शनिवार, २५ मार्च, २०२३

स्वतःसाठी बदलताना लेख 16

#स्वतःसाठी_बदलताना_लेख16
स्वतःला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर त्यातून वाचण्यासाठी ,बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण अशावेळी बऱ्याचदा आपल्याला इतर व्यक्तींकडून नकारात्मक वागणुकीचा सामना करावा लागतो. मग काय करायचं? तर अशा परिस्थितीत स्वतःसाठी ठामपणे उभे राहणे आणि त्याच वेळी स्वतःची मन:शांती ढळू न देणं हेही गरजेचं असतं. 
त्याबद्दल काही टिप्स...
1. स्वतःचे जागरूकतेने निरीक्षण करा. Self awareness 
नकारात्मक विचार, भावना ह्या कशामुळे ट्रिगर होतात हे ओळखण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते. एकदा ते लक्षात आलं की त्या विचारांना कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यायची हे लक्षात येतं. 
स्वतःच्या भावना आणि प्रतिक्रियांबद्दल जागरूकता निर्माण झाली की आपण दोन पावले मागे येऊन योग्य पद्धतीने विचार करून व्यक्त होऊ शकतो. 
2. स्वतःसाठी मर्यादा आखून घ्या. Setting healthy boundaries. 
बऱ्याचदा आपण आपल्या गरजा आणि अपेक्षा योग्य पद्धतीने, योग्य शब्दात समोरच्या व्यक्तीला सांगत नाही. त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून जी वागणूक मिळते त्यामुळे कुठेतरी आपणच दुखावले जातो. म्हणून योग्य वेळी योग्य शब्दात आपल्या गरजा आणि अपेक्षा स्पष्ट करणे गरजेचे असते. जेंव्हा आपण असे करायला सुरुवात करतो तेव्हा अर्थातच आपल्याला आपल्या सोबतच इतरांकडून ही विरोध होतो. पण हळूहळू गोष्टी बदलतात हे नक्की. 
मनाविरुद्ध एखादी गोष्ट करावी लागणार असेल तर ठामपणे नकार देणं किंवा एखाद्या त्रासदायक गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे हे स्वतःसाठी बाऊंड्री सेट करण्याचे उत्तम उदाहरण आहेत. 
३.  स्वतःला/ इतरांना माफ करा. Practice forgiveness. 
चूक मग ती स्वतःकडून झालेली असू दे किंवा इतरांकडून त्यासाठी आपण स्वतःला त्रास करून घेत असतो. 
नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवणे आणि समोरच्या व्यक्तीला, तिच्या वागण्यालाही माफ करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते. 
आपण कितीही ठरवलं तरी कुठलीही गोष्ट पूर्णपणे विसरू शकत नाही , तसेच कुणालाही माफ करणं सुद्धा सोपी गोष्ट नसते. माफ करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्याचा विचार न करण्याचा प्रयत्न करणे. असं केल्याने आपल्याला आपोआपच मनाचा फोकस महत्वाच्या गोष्टींकडे वळवता येऊ लागतो. आणि हळूहळू त्या नकारात्मक भावना बोथट व्हायला सुरुवात होते. त्यांचा आपल्या मनावर तितकासा परिणाम होत नाही. 
४. वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा. Focus on the present moment. 
भूतकाळात घडून गेलेल्या घटनांवर ,किंवा भविष्य काळात काय घडेल ह्यावर विचार करत राहण्याची सवय बऱ्याच जणांना असते. त्या सवयींपासून प्रयत्नांनी दूर राहत वर्तमान काळात जगण्याची सवय मनाला लावावी लागते. 
आपली बाजू ठामपणे, आत्मविश्वासाने मांडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेण्याची किंवा आक्रस्ताळेपणा करण्याची गरज नसते. 
वर उल्लेख केलेल्या गोष्टी आपण आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनवल्या की हळूहळू बदल घडू लागतात. 
25 मार्च 2023
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 
(ह्या आधीचे लेख खालील लिंक वर मिळतील. https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02mZny1jqEDk8rHPuMkwTgc6At6LRB9GMGh7kJ2vzkDofgZHuj9sSw8Kdu6oKm9zWhl&id=100000197780430&mibextid=Nif5oz)

गुरुवार, २३ मार्च, २०२३

स्वामींचा प्रगट दिन आणि शेरुचा स्मृतिदिन

#स्वामींचा_प्रगटदिन_आणि_शेरूचा_स्मृतीदिन
लॉकडाऊन लागलं आणि दोन दिवसात आमच्या शेरूची तब्येत जरा जास्तच बिघडली. त्याच्याबद्दल मी हनुमान जयंती आणि हार्ट बीट या लेखामध्ये लिहिलेल आहे. शेरुला रामरक्षा आणि हनुमान चालीसाच प्रचंड वेड होत.  कोणी म्हणेल की कसं काय? पण ही खरंतर खूप आश्चर्याची गोष्ट होती. त्याला घरात अखंड रामरक्षा आणि हनुमान चालीसा ऐकायला हवी असायची. 
 आणि त्यासाठी एक सेपरेट मोबाईल, त्याच्यामध्ये ते दोन्ही स्तोत्र सतत चालू ठेवावे लागायचे. 
 कधी जर चुकून बॅटरी संपून मोबाईल स्विच ऑफ झाला तर त्याच्यावर पंजा आपटून फोन माझ्यापर्यंत आणून  सांगणं की चार्ज कर आणि लाव माझे गाणे. 
याचा अर्थ  फक्त रामरक्षा आणि हनुमान चालीसा एवढे दोनच गोष्टींशी संबंध होता.  बाकी शक्यतो फारसा काही त्याला लागायचं नाही. 
जेव्हा मी संक्षिप्त गुरुचरित्र किंवा काही वाचायला बसायचे की शेरू महाराज समोर येऊन मस्तपैकी ऐटीत बसणार अन् ऐकणार. अजिबात हलणार नाही, तास दोन तास त्याची समाधी लागलेली असायची.  ते म्हणतात ना, की प्राण्यांना त्यांच्या जाण्याचा दिवस कळतो किंवा ते खूप संयतपणे स्वतःचा मृत्यू स्वीकारतात असंच काहीसं माझ्या शेरुनी केलं.  जेव्हा त्याला लक्षात आलं की आता आपण बरे होणार नाही आहोत. 
 डॉक्टरकडे जाणं सलाईन लावून घेणे हे तीन, चार दिवस झाल्यानंतर मात्र त्याने अन्न पाणी सोडून दिलं. जवळपास 15 दिवस तो थोडाफार काहीतरी बळजबरीने खाऊन त्यावरती असायचा.  पण शेवटी मात्र त्याने एक दिवशी माझ्याकडे बघितलं डोळ्यात पाणी होतं.  मी म्हटलं ठीक आहे बाबा तुला जे योग्य वाटतं ते तू कर. 
दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबाला काय वाटलं माहित नाही. त्याने मला सांगितलं की मला शेरू साठी संक्षिप्त गुरुचरित्राची पोथी वाचायची.  एक दीड तासाचे पारायण असतं ते मी करणार आहे.  त्याप्रमाणे पहाटे उठून शेरुला मांडीवर घेऊन त्याने ती गोष्ट केली.  त्यानंतर तो ऑफिसला निघून गेला.  आणि साधारणतः दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान शेरू शांतपणे गेलेला होता.  त्याला कुठलाही त्रास झाला नाही असे भाव चेहऱ्यावर होते. 
 कुठेतरी असं आम्हालाही वाटलं की शेरूने  एक गोष्ट जाता जाता सांगितली.  माणसं सगळ्याचा मोह बाळगतात. 
 पण हे पिल्लं मात्र जीव लावतात, आपल्यापेक्षा कैकपटीने जास्त प्रेम आपल्याला देतात आणि जायची वेळ आली की एक एक गोष्ट सोडत, सगळं काही इथेच त्यागून पुढच्या प्रवासाला निघून जातात  
स्वामींच्या प्रकटदिनी शेरू ने संक्षिप्त गुरुचरित्राचा पारायण करून घेऊन त्यानंतर स्वतः या सगळ्या गोष्टी स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट किंवा हा एक खूप वेगळा योगायोग होता. 
शेरु मुळे रामरक्षा आणि हनुमान चालीसा म्हणण्याची, ऐकण्याची सवय इतकी सहज लागली की रोज ते आपोआपच होतं. 
त्याच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली असली तरीही त्याचं असणं जाणवतं ते  पद्माक्ष च्या कडून रामरक्षा आणि हनुमान चालीसा साठी केल्या जाणाऱ्या हट्टामुळे. 
कुणी कितीही नाकारलं तरी माझ्या मनीमाऊनी नेहमीच त्या स्पेशल आहेत हे सिद्ध केलं. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल 

