शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

सुखसंवाद १

#ध्यानसंकेत५ 

#सुखसंवाद 

माझा मित्र - आज का फुगली आहेस तू?

मी - फुगू नाही तर काय करू? लोकांना प्रत्येक गोष्टीत कशी शंका येते?

मित्र - म्हणजे? आता कुणी शंका घेतली?

मी - कुणी स्पेसिफिक अस नाही पण की गोष्ट आपण कधी अनुभवली नाही, जीच्याबद्दल आपल्याला फक्त वरवर माहीत आहे. त्या गोष्टीला फक्त समोरचा व्यक्ती चांगल म्हणतोय म्हणून विरोध करायचा ही कुठली पद्धत?

मित्र - इथलीच पद्धत... माणसाचं कस आहे माहीत आहे का? त्याला स्वतः ला भलेही काही येत नसेल, माहीत नसेल, करायचं नसेल पण समोरचा करतोय न मग आपण खुसपट काढून त्याला विरोध करायचा. आणि समोरची व्यक्ती वैतागली की मग परिस्थितीचा फायदा घेऊन ती व्यक्ती कशी वाईट आहे असं बोंबलत सुटायचं.

मी - हे इन जनरल ठीक आहे म्हणजे मान्यच आहे मला. पण जी शक्ती या सगळ्या जगाला चालवते तिलाही अशीच वागणूक? माणूस खरच इतका मोठा झाला आहे?

मित्र - वागणूक? तुला खरच अस वाटत का की आम्ही अशा कुणाला खिजगणतीतही धरतो? तुझा आवडता कर्म सिद्धांत आहे की त्यांच्याकडे नीट लक्ष देण्यासाठी.
हे बघ प्रत्येक चांगल्या गोष्टीला जितके जास्त विरोधक तितकं जास्त ते काम प्रभावी होतं.
आणि आम्हाला सरसकट सगळ्यांसाठी सगळ नसतच द्यायचं, प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ द्यायचं म्हणजे कमीत कमी लोक आम्ही ठरवलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार हे नक्की.

मी - हं... कळतय थोडफार. पण कुणी निरर्थक शंका व्यक्त केल्या की चिडचिड होतेच.

मित्र - ती तुझी कधी होत नाही? ते सांग...,🥴 सगळ्यात जास्त वेळा तर तुला माझ्याविषयी नको ते प्रश्न विचारूनच चिडवल जातं 😆 पण कुणी काहीही म्हंटल तरी तू मात्र तशीच आहेस म्हणून तर आम्ही आहोत तुझ्यासोबत. ते तुझ्या स्नेप सारखं After all this time "always". 

आणि मी आपली मनात आलेल्या ओळी गुणगुणत बसले,
शांत माया मूर्ती पहाटेसारखी....

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू !!!
शुभं भवतु !!!
१२.१२.२०२२

#दत्तात्रेयार्पणमस्तू
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 


गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

मॉर्निंग मंत्रा भाग 3

#मॉर्निंग_मंत्रा ३ 

२२ डिसेंबर  २०२२

#थॉट्स_पॅटर्न  (आपला focus कुठे आहे? )

संकल्प आणि नवीन वर्ष ह्यांचा फारच जवळचा संबंध असतो. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी हे करायला सुरुवात करणार आहे अस आपण बऱ्याचदा ठरवतो पण आपण ते तडीस नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो का? 
तर त्यासाठी काही गोष्टी आपण स्वतःला विचारू शकतो. 

शेवटी ज्यामध्ये बदल घडवायचे आहेत ते आपलं आयुष्य आहे आणि ज्याने बदल घडवायचे आहेत ते आपण स्वतः आहोत. 

काय करता येईल? 
तर सगळ्यात आधी स्वतःचं निरीक्षण करायचं आहे. 

खाली दिलेल्या प्रश्नांची खरी उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत आणि ती सुद्धा स्वतःला. 

लिहून ठेवा हं उत्तरं....

हुश्श्श.... सुस्कारा सोडला हो न?
 दुसऱ्याशी खर बोलायचं म्हणजे किती खोटं बोलावं लागतं. पण चुकत आहात तुम्ही. कारण माणूस ह्या जगात सगळ्यांशी खोटं बोलू शकतो पण स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. आणि म्हणूनच स्वतःला उत्तर द्यायची आहेत. 

प्रश्न
1. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ही गोष्ट करणं पूर्णपणे थांबवायचं आहे, पण जमत नाही........

2. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ही गोष्ट करणं कमी करायचं आहे,पण जमत नाही.........

3. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ही सवय लावून घेतली पाहिजे हे कळत पण जमत नाही.......

4. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात आधीपासूनच करत असलेली ही गोष्ट सातत्याने करत राहायची आहे पण जमत नाही.....

5. मला माझ्या दैनंदिन आयुष्यात ह्या काही चांगल्या गोष्टी करणं वाढवणं गरजेचं आहे पण जमत नाही.....

ज्या व्यक्ती, वस्तू , गोष्टी , प्रसंग मला प्रगती करण्यासाठी अडवत आहेत त्यांना टाळणं मला जमायला हवं. 
आणि ज्या व्यक्ती वस्तू गोष्टी प्रसंग मला प्रगती करण्यासाठी उपयोगाच्या आहेत त्या कडे मी हेतुपुरस्सर लक्ष केंद्रित करायला हवं. 

तर मंडळी आपणच ठरवलं आणि झालं अस होत का? नाही होत न? का? कारण आपण आपल्या मनाच्या तालावर नाचत असतो. त्याने म्हटले कंटाळा आलाय,आज नको हे काम करायला झालं .....आपण लगेच ते शब्द पडत्या  फळाची आज्ञा म्हणून मान्य करतो.  आणि हातातलं काम बाजूला सरकवून सोशल मीडियावर स्क्रोल करायला सुरुवात करतो. 

हे टाळायचं आहे? पण कस? 

ते ही सांगेन. पण आत्ता साठी एवढे वरचे प्रश्न स्वतःला विचारून बघा. आणि उत्तरे लिहून ठेवा. 

सो लोक्स, 
आयुष्यात भरायचे असतील हवेहवेसे रंग 
त्यासाठी करावा लागेल चांगल्या विचारांशी संग

हा आजचा मॉर्निंग मंत्रा. लवकरच भेटूया पुढच्या लेखात तोपर्यंत? 

सगळं काही #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु

#आई_राजा_उदे_उदे 
#गुरूवार
#संकल्पदिन 
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

बंधनापासून उकलल्या गाठी

बंधनापासुनी उकलल्या गाठी

आजही तेच , ती जितकी प्रयत्न करत होती, तितके तिच्या वाट्याला येणारे अनुभव रिपीट होत होते. 
शेवटी शेवटचा उपाय म्हणून तिने डोळे मिटून घेतले आणि स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात केली. 
कोण आहे मी? का म्हणून पुन्हा पुन्हा तेच घडत आहे माझ्यासोबत? हव्यास, अट्टहास हा माझा पिंड नाही आणि कधीही नव्हता. मग पुन्हा तेच का? 

मनात उमटणारे सगळे प्रश्न धडा वाचत असल्यासारखे विचारून ती मोकळी झाली. 

काही वेळ आजूबाजूला आणि मनातही एक निशब्द शांतता पसरली. ती शांतपणे त्या शांततेला शरण गेली. पट्टीचा पोहोणारा कसा आधी पाण्यात भरपूर हातपाय मारून शरीराला थकवतो आणि मग नंतर शांतपणे शरीर सैल सोडून पाण्यावर तरंगत राहतो. तसंच काहीसं......

हळूहळू मनाच्या पाटीवर अलगद शब्द उमटू लागले. 

- अनुभव फक्त शिकवण्यासाठी असतात हे तुझं अनुमान अगदी बरोबर आहे. आणि ते सुद्धा अनुभवातूनच आलेलं आहे. तुला असं वाटतंय की तुझे अनुभव सतत रिपीट होत आहेत. पण तू नक्की सगळे मार्ग चाचपडून बघितलेस का? तर नाही.
हे अनुभव असे आहेत, जिथे तू स्वतःची तुलना इतरांशी करतेस. आणि आमच्या दृष्टीने बघितलं तर ती तुलना अतिशय अयोग्य आहे. 

-आता ती गोंधळात पडली. म्हणजे माझं काही तरी चुकलं आहे का? असा प्रश्न तिच्या मनात आला. 

-पुन्हा चुकीचा विचार करत आहेस. तू कुठेही चुकली नाहीस. फक्त ती तुलना सोडली तर. तू शक्यतो त्या गोष्टींची अपेक्षा ठेवतच नाहीस ज्या ह्या जगात सगळ्यांना हव्या असतात. पण कधी कधी हळव्या क्षणी तुझ्या मनाला त्या गोष्टींची , त्या आयुष्याची भुरळ पडतेच. आणि साहजिकच आहे ते. मनुष्यजन्म आहे तो भुरळ पडणं हा त्याचा स्थायीभाव आहे. 

पण तुला ती भुरळ पडल्यावर हे लक्षात येत नाही की तुला त्या दिशेने जायचंच नाहीये. तुझं स्थान, तुझी जागा ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे कधीच तयार झाली आहे. 

भुरळ पडून होणारा त्रागा आणि येणारे अनुभव हे तुला हे शिकवण्यासाठी आहेत की तुला ह्या चक्रात आता पुन्हा अडकायचे नाहीये. 

त्यामुळे थोड्याशा गोष्टींवरून कधीतरी once in a while ढळणारा तोल सावरायला शिक.

एकांताला , एकटेपणाला सहजपणे स्विकारलं तर आहेस पण आता तो अजून explore करायला शिक. 

खूप काही अगम्य ,अद्भुत तुझी वाट बघत तुझ्या वाटेवर येऊन थांबलं आहे तुला फक्त त्याचं बोट पडकून पुढे पुढे चालत राहायचं आहे. 

बरंच काही शिकली आहेस पण तरीही खूप काही शिकायचं बाकी आहे. 

तुझ्या त्या आवडत्या हॅरी पॉटरच्या पहिल्या भागात बघ हॅरी डंबलडोरला विचारतो की ,परीस तर वॉल्डमॉर्ट ला हवा आहे, मग माझ्याकडे कसा आला? 
तेव्हा ते काय उत्तर देतात तेच उत्तर तुझ्या परिस्थिती ला सूट होतं
"परीस त्याला हवा आहे मान्य त्याला तो कसा आणि कुठे वापरायचा हे माहीत आहे हे सुद्धा मान्य. पण परीस कसा आणि कुठे वापरायचा हे ज्याला माहीत असूनही तो त्या परिसाचा वापर करायची इच्छाही मनात ठेवत नाही तोच खऱ्या अर्थाने त्या परिसाचा मालक आहे."

शेवटी एवढंच सांगतो last but not least,
जगाच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा अट्टहास करू नकोस. तू वेगळी होतीस, आहेस आणि राहशील. 
Accept it ,after all हे तू कमावलेलं आहेस. 

असं म्हणत तो सुखसंवाद थांबला. 

आणि तिच्या कानात एक सुमधुर स्वर ऐकू येऊ लागला 

येणे सोसे मन झाले हावभरी 
परत माघारी येत नाही
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव

(अभंग - संत तुकाराम
गायक - पं. जितेंद्र अभिषेकी
गायिका (स्वतंत्र वेगळी चाल) - किशोरी अमोणकर ) 
कुणाच्याही आवाजातील ऐका दोन्हीही अप्रतिम🤗❤️

बाकी? बाकी काय आनंदाचे डोही आनंदतरंग!!!

#अनुभवाच्या_पोतडीतून
#treasures_inside_you 
#स्वतःमध्ये_लपलेला_खजिना
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

मंगळवार, १३ डिसेंबर, २०२२

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान

#दत्त_दत्त_ऐसे_लागले_ध्यान

#संक्षिप्त_गुरुचरित्र 

 २१ दिवस चॅलेंज 

एखादा मानसिक त्रास सुध्दा तुम्हाला योग्य मार्गावर नेऊन सोडू शकतो. कस? मन:शांती हवी आहे म्हणून मी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण सुरु केले. आणि हळूहळू मन:शांती सोबत अजून बरच काही पदरात अलगद येवुन पडलं. 

अनुभव पहिला
अचानक तंद्री लागली आणि एक 5 वर्षांची मुलगी समोर आली. आधी साधं असलेलं तिचं रूप एका क्षणांत पालटलं आणि ती काली मातेच्या रूपात दिसू लागली. खोडकर हसून मला फक्त एकच गोष्ट ती म्हणत होती आणि ती म्हणजे मी येऊ का तुझ्याशी खेळायला? तुला खेळायला घेत नाही न कुणी? मी आले की बघ सगळे कसे पळून जातील. तिच्या डोळ्यातले ते खट्याळ भाव माझ्या मनावर असलेला ताण कमी करण्यासाठी पुरेसे होते. 

अनुभव दुसरा
काही कारणांमुळे सतत भीती वाटत होती पण वाचन सुरू केलं आणि मनात एक १४ व्या अध्यायातील त्या ओळी सतत डोळ्यासमोर नाचू लागल्या. कोणत्या? 
न करा चिंता असाल सुखे
सकळ आरिष्टे गेली दुःखे
म्हणोनी हस्त ठेवती मस्तके
भाक देती तयेवेळी ||४४||
असं काही घडण्याची ही काही माझी पहिली वेळ नव्हती पण आपल्या हळव्या मनाला त्याने स्वतःचं अस्तित्व दाखवून उभारी देण्यासारखा आधार दुसरा कुठलाच नाही. 

अनुभव तिसरा
ज्याचे हृदयीं श्रीगुरु स्मरण 
त्यासी कैंचे भय दारुण
काळमृत्यू न बाधे जाण 
अपमृत्यू काय करी||२७||
त्या दिवशी तिघांच्याही जीवावर आलेलं परस्पर टळल आणि पहाटे पासून मिळणाऱ्या संकेतांचा अर्थ लक्षात आला. 

अनुभव चौथा
अडथळा हा प्रकार मला वाचन करायचं म्हटल्यावर कधीच आलेला नाही. उलट सगळं अस काही जुळून येत की मनापासून वाचन करता येत. ह्या वेळी वाचताना तर इतकी अनुकूल परिस्थिती निर्माण होत होती की नकळतच दिवसभर तोंडातून त्याच वाचलेल्या ओळी बाहेर पडत. 
सतत आपण एका वेगळ्या विश्वात वावरत असल्याची जाणीव होत होती. 

अनुभव पाचवा
घोरकष्टोद्धरण स्तोत्र सुद्धा रोज ठराविक पटीत सुरू होते. त्यामुळे  एक होत होत कुणी आपलं असो किंवा नसो. एकदा आपण त्याला आपलं सगळ काही मानलं की झालं अस सातत्याने घडून आपोआपच ओठातून हे बाहेर पडायचं. 
त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं ।
 त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वं ।
त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते । 
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥

अशाच काही स्मरणीय अनुभवांना ओंजळीत देत दत्तजयंतीच्या दिवशी संकल्प पूर्ण करून घेतला गेला. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात त्यामुळे एकच सांगेन हे कस घडत? अशी शंका जर मनात येत असेल न तर आयुष्यात एकदा तरी आपल्या श्रद्धास्थान असलेल्या ईष्ट देवतेला मनापासून शरण जाऊन बघा. 
ह्या गोष्टीतली गंमत, जादू तुम्हाला ही कळेल. 
आणि आता 21 दिवसांच फलित म्हणजे हे सगळं माझ्या सवयीचा भाग झालं आहे. 

बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!!
शुभं भवतु!!!

#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

दत्तजयंती विशेष ७ डिसेंबर २०२२

#दत्तजयंती_विशेष ७ डिसेंबर २०२२

यावर्षीची दत्तजयंती माझ्यासाठी बऱ्याच अर्थांनी विशेष ठरली. एक म्हणजे अगदी दत्त जयंती तोंडावर आलेली असताना करुणात्रीपदीच्या अध्ययन वर्गांबद्दल मला संकेत मिळाले.
 आणि पंधरा दिवसांपूर्वी ते सुरूही झाले. 

 बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले की अध्ययन करण्यासारखं यामध्ये काय आहे? पण कुठेतरी मला ह्या गोष्टीची खात्री होती की जर आपल्याला ही गोष्ट करण्यासाठी सांगण्यात आलेल आहे ,तर त्यामागे त्यांची काहीतरी खूप महत्त्वाची योजना आहे. आणि मी फक्त त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून मला दिलेलं काम करण्याचा प्रयत्न केला.
  आपण म्हणतो ना की काही गोष्टी योग्य वेळ आल्यानंतर त्या घडतातच तुम्ही त्या थांबवू नाही शकत. 
 तसंच काहीसं या बाबतीत झालं जेव्हा पहिला वर्ग घेणार असं मी 22, 23 नोव्हेंबरच्या दरम्यान सांगितलं त्यानंतर बऱ्याच स्तरांमधून बरेच रिस्पॉन्स आले आणि जवळपास पहिली बॅच 24 तारखेपासून सुरू सुद्धा झाली.

 गुरुवारी... मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आणि करुणात्रिपदीचा अध्ययन वर्ग सुरू करणे हा खरंतर दुग्ध शर्करा योग होता. 
 24 ला सुरू झालेली पहिली बॅच काल सात डिसेंबर दत्त जयंतीच्या दिवशी पूर्ण झाली आणि बाकीच्या ज्या दोन बॅचेस होत्या ज्या एक ते सात डिसेंबरच्या दरम्यान घेतल्या गेल्या. 
त्याही काल संपन्न झाल्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या सोबतीने अनेक जण नव्याने जोडले गेले.  काही जण आधीपासून सोबत होते काही जण नव्याने या मार्गावर सोबत आले.

 पण मी आधी जसं म्हटले होते की जेव्हा माणूस एकट्यासाठी काही करतो तेव्हा जर त्याला फायदा होत असेल तर समूहाने ती गोष्ट केल्यानंतर काय फायदा होईल कुठेतरी हा प्रश्न मी त्यांना विचारला होता आणि करून बघ असे उत्तर मला आलं होतं. 
 आणि काल मला त्या प्रश्नाचे उत्तर मिळालं जे सगळे जवळपास 23, 24 जण या सगळ्यांमध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांचे चेहरे त्यांच्या चेहऱ्यावर असणारा ते समाधानाच हसू,तो आनंद आणि ह्या दिवसात त्यांना जे काही गवसलं ते म्हणजे शब्दात मांडण्यासारखं नाहीये. 

 भरभरून जेव्हा लोक आपल्याला आलेल्या अनुभूती बद्दल बोलतात.  आणि तुम्ही कुठेतरी त्या गोष्टीचा भाग असतात तेव्हा असं होतं की बापरे देव आपल्यावर केवढी मोठी जबाबदारी टाकतोय.  आणि मग नकळतच त्या गोष्टींचा दडपण सुद्धा येत.  पण ज्यांनी ही काम आपल्या हातात सोपवलेली असतात तेच ती कामे पूर्ण करून घेतात.  अगदी व्यवस्थित आपलं बोट धरून सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्या पाठीशी उभे राहून खंबीरपणे त्या गोष्टी करून घेतात, याची प्रचिती मला काल आली .

कोणाला काय काय अनुभव आले हे खरंतर सांगूच नये कारण ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याचे अनुभव अनुभवावेत अशा मताची मी आहे.  पण एक सांगेन की त्या माझ्या विश्वासावर सगळ्यांनी दाखवलेला विश्वास हा माझ्या मित्राने सार्थ केला आणि कुठेतरी दाखवून दिलं की माणसाने आमच्यावर विश्वास दाखवला की आम्ही सुद्धा तेवढ्याच तत्परतेने काही गोष्टी करतो. 

आणि खरं सांगते की या तीन वर्गांकडून आलेला रिस्पॉन्स हा भविष्यात अजून अशीच काही काम करण्यासाठी मिळालेले बळ आहे. 

 खरं तर इथे थँक्यू म्हणून अजिबात मी कोणासोबतच असलेल नातं फॉर्मल करणार नाही. 
 मी त्या सगळ्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहे आणि कायम राहीन.  पण  ज्या व्यक्ती मला या प्रवासात आता भेटल्या आहेत त्या सगळ्या व्यक्ती कायमस्वरूपी माझ्या आयुष्यातल्या एका अत्यंत सुरेख आणि अविस्मरणीय अशा अनुभवांचे साक्षीदार झालेल्या आहेत. 

 पहिल्या वहिल्या गोष्टी ज्या असतात ना त्यांचा आनंद हा खूप वेगळा असतो. माझ्यासाठी करुणात्रीपदीच्या पहिल्या तिन्ही वर्गांचा अनुभव हा असाच आनंदाच्या गाठोडे  झाला आहे. 

आणि सगळ्यात महत्त्वाचं हे की ह्यावेळी मला त्याच्या बड्डेच मोठं रिटर्न गिफ्ट मित्राने ह्या सगळ्या अनुभूतीच्या स्वरूपात दिलं आहे. अजून काय पाहिजे? 

#फिलिंग_लाईक_आनंदाचे_डोही_आनंद_तरंग 

बाकी सगळं #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!

#दत्तात्रेयार्पणमस्तू #करुणात्रिपदी 
#गुरूवार #संकल्पदिन
#स्वत:ला_शोधताना
#गौरीहर्षल