मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

दुर्गे दुर्घट भारी भाग 3

#दुर्गे_दुर्घट_भारी भाग ३ 

ध्यानाला बसायचं म्हणजे माझ्यासाठी नेहमीच एक अवघड काम असत. पण माझ्या लेकाने पोटात असल्यापासून ही गोष्ट माझ्याकडून करून घेतली. 
जसं आमचा शेरू (बोका) अगदी थोरल्या मुलासारखा माझ्या हालचाली वर लक्ष ठेवायचा तसच लेकानेही सुरू केलं. आधी आपण शेरूचा अनुभव ऐकुया. 
शेरु म्हणायला फक्त बोका होता. पण बाकी सगळं वागणं अगदी घरातल्या मोठ्या माणसासारख. 
रोज तिन्ही सांजेला दिवा लावला की रामरक्षा आणि हनुमान चालीसा हे झालच पाहिजे असा त्याचा नियम होता. आता कुणी म्हणेल त्याला काय कळत होतं? पण त्याला कळायचं. ही दोन्ही स्तोत्रं आणि अजून काही स्तोत्रं खंड न पडता ऐकता यावीत म्हणून एका वापरात नसलेल्या फोनमध्ये सेव्ह करून मी ठेवली होती. तो फोन जिथे ठेवलेला असायचा शेरा बरोबर ठराविक वेळी तिथे जाऊन ओरडायला सुरुवात करायचा. आणि एकदा त्याला रिपीट मोडवर सगळ लावून दिलं की स्वतःच्या ठरलेल्या जागी बसून ऐकायचा. 
अमावस्या, पौर्णिमा वगैरेच्या दिवशी ते दिवसभर आमच्या घरात हळू आवाजात दोन्ही स्तोत्रं सुरू असायची. 
एक ,दोन वेळा हयगय केली तेंव्हा त्याला आणि इतर लेकरांना त्रास झाला. त्यानंतर मात्र माझी हिंमत झाली नाही. 
मंडळी एक साधी गोष्ट आहे , शेरुला काय कळत होतं हा भाग जर बाजूला ठेवला , तर रामरक्षा आणि हनुमान चालीसा ऐकल्याने माझं जर काही नुकसान होत नाही तर मग उगाचच खुसपट काढून त्याला विरोध करणं हे मी टाळलं.मला काही हातातली कामं सोडून करावं लागणार होत का? तर नाही मग झालं. जस आपण गाणे ऐकतो तसच ऐकायचं. हळूहळू आपोआपच गोडी लागते आणि ती गोष्ट सवयीचा भाग होऊन जाते. 

जनरली बरेच जण विरोध करतात हे मी ऐकल. पण कॉमन सेन्स असलेली कुठलीही व्यक्ती सांगू शकते , ज्या लोकांमध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो ते अशा गोष्टींमुळे अस्वस्थ होतात. 
शेरा ने हे सगळ माझ्या पहिल्या गर्भपाताच्या नंतर सुरू केलं होतं. आणि खर सांगू का तुम्ही जर 9 महिने फक्त ही दोन स्तोत्रं जरी ऐकली तरी तुमचं मूल अत्यंत हुशार, चपळ आणि निरोगी जन्माला येतं. 
बाकी करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेतच. 
मी स्वतः कुठेतरी अनुभव वाचून गुरूचरित्रामधला चौदावा अध्याय रोज  सहा वेळा वाचायला सुरुवात केली होती. नंतर जेंव्हा तो पाठ झाला तेंव्हा तर मी मोजत ही नसायचे की कितीवेळा म्हणतेय. 
त्या अनुभवामध्ये अस लिहिलं होतं की सहा वेळा अध्याय वाचल्याने होणारी संतती बुद्धिमान, तेजस्वी असते. बस...खरच अस होत की नाही हे बघण्यापेक्षा संतती होण्यासाठी हा उपाय करता येईल एवढच माझ्या मनात होत. आज मला त्याचे परिणाम दिसत आहेत अस मी नक्कीच म्हणू शकते. 