सोमवार, २० मार्च, २०२३

स्वतःसाठी बदलताना 15

#स्वतःसाठी_बदलताना 15
 कधी कधी आयुष्यात अशी परिस्थिती येते ना की प्रचंड उलथापालथ सुरू असते. काहीही नीट घडत नसते, मन अस्थिर असतं, आपण सतत गोंधळलेल्या अवस्थेत असतो, असं वाटत असतं की कुठून तरी एखादा तरी आशेचा किरण दिसावा.
आणि ॲट द सेम टाइम या सगळ्यांमध्ये आपण स्वतः सुद्धा स्वतःसाठी काहीतरी प्रयत्न करत असतो. 
माझ एक प्रामाणिक मत आहे की अगदी आत्महत्या करणारे व्यक्ती असू दे किंवा डिप्रेशनमध्ये जाणारी व्यक्ती... पहिल्या स्टेज पासून ते शेवटच्या स्टेजला पोहोचेपर्यंत व्यक्ती हात पाय मारत असते, प्रयत्न करते डायरेक्ट असं कोणीच या सगळ्या चक्रात जाऊन अडकत नाही. 
पण  जेव्हा ती व्यक्ती हातपाय मारायचा प्रयत्न करत असते, बाहेर पडायचा प्रयत्न करत असते, तेव्हा जर तिच्या जवळच्या लोकांनी तिला शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर??? कित्येक जीव तिथेच सावरले जाऊ शकतात. 
पण दुर्दैवाने आपल्याकडे याबाबतीत अवेअरनेसही कमी आहे आणि शक्यतो जर कोणी असं बोलायला लागलं तर त्याला टोचून टोचून बोलण्याचा प्रमाण खूप जास्त आहे. 
 उदाहरण द्यायचं झालं तर एखादी व्यक्ती जिच्या आयुष्यात नुकतंच काहीतरी घडून गेलेल आहे. घटस्फोट झालेला आहे किंवा तिचा आयुष्यात कोणीतरी मृत्यू पावलेल आहे त्या परिस्थितीतून सावरताना ती व्यक्ती बाहेर पडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला जाते. 
कुठलेही प्रयत्न... स्वतःला जिवंत असण्याची खूण पटवून देण्यासाठी... ती व्यक्ती चांगले कपडे घालून बघते तर तिला ऐकायला मिळतं, "अरे लगेच सावरलात? Xyz या गोष्टी झाल्या त्याला अजून फार वेळ नाही झाला एवढं कसं कोणी पटकन गोष्टी बदलू शकतो? तुम्हाला दुःख नाही होत?".
 अशाच काही गोष्टी अगदी नोकरी किंवा व्यवसायात फटका पडलेल्या माणसांच्या बाबतीतही होतात. चुकून ती व्यक्ती कुठे बाहेर गेलेली दिसली,  काही गोष्टी केलेल्या दिसल्या. रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलीये, काहीतरी वस्तू विकत घेताना दिसते.
" अरे आत्ता एवढा सगळा खर्च झालाय. तुम्ही कर्जात बुडलेले आहात तुम्ही हे सगळं कसं काय करू शकता???"
 हे त्या व्यक्तीला ऐकवलं जातं. ऐकवणाऱ्या व्यक्तीला जनरली गोष्टींच बॅकग्राऊंड माहीत नसतं. तिला फक्त तिच्या मनात जे आले ते फडकन बोलून मोकळं व्हायचं असतं.
समोरच्या व्यक्तीसोबत जे काही घडलं आहे त्याबद्दल सगळंच आपल्याला माहित असतं का? 
 जी व्यक्ती वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतीये की त्यासाठी पहिली स्टेपच ही घेत असते की मी माझ्या वातावरणातून बाहेर येऊन काही क्षण जगून बघावं मला पुन्हा तो आत्मविश्वास मिळतोय का? दुर्दैवाने हे केलं जात नाही की अशा गोष्टी ऐकायला मिळतात आणि लोक आतल्या आत घुसमटत राहतात. 
 सो इथे एक सांगणं आहे की समोरच्यावर वाईट वेळ आली आहे, तो त्या परिस्थितीतून जातो आहे, ती परिस्थिती किती बिकट आहे हे जर आपल्याला माहीत नसेल तर कुठलेही जजमेंट पास करू नये. 
 आपल्याला कुणाचं चांगलं करता येत नसेल तर निदान वाईट तरी करू नये. 
आणि जे अशा परिस्थितीतून जात आहेत त्यांनी मात्र एक गोष्ट नक्की करावी जर आपलं बाहेर निघायचं ठरलेल आहे तर आजूबाजूचा वातावरण,त्यामध्ये असणारी माणसं यांचा आपल्या मनस्थितीवर कितपत परिणाम होऊ द्यायचा हे आपण ठरवायचं. आपल्याला एकट्याच्या जीवावरती गोष्टी करता येत नसतील तर शक्य तिथे न लाजता "योग्य लोकांकडे" मदत मागायची. इथे मी योग्य लोकांकडे म्हणत आहे सरसकट सगळ्यांसमोर आपली परिस्थिती सांगून स्वतःच हसू करून घ्यायचं नाही.
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
20.3.2023
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

सोमवार, १३ मार्च, २०२३

स्वतःसाठी बदलताना हा कोर्स का करावा?

#स्वतःसाठी_बदलताना
स्वतःसाठी बदलताना हा कोर्स मी का करावा असा प्रश्न जर पडत असेल तर हे नक्की वाचा. 
1. भूतकाळातील वाईट गोष्टींचे वर्तमान काळावर अजूनही पडसाद उमटतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भूतकाळात घडून गेलेल्या चुका किंवा मिळालेली वाईट वागणूक यामधून मला अजूनही बाहेर पडता येत नाहीये. असं काही जर तुमच्याबरोबर असेल तर तुम्ही हा कोर्स नक्की करा.

2. कितीही चांगले बदल करायचे म्हटले त्यासाठी कितीही संकल्प केले तरीही माझ्याकडून सातत्याने गोष्टी घडत नाही. म्हणून तर हा जो कोर्स आहे तो 21 दिवसांचा आहे.  21 दिवसांमध्ये सातत्याने स्वतःसाठी काम केल्याने मनाला, मेंदूला आणि पर्यायाने शरीराला त्या गोष्टींची सवय लागते. 

3. विनाकारण चिडचिड, नीट झोप न लागणे, सातत्याने विचार करणे, कुठल्याही गोष्टीकडे बघताना नकारात्मक बाजूला जास्त झुकणे हे जर आपल्या बाबतीत होत असेल....तर आपल्याला आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या विचारसरणीवर काम करायची गरज आहे आणि म्हणून हा कोर्स महत्त्वाचा आहे. 

4. कुठलंही नवीन काम करणं, नवीन गोष्टीची सुरुवात करणं याची भीती वाटते किंवा एखादी गोष्ट कितीही करण्यासाठी गरजेची असली तरीही ती सुरू करण्याची इच्छा न होणे हे जर तुमच्या बाबतीत होत असेल तर हा कोर्स नक्कीच करा. 
 कारण इथे तुम्हाला आपली गाडी नेमकी कुठे अडते आहे हे लक्षात येईल.  बऱ्याचदा काय होतं माहितीये का की आपल्यामध्ये ते पोटेन्शिअल असतं, ती ताकद असते पण कुठेतरी मोटिवेशन कमी पडत असतं आणि ते मोटिवेशन आपण आपल्या आजूबाजूला शोधत असतो.  त्या ऐवजी ते मोटिवेशन तुम्हाला स्वतःकडून मिळालं तर?  स्वतःच स्वतःचे मोटिवेटर होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकायचं असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. 

5. आयुष्यात आपल्याला नेहमी वाटतं की माझ्या बाबतीत काही वाईट घडलं तर माझी कोणीतरी मदत करावी पण असं नेहमीच होतं का?  प्रत्येक वेळी कोणी आपल्या मदतीला धावून येतं का? तर नाही...  बऱ्याच जणांचं उत्तर हेच असेल.  मग अशा वेळेला आपण प्रयत्न करायचे सोडून देतो का?नाही ना?

 मग आधीपासूनच आपण आपल्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली तर? आपण स्वतःला बदलून स्वतःचा सगळ्यात जवळचा मित्र तत्त्वज्ञ आणि वाटाड्या बनवलं तर? अवघड आहे पण अशक्य नाहीये.  

आणि म्हणूनच आपण 21 दिवसांचा वेळ निवडला आहे.  जिथे एका क्षणात गोष्टी बदलतात तिथे 21 दिवसांमध्ये किती चांगले बदल घडून येऊ शकतात याचा विचार केला तर तुम्हाला ही संकल्पना नक्कीच पटेल.

*** कॉमन प्रश्न
टास्क करायचे म्हणजे नेमकं काय करायचं? 
--- तर कोर्स चे जे मेंटोर आहेत जे मार्गदर्शक आहेत ते तुम्हाला जे टास्क देतील ते तुम्ही ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करायचे. आता हा ठराविक कालावधी तुमच्या ऑफिस टाइमिंग ना, डेली रुटीनला डिस्टर्ब करणार असेल का? तर अजिबात नाही तुमचं डेली रुटीन अजिबात डिस्टर्ब होणार नाहीये.

तुम्हाला कोर्स बद्दल अजून काही शंका असतील तर दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर संपर्क साधा. 
कोर्स सुरू होतो आहे 16 मार्च 2023 पासून
फी 800रू फक्त
नंबर 9730961014
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

गुरुवार, ९ मार्च, २०२३

स्वतःसाठी बदलताना बॅच 1

#स्वतःसाठी_बदलताना 
#संकल्पदिन #गुरूवार
#21dayschallenge

गेले महिनाभर सातत्याने #संकल्प2023 #संकल्पदिन ह्या नावाने 31 संकल्प मी शेयर करत आहे. आधीही असेच काही संकल्प दिले होते. 
ह्या संकल्पना माणसाच्या रोजच्या आयुष्यात जे बदल घडवून आणत आहेत त्या मागे एक वेगळी सकारात्मक ऊर्जा कार्यरत आहे. आणि तिच्याच परवानगीने आता पुढच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. 
"स्वतःला घडवण्यासाठी" ह्या 21 दिवसांच्या कोर्सच्या चार बॅचेस यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या. आणि त्यातून नवीन संकल्पनेचा जन्म झाला ती म्हणजे "स्वतःसाठी बदलताना".हा कोर्स हा आधीच्या कोर्सच्या पुढचा टप्पा जरी असला तरी तो कुणीही करू शकते. 

 तुमच्या लक्षात आलं असेल की या सगळ्या गोष्टी स्वतःभोवती फिरतात. का??? कारण जोपर्यंत आपण स्वतःवरती काम करत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात बदल जाणवत नाहीत. 

आणि काम करायचं म्हणजे स्वतःला तडजोड करण्यासाठी तयार करायचं असा त्याचा अर्थ होत नाही तर गोष्टींबरोबर जुळवून घेताना स्वतःचा आयुष्य जगण्याचा आणि त्याचा भरभरून आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा. 

चढउतार हे आयुष्यात सातत्याने येतच असतात. पण म्हणून आपण जगणं सोडत नाही किंवा कष्ट करणे सोडत नाही.
 म्हणतात ना उम्मीद पे दुनिया कायम है.  मग तीच थोडीशी उम्मीद स्वतःच्या आयुष्यात चांगलं काही घडण्यासाठी वापरली तर???

कॉमन विचारले जाणारे प्रश्न - 
स्वतःला घडवण्यासाठी हा कोर्स केला नाही तर मी स्वतःसाठी बदलताना करू शकतो का? 
---- हो आधीच्या गोष्टींची सांगड घालूनच हा कोर्स तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही हा कोर्स नक्कीच करू शकता. 

