मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

अध्यात्म म्हणजे काय ? भाग १

#अध्यात्म_म्हणजे_काय_? भाग १

आपण लहानपणापासून काही विशिष्ट आणि ठराविक साच्यातूनच विचार करत आलो आहोत कारण आपल्याला तशीच सवय लागली आहे. आणि तस बघायला गेलं तर त्यात आपली चुक आहे अस काहीच नाही. 

ओव्हरऑल  समरी काढली तर कॉमन पॉईंट हे निघतील

- स्वतःच्या आत्म्यापर्यंत प्रवास
- देवात किंवा त्या शक्तीत लीन होणे
- स्वतःच्या आत्माच्या प्रगतीसाठी 
- स्वतःमध्ये सकारात्मक विचार वाढवणे
- मृत्यू ला शांतपणे सामोरे जाणे
- देवाकडे पोहोचण्याचा मार्ग

पण हे सगळं घडून येण्याच्या मध्ये अनेक पायऱ्या आहेत. 
त्या पायऱ्या गाळून अचानक शेवटच्या टप्प्यात नाही जाता येत. 

त्या पायऱ्या कोणत्या? 
* आपली स्वतःप्रति असलेली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या 
- हो स्वतः, मी , ह्या मी ला विसरून "त्या"च्यापर्यंत पोहोचणे इतके सोपे नसते आणि ते सहज शक्य ही नसते. 
आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे तो कुठलीही एकच गोष्ट करण्यासाठी नाही. तर अनेक गोष्टी करत स्वतःची प्रगती करण्यासाठी. 
मी ला विसरणे म्हणजे स्वतःच्या सगळ्या चांगल्या वाईट गुणांकडे डोळेझाक करणे. 
मी खरा कसा आहे? हे ज्याला कळले तोच आणि तोचच स्वतःच्या दुर्गुणांवर काम करू शकतो. 

मी एक टास्क दिला होता स्वतःच्या चुका मान्य करण्याचा.

का करायचं होतं?  कारण हीच पहिली पायरी होती स्वतःकडे जाण्याची. आधी त्या आतल्या खऱ्या मी ला तर भेटा मग पुढच्या गोष्टी बघू. 

कॉमन चुका किंवा दुर्गुण बघू
- नकारात्मक विचार करणे आणि पसरवणे
- दुसऱ्याला जज करणे
- ईर्षा
- तिरस्कार
- वाईट भावना 
- अहंकार

ह्या आणि अजून काही कॅटेगरी आहेत ह्यामध्ये आपल्या कळत नकळत केलेल्या चुका, दुर्गुण मोडतात. 

किती जणांना हे जमलं ? तुमचं तुम्ही ठरवा. 

* आपल्या जवळच्या लोकांप्रती असलेली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या
- आपल्याशी कोणत्याही कारणांनी जोडलेल्या लोकांप्रती आपली काही कर्तव्य असतात. आणि स्वतःची अध्यात्मिक प्रगती करताना त्यातल्या कुठल्याही बाबतीत हयगय केलेली "त्या "लाही आवडत नाही. 

मग बरेच जण म्हणतात की सगळं त्यांच्यावर सोपवून टाकायचं. टाका न , नक्की सोपवा पण त्याआधी एक गोष्ट स्वतःला विचारा की मी अस वागल्याने देव किंवा ती शक्ती माझ्या अध्यात्मिक प्रगतीला सहाय्यक ठरेल का? की मी अजून एक चूक करतोय? 

मी खूपदा सांगते असेल माझा हरी तर नेईल खाटल्यावरी ही वृत्ती सोडा. जस युगे बदलली आहेत, माणूस बदलला आहे तसेच वरूनही काही गोष्टी बदलल्या आहेत. बदलल्या म्हणण्यापेक्षा त्या आधीपासूनच तशाच होत्या. ज्या व्यक्ती स्वतःची मदत करण्यासाठी कष्ट घेतात, मेहनत घेतात त्यांना हमखास मदत मिळते, मार्ग सापडतो. 

सो फर्स्ट हेल्प युअरसेल्फ अँड अदर्स ऑल्सो. 

* इतर कुठल्याही जीवाबद्दल मनात वाईट विचार न येऊ देणे. 

जमतं? स्पष्ट उत्तर आहे नाही. 

मग आपण कसे काय पुढे जाणार? 

वाईट विचार हे कुठल्याही प्रकारचे असू शकतात.

उदाहरणार्थ -  अगदी कॉमन फेसबुक फ़्रेंड च्या पोस्टवर xyz अनोळखी व्यक्ती अस का बोलली? मग त्याबद्दल मत बनवायचं आणि वाटत सुटायचं. 
कशासाठी? तुम्ही त्या व्यक्तीला किंवा ती तुम्हाला खाऊ घालतेय का? मग सोडा 

सोडून देणं , let go  करणं जमलंय का मला? 

लेट ईट गो , जाऊदे 

मला का नाही जमत घरात , बाहेर सगळीकडे तटस्थ न्यूट्रल जगणं. 

माझ्यासाठी जे योग्य आहे ते घ्यायचं आणि बाजूला व्हायचं. 

अगदी आपले सो कॉल्ड कुणी शत्रू असतील तर त्यांच्याकडूनही योग्य ती शिकवण धडा घ्यायचा आणि स्वतःला सुधरवायच. 

लीन होणं ह्यालाच म्हणत असावेत कदाचित.

जो जो जयाचा घेतला मी गुण 
तो तो म्या केला गुरू जाण


* सकारात्मक विचार वाढवणे , कृती वाढवणे 

हे होतय का?? 

 मेडिटेशन, जप मी केला पण मी कुठेही कुठलीही चांगली गोष्ट बोलले नाही, वागले नाही तर माझं कर्म काय परतून माझ्याकडे आणेल? 

