नात्यात आपण स्वतःला झोकून देऊन involve असतो. त्या व्यक्तीला खुश करण्यासाठी आपण जीव तोडून प्रयत्न करत असतो. आणि आपली वेळ आली की ती व्यक्ती मात्र मला असलं काही येत नाही अशा आविर्भावात असते. 
People pleasing ही टर्म हेच सांगते इतर लोकांची मर्जी सांभाळण्यासाठी स्वतःला त्रास करून घेणे . 
या चक्रातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न हे स्वतःलाच करावे लागतात. कारण आपण आपल्या वागण्यातून समोरच्या व्यक्तीला कुठेतरी आपल्याला गृहीत धरण्याची सवय लावलेली असते. 
आणि कधी कधी समोरची व्यक्ती सुद्धा संधीसाधू असते. 
जेंव्हा आपण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू करतो तेंव्हा अर्थातच आपल्याला विरोध केला जातो. 
कधी कधी तर हा विरोध इतरांपेक्षा जास्त स्वतःकडून केला जातो. 

स्वतःला प्रायोरिटी दिल्याने अपराधी वाटणे हे त्याचंच लक्षण. 

स्टेप बाय स्टेप स्वतःला या गोष्टी पटवून देत कृती करण्यावर भर दिला तर नक्कीच हे सगळं बदलू शकतं. 
पण आपल्याला सुरुवातीला वाटणारे गिल्ट, इतरांचा विरोध, वाद, रुसवे फुगवे आणि काही प्रसंगी दूर होणारी नाती हे सगळं सहनच होत नाही. आणि पुन्हा पुन्हा आपण तेच करणे स्वीकारत राहतो. 

जुनाट आजार नीट होण्यासाठी कसं मुळापासून दिनचर्या बदलावी लागते हेही तसच काहीसं असतं. 
फक्त इथे स्वतःचे शरीर, मन , मेंदुच नाही तर इतर लोकांकडूनही या बदलांसाठी विरोध केला जातो. 
हा विरोध मोडून काढण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. कारण गोष्ट आपल्या मनस्वास्थ्याशी संबंधित असते. 

वरच्या गोष्टीत असलेल्या अनुष्कानेही असेच प्रयत्न सुरू केले. 
तिला जसा त्यातून बाहेर पडण्यासाठी त्रास झाला तसाच त्रास इथे प्रितीलाही झाला. कारण तिला अनुष्काचा फायदा उचलून जगण्याची सवय झालेली होती. तिने त्यासाठी अनुष्काला मनस्ताप देण्याचा प्रयत्न केला. पण अनुष्का आपल्या बाजूने ठाम होती. 

अनुष्काने मात्र समोरासमोर वाद घालणे टाळत स्वतःसाठी इतर मार्ग शोधले. जसं की ऑफिस ब्रांच बदलणे, नवीन काही क्लासेस जॉईन करणे. जेणेकरून तिला प्रितीसोबत जास्त वेळ राहावे लागणार नाही. या गोष्टी सोप्या नव्हत्याच पण तिने त्या जमवल्या. स्वतःसाठी, स्वतःच्या चांगल्या भविष्यासाठी. 

जर एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यात आपल्याला जागा देत नसेल तर त्यासाठी आपण जबरदस्ती करून काही उपयोग होत नाही. 
ते म्हणतात ना की, If they don't see the value of having you, then don't try to convince them.

आपल्याला शारीरिक, मानसिक पातळीवर त्रासदायक असणाऱ्या गोष्टी, व्यक्ती जर आपल्याला स्वतःपासून दूर करता येत नसतील तर अर्थातच आपली परिस्थिती "अग अग म्हशी मला कुठं नेशी" अशी असते. 

आणि महत्वाचा मुद्दा प्रत्येक वेळी दूर करणे म्हणजे तोडून टाकणं नसते. प्रत्येक नात्यात मर्यादा निश्चित करून नाती सांभाळता येतात. सगळा त्रास आपणच सहन करायला हवा ही मनोवृत्ती मात्र त्यागणे जमलं पाहिजे. 