स्वतःसाठी बदलताना हा कोर्स कोण करू शकतो? 
 ------- वय वर्ष 20 ते 55 ज्याला आपल्या आयुष्यात चांगले बदल हवे आहेत असं कोणीही हा कोर्स करू शकता. 
 वेळेचं बंधन अजिबात नाहीये. पण कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर तो कोर्स व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करणे हे मात्र गरजेचे आहे . 

स्वतःला घडवण्यासाठी आणि स्वतःसाठी बदलताना यामध्ये नेमका फरक काय आहे? 
---------- स्वतःला घडवण्यासाठी इथे सहभागींनी स्वतःच्या पूर्वायुष्यातल्या काही गोष्टींवर काम केलं होतं.
तर स्वतःसाठी बदलताना ह्या कोर्समध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना स्वतःसाठी प्रत्यक्षात ठामपणे काही गोष्टी करायच्या आहेत. 

कोर्सचे स्वरूप काय असेल? 
-------- 10 टास्क लिहिण्याचे आणि 10 टास्क कृती करण्याचे असतील. 
टास्क नेमके काय असतील ते मात्र कोर्स जॉईन केल्यानंतर कळेल. 

कोर्स कालावधी - 16 मार्च ते 5 एप्रिल 2023 
कोर्स फी - 800रुपये 
गुगल पे/फोन पे - 9730961014 

(कोर्स बद्दल कुठलीही माहिती हवी असल्यास 9730961014 ह्या wa नंबर वर संपर्क साधा. फी पेमेंट केलं आहे त्यांनी ह्या नंबर वर रिसिट पाठवा म्हणजे ग्रुप मध्ये एड केलं जाईल. ) 

बाकी सगळं #दत्तात्रेयार्पणमस्तू!!!! शुभं भवतु !!!

#दत्तात्रेयार्पणमस्तू
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल 

बदलाल तर बदलाल

बदलाल तर बदलाल

बदल ही एकमेव अशी गोष्टआहे जी सातत्याने बदलत असते. 
किती गोंधळात टाकणारं वाक्य आहे न? पण तेच मर्म आहे आयुष्याचं... 
Change is only constant thing.

त्यावरून एक गोष्ट आठवली स्वातीला घरातील फर्निचरच्या जागांमध्ये बदल करण्याची सवय होती. 
दर ठराविक दिवसांनी ती घरातील फर्निचरची ठेवण बदलत असे. हे बदल करण्यामागे तिच्या मनात दोनच विचार असत - 
पहिला म्हणजे फार कमी वेळा घरातून बाहेर पडणाऱ्या स्वातीला असे बदल केल्याने मूड फ्रेश झाल्यासारखे वाटत असे. 
आणि 
दुसरा म्हणजे अस करत असल्याने घरात जनरली फारशी स्वच्छता करावी लागत नसे कारण ह्या निमित्ताने सगळ्या गोष्टींवरून आपसूकच हात फिरत असे. 

तिच्या या वागण्याचं घरात सगळ्यांना आधी आश्चर्य वाटत होतं. पण हळूहळू सगळ्यांना ते ही अंगवळणी पडलं. 
तशी ती काही कुणाला मदत करायला सांगत नसे. पण ते काम केल्यावर घरात जाणवणाऱ्या गोष्टी सगळ्यांनाच लक्षात आल्याने आता सगळेच आवडीने ह्या वेळी नवीन काय करायचं ? हे ठरवण्यात पुढे येऊ लागले होते. 

एकदा अचानक काही पाहुणे त्यांच्याकडे आले. एक दोन दिवस राहून गेले. घर अर्थातच नेहमीप्रमाणेछान आवरलेलं होतं. आलेल्या पाहुण्यांना ते बघूनच खूप प्रसन्न वाटलं. ते कौतुक करून आपल्या घरी गेले. 

पुन्हा काही दिवसांनी त्याच पाहुण्यांच येणं झालं ह्यावेळेस त्यांना घर बदललेलं वाटलं पण प्रसन्नता, कलात्मकता आणि सकारात्मक ऊर्जा मात्र तशीच होती. 

"हे कसं काय?", त्यांनी न राहवून विचारलं. 

स्वातीने तिचा फंडा सांगितला. आणि त्यांना सांगितलं की ती तिच्या मनस्वास्थ्यासाठी ही गोष्ट करत होती. फार काही करायचं नव्हतंच फक्त वस्तू रिअरेंज करायच्या. काही गोष्टी नंतर वापरू म्हणून ठेवल्या असतील तर त्या आलटून पालटून वापरायला सुरुवात करायची. 
स्वतःच्या आनंदासाठी विकत घेतलेल्या गोष्टी जर आत्ता वापरल्या नाहीत तर कधी वापरणार? 

तिची ही पध्दत घरात सगळ्यांना आवडली त्यामुळे सगळ्यांनीच अवलंबून बघितली होती. 

अशीच पद्धत स्वतःच्या मनाच्या आणि मेंदूच्या बाबतीतही वापरायला हरकत नाही हो न? 

घरातील वस्तुंची जागा बदलून जर मनस्थितीत फरक पडत असेल तर मनातील, मेंदूतील विचारांची जागा बदलल्यावर, पद्धत बदलल्यावर किती फरक पडेल? 

बदल जर आपल्याला स्वतःसाठी स्वतःच्या आयुष्यात हवे आहेत तर त्यासाठी प्रयत्नही आपणच करायला हवेत ना? 

बघूया बदल आपल्याला बदलतो की आपण बदलाला बदलतो 😂😂 

बाकी 

बाकी बरच आहे शोधुया हळूहळू ... 



रविवार, ५ मार्च, २०२३

बी थॉटफुल

बी थॉटफुल
𝐍𝐨 𝐦𝐨𝐫𝐞 𝐝𝐞𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐢𝐧𝐠 𝐮𝐧𝐰𝐚𝐧𝐭𝐞𝐝 𝐭𝐡𝐢𝐧𝐠𝐬 𝐭𝐨 𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐩𝐞𝐨𝐩𝐥𝐞.
𝐝𝐢𝐬𝐚𝐩𝐩𝐨𝐢𝐧𝐭𝐦𝐞𝐧𝐭 𝐬𝐭𝐨𝐫𝐢𝐞𝐬 𝐚𝐫𝐞 𝐧𝐨𝐭 𝐭𝐡𝐞 𝐬𝐭𝐨𝐫𝐢𝐞𝐬 𝐲𝐨𝐮 𝐰𝐚𝐧𝐭 𝐭𝐨 𝐭𝐞𝐥𝐥. 

मीच का? माझ्यासोबतच का? हे विचारताना आपण विसरतो की आपल्याबाबतीत घडणाऱ्या 99.99 टक्के वाईट गोष्टींना आपण स्वतः आमंत्रण दिलेले असते. 

वाईट विचार, डिप्रेसिंग स्टेटस, गॉसिप्स, इतरांना कमी  लेखणे ह्या गोष्टी आपण करत असतो. पण त्या करताना आपल्याला वाटतं की हे फक्त मला माहित आहे. प्रत्यक्षात मात्र त्या गोष्टी तुमचं भविष्य ठरवत असतात. 
सो लोक्स , चुकीच्या गोष्टी, बातम्या, नकारात्मक विचार इतरांकडे पास करताना 100 वेळा विचार करा. 

अँड फॉर अ चेंज म्हणून एखाद्या दिवशी कुठल्याही वाईट गोष्टीला एंटरटेन करू नका. आणि फरक बघा. 

११.६.२०२२ वेळ रात्रीचे १०:२६

#स्वतःला शोधताना
#गौरीहर्षल

शनिवार, ४ मार्च, २०२३

गारूड

गारुड

विकेंडच काम नाही म्हटलं तरी बरंच लांबल होतं. 
शेवटच्या बसमध्ये कसाबसा घुसत तो गावाकडे निघाला होता. ती बससुद्धा आज काही बिघाड झाल्यामुळे त्याला मिळाली होती. नाही तर रात्री ८ नंतर गावाकडे जाण्यासाठी एकही बस नसायची.

बायको आधी बाळंतपण म्हणून आणि मग बाळाच्या   दोन्ही आजीआजोबांचा हट्ट म्हणून हल्ली गावीच राहत होती. त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता. कारण सुरुवातीला  बाळाला आणल्यानंतर  काही दिवस दोघांची प्रचंड तारांबळ उडत होती. त्यात त्याच्या घरी येण्याची वेळ निश्चित नव्हती. मग शेवटी अजून काही महिने तरी बाळ गावीच राहील अस ठरलं होतं आणि त्याला सांगण्यात आलं होतं. 

गावी काय हाकेच्या अंतरावर सासर माहेर असल्याने बायकोही निवांत झाली होती. पण त्याची काळजी मात्र तिला असायची. ती होती तोपर्यंत त्याचं सगळं वेळच्या वेळी होत होतं पण नसताना सुद्धा अडणार नाही हे तिने बघितलं होतं. 

विकेंडला आला की कोरड्या फराळाचे डबे सोबत जात होते. आणि इतर वेळेसाठी तिने जवळच्या एका मावशींकडे डब्याची सोय केली होती. इनशॉर्ट स्वतःच्या बाळाला जरी आई आणि सासूच्या हातात सोपवलं असलं तरी सासूच्या बाळाची काळजीही ती घेत होती. 

गाडीत बसायला जागा मिळाली, तस त्याने सीटवर मागे डोकं टेकवून डोळे मिटून घेतले. थकल्यामुळे त्याचा डोळा लागला. जाग आली तेंव्हा गाडी सेकंड लास्ट स्टॉपवर होती. त्याचा शेवटचा स्टॉप होता. गाडीत आता बोटावर मोजण्याएव्हढी माणसं उरली होती. 

इकडे तिकडे नजर फिरवताना त्याचे डोळे एका ठिकाणी स्थिर झाले. ड्रायव्हरच्या मागची सीट होती. तिथे कुणीतरी बसलं होतं. कोण आहे हे पाठ असल्याने लक्षात येत नव्हतं. ती स्त्री आहे हे त्याला तिचा पदर हलला तेव्हा लक्षात आलं. आता ती मागे वळणार तेवड्यात कुणीतरी मागून भराभर चालत उतरण्यासाठी पुढे गेला. आता त्या सीटवर कुणीच दिसत नव्हतं. 

आपल्याला भास झाला अस समजून त्याने खिडकीबाहेर नजर टाकली तर गाडी स्लो झाली तिथे कुणीतरी त्याच्याकडे बघून हात हलवत होतं. त्याला काही समजलं नाही. तो काही रिएक्शन देणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. 

फोनच्या रिंगटोन मुळे तोच काय सगळी बस भानावर आली. आणि चकव्या कडे  जाणारी बस गावाच्या दिशेने वळली. 

त्याने फोन उचलून बायकोला जवळच आलो आहे असं सांगितलं आणि तो आजूबाजूला बघू लागला. 

ड्रायव्हर जवळ जाऊन कंडक्टर काहीतरी विचारत होता. आणि ते दोघे पुन्हा पुन्हा वळून त्याच्याकडे बघत होते. त्याला जरा विचित्रच भासलं सगळं पण  तेवढ्यात कंडक्टर त्याच्या दिशेने आला आणि त्याने त्याला विचारलं , "ओ भाऊ जरा तुमचा नंबर देता का? किंवा मग ही रिंगटोन द्या " 

"कशासाठी?", त्याने विचारलं. 

" सांगतो उतरल्यावर पण इथं फोनच नेट नाही चालणार एखाद्या वेळी निदान रिंगटोन तरी वाजवता येईल. "कंडक्टर अजिजीने म्हणाला. 

त्याने रिंगटोन दिली. आणि नंबरसुद्धा. 

गावाच्या अगदी अलीकडे बस स्लो झाली आणि बसमधलं वातावरण अचानक बदललं. 
अचानकच खूप सारे हसण्याखिदळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. सोबतच बांगड्या, पैंजण ह्यांची किणकिण सुरू झाली. दिसत कुणीच नव्हतं पण आवाज ऐकू येत होते. 

ड्रायव्हर कसाबसा बस चालवण्याकडे लक्ष देत होता. 

तर कंडक्टर बसच्या दाराकडे डोळे मोठे करून बघत होता. 

उरलेले प्रवासीही काही तरी विचित्रच वागत होते जस काही ते गाडीत नाही बारमध्ये बसले आहेत. 

हा सगळा अनुभव त्याच्यासाठी नवीन होता. त्याने कंडक्टर कडे बघितलं आणि तो ज्या दिशेने बघत होता तिकडे बघितलं एक स्त्री चालत्या बसमध्ये चढत होती. अगदी निवांतपणे. जणूकाही ती हवेवर तरंगत आहे. 

अंगात आहे नाही तेवढं त्राण गोळा करून कंडक्टर पुढे झुकत त्याला म्हणाला ," चुकुन सुद्धा तिच्या डोळ्यात बघू नका. जमलं तर ती रिंगटोन लावा. ", कारण गडबडीत त्याचा फोन सीटखाली पडला होता आणि तो फोन उचलायला वाकला तसा कुणीतरी त्याचा हात धरला होता. 

पण कंडक्टर च्या सांगण्याआधीच त्याने तिच्या डोळ्यात बघितलं होतं. आणि तो  सीटवरून उठून तिच्यामागे चालू लागला. 

इकडे त्याच्याशी बोलल्यापासून त्याच्या बायकोचा जीव वरखाली होत होता. तिने पुन्हा त्याचा नंबर डायल केला पण तो लागला नाही. शेवटी तिला काय वाटलं माहीत नाही पण देवासमोर जाऊन बसत तिने फोन लावायला सुरुवात केली. 

जवळपास दहा मिनिटांनी फोन लागला आणि .....

फोनची रिंगटोन वाजू लागली. त्याला एक जोरदार झटका बसला आणि तो भानावर आला. 

तो चालत्या गाडीतून बाहेर पाय टाकणार होता. 

ड्रायव्हर आणि कंडक्टर च्या तोंडातून भितिने शब्द फुटत नव्हते. 

त्याची रिंगटोन बंद झाल्याने त्याच्या पुढे असलेली ती रागाने मागे वळत होती. 

पण अचानकच पुन्हा एकदा वातावरण बदलले होते. तेवढ्यात सावरत कंडक्टर ने खाली पडलेला फोन उचलून ती रिंगटोन वाजवायला सुरूवात केली. 

ड्रायव्हरने जीव खाऊन बस गावाच्या हद्दीत घुसवली. 

सगळ्यानी मागे वळून बघितलं तर अर्धवट जळलेल्या कलामंदिराच्या आवारात  विचित्र अवतारात असलेल्या त्या सगळ्या जणी त्यांच्याकडे जळजळीत नजरेने दातओठ खात बघत होत्या. 

आज बऱ्याच दिवसांनी १३ जण त्यांच्या हाती येता येता निसटले होते. 

पहिल्यांदा गावाच्या वेशीबाहेर असलेल्या कलामंदिराच्या गारुडातुन कुणीतरी निसटले होते. 

कंडक्टरचा फोन अजूनही तीच रिंगटोन वाजवत होता. 

त्या रिंगटोन च्या आवाजात घुंगराचा आवाज हळूहळू कमी होत गायब झाला होता.

काय होती रिंगटोन? तुम्हीच सांगा बघू तुम्हाला लक्षात येतेय का? 

नाहीतर बघा हं आज नेमकं विकेंड आहे तिच्या नजरेच्या गारुडात अडकला तर कुणीही वाचवायला येणार नाही. 

#गौरीहर्षल 

शुक्रवार, ३ मार्च, २०२३

नकार देण्याची कला भाग 2

#नकार_देण्याची_कला_भाग 2
मागच्या लेखात आपण बघितलं की कोणाला नकार देताना 
 -  आपल्या मनात गिल्ट फिलिंग येते
 - सोबतच आपल्याला बरेच प्रश्न पडलेले असतात
 - आपण स्वतःला बऱ्याचदा या सगळ्या प्रोसेस मध्ये कुठेतरी मागे टाकत असतो 
- स्वतःला प्रायोरिटी वरती ठेवणं आपल्याला जमत नाही.  
आणि त्याच सोबत काही टर्म्स आणि कंडिशन सुद्धा आपण बघितल्या. 
 तसंच मी एक छोटासा टास्क सुद्धा दिला आहे जो तुम्हाला सात दिवसांमध्ये करायचा आहे.  तुम्ही कधीही करू शकता त्याचं काही आपल्याला बंधन नाहीये.

 तर आता पुढे आपण बघूया की आपण इतरांची मने राखताना स्वतःला कशा पद्धतीने त्रास करून घेत असतो? 
 बऱ्याच जणांना सवय असते ना की स्वतःच्या महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाची काम कुठेतरी बाजूला ठेवायची आणि समोरून कोणी काही काम सांगितलं की आधी त्या व्यक्तीचं काम करून द्यायचं.
 मग भलेही आपल्याला आपल्या कामांमध्ये आपल्या गोष्टींमध्ये उशीर झाला नुकसान झालं तरी चालेल आणि हे कुठेतरी एका भीतीपोटी सुद्धा होतं मनात एक भीती असते की लोक काय म्हणतील मी नकार दिला तर? त्यांना वाईट वाटेल आणि मग ते दुखावले जातील, मग आमचं नातं बिघडेल. 

 असं करताना मग आपण कुठेतरी स्वतःला प्रचंड ताण देत राहतो.  आणि  इतरांची मन राखायच्या प्रोसेस मध्ये कुठेतरी ही गोष्ट लोकांना ही कळून चुकते की ही व्यक्ती स्वतःला त्रास करून घेईल पण आपलं काम अडकू देणार नाही. 
 कदाचित अशा संदर्भातली स्वतःबद्दलची काही मतही तुम्ही ऐकली असतील आणि तुम्हाला त्याबद्दल प्रचंड अभिमानही वाटला असेल. पण त्या अभिमानाची किंमतही तुम्ही तेवढी चुकवलेली असणार बरोबर ना???

हा सगळा अट्टाहास आपण कशासाठी करतो? तर लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं,चारचौघांमध्ये आपलं कौतुक व्हावं आणि कुठेतरी आपली जी इमेज आहे ती खूप चांगली व्यक्ती अशी व्हावी पण खरंच असं होतं का? तर याचे उत्तर "नाही" असच आहे. 
कारण एक युनिव्हर्सल नियम आहे तुम्ही कोणासाठी कितीही करा कुठे ना कुठेतरी त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी तक्रार असतेच. 
मग अचानक कधीतरी आपल्याला जाणवत की सगळेजण आपल्याला गृहीत धरत आहेत.  जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते आपली मनस्थिती, परिस्थिती यांचा जरा सुद्धा विचार न करता स्वतःच्या गरजा आपल्यासमोर मांडतात आणि आपल्याकडून मदतीची अपेक्षा सुद्धा ठेवतात. कोणालाही नकार अपेक्षित नसतो .कित्येकदा तर तुझ्याशिवाय दुसरं कोणीच माझी मदत करू शकणार नाही असं म्हणून ते काम करण्यासाठी गळ घातली जाते. मग इथे आपण सुद्धा आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन  समोरच्याच मन राखण्यासाठी ते काम करतो. परिणामी आपण पुन्हा एकदा त्याच सिच्युएशन मध्ये असतो. 
या सगळ्या प्रोसेस मध्ये आपलं नुकसान तर होतच असतं पण स्वतःची काम स्वतःच्या गोष्टी वेळेवर न करता आल्यामुळे कुठेतरी आपण स्वतःला दोष देऊ लागतो. कारण आपली परिस्थिती कळतंय पण वळत नाही अशी असते.

 कधी कधी काही नाती खूप जवळची असतात आणि मग त्यांच्यासाठी मी हे केलंच पाहिजे अन् मीच हे केलं पाहिजे अशी भावना आपल्या मनात असते. किंवा भावना म्हणण्यापेक्षा असा पगडा आपल्या मनावरती असतो.आणि त्याच्या ओझ्याखाली आपण सातत्याने त्या गोष्टी करत जातो. मग इथे कोणी म्हणेल की सरसकट सगळ्यांना नकार द्यायचा का? तर मुळात आपण इथे सगळ्यांना नकारच द्यायचा किंवा वाटेलाच लावायचं असं नाही म्हणत आहोत.

 इथे आपल्याला आपल्या गरजा ओळखणे, त्या योग्य शब्दात मांडणं, त्यांची प्राथमिकता स्वीकारणं ह्या गोष्टी शिकायच्या आहेत .