सकारात्मक विचार तर हवाच तसा माईंडसेटही हवा पण अस करताना वास्तवाला नाकारायच नाही. 

फॉर eg. माझं एक काम सुरू आहे मला माहित आहे की मी ते कसं केलं आहे. पण ज्या कारणासाठी ते केलं आहे ते बघितल्यावर मला अंदाज येतो की, माझ्याकडून काही गोष्टी सुटल्या आहेत. त्यामुळे आता मला अपेक्षित यश मिळणार नाही. अशावेळी मी सत्य स्वीकारून जर दुसरे पर्याय शोधायची त्याती ठेवली तर त्याला म्हणता येईल सकारात्मक विचारसरणी. 

पण जर मी नुसतच म्हणत बसले की सगळं नीट होईल तर अर्थातच ते आपोआप घडणार नाही. कारण इथे मी वास्तव स्विकारतच नाहीये. 

सेम गोष्ट अध्यात्म सांगते आधी सर्व बाजूनी स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न करा आणि मग अपेक्षित गोष्टींची अपेक्षा बाळगा. 

कारण हे सगळं कनेक्टेड असतं. 

* मला काही माहीत नाही

आपल्याला सगळ्यांनाच अगदी प्रत्येक माणसाला अस वाटत असत की मला सगळं माहीत आहे. 
पण खरंच जगातील सगळ्या गोष्टी कळण्याची, माहीत असण्याची गरज असते का? 

कधी कधी छोटासा अनुभवही आयुष्य बदलून टाकतो आणि कधी कधी मोठ्यात मोठी गोष्ट घडूनही काहीच फरक पडत नाही. 

अशा वेळी आपल्याला सगळंच कळण्याची गरज नसतेच. आयुष्य आनंदी, सुखी करणे हे आपल्याच हातात असते. त्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये आतून बदल घडवावे लागतात. 
आणि त्यात वेळ जाऊ द्यावा लागतो.


* आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा 

रूढी, परंपरा , चालीतीरी 

ह्या गोष्टी प्रत्येक भागातील वातावरणा सोबत बदलेल्या सापडतात. 

अध्यात्म आणि धार्मिक कृत्य ह्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही अस नाही. 

पण धार्मिक कृत्य ही सामान्य माणसाला देवाच्या , योग्य गोष्टींच्या दिशेने वळवण्यासाठी तयार केलेला मार्ग आहेत. 

ती पार पाडत असताना मात्र मनाची आणि पर्यायाने शरीराचीही शुचिता(शुद्धता) अपेक्षित असते. 

आपल्याला श्रद्धा, विश्वास , संयम शिकवण्यासाठी काही गोष्टींचा अंतर्भाव आपल्या आयुष्यात करण्यात आला होता.                         

*अध्यात्म मार्गावर अनुभव येण्याची अपेक्षा सगळ्यांनाच असते. पण ही गोष्ट प्रत्येकाच्या पूर्वसंचितावर आणि आत्ताच्या कर्मांवर अवलंबून असते. 

त्यात कुणीही ढवळाढवळ करू शकत नाही.

हा प्रवास सुरू करताना आपल्याला आपल्या सगळ्या चुकीच्या सवयींना सोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. 

आपोआप काहीही घडून येत नाही. 

मी रागवत नाही म्हणायचं आणि मनातल्या मनात समोरच्या व्यक्तीला शिव्या द्यायच्या ह्याला कंट्रोल म्हणत नाहीत. 

मनातल्या भावना स्विकारायला आणि बदलायला जमलं पाहिजे. अवघड असते अशक्य नाही.

इतर लोकांना त्यांच्या वागणुकीला आहे तस स्विकारता यायला हवे. कसलीही कमेंट मनात सुद्धा न करता स्वीकार करायचा. 

अपेक्षा न ठेवता चांगली वर्तणूक करायची पण ह्याचा अर्थ असा नाही की स्वतःची पूर्ण किंमत कमी करून घ्यायची. 

लक्षात घ्या हे कलियुग आहे. इथे तुम्ही आधी स्वतःचा आदर करायला हवा. अस जर तुम्ही करत नाही आहात म्हणजे तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेल्या त्याच्या अंशाचा अपमान करत आहात. 

विनम्रता आणि दुबळेपणा ह्यातला फरक ओळखून वागायचं. 

काही मुद्दे प्रायमरी लेव्हलवर आहेत काही अजून येतील. 

पण आत्तासाठी एवढं बास. 

बाकी #दत्तात्रेयार्पणमस्तू!!!

शुभं भवतु!!!

क्रमश: 

#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल


मॉर्निंग मंत्रा भाग 2

#मॉर्निंग_मंत्रा २
१ नोव्हेंबर २०२२
#थॉटस्_पॅटर्न 

ह्या जगात कुठली गोष्ट सर्वात जास्त अवघड असेल तर ती म्हणजे स्वतःच्या बाबतीत चांगल घडत आहे, घडणार आहे असा विचार करणे. 

जसा वाईट विचार , भावना, व्यक्ती ह्यांचा मनावर परिणाम पटकन होतो तसा तो चांगल्या विचार, भावना आणि व्यक्तींचा होत नाही अस का? कारण जी गोष्ट सोपी , कमी त्रासदायक ती लवकर स्विकारली जाते. जी गोष्ट करायला, स्वीकारायला अवघड तिला शक्यतो टाळण्याकडे माणसाचा कल असतो. 

चांगल्या सवयी स्वतः ला लावणे, स्वतःमध्ये रुजवणे हे सगळ्यात अवघड काम. त्यातही एका स्पेसिफिक वयानंतर तर मी कुणाचं का ऐकावं? हा मला सांगणारा कोण? ही वृत्ती वाढलेली असते. त्यामुळे चांगल काही शिकायचं म्हटल की जास्त कष्ट करावे लागतात. 

मी याआधीही म्हणाले होते की अध्यात्मातच नाही तर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यात प्रगती हवी असेल तर आधी बेसिकवर काम करा. 

स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करायचा प्रयत्न करा. 

ज्यांना अस वाटत की , अध्यात्म म्हणजे फक्त परमार्थ त्यांना एक सांगते , जोपर्यंत स्वार्थी होऊन तुम्ही स्वतःची प्रगती करत नाही तोपर्यंत तुम्ही इतरांची मदत करू शकत नाही. 

इथे स्वार्थी होण म्हणजे स्वतः ला घडवण, स्वतःला सगळ्या गुणदोषांसकट स्वीकारणे , आपल्या मनात सातत्याने चांगल्या विचारांना घोळवत ठेवणे. हे इतकं जरी जमल तरी तुमच्या सहवासात येणाऱ्या "चांगल्या" लोकांना सुद्धा तुमच्या अशा स्वार्थी होण्याचा फायदा मिळतो. कारण सकारात्मकता सुद्धा संसर्गजन्य असते.

 गरज असते ती फक्त मनापासून स्वतःसोबत प्रामाणिक राहण्याची. 

सो लोक्स,

स्वार्थी होऊन बघा बाय गुड मिन्स 
आयुष्य नक्की होईल मास्टरपीस

संकल्प करण्यासाठी मुहूर्ताची गरज नसते. 
त्यातही संकल्प जर स्वतः ला घडवण्यासाठी असेल तर? वाट कसली पाहताय करून टाका. 

हा आजचा मॉर्निंग मंत्रा. लवकरच भेटूया पुढच्या लेखात तोपर्यंत? 

सगळं काही #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु

#आई_राजा_उदे_उदे 

#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

मॉर्निंग मंत्रा १

#मॉर्निंग_मंत्रा १ 

१९ ऑक्टोबर २०२२

#थॉट्स_पॅटर्न (स्विकार आणि बदल) 

Acceptance म्हणजे स्विकारणं. 

आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपण नाईलाजाने स्विकारतो. 
पण काही गोष्टी मात्र खरोखरच स्विकारण्याची गरज असते. 
जसं की, 
- स्वतःला आहे तसं स्विकारणं 
- आपल्यामध्ये असलेले दुर्गुण स्विकारणं 
- आपल्याला एखाद्या गोष्टीचा, व्यक्तीचा, घटनेचा त्रास होतो हे स्विकारणं. 
- आपणही चुकू शकतो, चुकलो आहोत, चुकतो आहोत हे स्विकारणे

आपली बऱ्याच परिस्थितीत प्रतिक्रिया काय असते माहीत आहे? मला नाही करायचं हे, लोक काय म्हणतील? , मला जमणार आहे का असलं काही? म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला पलायन करायचे असते. 

पळायचे मग ती एखादी समस्या असो किंवा आलेली संधी. 

पण पळून प्रश्न सुटतात का? विचारा.... स्वतःला विचारा की बाबारे आत्तापर्यंत मी कितीतरी वेळा कितीतरी गोष्टींपासून, माणसांपासून , समस्यांपासून, संधींपासून पळालो आहे तर त्यामुळे माझे प्रश्न सुटले की अजून गुंतागुंतीचे झाले? 

जर उत्तर सुटले अस असेल तर तुम्हाला साष्टांग दंडवत🙏 ग्रेट आहात तुम्ही. 

पण जर गुंतागुंत वाढली असेल तर ती सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? की नेहमीप्रमाणे कुणीतरी दुसऱ्याने येऊन माझ्या समस्येवर उपाय शोधून द्यावा म्हणून वाट बघत बसला आहात? 

आता आजूबाजूला मी असे अनेक जण बघतेय जे अस करतात. स्वतःच्या समस्येवर स्वतः काहीच करायचं नसतं ह्यांना दुसऱ्याने ह्यांच्या समस्येवर विचार करून, कृती करून सगळं आयतं ह्यांना आणून दिले पाहिजे का? तर उद्या पुढे जाऊन काही प्रॉब्लेम झालाच तर पुन्हा एकदा हे दुसऱ्यांवर खापर फोडायला मोकळे. 

अशा लोकांना आयुष्यात कधीच काहीच धड जमलेलं नसतं. हेच का असे अनेक जण सापडतील जे सकाळी बस चुकल्यापासून ते रात्री झोप नीट लागली नाही इथपर्यंत दुसऱ्यांना दोष देत असतात. 

त्यांना मला विचारावेसे वाटतं की तुम्ही स्वतःच्या वागण्याचं, बोलण्याच काही निरीक्षण कधी केलं आहे का? 

तुम्ही स्वतःला स्वतःसाठी कधी बदललं आहे का? 
उशीर होतो म्हणून लवकर उठुया अस कधी ठरवलं? रात्री उशिरापर्यंत जागत बसण्यापेक्षा लवकर फोन बाजूला ठेवू अस कधी केलं? उत्तर अर्थातच नाही असं असतं. 

एखादी व्यक्ती आयुष्यात यशस्वी झाली की आपण त्याच्या यशाची पिसे काढू लागतो. कुणालाही त्या व्यक्तीचे श्रम दिसत नाहीत. 

तुम्हीही विचार, कृती बदलून बघा ,सातत्याने प्रयत्न करा , तुम्हीही व्हाल की यशस्वी. ह्यावर लगेच सुरू नाही हो , अस काही होत नाही. अरे मग अभ्यास वाढवा ,निरीक्षण करा,  कुठे काय चुकतंय बघा, नोंदी घ्या , पद्धत बदलून बघा ह्या गोष्टी सगळ्या बाबतीत लागू पडतात शाळेच्या अभ्यासपासून ते नाते आणि व्यवसाय नोकरी इथपर्यंत. 

मी जेव्हा लोकांना गाईड करत असते तेव्हा बऱ्याचदा एक कॉमन प्रश्न विचारला जातो,  आयुष्यात सतत अडथळे येतात, समस्या निर्माण होतात, कुठल्याही गोष्टीत यश मिळत नाही. 

अशा बाबतीत माझं साधं सरळ विचारणं असत, स्वतःच्या बेसिकवर काम केले आहे का? ते करण्याची तयारी आहे का? 

बेसिक म्हणजे काय? तर आपल्या मनात सतत येणारे विचार. मग ते स्वतःबद्दल असू दे किंवा इतरांबद्दल.

एक छोटासा टास्क करून बघा. हा लेख वाचल्यापासून पुढचे काही तास स्वतःच्या वागण्याचं निरीक्षण करा. आपण किती वेळा स्वतःबद्दल वाईट बोलतो ते बघा. कितीवेळा समोर आलेल्या, व्यक्ती, वस्त बद्दल वाईट विचार करतो ते बघा. हा विचारांचा पॅटर्नच तुमच्या अपयशाचं कारण असतो. 

हा आपल्या सगळ्यांचाच एक महत्वाचा दुर्गुण आहे. उघडपणे किंवा मनातल्या मनात सतत चुकीचे विचार घोळवत राहायचं. सगळेच अस करतात , कुणीही संत नाहीयेत. 

हे अस का घडतं? तर बऱ्याचदा आपल्या स्वतःबद्दल वाईट विचार करणं हे आपण लहानपणापासून जे काही इतरांकडून ऐकत आलो आहोत त्यामुळे असतं. आणि इतरांबद्दल ? ते ही तसच. घरातली मोठी मंडळी बऱ्याचदा लहान मुलांच्या उपस्थितीतच नातेवाईक, शेजारी, स्नेही, सहकारी ह्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करत असतात. 
झालं अनुकरणातून मुलंही तेच शिकतात. 


म्हणून आपल्याला सगळ्यात आधी आपल्या थॉट पॅटर्न वर काम करावं लागणार आहे. त्यासाठी स्वतः चुकत आहोत हे स्विकारण्याची गरज आहे. 

काही तास स्वतःच निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला आपोआपच लक्षात येईल की तुम्ही काय विचार करता आणि किती पातळीवर जाऊन करता. 

त्यानंतर पुढची स्टेप घेता येईल. 

मंडळी, अध्यात्मिक साधनेत जर प्रगती करायची असेल न तर हा पाया नीट करणं प्रचंड गरजेचं आहे. कुणी त्रास दिला असेल आणि त्यामुळे तुम्ही चिडत, रागवत असाल तर गोष्ट वेगळी. पण जर विनाकारणच तुमच्या मनात नकारात्मक विचार येत असतील तर मात्र त्यावर उपाय करणे आवश्यक असते. 

सो लोक्स, 

आयुष्याला बनवायचे असेल सुखकर
तर नकारात्मक गोष्टींना दूर कर 

हा आजचा मॉर्निंग मंत्रा. लवकरच भेटूया पुढच्या लेखात तोपर्यंत? 

सगळं काही #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु

#आई_राजा_उदे_उदे 

#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 


शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

दुर्गे दुर्घट भारी भाग 2

#दुर्गे_दुर्घट_भारी भाग २ 

आय नो मंडळी बरेच दिवस गॅप घेऊन भाग येतात. पण काय करू जुन्या गोष्टी आठवून त्यातून मोजकंच आणि महत्वाचं तुमच्यासमोर मांडायचं आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा सगळं रिकॉल करावं लागतं. 

तर आपण मागच्या वेळी येऊन थांबलो होतो ते २०१८ गुढीपाडवा ह्या दिवसापर्यंत. 

मार्च २०१८ च्या गुढीपाडव्याला आम्हाला पुन्हा एकदा कळलं की आम्ही आईबाबा होणार आहोत. पण ह्यावेळेस चार महिने थांबून मग पुन्हा हुलकावणी ह्या चक्रातून जाण्याची आमच्या दोघांची तयारी नव्हती. कारण नुकत्याच जानेवारीच्या सुरुवातीला माझ्या सासूबाई आकस्मिकपणे आम्हाला सोडून गेल्या होत्या. त्यातून पुन्हा हे सगळं म्हटल्यावर मी तर अक्षरशः डॉक्टराना कन्फर्म होत नसेल तर लगेच सांगा म्हणून मोकळी झाले. 

पण ह्यावेळेस बऱ्याच गोष्टी जुळून आल्या होत्या. बातमी कळली गुढीपाडव्याला आणि त्यानंतर मला ज्या ज्या दिवशी चेकअप साठी बोलावलं होत त्या प्रत्येक दिवशी काही तरी विशेष असायचं. 

म्हणजे पुढचं चेकअप झालं रामनवमीला तेंव्हा डॉक्टर स्वतः होपफुल होते. पण अर्थातच त्यांनी माझी अवस्था पाहून काही खोटी आशा दाखवली नव्हती. 

आणि माझी हो नाही करता करता शेवटी माझी प्रेग्नन्सी कन्फर्म झाली हनुमान जयंतीच्या दिवशी. तो किस्सा मी सेपरेट लिहिला आहे तुम्हाला थोडा शोध घेतला तर सापडेल 
हनुमान जयंती आणि हार्टबीट अस नाव आहे. 

पण हनुमान जयंतीच्याच पोर्णिमेला प्रेग्नन्सी कन्फर्म होणं हा अजून एक छान संकेत होता. 

त्यानंतर मात्र माझ्या बाळासोबत माझा एक नवीन प्रवास सुरू झाला. बसल्या जागी माझी बऱ्याचदा तंद्री लागत होती. आणि पहिल्यांदा माझी तंद्री लागली तेंव्हा मी थेट थेऊरच्या मंदिरात होते. 

तिथे मी एका बाजूला उभी राहून एका दिशेने बघत होते. 

जे कुणी गेले असतील त्यांना माहीत असेल की मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. तर मला एक खूप तेजस्वी चेहऱ्याचा 2,3 वर्षाचा मुलगा तिथे खेळताना दिसत होता. आणि एक हिरव्या रंगाची साडी नेसलेली लांबसडक केस असलेली स्त्री पाठमोरी उभी होती. तो मुलगा इकडे तिकडे मस्ती करून पुन्हा तिच्याकडे जात होता.

 मी वेगवेगळ्या कोनातून त्या स्त्रीचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत होते. पण 4,5 वेळा प्रयत्न करूनही मला तिचा चेहरा दिसला नाही. शेवटी मी हिरमुसून परत जाण्यासाठी वळले तसा माझ्या कानावर खळखळून हसण्याचा आवाज आला. मी गडबडीने वळून पाहिलं पण मला फक्त मळवट भरलेलं कपाळ आणि तिचे डोळे दिसले. 

ते डोळे इतके प्रेमळ होते की त्या अवस्थेत मला जाणवणारा सगळा थकवा दूर झाला. आणि मी तिच्या दिशेने चालायला लागणार तेवढ्यात आमच्या मार्जार 🐈लेकरांपैकी एकाने माझ्या मांडीवर उडी मारून मला जागं केलं. जनरली त्या सगळ्यांच हेच काम होतं वाटतं की मी जास्त उत्सुकता दाखवायला लागले की माझी तंद्री मोडायची😊 . 

तर हे अस काही वेळा घडल्यानंतर मात्र मी नाद सोडून दिला आणि त्या बाळाला बघत बसण्यात धन्यता मानू लागले. सततच्या ह्या संकेतामुळे मला आपल्याला मुलगा होऊ शकतो अस वाटू लागलं होतं. अर्थात आम्हाला काहीही झालं तरी चालणार होतं कारण इतक्या सगळ्या वर्षानंतर होणारे मूल हे सुदृढ असावे एवढीच आमची इच्छा होती. 

एके दिवशी मात्र सकाळी सकाळी साधारणतः दहाच्या सुमारास मी घरात एकटीच होते. आता सहावा महिना लागला होता. आणि आधीच्या हिस्ट्री मुळे मला फारशी हालचाल करायची नव्हती.  पूर्ण बेडरेस्ट वगैरे नव्हतं पण मी आपली जमेल तेवढ घरातलं करून एक जागी बसायचे किंवा लोळत पडायचे. कुणी काहीही शंख केला तरी सध्या आपलं ध्येय 9 महिने नीट पूर्ण करून बाळ जन्माला घालणं हेच आहे हे मी डोक्यात फिट्ट केलं होतं. त्यामुळे किती झोपतेस वगैरे वगैरे सल्ल्याने मला काही फरक पडत नसे. 

तर मी त्या दिवशी अशीच काही तरी वाचत असताना अचानक मला बेडरूमच्या दरवाजाच्या बाहेर प्रचंड उजेड दिसला. मी उठून काय आहे ते बघणार त्याच वेळी मला डोळ्यासमोर अंधार आल्यासारखं वाटलं. मग मीही आहे तिथेच आधी बसले. डोळे बंदच होते. हळूहळू मनाच्या पटलावर शब्द उमटू लागले. 

" किती घाई उठायची? ह्या अवस्थेत अस करायचं नसतं हे माहीत नसेलच म्हणा तुला. पण पुन्हा अस करू नकोस. तसही मी तुला भेटायला आले आहे. पण तुला सध्या तरी मला बघता येणार नाही. तुझ्या डोळ्यांना ते सहन होणार नाही. त्यामुळे आपण असच बोलू. " हळूहळू डोळ्यांसमोर एक स्त्री आकृती साकार होत होती. पण अर्थातच त्या आकृतीचं मूळ रूप अजूनही दिसत नव्हतं. पाय मात्र स्पष्ट दिसत होते. आणि आजूबाजूच्या वातावरणात एक चिरपरिचित गंध जाणवू लागला होता. 

हा वास माझ्या खूप जास्त ओळखीचा होता. पण मी पहिल्यांदा कुठे अनुभवला हेच मला लक्षात येत नव्हतं. 

ती जी कुणीही होती ती एक चांगली शक्ती आहे हे मला माहित होतं त्यामुळे मी तिच्याकडून होणाऱ्या संवादात श्रोत्याची भूमिका घेत सगळं मनात साठवून घेत होते. 

हे असे अतर्क्य , वेगळ्या पठडीतले अनुभव येण्याची ही सुरुवात होती. 
हळूहळू ह्या गोष्टी माझ्या रोजच्या जीवनात एक महत्वाचा भाग होणार आहेत असं कुणी मला सांगितलं असतं तर तेव्हाही मी त्यांना वेड्यात काढलं असतं. 
कारण एकच जे मनावर ठसवलेलं होतं की मी कुणीही नाहीये. 

पण मला कुठे माहीत होतं की जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती तिच्या मित्रासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि त्यानेच मला योग्य वेळी योग्य गोष्टींची प्रचिती द्यायला सुरुवात केली आहे. 

एकेक टप्पा ओलांडत मी सातव्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आले होते. 

इतके दिवस ध्यानाला बसण्यासाठी खळखळ करणाऱ्या मला 9 महिन्याच्या ह्या काळात माझ्या लेकराने जवळपास अर्धा तास तरी बसायची सवय लावली होती. 

अर्ध्या तासात मिळणाऱ्या मनःशांती ची इतकी सवय झाली होती की तसच बसलो तरी चालेल अस वाटायचं. 

त्यावर बसण्याची अनुमती ही नव्हती. कारण आमचा रात्रीचा जागरणाचा वेगळा कार्यक्रम असायचा 😂

आता सांगायला हरकत नाही पण जवळपास पंधरा वर्ष मी जनरली तीन ते पाच जागी असते. त्या आधी मिळणारी झोप मला पुरेशी असते. सुरुवातीला बायोलॉजीकल क्लॉक मग शरीराचं टाईमटेबल आहे असं म्हणत मी येणारे अनुभव उडवून लावले. पण नंतर मात्र आहे हे असंच सुरू राहणार आहे हे माझ्या लक्षात आलं. 

मंडळी , खूप जणांना वाटत हा फाफटपसारा आहे, किंवा ह्यामध्ये काही अद्भुत नाहीये. असे कुठे अनुभव असतात का? तर हो असेच अनुभव असतात हे मी ठामपणे सांगू शकते. कारण मी जेव्हा स्वतःला आरशात बघते तेव्हा मला माझ्या जागी एक सामान्य व्यक्ती दिसते जिला घर, संसार, जबाबदाऱ्या आहेत , जी कधी कधी बरोबर असते तर बऱ्याच वेळेला चुकते सुद्धा, जी चिडते ,रागावते इन शॉर्ट जी एक साधं सरळ सामान्य आयुष्य जगतेय. 

पण ह्या साध्या सरळ सामान्य आयुष्यात त्या शक्तीच्या स्वेच्छेने काही क्षण तिचा सहवास ध्यानात अनुभवता येतो हेच माझ्या जन्माचे सार्थक नाही का? 

हे अनुभव मला मात्र एका मोठ्या जबाबदारीची सतत जाणीव करून देतात आणि ती जबाबदारी म्हणजे माझ्या आतल्या माणुसकीला जिवंत ठेवण्याची जबाबदारी. 

आपल्या सोबत अस कुणीतरी सतत असतं ज्याला फक्त अनुभवता येतं ही गोष्टच तुम्हाला योग्य मार्गावर चालण्यासाठी बळ देते. 

जाता जाता इतकंच म्हणेन देवाला शोधत इकडे तिकडे भटकण्यापेक्षा एकदा स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघा देव तिथेच सापडेल. 

तुमची वाट बघत बसलेला ,आणि तुम्ही दिसला की तो हसून म्हणेल, " चांगलं आणि वाईट दोन्ही तुझ्या मध्येच असतं कायम, तू त्यातून काय निवडतोस त्यावर आपली भेट अवलंबून असते. " 

तुम्ही ठरवा काय निवडायच ते☺️ 

मी लवकरच येतेय पुढचा अनुभव घेऊन तोपर्यंत? 

तोपर्यंत सगळं काही जगदंबार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!! 

#आई_राजा_उदे_उदे !!!  १४ ऑक्टोबर २०२२ शुक्रवार 

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल





सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

दुर्गे दुर्घट भारी भाग १

#दुर्गे_दुर्घट_भारी १



काही गोष्टी घडून येण्यासाठी योग्य वेळेची वाट बघावी लागते. काही गोष्टी आपोआपच योग्य वेळी घडून येतात. 

पण अनुभूती मात्र तुमच्या तयार होण्याची वाट बघत असते. कारण जोपर्यंत ते अनुभव त्यांची ताकद पेलण्यास तुम्ही मानसिक पातळीवर तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांचा आवाका कळण्याची सुतराम शक्यता नसते. 

वेगळी वाट जेव्हा आपल्यासाठी तयार केली जात असते तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते. स्वतःला आणि जवळच्या लोकांना अगणित शारीरिक यातना , मानसिक पातळीवर उलथापालथ, आजूबाजूला ज्यांच्यावर आपला अतिविश्वास असतो अशा कित्येकांचे खरे रूप समोर येते. कित्येकदा आपण कोलमडून पडतो. असे आणि ह्यापेक्षा विचित्र असे कित्येक प्रसंग तुमच्यासोबत घडतात. 

आता कुणी म्हणतील अस का? तर त्याचं उत्तर एकच आयुष्यात पुढे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सगळ्या पातळींवर सक्षम करणे. कुठलाही आणि कसलाही प्रसंग आला तरी तुम्ही न डगमगता त्या गोष्टींचा सामना करावा म्हणून हा सगळा प्रपंच. 

बऱ्याच जणांना वाटत असते अरे वा ह्याचं बरंय ह्यांना अध्यात्मिक अनुभव येतात, देव ह्यांना सतत सुखात ठेवतो. 
तर अस अजिबात होत नाही. अध्यात्मिक अनुभव आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या, भोग, त्रास ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 

अध्यात्मिक अनुभव घेणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला प्रापंचिक त्रासातून सुटका मिळत नाही. रादर बऱ्याचदा लोकांच्या समस्या सोडवताना त्यांच्या त्रासातून काही गोष्टी स्वतःकडे येतात आणि स्वतःच्या त्रासात भरच पडते. पण असो काही गोष्टी टाळता येत नाहीत. 

हे सगळं लिहायचं प्रयोजन म्हणजे मला माझे अनुभव मांडण्यासाठी परवानगी दिली गेली. पण लिहावं काय ते मात्र माझं काही ठरत नव्हतं. कारण खूपदा मी आजूबाजूला बघितलं आहे की कुणी जर असे अनुभव लिहिले तर त्या व्यक्तीची , त्याच्या अनुभवांची खिल्ली उडवली जाते. मला स्वतःला ह्या गोष्टी खूप त्रासदायक वाटतात. 

आय मिन तुम्हाला एखादी गोष्ट पटत नाही, तुम्ही ती अनुभवली नाही म्हणजे ती गोष्ट अस्तित्वात नाही असं नसत न.... नाही पटत , नाही आवडत मग सोडून द्या, वाद घालू नका असं माझं साधं सोपं मत आहे. 

तर आता वळते माझ्या गोष्टीकडे. 

ही खरंतर माझी गोष्ट नाहीये. ही त्यांच्या आणि माझ्या सोबतीची गोष्ट आहे. जे कुणी माझं लेखन वाचतात त्यांना आत्तापर्यंत माझी दत्तासोबत असलेली मैत्री, त्या मैत्रीमुळे मला आलेले अनुभव , माझ्या अनुभवांमुळे लोकांना आलेले अनुभव हे माहीत असेलच. 

घरात दत्ताशी गप्पा ह्या लहान असताना सुरू झाल्या होत्या. पण आपल्या बाबतीत काही गोष्टी वेगळ्या घडतात, काही वेगळे अनुभव येतात , हे मात्र सगळ्या देवांवर रुसून त्यांचं करायचं सोडलं तेंव्हा कळायला लागल्या. 

करायचं का सोडलं? तर लग्नानंतर सात वर्षे माझ्यासाठी प्रचंड अवघड होती. सततच्या हॉस्पिटलमध्ये वाऱ्या, महिनाअखेरीस पदरी पडणारी निराशा, पुनः त्याच चक्रातून जाणे, मग सततचे गर्भपात त्यातही क्यूरोटीन , त्यानंतरच डिप्रेशन हे मी सात वर्षे अनुभवलं. माझ्याप्रमाणे बऱ्याच जणींनी असे अनुभव घेतले असणार. आणि हाच काळ माझ्या परीक्षेचा काळ होता. 

वैतागून एके दिवशी मी सगळं करायचं बंद केलं. पण  करायचं बंद केलं होतं बोलायचं नाही. मला सतत समोर असलेल्या फोटोंशी , देवघरात असलेल्या मूर्तींशी बोलायची सवय होती. काही झालं की सांगायचं , मग ते चांगलं असुदे किंवा वाईट. तो संवाद कधीच थांबला नाही. म्हणजे तस म्हणायला गेलं तर फक्त रूढ मार्ग सुटला होता, पूजाअर्चा, जपजाप्य ह्यांचा. पण मनाने जी नाळ जोडली गेली होती ती मात्र त्या काळात अजूनच बळकट होत गेली. 

क्यूरोटीन करून आल्यावर माझ्याकडे असलेल्या फोटोंशी मी जशी भांडायचे तशीच त्यांनाच जवळ घेऊन रडरड रडायचे सुद्धा. माझ्या बलिशबुद्धीला तेंव्हा सतत काही तरी चमत्कार घडावा अस वाटत असायचं. आणि तस मी भावनेच्या भरात बोलून दाखवायचेही. पण नंतर लक्षात यायचं अरे आपलं आयुष्य म्हणजे काही सिनेमा नाहीये. इथे गोष्टी त्यांच्या वेळेवरच घडतील. त्यात काही करू शकत नाही. मग अशी माझ्याकडूनच माझी समजूत घातली जायची. 

ह्या सगळ्या प्रवासात मी माझ्याच वागण्याचं सतत आत्मपरीक्षण ही करायचे. एखाद्या गोष्टीची इच्छा तीव्र होऊ लागली की स्वतःला विचारायचे हे सगळं इतकं गरजेचं आहे का? आतून उत्तर आलं की मग पुढचा मार्ग शोधायचा. 
हळूहळू माझा प्रवास स्वतःच्या दिशेने होण्याकडे माझी वाटचाल सुरू झाली. 

दत्तभक्ती नसानसात भिनलेली होती पण आपण राहून राहून महिषासुर मर्दिनीकडे का ओढले जातो हे काही कळायला मार्ग नव्हता. 

ही अगदी ताजी म्हणजे दोन ते तीन वर्षांपूर्वी माझ्या लक्षात आलेली गोष्ट हं! इतकी वर्षे मी माझा वाढदिवस रामनवमीच्या आदल्या दिवशी दुर्गाष्टमीला येतो म्हणून माझं नाव गौरी ठेवलं आहे एवढंच जाणून होते आणि त्यातच खुशही होते. पण अलीकडच्या काळात जेव्हा गोष्टी बघण्यात वाचण्यात आल्या तेंव्हा समजलं की अरे हे सगळं खूप विलक्षण आहे. 

चैत्र शुद्ध नवरात्र दुर्गाष्टमीला तर तुळजाभवानीचा उत्पत्तीदिन असतो.  आता मात्र मला माझ्या बाबतीत घडणाऱ्या कित्येक गोष्टींचा अर्थ लागायला सुरुवात झाली. 

आपली जन्मतिथी , आपलं जन्मगाव(तुळजापूर)  आणि आपलं सध्याच राहण्याच ठिकाण(अहमदनगर) हे सगळे तुळजाभवानीशी इतके संलग्न आहेत की आपण काही संबंध नसताना लग्न होऊन सासर सोडून अहमदनगर मध्येच कस काय स्थायिक झालो ? हे सगळं कोडं क्षणार्धात सुटलं.

माझी जन्मभूमी तिची कर्मभूमी आहे  आणि तिची जन्मभूमी तिने माझी कर्मभूमी  बनवली. माझ्यासाठी हे सगळंच फील गुड लेव्हलवर न थांबता पुढच्या टप्प्यावर आलं होतं. 

आयुष्यात अजून काही विलक्षण गोष्टी वाट बघत होत्या आणि त्या माझ्या तयारीची वाट बघत होत्या. 

ती वेळही आली माझ्या आयुष्यातील तुळजाभवानीच्या सहवास पर्वाची सुरुवात झाली चैत्र शुद्ध प्रतिपदा , गुढीपाडवा २०१८. त्या वर्षीची दुर्गाष्टमी स्पेशल होती. बाय ऑल मिन्स. 

मी तिला एकच गोष्ट विचारली , "आफ्टर ऑल धिस टाइम?" 

तिने हसून उत्तर दिलं, " ऑलवेज " 

आणि निश्चिन्तपणे तिच्या हातात स्वतःला सोपवत मी ह्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज झाले. 

#आई_राजा_उदे_उदे  

#महाष्टमी ३ ऑक्टोबर २०२२

बाकी? 

बाकी सगळं जगदंबार्पणमस्तु 🙏 शुभं भवतु!!!

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल 

दुर्गे दुर्घट भारी

#दुर्गे_दुर्घट_भारी 

#विश्वास



एवढीशी कथा 15 भागात संपवून टाकू म्हणून सुरू केली होती. पण तिने आत्तापर्यंत 72 भाग घेतले. 

मानगुटीवर बसून लिहून घेणं काय असतं ते मला विश्वास मुळे कळलं. 5 मिनिटे एका जागी स्वस्थ न बसणारी मी आता एक तास सहज तंद्री लागल्यासारखी बसलेली असते. 

स्वतःला शोधताना ह्या माझ्या फेसबुक पेज आणि ब्लॉगच नाव ह्या कथेने खरं केलं. आत्तापर्यंतच्या 35 वर्षाच्या छोट्याश्या संपुर्ण आयुष्यात मिळाले नसते एवढे अनुभव जून 2021 ते सप्टेंबर 2022 ह्या वर्षात मिळाले. 

अतर्क्य अनुभव त्यांची व्याप्ती ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं अस्तित्व किती खुजे आहे ह्याची जाणीव सतत होऊ लागली. पण आपल्या एवढ्याशा अस्तित्वाची त्यांनी दखल घेतली आहे हे लक्षात आल्यावर अंगावर काटा आला. 

माणसांनी माणसावर जबाबदारी टाकणे आणि त्या वर बसलेल्या शक्तीने आपल्यावर जबाबदारीची कामे देणे ह्यामध्ये किती फरक आहे हे कळत गेलं. 
खूप गोष्टी, व्यक्ती ह्या प्रोसेसमध्ये दुरावल्या ह्याचं कारण मला जस समजलं त्याप्रमाणे तरी चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार करणं हेच आहे. 

हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे माझ्यासाठी सुद्धा. पण प्रयत्न करणार आहे हे सगळे अनुभव शब्दांत मांडण्याचा.  

चैत्र नवरात्र दुर्गाष्टमी  ते शारदीय नवरात्र महाष्टमी माझा प्रवास नक्की वाचा 

#आई_राजा_उदे_उदे  

बाकी? 

बाकी सगळं जगदंबार्पणमस्तु 🙏 शुभं भवतु!!!

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

और तुम

#और_तुम 

इन्स्टाग्राम रिल्सवर मध्यंतरी काही दिवसांपूर्वी सतत अमितकुमारांच्या आवाजातील बडे अच्छे लगते हैं गाण्याचं एकच कडवं ट्रेंडिंग होतं. 

हम तुम कितने पास हैं कितने दूर है चाँद सितारे
सच पुछो तो मन को झूठे लगते है ये सारे 
मगर सच्चे लगते है, ये धरती, ये नादिया, ये रैना,
और तुम

गाणं आवडतं असल्याने मीही काम करताना गुणगुणत होते. लेकाच्या कानावरही पडत होतं. 

दोन दिवसांपासून मात्र एक दोन वेळा लक्षात आलं की छोटे कुलकर्णी हळू आवाजात काहीतरी म्हणत असतात. 
मला वाटलं असेल नेहमीप्रमाणे अशक्य ही शक्य करतील स्वामी कारण ते त्याचं 24×7 आवडतं वाक्य, गाणं, मंत्र आहे . कारण त्याचे बजोबा (स्वामींना तो लाडाने आजोबा ऐवजी बजोबा म्हणतो ❤️) ,तर बजोबा आपले ऑल टाइम आवडते दोस्त आहेत. 

पण आज मात्र सकाळी आगावपणा केला सायकल घेऊन ओट्यावर चढण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मग अम्माकडून ओरडा खाल्ला, दोन फटकेही खाल्ले. शेवटी अम्मा काही ऐकत नाही हे लक्षात आलं मग एक कोपरा पकडला आणि बसून घेतलं. 

माझं लक्ष होतंच पण लगेच राग सोडला की मग अर्थ नसतो आधीच्या रागावण्याला. सो मी गप्प बसले. 


हळूहळू जवळ येऊन मागून गळ्यात हात टाकून तोंडाने पुटपुटणे सुरू झाले. आधी काही कळेना, मग विचारलंच म्हटलं काय म्हणतो आहेस? 

मग छानपैकी कपाळावर हात मारून घेत म्हणे , अग और तुम ,और तुम. 

आता मात्र मला कळलं की अय्या (हे माझंच संबोधन) रागावली म्हणून तिला मस्का मारण्यासाठी गाणं म्हणत होता. 

चंगोंची माफी मागून,

इतकं गोड कुणी मस्का मारणार असेल तर 
रागावण्याला ही अर्थ आहे
तोडक्यामोडक्या भाषेतलं मनवणं ऐकण्यात तर 
आयुष्याचं सार्थक आहे 

#वयवर्षेपावणेतीन
#पद्माक्ष_गौरीहर्षल_कुलकर्णी
#गौरीहर्षल