गौरी हर्षल कुलकर्णी 
(एम ए क्लिनिकल सायकॉलॉजी, समुपदेशन ) 
#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

प्रत्येकाचा मार्ग वेगळा ...

आपण सगळेच जण आपल्या जवळच्या लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असतो. कधी कधी तर अनोळखी लोकांना सुद्धा आपण न मागता मदत करण्यास तयार होतो. 
अशावेळी आपण त्यांना ते सगळे उपाय सांगत असतो जे आपल्याला उपयोगी पडलेले असतात. पण ते उपाय स्विकारण्याची त्यांची तयारी आहे किंवा नाही हे आपल्याला माहित नसतं.
मात्र आपल्याला असा ठाम विश्वास असतो की जे पुस्तकं किंवा औषध, किंवा एखादं मोटिव्हेशनल भाषण जसं आपल्या मनाला, शरीराला उभारी देण्यासाठी उपयोगी पडले तेच त्यांनाही तशीच सकारात्मक ऊर्जा देईल. 
पण आपण हे विसरतो की, आपण ज्या फेजमध्ये आहोत किंवा होतो त्याच फेजमध्ये समोरची व्यक्ती नाहीये. 
त्यामुळे अर्थातच हे उपाय कितीही प्रभावी असले तरीही जोपर्यंत एखाद्या व्यक्तीची ते स्विकारण्याची मानसिक तयारी नसते तोपर्यंत त्यांचा काहीही उपयोग होत नाही. 
म्हणूनच मदत करताना ती समोरच्या व्यक्तीवर लादली जात नाही ना हे लक्षात घ्यावं. 
त्रास शारीरिक असो किंवा मानसिक प्रत्येक व्यक्तीची त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा महत्वाची असते नेहमीच. 
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
मानसशास्त्रतज्ञ



 

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

कौन्सेलिंग बेसिक ..

Don't judge a book by its cover...
अतिशय साधं वाक्य पण आपण मात्र कुणाला भेटल्यानंतर हीच गोष्ट करत असताॆ ना? 

पहिल्या भेटीत व्यक्ती कशी आहे हे कधीच कळत नाही. त्यामुळे कुणाबद्दलही कुठलेही अडाखे बांधू नयेत हे खरं तर बऱ्याचदा सांगितलं जातं.

 कारण पहिल्या भेटीत शिष्ट, माणूसघाणी वाटणारी व्यक्ती पुढे जाऊन कदाचित तशी नसू शकते...
 आणि तुमच्याशी प्रचंड मोकळेपणाने वागणारी, खूपच आपलेपणा दाखवणारी व्यक्ती आतल्या गाठीचीही असू शकते...

 सगळी माणसं सातत्याने मुखवटे घालूनच वावरत असतात.
 हे मुखवटे कोणासमोरही उतरत नाहीत.
 प्रत्यक्ष आयुष्यामध्ये कोण कुठल्या परिस्थितीतून जात आहे हे कोणालाही माहीत नसतं.
 असो तर मुद्दा हा आहे.....
 जेव्हा एखाद्या व्यक्तीला समुपदेशनाच्या क्षेत्रात कार्य करायचे असते, तेव्हा तिला तटस्थपणे इतरांचे निरीक्षण करणे जमायला हवे.
 कुठल्याही व्यक्ती बद्दल कमेंट्स पास करणं, गॉसिपिंग करणे या गोष्टी टाळता येणे जमायला हवं.
 जर या गोष्टी जमत नसतील तर त्या शिकायलाच हव्या.... तर आणि तरच तुम्ही समोर येणाऱ्या क्लायंटचे समुपदेशन उत्तम प्रकारे करू शकता.
कौन्सेलिंग बेसिक ... 
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 