ह्या जगात प्रत्येक समस्येवर उपाय असतात आणि थोडेसे कष्ट घेऊन ते अमलात आणले तर त्यांचं योग्य ते फळही मिळतं. पण आपण काय करतो रडत बसतो, दुसऱ्याकडे बघत बसतो, त्यापेक्षा आपल्याला काय करता येईल हे बघितल तर तुम्हाला स्वतःला स्वतःची मदत करता येईल. 

आता वळूया ध्यान करणे ह्या गोष्टीकडे...
मी काही कुठे जाऊन ह्या गोष्टी शिकले नाही. माझ्या मनाला ज्या गोष्टी पटल्या त्या मी करण्यास सुरुवात केली. 
सुरुवातीला फक्त पाच मिनिटे मी बसायचे. साधारणपणे चौथ्या महिन्या नंतर मी जवळपास जमेल तसं करू लागले. 
त्या दरम्यान काही अनुभव आले त्यातले आजपासून शेयर करत आहे. 

२३जुलै२०१८ आषाढी एकादशी
आजपासून ध्यानधारणा करायला सुरुवात केली. येणारे अनुभव नुसतेच बोलण्यापेक्षा लिहीण्याचं ठरवलं.

साधारणतः 20 मिनिटे बसायचं ह्या हिशोबाने टायमर सेट केला होता. पहिली काही मिनिटे पूर्ण शांततेत गेली. मला फक्त माझा श्वास आणि हृदयाचे ठोके ऐकू येत होते. त्यानंतर अधूनमधून काहीतरी विचार मनात येत. मग मात्र मी अचानक कुणाच्या तरी मागे चालत निघाले. बोलत होतो आम्ही म्हणजे खरं तर मी बोलत होते , आणि ती व्यक्ती जी पुरुष होता की स्त्री माहीत नाही फक्त हुंकार देत होती. 
थोड्या वेळाने मी एका गुहेसारख्या ठिकाणी पोहोचले. मंद पण अगदी स्पष्ट दिसेल सगळं इतका प्रकाश होता आतमध्ये. समोरच थोड्याश्या उंच अशा ठिकाणी एक धूसर आकृती होती उदाहरण द्यायचे तर शंकराच्या मूर्तीची जी आऊट लाईन असेल तशी. पण तिथे फक्त वलय होतं तेजस्वी. मग माझी नजर अवतीभवती फिरली मी अक्षरशः शॉक झाले. अर्धगोलाकार जागेत जवळपास ९ माझ्या सारख्या दिसणाऱ्या स्त्रिया होत्या. सगळ्यांची वयं 30च्या आसपास. पण चेहरे प्रचंड तेजस्वी, सात्विक, शांत इन शॉर्ट मी जशी आहे त्या विरुद्ध एकदम. प्रत्येकजण ध्यानात मग्न होती  त्यामुळे डोळे कुणाचेही बघायला मिळाले नाहीत. 

दुसरीकडे माझे प्रश्न नॉनस्टॉप सुरू होते. "मी कोण आहे? ह्या कोण आहेत? मी ह्यांच्यासारखी दिसते की ह्या माझ्यासारख्या? पण मी अशी नाहीये इतकी शांत, संयमी वगैरे मग अस कसा?  मला इथे का आणलेत?"

उत्तर आलं,  
"समोर उंचावर असलेल्या मुख्य वलयातून फक्त तूच आहेस, कशाला हवीत सगळी उत्तरं लगेच, वेळ आली की कळेल, खूपच घाई करतेस"

 मग मी त्यांचं निरीक्षण करू लागले त्यामध्ये एकजण होती जी पूर्ण ९महिन्याचं पोट घेऊन बसली होती. मला मी 2 हात अंतरावर असूनही तिच्या पोटात हालचाल करणारं बाळ स्पष्ट दिसत होतं. ते सतत हालचाल करत असूनही ती मात्र ध्यानात मग्न होती. अलिप्त, शांत आणि चेहऱ्यावर इतकं कम्फर्टिंग हसू की बघणारा माणूस रिलॅक्स होईल. मी तिला विचारणार इतक्यात एकजण माझ्याजवळून चालत गेली तिच्या कडेवर बाळ होतं, पण चेहऱ्यावरचे भाव सेम. ह्या सगळ्यात एकच गोष्ट कॉमन होती ती म्हणजे त्यांचे डोळे खूप प्रयत्न करूनही मला कुणाचेच डोळे बघता आले नाहीत किंवा दिसले नाहीत. हे इतकं सगळं होईपर्यंत अर्थातच माझ्यासारख्या उतावळा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीचा पेशन्स संपला होता मी वळून त्या मुख्य वलयाला काही विचारणार इतक्यात तेच म्हणे मी चाललोय योग्य वेळी सगळी उत्तरं देईन. 
झालं माझ्या तोंडून हट्टीपणे निघालं,"काहीच सांगायचं नव्हतं तर इतक्या लांब आणता कशासाठी? मी चालले परत". आणि बरोबर 16 व्या मिनिटाला माझे डोळे उघडले. #गौरीहर्षल

मंडळी , अशा छोट्या छोट्या अनुभूती मधून मला त्यांनी जे काही शिकवलं तेच आज माझी ताकद आहे. 
 
आज एकच सांगेन, भक्ती, नामजप, पूजा , ध्यान ह्या गोष्टी काही तरी मिळावं म्हणून करण्यापेक्षा त्यातून नवीन काही तरी शिकता येईल म्हणून आनंद घेत करावं. 

आणि एकदा का ती गंमत कळली की ते आपोआपच आपला हात धरून आपल्याला फिरवून आणतात. 

मी लवकरच येतेय पुढचा अनुभव घेऊन तोपर्यंत? 

तोपर्यंत सगळं काही जगदंबार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!! 

#आई_राजा_उदे_उदे !!!  २२ नोव्हेंबर २०२२ मंगळवार 

#स्वतःला_शोधताना #गौरीहर्षल

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

अध्यात्म म्हणजे काय ? भाग १

#अध्यात्म_म्हणजे_काय_? भाग १

आपण लहानपणापासून काही विशिष्ट आणि ठराविक साच्यातूनच विचार करत आलो आहोत कारण आपल्याला तशीच सवय लागली आहे. आणि तस बघायला गेलं तर त्यात आपली चुक आहे अस काहीच नाही. 

ओव्हरऑल  समरी काढली तर कॉमन पॉईंट हे निघतील

- स्वतःच्या आत्म्यापर्यंत प्रवास
- देवात किंवा त्या शक्तीत लीन होणे
- स्वतःच्या आत्माच्या प्रगतीसाठी 
- स्वतःमध्ये सकारात्मक विचार वाढवणे
- मृत्यू ला शांतपणे सामोरे जाणे
- देवाकडे पोहोचण्याचा मार्ग

पण हे सगळं घडून येण्याच्या मध्ये अनेक पायऱ्या आहेत. 
त्या पायऱ्या गाळून अचानक शेवटच्या टप्प्यात नाही जाता येत. 

त्या पायऱ्या कोणत्या? 
* आपली स्वतःप्रति असलेली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या 
- हो स्वतः, मी , ह्या मी ला विसरून "त्या"च्यापर्यंत पोहोचणे इतके सोपे नसते आणि ते सहज शक्य ही नसते. 
आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे तो कुठलीही एकच गोष्ट करण्यासाठी नाही. तर अनेक गोष्टी करत स्वतःची प्रगती करण्यासाठी. 
मी ला विसरणे म्हणजे स्वतःच्या सगळ्या चांगल्या वाईट गुणांकडे डोळेझाक करणे. 
मी खरा कसा आहे? हे ज्याला कळले तोच आणि तोचच स्वतःच्या दुर्गुणांवर काम करू शकतो. 