तुम्ही इतरांना मदत करू नका असा त्याचा अर्थ होत नाही इतरांना मदत करण्याच्या आधी तुम्ही स्वतःच्या गोष्टी पूर्ण करा, स्वतःच्या गोष्टींना अग्रक्रम द्या जेणेकरून तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटणार नाही.  आपल्याला कुठल्या क्षणी कशाची गरज आहे हे ओळखून ते योग्य शब्दात ठामपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं असतं. 

 उदाहरण द्यायचं झालं तर, आपली बाजू ठामपणे आत्मविश्वासाने मांडू न शकणाऱ्या व्यक्तीला बऱ्याचदा अचानक बोलल्यानंतर ही गोष्ट ऐकायला मिळते. 

एक छोटसं उदाहरण देते समजा मीना नावाची एक स्त्री आहे तिने तिच्या सासू-सासर्‍यांना किंवा आई-वडिलांना एका विशिष्ट कामासाठी नकार देताना सांगितलं की,"या वेळेस मला तुमची मदत करणे शक्य नाहीये तर तुम्ही मिताची मदत घ्या." 
 इथे मीनाला समोरून जे उत्तर मिळालं ते बऱ्याच जणांनी ऐकलं असेल,"मीता कशी काय आमची मदत करेल? तुला माहित आहे ना तिला काहीही सांगायला गेलं की ती प्रचंड चिडचिड करते, राग राग करते, भांडण करते. आमचं तिच्यासमोर काहीही चालत नाही. तू समजून घे ना. तू समजूतदार आहेस ना!!!"
आणि मग हे उत्तर ऐकल्या नंतर अर्थातच मीना मनाविरुद्ध ते काम करते. पण कुठेतरी तिच्या मनात आपण स्वतःसाठी उभे राहू शकलो नाही,ठामपणे स्वतःला होणारा त्रास मांडू शकलो नाही याबद्दल विचार चालू होतात. सोबतच बऱ्याचदा समोरची व्यक्ती तिच्या स्वभावातील आक्रमकता दाखवून सगळ्या गोष्टींमधून अंग काढून घेते हे लक्षात आल्यामुळे चिडचिड होऊ लागते. कारण इथे या उदाहरणात मीनाला माहीत असतं की तिने कितीही प्रामाणिकपणे ते काम केलं तरीही त्याच्यात चुका काढल्या जाणार आहेतच. 
त्यामुळे तिला ते काम केल्याच समाधानही मिळणार नसतं. त्याउलट समोरची व्यक्ती मात्र काहीही न करता आपल्या निवडीच आयुष्य जगत असते. 

"इथे आपण दोन गोष्टी बघत आहोत एक ठामपणे आत्मविश्वासाने स्वतःची बाजू मांडणे आणि दुसरी आक्रमकतेने स्वतःची बाजू समोरच्याच्या गळी उतरवणे."

दुसऱ्या बाबतीमध्ये अर्थातच वरवर जरी कितीही चांगल्या गोष्टी दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्या तशा नसतात.त्यामुळे आपल्याला नकार देणं शिकताना सगळ्यात आधी आपली बाजू मांडायला शिकायचं आहे. 

मग जर इथे कोणाला वाटत असेल की प्रत्येक वेळेला स्पष्टीकरण द्यायचं का? तर नाही जिथे ज्या ठिकाणी गरज आहे (हे तुम्ही स्वनिरीक्षणाने ओळखायचं) तिथे आणि फक्त तिथेच आपली बाजू मांडायची------ स्पष्टीकरण द्यायचं असं मी म्हणत नाही. 

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की जेव्हा आपण स्वतःसाठी बोलायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तींकडूनच सगळ्यात जास्त विरोध होतो. 
आपल्याकडून तर विरोध होतोच त्याबद्दल आपण आधीच्या लेखात बोललो आहोत. पण जेव्हा आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींकडून विरोध होतो. तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास व्हायला सुरुवात होते. 

कधीकधी आपण आपल्या जवळच्या व्यक्तींच्या वाट्याचा वाईटपणा स्वतःकडे घेतो. पण असं करताना आपण हे विसरतो की आपण जरी त्यांच्यावरच्या प्रेमापोटी त्या गोष्टी करत असलो तरीही इतर लोकांसाठी आपण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहोत. त्यामुळे आपली केली जाणारी कृती हे आपल्याशी जोडली जाणार आहे. आपण कुणासाठी केली आहे त्याच्याशी नाही.

उदाहरणार्थ , मीना आणि तिच्या नवऱ्याचं कुठेतरी जायचं ठरलेल आहे. कुठलं तरी फॅमिली फंक्शन आहे. आणि अचानक जाणं कॅन्सल होतं. समोरच्या व्यक्तीला हे कसं कळवायचं ही जबाबदारी नवरा मीनावरती टाकतो कारण त्याला माहीत असतं आपण समोरून जर नकार दिला तर अर्थातच समोरची व्यक्ती दुखावली जाणार आणि त्याचा परिणाम नात्यावरती होणार. मीनाला सुद्धा हे काम करण्याची इच्छा नसते पण दोघांपैकी कोणीतरी तर सांगणं गरजेचं आहे आणि जर नवरा त्या गोष्टीसाठी तयार होत नाहीये तर अर्थातच तिला ती गोष्ट करणे भाग आहे मग अशा वेळेला तिने काय करावे?
एक म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अजिबात खोटं बोलायला जाऊ नये. आपल्याला जरी समोरच्या व्यक्तीला पूर्ण परिस्थिती आहे तशी सांगता येत नसेल, तरीही सौम्य भाषेत ती गोष्ट सांगणं शक्य असतं. 
 उदाहरणार्थ मीना म्हणू शकते की येण्याची खूप इच्छा होती पण अचानक काही महत्त्वाचं काम आल्यामुळे आम्हाला येणं शक्य नाहीये. पण मी लवकरच प्रत्यक्ष येऊन भेटेन किंवा आपण त्यावर बोलू. 
इथे जेव्हा आपण खोटं बोलत नाही तेव्हा आपल्याला नंतरच्या गोष्टींचा विचार करण्याची गरज पडत नाही. 

वाचक मित्र-मैत्रिणींनो नकार मिळणं ही अशी गोष्ट आहे की जी आपल्याला स्वतःलाही लवकर पचवता येत नाही मग समोरच्याकडून सुद्धा तशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे न? 
 
नकार मिळाल्यानंतर सौम्य किंवा तीव्र प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. पण त्या प्रतिक्रियांचा आपल्यावरती किती परिणाम करून घ्यायचा हे आपल्या हातात आहे आणि असतं. 
जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या सगळ्या वागण्याची जबाबदारी घ्यायला सुरुवात करते. तेव्हा तिला काही गोष्टी स्वीकारायची सुद्धा तयारी ठेवावी लागते . आणि तसं जर जमत नसेल, ते करताना जर अडचणी येत असेल तर अशा ठिकाणी तज्ञांची मदत नक्की घ्यावी. 

तुम्हालाही जर मीनाच्या दोन्ही सिच्युएशनच्या संदर्भात स्वतःची काही मत मांडायची असतील तर नक्की मांडू शकता. 
आत्ता साठी इथेच थांबते लवकरच पुढचा भाग घेऊन येईन. 
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु!!!
क्रमशः 
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

गुरुवार, २ मार्च, २०२३

नकार देण्याची कला भाग 1

#नकार_देण्याची_कला_भाग1
"मला नाही म्हणता येत नाही हो मॅडम.", ती टेबलवर समोर ठेवलेल्या पेनशी खेळत म्हणाली. पेनशी खेळणं तिच्या मनात असलेली अस्वस्थता दाखवत होते. 
"म्हणजे मी खूपदा ठरवते की आता पुन्हा तीच गोष्ट करण्यासाठी होकार द्यायचा नाही. पण समोरच्या व्यक्तीने गळ घातली की माझ्याकडून नकळतच हो म्हटल जातं. आणि मग पहिले पाढे पंचावन्न. ", हे बोलता बोलता नकळतच तिच्या डोळ्यात पाणी आलं होत. कौन्सिलींग सेशनमध्ये आलेल्या व्यक्तीचं हळव होऊन रडणं हे अपेक्षितच असतं. 
ती , तुमच्या माझ्या सारखीच एक व्यक्ती, गृहिणीही असू शकते किंवा नोकरी-व्यवसाय करणारीही, स्त्रीही असू शकते किंवा पुरुषही. 

 मी नेहमी म्हणते की, आपण प्रत्येकाने आयुष्यात स्वतःला कधीतरी हो म्हणून बघावं. पण ते म्हणण्याआधी स्वतःच्या मनाची तयारी केलेली हवी. 
इतरांच्या नजरेत वाईट होऊ नये म्हणून आपण बऱ्याचदा स्वतःला नकार देत इतरांना होकार देत असतो. परिणामी आपलं बरच नुकसान होतं. 

तुमचं ही असंच होतं का? दर वेळेला तुम्ही ठरवता की आता पुढच्या वेळी स्पष्ट शब्दात नकार कळवायचा पण त्या वेळेला भिडस्तपणामुळे नकार कळवता येत नाही?
शिवाय मनात ही भीती सुद्धा असते की मी नाही म्हणालो तर समोरची व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल? इतर लोकांना काय सांगेल? आणि मग आपण मनाविरुद्ध होकार देऊन मोकळे होतो. 

एखाद्या गोष्टीला नकार कळवणं म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अपमान करणे असा त्याचा अर्थ होत नाही. तर तो नकार म्हणजे ती गोष्ट आपल्याला करता येणं शक्य आहे की नाही? ती गोष्ट करण्याव्यतिरिक्त आपल्यासमोर कोणत महत्त्वाचं काम आहे? हे योग्य भाषेत आणि योग्य शब्दात समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे जे आपल्याला जमायला हवं. 

 सातत्याने जर आपल्याकडून इतरांचं मन राखण्यासाठी स्वतःच्या मनाविरुद्ध होकार दिला जात असेल तर कालांतराने लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात. 
आणि मग कधीतरी अचानक आपल्याला आपण या सगळ्यांमध्ये अडकल्याची जाणीव होते. स्वतःच्या मनासारखं जगता येत नाही, कुठली गोष्ट करता येत नाही, कुठे जाता येत नाही कारण आपल्याला इतरांना नाही म्हणता येत नाही. 
 इतरांची मन राखताना आपण आपल्या मनाचं ऐकायचं बंद करून टाकतो का? 
 आणि जर खरंच आपल्याबरोबर असं होत असेल तर त्यावर वेळीच काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे. 
 जर एकीकडे आपण असं म्हणतो की आपल्याला निदान आपल्या जवळच्या लोकांसाठी तरी काहीतरी करायच आहे पण त्यामध्ये आपण स्वतःसाठी करायचं विसरून जातो तर आपल्यासाठी आपणच जवळचे नसतो का? 
अशावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण शिकणं गरजेचं असतं ती म्हणजे नकार देण्याची कला. 
येस.... समोरच्या व्यक्तीला न दुखवता, नात्यात दरी येऊ न देता आपला नकार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे शिकणं गरजेचं आहे. 
आणि सोबतच काही टर्म्स आणि कंडीशन लक्षात ठेवणेही आवश्यक आहे. 
टर्म्स आणि कंडीशन कसल्या तर...

***पहिली गोष्ट ही की नकार देण्यासाठी आपली मनाची तयारी झालेली हवी. कारण बऱ्याचदा आपण नकार देतो पण मग कुठेतरी मनात अपराधीपणाची भावना (गिल्ट फिलिंग) घर करू लागते. तर ते होऊ नये म्हणून प्रयत्न करावे लागतील. 

***दुसरी गोष्ट म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला कितीही जेन्युईनपणे आपली बाजू सांगितली तरीही ती व्यक्ती तिच्या मनस्थिती , दृष्टिकोन ह्यानुसारच प्रतिक्रिया देणार. प्रत्येक जण तुमचा नकार मनापासून स्विकारेलच अस नाही. पण मग नकार देऊन काय उपयोग? असंही तुम्हाला वाटेल. तर त्यासाठी तिसरा मुद्दा वाचा. 

***होकार किंवा नकार हा आपण इतरांना खुश किंवा दुःखी करण्यासाठी देत नाही आहोत तर होकार / नकार देण्यामागचं आपलं कारण हे स्वतःला प्राथमिकता देणं आहे. स्वतःच्या गरजांना,भावनांना ओळखणे हे आहे. आणि जेंव्हा आपण स्वतःला प्रायोरिटी म्हणून बघायला सुरुवात करतो तेंव्हा सगळ्यात जास्त विरोध स्वतःकडूनच होतो.
 तीच ही पहिली पायरी असते जिथे आपल्याला गरज पडल्यास योग्य तज्ञ व्यक्तीशी बोलणही गरजेचं असतं. 
कारण नवीन सुरुवात करायची ठरवून चालत नसते तर त्या मार्गावर चालण्यासाठी शक्य ती मदत स्विकारण्याची तयारीही ठेवावी लागते. 

तर इथे एक छोटासा टास्क सांगते. पुढचा एक आठवडा म्हणजे सात दिवसात कमीत कमी दोन तरी गोष्टी अशा करण्याचा प्रयत्न करा ज्या करताना तुम्हाला मनापासून आनंद मिळतो. मग ते गल्लीत क्रिकेट खेळणे असो किंवा गोळा खाणे किंवा अजून काही तुम्ही ठरवा. स्वतःला नकार द्यायचा नाही ही अट आहे बर का!!!
बाकी सगळं दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतु !!!
नवीन काहीतरी ऑन द वे आहे ✌️✌️✌️
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल