सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

व्यक्त होणं का थांबतं?

"व्यक्त होणं का थांबतं? ~अनपेक्षित धक्क्याचा मनावर होणारा परिणाम"
बऱ्याचदा ढोर मेहनत करून सुद्धा ऐनवेळी तोंडचा घास दुसऱ्या व्यक्तीने हिसकावून घेतल्यावर ढसाढसा रडणाऱ्या व्यक्ती कौन्सिलिंग सेशनमध्ये भेटतात. 
त्यापैकी कित्येक जणांचे मनोगत ही खालची वाक्यं दर्शवतात... 

तुमच्या बाबतीत सुद्धा हे घडलं आहे का? 
हळूहळू काही माणसं व्यक्त व्हायची बंद होतात किंवा ती व्यक्त होणे टाळू लागतात असं का होत असेल? 
कारण त्यांच्या आजूबाजूला त्यांना इतरांचा खोटेपणा, दिखाऊपणा, इतरांचं क्रेडिट लाटण्याची वृत्ती अशा अनेक गोष्टी उघडपणे दिसू लागतात पण त्याच वेळेला त्यांना हेही दिसतं की असं वागणाऱ्या लोकांना कोणीच ना त्यांच्या चुकीची जाणीव करून देतात... ना कधी धारेवर धरतात... उलट दुसऱ्यांच्या गोष्टी लाटून खऱ्याचं खोटं करून खोट्याचं खरं करून स्वतःची बाजू चांगली सिद्ध करायला शिकलेल्या ह्या लोकांना जर चुकून कधी यश मिळालं तर त्यांच्या यशाचा एवढा गाजावाजा केला जातो की रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या व्यक्तीचे यश झाकोळून जातं. 

आता कोणी म्हणेल की त्याने त्या यशाची किंमत कमी तर होत नाही ना? नक्कीच होत नाही पण आनंदाने आपलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनस्थितीवर मात्र खोलवर परिणाम होतो. 

 कारण हे असं वागणारी आपलीच माणसं असतात... ज्यांना आपण कधीकाळी बऱ्यापैकी जवळच्या नात्यांमध्ये ओळखत असतो. पण त्या व्यक्ती वेळ आल्यावर आपल्या कल्पना, आपण मांडलेली मतं, आपण केलेली काम सुद्धा स्वतःच्या नावावर खपवून मोकळे होतात. 

कालाय तस्मै नमः म्हणजे काळ हे या सगळ्या गोष्टींवर उत्तम उत्तर असतं. कारण अर्थातच सत्य एके दिवशी समोर येतच...
 पण म्हणून झालेला त्रास, मनस्ताप यांची भरपाई होत नाही. 

माणसं कितीही यशस्वी झाली तरी सुरुवातीच्या काळात किंवा अगदी यशाच्या शिखरावर असताना सुद्धा जर त्यांना जवळच्या लोकांकडून असे अनुभव आले तर ती अलिप्त होत जातात. कारण बऱ्याचदा अन्याय झालाय म्हणून दाद मागायला गेलो तर समोरच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी वाटेल त्या लेवलची वाक्य तोंडावर फेकून मारली जातात. 

हे फक्त घरात, ऑफिसमध्ये घडत नाही तर हल्ली सर्वत्र घडतं. 
उपाय खूप सारे असतात... पण जेव्हा समोरच्याने आपला केसाने गळा कापलेला असतो... तेव्हा त्यावर चिडचिड करून त्रागा व्यक्त करून काहीही साध्य होत नाही.‌

उदाहरण द्यायचं झालं तर थोडक्यात सांगते, 
नावं बदललेली आहेत...
नेहा नावाची माझी एक क्लायंट मागच्या आठवड्यात सेशनची वेळ ठरवून माझ्याशी बोलत होती. 
तिच्या आत्तापर्यंतच्या सेशनचा आढावा घेत असतानाच अचानक ती थांबली आणि म्हणाली , "गौरीताई मला एक महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे. खरंतर तुम्ही म्हणाल की इतके दिवस आपण जे काही करत आहोत तरीही तुझ्याकडून अशी रिएक्शन मला अपेक्षित नव्हती. पण मला राहावत नाहीये आणि मला प्रामाणिकपणे तुम्हाला हे सांगायचं आहे." 

मी तिला म्हणाले, " ठीक आहे, आधी तुझ्या मनात जे काही साचलेले आहे ते आपण बाहेर काढू आणि मगच पुढे जाऊ." 

ती, " माझी एक मैत्रीण आहे. जिला मी इतके दिवस खूप जवळची मैत्रीण समजत होते. मागच्या वर्षापर्यंत ती नोकरी करत होती. आणि तिचं बाकी सगळंही उत्तम सुरू होतं. पण अचानक तिच्या नोकरीत काही प्रॉब्लेम झाले आणि तिला राजीनामा द्यावा लागला. त्यावेळेला ती निराश झालेली होती. म्हणून मी तिला उभारी देण्यासाठी नेहमी तिच्याशी स्वतःहून संवाद साधत होते. 
संवाद साधत असताना एके दिवशी मी तिला एका व्यवसायाबद्दल स्वतःहून माहिती दिली आणि म्हणाले की जर तुझे तयारी असेल तर आपण दोघी एकत्र हे काम करू. मला हे काम करायची खूप इच्छा आहे. त्यावेळी ती मला म्हणाली की मी विचार करून सांगते. त्यानंतर बरेच दिवस, महिने उलटले तिच्याकडून मला काहीही रिप्लाय आला नाही. माझ्याकडे बाकीची ही कामं असल्यामुळे मी ही गोष्ट फारशी मनावर घेतली नाही. आणि अचानक काही दिवसांपूर्वी मला असं कळलं की मी सुचवलेला व्यवसाय तिने करायला सुरुवात केली आहे. तिने मला त्यात सामील केलं नाही याच्याशी मला काहीच देणं घेणं नव्हतं. पण ते करताना तिला एकदाही मला संपर्क करावासा वाटला नाही याचं मला खूप वाईट वाटलं. मुळात तिला ती गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवावी वाटली यातच मला काय ते उत्तर मिळालं होतं. पण तरीही माझा स्वभाव जो सगळ्यात जास्त तुम्हालाच माहित आहे. त्याला अनुसरून मी फोन करून माझा त्रागा व्यक्त केला. आणि इथेच माझं चुकलं.... समोरच्या व्यक्तीने अर्थातच माझं म्हणणं उडवून लावलं आणि समोरून फोन बंद केला. या सगळ्या गोष्टींमुळे माझा पुढचा सगळा आठवडा खराब गेला. तुम्ही म्हणाल की मी वेड्यासारखी वागले, मी असं करायला नव्हतं पाहिजे हे मला सुद्धा पटलं पण तोपर्यंत बंदुकीतून गोळी सुटली होती. " 

मंडळी माझ्या ह्या क्लायंटला अँगर इशू आहेत. त्यांना राग येतो, आणि त्यावर आम्ही गेले काही महिने काम करत आहोत. पण होतं काय सगळ्या पद्धती तंत्र वापरली तरी त्या स्वतः एक माणूस आहेत आणि जेव्हा माणूस एखाद्या व्यक्तीकडून जाणून बुजून दुखावला जातो तेव्हा त्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यात जमेलच असं नाही. 
लक्षात घ्या आपण रागावर नियंत्रण ठेवणं शिकायचं असतं पण ते केव्हा जेव्हा बऱ्यापैकी वेळेला आपल्याला माहीत असतं की आपल्याला राग येणार आहे आपलं शरीर तसेच सिग्नल आपल्याला देत असतं. इथे माझ्या क्लायंटच्या बाबतीत मात्र घडलेली घटना पूर्णपणे अनपेक्षित होती त्यामुळे त्या जे काही वागल्या ती त्यांची प्रतीक्षिप्त प्रतिक्रिया होती. म्हणजे त्या घडलेल्या घटनेवरची रिएक्शन... इन्स्टंट रिएक्शन. 
जी खरंतर त्यांना टाळता येऊ शकली असती.... पण कदाचित ते त्यांना नाही जमलं. हरकत नाही... त्याही परिस्थितीत आपण चुकत आहोत , चुकीच्या व्यक्तीसमोर व्यक्त होत आहोत हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ते माझ्याकडे प्रामाणिकपणे कबूल केलं ही सुद्धा स्वतःमध्ये चांगल्या सुधारणा घडवून आणण्याची एक बाजू आहे. 
हळूहळू कदाचित त्यांना त्यांच्या रागावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येईल. 

पण एक गोष्ट लक्षात घ्या आपण समोरच्या व्यक्तीच्या कडून नकळत किंवा जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अशा पद्धतीच्या वर्तणुकीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मग अशा लोकांच्या बाबतीत काय करायचं? ते मी जनरलाइज्ड सांगू शकत नाही. पण ज्यांना असं वाटतं ते कौन्सिलिंग सेशन चा वापर करून स्वतःच्या आयुष्यातील अशा व्यक्तींसोबत कसं वागायचं हे नक्कीच शिकू शकतात... 
बाकी तुमच्या बाबतीत सुद्धा जर असं काही घडत असेल तर ते आमच्या पर्यंत पोहोचवा.... 
गौरी हर्षल 
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर 

शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०२६

choice is yours

Choice is yours 
निवड तुमची: जेव्हा शहराच्या वेगात आयुष्य थबकतं!
'समीर' एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत (MNC) सिनीअर मॅनेजर म्हणून काम करत होता. पुण्यात स्वतःचं हक्काचं घर, आलिशान गाडी आणि सुखी कुटुंब—सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं होतं. समीरला वाटायचं की त्याने आयुष्याचं गणित अचूक सोडवलं आहे.
पण एक दिवस अचानक कंपनीत 'ले-ऑफ' जाहीर झाला आणि एका ईमेलने समीरचं जगच बदलून गेलं. ज्या कंपनीसाठी त्याने रक्ताचं पाणी केलं होतं, तिथून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
बाहेर पावसाळी संध्याकाळ होती आणि समीर मुंबई-पुणे हायवेवर गाडी थांबवून सुन्न होऊन बसला होता. डोळ्यासमोर घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण आणि भविष्याची चिंता उभी राहिली. त्याला वाटलं, "हे माझ्याच बाबतीत का झालं? मी काय चूक केली होती?"
अशाच अस्वस्थ मनस्थितीत तो आपल्या कॉलेजच्या एका जुन्या मित्राला, 'विक्रम' ला भेटायला गेला. विक्रम एक यशस्वी उद्योजक होता आणि त्याने आयुष्यात खूप चढ-उतार पाहिले होते.
समीरने आपली सगळी कैफियत मांडली. विक्रम शांतपणे ऐकून घेत होता. त्याने हॉटेलच्या खिडकीबाहेर पाहिलं, जिथे जोरात पाऊस पडत होता आणि ट्रॅफिक जाम झालं होतं.
विक्रम म्हणाला, "समीर, बघ बाहेर ट्रॅफिक जाम आहे. कोणीतरी गाडी खराब झाल्यामुळे किंवा पावसामुळे अडकलंय. तुझ्या मते, त्या माणसाच्या हातात हा पाऊस थांबवणं होतं का?"
समीर म्हणाला, "नाही रे, पाऊस किंवा ट्रॅफिक आपल्या हातात नसतं."
विक्रम हसून म्हणाला, "अगदी हेच तुझ्या करिअरचं आहे. जागतिक मंदी, कंपनीचे निर्णय किंवा 'ले-ऑफ' हे त्या पावसासारखं आहे. ते टाळणं तुझ्या हातात नव्हतं. पण आता कारच्या आत बसून रडत बसायचं की जवळचा रस्ता शोधून बाहेर पडायचं, हे मात्र तुझ्या हातात आहे."
समीरला काहीतरी पटू लागलं. विक्रम पुढे म्हणाला:
"संकटं ही शहरातल्या ट्रॅफिकसारखी असतात. ती कधी येतील सांगता येत नाही. पण त्या वेळी आपण 'हॉर्न' वाजवून डोकं दुखवून घ्यायचं की शांत राहून पुढच्या वळणाचा विचार करायचा, ही आपली निवड असते."
समीरने त्या रात्री स्वतःला एक प्रश्न विचारला— "मी जे बदलू शकत नाही त्याचा विचार करत बसू की जे मी करू शकतो त्यावर लक्ष देऊ?"
त्याने दुसऱ्या दिवसापासून रडणं थांबवलं. त्याने आपल्या अनुभवाचा वापर करून स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली. सुरुवातीला कठीण गेलं, पण सहा महिन्यांतच तो आधीपेक्षा जास्त कमावू लागला आणि मुख्य म्हणजे तो आता स्वतःचा मालक होता.
कथेचे तात्पर्य:
शहरातल्या धावपळीच्या आयुष्यात कधी 'पिंक स्लिप' मिळेल, कधी तब्येत साथ देणार नाही किंवा कधी नाती दुरावतील, हे आपल्या हातात नसतं. संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं, त्याच्या हातात असतं.
जेव्हा परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर असते, तेव्हा तुमच्याकडे दोनच पर्याय असतात:
परिस्थितीचे बळी (Victim) बनायचं की
परिस्थितीचे विजेते (Warrior) बनायचं.
लक्षात ठेवा, वादळ तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर तुमच्यातली सुप्त ताकद ओळखण्यासाठी येतं!
तुमच्याही आयुष्यात असं कधी 'वादळ' आलं होतं का? तुम्ही त्याला कसं तोंड दिलं? कमेंट्समध्ये नक्की सांगा.
गौरी हर्षल कुलकर्णी
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सेलर
📱 9730961014