गुरुवार, २९ जून, २०२३

नास्तिक

नास्तिक 

"गाडी का थांबवलीस रतन?" लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेल्या डॉ. कोरडेनी गाडी थांबवल्याच जाणवलं तस ड्रायव्हरकडे बघण्यासाठी मान वर करत आपल्याच तालात विचारलं. 

पण वर बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ड्रायव्हर जागेवर नाहीये. आणि गाडीच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी आहे. 

त्यांनी गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते कधीचेच गाडीतून बाहेर पडले आहेत.  आणि फक्त गाडीतूनच नव्हे तर त्यांच्या शरीरातूनही बाहेर पडले आहेत. 

स्वतःला बसलेल्या धक्क्यातून सावरत त्यांनी आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला असलेल्या गर्दीकडे त्यांचं लक्ष गेलं. 

वारीसाठी जाणाऱ्या एका दिंडीतले वारकरी होते ते सगळे गर्दीतले लोक. जसे ते कोरडेंसाठी पूर्णपणे अनोळखी होते तसेच कोरडेही त्यांच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते. 
पण आता या क्षणी मात्र ते सगळेजण कोरडेना आणि त्यांच्या ड्रायव्हर ला वाचवण्यासाठी धडपड करत होते. ड्रायव्हर कसा माहीत नाही पण गाडीच्या बाहेर फेकला गेला आणि वाचला होता. पण डॉक्टर मात्र गाडीतच होते. 

काही वेळातच तिथे ऍम्ब्युलन्स आली. एम्ब्युलन्स मधून उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी दोघांनाही स्ट्रेचरवर घेत एम्ब्युलन्स मध्ये ठेवलं. शरीर एम्ब्युलन्स मध्ये ठेवताच कोरडेही तिकडे ओढले गेले, कदाचित अजून काही बंधन शिल्लक असावे. 

त्या दोघांकडे त्यांचा जीव वाचावा ह्या आशेने बघणाऱ्या वारकऱ्यांच्याकडे जाता जाता कोरडेंच लक्ष गेलं. आणि त्यांना तो प्रसंग आठवला. 

भेटीचीया ओढ लागलीसे डोळा,
वाट हि विरळा दिसे मजला,
लाखो राउळाशी टेकवीला माथा,
देव कुठे माझा शोधू आता,

कुणी पाहिला पाहिला पाहिला हो,
माझा देव कुणी पाहिला..
कुणी पाहिला पाहिला पाहिला हो,
माझा देव कुणी पाहिला..

सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई
सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई

गाण्याचे बोल आणि तो आवाज कोरडेंच्या मनात फेर धरून नाचू लागला. अन् ते सगळे चेहरे त्यांना आठवले. 

डॉक्टर कोरडे प्रचंड सुदैवी होते. त्यांच्या घरात एकाच वेळी चार पिढ्या गुण्यागोविंदाने नांदत होत्या. 

डॉक्टर सोडले तर सगळेजण रूढार्थाने देवभोळे असे होते. 
डॉक्टरांना मात्र ते सगळे  अजिबात आवडत नव्हते. आताही त्यांना तो प्रसंग आठवला जेव्हा त्यांनी घरातल्या सगळ्यांना गाण्याच्या बोलावर हातात टाळ घेऊन वारकरी वेशात नाचणाऱ्या नातवाकडे कौतुकाने बघताना बघितले होते. 

कोरडें चे आईवडील, बायको आणि  डॉक्टर मुलगा सूनही नातवाला कौतुकाने बघत होते. हे बघून त्यांचं डोकं फिरलं होतं. 

सगळ्यांवर चिडत त्यांनी नातवाच्या हातात असलेली टाळ फेकून दिली होती. कुठल्याही देवावर त्यांना इतका राग का आहे हे खुद्द त्यांनाही कळत नव्हतं. 

डॉक्टर रूढार्थाने जरी स्वतःला नास्तिक म्हणवून घेत असले तरी त्यांची त्यांच्या कामावर प्रचंड निष्ठा होती. अडल्या नडल्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांना वेळ काळ कशाचेही भान उरत नसे. 

आणि त्यांच्या ह्याच गुणाबद्दल घरात आणि आसपासही सगळ्यांना आदर होता. अन् त्यामुळेच त्यांचे आईवडीलही त्यांचा देवावरचा राग सहन करत असत. कारण त्यांना त्या रागाचं मूळ कळलं होतं. 

एखाद्या पेशंटला इच्छा असूनही वाचवता आलं नाही की डॉक्टर हतबल होऊन चिडत असत. प्रॅक्टीसला इतकी वर्ष होऊनही अजूनही त्या गोष्टींचा त्यांच्या मनाला त्रास होत असे. 

सगळ्यात आधी उपचारासाठी दवाखान्यात आणण्याऐवजी देवळात, मशिदीत किंवा इतर कुठेतरी खेटे घालत बसलेल्या नातेवाईकांमुळे पेशंटला योग्य वेळी उपचार न मिळून तो दगावला की डॉक्टरांचा राग देवावर निघत असे. ते म्हणत असत की तुमचा देव ह्या लोकांना दवाखान्यात जा अशी बुद्धी का नाही देत?  मग लोक पेशंटला काही झालं की डॉक्टर वर का चिडतात? देवावर का नाही चिडत? 

आताही हा प्रसंग आठवताना त्यांना राग येत होता. मनातून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या. 

पण अचानकच त्यांना आपल्या जवळ कुणीतरी उभं असल्याची जाणीव झाली. त्यांनी मान वळवून बघितलं तर एक व्यक्ती त्यांच्याकडे प्रेमळ हसत बघत होती. 

आतापर्यंत कोरडेंना आपल्या अवस्थेची जाणीव झाली होती. त्यामुळे ही व्यक्ती आपल्याला कशी काय बघू शकतेय ह्याच त्यांना आश्चर्य वाटलं. 

त्यांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्या व्यक्तीकडे बघितलं. 
त्या व्यक्तीने हसून अगदी मित्रत्वाने बोलायला सुरुवात केली. 

" काय मग डॉक्टर कस वाटतंय? खूप सगळे प्रश्न आहेत न मनात? कळत नाहीये हे सगळं अस अचानक कसं घडलं? मी कोण आहे? तुम्हाला कसा काय बघू शकतो? वगैरे वगैरे...अहं .... असं अजिबात समजू नका की मी तुमची खिल्ली उडवतोय. मी तर तुमच्या मदतीसाठी इथे आलो आहे. तसा मी सगळ्यांनाच मदत करण्यासाठी येतो पण तुम्ही जरा जास्तच स्पेशल आहात. " 

"कस काय? अहो तुम्ही प्रत्यक्ष देव आहात कित्येक लोकांसाठी. तुम्हाला कितीही चीड आली तरी तुम्ही स्वतः आमचं प्रतिरूप आहात पृथ्वीवर. हो बरोबर ऐकलत... मीच तो ज्याचा तुम्हाला खूप राग येतो. पण मला तुमचा राग त्यामागची भावना कळते , जशी ती तुमच्या आईवडिलांना पण कळली आहे. पण कसं आहे न डॉक्टर प्रत्येक माणूस हा त्याचं नशीब घेऊन जन्माला येतो. ते कसं घडवायचं हे त्यांचा हातात असतं. आमच्यासारखे तुम्हीही फक्त निमित्तमात्र ठरता. " 

डॉक्टर मन लावून ऐकत होते. 

" आता त्या दिवशीचच उदाहरण घ्या. त्या दिवशी तुमचे दोन पेशंट दगावले. पहिला पेशंट बऱ्याच उंचावरून पडून गेला आणि दुसरा सुद्धा एक्सिडेंट होता. पण त्या मागची गोष्ट तुम्हाला माहित नव्हती डॉक्टर. पहिल्या पेशंट ने आईवडिलांना, बायकोला जीव नकोसा केला होता. तो गेल्यावर तुम्हाला जे वाटलं न की ह्याचं घर उघड्यावर पडेल तस काही होणार नव्हतं. कारण त्याच्यामागे उरलेले ते तिघे आणि अजून दोन निष्पाप जीव रोज अक्षरशः जीव मुठीत धरून जगत होते. त्या जीवांनी भलेही कधीच त्याच्या मृत्यूची कामना केली नसेल पण त्या जीवांना होणारा त्रास नियतीला दिसत होता. त्यामुळेच त्या दिवशी तो दारू पिऊन इकडे तिकडे भरकटत असताना ही गोष्ट घडली आणि तो मृत्यूच्या दारात पोहोचला. पाच जीवांच्या पुढे त्याला मिळालेली शिक्षा तशी कमीच आहे. पटलं न? " 

डॉक्टरांनी होकारार्थी मान डोलावली. 

"आणि दुसरा? त्याने स्वतःच्या आनंदासाठी बऱ्याच मुलींना फसवले होते. त्यापैकी दोघींनी ट्रकसमोर येऊन जीव दिला होता. त्या बिचाऱ्या अकाली गेल्या. आणि तुम्हाला वाटलं की त्याला नुकतंच नोकरी लागली होती, लग्न ठरलं होतं. पण डॉक्टर त्या मुलीचाही जीव वाचलाच. कारण ह्या मुलाच्या आईवडिलांना फक्त तो मुलगा आहे म्हणून त्याचे सगळे गुन्हे माफ करायची सवयच लागली होती. त्यांनाही शिक्षा होणं गरजेचं होतं. असे कित्येक आईवडील आहेत जे आपल्या अपत्याची मग तो मुलगा असो वा मुलगी चूक लपवतात ,त्यांना पाठीशी घालतात. पण त्यामुळे दुसऱ्या कुणाला त्रास होतो आहे हे त्यांना समजूनही ते दुर्लक्ष करतात. एखाद्या जीवाला हेतुपुरस्सर त्रास देणे मग तो मानसिक असो किंवा शारीरिक हे सगळ्यात मोठं पापच आहे न डॉक्टर? " 

इतका वेळ शांतपणे ऐकणारे डॉक्टर बोलू लागले, " बरोबर आहे तुमचं... मला फक्त नाण्याची एकच बाजू माहीत असायची त्यामुळे मी कित्येकदा तुमच्यावर आगपाखड केली. पण आज कळतंय की जाणारा जाण्यामागे बरीच कारणं असू शकतात. मी चुकलो , रागाच्या भरात खूपच चुकीचा वागलो. आईवडिलांना देवाचं करताना त्रास दिला. तुम्ही मला हवी ती शिक्षा देऊ शकता. " कोरडेंचे डोळे पाणावले होते. 

" हं शिक्षा तर होणार आहेच तुम्हाला. ",  ते हसत हसत म्हणाले. तस कोरडेना आश्चर्य वाटलं. 

" तुम्हाला परत पृथ्वीवर जायचं आहे, अजून बरच काम शिल्लक आहे. आमची एक छोटी मैत्रीण तुम्ही वाचावं म्हणून आम्हाला साकडं घालत आहे. ", अस म्हणत त्यांनी कोरडेना एक दृश्य दाखवलं. 

त्या दृश्यातले चेहरे ओळखू येताच कोरडेना आठवलं की त्या मुलीच्या आईला त्यांच्याकडे आणलं होतं. आणि तिचं दोन महिन्यांनी ऑपरेशन ठरलं होतं. ती मुलगी देवांना पाण्यात ठेवून डॉक्टर वाचूदे म्हणजे ते माझ्या आईला वाचवतील अस सांगत होती. ते बघून कोरडेना जाणीव झाली की घरातील लोकांपेक्षा जास्त बाहेर लोकांना त्यांची किती गरज आहे. 

आणि ते आठवताच कोरडेना घरच्यांची आठवण झाली. 

"आहेत आहेत ते सगळे इथेच ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आहेत. पण एक वाईट बातमी आहे बुवा तुमच्यासाठी... तुम्हाला बरं वाटलं की बरेच नवस फेडावे लागणार आहेत." अस म्हणत ते हसू लागले. 

"आता तर माझी कुठलेही नवस फेडायची तयारी आहे देवा, तुम्ही फक्त माझं काम माझ्याकडून नीट करून घ्या एवढं एकच मागणं. आणि माझे पाय जमिनीवर राहूदे. " डॉक्टर म्हणाले. 

" तथास्तु" अस कानावर पडत असतानाच कोरडेना वेगाने खेचलं गेल्याची जाणीव झाली. 

मोठयाने श्वास घेत त्यांनी डोळे उघडले तसे आजूबाजूला असलेल्या चेहऱ्यावर उमटलेले हसू बघून त्याना आपण परत आपल्या शरीरात आलो आहोत ह्याची जाणीव झाली. 

नर्सने बाहेर जाऊन सांगितलं तसं त्यांच्या कानावर आवाज आला, " देवा, पांडुरंगा वाचवलंस रे बाबा. ", ते ऐकून डॉक्टर कोपऱ्यात उभं राहून त्यांच्याकडे बघत डोळे मिचकवणाऱ्या त्या व्यक्तीला बघून हसले. 

सगळे जण त्या दिशेने बघू लागले तर तिथे भिंतीवर असलेल्या फोटोशिवाय काहीच नव्हतं. 

पण तो तिथेच होता सदैव. मनापासून आस्तिक असलेल्या नास्तिकासाठी. 

मंडळी पूजा , कर्मकांड करणारी प्रत्येक व्यक्ती मनापासून ते करत असतेच असे नाही तसेच आयुष्यभर मंदिराची पायरीही न चढलेली व्यक्ती नास्तिक असते अस ही नाही. 

माणसाचं कर्म आणि त्यांचे परिणाम , माणसाचं भविष्य घडवत असतात. 

मग तुम्ही देवावर विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ. मनाने, विचाराने आणि कर्माने तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहीत असतं. आणि त्यालाही . 

बाकी कर्मसिद्धांत स्पष्ट करतोच. Always and forever. 

#स्वतःला शोधताना 
#गौरीहर्षल

गुरुवार, २२ जून, २०२३

मी आणि करुणात्रिपदी

मी आणि करुणात्रिपदी
मागच्या एका वर्षापूर्वी विश्वास कथेमधील काही भाग एकीने ढापला होता. नंतर मी ते फेसबुक वर शेअर केलं आणि त्यावर तिने काउंटर लेख लिहिला.
तो वाचून माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की तू तिने लिहिलेलं नीट वाच. तिने तुझ्या लेखनाचा अभ्यास तुझ्यापेक्षा जास्त केला आहे. तुला तुझ्या देवाकडून संकेत आहे त्यात.
मी शांतपणे ते लिहिलेलं वाचलं. आणि जाणवलं की काय मिस केलं मी.
त्यात तिने लिहिलं होतं की दत्त गुरूंना ही म्हणजे मी गौरी हर्षल काय स्वतःची प्रॉपर्टी समजते का? तेंव्हा मी ते खूप हलक्यात घेतलं होतं.
पण आज मला त्या व्यक्तीला थँक्यू म्हणायचं आहे.
का? अरे नकळत का होईना तिच्यामुळे मला हे जाणवलं की माझा मित्र , माझा दत्त माझ्या आयुष्यात लेखनात किती भिनलेला आहे.
हा प्रसंग माझ्या आयुष्यात खूप काही छान घडवून गेला.
माझं दत्ताशी नातं इतकं घट्ट झालं की आता काही मागण्याची गरजच पडत नाही.
दत्त माझी प्रॉपर्टी नाहीये पण माझ्या सगळ्या जन्मांच्या पाप-पुण्याच्या प्रॉपर्टीचा हिशोब प्रत्यक्ष त्याने आपल्या हातात घेतला आहे. बास अजून काय पाहिजे.
वाईटातून चांगलं घडतं म्हणतात ते असं...
पुढे करुणा त्रिपदीचे अनुभव, मग अध्ययन वर्ग जे दत्त नवरात्र सुरू होतं त्या दिवशीच सुरू झाले. आणि आजही सुरू आहेत.

जितक्या लोकांनी मला करुणा त्रिपदी वरून नकळत टोमणे मारले  त्या पेक्षा किती तरी जास्त लोकांनी करुणा त्रिपदीचा अनुभव मला येऊन सांगितला.

आजही जेव्हा कुणी इरेला पेटून करुणा त्रिपदी आणि दत्तगुरु ह्या विषयांवरून उगाचच खेचायला किंवा तुच्छ लेखण्यासाठी येतं. तेंव्हा जाणीव होते की ते माझ्याकडून जे काही करून घेत आहेत. ते अतिशय उत्तम आहे.

माझ्यामुळे, माझ्या वर्गांमुळे, लेखनामुळे पोटशूळ उठणाऱ्या प्रत्येकाला एक सोपा उपाय सांगते " करुणा त्रिपदी ऐका"

थोरल्या महाराजांनी ती लिहिलीय तेच मुळात आपल्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी.

कुणास ठाऊक तुमचीही पोटदुखी बरी होईल.

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!

तो आहे सदैव माझ्या पाठीशी नव्हे माझ्या सोबत...माझ्यातल्या लेकराचा हात घट्ट धरून तो मला चालवत आहे योग्य दिशेने ... योग्य मार्गावर ...
अन् हे तो सांगतो प्रत्येक गुरुवारी कुठल्या ना कुठल्या रूपात.
22जून 2023

स्वतःला शोधताना
गौरीहर्षल

 

मंगळवार, २० जून, २०२३

प्लेलिस्ट भाग 1 - गौरी हर्षल

प्लेलिस्ट भाग 1 


छोटी सी कहानी से, बारिशों के पानी से

सारी वादी भर गयी

ना जाने क्यों, दिल भर गया

ना जाने क्यों, आँख भर गयी


कानात हेडफोन आणि बसच्या खिडकीमधून बाहेर

दूर कुठेतरी नभापलीकडे रेंगाळलेली नजर...

ती तिच्याच विश्वात दंग...


काय विचार करत असेल ती? 

ह्या विचारात संपणारा बाकीच्या प्रवाशांचा रोजचा प्रवास...


मुळात ती अशीच होती आपल्यात रमलेली. 

जगाचं भान राखाव अस काही नव्हतच जगाकडे ...


स्वतःशीच संवाद साधत ती तो प्रवास 

भरभरून एन्जॉय करत राहायची. 

इतर कुणी आपल्याला बघत आहे, 

हे तिच्या खिजगणतीतही नसायचं. 


ती आपली तिच्या वेगाने तिचं घर ते क्लिनिक,

अन् क्लिनिक ते घर हा प्रवास तिच्या प्लेलिस्ट सोबत करायची. 


रोज वेगळी प्लेलिस्ट रोजच्या मुडशी जोडलेली. 


आज तर प्लेलिस्ट मधले आवडते सोबती बरोबर होते म्हणजे कारण ही खास होतं. 

छोटी सी कहानी से... पासून सुरू झालेली प्लेलिस्ट विचारांच्या सोबत वाऱ्याशी गप्पा मारत होती. 


नकळतच ओल्या होणाऱ्या डोळ्यांच्या कडांवर एखादा चुकार थेंब रेंगाळत होता. त्याला ही तसच स्वीकारत ती ओठांवर मात्र हसू खेळवत होती. 


मनात हळूहळू भूतकाळाच्या तुकड्यातून पझल पूर्ण होत होते. एकेक पीस अलगद आपापल्या जागी येत होता. 


आणि एका क्षणी पझल पूर्ण झालं... तिच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली जणू काही लहान मुलाला खूप हट्ट केल्यानंतर हवी असलेली गोष्ट मिळालेली आहे. 


तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. इतका की आसपासच्या लोकांना त्याची जाणीव झाली. 

आणि तोच आनंद वाटत ती आपलं सामान सावरत उठली.  समोरच्या दरवाजाच्या दिशेने निघाली. 

 

गुणगुणत बसमधून उत्साहाने उतरलेल्या तिला बघताना प्रत्येकालाच काहीतरी गवसले. 


छोटी सी कहानी से, बारिशों के पानी से

सारी वादी भर गयी

ना जाने क्यों, दिल भर गया

ना जाने क्यों, आँख भर गयी...

तिचे ओठ अजुनही गुणगुणत होते. 


नेहमीची पायवाट सुद्धा आज नकळतच तिला आपली वाटली. 


रोज समोरून येणाऱ्या काकूंना चिडून उत्तर देणारी ती आज स्वतःहून हसतच म्हणाली, "आज मी लवकर आले बर का काकू …", आणि काकुंचे डोळे अजून मोठे होण्याआधी जिन्याने वर सटकली. 


घरासमोर येऊन तिने खिशातून चावी काढली. आणि हसऱ्या चेहऱ्याने घरात पाय टाकला. 


आज किती दिवसांनी असं येणाऱ्या तिला बघून घरानेही हसऱ्या पसाऱ्याने तिचं स्वागत केल. 


फोनवरची प्लेलिस्ट अलेक्साला लावायला सांगत तिने हळूच एकेक गोष्ट जागेवर ठेवायला सुरुवात केली. 


पुढच्या काही मिनिटात घर अगदी व्यवस्थित झालं. हसरा पसारा आता पसारा नव्हता. तर हॅप्पी प्लेस झाला होता. 


कॉफी मग हातात घेऊन तिने तिच्या हॅप्पी प्लेसकडे अभिमानाने बघितलं. 


मघाशी छोटीसी कहानी म्हणणारी प्लेलिस्ट आता… कित्येकदा लूप वर वाजून शेवटाकडे आली होती. 


पण त्या गाण्याने तिला तिच्या मनात सुरू झालेल्या वादळाला शांत करायला मदत केली होती. 



क्रमशः 

गौरी हर्षल


रविवार, १८ जून, २०२३

one day at a time - 3-365 days of self care

"आई, मी येतेय ह्या वीकेंडला. आणि माझा प्रोग्रॅम फिक्स आहे बरं का! आधी मी शॉपिंगसाठी जाणार आहे, तिथून एक बुक लॉन्च आहे, त्या नंतर वैदू सोबत लंच आणि मग दुपारी चारच्या आसपास घरी येणार. अँड देन....", शची नॉनस्टॉप बोलत होती. 

"अग हो , हो थांब, जरा श्वास घे. ", तिला थांबवत रीमा म्हणजे तिची आई म्हणाली, " तू घरी येणार आहेस की तुझ्या पी ए ला तुझ्या अपॉइंटमेंट सांगत आहेस? ", रीमाने थोडं रागातच विचारलं. 

"उप्स, साॅरी आई , एक्ससाईटमेंट मध्ये मीच बोलत राहिले. बट आय प्रॉमिस संध्याकाळ नंतर कुठेच जाणार नाहीये. घरीच असेन तुझ्या आणि बाबासोबत. ", शचीच्या आवाजात तिला तिची चूक कळली आहे हे जाणवत होतं. 

"ओके , ठीक आहे, बघू. संध्याकाळी तरी किती वेळ तुझा पाय घरात टिकतो ते. ", रीमा हसतच म्हणाली. 
दोघी मायलेकींनी संभाषण आवरतं घेत फोन ठेवला. 

ठरल्याप्रमाणे शची शनिवारी सकाळीच लवकर घरी आली. 
घरात पाऊल टाकत नाही तोच तिच्या बॉसचा फोन आला. आणि त्यावर बोलतच तिने नाश्ता केला. आवरून आईबाबांच्या गळ्यात पडून सॉरी म्हणतच तिने घर सोडलं. 

मग पुढचा भरगच्च कार्यक्रम पार पाडत वैदू आणि तिने लंच केलं. आणि चार ऐवजी पाच वाजता शची घरी आली. 

घरी आल्यावर ती इतकी थकली होती की कुणाशी काही न बोलता तिने सरळ बेडरूम गाठलं. आणि पुढच्या दहा मिनिटात स्वारी चंद्रावर पोहोचली. 

संध्याकाळ तशीच सरली. तिन्हीसांजेला झोपून राहू नये म्हणून रीमाने तिला उठवलं आणि हातात चहाचा कप दिला. 

गॅलरीत झोक्यावर बसून ती सूर्यास्त बघत होती. बघता बघता तिने शेजारी बसलेल्या रीमाच्या खांद्यावर हलकेच डोकं टेकवल. 

"काय झालं पिल्ल्या?", रीमाने तिच्या कृतीतूनच ओळखलं होतं की काहीतरी बिनसलं आहे. 

"आई, अस वाटत आहे की मी नुसती धावतेय. इट्स एन अन्एन्डींग रेस. आणि कितीही धावा काहीतरी मिस होतच आहे. बघ ना आज मी आणि वैदू बुक लॉन्चला गेलो होतो. तर समीर आणि आद्या म्युझिक कॉन्सर्ट मध्ये होते. त्यांना अस वाटल त्यांनी बुक लॉन्च मिस केला आणि आम्ही म्युझिक कॉन्सर्ट. कळत नाही काय चुकत आहे. " शचीने आपल्या मनात आलेलं आईला सांगून टाकलं. 

" तुमचा गोंधळ कुठे होतो आहे माहीत आहे का शची ? तुम्ही सगळ्या गोष्टी मिळवायच्या मागे धावत आहात. आणि त्या धडपडीत हातात जे आहे त्याचा आनंद घ्यायचाच राहून जातोय. वास्तविक पाहता तुम्ही ज्या ठिकाणी नाही जाऊ शकत त्याचे अपडेट पुन्हा सोशल मीडियावर मिळतातच तुम्हाला. रादर तुमची पिढी लकी आहे त्या बाबतीत. मिस होईल असं काही नाहीये. पण तुमच्या प्रायोरिटी ठरत नाहीयेत. आणि तुम्हाला अस वाटत की काही तरी मिस होतंय. पण प्रत्यक्षात आता नाही तर थोड्या वेळाने तरी तुम्हाला सगळं एक्सैसिबल आहे. ", रीमा म्हणाली. 

"खरंय आई तुझं. ही धावाधाव कुठेतरी थांबायला हवी. सुकून शोधायचा असेल तर थांबणे गरजेचे आहे.
 ते म्हणतात न , 
One day at a time,
One step at a time, 
One breath at a time... 

#one_day_at_a_time 
#3/365_days_of_selfcare
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 
 

मंगळवार, ६ जून, २०२३

learn from experience...2-365 days of self care

"आर्यन, झालं की नाही तुझं आवरून? उशीर होत आहे आपल्याला.", असं म्हणतच शिला आर्यनच्या खोलीत आल्या.
आर्यन खिडकीजवळ बसून टेबलवर असलेल्या त्या फोटोंकडे एकटक बघत होता. आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

त्याची अवस्था बघून शिलाला सुद्धा भरून आलं. आणि चार वर्षांपूर्वीचा आर्यन समोर उभा राहिला. पडलेले खांदे, रडवेला चेहरा आणि कोलमडून गेलेलं मन अशा अवस्थेतच आर्यन पीजी मधून घरी आला होता.

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शक्य ते प्रयत्न आर्यन करत होता. त्यासाठी तो वाट्टेल ते कष्टही घेत होता.
पण एकामागे एक संकटांची मालिका सुरू झाली. आणि कुठेतरी आर्यनचा आत्मविश्वास डळमळीत झाला.

शीला आणि रमेश मात्र ह्या काळात खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभे राहिले. रमेशची त्याच्या बिझनेस मध्ये पैसे गुंतवण्याची तयारी असूनही आर्यनने त्याला नकार दिला.

नकार देताना आर्यनने त्या दोघांनाही सांगितलं की , "माझ्या बुद्धिमत्तेच्या आणि कष्टाच्या जोरावर मला काही तरी करून दाखवायचे आहे. जर ह्या वेळीही  मला यश मिळालं नाही तर मी नक्की तुमची मदत घेईन. पण मला पुन्हा एकदा प्रयत्न करून बघू द्या. "
त्या दोघांनाही आर्यन ला पुन्हा उभं राहिलेलं बघायचं होतंच. त्यामुळे त्यांनी त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याची साथ द्यायचे ठरवले.

आणि रात्रंदिवस एक करून आर्यन ने घेतलेल्या कष्टाचं चीज झालं. त्याचा बिझनेस हळूहळू का होईना मार्गी लागला.

पण म्हणतात न, पडत्या काळात आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांपैकी कोण आपले खरे हितचिंतक आहेत हे लक्षात येतं. आर्यन ही काही वेगळा नव्हता. त्यानेही हा अनुभव घेतला.

आयुष्याच्या शाळेने त्याला असे काही अनुभव दिले की तो त्यातून तावून सुलाखून बाहेर पडला.

आणि आजच तो दिवस होता, आर्यनला एके ठिकाणी तरुण मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं होते.

मागे वळून पाहताना आज आर्यन ला जाणवलं होतं की अनुभव नावाचा हा गुरू त्याचं आयुष्य किती समृद्ध करून गेला होता.

आर्यन ने तर घेतला होता त्याच्या अनुभवातून योग्य तो धडा म्हणून तर त्याच्या प्रयत्नांना यश मिळालं.  पण आपण त्या दृष्टिकोनातून लक्ष देतो का?

वाचक मित्रमैत्रिणींनो , प्रत्येक अनुभव मग तो चांगला असो किंवा वाईट आपल्याला काही तरी शिकवत असतो.

आणि जोपर्यंत आपण त्या अनुभवातून योग्य तो धडा घेत नाही,  तोपर्यंत आपल्याला त्याच त्याच पद्धतीचे अनुभव येतात.
नकळतच आपण म्हणतो ना की सारखं सारखं हे असच माझ्यासोबत का घडतं?

तर ती नियतीची योजना असते आपण त्या अनुभवातून योग्य तो धडा घेत #स्वतःला_घडवण्यासाठी.
अशावेळी खाली दिलेला सुविचार लक्षात ठेवायचा...
𝑫𝒐𝒏𝒕 𝒃𝒆 𝒂𝒇𝒓𝒂𝒊𝒅 𝒕𝒐 𝒔𝒕𝒂𝒓𝒕 𝒐𝒗𝒆𝒓.
𝑻𝒉𝒊𝒔 𝒕𝒊𝒎𝒆 𝒚𝒐𝒖'𝒓𝒆 𝒏𝒐𝒕 𝒔𝒕𝒂𝒓𝒕𝒊𝒏𝒈 𝒇𝒓𝒐𝒎 𝒔𝒄𝒓𝒂𝒕𝒄𝒉,
𝒚𝒐𝒖'𝒓𝒆 𝒔𝒕𝒂𝒓𝒕𝒊𝒏𝒈 𝒇𝒓𝒐𝒎 𝒆𝒙𝒑𝒆𝒓𝒊𝒆𝒏𝒄𝒆.
#learn_from_experience
#2/365_days_of_selfcare
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 



रविवार, ४ जून, २०२३

feel it heal it...from 1-365 days of self care

"मनीषा अजून किती दिवस धावणार आहेस तू या सगळ्या गोष्टींपासून? कधी ना कधीतरी तुला सगळ्या गोष्टींना फेस करावेच लागणार आहे. चार लोकांमध्ये जाऊन मिसळावे लागणार आहे. पुन्हा एकदा जॉब वर जावे लागणार आहे. पण तू आहेस की तुला फक्त घरात एका कोपऱ्यात बसून राहायचं आहे. असं केल्याने कसं चालेल मनीषा?" मनीषाची आई मनीषाला समजावण्यासाठी प्रयत्न करत होती.
मनीषा वय वर्ष 30 च्या आसपास.
असं काय घडलं होतं मनीषाच्या आयुष्यात? की ती सगळ्या गोष्टी सोडून घरात बसून रहात होती.
मनीषाचं वय बघता तुम्हाला एक साधारण अंदाज आला असेल.
तर मनीषा नुकतीच एका विचित्र नात्यातून सुटली होती.

ओळखीने ती त्या व्यक्तीच्या आणि ती व्यक्ती तिच्या संपर्कात आले होते. बघता बघता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्नाचा निर्णय घ्यायची वेळ आली तसं मात्र समोरची व्यक्ती टाळाटाळ करू लागली.

मनीषा ने काही गोष्टी तिच्या मोठ्या बहिणीच्या कानावर घातल्या होत्या. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट बहिणीला सांगितली. बहिणीने तिच्या नवऱ्याच्या मदतीने त्या मुलाची चौकशी केली. तेव्हा लक्षात आलं की, त्याचं ऑलरेडी लग्न झालेल आहे. बायको गावाकडे असते आणि हा शहरात. मनीषा ही त्याच्यासाठी फक्त सोय होती.

बहिणीच्या नवऱ्याने आपल्या पातळीवरती प्रयत्न करत पुरावे जमा केले. त्या सगळ्या गोष्टी त्याने मनीषा आणि त्या मुलाच्या समोर एकत्रच ठेवल्या. कारण नुसतं सांगून मनिषाला पटलं नसतच. 

एकीकडे जिथे मनीषाला धक्का बसला तिथे दुसरीकडे तो मुलगा मात्र मनीषा माझ्या मागे लागली होती असं म्हणू लागला .
त्याचं ते सगळं बोलणं ऐकल्यानंतर मनीषाने तिथेच त्याला आपल्यातलं नातं संपलं असं सांगून जायला सांगितलं.  तो रागा रागातच तडतडत निघून गेला.

त्यानंतर त्या दोघांचा एकमेकांशी काहीही संपर्क उरला नाही. रादर मनीषाच्या बहिणीने आणि तिच्या नवऱ्याने तशी काळजी घेतली. पण मानसिकरित्या मनीषावर जे आघात व्हायचे होते ते झालेच होते. दुखावलं जाणं, विश्वासघात होणं या सगळ्या गोष्टी कुठेतरी तिच्या मनावर खोलवर परिणाम करून गेल्या.

परिणामी गेले काही दिवस मनीषा सुट्टी घेऊन घरात बसून राहिली होती. तिचं हे नातं फारशा कोणाला माहित नसलं तरी लोक काय म्हणतील?कुणाला काय वाटेल? ह्या गोष्टींचा विचार तिच्या मनात पिंगा घालू लागला. घरात आता सगळ्यांना माहीत होतं. पण मनीषाची काही चूक नसल्याने सगळ्यांनी तिला समजून घेण्याचा पवित्र घेतला होता. तिने त्या नात्यातून, त्याच्या कटू आठवणींमधून बाहेर पडावं म्हणून सगळेजण प्रयत्न करत होते. पण मुख्य प्रयत्न तर मनीषानेच करण अपेक्षित होतं. आणि ती मात्र कुठेतरी अपराधीपणा घेऊन बसली होती.

वाचक मित्रमैत्रिणींनो , आपल्या बाबतीत अशा अनेक घटना घडत असतात. ज्यामध्ये बऱ्याचदा समोरची व्यक्ती चूक झाल्यानंतर सगळा ब्लेम आपल्यावर टाकून स्वतः नामानिराळी होते.

आपण मात्र त्या आरोपाला नकळतच स्वीकारतो आणि मग मानसिक पातळीवर त्रास होऊ लागतो. आपल्याला त्रास होऊ लागल्यावर मात्र आपली सगळ्यात पहिली भूमिका असते दुर्लक्ष करण्याची.

आपण आजारपण किंवा दुखणे मग ते शारीरिक असो किंवा मानसिक त्यांना टाळण्याचा प्रयत्न सगळ्यात आधी करतो. कारण आजूबाजूला तेच बघितलेले असते, सल्लेही तसेच मिळालेले असतात.

पण एका पॉइंट नंतर मात्र गोष्टी अवघड होतात....
अशा वेळी काय करायचं? ते खाली दिलेलं आहे...
Sit with it. sit with it. sit with it.
Even though you want to run.
Even when it's heavy and difficult.
Even though you are not quite sure of the way through.
Healing happens by feeling... Dr. Rebecca Ray

कितीही त्रास होत असला तरी ती भावना पूर्णपणे काढून टाकण्यासाठी आधी आपल्याला ती स्वीकारावी लागते.
- मला ह्या xyz व्यक्तीच्या ह्या वागण्याचा त्रास होतो आहे.
- कितीही पळून जावसं वाटलं तरी त्या गोष्टीला सामोरे जावे...आज नाही गेलो तर भविष्यात पुन्हा कधीतरी घूम फिरके ती गोष्ट कुठल्या ना कुठल्या रूपात समोर येणार हे नक्की... मग आजच सुरुवात करायची.
- गोष्टी अवघड असतात अशक्य नाही... त्यामुळे आपण प्रयत्न केले तर 99 टक्के त्रासातून सुटका होऊ शकते.
सो आधी प्रयत्न तर करू....
वरच्या quote मध्ये शेवटचं वाक्य आहे healing happens by feeling... ह्या वाक्यात सोप्या भाषेत सांगितल आहे.
"शारीरिक दुखण्यातून बरं व्हायचं असेल तर जसं कडू औषध, इतर ट्रीटमेंट घ्याव्या लागतात. तसच मानसिक पातळीवर गोष्टी बदलायच्या असतील तर त्या स्वीकारून त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करणे गरजेचे असते."

जाता जाता एकच सांगते , त्रासदायक प्रसंग, घटना, आठवणी, व्यक्ती ह्यांना टाळू नका. जितकं टाळण्याचा प्रयत्न कराल तितका जास्त त्रास होईल. त्यापेक्षा त्या गोष्टींवर नीट विचार करून ती भावना समजून घेत त्यावर उपाय शोधून तो त्रास कायमचा दूर करण्यासाठी प्रयत्न करा.

𝙵𝚎𝚎𝚕 𝚒𝚝. 𝚃𝚑𝚎 𝚝𝚑𝚒𝚗𝚐 𝚝𝚑𝚊𝚝 𝚢𝚘𝚞 𝚍𝚘𝚗𝚝 𝚠𝚊𝚗𝚝 𝚝𝚘 𝚏𝚎𝚎𝚕. 𝙵𝚎𝚎𝚕 𝚒𝚝. 𝙰𝚗𝚍 𝚋𝚎 𝚏𝚛𝚎𝚎...

#feel_it_heal_it
#1/365_days_of_selfcare
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 


बुधवार, ३१ मे, २०२३

विश्वास हा ग्रुप आणि त्याची संकल्पना काय आहे?

#विश्वास हा ग्रुप आणि त्याची संकल्पना काय आहे? 


आधी एक शॉर्ट इंट्रोडक्शन माझं 
नमस्कार मंडळी, 
मी गौरी हर्षल कुलकर्णी रा. अहमदनगर
व्यवसायाने मी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि समुपदेशक आहे.  पण त्यापेक्षा जास्त मी ओळखली जाते ती माझ्या विश्वास, कालाय तस्मै नमः आणि इतर काही अध्यात्मिक रहस्यकथामुळे. 
"स्वतःला शोधताना - गौरी हर्षल" ह्या नावाने माझं फेसबुक पेज आहे आणि ब्लॉग ही.  ब्लॉग लिंक शेयर केली आहेच. त्यावर माझं लेखन वाचता येईल. 
अध्यात्मिक मार्गदर्शन ही गोष्ट मात्र माझ्या आयुष्यात दत्तगुरुंच्या कृपेने आलेली आहे. त्यामुळे त्याचं सगळ श्रेय त्यांचं आहे. 
आणि ते त्यांच्याच इच्छेने घडत. 

************************************************

विश्वास हा ग्रुप आणि उपक्रम हे अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन्हींच्या माध्यमातून सातत्याने काहीतरी देण्यासाठी राबवले जात आहेत. 
त्यासाठी हे काही वाचावं लागेल. 

दत्त जयंती 7 डिसेंबर 2022
http://gauriharshal.blogspot.com/2022/12/blog-post.html

************************************
सकाळ आणि रात्रीच्या टास्क सहित आहे त्यामुळे काळजीपूर्वक वाचा.
बऱ्याच जणांच्या मनात शंका आहेत की आपण या ग्रुप मध्ये ऍड तर झालोय पण आता नेमकं काय काय आपल्याला करावे लागणार आहे? 
 सो सगळ्याना एक सांगते सीट बॅक अँड रिलॅक्स...
आपल्याला काहीही अवघड अतर्क्य असं करायला जायचं नाहीये . उलट आपल्याकडून ज्या काही गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत, निसटल्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 
 रोजचं आयुष्य,रोजच्या गोष्टी आहेतच आणि असणारच फक्त त्या सोबतीने असं काहीतरी शोधायचं जे जगण्यासाठी टॉनिक ठरेल.  
असं काय असू शकतं की जे तुमच्याकडेच आहे पण इतकी वर्ष तुम्हाला सापडल नाही आहे? 
 अशा बऱ्याच गोष्टी आहेत हळूहळू प्रत्येकाला त्या गोष्टी सापडतील हे नक्की.  पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपण सगळे एका समांतर मार्गाने प्रवास करत आहोत. कोणी थोडं पुढे आहे, कोणी थोडं मागे आहे. 
 पण प्रत्येकाचा प्रवास हा त्याचे/ तिचे  वेगळे अनुभव घेऊन आतापर्यंत आला होता आणि पुढेही येणार आहे. 

इथून फक्त एक महत्त्वाचा बदल हा असेल की तुम्हाला आयुष्याच्या जास्तीत जास्त चांगल्या क्षणांची शिदोरी सोबत कशी ठेवायची हे कळेल. आणि त्यामुळे गोष्टी सुकर होतील. 

 मी आहेच मदतीसाठी.  तुम्ही कधीही कुठल्याही शंकेसाठी इथे ग्रुप वर संपर्क साधू शकता. 

*** सकाळचे टास्क ***
रोज सकाळी उठल्या नंतर जागीच सुखासनात बसायचं आहे. "पाच" मिनिटे डोळे मिटून शांत बसायचं. 
ज्यांना येत असेल त्यांनी डोळ्यासमोर हाताची ओंजळ धरून खालील श्लोक म्हणायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात एकमेकावर चोळून चेहऱ्यावरून फिरवायचे. 
कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम्॥
(आधीपासून करत असाल तर अतिशय उत्तम) 

*** दात घासत असाल न तेंव्हा आजचा दिवस छान असणार, सगळी कामं मी ठरवली तसं करण्याचा प्रयत्न करणार अस जमेल तितक्या वेळा स्वतः ला सांगा.

झालं की इथे मेंशन करा. उठल्या उठल्या करायचं आहे त्यामुळे सकाळी लगेचच हे होण अपेक्षित आहे हा नियम पाळण्याचा प्रयत्न करा.

*** रात्रीचा टास्क ***
एक छोटीशी गोष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या कमीत कमी तीन चांगल्या गोष्टी, घटना किंवा भेटलेल्या व्यक्ती आठवायच्या आहेत.
घरात कुणासोबत हे करायचं असेल तर अतिशय उत्तम. संवाद वाढतो आणि मुख्य म्हणजे फक्त चांगलं काय घडलं ते आठवायच आहे. 
(कुणी बोलण्यास नसेल तर लिहून ठेवायचं, फोनमध्ये सुद्धा लिहू शकता. )

धावपळ आणि गडबडीत दिवस सरून
सुरू झाली आहे रात्र
मनाच्या कप्प्यात जपून ठेवूया 
दिवसातील तीन सकारात्मक घटनांचे चित्र

झोपण्याआधी करायचं आहे सो त्यानंतर फोन हातात घेऊन बसायच नाही हा नियम पाळण्याचा प्रयत्न करा. 
तुम्ही झोपण्याआधी टास्क करायचा आहे. त्यानंतर शक्यतो फोन बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा.

आणि हो सगळ्यांना एक विनंती वजा सूचना आहे की इथले टास्क बाहेर शेयर करू नका. त्याचा काही उपयोग होणार नाही. 
का? कारण माझी पद्धत वेगळी आहे. त्यामागे माझी साधना आणि दत्तगुरुंची इच्छा असते. 
मी ज्यांची जबाबदारी घेते त्यांनाच त्याचा फायदा होतो. ही त्यांनी 🙏 केलेली सोय आहे. - गौरी हर्षल 

(करुणात्रिपदी अध्ययन वर्ग, घोरकष्टोद्धरण स्तोत्र अध्ययन वर्ग आणि स्वतःला घडवण्यासाठी हा 21 दिवसांचा कोर्स, त्याशिवाय वैयक्तिक मार्गदर्शन हे मात्र माफक फी घेऊन केले जातात.)

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल