मंगळवार, २३ मे, २०१७

याद पिया की आए.......

#याद पिया की आए
              संयोगीता जितक्या आर्ततेने सुरांना आळवत होती तेवढ्याच तीव्रतेने अश्रू  तिच्या पापण्यांच्या कडांना ओलांडत होते. आज कित्येक दिवसानंतर ती रियाज करत होती. सूर मनासारखा लागलंय हे  ओसंडून वाहणारे तिचे डोळेच सांगत होते. शेवटच्या आलाप संपवून तिने डोळे उघडले. नेहमीप्रमाणे गुरूंना मनोमन अभिवादन करत तिने रोजच्या कामांना सुरुवात केली.
         संयोगीता वयाच्या अवघ्या चार वर्षांपासून ती शास्त्रीय संगीत शिकत होती. तशी तिच्या आईवडिलांची इच्छाच होती. पुढे तिलाही त्यात गोडी वाटू लागल्याने संगीतच तिचा श्वास बनले होते. तिच्या गुरू वंदनाताई सुद्धा तिच्यासारखी शिष्या मिळाल्यामुळे तृप्त झाल्या होत्या. आपल्याकडे असेल नसेल तितकं ज्ञान त्यांनी संयोगीताच्या ओंजळीत टाकलं होतं.
                 वंदनाताईंच्या घरच्यांनाही संयोगीता आता घरातील एक वाटत होती. ताईंचा मुलगा मार्दव आणि संयोगीता एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. पुढे दोन्ही घरांच्या संमतीने त्यांनी लग्नाचा निर्णयही घेतला. साखरपुडा झाला आणि मार्दवला कंपनीच्या कामानिमित्त काही महिन्यांसाठी अमेरिकेला जावं लागलं. रोज तसंही फेसबुक , वॉट्सअप्प होतंच बोलण्यासाठी त्यामुळे फारसा दुरावा जाणवत नव्हता. तो परत येताच लग्नाची तारीख काढायची असं ठरलं.  हळूहळू मार्दवच्या येण्याची तारीख जवळ आली. त्याने निघतानाच फेसबुकला स्टेटस अपडेट केलं कमिंग बॅक टू इंडिया. फ्लाईट कनेक्टेड असल्याने त्याला येईपर्यंत सकाळ होणार होती. संयोगीताच्या मनात मात्र उगाच शंकेची पाल चुकचुकली. पहाटेच उठून ती अस्वस्थ मनाने रियाजाला बसली पण आज तिचे सूर का कुणास ठाऊक रुसले होते. इतक्यात तिचा फोन वाजला वंदनाताई बोलत होत्या परतून येत असताना मार्दवचा अपघात झाला होता. क्षणभर संयोगीताच्या नजरेसमोर अंधार पसरला. जेंव्हा ती जागी झाली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होती. मार्दव अपघातातून वाचला तर होता पण कोममध्ये गेला होता. आता खरी कसोटी होती. पण वंदनाताईनी संयोगीताला पूर्ण स्वातंत्र्य दिले त्या नात्यातून बाहेर पडण्याचं. संयोगीताने मात्र मार्दवची वाट बघायची असं आधीच ठरवलं होतं. आज ६ महिने झाले होते मार्दवच्या तब्येतीत फरक नव्हता. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला घरीच लाइफ सिस्टीमवर ठेवण्यात आले. त्याला साद घालण्यासाठी म्हणून संयोगीता रोज न चुकता त्याच्या खोलीतच रियाज करत होती. "जौबन बिता जाए रे हाय राम याद पिया की आए......" आज खूप दिवसांनी तिचे सूर मनासारखे लागले होते. तृप्त मनाने ती मार्दवच्या जवळ येऊन बोलत बसणार तोच तिला मार्दवच्या डोळ्यांत हालचाल जाणवली. आणि पुढच्याच क्षणी त्याने डोळे उघडले होते. खऱ्या अर्थाने तिच्या पियाने तिची ती आर्त साद ऐकली होती.
गौरी हर्षल
२३.५.२०१७

#गेले द्यायचे राहून........

#गेले द्यायचे राहून
          स्वतःच्या केबिन मध्ये अनय शांतपणे बसून होता. त्याला कारणही तसंच काहीसं होतं पैसा, पॉवर, स्टेटस मिळवताना खूप काही निसटून गेलं होतं. वळून मागे बघितल्यावर त्याला जाणवलं की या सगळ्या चढाओढीत आपण आपल्या माणसांना हरवून बसलोय.
            स्वराचा आवाज त्याच्या कानात गुणगुणत होता,"गेले द्यायचे राहुनी , तुझे नक्षत्रांचे देणे". खूप छान गायची ती आणि तितकीच छान माणूसही होती. हो , होतीच कारण आता ती या जगात नव्हती. तिचं जाणं अकाली होतं पण ते तिने मात्र हसत हसत स्वीकारलं होतं.
         अनय तिचा खूप जवळचा मित्र, जिवापाड प्रेम होतं तिचं त्याच्यावर. पण त्याला मात्र खूप यशस्वी व्हायचं होतं आणि त्या धुंदीत त्याने तिचं प्रेम आणि मैत्री दोन्ही धुडकावली.
आज जेंव्हा ती गेली असं त्याला समजलं तेंव्हा त्याला आपल्या यशातला फोलपणा जाणवला. तिच्या सगळ्या आठवणी फेर धरून त्याच्याभोवती नाचू लागल्या. कारण हे प्रोजेक्ट संपताच तिची माफी मागून तिला लग्नासाठी मागणी घालण्याचा त्याचा विचार होता. पण तिने मात्र त्याला तशी संधीच शिल्लक ठेवली नव्हती. 
                  हरवलेल्या अनयची पावलं नकळत सावलीकडे वळली. सावली अनाथाश्रम इथेच तो आणि स्वरा लहानाचे मोठे झाले आणि इथेच पहिल्यांदा भेटलेही. त्यामुळेच स्वराचं जाणं अनय ला पुन्हा आश्रमात घेऊन आलं. तिथे गेल्यावर त्याच्या कानावर तेच सूर पडले तसा तो धावत धावत त्या दिशेने निघाला. बंद दारामागून येणारे ते सूर आणि तो आवाज ऐकून त्याला वाटलं की स्वराच्या जाण्याची बातमी खोटी आहे. पण दार ढकलताच त्याला जे दिसलं त्यामुळे त्याच्या डोळ्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. त्या खोलीत ५ वर्षांची इटूकली नीरा गात होती. नीरा सावली आश्रमात आली तेंव्हा १५ दिवसांची होती तेंव्हाच स्वराने तिची जबाबदारी उचलली होती. अनय मात्र विसरून गेला होता हे सगळं. आत्ता हे सगळं काही सेकंदात त्याच्या डोळ्यासमोरून गेलं , आणि निरु ला कवटाळून त्याने ठरवलं काहीतरी मनाशी. 
           सावली अनाथाश्रमच्या ऑफिसमध्ये त्याने देशमुख सरांना निरु ला दत्तक घेण्याची इच्छा बोलून दाखवली आणि सोबतच कायमस्वरूपी आश्रमाचा जास्तीत जास्त खर्च उचलण्याचं ठरवलं. लवकरच सर्व सोपस्कार पूर्ण झाले. आज स्वराच्या वाढदिवसाच्या दिवशी जे तिला द्यायचं राहून गेलं होतं ते सर्व निरु सोबतच इतर गरजू मुलांनाही देण्याचा निश्चय करत अनयने  निरुचं बोट धरून आयुष्याची एक नवी सुरुवात  केली.
गौरी हर्षल
२३.५.२०१७

सोमवार, १७ एप्रिल, २०१७

असं जमलं आमचं

#असं जमलं आमचं
      पुणे- नाशिक- पुणे
   ती आपली टॉमबॉय भरपूर मित्रमैत्रिणी जमवून गोंधळ करणारी, तो मात्र मुलींशी कसं बोलू यात अडकलेला. त्याचे जेंव्हा कांद्यापोह्याचे कार्यक्रम सुरू होते तेव्हा ती मात्र मस्तपैकी कॉलेजमध्ये धिंगाणा करण्यात बिझी होती. अशातच तिच्या चुलत बहिणीला बघण्याचा कार्यक्रम ठरला आणि तो मुलीला बघण्यासाठी हिच्या घरी आला. हीच दोघांची पहिली भेट.
           त्याला बघितल्यावर तिची रिएक्शन की काय ध्यान आहे आणि त्याची तिच्याबद्दल प्रतिक्रिया किती गबाळी आहे ही😝ही पृथ्वीवर शेवटची मुलगी असेल तरी मी हिच्याशी लग्न नाही करणार( खरतर तो तिच्या बहिणीला बघायला आला होता आणि मनात हे 😝😝). पुढे ते लग्न जमलं नाही पण या दोघांची मात्र मस्त मैत्री झाली. तिचा स्वभाव बडबडा असल्याने तिने त्याला ही बोलण्यास भाग पाडलंच. आपल्या एकमेकांबद्दलच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर दोघेही प्रचंड हसत सुटले. एकीकडे तो त्याचं MBA  आणि नोकरी ह्यात बिझी होता आणि दुसरीकडे त्याचे कांदेपोहे पण चालूच होते . तिचं तिकडे पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होतं आणि सोबत तो मुली बघून आला की त्यावरून त्याला चिडवणे.
            तिचं कॉलेज संपलं आणि आता ती नोकरी शोधण्यात बिझी झाली. तसं तिच्या आईबाबांना तो आधीच आवडला होता पण हिला काहीच वाटतं नसल्याने त्यांनी विषय काढला नाही. आणि त्यालाही अजून तशी काही जाणीव झाली नव्हती. बाकी दोघेही सतत फोनवर संपर्कात होतेच हो फक्त फोनवरच कारण तो नाशिकला ती पुण्यात त्यामुळे त्या बहिणीच्या प्रोग्रॅम नंतर भेट अशी होणं शक्यच नव्हतं.
         अशाच गप्पा मारण्यात 2 वर्षं कधी निघून गेली दोघांनाही कळालं नाही. त्यात तिचा वाढदिवस आला. आणि तो दुसऱ्या एका मैत्रिणीचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी हिलाच टिप्स विचारत होता त्या नादात विसरला. झालं दुसऱ्या दिवशी ती जाम भडकली मग पहिलं वहिलं भांडण झालं.
त्या नंतर त्याला जाणीव झाली की आपण जगभर जिला शोधतोय ती हीच😝😝.
तरीही त्याने मध्ये काही दिवस जाऊ दिले आणि मग शेवटी तिला विचारलं. मॅडम अजूनही लग्न ह्या बाबतीत मंदच होत्या, त्यामुळे त्याला होकार द्यायच्या ऐवजी तू माझ्या आईबाबांना विचार असं सांगून मोकळी झाली. त्याने ही तेच केलं तिला भेटण्यासाठी आणि मागणी घालण्यासाठी तो पुण्यात पोहोचला. आणि मग ३ डिसेंम्बर २०१० ला तिच्या घरच्यांच्या परवानगीने साखरपुडा ठरला.  २३ जानेवारी २०११ ला साखरपुडा होता तोपर्यंत त्याच्यासोबत फिरून भेटून तिला आता जाणीव झाली होती की येस he is the right guy.   आता मात्र मॅडमला स्वर्ग दोन बोटं उरला होता.
         अशी ही टेढी मेढी लव स्टोरी २९ मे २०११ ला नव्या बंधनात अडकली. तिला मात्र त्याला चिडवण्यासाठी आयुष्यभर पुरेल असं कारण मिळालं . हो जी पृथ्वीवर शेवटी उरली तरी तो लग्न करणार नव्हता तीच आता त्याची आयुष्यभराची सोबतीण झाली होती.
       अशा या आमच्या खोडकर नात्याला आता ६ वर्ष पूर्ण होतील. पण तो गोडवा ती ओढ आजही कायम आहे आणि राहील. थँक्यू हर्षल  for the wonderful relationship of togetherness and love💖💖 And also thanks आपण निवडलेल्या वेगळ्या वाटेवर खंबीर साथ देण्यासाठी.
गौरी हर्षल
२९.५.२०१७

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

असाही दोस्ताना

असाही दोस्ताना .......
जाने क्यू दिल जानता है तू है तो I will be allright……” असं म्हणत नाचणाऱ्या जॉन अभिषेक आणि प्रियांका ऐवजी अक्षताला ती आणि गायत्रीने सेंड ऑफला केलेला भन्नाट डान्स आठवून हसू येत होत आणि हसता हसता नकळत तिच्या डोळ्यात गायत्रीच्या आठवणीने पाणी आलं.
तेवढ्यात “ आई, किती वाईट आहे ग आराध्या!!” असं म्हणत अक्षताच्या लेकीने घरात एन्ट्री केली. लाडक्या लेकीचं आज काहीतरी बिनसलंय हे अक्षताच्या लक्षात आलं. हातातला लॅपटॉप बाजूला ठेवत ती अंशिकाच्या जवळ गेली. गोबरे गोबरे गाल लाल झाले होते आणि डोळ्यात कितीतरी मोत्यांची गर्दी झाली होती. अक्षताने डोक्यावरून हात फिरवताच सगळे मोती सांडू लागले. अक्षतानेही मग आधी तिचं रडणं संपू दिलं आणि शांत झाल्यावर तिला विचारलं, “काय झाल पिल्लू?” तसं अंशिकाने सांगितलं कि ती नव्हती दोन दिवस स्कूलमध्ये. त्याचवेळेस सगळ्यांचे प्रोजेक्ट कळाले मग आराध्याला दुसरी मुलगी पार्टनर म्हणून मिळाली, मग हिला राग आला आणि ती बोलली तिला काहीतरी. त्यावरून आराध्याला पण राग आला सो अघोषित अबोला चालू झाला आणि त्याचमुळे आज चिडचिड सुरु होती.
लेकीची समजूत घालून अक्षताने तिला खेळायला पाठवले. आणि इकडे तिचे मन भूतकाळात गेले. ती आणि गायत्री सख्ख्या बहिणी वाटाव्या इतकं साम्य होत दोघींमध्ये.तशा त्या लहानपणापासून ओळखत नव्हत्या एकमेकीना पण आतून जुळलेलं नातं होत ते. कुणालाही हेवा वाटावा असं. रिझल्टच्या आधी गावी गेलेली गायत्री ती परत येणार म्हणून खूप खुश होती अक्षता. पण ती कधीच परत आली नाही चौकशी केल्यानंतरही काहीच अक्षताच्याहाती नाही लागले. ती गेल्यानंतर कित्येक दिवस अक्षता तिला वेड्यासारखी शोधत होती. काहीच पत्ता न सापडल्याने शेवटी तिने तो नाद सोडून दिला. त्यानंतर थोड्याच दिवसात ती लग्न करून मुंबईत आली आणि मग हळूहळू जुनं सगळेच धूसर झाले.
 आज अंशिका आणि आराध्या च्या लुटुपुटूच्या भांडणाने तिला गायत्रीची आठवण आली. कशी असेल , कुठे असेल ती याचा विचार करत अक्षता पुन्हा कामाला लागली. तिच्या फोनवर तितक्यात एका अनोळखी नंबर वरून फोन आला.
“हॅलो, अंशिकाच्या आईशी बोलू शकते का?” तिकडून आलेला आवाज ऐकून क्षणभर अक्षताला गायत्रीचा भास झाला. “हो आपण ?” तिने विचारलं.
“ मी आराध्याची आई बोलतेय तन्वी. कालपासून तिचं काय बिनसलंय कळत नाही म्हणून मला वाटलं तुम्हाला कल्पना असेल.”
तन्वीला अक्षताने सगळी स्टोरी सांगितली. मग दोघींनी मिळून संध्याकाळी बागेत भेटण्याचे ठरवले. अक्षताला का कुणास ठाऊक या भेटीची एक ओढ लागली. संध्याकाळी सगळं आवरून ती अंशिकाला घेऊन पार्कमध्ये पोहोचली. आत एन्ट्री करत असतांनाच अंशू...... अशी जोरदार आरोळी कानावर आली आणि त्या मागेच वाऱ्याच्या वेगाने धावत आराध्या अंशिका च्या गळ्यात येऊन पडली. मग लटक्या रागाने एकमेकीना रागावत रुसत दोघी खेळायला निघून गेल्या. त्यांची ती निरागस मैत्री बघण्यात अक्षता इतकी गुंग झाली होती कि तन्वी मागे आल्याच तिच्या लक्षातच नाही आलं.
“कशी आहेस अक्षु?” तब्बल १० वर्षांनी हा आवाज तिच्या कानावर पडत होता पण त्यात जी ओढ होती ती अजूनही तशीच आहे हे जाणवत होतं. गरकन मागे वळून बघितल्यावर अक्षताला धक्काच बसला ती तिच होती जिचा शोध घेण अजूनही अक्षताच्या मनाने थांबवलं नव्हतं. तिची soul sister गायत्री. तिला समोर बघताच अक्षताला काहीच बोलायला सुचेना शांतपणे तिचा हात हातात घेत गायत्रीने तिच्याकडे पहिले. अक्षता तिच्यासमोर गुढघ्यावर बसली कारण गायत्री व्हील चेअर वर होती. पुढचा काही वेळ काहीच न बोलता त्या दोघी बरंच काही बोलल्या. गायत्रीने गावावरून परत येत असताना झालेल्या अपघातात फक्त पायच नाही तर सगळं कुटुंब गमावलं होत. त्यावेळेस खूप पैसा असूनही तिच्यावर एका आश्रमात राहायची वेळ आली होती कारण कित्येक दिवस ती काहीच बोलत नव्हती. मग अशा परिस्थितीत अक्षताला सांगणार तरी कोण? आश्रम ज्यांचा होता त्या डॉ. जोशींनी पुढे होऊन तिला बरं करण्याचा चंगच बांधला. आणि मग २  वर्षांच्या त्यांच्या मेहनतीला फळ आले. गायत्री हळूहळू प्रतिसाद देऊ लागली. तोपर्यंत डॉक्टरांनी तिचं तन्वी असं बारस केलं होत. त्याचं काळात डॉक्टरांच्या मुलाने तिला लग्नाची मागणी घातली आणि ती मिसेस तन्वी जोशी झाली. तन्वीनेही अक्षताला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तोपर्यंत अक्षताचेही घराचे दुसरीकडे निघून गेले होते. मग तीही तिच्या संसारात रमली.
आजचा दिवस मात्र त्या दोघींसाठी आणि त्यांच्या मुलींसाठीही खूप स्पेशल ठरला. त्यानंतर अक्षताने स्वतः तन्वीच्या डॉक्टरांची भेट घेत तिच्या पायाच्या बाबतीत चौकशी केली तेंव्हा तिला कळाले कि तिचे पाय अजूनही नीट होऊ शकतात पण प्रंचड मानसिक धक्क्यामुळे तन्वीच शरीर मेडीसिनला हवं तसं प्रतिसाद देत नाही. आता कसोटी अक्षताची होती ती स्वतः सगळे डिटेल्स घेत तन्वीला प्रोत्साहन देऊ लागली आणि काही महिन्यातच तिच्या प्रयत्नांना यश आलं.
आज तब्बल २ वर्षांनतर अक्षता आणि तन्वी मुलींसोबत सायकल राईडला निघाल्या होत्या. बॅकग्राउंडला गाणं वाजत होतं.
जाने क्यू दिल जानता है तू है तो I will be allright, I will be allright...... 

गौरी हर्षल

२३ फेब्रुवारी २०१७

शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

यु टर्न (भाग 4) ©®गौरीहर्षल (31/12/2016)

यु टर्न (part ४)
पूर्वार्ध – नेहा, प्रथितयश वेब डिझायनर पण त्यासोबतच अत्यंत हट्टी आणि स्वतःला हवं ते मिळवण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार. याच हट्टापायी सारंगने तिच्या प्रेमाला दिलेला नकार तिला काही पचवता आला नाही. आणि मग सुडाच्या भावनेने तिने सारंग आणि सानिका याचं ठरलेलं लग्न शक्य ते सगळे प्रयत्न करून मोडलं. पुढे जाऊन तिनेही प्रेमात पडून राघवशी लग्न केलं पण लग्नानंतर आयुष्यात येणारे चढउतार पार करताना मात्र तिला स्वतःची चूक कळली. तीच नेहा पुन्हा एकदा फिरून सानिका समोर येते आणि नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तिचीच मदत घेते. सारंगही स्वतःची चूक मान्य करत नेहाला माफही करतो आणि मदतही करतो.
 आता पुढे

नेहा आणि राघवची तर गाडी मार्गावर आली होती. पण सानिका आणि सारंगच काय? ते दोघे तर अजूनही काहीच पुढाकार घ्यायला तयार नव्हते. सानिकाच्या आत्यानेही तिच्या लग्नासाठी आता स्थळांचा विचार करू म्हणून तगादा सुरु केला होता.ही गोष्ट अमेयच्या कानावर येताच त्याने स्वरुपामार्फत सारंग पर्यंत पोचवली. त्यात भरीस भर ही पडली की इतके दिवस या गोष्टीना नकार देणाऱ्या सानिकाला आत्या आणि बाकी लोकांनी इमोशनल ब्लॅकमेल करत तयार केलं. मनातून जरी सानिकालाही सारंगला पुन्हा भेटावं वाटत होतं. पण त्यावेळेस तिची चूक नसतानाही त्याने तिला दिलेली वागणूक ती विसरू शकत नव्हती. त्याचा आपल्यावर असलेला विश्वास इतका कमकुवत असेल तर आयुष्यभर कसं निभावणार हा प्रश्न तिला रोखत होता. पुढे दोन दिवसांनी तिला एका मुलाला भेटायचं आहे असं आत्याने सांगितलं.  थोड्याशा गोंधळलेल्या मनःस्थितीतच सानिका त्या मुलाला भेटली. दुसऱ्या दिवशी जेंव्हा अनिताने तिला त्या मुलाबद्दल विचारलं तिला साधं त्याच नावही लवकर आठवेना. हे बघितल्यावर अनिताने तिला पुन्हा एकदा सारंगबद्दल विचार कर असं सुचवलं. पण भारतात येऊन, नेहाच्या केसमध्ये मदत करूनही सारंगने स्वतः अजून सानिकाला एक मेसेजही केला नव्हता. त्यामुळे आधीच्या घटनांमुळे दुखावलेली सानिका अजूनच दुखावली गेली. तिने तस अनिताजवळ कबुलही केलं. 
          इकडे सानिकाशी काय बोलावे याचा विचार करत असतानाच सारंगला तिने लग्नासाठी स्थळांना भेटायला होकार दिल्याचं समजलं. आता मात्र आपण काहीतरी करायला हवं हे त्याला कळून चुकलं. त्यासाठी नेहा आणि अनिताच आपली मदत करू शकतात हे त्याला माहित होतं. त्याने पहिला फोन अनिताला लावला तस तिच्याकडून सानिकाशी झालेलं सगळं बोलणं त्याला समजलं. अजूनही सानिकाच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी आहे हे कळून त्याला जरासं हायस वाटलं. आता तो पुढच्या तयारीत गुंतला. कितिही झालं तरी सानिकाचा राग त्याला झेलावाच लागणार होता. त्याने फोनवर सानिकाचा नंबर डायल केला. पण तिने फोन उचललाही नाही अन् काहीच रिप्लाय केला नाही. दोन,तीन दिवस ह्यातच गेले. शेवटी आता वेगळं काहीतरी करावं लागणार हे सारंगला समजलं. 
तिकडे नेहालाही मनोमन या दोघांना परत एकत्र आणण्यासाठी काहीतरी करायचं होतं. नेमकं काय केलं म्हणजे निदान सानिका आणि सारंग समोरासमोर येतील ह्यावर तीही विचार करत होती. त्या विचारातच मनाशी काही ठरवत ती कामाला लागली. 
आकाशात मात्र लवकरच येणारी पौर्णिमा नव्याने चंद्राला भेटायचं म्हणून उगाच गालातल्या गालात हसत होती. 
#गौरीहर्षल

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

यु टर्न (भाग 3) ©®गौरीहर्षल (31/12/2016)

यु टर्न (part 3)
      चार दिवसांच्या सुटीनंतर रिफ्रेश होऊन आज सानिका आज ऑफिसला निघाली होती. पार्किंग मध्ये गाडी लावत असताना एक फोर व्हीलर तिच्याजवळून गेली. ती चालवणाऱ्या व्यक्तीला आपण कुठे पाहिलं आहे याचा विचार करत ती अनिताला येऊन धडकली. “ मला वाटलं नव्हतं साना सुट्टीमुळे तू इतकी रिफ्रेश होशील” हसत हसत अनिता तिला म्हणाली. “ बाय द वे नेहा भेटली का तुला?”.
 “ तरीच मला ती कार चालवणारी ओळखीची वाटली, बट किती चेंज झालीय ती? इतकी थकलेली हरलेली नेहा बघताना कसतरीच झालं?” सानिका म्हणाली. ती अनितासोबत तिच्या  केबिनमध्ये बसली. “ अनु तुला काही सांगायचं आहे का मला?” थोडसा विचार करत अनिता म्हणाली, “हो, साना नेहाला एका चांगल्या आणि समजून घेणाऱ्या मैत्रिणीची गरज आहे आणि सध्या तिची मनस्थिती पाहता तूच तिला योग्य पद्धतीने सांभाळू शकतेस. लहानपणापासून तिला हवं ते मिळत गेल त्यामुळे नकार पचवायची ताकदच नव्हती तिच्यात.त्याच भावनेतून तिने तुझं आणि स्वतःच आधीच खूप नुकसान केलय. आणि तिला याची जाणीव झालीय तीही अर्थातच खूप मोठी किंमत चुकवल्यानंतर. पण तू तिला या सगळ्यातून बाहेर काढू शकतेस. एक माणूस म्हणून विचार कर.” त्यानंतर सानिकाने स्वतःहून नेहाला फोन केला आणि भेटायला बोलावलं. हे सगळं सानिका फक्त नेहाला डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठीच करत होती.कारण नेहा अजून कुठलच नुकसान होऊ नये असं तिला मनापासून वाटत होत. नेहाला भेटून तिने नेहा खरच बदलली आहे का याचा अंदाज घेतला. आणि तिला खात्री पटली कि आता नेहा पहिल्यासारखी नाहीये.
नेहाला भेटल्यानंतर सानिकाला तिच्या डिप्रेशनच कारण कळाल. नेहाने मुंबईला गेल्यानंतर तिच्याच एका कलीगच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न केल होतं. पण प्रेमाचा पहिला भर ओसरल्यावर दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले. या सगळ्या कारणांसोबतच सारंग आणि सानिकाला आपण विनाकारण वेगळं केल्याच्या गिल्टमुळेचं नेहाला डिप्रेशन येऊ लागलं. त्यात भर पडली ती तिच्या नवऱ्याने तिला पाठवलेल्या डिव्होर्स नोटीसची. नोटीस मिळाल्यामुळेच खचून नेहाने आत्महत्येचा प्रयत्न केला. आणि अनपेक्षितरीत्या ती सानिकाला भेटली. सानिकाने सगळ्यात आधी नेहाला गिल्टमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासोबतच तिने नेहाच्या नवऱ्याला सुद्धा परिस्थितीची कल्पना दिली. सुदैवाने तो अजूनही नेहावर प्रेम करत असल्याने मदत करायला तयार झाला.आणि तो नेहाला पुन्हा घरी घेऊन गेला. या सगळ्या प्रोसेस मध्ये ६ महिने उलटून गेले. त्याचवेळेस स्वरूपाने सारंगच्या बहिणीने तो भारतात येणार असल्याची माहिती सानिकाला दिली. त्यामागे तिचा उद्देश नेहाची मदत हा तर होताच, पण त्यासोबतच सारंग आणि सानिकानेही सगळं विसरून परत एकत्र याव असा हेतूही होता.
सारंगच्या मदातीने नेहाला आपण लवकर नैराश्यातून बाहेर काढू असं सानिकाला वाटत होत. पण प्रश्न फक्त एकच होता त्याच्याशी बोलणार कोण आणि कसं? हा प्रश्न अनिताने सोडवला ती सारंगला भेटून सगळं एक्प्लैन करायला तयार झाली. त्यानुसार ती सारंगला  भेटली. नेहाबद्दल सगळी परिस्थिती तिने त्याच्या कानावर घातली. सारंग प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐकत होता. नेहा जे काही वागली ते फक्त सूड घेण्यासाठी हे लक्षात आल्यानंतर त्याला तिचा राग आला. पण सध्याची तिची अवस्था काय आहे हे कळल्यानंतर त्याला तिची कीव करावी वाटली. अनिताने सांगितल्याप्रमाणे तो नेहाला भेटून तिला समजवण्यासाठी तयार झाला.
ठरल्याप्रमाणे सारंग नेहाला भेटला तेसुद्धा अगदी छान हसत हसत. त्याला आनंदात पाहिल्यावर नेहाला मनापासून खूप बर वाटलं. तिने त्याची आपण जे काही केल त्याबद्दल माफी मागितली तसं तो तिला म्हणाला, “नेहा तुच नाही मी सुद्धा चुकलो साना हि चुकली. आपण तेव्हा खूप वरवर विचार करत होतो. नात्यांची खरी किंमत आपल्याला ती गमावल्यानंतर कळली. पण आता तूसुद्धा हे गिल्ट मनातून काढून दे आणि नव्याने सुरुवात कर.” सारंगकडून हे ऐकल्यानंतर नेहाच्या मनावरच ओझ बऱ्याच प्रमाणात कमी झाल होत. एक मैत्रीण म्हणून सानिकाने जे काही तिच्यासाठी केल होत त्याची परतफेड कशी करायची याचा विचार करतंच नेहा झोपेच्या स्वाधीन झाली. उद्यापासून तिला खऱ्या अर्थाने एका आयुष्याची वेब डिझाईन करायची होती.
क्रमशः
गौरी हर्षल २९.१२.२०१६



बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

यु टर्न (भाग 2) ©®गौरीहर्षल (31/12/2016)

यु टर्न (part 2)
“ आज तरी लवकर यायचंस न रे?” सानिका गाडी पार्क करत असलेल्या सारंगला थोडी रागातच म्हणाली, तसं तिच्याकडे टक लावून बघत तो हसला आणि गाडीतून उतरताना मागे लपवलेले गिफ्ट त्याने तिच्यासमोर धरत तिचा कान पकडला सॉरी म्हणण्यासाठी. एकमेकांना सॉरी म्हणण्यासाठी ते नेहमी असंच करायचे ज्यामुळे समोरचा कितीही रागात असला तरी ते विसरून मनापासून हसायचा. आत्ताही तसचं घडलं सारंगच्या त्या कृतीने सानिका खुदकन हसली. आणि मग दोघेही हातात हात घेऊन नेहमीच्या टेबलवर येऊन बसले.
आजच्याच दिवशी १ वर्षांपूर्वी ते दोघे पहिल्यांदा भेटले होते. सारंग च्या बहिणीच्या स्वरूपाच्या  लग्नात. सानिका स्वरूपाचा नवरा अमेयची मावस आणि एकुलती एक लाडकी बहिण असल्यामुळे करवली म्हणून मिरवण्यात ती कुठेही कमी पडत नव्हती. ह्याच लग्नात थट्टामस्करी करता करता ती आणि सारंग एकमेकांचे चांगले मित्र झाले इतके चांगले कि बघणाऱ्याला वाटावं ते दोघ लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. सारंग देशमुख IIT मधून पास होऊन आता एका MNC मध्ये काम करत होता. तर सानिका पाटील नुकतीच कुठे देसाई मंडमची असिस्टंट म्हणून जॉइन झाली होती. दोघंही आपल्या कामामधून वेळ काढून आवर्जून एकमेकांना वेळ देऊ लागले होते. हळूहळू इतरासारखच त्यांच्याही लक्षात येत होत कि आपण एकमेकांना मित्रापेक्षाही जास्त काहीतरी मानतोय. आणि अशाच एका मस्त संध्याकाळी लॉंग  ड्राइवला गेल्यावर सारंगने तिला आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवत लग्नाची मागणी घातली. आज त्या सेलिब्रेशन साठीच ते दोघ भेटले होते. लवकरच त्यांचा साखरपुडा होणार होता आणि मग २ महिन्यात लग्न. इतक्या घाईचं कारण होतं सारंगला मिळालेली ऑफर ५ महिन्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाला शिफ्ट व्हायचं होत ३ वर्षांसाठी आणि सोबत अर्थातच सानिकाला घेऊन जायचं असल्याने त्या दोघांनी हा निर्णय घेतला होता. घरचे तर आधीपासूनंच त्यांच्या होकाराची वाट पाहत थांबले होते. त्यांच्या या निर्णयाने दोन्हीकडे उत्साहाचे वातावरण तयार झाले. कॅफे यु टर्न च्या त्या धुंद वातावरणात ते दोघे जगाला विसरून एकमेकातच गुंतले होते.
इकडे  नेहाला मात्र अजूनही सारंगने दिलेला नकार पचवता आला नव्हता. तिने मैत्रीच्या नात्याखातर त्याचे आणि सानिकाचे नाते मान्य केले होते पण ती अजूनही शांत झाली नव्हती. त्या नात्यातूनच बाहेर पडण्यासाठी तिने सानिकालाच मदत कर अशी गळ घातली. सानिकाच्या मनात काहीच नसल्याने ती नेहाला वेळ देऊ लागली पण नेहाने मात्र त्याचा फायदा घेत ते सारंगच्या कानावर घातले हे सांगत कि सानिका मला पूर्णपणे उध्वस्त करण्यासाठी असं करतीय. सुरवातीला सारंगला ते पटले नाही पण मग नेहा त्या दोघींचे बोलणे सानिकाच्या नकळत रेकोर्ड करून आणि त्यात बदल करून सारंग ऐकवले. त्या मध्ये सरळ सरळ सानिका नेहाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतेय अशी काही वाक्ये होती. जे ऐकल्यावर सारंगने सानिकाला जाब विचारला सानिका तो माझा आवाज नाही असं म्हणू शकत नव्हती कारण जुन्या एका नाटकाचे स्क्रिप्ट आहे असं सांगून नेहाने ते म्हणून घेतले होते. सारंग काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने सानिकाला खडसावत नेहाची बाजू घेतली. आगीत तेल ओतत नेहाने तू अशा मुलीशी लग्न करशील का असं विचारलं तेंव्हा त्याने रागाच्या भरात नाही असं म्हणत सानिकाकडे पाठ फिरवली. विनवणी करत सानिका त्याला परत एकदा विचार कर हेच सांगत होती. पण तो मात्र तसाच उभा होता. नेहाने डोळे पुसत जाणाऱ्या सानिकाला थांबवले. आणि इतकेच बोलली कि सारंग कधीच तुझा होणार नाही. त्या वाक्यातून सानिका जे समजायचं होत ते समजली. नेहाच्या त्या प्रकरणानंतर सारंग आणि सानिकाने एकमेकांना भेटणे बोलणे पूर्णपणे टाळले मुलांच्या वागण्याचा अर्थ कळूनही दोन्हीकडच्या घरच्यांनी समजुतीचे धोरण स्वीकारले होते. नेहाने त्यानंतर सारंगला आपल्या जाळ्यात ओढण्याचा खूप प्रयत्न केला पण सारंगने तिला नकार देत सरळ ऑस्ट्रेलिया गाठले. नेहाने हे सगळ फक्त तिचा इगो दुखवला म्हणून केल होत त्यामुळे तिला आता सारंग किंवा सानिकात काही इंटरेस्ट नव्हता. त्यांना वेगळ करून तिने मी जिंकले अशी स्वताची समजूत करून घेतली. आणि ती मुंबईला शिफ्ट झाली.
 सारंग गेल्यानंतर दोनच दिवसांनी नेहा सानिकाला भेटायला आली होती आणि तिने स्वतःच्या तोंडाने आपण हे सगळं केल होत असं कबूल करत सारंगला कसा धडा शिकवला हे सांगितलं. सानिकाने सारंग आणि त्याच्या घरच्यांशी कायमचा संपर्क तोडला  आणि स्वतःला क्लिनिकच्या कामात बुडवून घेतलं.
आज त्या गोष्टीला ४ वर्ष झाली होती सानिका किंवा सारंग दोघांनीही एकमेकांशी कसलाच संपर्क ठेवला नव्हता. पण आज अचानक नेहाची फाईल समोर आल्यावर सानिकाला सगळ आठवल होत. उद्या नेहा तिच्या फर्स्ट सेशन साठी अनिताकडे येणार होती. आपल्याला समोर पाहिल्यावर ती काय करेल याची कल्पना असल्याने सानिकाने सुटी काढली होती.
क्रमशः

गौरी हर्षल २८.१२ २०१६