सोमवार, १ जानेवारी, २०२४

कालाय तस्मै नमः कथेमुळे वाचकांना आलेला अनुभव

कालाय तस्मै नमः कथेमुळे वाचकांना आलेला अनुभव
कालाय तस्मै नमः ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे असा उल्लेख त्यामध्ये मी केला होता. 
कालाय तस्मै नमः मधील सगळ्यात महत्वाच्या पात्रांपैकी एक पात्र म्हणजे अरुंधती श्रीपाद कुलकर्णी, कैवल्य ची आई. 
ज्यांनी ही कथा प्रतीलिपीवर किंवा पुस्तकाच्या माध्यमातून ( shopizen ॲप वरून मागवता येईल) वाचली आहे त्यांना त्या पात्राबद्दल माहीत आहे. 
नवीन वाचकांसाठी थोडक्यात सांगते ,
 कालाय तस्मै नमः ही गोष्ट आहे कुलकर्णी कुटुंबाची...
ह्या कुटुंबातील थोरल्या सुनेवर अरुंधतीवर घरातील कुणीतरी अमानवीय शक्तींसोबतच विषप्रयोग करत आहे...
पण अरुंधतीला मिळाली आहे दैवी शक्तींची देणगी...
तिच्या जीवाशी खेळण्याचा परिणाम होतो सगळ्या कुटुंबावर ....
अरुंधतीचा अकाली मृत्यू कुटुंबाला देतो मुलगी जन्माला न येण्याची शिक्षा.....
पण मग अचानक काही वर्षांनी घरात एक मुलगी जन्माला येते आणि ती जगते ....
तिच्या जन्माला येण्यामागे काही रहस्य आहे की अरुंधतीने घेतला आहे पुनर्जन्म? 
अरुंधतीच्या मृत्यूला जबाबदार असणारे पुन्हा एकदा प्रयत्न करतील का? त्या नुकत्याच जन्माला आलेल्या जीवाला संपवण्याचा... 
वरवर सामान्य दिसणाऱ्या ह्या कुटुंबातील लोकांनी अशी काय रहस्य दडवली आहेत आपल्या मनात?  

तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की या कथेतील अरुंधती च्या मृत्यु आधी ती तिच्या सासऱ्याना काही गोष्टी सांगते. त्यातील एक गोष्ट म्हणजे घरातल्या सर्वांसोबत कुलदैवतेच्या दर्शनाला जाणे. ज्यामुळे तिच्या मृत्युने घराला लागलेला दोष कमी किंवा सुसह्य होईल. 

ह्या मुद्द्यावरून माझ्या एका अध्यात्मिक साधक असलेल्या वाचक मैत्रिणीने नुकतीच एक सुंदर अनुभूती अनुभवली. 

ही मैत्रीण स्वतः अध्यात्मिक साधनेत एका उंचीवर आहे. तिचा अनुभव तिच्या शब्दात जेव्हा तिने मला सांगितला तेंव्हा अंगावर उमटलेला शहारा आजही मला आठवतो. 

माझं या मैत्रिणीशी बोलणं नुकतच झालं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातच. त्यामुळे तिला आलेली अनुभूती हा आमच्या दोघींसाठी अध्यात्मिक संकेत आहे असं मला वाटत. 

कालाय तस्मै नमः कथेत ज्याप्रमाणे कुलकर्णी कुटुंब काही अडचणींनी त्रासलेले आहे त्याच प्रमाणे या मैत्रिणीचे माहेरचे कुटुंबीय सुद्धा दीड वर्षांपूर्वी काही गोष्टींना सामोरे जात होते. 
घरात वादविवाद, लग्न न जमणे, जमलेल लग्न मोडणे इतर काही त्रास हे सगळं ही मैत्रीण अनुभवत होती. पण तिला उपाय सापडला तो वर उल्लेख केलेल्या अरुंधतीच्या तोंडी असलेल्या संवादामध्ये तिने तिच्या माहेरच्या घरच्यांना ठामपणे हा उपाय करण्यासाठी सांगितले.
 मी इथे सविस्तर सगळं सांगू शकत नाही. कारण हा त्या कुटुंबाचा वैयक्तिक अनुभव आहे. पण महत्त्वाचा मुद्दा हा की, दीड वर्षांपूर्वी कुलदैवतेच्या दर्शनाला जाऊ लागल्यानंतर या कुटुंबाने विस्कटलेल्या गोष्टी नीट होताना बघितल्या.
यामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी गोष्टी नीट होताना बघितल्या त्याचप्रमाणे आगळीक झाल्यानंतर थोड्या वरून गोष्टी पुन्हा विस्कटताना सुद्धा बघितल्या. 
हे सगळं अनुभवणाऱ्या आपल्या साधक मैत्रिणीने तिच्यावतीने सतत देवीच्या चरणी प्रार्थना करत कुटुंबाला सद्बुद्धी देण्याची विनंती केली. आणि फायनली दीड वर्षानंतर अनेक अडथळे पार करत त्यांच्या घरामध्ये मंगल कार्य छान पद्धतीने पार पडले.
इथे या प्रत्यक्ष अनुभवांमध्ये अनेक गोष्टी होत्या. 
जसं की या घरातील व्यक्तीसुद्धा नको त्या मार्गांचा अवलंब करत होत्या चुकून किंवा हेतुपुरस्सर घरात येणाऱ्या माहेरवाशीणीचा अपमान केला जात होता. कुळधर्म कुळाचार योग्य पद्धतीने केले जात नव्हते. 
जसजसे हे कुटुंब त्यांच्या कुलदैवतेचे दर्शनाला जाऊ लागले, तसतशा हळूहळू गोष्टी मार्गी लागत आहे ते त्यांच्या लक्षात आले. अर्थात या गोष्टींसाठी बराच वेळ जावा लागला आणि तो लागतोच. पण संयमाने या कुटुंबाने एकमेकांची साथ देत त्या अवघड वेळेवरती मात केली.
 आणि देवीच्या इच्छेने आणि कृपाशीर्वादाने ते या सगळ्या दिव्यातून बाहेर पडले. 

ज्या साधक मैत्रिणीने अनुभव शेअर केला तिचे मनापासून आभार मानते आहे कारण मला स्वतःला हे लेखन माझ्याकडुन का करून घेतले जाते याची जाणीव या अशा अनुभवांतून होते. 

या कुटुंबाकडून मिळालेल्या सदिच्छा माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. 
माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट ही होती की , मी कधीही न ऐकलेल्या कुलदेवतेची ओळख मला या अनुभवातून झाली. 
श्री गड कालिका माता धार (इंदोर), माहेरची कुलस्वामिनी 🙏
देवीचा फोटो सोबत शेयर करतेय माहिती गुगल वर मिळेल. 
जिथे मी विचार काय कल्पनाही करू शकत नाही तिथून देवाचं माझ्याकडे लक्ष आहे. आणि हे कार्य कुठल्या तरी विशिष्ट हेतून माझ्याकडुन करून घेतले जाते आहे याची जाणीव झाली. 
माझ्यासाठी हा अनुभव करुणात्रिपदीच्या अनुभवाप्रमाणे च एक विलक्षण अनुभूती आहे. 
लिहिताना खरे तर मला शब्द सुचत नव्हते पण " हे श्रेय माझं नाही. ही माझ्या मित्राची, दत्ताची इच्छा. आणि दत्त जयंतीच्याच आधी हा अनुभव कानावर येणं हे माझं रीटर्न गिफ्ट ❤️❤️❤️" 
बाकी? आता बाकी नाही...
सगळंच काही दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
आई राजा उदो उदो
स्वतःला शोधताना - गौरीहर्षल
1 जानेवारी 2024