मी एक टास्क दिला होता स्वतःच्या चुका मान्य करण्याचा.

का करायचं होतं?  कारण हीच पहिली पायरी होती स्वतःकडे जाण्याची. आधी त्या आतल्या खऱ्या मी ला तर भेटा मग पुढच्या गोष्टी बघू. 

कॉमन चुका किंवा दुर्गुण बघू
- नकारात्मक विचार करणे आणि पसरवणे
- दुसऱ्याला जज करणे
- ईर्षा
- तिरस्कार
- वाईट भावना 
- अहंकार

ह्या आणि अजून काही कॅटेगरी आहेत ह्यामध्ये आपल्या कळत नकळत केलेल्या चुका, दुर्गुण मोडतात. 

किती जणांना हे जमलं ? तुमचं तुम्ही ठरवा. 

* आपल्या जवळच्या लोकांप्रती असलेली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या
- आपल्याशी कोणत्याही कारणांनी जोडलेल्या लोकांप्रती आपली काही कर्तव्य असतात. आणि स्वतःची अध्यात्मिक प्रगती करताना त्यातल्या कुठल्याही बाबतीत हयगय केलेली "त्या "लाही आवडत नाही. 

मग बरेच जण म्हणतात की सगळं त्यांच्यावर सोपवून टाकायचं. टाका न , नक्की सोपवा पण त्याआधी एक गोष्ट स्वतःला विचारा की मी अस वागल्याने देव किंवा ती शक्ती माझ्या अध्यात्मिक प्रगतीला सहाय्यक ठरेल का? की मी अजून एक चूक करतोय? 

मी खूपदा सांगते असेल माझा हरी तर नेईल खाटल्यावरी ही वृत्ती सोडा. जस युगे बदलली आहेत, माणूस बदलला आहे तसेच वरूनही काही गोष्टी बदलल्या आहेत. बदलल्या म्हणण्यापेक्षा त्या आधीपासूनच तशाच होत्या. ज्या व्यक्ती स्वतःची मदत करण्यासाठी कष्ट घेतात, मेहनत घेतात त्यांना हमखास मदत मिळते, मार्ग सापडतो. 

सो फर्स्ट हेल्प युअरसेल्फ अँड अदर्स ऑल्सो. 

* इतर कुठल्याही जीवाबद्दल मनात वाईट विचार न येऊ देणे. 

जमतं? स्पष्ट उत्तर आहे नाही. 

मग आपण कसे काय पुढे जाणार? 

वाईट विचार हे कुठल्याही प्रकारचे असू शकतात.

उदाहरणार्थ -  अगदी कॉमन फेसबुक फ़्रेंड च्या पोस्टवर xyz अनोळखी व्यक्ती अस का बोलली? मग त्याबद्दल मत बनवायचं आणि वाटत सुटायचं. 
कशासाठी? तुम्ही त्या व्यक्तीला किंवा ती तुम्हाला खाऊ घालतेय का? मग सोडा 

सोडून देणं , let go  करणं जमलंय का मला? 

लेट ईट गो , जाऊदे 

मला का नाही जमत घरात , बाहेर सगळीकडे तटस्थ न्यूट्रल जगणं. 

माझ्यासाठी जे योग्य आहे ते घ्यायचं आणि बाजूला व्हायचं. 

अगदी आपले सो कॉल्ड कुणी शत्रू असतील तर त्यांच्याकडूनही योग्य ती शिकवण धडा घ्यायचा आणि स्वतःला सुधरवायच. 

लीन होणं ह्यालाच म्हणत असावेत कदाचित.

जो जो जयाचा घेतला मी गुण 
तो तो म्या केला गुरू जाण


* सकारात्मक विचार वाढवणे , कृती वाढवणे 

हे होतय का?? 

 मेडिटेशन, जप मी केला पण मी कुठेही कुठलीही चांगली गोष्ट बोलले नाही, वागले नाही तर माझं कर्म काय परतून माझ्याकडे आणेल? 

सकारात्मक विचार तर हवाच तसा माईंडसेटही हवा पण अस करताना वास्तवाला नाकारायच नाही. 

फॉर eg. माझं एक काम सुरू आहे मला माहित आहे की मी ते कसं केलं आहे. पण ज्या कारणासाठी ते केलं आहे ते बघितल्यावर मला अंदाज येतो की, माझ्याकडून काही गोष्टी सुटल्या आहेत. त्यामुळे आता मला अपेक्षित यश मिळणार नाही. अशावेळी मी सत्य स्वीकारून जर दुसरे पर्याय शोधायची त्याती ठेवली तर त्याला म्हणता येईल सकारात्मक विचारसरणी. 

पण जर मी नुसतच म्हणत बसले की सगळं नीट होईल तर अर्थातच ते आपोआप घडणार नाही. कारण इथे मी वास्तव स्विकारतच नाहीये. 

सेम गोष्ट अध्यात्म सांगते आधी सर्व बाजूनी स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न करा आणि मग अपेक्षित गोष्टींची अपेक्षा बाळगा. 

कारण हे सगळं कनेक्टेड असतं. 

* मला काही माहीत नाही

आपल्याला सगळ्यांनाच अगदी प्रत्येक माणसाला अस वाटत असत की मला सगळं माहीत आहे. 
पण खरंच जगातील सगळ्या गोष्टी कळण्याची, माहीत असण्याची गरज असते का? 

कधी कधी छोटासा अनुभवही आयुष्य बदलून टाकतो आणि कधी कधी मोठ्यात मोठी गोष्ट घडूनही काहीच फरक पडत नाही. 

अशा वेळी आपल्याला सगळंच कळण्याची गरज नसतेच. आयुष्य आनंदी, सुखी करणे हे आपल्याच हातात असते. त्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये आतून बदल घडवावे लागतात. 
आणि त्यात वेळ जाऊ द्यावा लागतो.


* आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा 

रूढी, परंपरा , चालीतीरी 

ह्या गोष्टी प्रत्येक भागातील वातावरणा सोबत बदलेल्या सापडतात. 

अध्यात्म आणि धार्मिक कृत्य ह्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही अस नाही. 

पण धार्मिक कृत्य ही सामान्य माणसाला देवाच्या , योग्य गोष्टींच्या दिशेने वळवण्यासाठी तयार केलेला मार्ग आहेत. 

ती पार पाडत असताना मात्र मनाची आणि पर्यायाने शरीराचीही शुचिता(शुद्धता) अपेक्षित असते. 

आपल्याला श्रद्धा, विश्वास , संयम शिकवण्यासाठी काही गोष्टींचा अंतर्भाव आपल्या आयुष्यात करण्यात आला होता.                         

*अध्यात्म मार्गावर अनुभव येण्याची अपेक्षा सगळ्यांनाच असते. पण ही गोष्ट प्रत्येकाच्या पूर्वसंचितावर आणि आत्ताच्या कर्मांवर अवलंबून असते. 

त्यात कुणीही ढवळाढवळ करू शकत नाही.

हा प्रवास सुरू करताना आपल्याला आपल्या सगळ्या चुकीच्या सवयींना सोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. 

आपोआप काहीही घडून येत नाही. 

मी रागवत नाही म्हणायचं आणि मनातल्या मनात समोरच्या व्यक्तीला शिव्या द्यायच्या ह्याला कंट्रोल म्हणत नाहीत. 

मनातल्या भावना स्विकारायला आणि बदलायला जमलं पाहिजे. अवघड असते अशक्य नाही.

इतर लोकांना त्यांच्या वागणुकीला आहे तस स्विकारता यायला हवे. कसलीही कमेंट मनात सुद्धा न करता स्वीकार करायचा. 

