बुधवार, २२ जुलै, २०२०

मला आवडलेलं पुस्तक भाग १

#मला_आवडलेलं_पुस्तक
जिवात्म जगाचे कायदे / laws of spiritual world 
लेखिका - खोरशीद भावनगरी

मागच्या वर्षी एका ग्रुपवर अशीच पुस्तकावर चर्चा सुरू होती तिथे ह्या पुस्तकाचा विषय निघाला. कुणाला आवडले होते कुणाला नाही. 

चर्चा वाचून शेवटी पुस्तक मागवलं. हे पुस्तक मात्र नेहमीप्रमाणे एका बैठकीत वाचून संपवलं नाही. निवांत वेळ काढत एकेक प्रकरण वाचलं. आणि मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. 

पुस्तक लिहिले आहे खोरशीद भावनगरी ह्यांनी. पुस्तकाच्या नावावरून विषयाचा अंदाज येतोच पण तरीही सांगते. हे पुस्तक हा त्यांच्या दोन दिवंगत मुलांच्या आत्म्यांशी असलेला संवाद आहे. असा संवाद जो व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील बऱ्याच सवयी, पद्धती ह्यांच्यावर पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडतो. 

पुस्तक कुठलीही अंधश्रद्धा पसरवत नाही कारण तसं काहीच ह्या पुस्तकात नाही. ह्या आत्म्यांशी संवाद हा विशिष्ट पद्धतीने साधला गेला आहे. त्या पद्धतीही त्याचं उत्तम ज्ञान घेऊनच वापरल्या आहेत. (Planchet वगैरे फालतू प्रकार नाहीत? )

मला हे पुस्तक आवडण्याचं कारण म्हणजे एक तर वयाच्या मानाने बऱ्यापैकी लवकर ते माझ्या हातात पडले आहे. आणि दुसरे म्हणजे जेव्हा आयुष्यात एखादी वाईट किंवा चुकीची गोष्ट घडते तेव्हा आपण आपलं नशीब, देव किंवा इतरांना बोल लावत बसतो. पण हा विचार कधीच करत नाही की अरे मी कधी न कधी कळत नकळत त्या व्यक्तीचं, प्राण्याचं काही नुकसान केलं आहे का? 

कारण हे पुस्तक पूर्वजन्मापासून ते मृत्यूनंतर घडणाऱ्या अनेक गोष्टी साध्या सोप्या भाषेत सांगते. अर्थात  ज्या मला पटल्या आहेत. 


छोटी छोटी उदाहरणे देत सत्यकथेवर आधारित हे पुस्तक वाचताना आयुष्याची एक नवीन बाजू सांगते हे मात्र नक्की. 

(वाचायचे असल्यास पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध आहे.)
#गौरीहर्षल
#पुस्तकवाचन


मंगळवार, २१ जुलै, २०२०

रंजीश ही सही🎶🎶 भाग १

रंजीश ही सही 🎶🎶

भाग १ 

आपल्या छोटयाशा घरात असणाऱ्या मोठ्या खिडकीत टांगलेल्या झोपाळ्यावर झोके ती बाहेर कोसळणारा पाऊस बघत होती. 

मागे बॅकग्राऊंडला रुना लैलाच्या आवाजात तिची आवडती गझल बरसत होती अगदी रिपीट मोडवर. 
(Lyrics By: अहमद फ़राज़)

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ

अब तक दिल-ए-खुशफ़हम को हैं तुझ से उम्मीदें
ये आखिरी शम्में भी बुझाने के लिये आ
रंजिश ही सही...

इक उम्र से हूँ लज्ज़त-ए-गिरया से भी महरूम
ऐ राहत-ए-जां मुझको रुलाने के लिये आ
रंजिश ही सही...

कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिये आ
रंजिश ही सही...

माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ
रंजिश ही सही...

जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ
रंजिश ही सही...

पहले से मरासिम ना सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रहे दुनिया ही निभाने के लिये आ
रंजिश ही सही...

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफा है तो ज़माने के लिये आ
रंजिश ही सही...

एका क्षणी तिला मनावरचा भार इतका नकोसा झाला की मेंदूचं न ऐकता डोळे पाझरू लागले. 

का इतक्या हतबल झालो आपण? ती स्वतःलाच विचारू लागली. का आपण एकदाही प्रयत्न केला नाही स्वतःच्या समाधानासाठी? जी मुलगी स्वतःच्या सुखासाठी तडजोड करत नव्हती ती त्या व्यक्तीच्या एका शब्दाखातर सगळं सोडून कशी काय निघून आली? 

दुसरीकडे तिच्याच मनाने त्या प्रश्नांची उत्तरे दिली, मग काय करू शकणार होतीस तू? त्या क्षणी तुझ्या सुखापेक्षा इतरांची आयुष्य जास्त महत्वाची होती. 
    आणि आफ्टर ऑल द ग्रेट पौरवी देशमुख ह्यांना त्याग करून मोठ्ठं व्हायचं होतं न? शेवटचं वाक्य ऐकताच तिच्या अंगावर काटा आला. 

खरंच अस होतं सगळ्यांच्या नजरेत मोठेपणा हवा म्हणून मी अशी वागले की मला त्या सगळ्यांचं सुख महत्वाचं वाटलं? 
मोठेपणाच हवा होता तर घरच्यांना हव्या असलेल्या मुलाशी लग्न करूनही मिळवता आला असता की.
 पण मला ते नव्हतं करायचं मला स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि त्यालाही दाखवून द्यायचं होतं की पौरवी देशमुख काय चीज आहे. 
जिने एकदा नातं जोडलं की मग ती त्या व्यक्तीसाठी काहीही करू शकते. आणि जर नातं तोडलं तर त्याचं लोकांना कायमचं विसरून जगुही शकते. 

काय म्हणाला होता तो मला? तू जळतेस माझ्यावर! अरे हट मी जर तुझ्यावर जळले असते न तर तुझ्या हातात माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीचा हात कधीच दिला नसता. 

आरुषी , तिचं नाव ओठांवर आणि चेहरा क्षणार्धात पौरवीच्या नजरेसमोर येऊन गेला. लग्नाच्या वेळी आरु च्या चेहऱ्यावर असणारा तो आनंद बघण्यासाठी तर पौरवीने आयुष्यभरासाठी वनवास स्विकारला होता. 

मुंबईत असणारे सरळसोट पण जीव की प्राण आयुष्य सोडून  ती  ह्या मनालीजवळ असणाऱ्या गावात येऊन राहिली होती. सगळ्या सुखसोयी सोडून स्वतःच्या जीवावर मागच्या दोन वर्षात तिने बरीच प्रगती केली होती. 

आज तिच्याकडे छोटंसं घर, गाडी तर होतीच पण अहोरात्र मेहनत करून तिने तिच्या बुटीकच्या दोन शाखा तिने मनालीत उभ्या केल्या होत्या. पण तिला शांत वातावरण खूप आवडतं असल्याने तिने घर घेताना ते गाव निवडलं होतं. तिथून मनालीला  जाण्यास फारसा वेळ लागत नव्हता त्यामुळे तिला ते सोयीचं होतं. 

आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेलच की ही नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळी कथा आहे. 
तर ही गोष्ट आहे एका अशा मुलीची जिचा प्रवास सुरू झाला मुंबई मध्ये आणि सध्या तो येऊन थांबला आहे हिमाचल प्रदेशात असणाऱ्या मनालीत. 
पौरवी देशमुख , एका नाकासमोर चालणाऱ्या मराठी कुटुंबात जन्माला आलेली ज्येष्ठ कन्या. अभ्यासात प्रचंड हुशार असायलाच हवी न कारण मध्यमवर्गीय लोकांना त्याशिवाय पर्यायच नसतो. पण तरीही तिने फॅशन डिझायनिंगचं क्षेत्र निवडलं आहे. 

त्या क्षेत्रात ती थोडीफार धडपडत उभी रहातच होती पण तेवढ्यात तिच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की तिला सगळं काही सोडून द्यावे लागले. 

आता अस काय घडलं होत ते कळेलच हळूहळू तोपर्यंत पहिला भाग कसा वाटला नक्की कळवा. 
क्रमशः
#गौरीहर्षल