अपेक्षा न ठेवता चांगली वर्तणूक करायची पण ह्याचा अर्थ असा नाही की स्वतःची पूर्ण किंमत कमी करून घ्यायची. 

लक्षात घ्या हे कलियुग आहे. इथे तुम्ही आधी स्वतःचा आदर करायला हवा. अस जर तुम्ही करत नाही आहात म्हणजे तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेल्या त्याच्या अंशाचा अपमान करत आहात. 

विनम्रता आणि दुबळेपणा ह्यातला फरक ओळखून वागायचं. 

काही मुद्दे प्रायमरी लेव्हलवर आहेत काही अजून येतील. 

पण आत्तासाठी एवढं बास. 

बाकी #दत्तात्रेयार्पणमस्तू!!!

शुभं भवतु!!!

क्रमश: 

#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल


मॉर्निंग मंत्रा भाग 2

#मॉर्निंग_मंत्रा २
१ नोव्हेंबर २०२२
#थॉटस्_पॅटर्न 

ह्या जगात कुठली गोष्ट सर्वात जास्त अवघड असेल तर ती म्हणजे स्वतःच्या बाबतीत चांगल घडत आहे, घडणार आहे असा विचार करणे. 

जसा वाईट विचार , भावना, व्यक्ती ह्यांचा मनावर परिणाम पटकन होतो तसा तो चांगल्या विचार, भावना आणि व्यक्तींचा होत नाही अस का? कारण जी गोष्ट सोपी , कमी त्रासदायक ती लवकर स्विकारली जाते. जी गोष्ट करायला, स्वीकारायला अवघड तिला शक्यतो टाळण्याकडे माणसाचा कल असतो. 

चांगल्या सवयी स्वतः ला लावणे, स्वतःमध्ये रुजवणे हे सगळ्यात अवघड काम. त्यातही एका स्पेसिफिक वयानंतर तर मी कुणाचं का ऐकावं? हा मला सांगणारा कोण? ही वृत्ती वाढलेली असते. त्यामुळे चांगल काही शिकायचं म्हटल की जास्त कष्ट करावे लागतात. 

मी याआधीही म्हणाले होते की अध्यात्मातच नाही तर आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यात प्रगती हवी असेल तर आधी बेसिकवर काम करा. 

स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करायचा प्रयत्न करा. 

ज्यांना अस वाटत की , अध्यात्म म्हणजे फक्त परमार्थ त्यांना एक सांगते , जोपर्यंत स्वार्थी होऊन तुम्ही स्वतःची प्रगती करत नाही तोपर्यंत तुम्ही इतरांची मदत करू शकत नाही. 

इथे स्वार्थी होण म्हणजे स्वतः ला घडवण, स्वतःला सगळ्या गुणदोषांसकट स्वीकारणे , आपल्या मनात सातत्याने चांगल्या विचारांना घोळवत ठेवणे. हे इतकं जरी जमल तरी तुमच्या सहवासात येणाऱ्या "चांगल्या" लोकांना सुद्धा तुमच्या अशा स्वार्थी होण्याचा फायदा मिळतो. कारण सकारात्मकता सुद्धा संसर्गजन्य असते.

 गरज असते ती फक्त मनापासून स्वतःसोबत प्रामाणिक राहण्याची. 

सो लोक्स,

स्वार्थी होऊन बघा बाय गुड मिन्स 
आयुष्य नक्की होईल मास्टरपीस

संकल्प करण्यासाठी मुहूर्ताची गरज नसते. 
त्यातही संकल्प जर स्वतः ला घडवण्यासाठी असेल तर? वाट कसली पाहताय करून टाका. 

हा आजचा मॉर्निंग मंत्रा. लवकरच भेटूया पुढच्या लेखात तोपर्यंत? 

सगळं काही #दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु

#आई_राजा_उदे_उदे 

#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल